Tuesday, March 27, 2018

शांतिनिकेतनची सहल

  शांतिनिकेतन शाळेबद्दल तिसरीच्या ’थोरांची ओळख’ या आम्हाला असलेल्या इतिहासाच्या पुस्तकात पहिल्यांदा वाचलं त्यावेळच पुस्तकातील झाडाखाली भरणाऱ्या शाळेच चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. तेंव्हापासून शांतिनिकेतन आणि गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी मनात घर केलं.पुढे रविंद्रनाथांच्या अनेक कथा,कविता वाचल्या (अर्थात सगळ्या अनुवादित)गोरा नावाची उत्कृष्ट कादंबरी वाचली. .पु.ल.देशपांड्यांची रविंद्रनाथांवरील तीन व्याख्याने प्रत्यक्ष ऐकली.बोरकरांचे आनंदयात्री रविंद्रनाथ हे पुस्तक वाचले आणि दिवसेंदिवस या व्यक्तिबद्दलचा मनातला आदर वाढतच गेला. एका धनाढ्य घरात जन्माला आलेल्या ,पाश्चात्य वातावरणात वाढलेल्या रविंद्रनाथांचे मन किती संवेदनाक्षम होते ! गरीबांची दुःखे त्यांनी जवळून बघितली, लहान मुलांकडे ज्या काळी कमालीचे दुर्लक्ष केले जाई त्या काळी मुलांच्या शिक्षणाकरीता त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरताना ते शिक्षण जास्तीत जास्त आनंददायी,सोपे व्हावे या करीता त्यांनी सहजपाठ लिहिले. शिक्षण समाजाभिमुख हवं,निसर्गाच्या सानिध्यात हवं आणि संगीत,चित्रकला,शिल्पकला अशा नाना विद्या कला देखील भाषा,गणित,शास्त्र अशा विषयांएवढ्या महत्त्वाच्या असून शालेय वयातच विद्यार्थांना त्यापैकी ज्याच्यात रस आहे,त्यातच त्याला प्राविण्य मिळवता यावे यासाठी शांतीनिकेतनाची स्थापना झाली.

                मुलांना मार्गदर्शनासाठी त्यांनी देशभरातील दिग्गज व्यक्तींना बोलावुन घेतले.कित्येकांनी अल्प मोबदल्यात मुलांची जीवने घडवली.सत्यजीत रे, राम किंकर , अमर्त्य सेन  अशा थोर विभूती शांतीनिकेतनच्याच. त्यामुळे शाळेत असल्यापासून शांतीनिकेतन बघण्याची माझी फार इच्छा होती. पण म्हणतात ना, कोणतीही भेट होण्यासाठी वेळ यावी लागते मग ती भेट व्यक्तीची असो कि वास्तुची. लेक इंग्लंडला शिकायला गेल्यामुळे तिच्या निमित्ताने इंग्लंडला जाणे झाले पण कलकत्त्याला जाणे राहिले. इंग्लडला गेले असताना शेक्सपियरचे जन्मगाव स्ट्रॅटफोर्ड अपॉन -एव्हॉन बघायला गेलो होतो.शेक्सपियरच्या घराबाहेरील बागेत रविंद्रनाथांचा पुतळा बघून तर माझ्या डोळ्यात पाणीच आले. इतक्या थोर व्यक्तीच्या शांतिनिकेतनात न जाणारी मी किती करंटी ! गुरुदेवांबद्दलचा आदर आणिकच दुणावला.

               शेवटी इशान्य भारतासह कलकत्ता बघायचा योग जुळून आला. शांतीनिकेतन बघाय़ला एक दिवसच मिळत होता. कलकत्त्याहून सकाळी ७ वाजताची ट्रेन होती.ती वेळेवर निघाली पण ट्रॅकवर काम चालू असल्याने गाडी लेट पोचणार होती.दोन-तीन तासाचा प्रवास होता. दुतर्फा हिरवीगार शेतं आणि असंख्य तळी त्यात फुललेली कमळे आणि नाना तऱ्हेचे पक्षी.निसर्ग सुंदर होता पण आपल्या लोकांनी टाकलेल्या प्लॅस्टिकचा कचरा आणि घाण डोळ्याला कितीही नाही म्हटल तरी टोचत होता. गाडीतल्या प्रवाशांना आम्ही सहज शांतीनिकेतना बद्दल विचारलं  तर बहुतेकांना शांतिनिकेतन माहित नव्हते आणि ज्यांना माहित होते त्यांपैकी फारच थोडे तेथे जाऊन आलेले होते !

                 दहा-साडेदहाला आम्ही बोलपूर स्टेशनावर उतरलो.स्टेशनवरच गुरुदेवांचे एक सुंदर स्मारक आणि संग्रहालय आहे. त्यात गुरुदेवांचे सगळे चरीत्र,लहानपणापासून फोटो,त्यांनी दिलेल्या नाना विध देशातील भेटींबद्दलचे वुत्तांत,त्यांच्या कुटुंबियांचे फोटो.गुरुदेवांच्या शेवटच्या आजारात त्यांना कलकत्त्याला नेले ती ट्रेन तशीच्या तशी ठेवलेली आहे.फारच सुंदर आहे ते संग्रहालय !
तेथुन बाहेर पडल्यावर एक ई-रीक्षा वाला भेटला तो शांतीनिकेतन आणि परिसर फिरवुन दाखवतो म्हणाला. त्या मुलाला बऱ्यापैकी माहिती होती आणि हिंदी बोलत होता हे महत्वाचे. झाडाखाली भरणारी ती शाळा डोळे भरुन बघितली. राम किंकरदांनी तयार केलेली शिल्पे बघीतली.रविंद्रनाथांचे नोबेल पारितोषक ठेवलेले संग्रहालय मात्र बंद होते.फारच निराशा झाली ! जाण्यापूर्वी मी साईट इतक्या वेळा बघितली होती पण कुठेच ते कधी  बंद असते याची माहिती नव्हती. त्या इमारतीच्या बाहेर उभ्या असलेल्या सुरक्षा आधिकाऱ्याला आम्ही किती दुरुन आलोय वगैरे सांगून आत सोडण्याची विनंती करुन बघितली पण त्याने फारच कर्तव्य तत्परता दाखवून आम्हाला तिथे उभे पण राहू दिले नाही. नोबेल पदक तर खूप वर्षांपूर्वी हरवलय ते वाचले होते. हि तत्परता त्यांनी त्यावेळी दाखवली असती तर कदाचित पदक चोरीला जाते ना ! असो. नंतर तो मुलगा आम्हाला विविध प्रांतातल्या कला आणि वस्तुंचे संग्रहालय दाखवायला घेऊन गेलो. इशान्य भारतातील सगळी राज्ये,ओरिसा ,बंगाल अशा राज्यांच्या कलाकृतींचे सुरेख संग्रहालय होते .परत निघण्याची वेळ कधी झाली समजलेच नाही.त्या मुलाने आम्हाला परत स्टेशनवार सोडले.परत मेल्या(जत्रेच्या) च्या वेळी या असे पुन्हा पुन्हा सांगत त्याने आमचा निरोप घेतला. टागोरांचे संग्रहालय, शांतीनिकेतन्,रामकिंकरदांची शिल्पे,विविध राज्यांच्य़ा कला पाहून मन भरुन गेले.


            पण ते बोलपूर गाव इतर सगळ्या खेडेगावांसारखेच.मातीचे रस्ते,धुराळा,उघडी गटारे,प्लॅस्टीक आणि तत्सम कचरा.  आपले मन किती तुलना करणारे असते ! शेक्सपियरचे गाव मी बघितलेच नसते तर शांतिनिकेतन त्या घाणेरड्या बोलपूर गावासकट मला आवडलेही असते. एकवेळ ते अस्वच्छ गाव पण सहन होईल मात्र कलकत्त्याहून येतानाच्या सहप्रवाशांची टागोर किंवा शांतिनिकेतनाबद्दलची अनास्था मनाला जास्त वेदना देवुन गेली. शेक्सपियरच्या त्या गावात मी कित्येक छोट्या मुलांना त्यांच्या आई,वडीलांबरोबर बघितले होते. आपल्या भाषेतील एका महान कवीआणि नाटककाराची आपल्या मुलांना इतक्या लहान वयात ओळख करुन देणऱ्या त्या पालकांबद्दल मला खरचच खूप कौतुक वाटलं. आपण आपल्या मुलांवर असे संस्कार करतो का? हि देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे.यातही अंडे आधी का कोंबडी आधी या कोड्याप्रमाणे दाखवण्याजोगी स्मारके आपल्याकडे आहेत किती हा प्रश्ण ही आहेच.

          आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल आपण तोंडाने नुसत्या गप्पा मारतो आणि तो जतन करायची जबाबदारी कोणीच घेत नाही.आज टागोरांसारख्या जगद्विख्यात विश्वकवीचे स्मारक बघायला जागातून पर्यटक येत असतील तेंव्हा एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून ते विकसित करायला काय हरकत आहे? टागोरांच्या जीवनावर एखादा लघुपट काढुन त्यांच्य़ा कार्याची माहिती त्यातुन देता येईल. त्यांच्या अनेक कथा,कांदबऱ्या,कवितांवर बरेच सिनेमे निघालेत त्यांतील क्लिप्स दाखवता येतील. बोलपूर खेड्याचा बाज राखत स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ परिसर, जागोजागी मार्गदर्शक नकाशे लावुन पर्यटकांची सोय करता येईल.शांतीनिकेतन मध्ये तयार होणाऱ्या उत्तम कलाकृती विकायला सुरेख बाजार असे किती तरी करता येईल.रविंद्रनाथाचे वाङ्मम जवळपास सगळ्या भारतीय भाषा आणि इंग्रजीत अनुवादित झाले आहे त्याच्या विक्रिसाठी भव्य दुकान करता येईल. रविंद्रनाथांसारख्या उत्तुंग प्रतिभेच्या विश्वकवीचे त्याला साजेसे स्मारक केले तर त्यांच्या अनमोल साहित्याचा नव्या पिढ्या पण आस्वाद घेतील आणि ते अजरामर होईल . पण हे  घडावे कसे ? समर्थांनी म्हटले आहे  केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे . पण ते कोणी केले पाहिजे त्याबद्दलच घोळ आहे. बंगालने देशाला रविंद्रनाथ टागोर, विवेकानंद,अरविंद घोष ,रामकृष्ण परमहंस,ईश्वरचंद्र विद्यासागर,चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस अशी एकाहुन एक नररत्ने दिली आहेत. रामकृष्ण मिशनमुळे स्वामीजींचे स्मारक कलकत्त्यात झालय. योगी अरविंदाची स्मृती पॉंडेचरीत जतन केलीय.गुरुदेव रविंद्रनाथांच्या दैवी मात्र अशी कोणतीच संस्था नाही आणि  तेथील कम्युनिस्ट राज्य सरकारला या सगळ्या कामांसाठी पैसा खर्च करणे योग्य वाटत नसावे !
एकूण आपल्या हृदयातील गुरुदेवांची प्रतिमा पुजायची आणि जमेल तेंव्हा शांतिनिकेतनात जाऊन त्या महात्म्याच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वास्तुचे दर्शन घ्यायचे एवढेच माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या हातात आहे .

Wednesday, March 14, 2018

मन केवढं केवढं

पावसाने उच्छाद मांडला होता. पहाटे पाचलाच जाग आली होती  पण पांघरुणातुन उठायचे आबांना जीवावर आले होते. सहा वाजून गेले होते, गरम गरम चहा प्यायची अनावर हुक्की आली होती पण कोण करुन देणार ? तसा सकाळचा पहिला चहा आबाच गेली अनेक वर्षे करीत. सुलूच्या नसण्याचा त्याच्याशी काही फारसा संबंध नव्हता पण आज तिची फारच आठवण झाली.एवढा वेळ आपल्याला गादीवर लोळताना बघून ,"बरं वाटत नाहीये का? " अस विचारणार कोणी नाही याची आज प्रकर्षाने जाणीव झाली. मन उगीचच उदासल तेवढ्यात फोनची रींग वाजली
    हात लांब करुन आबांनी फोन घेतला, समीरचा फोन ," हाय बाबा ,मोबाईल बंद आहे तुमचा .आज तिकडे खूप पाऊस पडतोय ना, तुम्ही वॉकला नसाल गेलात म्हणून कॉल केला"
" रात्री बंद करुन ठेवतो मोबाईल सकाळी चालू करायचा राहिलाय, पाऊस तर आहेच गेला आठवडाभर, तरी जातो मी रोज. आज जरा जास्तच आहे म्हणून कंटाळा केला"
"पावसात नका जात जाऊ,घरी आहे ना वॉकर त्यावरच चालत जा ना ,उगाच रस्त्यावर चिखल,पाणी त्यात पडला बिडलात तर ..."
" ते ही खर पण बाहेर पडल की चार लोक भेटतात गप्पा,गोष्टी केल्या की बर वाटत ...आज नाही गेलो"
" विशु येतो ना रोज , बॅंकेची कामे तो करतो कि करता तुम्हीच?"
" येतो विशु वेळेवर .मी जातो बॅंकेत त्याच्याच बरोबर .ऑनलाईन पण शिकतोय हळूहळू पण माझा नाही विश्वास या नेट्बॅंकींग वर. रोज नवनव्या बातम्या कानावर पडतात.त्यापेक्षा विशुच्या हातात पासबुक देवुन पैसे काढलेले बरे "
" ठिक आहे बाबा .तुम्हाला पटेल तस करा ,ठेवतो आता फोन जेवण करुन झोपायचय"
" ठेव ठेव किती नऊ वाजले असतील ना तिकडे?"
"हो"
" गुड नाईट"
सुलू असती तर अर्धा तास गप्पा मारल्या असत्या तिने,तो ही बेटा बोलत बसला असता, बापाशी बोलायला जमत नाही.त्याला देखील काय दोष द्यायचा म्हणा मला तरी कुठ सुचतय बोलायाला..ओम च काय चाललय ,त्याचे गेल्या वर्षी ग्रॅज्य़ुएशन झाले. नसती फॅड एकेक. आपल्या भाषेत दहावी झाली ,पण मोठा झाला आता. त्याला आता इंडीयात यायच नसतं, चालायचच. त्याच्याबद्दल विचारायला हव होत, राहिलच. असच होत. नंतर सुचत एकेक असो उठायलाच हव आता.
तेवढ्यात लॅच उघडून विशु आला घाईघाईत तो आबांच्या बेडरुममधे शिरला
"आबा तब्येत बरी नाही का?"
" अरे विशु आज इतक्या लवकर कसा?"
"आबा अहो सात वाजून गेलेत अजून दुधाची पिशवी बाहेरच ,बर वाटत नाही का तुम्हाला?"
" नाही रे बाबा, ठिक आहे मी. आज पावसामुळे उठावस वाटत नव्हत पण तू लवकर कसा?"
" आज टपरीवर तुमच्या दोस्तात तुम्ही नव्हतात मग बायकोनं फोन करुन सांगितल, जाऊन बघा म्हणाली"
"फोन करायचास ना?"
" केला लॅंड्लाईनवर. तुम्ही उचलत नव्हता , मोबाइल पण लावला तो बंद होता,मग म्हटल हि म्हणतीय ते बरोबर असल तब्येत नसल बरी मग आलो थेट ,काय जास्त लांब यायचय थोडच ?"
" अरे समीरचा फोन होता त्याच्याशी बोलत होतो कॉल वेटींग मुळे तुला तस वाटल असेल. मी ठिक आहे. तू जा घरी. ये नेहमीच्या वेळेला, तुझी घरची काम उरकायची असतील ना? बायको तिकडे टपरीवर कामाला. तू इथे. पोरांच कोण बघणार?"
" पोरगी आवरते म्हणाली ,सिध्दु पण मोठा झालाय आता आणि हि येईलच नऊ पर्यंत मी चहा करू का तुम्हाला "
" चालेल, उठतोच मी ,दुध ठेव तापत .."
" करतो आबा मी ,घरी मीच करत असतो "
 "तुझा पण ठेव रे "
" करतो करतो"
     विशु आल्याने आबांचा गेलेला उत्साह परत आला,त्याने केलेल्या चौकशीने मन आनंदले. ब्रश करुन ते किचन मधे जातात तोच वाफाळलेला चहाचा कप विशुने त्यांच्या समोर ठेवला , डब्यातली बिस्कीटेही त्याने बशीत ठेवली.आबा खुश झाले. चहाचा पहिला घोट घेताच त्यांच्या तोंडून वाक्य निघाले
"व्वा ..झकास झालाय चहा . विशु,तू पण घे चहा,बिस्कीट घे"
"घेतो आबा, हि भांडी टाकतो घासायला "
"टाकशील रे, आधी चहा घे गरम. पेपर आला असेल ना?"
"हो आलाय कि तो बघा ठेवलाय तिकडे, आज पेपरही  बाहेर,दुधाची पिशवी पण बाहेर मी घाबरलो म्हटल काय झाल आबांना?"
" तुला काय वाटल झोपेतच आबांच काही बर वाईट?"
" छे छे... सकाळी सकाळी अस वाईट नका बोलू आबा..."
" अरे वाईट कुठे ? अस मरण यायला फार मोठ भाग्य लागत बाबा ...  आमच्या दैवात काय लिहून ठेवलय कुणास ठाऊक? "
" चहा घ्या आबा, थंड होतोय " विशुने विषय बदलायचा प्रयत्न केला
 चहा घेता घेता आबा एकदम गंभीर झाले , त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा काळजीचे सावट आले.

