Wednesday, May 19, 2010

गावाकडच्या गोष्टी... क्रमश:

(माझ्या आईचे माहेरचे कुटुंब मोठे , तशी जुन्या काळातील सगळीच कुटुंबे मोठीच असत, एकत्र राहत असल्याने त्यांच्यात संबंध असत, भांडणे, भाऊबंधक्याही असत.तसेच माया, प्रेमही असे. माझ्या आईकडून तिच्या घराण्यातील सगळ्या काका-आत्यांच्या, मामा मावशांच्या कथा मी वारंवार ऎकलेल्या आहेत.
सध्या आई आजारी असते, कंपवाताने ती घराबाहेरही पडू शकत नाही.रेडीओखेरीज दुसरी करमणुक तिला नसते, तिच्याशी बोलताना आजार सोडून बोलणे कठीण असते, मग परवा मी पुन्हा तिला तिच्या बालपणात नेऊन त्या आठवणींमध्ये तिला रमवण्याचा प्रयत्न केला त्यातुन तिचा वेळ चांगला गेलाच पण मला देखील काही गोष्टी नव्यानेच समजल्या.तिने सांगितलेल्या काही घटना या तिलाही केवळ ऎकुनच माहित आहेत, आता तिच्या घराण्यातली सगळ्यात मोठी अशी तिच शिल्लक आहे, बाकिची मंडळी तिच्याहून लहानच असल्याने या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहतील. गोदुची कथा त्या पैकीच एक. या गोष्टी ऎकताना मला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे तिला तर नाहीच माहित पण ती कुणालाच माहित असणार नाहीत. तिने सांगितलेल्या गोष्टीमंधले कच्चे दुवे कल्पनेने जोडण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा कथानकांवर खर तर चांगल्या मालिकाही बनू शकतील, पण सध्या तरी त्या ब्लॉगवाचकांपर्यंत पोचाव्यात या साठी हा लेखन प्रपंच.....)




तळ्य़ाच्या आत्याबाई अस त्यांना म्हणतं.कोकणातलं हे लहानस खेडं. पण गावचे खोत असल्यानं गावात दबदबा होता. लोकांची घरात उठबस.घरचे भात, नारळ भरपूर.पोफळीच्या बागा.खाऊन पिऊन सुखी कुटुंब.आत्याबाईंचे माहेर भोरचे.त्यांची मोठी अक्का दिसायला गोरी-ऊंच, नाजूक,तिचं लग्न चटकन जमलं,तिच्या यजमानांची सरकारी नोकरी.माई मात्र काळी सावळी,उंचीने बेताची तिचं बाशींगबळ जड.लग्न जमायला फार त्रास पडले.भो्रच्या अण्णा मामांनी तिच्याकरीता बरीच स्थळे बघितली पण योग नव्हता.अखेर शेवटी अलिबाग जवळ अक्षी नावाच्या अगदी लहान गावातील मुलाचे स्थळ समजले.सुदैवाने माणसे चांगली होती, परिस्थिती नव्हती तितकी चांगली, पण त्यांनी माईला पसंत केली आणि लग्न जमले.तळ्याची माई अक्षीला जाऊन पडली.तिथले वातावरणही कोकणचेच त्यामुळे माईला वातावरणाशी जुळवून घेणे कठीण गेले नाही. माईचे यजमान गोपाळाराव भिक्षुकी करीत.फारशी जमीन देखील नव्हती.पण माईला त्याचे दुःख नव्हते.कामाची तिला पहिल्यापासून सवयच नाही तर आवड होती.परसातल्या भाजीपाला आणि घरच्या भातामुळे खायप्यायची ददात नसे. तिने आंबे, फणस यांची देखभाल केली.उन्हाळ्यात त्यांच्या आंबापोळ्या, फणसपोळ्या करणे, कपडे शिवणे हे करुन तिने चार पैसे मिळवायलाही सुरुवात केली.पाठोपाठ दोन मुली झाल्याने घरात सगळेच नाराज झाले होते. मुलींच्या पाठीवर बरेच दिवस तिला मुल झाले नाही.मधल्या काळात मागे रहाणाऱ्या एका कुणब्याच्या बाईचे रात्री बोलावणे आले होते ती अपरात्री अडली होती. सुईणीला बोलावणे धाडले होते पण हि पहिलटकरीण घाबरली होती, माई लगोलग गेली, सुईण येई पर्यंत तिने चूल पेटवून पाणी तापवले इतरही तयारी केली.तान्हु सुईण पार वाकली होती तिला माईने सगळी मदत केली. या घटनेनंतर जवळपासच्या आडल्या बायकांना सोडवायला माई आपणहून जायला लागली.
मोठी सुमन मॅट्रीक झाली तिला आठवीनंतर आलीबागला ठेवावे लागले,पण माईला शिक्षणाचे महत्त्व असल्याने तिने मुलीला शिकवायचा निर्धार केला होता, मुलगी ही हुशार होती.पण आलीबागला पुढच्या शिक्षणाची सोय नसल्याने मुंबई नाहीतर पुण्याला पाठवायला हवे होते, हा खर्च मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर होता.

