Tuesday, May 4, 2010

गावाकडच्या गोष्टी

(माझ्या आईचे माहेरचे कुटुंब मोठे , तशी जुन्या काळातील सगळीच कुटुंबे मोठीच असत, एकत्र राहत असल्याने त्यांच्यात संबंध असत, भांडणे, भाऊबंधक्याही असत.तसेच माया, प्रेमही असे. माझ्या आईकडून तिच्या घराण्यातील सगळ्या काका-आत्यांच्या, मामा मावशांच्या कथा मी वारंवार ऎकलेल्या आहेत.
सध्या आई आजारी असते, कंपवाताने ती घराबाहेरही पडू शकत नाही.रेडीओखेरीज दुसरी करमणुक तिला नसते, तिच्याशी बोलताना आजार सोडून बोलणे कठीण असते, मग परवा मी पुन्हा तिला तिच्या बालपणात नेऊन त्या आठवणींमध्ये तिला रमवण्याचा प्रयत्न केला त्यातुन तिचा वेळ चांगला गेलाच पण मला देखील काही गोष्टी नव्यानेच समजल्या.तिने सांगितलेल्या काही घटना या तिलाही केवळ ऎकुनच माहित आहेत, आता तिच्या घराण्यातली सगळ्यात मोठी अशी तिच शिल्लक आहे, बाकिची मंडळी तिच्याहून लहानच असल्याने या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहतील.गोदुची कथा त्या पैकीच एक. या गोष्टी ऎकताना मला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे तिला तर नाहीच माहित पण ती कुणालाच माहित असणार नाहीत. तिने सांगितलेल्या गोष्टीमंधले कच्चे दुवे कल्पनेने जोडण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा कथानकांवर खर तर चांगल्या मालिकाही बनू शकतील, पण सध्या तरी त्या ब्लॉगवाचकांपर्यंत पोचाव्यात या साठी हा लेखन प्रपंच. )