आयुष्याचा पट त्यांच्यापुढून झटकन सरकून गेला. आजवरच्या त्यांच आयुष्य तस सरळ मार्गी गेल. आईवडीलांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती ,खाऊन पिउन सुखी होती पण त्याकाळी त्याच काही वाटत नसे.वडील वाईच्या शाळेत शिक्षक. स्कॉलरशिपवर शिक्षण झाले पदवी मिळाल्यावर पुढे शिकायची फार इच्छा होती पण धाकटी भावंडे होती ,तात्यांना मदत करणे गरजेचे होते मग CWPRS ची जाहिरात वाचून अर्ज केला, लगेच बोलावणे आले मुलाखतीला मार्क बघून तिथल्या वरीष्ठांनी विचारले देखील एम.एसस्सी का करत नाहीस ? हसून नोकरीच करायची आहे अस सांगितल लगेच रीसर्च ऍसिस्टंट ची नोकरी मिळाली किती आनंद झाला आई,तात्यांना ! ऑफिस सकाळी ७ ते २ असायच.काम करायला उत्साह होता,वातावरणही छान होत ऑफिसमधल. म्हणता ,म्हणता तीन वर्षे गेली एक प्रमोशनही  मिळालं  क्लास टू ऑफिसर झालो, त्यावेळच्या नायर सरांनी पुढे शिकायला प्रवृत्त केल म्हणाले पुढल्या प्रमोशनला पोस्ट ग्रॅज्युएट झालास तर फायदा होईल.दुपारी अभ्यास करीत जा, ऑफिसच्या वेळेचा फायदा घेत गणित विषय घेऊन एम.एस्सी करता आल,पुस्तके मिळायची लायब्ररीमधे,घराजवळच्या पटवर्धन सरांच मार्गदर्शन मिळाल आणि त्यामुळेच एम.एस्सी करु शकलो त्याचा पुढच्या आयुष्यात फार फायदा झाला. लग्न,मुलं सगळ्याच बाबतीत दैवान साथ दिली. सुलभासारखी सालस पत्नी मिळाली. तिने संसारात चांगली साथ दिली.अगदी आखीव,रेखीव आयुष्य होत. आई,तात्या गावीच होते त्यांनी शेतात लक्ष घातल होतं वर्षाच धान्य पाठवायचे.श्रीधरच शिक्षण,मालूच लग्न सगळ्याला आपण मदत केली याची त्यांना जाणीव होतीच. श्रीधरन परजातीच्या लग्न केल्याने तात्या-आई जरा नाराज झाले ,त्यावेळी आपण मध्यस्थी केली लग्न झाल पण ते दोघे दुखावलेले राहिले. तो नोकरी निमित्ताने दूर मद्रासला गेला त्याच येण जाण कमीच राहिल. मालू बी.एस्सी झाली तिला चांगल स्थळ मिळाल ती नाशिकला गेली. आई,तात्या शेवटी आपल्याकडेच होते.पिकली पान पाठोपाठ गळून गेली ,त्यांची दुखणी बाणी सुलभानेच बघितली त्यावेळी ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमुळे घरात लक्ष देणे व्हायचे नाही पण तिने कधी फारशी तक्रार केली नाही. आईची तब्येत शेवट पर्यंत चांगलीच होती. सुदैवान सुलभाच आणि तिच पटायच, आईमुळे सुलभाला गाण्याच्या परीक्षा देता आल्या, मुलांना वाढवताना आजी आजोबांची मदतच झाली. माणसांत वाढल्यामुळे मुलेही शिस्तीत होती.तात्यांनी मुलांना शिकवायच काम आनंदान केल. ऑफिसमधे त्यामुळेच आपण निवांतपणे काम करु शकत होतो.

        समीर हुशार होता, आय.आय.टी त्याला सहज प्रवेश मिळाला तो कानपूरला गेल्यावर घर कस सुन सुन झाल होत. त्यावेळी मोबाइल्स नव्हते,तो आठवड्यातून एकदाच फोन करायचा बाकी सगळी खुशाली पत्रांतुनच समजायची. तो बी.टेक झाला आणि अमेरिकेत गेला पुढे शिकायला एम.एस झाला आणि तिकडेच नोकरी करु लागला.सुरुवातीला म्हणायचा येईन चार पाच वर्षांनी. अमोल इथे असल्याने त्याचे जाणे तितके जाणवले नाही,तोवर नोकरी होती .रीटायर्ड झाल्यावर अमेरीकेत जाऊन आलो. पुढे ते नित्याचेच झाले. अमोल ने पुण्यातून इंजिनियरींग केल तो ही भावाच्या मागोमाग अमेरीकेत गेला. मुलांनी इथे रहावे असे कुठल्याही आई वडीलांना वाटणारच पण इथे त्यांना तशा संधी नव्हत्या. आपल्या देशाबद्दल प्रेम वाटावे असे संस्कार करण्यात आम्हीच कुठेतरी कमी पडलो असू. तिकडच्या आरामदायी आयुष्याचा,अमर्याद स्वातंत्र्याचा मोह पडण्याच त्यांच वय होत .शिवाय आम्हालाही मुले तिकडे असल्याने स्वातंत्र्य होतेच की. वर्षा-दोन वर्षांनी मुल यायची ,भरपूर पैसा खर्च करायची,एक गेट-टूगेदर करुन सगळ्या नातेवाईंना बोलवायच.बाकी मुलांचा वेळ मित्र मंड्ळीत जाय़चा.कधी गोवा,तर कधी महाबळेश्वर ट्रिप्स व्हायच्या. मुल परत गेली कि घर खायला उठायच दोन चार दिवस.पण नंतर आमचे प्रोग्रॅम्स पण ठरलेले असायचे ,आमचा ग्रुप होता. सुलभाचा ग्रुप होता.शिवाय आमच्या मित्रांचा ग्रूप होता,आमच्या एकत्र ट्रिप्स व्हायच्या,जेवणे व्हायची. कधी श्रीधर यायचा,कधी आम्ही त्यांच्या कडे जायचो.मालू वर्षातून एकदोनदा यायची.आम्ही जायचो तिकडे. एकूण आयुष्य मजेत होते.सुलभाला अमेरीकेत जायलाही खूप आवडाय़च,एकतर मुल भेटायची त्यांच्या आवडीच त्यांना खाऊ-पिऊ घालायच. शनिवार-रविवार मनसोक्त भटकायच. माझ मात्र तिकडे मन फारस रमायच नाही.एखादा महिना मला आवडे नंतर मला इकडचे वेध लागायचे. पुण्यात राहत असलो तरी आई तात्या गेल्यानंतरही मी  गावी जातच होतो.वाईची हवा मला फार आवडायची. तिकडे गेल की घरी गेल्यासारख वाटायच. समीरने गाडी घेवुन दिल्यामुळे जाण ही सोईच झाल होत. शेत शांताराम बघत होता. आम्ही जाण्यापूर्वी त्याला कळवल कि तो घराची साफसफाई करुन ठेवायचा, त्याची बायको भाकरी करुन द्यायची. आठवडाभर तिथे राहून सगळी कामे मार्गी लावली कि पुण्याला यायचे. पंचविस -तीस वर्षांपूर्वी वाई तस गावच होत.इंटरनेट्चा जमाना अजून आलेला नव्हता. तिथल्या शाळाकॉलेजच्या मुलांना करीयरच्या संधींबद्दल मार्गदर्शनाच काम मी करायला घेतल होत माझाही वेळ चांगला जायचा ,मुलांनाही उपयोग व्हायचा.पुण्याहून येताना वेगवेगळी स्पर्धा परीक्षांची पुस्तक घेवुन जायचो. वाचनही खूप व्हायच. शेतात वेगवेगळे प्रयोगही करुन बघितले. एकूण निवृत्तीनंतरच आयुष्यही मजेत चालल होत.सुना आल्या नातवंड झाली.पण सुलभाला कॅन्सर झाला आणि सगळच आयुष्यच बदलल.तिने आजारपण मोठ धीरान घेतल पण मीच मनान खचलो.

        तिचा आजार झपाट्याने वाढला आणि दोन वर्षात ती गेली. मुले येवुन गेली .समीर म्हणाला ,"बाबा तुम्ही आता तिकडेच चला" इकडे एकटे काय कराल? अमेरीकेत जायचे ते ही कायमचे ,शक्यच झाले नसते. एका घरातुन दुसऱ्या घरात रुजायला बाईचाच जन्म असायला हवा कदाचित. मी म्हणालो, ’ नको रे बाळांनो मी इथेच राहीन, येत जाईन तुमच्याकडे पण कायम तिकडे राहण मला नाही जमायच .माझी काळजी करु नका.इथे माझा वेळ जाईल मी अजून व्यवस्थित हिंडू,फिरु शकतो. कधी मालू कडे जाईन , तिला बोलवेन. कशी श्रीधर कडे, शिवाय त्यांची मुले आहेत.माझे मित्र आहेत. वाईला जात जाईन. आता फोन आहे ,तुम्ही मोबाईल दिलाय त्याचा होईल ना उपयोग "
मुलांनी आग्रह केला पण त्यांनाही मी तिकडे आल्यावर माझा वेळ कसा जाणार हा प्रश्ण असेलच ती बिचारी आठवडाभर कामात, इथल्यासारखे तिकडे एकट्याने फिरणे तेवढे सहज नाही.शनिवार रविवार त्यांच्या ट्रिप्स,पार्ट्या नाहीतर कामे. अधुन मधुन जाणे निराळे.