याच वेळी सुमनला नागपूर कडून एक स्थळ सांगून आले.घरची परिस्थिती उत्तम, मुलगा शिकलेला माणसं चांगली.माईच्या यजमानांनी भितभितच पत्रिका पाठवली.पत्रिका जुळतीय, मुलीला घेवुन पुढची बोलणी करायला या, असे पत्र आल्यावर माईला आनंद झाला तो शब्दात सांगता येण्याजोगा नव्हता, मात्र गोपाळाराव चिंतागती झाले. आपल्याला ही उडी झेपेल का? इतकी मोठी माणसं, आपल्या जवळ काय आहे?हुंड्य़ावरुन लग्न मोडायचं, की मुलीच्या सुखासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवायचं? काय करावं त्यांना सुचेना. माईला त्यांच्या मनःस्थितीची कल्पना आली.
ती म्हणाली,"मला वाटतं आपण एवढं हताश होवु नये, त्या मंडळींना आपल्या सुमनचा फोटो पाठवू बरोबर आपल्या परिस्थितीची कल्पनाही देवू. आम्ही आम्हाला झेपेल असं कार्य हौसेने करुन देवू म्हणावं, मात्र तुमच्या तोलामोलाचं करण आम्हाला जमणार नाही., त्यांना पटलं तर हो म्हणतील नाहीतर आपण सुमनसाठी दुसरे मुलगे बघू. पण त्यांच्याशी काहीच पत्रव्यवहार न करता गप्प बसणे बरोबर नाही"
माईचे बोलणे त्यांना पटले, सुमनचा फोटॊ आणि सविस्तर पत्र त्यांनी नागपूरला पाठवून दिले.पंधरा दिवसांत नागपूरहून उत्तर आले, आम्हांला मुलगी पसंत आहे.खर्चाची काळजी आपण अजिबात करु नये.आम्ही माणसांचे मोल मानतो.

गोपाळराव नागपूरला जावून घर, मुलगा बघून आले,त्यांनी आम्ही अक्षीला लग्न करुन देवू असे सांगितले, नागपूरकरांनी कुठल्याही मागण्या केल्या नाहीत.आम्ही पन्नास माणसे येवू भाड्याचा खर्च देखील त्यांनी मागितला नाही.सारे अक्षीगाव माईच्या मदतीला आले.माईने मोठ्या हौशीने तयारी सुरु केली.शेजारच्या पुरोहितांच्या वाड्यात मुलाकडच्यांना जानवसा दिला होता.विहिणीसाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.सिमांतपूजनाच्या जेवणाला उकडीचे मोदक केले होते.भोरहून माईच्या मामांनी वामनरावांना नेले होते, त्यांच्या स्वयंपाकावर व्याही मंडळी खूष होती.एकंदरीत कुठलेही रुसवेफुगवे भांडाभांडी न होता कार्य झकास पार पडले.माईच्या घरी पैशाची रेचचेल नव्हती, पण माणसांच्या आगत्याने, प्रेमाने सासरचे लोक भारावून गेले अर्थात त्यांनाही याच गोष्टीचे महत्त्व होते.त्यांच्या घरच्या मोठ्या कारभाराला अशी दहा माणसात वावरणारी मुलगीच हवी होती.