जेवणीखाणी उरकेपर्यंत दोन वाजून गेले.मागचे आवरुन बायका जेवायला बसल्या त्यांचे आवरायला अजून अर्धा तास गेला.शेणगोळा उरकून माजघरात जरा आडवे व्हावे असे म्हणेपर्यंत तीनाचे ठोके पडले.लहान मुले बाहेर कालवा करत होती, त्यांना रागावून घरात आणले.आता मला निघायला हवं लक्ष्मी आईला म्हणाली.
"अगं जाशील काय घाई आहे एवढी?"
"नाही , तसं नाही पण उशीर नकॊ व्हायला"
"पण मी म्हणते आजच निघायचं काही नडलयं का? राहिली असतीस अजुन चार दिवस,कित्ती दिवसांनी आलीस, दोन वर्ष होवुन गेली असेतील ना? नानाच्या लग्नालाही आली नाहीस"
आत्ताच कशी आले माझं मला माहित, लक्ष्मी मनाशीच म्हणाली.मागच्या खेपेला राहिले आणि परत निघताना आबाच्या पाठीवर छोटा फोड झालेला होता, तो पाहिला होता, पण चावलं असेल काही डास, पिसू म्हणून लक्ष दिलं नाही.सासरी गेले आणि बघता बघता काट्याचा नायटा व्हावा तसा तो फोड वाढला.तांब्यांचं तामल पालथं घालावं अस ते गळू झालं , रात्र रात्र रडून मुलानं आकांत मांडला, तापानं अंग चटचटत होतं वेदनेने पोरगं कळवळत होतं. रामशास्त्री वैद्यांचं ऒषध आणलं पण गुण येत नव्हता.सासुबाईंच्या तोंडाचा पट्टा चालू होता, " माहेरी गेली कि दर खेपला असच होतं, पोरांकडे दुर्लक्ष करत असेल, त्या लोकांना तरी कुठे जावयाची पोराची कदर? आता ह्या पोराला कसलं दुखणं झालं म्हणायचं ! आंबाबाई तुच बघ गं! "
लक्ष्मीला काही सुचेना, मुलाच्या काळजीने जीव कळवळलेला , त्यात सासुबाईंच्या बोलांची भर.भर दुपारच्या उन्हात लक्ष्मीनं रामशास्त्रींचे घर गाठलं.
"शास्त्रीबुवा, काहीही करा, पण माझ्या मुलाला बरं करा" बोलताना तिचा स्वर रडवेला झाला होता.
"तुमच्या मुलाला काळ्पुळी झाली झाली आहे, एक प्रकारचे गळूच म्हणाना, पण त्याचे तोंड आतल्या बाजूस आहे, माझ्या जवळ एक जालीम उपाय आहे, करुन घेणार का?"
" काय वाट्टॆल ते करुन घेईन"
" मग मी आत्ताच येतो" त्यांनी बरोबर एक डबा घेतला.घरी आल्यावर त्या डब्यातुन त्यांनी लहान लहान असे सहा किडे बाहेर काढले.
"काय आहे ते?"
"या जळवा आहेत, त्या दुषित रक्त पिऊन टाकतील. " असे म्हणत त्यांनी गळवावर जळवांचा वेढा दिला. मी येईन परत असे सांगून शास्त्रीबुवा गेले. पाच दहा मिनिटांतच आबा शांत झाला. दोन -तीन तास झाले तशा त्या जळवा लठ्ठ फुगून गेल्या आणि गळू बसू लागले.
शास्त्रीबुवा परत आले.त्यांनी जळवा काढून घेतल्या त्या गळवावर कसलीशी माती लावली.चार दिवसांनी बाळ शांत झोपला,त्याचा तापही कमी झाला.
दोन दिवसांच्या उपायानी मुलगा बरा झाला, पुन्हा हसू खेळू लागला.
पण तुझ्या माहेरी मुलांची अबाळ होते असे पालुपद लक्ष्मीला सतत ऎकावे लागले.
नानाच्या लग्नाच्या वेळीही अशाच क्षुल्लक कारणाने तिला पाठवले नाही.सासर इतकी माहेरी सुब्बत्ता नव्हती. म्हणूनही तिकडे पाठवायला कुरकूर असायची.
यंदा बरीच वादावादी करुन तिने माहेरी जायची परवानगी मिळवली.वहिनीच्या डोहाळजेवणाचे निमित्त काढून आठ दिवस राहून येते असे सांगून ती आली होती. आठाचे पंधरा दिवस झालेच होते. उद्या आवस आणि सूर्यग्रहण. आज निघायलाच हवे. हरतालिका, गौरी गणपतीची तयारी लक्ष्मीपुढे घरची कामे दिसू लागली होती. रात्री आठ पर्यंत पोहचू.तिने आईला बजावले ,"आता नकॊ बाई आग्रह करुस.तिकडे गौरी गणपतीची तयारी राहिलीयं, परत इकडे यायला हवय ना मी? मग आज निघूदे"