        आबा सुलभानंतर आठ-दहा वर्षे एकटे पुण्य़ात राहिले. दरम्यान तीन चार दा समीर,अमोल येवुन गेले. आता ते एक एक करुन आले.आणि बराच काळ आबांबरोबर राहिले देखील. दोन-तीन वेळा आबा तिकडे जावुन आले. आबांची मुळची प्रकृती चांगली, शिवाय निर्व्यसनी,नेमस्त जीवन असल्याने किरकोळ तक्रारी सोडल्यास कुठलाच आजार त्यांना नव्हता. दिवसाचा वेळ आखून घेतल्याने त्यांना सुलभाशिवायचे जीवन जगायची सवय झाली. पण वयाची ऐंशी उलटल्यावर मुलांना आबांचे एकटे राहणे आणि आपले सातासमुद्रापार असणे त्रासदायक वाटू लागले.रोज फोन करुन समीर म्हणू लागला,"बाबा तुम्ही कुणाला तरी सोबत आणुन ठेवा.किंवा एखादे ओल्ड एज होम बघा " आबांनी डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर गाडी चालवणे कमी केले. वाईच्या त्यांच्या शेतावर त्यांना जाणे जमेना.शांताराम वारल्यानंतर त्याचा थोरला मुलगा रवी शेत बघत होता पण तो आबांशी तितक्या आपुलकीने वागत नव्हता. रविचे त्याच्या धाकटा भाऊ विशुशी पण जमत नव्हते. धाकट्या विशुने बारावी पास झाल्यावर पुण्य़ाचा रस्ता धरला.दरम्यान मुले शेतीत लक्ष घालणार नाहीत याचा आबांना अंदाज आल्यामुळे त्यांनी शेत विकायचा निर्णय घेतला. योग्य गिऱ्हाइक मिळताच श्रीधर,मालुशी आणि मुलांशी, बोलून त्यांनी शेत विकले. खूप दुःख झाले त्यांना पण आता हळूहळू सगळा कारभार आवरता घेणेच योग्य ठरणार होते. आबांनी शेताच्या पैशातला श्रीधर आणि मालूचा हिस्सा त्यांना दिल्यावर स्वतःच्या वाट्याला आलेल्या पैशात वाईच्या शाळेला देणगी दिली.पुण्यातील एक दोन माहित असणाऱ्या सेवाभावी संस्थाना देणग्या दिल्या. शांतारामच्या रवीला त्याच शेतावर वाटेकरी म्हणून लावले.विशुला  आणि त्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये दिले.   
   
        आबांच्या एकट्याच्या नोकरीमुळे पुण्यात त्यांनी दोन बेडरुमचा फ्लॅट पन्नाशीनंतर घेतला.तोपर्यंत ते भाड्याच्या घरातच रहात होते.दोन बेडरुमचा फ्लॅटही त्यांना व सुलभाला खूप मोठी कमाई वाटली होती.मुले परदेशात गेली त्यांनी चाळीशीच्या आतच मोठमोठाले बंगले बांधले याच त्यामुळेच फार कौतुक होत. त्याच वेळी आबांच्या बिल्डींगचे नूतनी करण करायचे ठरले होते वाढत्या एफ.एस.आय मुळे त्यांना एक खोली वाढवू्नही मिळणार होती.तशा मिटिंग्ज होत होत्या .वरचे पैसे घालायला आता मुलांजवळ मागायची जरुर नव्हती. वर्षा-दोन वर्षात तेही काम झाले.मालूच्या आर्किटेक्ट मुलाने सुरेख इंटिरीयर करुन दिले.घर सुंदर झाले पण त्यात रहायला मात्र एकटे आबाच. शांतारामचा विशु पुण्यात आबांच्या घराजवळ रहात होता.भोसरीला कुठल्याशा कंपनीत नोकरी करायचा.बर चालल होत त्याच.बायकोही कामाला जायची.मुल शाळेत जाय़ची. तो येत असे आबांना भेटायला अधुन मधुन.त्याची कंपनी अचानक बंद पडल्यान त्याला ब्रम्हांड आठवल आता परत वाईला जाण फार कठीण झाल असत.आबांकडे तो सल्ला मागायला गेला.
आबा म्हणाले, " तू वाईला जावुन तरी काय करणार? तिकडे नोकरी मिळेल का?"
" नाही ना आबा आणि वहिनी आणि सुरेखाच अजिबात पटत नाही,दादा पण फार हलक्या कानाचा आणि गरम डोक्याचा आहे.इथच कुठ जमल काही तर बर होईल"
" तुला गाडी चालवता येते?"
" हो येते की,वाईला असतानाच शिकलो होतो तिकडे वाई महाबळेश्वर टॅक्सी पण चालवलीय ना मी"
" मग माझ्या कडेच कामाला राहतोस का? गाडी चालवायची आणि इतर काम पण करायची"
" चालेल की आबा तुमच्या रुपान देवच पावला म्हणायचा"
"अरे देव बिव काही नाही तुला दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत आपण अस करु तुला मी पगार किती देवू?"
" काय तुम्ही द्याल तो"
" हे बघ हा व्यवहार आहे, मी कधी ड्रायव्हर ठेवलेला नाही पण मी चौकशी करतो,समीर,अमोलला विचारतो ,तू ये मग उद्यापासून"
" उद्या कशाला आबा आजपासून सुरु करु काम .तुम्हाला जायचय का कुठे?"
" नाही रे बाबा आताच मी फिरुन आलो आता रात्रीचा कुठे जाऊ? ये तू उद्या"
    
        आबांच्या सोबतीचा नाही तरी ड्रायव्हरचा प्रश्ण असा सहज सुटला.विशु माहितीतला होता,शिवाय आता त्याला नोकरीची निकडही होती. मुलगा खरच गुणी होता त्य़ाच्या वडीलांसारखाच. आबांचा त्याला आधार होता आणि आबांना त्याचा.
        "आबा,अंघोळ कराल ना? मी जाउ का घरी कि खायला काही आणून देवु तुम्हाला?" विशुच्या प्रश्णांनी आबा भानावर आले.
" जा तू घरी ये दहा-अकरापर्यंत .कुसुमताई येतील इतक्यात स्वयंपाकाला ,तेवढी भाजी आहे ना फ्रिजमधे बघ "
" ठिक आहे"
 विशु गेला.आबांना वाटले आता आपले कधी काय होईल सांगता येणार नाही. आयुष्य चांगले गेले तसे मरणही चांगले यावे एवढीच इच्छा आहे. विशुला आपल्याकडील नोकरीतून आपण काय देतोय? ना फंड,ना ग्रॅच्युइटी मग पेन्शनचे नावच सोडा.हा मुलगा इतक्या प्रेमाने मायेने आपली काळजी घेतो. कधी एक पैशाचा हिशेब चुकवत नाही,आपल्या खाण्यापिण्यापासून दुखण्याबाण्यापर्य़ंत सगळ्याची काळजी घेतो.त्याच्या बायकोला आपल्या ओळखीने जोशांच्या खानावळीत काम मिळाल त्याची ही त्याला जाणीव आहे.त्याच्या मुलांना आपण शिकवतो,त्यांच्या वह्या पुस्तकांचे पैसे देतो त्याबद्दलही तो कृतज्ञ असतो. एकदा अमेरीकेतुन येताना समीरच्या रोशनचे कपडे सिमरनकडून मागुन आणले.त्याच्या मुलांना कपाटभर कपडे,फारसे न वापरताच लहान होतात.सिमरनला भित भितच विचारल,पण तिने सहज दिले कपडे.रो्शनला कळल्यावर त्याने ढिगभर खेळणी,पुस्तके सगळच आणून दिल. त्या दिवशी विशुच्या सिध्दार्थची गोष्ट्च त्याने थक्क डोळ्याने ऐकली.
   
    पण तरी विशुच्या प्रामाणिकपणाची किंमत एवढ्याने होणार नाही. आबांना एकदम वाटले हे घर आपल्या पश्चात विशुच्या नावावर करावे. समीर आणि अमोल काही भारतात परत येणार नाहीत.शिवाय दोघांनी इकडे घरे घेतलेलीच आहेत. श्रीधर आणि मालुलाही देवदयेने काही कमी नाही. विचारानेच आबांच्या मनात उत्साह आला.  हा विचार लवकरात लवकर मुलांजवळ बोलायचे ठरवले त्यांनी. त्या उत्साहात आबांनी अंघोळ वगैरे आन्हिके उरकली.अंघोळ करतानाही त्यांच्या मनात विशुचेच विचार होते, आता सुरेशला फोन करतो, सुरेश म्हणजे आबांचा शाळु सोबती चांगला वकील आहे,त्याची प्रॅक्टीस मुलगा आणि सून पुढे चालवतात.त्याच्याकडून कायदेशीर बाबी समजावुन घेतलेल्या बऱ्या.