सुमन सासरी गेली.तिच्या कामसू स्वभावामुळे ती सासरी लाडकी बनली.सासरचे रितीरिवाज तिने चटकन आत्मसात केले.सासरच्या लोकांना आपलेसे केले ते आपल्या लाघवी स्वभावाने आणि कामाच्या झपाट्याने.

सुमन सासरी गेली, आणि अचानक माईची कुस पुन्हा उजवली.तिलाही प्रथम खरे वाटले नाही, थोडे संकोचल्यासारखेही झाले. पंधरा वर्षांनी पुन्हा घरात पाळणा हलला, या खेपेला तिला मुलगा झाला.बरेच वर्षांनी घरात बाळ आले, मुलगा झाल्याचा सगळ्यांनाच आनंद झाला."माई, तुम्ही लई बायकांची बाळंतपण केलीत म्हनुन द्येवानं तुम्हान्सी प्रसाद दिला" असं अजूबाजुच्या बायका म्हणू लागल्या. सुमन देखील सासरी सुखात होती. तिची तशी पत्रे येत, तिला पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजात देखील घातले होते.एकंदरीत दिवस चांगले चालले होते. माईच्या घरात सुबत्ता नसली तरी समाधान भरपूर होते.तिच्या घरातील सगळ्यांनाच माणसांचे आगत्य होते.आहे त्यात आनंदाने राहण्याची वृत्ती होती आणि आपले आंथरुण पाहून पाय पसरायचा स्वभाव असल्याने घरात वखवख नव्हती.

पण सगळे दिवस सारखे नसतात.संध्याकाळची पूजा सांगून गोपाळराव घरी येत असताना त्यांना साप चावल्याचे निमित्त झाले आणि वेळीच उपचार न मिळाल्याने चार पाच तासांतच ते गेले.अचानक घरावर संकट कोसळले. माईचा बाळ नुकताच चालायला लागला होता. त्याचे सगळे आयुष्य घडवायचे होते, एका मुलीचे लग्न व्हायचे होते, माईला आभाळ फाटल्यासारखे झाले तरी रडत बसायला वेळ नव्हता. तळ्याहून भाऊ,वहिनी आले.आई नाही येवु शकली तेच चार दिवस माईला माहेरी घेवून गेले.आईच्या कुशीत माईने रडून घेतले ते अखेरचे.आता मलाच खंबीर व्हायला हवे,नातेवाईक आणि त्यांची मदत किती दिवस पुरणार? असा विचार करुन आठ दिवसात माई परत आपल्या घरी आली.

सुमनला वडील गेल्याचे समजले होते,खरं तर ती माहेरी बाळंतपणाला यायची होती पण अचानक ही तार आली, तिच्या घरच्यांनी प्रथम तिला सांगितलेच नाही, तिची मनःस्थिती बघून सासूबाईंनी तिला जवळ घेवून सांगितले. सुमनला फार दुःख झाले, पण ती काही करु शकत नव्हती तिच्या या नाजुक अवस्थेत तिला अक्षीला पाठवायला घरचे तयार नव्हते.

माईने सगळा कारभार बघायला सुरुवात केली. भिक्षुकीतून मिळणारी आवक बंद झाली होती, मात्र तिने असलेल्या लहानशा शेताच्या तुकड्यावर लक्ष घालायला सुरुवात केली.गोड बोलून चार लोक तिने जोडलेले होतेच.तिने सुईणीची कामे देखील करायला सुरुवात केली.लांबलांबच्या वाड्या वस्त्यांवरुन लोक तिला बोलवायला येत, माई लगोलग जाई. रात्री अपरात्री देखील माई त्यांच्या बरोबर जात असे. तिने कधीच तोंडाने मोबदला मागितला नाही.कधी कधी तर काही लोक इतके गरीब असत, की त्यांच्या कडून आल्यावर अंघोळ करुन माई भाताच बुडकुल शिजवी,त्यावर तूप, लोणच्याची फोड घाली कधीतरी गुळाचा सांजा असं जेवण बाळंतीणीला पाठवी. मात्र ही माणसं, अडीनडीला माईच्या मदतीला येत, तिच्या भातलावणी, काढणीचा कधी खोळंबा होवु देत नसत.