" पण रात्री अपरात्री जाल, मुल, लहान धाकटी आहेत, जावई-बापू असते तर प्रश्ण नव्हता ,नाना परवाच मुंबईला गेला तात्या आणि अप्पा शिकायला पुण्याला तुला सोडायला यायला हि कुणी नाही गं"
"काही होत नाही, रस्ता नेहमीचा आहे, गणू घरचा गाडीवान आहे, मला कॊण खातय? वाटेत कुठे थांबणारही नाही चार तासात भोरला पोहचू."
मुलांना गाडीत बसवून लक्ष्मी निघाली.आईने वाटेत खायला ओल्या शेंगा उकडुन दिल्या होत्या, बेसनाचे लाडू,गूळपापडीचे लाडू,आल्याच्या वड्या आणि बरच काही.
सरत्या श्रावणाचे दिवस होते, हवेत गारवा होता,पाऊस उघडलेला होता. शेते हिरवीगार झाली होती. गाडीवाट ओली असल्याने धुरळाही उडत नव्हता.मुले गाडीत खुशीत होती.धाकटी अंबु तान्ही होती.तिला मांडीवर घेतले होते.बाकीची तिघं अवती भवती होती.बघता बघता शिवापूर आलं.ओढा ओलांडला की मोठा रस्ता लागेल, मग कापूरहोळचा फाटा. अगदीच वेळ झाला तर भाटघरला करु मुक्काम, लक्ष्मी मनाशी म्हणाली. ओढ्याला पाणी अंमळ जास्ती होते.
पाण्यात थोडं पुढं गेल्यावरच बैल बुजले.जागच्या जागी चुळबूळू लागले.गणूही गडबडला.म्हणाला,"वैनीसाबं, पान्याला लई ऒढं हाय, आपन माघारी जाउया का?, उद्याच्याला पहाटंच निगूया की, बैलं बी जाइना म्हणत्यात"
" गणू काही होत नाही, किती वर्षं गाडी हाकतोस? एवढ्या पाण्यानं काय झालय, उतरवलीच्या नाल्यात कमरे एवढ्या पाण्यातन गेलो आठवतय ना? आजच काय तुला धाड भरली, चल लवकर रात्र पडायच्या आत पोचायला हवं"
गणू बापडा हुकुमाचा ताबेदार, त्याने बैलांच्या पाठीवर कासरा ओढला आणि गाडी पुढं घातली.
पण वरच्या घळीतून जोरात पाण्याचा लोट आला अचानक, बघता बघता पाणी चाकांच्या वर गेलं, बैलगाडीत पाणी शिरु लागल, गाडी वेडीवाकडी झाली.लक्ष्मीच्या तोंडच पाणी पळालं. आधी हसून खेळणारी मुल अचानक पाणी बघून कावरी-बावरी झाली.अबा आणि अण्णा पाण्यातही खेळू लागले.
गणू बैलांना हाकत होता पण पाणी वाढत होत, गाडी बुडत होती, बैल दमले होते.
एवढ्यात समोरुन एक उंचापुरा काळा सावळा माणूस आला.बघता बघता तो पाण्यात शिरला.बैलांच जू त्याने बळकट हातान धरल. आपल्या हातात दोन मुलांना घेतलं आणि बैलांना जवळजवळ ऒढतच पलिकडे आणून ठेवलं, रडणाऱ्या लक्ष्मीला तो म्हणाला,"बहनजी डरॊ मत , कुछ नही होनेवाला"
पलीकडच्या काठावर येईपर्यंत पोरांची चिरगुटं भिजून चिंब झाली होती.बैलगाडीतली पोती , बसकरं भिजली होती, थंडीने आणि भितीनं सगळेच गारठले होते.
त्या माणसानं काटक्याकुटक्या आणल्या आणि पेटवून दिल्या तो गणूला म्हणाला, " इधर रुकना थोडी देर, बच्चोंके कपडे सुखादो बाद में चले जाना"
लक्ष्मीला वाटले प्रत्यक्ष देवदूतच आला माझ्या मदतीला, त्याला थोडा खाऊ द्यावा म्हणून तिने बोचकी सोडली , कडोसरीचा रुपया काढला, गणूला म्हणाली अरे त्याला थांबाव.भाषेचा प्रश्ण होता पण गणुच्या हाती त्याला सगळ द्यावं असा विचार करुन तिने चार-सहा लाडू एका कोरड्या फडक्यात बांधले, आजुबाजूला बघितले तो काय तो माणुस गायब! तिने गणूला हाक मारली, " अरे गणू तो माणूस गेला कुठे असा कसा रे तू , जरा त्याला थांबवायच नाही का?