    कुसुमताई आल्या त्यांनी स्वयंपाक केला. त्यांच्या मुलीने घराची साफ सफाई केली. आबांनी पेपर वाचून संपवला. त्या मायलेकी बाहेर पडल्या तेंव्हा दहा वाजले होते. फोन वाजला आबांनी फोन उचलला आणि चक्क फोनवर सुरेशच.आबांना फार बरे वाटले
"अरे मी तुलाच फोन करणार तेवढ्यात तुझाच फोन आला"
" मार थापा लेका ,माझा फोन आला कि तुझ हे वाक्य ठरलेल आहे"
" नाही रे ,आज मी तुला फोन करणार कारण माझ तुझ्याकडे महत्त्वाच काम आहे?"
" काय झाल ?"
" काही नाहीरे पण फोन वर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलू ना,येतोस का घरी माझ्या निवांत बोलू"
"पाऊस बघतोस ना किती पडतोय आत्ता जरा कमी झालाय"
" पण मी विशुला पाठवतो ना तुला आणायला मग तर झाल ,जेवायलाच ये म्हटल असत पण कुसुमताईंनी किती आणि काय केलय तेही बघितल नाही अजून"
" जेवणाच नाही रे तेवढ महत्वाच ,येतो मी पाठव विशुला तू येतो मी अकरापर्यंत
विशु आला साडेदहा वाजता.
"आबा आज बॅंकेत जायचय का?"
" नाही विशु आज सुरेश कडे जावुन त्याला इकडे घेऊन येतोस? हे बघ आणि पैसे घेऊन येताना जोशी स्वीट मधुन सुरळीच्या वड्या आणि काहीतरी गोड घेउन ये"
"ठिक आहे, सुरेशकाकांना सांगुन ठेवलय का त्यांना फोन करताय?"
"झालय बोलण त्याच्याशी निघ तू"
सुरेश आला.
बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे भरपूर गप्पा झाल्या,मग आबांनी घराबद्दलचा विचार सुरेशबद्दल बोलून दाखवला
 विशुच्या नावाने घर करुन देण्यात काही कायदेशीर अडचण नाही ना? असे विचारले.
" तुझी स्वकष्टार्जित मालमत्ता तू कुणालाही देवु शकतोस.पण मला विचारशील तर तू आत्ता त्याबद्दल विशुजवळ काहीच बोलू नको आणि मुलांना विश्वासात घेतल्याखेरीज काही करु नकोस"
"मुलांच्या कानावर घालणारच आहे,पण त्यांना सल्ला मागणार नाही तर निर्णय सांगणार आहे"
"ठिक आहे,तुझी मुले काही म्हणतील अस वाटत नाही,कारण त्या दोघांना काहीच कमी नाही हा भाग असला तरी मोह कुणाला सुटलाय? ,पण मुलांना न कळवता परस्पर  केलेस तर ती दोघे दुखावतील.शिवाय तुझ्या सुनांबद्दल मला काहीच माहित नाही."
"सिमरन आणि अमृता गोड मुली आहेत त्या दोघीही कमावत आहेत,मला नाही वाटत त्या काही बोलतील पण तू म्हणतोस तसे त्यांना विश्वासात घेवुन नक्की सांगतो, तुझ्याकडून कायदेशीर बाबी नंतर पूर्ण करू"
चांगले विचार मनात आले कि त्वरित आमलात नाही आणले तर ते नाहिसे होतात असे आबांनी वाचले होते. सुदैवाने तो शनिवार होता, मुलांशी दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांच्या शनिवारच्या रात्री सविस्तर बोलायचे त्यांनी ठरवले. त्या रात्री त्यांनी समीरला फोन करुन अमोलला पण बोलावून घ्यायला सांगितले आणि रविवारी सकाळी दोन्ही मुले आणि सुनांना एकत्र स्काईप कॉल लावला.मुले थोडी काळजीत पडली होती, आई सारखाच बाबांना काही आजार डिटेक्ट झालाय का? दोघांना एकत्र काय सांगायचे असेल? आत्या,काका ठिक असतील ना? नाना विचार त्या चौघांच्या मनात येवुन गेले
पण स्क्रिन वर बाबांचा नेहमीसारखा आनंदी चेहरा बघून त्यांचे टेन्शन एकदम कमी झाले
"बाबा ,आज अचानक चौघांशी एकत्र बोलावस का वाटल तुम्हाला ?" अमोलने सुरुवात केली
" तुमचा जास्त वेळ न घेता एकदम मुद्द्याचच बोलतो, माझे वय आता ८२ आहे, माझ्या दृष्टीने मी आयुष्य उत्तम जगलोय ,आता कुठली आशा ,अपेक्षा उरल्या नाहीत. माझे सध्याचे जगणे सुकर करण्यात विशुचा खूप मोठा वाटा आहे.तो माझा नुसताच ड्रायव्हर नाही तर माझी सगळी काळजी तो घेतो.माझे सगळे आर्थिक व्यवहार तो बघतोच पण माझे दुखले,खुपले तो प्रेमाने बघतो.मी त्याला जो पगार देतो त्याहुन कितीतरी पटीने तो माझ्यासाठी करतो माझा आधारच आहे तो. त्याला मी काही प्रोव्हींडट फंड देत नाही कि कुठला इंन्शुरन्स नाही त्याची बायको खानावळीत काम करते. मुलांचे शिक्षण मी करतो पण त्याच्या भविष्याची मलाच काळजी वाटते म्हणून मी ठरवलय माझे राहते घर मी त्याच्या नावाने करावे"
एका दमात बोलल्याने आबांनी पाणी प्यायला घेतले मधले दोन चार क्षण शांततेत गेले
सिमरन आणि अमृता एकमेकींकडे बघत होत्या,समीर आणि अमोलही शांत होते , ते चार दोन क्षण आबांना जिवघेणे वाटले ते काही बोलणार तेवढ्यात समीर म्हणाला ," आबा तुम्ही पूर्ण विचार करुन निर्णय घेताय ना? विशुने तुम्हाला धाक वगैरे नाही ना दाखवला ?"
"नाही रे मुलांनो.त्याला मी अजून काहीच बोललेलो नाही आणि बोलणार पण नाही एवढ्यात सुरेशशी सकाळी बोललो आणिआता तुम्हाला सांगतोय"
"बाबा, आम्हाला तुमची काळजी वाटते,सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तुम्ही तिकडे एकटे राहता हे क्रेडीटेबल आहे पण पैशासाठी माणसे काय काय करु शकतात हे वाचतो,पाहतो आणि मग वाटते का तुम्ही ओल्ड एज होम मधे जात नाही?"
" अरे माझे हात पाय अजुन चालत आहेत, स्वातंत्र्याची माणसाला किती सवय होते हे मी तुम्हाला सांगायला हवे का? अगदी विकलांग झालो तर मग आहेच तो पर्याय, सध्या तो विषयच नाही,विशु माझ्या करता किती करतो ते तुम्हाला माहित आहेच.माझ्या निर्णयावर तुमचे मत मला ऐकायच आहे ,तुम्हाला विचार कराय़ला वेळ हवा आहे का?"
" नाही बाबा, तुमचे घर आहे, तुम्हाला हवे ते तुम्ही करु शकता ,फक्त लिगल मॅटर काय ते बघा आणि त्याला कधी सांगाय़चे ते सुरेशकाकांच्या सल्ल्याने बघा " समीर म्हणाला
"हो बाबा, दादा म्हणतोय ते खरे आहे, आणि विशु खरचच चांगला मुलगा आहे त्याला घर दिलेत तर त्याचे खूप प्रोब्लेम्स सॉल्व्ह होतील " अमोल म्हणाला
"सिमरन ,अमृता तुमच काय म्हणण आहे?"
"आम्ही काय़ सांगणार ? विशु is genuine guy, and it's your property " सिमरन उद्गारली
" बाबा,खूप छान विचार आहे तुमचा, मला आवडला तुमच्यासाठी करणा़ऱ्या विशुला तुम्ही घर दिलेत तर त्याच्यासारख्या अनेक मुलांना तुमच्या सारख्या सिनियर लोकांसाठी काम करावेसे वाटेल" अमृता म्हणाली
अमृताच्या बोलण्याने आबांना दिलासा वाटला. हि सगळ्यात धाकटी सून आपल्याला किती अल्लड वाटायची पण इतका वेगळा विचार करते !
" मला छान वाटले ,समीर,अमोल मला खात्री होती तुम्ही माझ्या निर्णयाला पाठींबा द्याल आणि सिमरन,अमॄता पण वेगळ वागणार नाहीत तरीही तुम्हाला सांगितल्याशिवाय कुठलेहीआर्थिक व्यवहार कराय़चा नाही असे मी ठरवले होते.तुम्ही माझ्या निर्णयाला विरोध केला असतात तर काय करायचे हे मात्र मी ठरवले नव्हते "
"बाबा तुम्हाला काय कराय़चे ते तुम्ही जरुर करा,पण निरवानिरव कशाला ? तुम्ही आम्हाला हवे आहात " अमृता भरल्या गळ्याने म्हणाली
"आपण कुणाला तरी हवे आहोत हे शब्दच आम्हा म्हाताऱ्यांना जगण्याचे बळ देतात पण हव हव असताना जाण्यात मजा आहे "
"बाबा, तुम्ही काय त्या लीगल प्रोसिजर्स पूर्ण करुन इकडे या बर ,आपण इकडे मजा करु " समीर म्हणाला
"खरच बाबा,पुढच्या आठवड्यात मुलांच्या सुट्ट्या सुरु होतील ,गेल्या महिन्यापासून तुम्हाला सांगतोय या तुम्ही इकडे" सिमरन म्हणाली
"बघू, तुम्हीच का नाही येत इकडे"
"तुम्हीच या आपण ट्रिप ला जाऊ,तुमचे इनामदार आलेत इकडे"
गप्पा बऱ्याच रंगल्या.तासभर बोलून मुलांनीच इकडे येवुन जाताना आबांना  तिकडे नेण्याचे ठरुन कॉल संपला
आबांच्या डोक्यावरचे ओझे उतरले.नंतरचा आठवडा गडबडीत गेला त्यांनी कायदेशीर मॄत्यूपत्र करुन आपली वास्तू विशुच्या नावाने करायचे लिहून ठेवले. सुलूचे दागीने त्यांनी पूर्वीच सुनांना दिले होते.स्वतःची जंगम रक्कम काही संस्थांना,काही विशुच्या मुलांच्या नावानी करुन ठेवली.