आपल्या सहा महिन्यांच्या मुलाला घेवुन सुमन अक्षीला आली.पांढऱ्या कपाळाच्या माईकडे बघून तिला हुंदका आवरला नाही.माईला देखील सुमनला बघून भरुन आले.बराच वेळ मायलेकी निःशब्द पणे अश्रू ढाळत राहिल्या.माईने नातवाला उराशी धरले,याचे बारसे इथे व्हायला हवे होते, पण काय करणार? सुमनने हि तिच्या भावाला पहिल्यांदाच पाहिले होते. आठ पंधरा दिवस सुमन राहिली.मग तिच्या सासरहून एक पत्र आले.पत्रात तिच्या नवऱ्याने लिहिले होते तुझ्या बहिणीला तू इकडे घेवुन ये तिच्या पुढच्या शिक्षणाची आपण व्यवस्था करु, सध्या आपण त्यांना एवढी मदत करु शकतो.

सुमनने माईला पत्रबद्दल सांगितले. माई म्हणाली," गौरीला तू घेवुन जा, जावयांच्या शब्दाचा मान राखायला हवा, पण त्यांना म्हणावं तिच्यासाठी मुलगाच बघा उगीच शिक्षणाचा खर्च नको,तुम्ही करताय हेच खूप आहे, अजून बाळचं सगळचं व्हायचं आहे, तेव्हा लागेलच मदत. मऊ लागल, म्हणून कोपरापासून खणू नये" सुमन म्हणाली ,"आई आता माझी कॉलेजची दोन वर्ष झाली, दोन संपली की मी पण नोकरी करेन, मग काय हरकत आहे? आणि आमची माणसं, खरच फार चांगली आहेत"
" हो आहेत गं, ह्यांची पुण्याई म्हणून अशी देवमाणसं भेटली आहेत, पण चांगल्याचं चांगुलपण आपण टिकवायचं असतं,उगीच आपला भार इतरांवर टाकणं मला नाही आवडतं गौरीसाठी तुमच्यासारखी चांगली माणसं बघं"