गणूने धावत जावुन बघीतले पण छे ! त्या माणसाचा ठाव ठिकाणाच लागला नाही, मघारी येताना शेतात काम करणाऱ्या दोघा तिघांना गणूने विचारले
" इकडून एक उंच काळा माणूस गेलेला बघितला का? डोइला हिरवा रुमाल व्हता आणि दुसरीच भाषा बोलत होता"
लोक म्हणाले , "न्हाइ बा, न्हाई गेलं कुनी इकडुन पन तुम्ही सांगता त्यावरुन त्यो पिरच असावा, इथल्या मशीदितला आजवर ऎकलय बरचं. दिसतो त्यो, कुणाकुनाला, हां पर त्रास न्हाइ द्येत मदतच करतो म्हनं"
गणू हेच सांगत आला. लक्ष्मीनं शेकोटीवर मुलांचे कपडे शेकले होते. ती म्हणाली,"कुणी का असेना आज माझ्या मदतीला तो कृष्णा सारखा धावुन आला, माझा पाठीराखा"
भोरला येइतो रात्र बरीच झाली होती.मामलेदार साहेबांना बायका मुलं निघाल्याचा सांगावा मिळाला होता, अजून मंडळी कशी पोहोचली नाहीत म्हणून घरात सगळे काळजीत होते. शिवापूरच्या ऒढ्याला पाणी असेल तर ते उलटे माघारी गुंजवण्याला गेले असतील असे पण वाटुन गेले.
बैलांच्या घुंगरांचा आवाज आला.मुलं धावतच घरात आली.आजी माजघरात होती.अण्णा आजीला बिलगून म्हणाला,"आज्जी आम्ही केवढं पाणी बघितल माहितियं, माझ्या गळ्यापोत्तर पाणी आलं, भाऊ यडा रडायला लागला.आई पण रडली बैलगाडीत पाणी आल, कपडे भिजले"
झालं पोरट्यानं घात केला, चोंबडेपणान बोलायची काही जरुर होती का?
लक्ष्मीन काही बोलायचा अवकाश , मामलेदार साहेबांनी खुंटीवरचा पट्टा काढला आणि गरजले," गणू आधी इकडे ये"
" काय करताय तुम्ही?" लक्ष्मीने पुढे होवुन विचारलं
" दिसत नाही? पट्ट्यानं झॊडून काढतो याला,लेकराबाळांना घेउन आधी उशीरा निघाला आणि पाण्यात गाडी घातली कशी? साधी अक्कल नाही?"
गणू बिचारा थरथर कापत पुढे आला.
लक्ष्मी म्हणाली," थांबा, त्याची काही चूक नाही, मारायचच असेल तर मला मारा, तो म्हणत होता, परत फिरू, मीच हट्टानं गाडी पुढे घालायला लावली"
मामलेदार साहेबांनी हाततला पट्टा संतापाने खाली टाकला. माजघरातून त्यांच्या आईचा तोंडाचा पट्टा चालू झाला होता .लक्ष्मीच्या हट्टाचे कारण त्यांना समजले.

लगेचच्या खेपेला पुन्हा ती गुंजवण्याला गेली तेंव्हा आठवणीने तिने शिवापूरच्या मशिदीत चादर दिली . पुढे कधीही माहेरी जाताना शिवापूर आले कि लक्ष्मीला हा प्रसंग आठवायचाच आणि मशिदीपाशी तिचे हात नकळत जोडले जायचे.


©

5 comments:

Maithili said...

Khoop sunder lihilay.... :)

हेरंब said...

अप्रतिम.

Shubhangee said...

Thanks Maithili and Heramb

Ramesh Rao said...

Good Narration

Naniwadekar said...

शुभांगीबाई : गोष्टी चांगल्या आहेत पण ... असा कोणी पीर येऊन मदत करतो आणि मग अद्‌ऋष्य होतो यावर तुमचा विश्वास आहे? दिवसाचे दहा-बारा तास अंधाराचं, पूर्ण वेळ ज़ुनाटपणाचं साम्राज्य असलेल्या काळातल्या भाबड्या लोकांच्या बर्‍याच खुळचट समज़ुती असत.

कथांना क्रमांक आणि शीर्षके देण्याचा तुम्ही कृपया विचार करा.