    अमोल ,अमॄता मुलांना घेवुन येणार असल्याचे त्यांनी कळवले.समीरला नव्या प्रोजेक्ट मुळे वेळ होणार नव्हता.मुले,नातवंडे येणार म्हणून आबा खुषीत होते.विशुच्या मदतीने त्यांनी सगळी तयारी केली. अमोल ,अमॄता अबीर आणि अनुजा आले घर भरुन गेले.दोन दिवसांनी मालू आली.श्रीधरचा मुलगा सून एक दिवस आले,सगळ्यांनी पावसात रायगडावर जायचा बेत आखला.सगळ्या दगदगीने आबांना ताप भरला.अमोल  आबांना डॉक्टरकडे घेवुन   गेला.पण म्हणता म्हणता सर्दी-ताप वाढून दुखणे नोमोनियावर गेले हॉस्पिटल ,औषधे सगळे झाले आणि आबांनी चार दिवसातच जगाचा निरोप घेतला
    सगळ्यांनाच हा धक्काच होता,समीरला कळवले,तो पण लगेच निघुन आला. विशुच्या दुःखाला पारावार उरला नाही. त्याच्यावर आबांनी वडीलांप्रमाणेच प्रेम केले होते आणि आता तर त्याला त्यांचाच आधार होता.आबांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान केले. कुठलेही धार्मिक विधी करु नका असे त्यांनी लिहूनच ठेवले होते. आबा गेले, त्यानंतर ठरल्याप्रमाणे  एक आठवड्य़ानंतर अमोल,अमॄता जाणार होते.आता त्यांच्याबरोबर त्यांचे आबा नसणार .समीरही आलेला होता. दोन दिवसातच दोघांनी सुरेश काकांना बोलावुन घेतले.आबांच्या मॄत्यूपत्राचे वाचन कराय़चे ठरले.विशु खाली गाडीपाशी होता.त्याच्यासमोर आता अनेक प्रश्णचिन्हे होती. नोकरी अशी ध्यानिमनी नसताना गेली होती.आबांचा त्याला खूप आधार होता.मधुन मधुन बायको दुसरीकडे नोकरी बघा म्हणायची ,पण आबांबद्दल फार माया वाटायची आपण नसलो तर म्हाताऱ्याच कस होईल ,नोकरी करुन सकाळ ,संध्याकाळ फेरी मारली असती तरी भागल असतं त्यांच्याकडे काम फार नसायच पण त्यांच्यांशी गप्पा मारतानाही बर वाटायच. आता समीर भाऊंना विचारू गाडी द्याल का वापरायला, टूरीस्ट कार म्हणून वापरु.पण विचारयला जीभ रेटेल का? पोरांच काय सांगता येणार नाही.उगाच अपमान नको व्हायला

"विशु अंकल,तुम्हाला पप्पा बोलवतोय " अबीरच्या आवाजाने विशुच्या विचारांची साखळी तुटली
तो जिने चढुन वर गेला.हॉल मधे सगळे बसले होते तो कोपऱ्यात उभा राहिला
"बैस विशु " समीर म्हणाला
"बाबांचे मॄत्यूपत्र वाचल, त्यांनी हे घर तुझ्या नावानी करायला सांगितले आहे,तेंव्हा हे घर आता तुझे आहे विशु "
ऐकून विशुला हुंदकाच फुटला
"रडू नको विशु,तू बाबांच खूप प्रेमाने केलेस तुझ्या जीवावर आम्ही तिकडे निश्चिंत होतो,गेल्याच महिन्यात बाबा आमच्याशी सगळे बोलले होते " अमोल म्हणाला
"ती वेळ इतक्या लवकर येईल अशी आम्हाला कल्पना नव्हती " समीर
"कदाचित त्यांना आपल्या मॄत्यूची चाहूल लागली असेल " अमॄता
"विशु आम्हाला वाटते बाबांची गाडी पण तूच घे तू ती वापर तुझं ड्रायव्हींग चांगल आहे,बाबा नेहमी म्हणायचे  .हल्ली उबेर,ओला कंपन्या निघाल्य़ात मी तुला मदत करेन त्यांच्या तर्फे तुला पुण्यातच गाडी चालवून किमी वर पैसे मिळतील " अमोल म्हणाला
विशुला बोलवत नव्हते त्याचे डोळे गळतच होते
मोठ्या मुश्कलीने डोळे पुसत तो म्हणाला," आबा मला माझ्या वडलांच्या जागी होते त्यांनी काही द्याव म्हणून मी नव्हतो हो करत मला पगार मिळतच होता ना "
" अरे वडील मानत होतास ना ,म्हणूनच या घरावर त्यांनी तुझे नाव घातले आहे.आम्हाला त्यांनी भरपूर दिलय तू नाही म्हणू नको "
"समीर दादा,अमोल दादा माझ्या सख्या भावाहून तुम्ही माझ्यासाठी करताय कसे फेडू तुमचे उपकार ?"
"अरे आम्ही आबांची मुले,म्हणजे तुझे मोठे भाऊच ना, मग उपकार कसले मानतोस.भावासारखी माया कर म्हणजे झालं" अमोल म्हणाला
"आम्ही  पुढल्या आठ्वड्यात  निघणार,तोवर इथे राहिलो तर चालेल ना विशु?"
"असं बोलून मला लाजवता होय? रहा कि हवे तेवढे दिवस आणि आबा गेले तरी इकडे यायच सोडू नका "
" अरे येऊना आम्ही ,आई बाबा नसले तरी आमचे काका आत्या आहेत कि इथे आणि हा देश आमचा पण आहेच ना?"
सुरेश काका बाकीच्या फोर्म्यालिटिज पूर्ण करुन कागदपत्रे तुझ्या ताब्यात देतील आम्ही असतानाच सगळे काम होईल असे आम्ही बघू आणि जाताना आम्ही तुला घराची किल्ली देवू.



एका सत्यघटनेवर आधारित कथा आहे हि.आजकाल आम्ही स्वदेशात मुले परदेशात अशी घरोघरी गत झालेली आहे.पैसा आहे पण मुले जवळ नाहीत, असलेल्या पैशाचा उपभोग घ्यायला शरीर साथ देत नाही,कुठे जोडीदार गेल्याचे दुःख आहे. हि मंडळी मग इथल्या कुठल्या नातलगाच्या,नोकरांच्या साथीने जीवन कंठंत असतात.त्यांच्याजवळ असणा्री स्थावर-जंगम  मात्र मुलांनाच द्यायची यांची इच्छा असते.तिकडच्या मुलांनाही भरपूर मिळूनही आईवडीलांच्या मालमत्तेवर हक्क दाखवाय़चा असतो अशी अनेक उदाहरणे मी जवळून पाहिली .मग मला वरील घटना कथारुपात लिहाविशी वाटली.आबांनी विशुवर उपकार केलेत असं नाही पण त्याच्या प्रामाणिकपणाचे मोल जाणुन त्याचे योग्य बक्षिस त्यांनी दिले आणि त्यांच्या मुलांनी पण वडीलांच्या निर्णयाचे स्वागत केले हा मुलांचा मोठेपणा मला ठळकपणे जाणवला.आज एक भाऊ परदेशात असेल तर इथे राहणाऱ्या आपल्या सख्या भावाला आईवडीलांची मालमत्ता द्यायला त्याची तयारी नसते तेंव्हा त्याला हक्क आठवतो पण आई-वडीलांची दुखणी बाणी काढण्यातली कर्तव्यकसूर केली असते त्याकडे डोळेझाक असते आणि मग सुरु होतात भांडणे. अशा सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हि घटना मला फार भावली. आपण आपल्या विकासासाठी देशाच्या सीमा पार केली तशीच मनाची दारे विशाल करायला शिकलो तर किती प्रश्ण सुटतील ना?

Tuesday, February 27, 2018

लळा जिव्हाळा शब्दच खोटे

काही व्यक्तींशी आपले नाते सहज जुळून जाते आणि काहींशी कितीही काळ गेला,कितीही प्रयत्न केला तरी अंतर जाणवतच राहते. माझे सासर कानडी.सासु-सासऱ्यांचे सक्खे,चुलत असे खूप मोठ्ठे गोत, मला माणसांची सवय होती तरी  भाषेच्या अडसराने काही वेळा नाती समजून घ्यायला वेळ लागायचा. आमच्या घरी सतत माणसांचा राबता होता त्यामुळे पहिल्या दोन -तीन वर्षात मला बरेचसे नातलग माहित झाले. नवऱ्याच्या एक चुलत मावशी कऱ्हाडला बरेच वर्षे असल्याने मराठी बोलू शकायच्या त्यांच्या यजमानाचे बालपण पुण्यात गेल्याने ते पण उत्तम मराठी बोलत . त्या पुण्यात रहायला आल्या आणि आमच्याघरी त्यांचे जाणे-येणे सुरु झाले.मराठी बोलू शकत असल्याने माझ्याशी त्या आवर्जुन बोलत. म्हणायला मावशी पण त्या माझ्या मोठ्या नणंदेच्या वयाच्या त्यामुळे मला त्यांचा सासू असा धाक वाटत नसे.त्यांची जुळी मुलेपण त्यावेळी कॉलेजमधे होती त्यांचेही सतत जाणे येणे होई.माझ्या मुलींचे वाढदिवस,गणपती अशा नाना कारणा प्रसंगांना जाणे-येणे झाल्याने आमचे सूर छान जुळले.माझ्या सासुबाईंच्या अकस्मिक निधनानंतर तर मला मावशी आणि काकांचा खूपच आधार वाटला. त्यावेळी आमचे घर त्यांच्या घराजवळच होते. सहाजिकच एकमेकांकडे जाणे,भेटणे सहज होई.