सुमन बरोबर गौरी गेली, कामाचाही हात कमी झाला, पण आज ना उद्या ती जाणारच होती. माईला उद्योगांमुळे दिवसाचे चोवीस तास कमी पडत. बाळच्या बाललीला बघायलाही सवड नसे. लेकरू फार गुणी होतं, कुणाकडेही जाई, देवु ते खाई, हट्ट नाही की रडणं नाही.परिस्थिती माणसाला शहाणं बनवते.
गौरी देखील सुमन सारखीच गुणी होती, माईच्या हाताखाली राहुन घरकामात ती तयार झाली होतीच, शिवाय शिवण, भरतकाम यातही ती तरबेज होती.सुमनच्या सासरचे खटले मॊठे होते, संत्र्याच्या बागा होत्या, कापसाची शेती होती.सुमनच्या सासऱ्यांच्या पश्चात तिच्या सासुबाई सगळा कारभार समर्थपणे बघत होत्या.सगळे त्यांना अक्का म्हणत ही मंडळी सधन होतीच पण त्याही पेक्षा त्यांची मनाची श्रीमंती जास्त होती.सुमनने गौरीसाठी मुलगे बघण्याचा आईचा निरोप सासुबाईंना सांगितला,त्यांच्या परिचितांपैकी दोन तीन ठिकाणी ती पत्रिकाही देवुन आली.पत्रिका जुळत नसल्याचे निरोप आले.
एक दिवस सुमनच्या सासुबाई तिला म्हणाल्या,"अगं आपल्या नानासाठी आपण गौरीची पत्रिका बघुयात का?" नाना हा त्यांचा धाकटा मुलगा होता, नुकताच पदवीधर होवुन नोकरीला लागला होता. म्हटल्याप्रमाणे त्यांनी गुरुजींना बोलावून पत्रिका दाखवल्या,पत्रिका जुळत होत्या.
त्यांनी नानालाही विचारले,"गौरी तुला पसंत आहे का? मला तर ही मुलगी फारच आवडली आहे, शिवाय माणसे माहितीतली आहेत.दोघी बहिणी जावा झाल्या तर घरात पुढे कुरबुरी पण कमी होतील"
सुमनच्या नवऱ्यालाही हा विचार पटला.नानानेही गौरीला होकार दिला.
सुमन भितभितच सासुबाईंना म्हणाली,"हे सगळ ठिक आहे,पण आता आईची परिस्थिती तुम्ही जाणताच, लग्न करुन देणं .."
"मला सगळं ठाऊक आहे, माईंनी माझी सगळी हौस तुझ्या लग्नात केली आहे,त्यांना जड होईल असे आपण नकोच करायला, गौरीचे लग्न आपण नोंदणी पध्दतीने करु, म्हणजे खर्चाचा प्रश्ण उरणार नाही. आपण दोन्ही अंगी लग्न करुन घेवू पण ते तुझ्या आईला पटणार नाही, त्या काही करुन लग्न देतील करुन पण अजून तुझ्या भावाचे सगळेच व्हयचयं आणि आई-वडीलांची जागा कुणी घेवु शकत नाही, देवक दुसरे कुणी बसवणार हे बघून त्या माऊलीला केवढं दुःख होईल, त्या पेक्षा नोंदणी पध्दतीने लग्न करु , सगळेच प्रश्ण सुटतील , मी नाना आणि दादाशी बोललीय आधीच, मुले माझ्या शब्दाबाहेर नाहित, हे नोंदणी लग्नाचं मला दादानचं सांगितलय."

सुमनने माईला पत्राने सविस्तर हकिकत कळवली.माईचे मन सुमनच्या सासरच्या लोकांच्या विशेषतः तिच्या सासुबाईच्या मनाच्या मॊठेपणाने भरुन आले.अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन या उक्तिचा प्रत्यय आला.गोपाळरावांच्या निधनानंतर अक्का दहा दिवसात समाचाराला आल्या होत्या, माईच्या पाठीवरुन हात फिरवून ,"माई, धीर सोडू नका, झालं ते फार वाईट झालं.पण स्वतःला एकटं समजू नका, आम्ही आहोत" अस बोलल्या होत्या.फार बडबड कराय़ची त्यांची सवय नव्हती.पण कृतीतून त्यांनी करुन दाखवलं.गौरीचं लग्न त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच झालं.

हि घटना आहे पन्नास एक वर्षांपूर्वीची.आज आपण समाज खूप सुधारलाय म्हणतो पण हौशीच्या नावाखाली लग्न समारंभांमध्ये लाखो रुपये उधळले जातात.आजही हुंडाबळी वाचायला मिळतात. मुलीच्या लग्नापायी त्यांचे बाप कर्जबाजारी होतात आणि त्या खर्चाला भिऊन मुलीचा जन्म नको म्हणून गर्भातच तिला मारली जाते. या सगळ्या गोष्टी बघून गावाकडची हि गोष्ट मला सांगाविशी वाटली.पैशाची समृध्दी मिळवताना मनाची श्रीमंती आपण गमावत नाही ना? याचा विचार केला पाहिजे.

4 comments:

Maithili said...

Nehmipramanech apratim katha. Mi tar fan ch zaliye tumachi...!!!

हेरंब said...

सुंदर !! आणि सुखांत वाचून तर अजूनच आनंद झाला..

एक प्रश्न : तुम्ही लिहिता त्या सगळ्या सत्यकथा असतात का?

Shubhangee said...

Heramb
mee adhichya blog madhe lihile aahe, hya kathanchi beeje khari aaheta.Mee mazya kalpanene tya rangawilya aahet

thanks Maithili and Heramb

Ramesh Rao said...

It is really good real story explained so that todays generation can learn that Money is not the Only thing in life.You should get enjoyment & learn from surrounding : Many important things in life other than Money.