     या मावशींना ऐन तारुण्यात कॅन्सर सारख्या व्याधीने ग्रस्त केलं, सुदैवाने आजार वेळीच लक्षात आला.त्यांची जुळी मुले अगदीच अडनिड्या वयातली होती ,त्यांच्यातल्या आईने मनाच्या तीव्र निर्धाराने आजाराशी सामना केला, दोन्ही स्तन पाठोपाठ काढावे लागले पण लवकरच त्या आजारातून बऱ्या होवुन कामालाही लागल्या.याच वेळी त्या पुण्यात आल्या. माझ्या सासुबाई त्यांची मोठी बहीण त्यांनी आपल्या मुलीच्या वयाच्या या बहीणीला छान मानसिक,भावनिक आधार दिला.मुलांची शाळेची महत्वाची १० वी बारावीची वर्षे सुखरुप पार पडली दोन्ही मुले इंजिनियरींगला गेली ,आणि मावशींच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले, गर्भाशयात कॅन्सर पसरला. पण मावशी आता आजाराला अजिबात भित नव्हत्या. त्यांनी स्वतःच हॉस्पीटलमध्ये जायची बॅग भरली.मुलांसाठी स्वयंपाकाला बाई बघितली. माझ्या सासुबाई त्यावेळी या जगात नव्हत्या. मी ऑपरेशनच्या आदल्या दिवशी भेटायला हॉस्पिटल मध्ये गेले ,माझे मन खूप धास्तावलेले होते.पण मावशी सुरेख ड्रेस,केसात गजरा माळून आरामात कॉटवर बसलेल्या होत्या,नेहमीच्या हसतमुखाने त्यांनी माझे स्वागत केले. त्यांनी त्यांचा आणि यजमानांचा दोघांचा डबा आणला होता.मला म्हणाल्या, " घरी हे एकटे जेवणार नाहीत म्हणून मग त्यांच जेवण ही इथेच आणलयं" त्यांच्या पराकोटीच्या आशावादामुळे ,परमेश्वराच्या कृपेने अतिशय तज्ञ डॉक्टर मिळाले आणि यावेळी देखील ऑपरेशन यशस्वी झाले.मावशी पूर्ण बऱ्या झाल्या. मुलांची शिक्षणे पार पडली, त्यांना चांगल्या नोकऱ्या पण मिळाल्या. एव्हाना आम्ही जागा बदलून मावशींच्या घरापासून खूप दूर शहराच्या दुसऱ्या टोकाला रहायला गेलो. सहाजिकच गाठी-भेटी कमी झाल्या,फोनवरच बोलणे होऊ लागले. माझ्याही मुली मोठ्या होऊन त्यांची महत्वाची शैक्षणिक वर्षे सुरु झाली. घर,नोकरी,मुलींचे अभ्यास यात मला डोके वर काढणे कठीण होऊ लागले.

    यथावकाश मावशींच्या मुलांची लग्ने झाली. मावशींना मनाजोगत्या सुना आल्या. मुले आधी परगावी नंतर परदेशी गेली. मावशी आणि काकांना कधीच एकटेपणा जाणवला नाही कारण मावशींनी स्वतःला व्यस्त ठेवले होते.त्या रोज भजनी मंडळात जात. पुण्यात आणि पुण्याबाहेरच्या सगळ्या नातलगांच्या छोट्या मोठ्या समारंभाना जाणे,नवरात्रात सप्तशतीचा पाठ करणे यामुळे वेळ चांगला जाई.मोठ्या आजारांतून सुखरुप बाहेर आल्यामुळे कदाचित देवावरची श्रध्दा अधिकच दृढ झाली असेल, मुले जवळ नसल्याने आलेलं रिकामपण विसरायला त्याचाच आधार वाटत असेल, काही असेल पण मावशी आणि काकांच आयुष्य मजेत चालल होतं हे नक्की.गावाकडचा रामनवमीचा उत्सव असो कि गोंदवल्याचा उत्सव असो ,ब्रह्मानंद महाराजांचा उत्सव सगळीकडे मावशी व काका आवर्जुन जात .मावशींना पाच सख्ख्या बहिणी तीन भाऊ.काकांचे तीन भाऊ व एक बहीण प्रत्येकाच्या घरची कार्ये,पुण्यातील अनेक नातलग,मित्रपरीवार ,भजनी मंडळाचे कार्यक्रम, भिशीच्या मैत्रीणींबरोबर सहली यासगळ्यात दिवस छान चालले होते. यातच वर्षा -दोन वर्षातून मुलगे-सुना येत .एकावेळी एकच जोडी येई.मग त्यांच्या बरोबरचे आठ पंधरा दिवस तर पंख लावल्यासारखे निघून जात. मावशींना एक नातू आणि एक नात झाली होती मग काय ते आले कि एखादे गेट टु गेदर होई.

    पण या सगळ्या सुखाला दृष्ट लागावी अशी घटना घडली,मावशी परत आजारी पडल्या.एकदा संध्याकाळी जावेबरोबर कुठल्याशा कार्यक्रमाला जायला तयार होवुन त्या बाहेर पडल्या जिना उतरल्या आणि कुणला काही समजायच्या आत त्या खालीच बसल्या ,काय होतय हे त्यांना देखील कळले नाही, कुणीतरी रीक्षा दारात आणली त्यांना हाताला धरुन रिक्षात बसवले,तेंव्हा त्या ठिक झाल्या ."काय आचानक पायातली शक्ती गेल्यासारखे झाले वाटतं. डॉक्टर कडे नको जायला ",असे म्हणत  ठरलेल्या ठिकाणी त्या गेल्या. पण ती त्या भीषण आजाराची सुरुवात होती. मावशींना एक असाध्य आजार झाला .शरीरातील सगळे स्नायु हळूहळू निकामी होण्याचा आजार.ज्यावर काही ठोस वैद्यकीय उपाय नसलेला आजार.
मग नाना उपाय झाले,ऍलोपाथी,आयुर्वेदिक,होमिओपाथी सगळे झाले.मावशींचे हिंडणे फिरणे एकदम कमी झाले. त्या वॉकर घेवुन चालू लागल्या .त्याही परिस्थितीत उडपीला जावुन ट्रिटमेंट घेतली पण फारसा उपयोग नाही झाला.मावशींनी मग त्याचाही शांतमनाने स्विकार केला.आता घरातच रहावे लागणार होते. मदतीला बायका आल्या,नंतर चोवीस तासासाठी दोन आया ठेवल्या.मावशींच्या मैत्रीणी येत असत.आता त्यांच्या घरातच भजन होवु लागले. परिचित,नातलग भेटायला येत.सख्ख्या बहिणी,चुलत बहिणी राहुन जात. मी जेंव्हा जेंव्हा त्यांना भेटायला जाई,किंवा फोन करे, त्यांच्या तोंडून कधी निराशेचा सूर ऐकला नाही.घरी गेले तरी त्या पलंगावर नीट आवरुन बसलेल्या,फार तर पडलेल्या असत. स्वतःची प्रकृती सोडून इतर विषयांवर गप्पा मारत.
   
    नोकरी,घरकाम,माझ्या तब्येतीच्या कुरबुरी आणि त्यांचे लांब घर यामुळे मनात असूनही मला नेहमी जायला काही जमत नव्हते. माझा नवरा मात्र वेळात वेळ काढुन,वाकडी वाट करुन मावशीला भेटुन येई.दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावतच होती,आता बोलणे बंद झाले, हात काम करत नव्हतेच, पण भरवलेले अन्न खाणे कठिण होवु लागले. काकांची शुगर मावशींच्या ढासळत्या तब्येतीला बघून वाढू लागली. मावशींच्या काळजीने काका खंगू लागले.

    अखेर काल दुपारी मावशी गेल्या. त्यांचे खूप हाल होत होते,सुटका झाली त्यांची. साडेचार वाजता काकांचा मावशी गेली हि बातमी सांगणारा फोन आला, आम्ही दोघे तिकडे जाईपर्यंत साडेपाच पावणेसहा झाले होते. आजुबाजुची मंडळी येत होती.पुण्यातले नातलग येत होते.मावशींच्या मैत्रीणी येत होत्या. काकांना कमालीचा खोकला झालेला होता,पण ते म्हणत होते ,"मी देवाला विनवत होतो,माझ्या आधी तिला ने, मी आधी गेलो तर हिच्या कडे कोण बघणार? आता मी मरायला मोकळा झालो " .कोणीतरी मुले कधी ,कशी येणार याबद्दल विचारले, आम्हाला त्या गेल्याची बातमी काकांनी सांगितली त्यावेळी मुले येतील तोवर तिला हॉस्पीटलच्या कोल्ड स्टोअरेज मधे ठेवणार असल्याचे ते म्हणाले होते. पण आम्ही पोचलो त्यावेळी रात्रीच सगळे उरकणार असे समजले.आम्हाला फोन केल्या नंतर त्यांचे मुलांशी बोलणे झाले आणि दोघांनाही लगेच येणे शक्य नसल्याने निर्णय बदलला होता.

    मावशी आणि काकांची हि गोष्ट प्रातिनिधिक आहे असं मला वाटत. आमच्या पिढीतील बह्तेकांचे भविष्य याच अंगाने जाऊ शकते. एखाद-दुसरे मुल आणि त्याला मिळलेल्या उच्च शिक्षणानंतर त्याचे चांगल्या भवितव्याकरीता परगावी,परदेशी जाणे अगदी स्वाभाविक आहे. पण त्या मुलांमध्ये आपली होणारी भावनिक गुंतणूक काहिशी आजच्या काळानुरुप अस्वाभाविक आहे. दोन्ही मुलांचं परदेशात निघून जाणं हे तर मावशींच्या आजारामागच कारण नसेल ? शारीरिक आजारामागची मानसिक कारणे फारशी विचारात घेतली जात नाहीत. ज्या आईने आपल्या जिवघेण्या आजारावर मुलांच्या मायेपोटी मात केली त्या माउलीला मुले शिकून सवरुन स्वावलंबी झाल्यावर आपापल्या बायकांबरोबर निघून गेली याचा काहीतरी त्रास होतच असेल .वर्षा-दोन वर्षातून कसे-बसे आठ दिवस यायचे त्यातही एखादी ट्रीप, सासुरवाडी,मित्र-मैत्रीणी यातुन आईच्या वाट्याला किती येत असतील? बोलून दाखवता न येणाऱ्या अशा बऱ्याच घटनांचा एकत्रित परीणाम शरीरावर आजाराच्या रुपात दिसतही असेल.
   
    माणसाच्या मेंदू प्राण्यांचा मेंदूपेक्षा जास्त विकसित झालेला  असतो हे लहानपणापासून वाचलय,शिकलय. भावना आणि विचार हि मानवी मेंदुतील दोन केंद्रे.मानवाच्या मेंदुचा विकास हा त्याच्या वैचारिक मेंदुचा विकास आहे.इतर प्राणी माणसाइतका विचार करु शकत नाहीत भावनिक बुध्दीबद्दल वाचताना असे वाचले होते कि भावनिक मेंदू किंवा भाव भावना या माणसाला फार पूर्वीपासून आहेत  विचार करण्याचे केंद्र त्या मानाने अलिकडचे. ज्यावेळी माणसाला भिती,राग,किंवा अस्तिवाचा प्रश्ण येतो त्यावेळी भावनिक मेंदूकडून कार्य केले जाते वैचारिक मेंदूशी असलेले कनेक्शन् तात्पुरते तुटते आणि त्यामुळे माणूस काहीवेळा अघोरी वर्तन ही करू शकतो नंतर त्याच्यावर पश्चात्तापाची वेळही येते. बरेचदा  जिवघेणी भांडणे,एखाद्या व्यक्तीची हत्या हि  अविचारी कृत्ये माणसाच्या भावनेच्या भारात घडलेली असतात.विवेकी विचार आणि भावनांचे भान राखणारा माणूस समाधानाचे आयुष्य जगू शकतो असे विज्ञान सांगते. पण असे मनात येतयं की अतिप्रगत मानवाच्या या बुध्दीविकासामुळे त्याच  मन संवेदनाशील राहिलं नाही का? त्याच्या भावना बोथट झाल्यात का?  आईच्या मॄत्यूची बातमी समजल्यावर वडीलांच्या काळजीपोटी,तिला अखेरच तरी बघता यावं यासाठी काय वाट्टेल ते करायला मन सरसावत नाही कारण त्यावेळी विचारी मेंदू समजावतो ,"आता जाऊन काही उपयोग होणार नाहीये, गेलेली व्यक्ती परत येणार नाही,बाबांकडे बघायला बरेच लोक आहेत तेंव्हा उगीच अव्वाच्या सवा पैसे मोजून तिकिट काढा ,रजेसाठी धावपळ करा आणि असलेले प्रश्ण वाढवा हे करण्य़ापेक्षा जमेल तसे जाऊ "
विचारी मेंदूचा विजय होतो आणि इकडे फोनवर सांगितले जाते ,"लगेच निघणे शक्य नाही आमची वाट बघू नका, आईचे अंत्यविधी उरकून घ्या "

    भावनेच्या भारात वाहून न जाणे समजू शकते पण एखाद्याच्या दुःखात काडीमात्र सहभागी न होता आपल्या ठरलेल्या वैयक्तिक कार्यक्रमात बदल न करणे हे कशाचे लक्षण समजायचे?  असेच आणखी एक उदाहरण, अनेक वर्षे एकत्र काम करणाऱ्या दोन डॉक्टरांपैकी एकाच्या मुलाचे लग्न झाले  त्या समारंभाला दुसरा गेला.लग्नाची धामधूम झाली नंतर दुसरा डॉक्टर अचानक आजारी पडला त्याचे दुखणे इतके विकोपाला गेले कि त्यात त्याचा शेवटच झाला एका वयाचे ,अनेक वर्षे एकत्र काम करणारे त्यातला एक अकाली गेला पण दुसऱ्याने मुलाच्या लग्नानंतर श्रमपरिहाराकरीता ठरवलेली सिंगापूर सहल रहित केली नाही,आपला सहकारी अकाली गेला त्याच्या कुटुंबियांना मानसिक,भावनिक आधार देण्यापेक्षा आपला श्रमपरिहार महत्वाचा वाटणे हा कुठला बौध्दिक विकास आहे?

    अशा वेळी whatsapp वर वाचलेली एक घडलेली घटना आठवते, लाँरेंन्स  अँथनी नावाच्या व्यक्तीने वनचर प्राण्यांना वाचवून त्यांचे जगभरात पुनर्वसनाचे मोठे काम केले. सात मार्च २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.त्यांच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी ३१ हत्तीचा एक कळप दोन हत्तीणींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या घरी आला आणि दोन दिवस व दोन रात्री अन्नपाणी काहीही न घेता त्यांच्या अंगणात बसून राहिला , नंतर हे हत्ती आले तसेच निघूनही गेले.आपल्या रक्षणकर्त्याला मानवंदना करण्यासाठी हे गजगण थोडाथॊडका नाही तर २० किमी.चा प्रवास चालत करत आले.हे हत्ती त्यापूर्वी तीन वर्षात त्यांच्या घरी एकदाही आलेले नव्हते, इतकच नव्हे तर त्या हत्तींना लाँरेंन्स  अँथनींच्या मॄत्यूची बातमी कोणी सांगण्याची शक्यता नव्हती .केवळ आपल्याला जीवदान देणाऱ्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता मनात ठेवून त्याला अखेरचा निरोप द्यायला, हत्ती एवढ्या लांबवर इतक्या मोठ्या संख्येने चालत आले !
    शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेमध्ये त्यांच्या लाडक्या कुत्र्याने उडी मारुन आपल्या निष्ठेचा वास्तुपाठ दाखवला,साने गुरुजींच्या ’शामच्या आई ’ पुस्तकात ते लिहितात,त्यांच्या आई वारल्यानंतर तिच्या आवडत्या मांजरीने अन्न पाण्याचा त्याग केला आणि दोन -तीन  दिवसात ती पण मरुन गेली. कुत्री,मांजरे,हत्ती यांसारखे प्राणी माणसावर असे निरपेक्ष प्रेम करतात आणि पोटची मुले विचार करतात !

    विज्ञानयुगाचा हा शापच म्हणावा लागेल, हल्लीच्या शिक्षणाने माणूस आत्मकेंद्री होतोय असं माझे वडील म्हणत असत मला त्यावेळी त्याचा अर्थ समजत नव्हता पण आता तो फारच चांगल्या रितीने समजला आहे. कारण जुन्या पिढ्यांमध्ये असे क्वचित घडत होते. आपल्या आजारी आईला भेटावयास जाण्याकरीता रजा मिळाली नाही त्यावेळी ब्रिटीश सरकारच्या नोकरीचा तात्काळ राजिनामा देणारे ईश्र्वरचंद्र विद्यासागर आठवले.आपल्या मातृभूमीकरीता आपले  शिक्षण,घर-दार, संसार यांवर पाणी सोडणारे असंख्य क्रांतीवीर आठवले.

    सगळाच दोष नव्या पिढीला देणेही कितपत योग्य आहे? असा विचार पण येतोच,शेवटी आमचे संस्कार कमी पडत असतील. बाहेरच्या स्पर्धेच्या रेट्यात टिकायचे म्हणून ही पिढी सतत ताणाखाली  आहेच. त्यांना आई-वडीलांचे प्रेम नाही असे नाही पण त्याकरीता द्यावा लागणारा वेळ त्यांच्या कडे नाही. मावशींच्या औषधपाण्याला,त्यांच्या आया-दायांना लागणारा पैसा मुले पुरवित होतीच की? पण मावशींना त्यापेक्षा मुलांच्या सहवासाची गरज जास्त होती ती पुरवणे मुलांना जमले नाही.

    आता या सगळ्याचा आपणही स्विकार करुन घेणे जरुर आहे.मुलांना योग्य तेवढे शिक्षण देवुन त्यांच्या पंखात बळ देणे हे आपले कर्तव्य आहे,मग बळ आलेले पंख घेवुन पिल्ले दूर जाणार याची मानसिक तयारी आधीपासून करुन घेतली पाहिजे आणि सुरुवातीपासूनच मन हरीभजनात गुंतवले पाहिजे. मुलांमधली भावनिक गुंतणूक कमी करुन आपापल्या आवडीनुसार कुठल्यातरी व्यापात स्वतःला गुंतवुन घेणे जरुर आहे.