Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Wednesday, March 14, 2018

मन केवढं केवढं

पावसाने उच्छाद मांडला होता. पहाटे पाचलाच जाग आली होती  पण पांघरुणातुन उठायचे आबांना जीवावर आले होते. सहा वाजून गेले होते, गरम गरम चहा प्यायची अनावर हुक्की आली होती पण कोण करुन देणार ? तसा सकाळचा पहिला चहा आबाच गेली अनेक वर्षे करीत. सुलूच्या नसण्याचा त्याच्याशी काही फारसा संबंध नव्हता पण आज तिची फारच आठवण झाली.एवढा वेळ आपल्याला गादीवर लोळताना बघून ,"बरं वाटत नाहीये का? " अस विचारणार कोणी नाही याची आज प्रकर्षाने जाणीव झाली. मन उगीचच उदासल तेवढ्यात फोनची रींग वाजली
    हात लांब करुन आबांनी फोन घेतला, समीरचा फोन ," हाय बाबा ,मोबाईल बंद आहे तुमचा .आज तिकडे खूप पाऊस पडतोय ना, तुम्ही वॉकला नसाल गेलात म्हणून कॉल केला"
" रात्री बंद करुन ठेवतो मोबाईल सकाळी चालू करायचा राहिलाय, पाऊस तर आहेच गेला आठवडाभर, तरी जातो मी रोज. आज जरा जास्तच आहे म्हणून कंटाळा केला"
"पावसात नका जात जाऊ,घरी आहे ना वॉकर त्यावरच चालत जा ना ,उगाच रस्त्यावर चिखल,पाणी त्यात पडला बिडलात तर ..."
" ते ही खर पण बाहेर पडल की चार लोक भेटतात गप्पा,गोष्टी केल्या की बर वाटत ...आज नाही गेलो"
" विशु येतो ना रोज , बॅंकेची कामे तो करतो कि करता तुम्हीच?"
" येतो विशु वेळेवर .मी जातो बॅंकेत त्याच्याच बरोबर .ऑनलाईन पण शिकतोय हळूहळू पण माझा नाही विश्वास या नेट्बॅंकींग वर. रोज नवनव्या बातम्या कानावर पडतात.त्यापेक्षा विशुच्या हातात पासबुक देवुन पैसे काढलेले बरे "
" ठिक आहे बाबा .तुम्हाला पटेल तस करा ,ठेवतो आता फोन जेवण करुन झोपायचय"
" ठेव ठेव किती नऊ वाजले असतील ना तिकडे?"
"हो"
" गुड नाईट"
सुलू असती तर अर्धा तास गप्पा मारल्या असत्या तिने,तो ही बेटा बोलत बसला असता, बापाशी बोलायला जमत नाही.त्याला देखील काय दोष द्यायचा म्हणा मला तरी कुठ सुचतय बोलायाला..ओम च काय चाललय ,त्याचे गेल्या वर्षी ग्रॅज्य़ुएशन झाले. नसती फॅड एकेक. आपल्या भाषेत दहावी झाली ,पण मोठा झाला आता. त्याला आता इंडीयात यायच नसतं, चालायचच. त्याच्याबद्दल विचारायला हव होत, राहिलच. असच होत. नंतर सुचत एकेक असो उठायलाच हव आता.
तेवढ्यात लॅच उघडून विशु आला घाईघाईत तो आबांच्या बेडरुममधे शिरला
"आबा तब्येत बरी नाही का?"
" अरे विशु आज इतक्या लवकर कसा?"
"आबा अहो सात वाजून गेलेत अजून दुधाची पिशवी बाहेरच ,बर वाटत नाही का तुम्हाला?"
" नाही रे बाबा, ठिक आहे मी. आज पावसामुळे उठावस वाटत नव्हत पण तू लवकर कसा?"
" आज टपरीवर तुमच्या दोस्तात तुम्ही नव्हतात मग बायकोनं फोन करुन सांगितल, जाऊन बघा म्हणाली"
"फोन करायचास ना?"
" केला लॅंड्लाईनवर. तुम्ही उचलत नव्हता , मोबाइल पण लावला तो बंद होता,मग म्हटल हि म्हणतीय ते बरोबर असल तब्येत नसल बरी मग आलो थेट ,काय जास्त लांब यायचय थोडच ?"
" अरे समीरचा फोन होता त्याच्याशी बोलत होतो कॉल वेटींग मुळे तुला तस वाटल असेल. मी ठिक आहे. तू जा घरी. ये नेहमीच्या वेळेला, तुझी घरची काम उरकायची असतील ना? बायको तिकडे टपरीवर कामाला. तू इथे. पोरांच कोण बघणार?"
" पोरगी आवरते म्हणाली ,सिध्दु पण मोठा झालाय आता आणि हि येईलच नऊ पर्यंत मी चहा करू का तुम्हाला "
" चालेल, उठतोच मी ,दुध ठेव तापत .."
" करतो आबा मी ,घरी मीच करत असतो "
 "तुझा पण ठेव रे "
" करतो करतो"
     विशु आल्याने आबांचा गेलेला उत्साह परत आला,त्याने केलेल्या चौकशीने मन आनंदले. ब्रश करुन ते किचन मधे जातात तोच वाफाळलेला चहाचा कप विशुने त्यांच्या समोर ठेवला , डब्यातली बिस्कीटेही त्याने बशीत ठेवली.आबा खुश झाले. चहाचा पहिला घोट घेताच त्यांच्या तोंडून वाक्य निघाले
"व्वा ..झकास झालाय चहा . विशु,तू पण घे चहा,बिस्कीट घे"
"घेतो आबा, हि भांडी टाकतो घासायला "
"टाकशील रे, आधी चहा घे गरम. पेपर आला असेल ना?"
"हो आलाय कि तो बघा ठेवलाय तिकडे, आज पेपरही  बाहेर,दुधाची पिशवी पण बाहेर मी घाबरलो म्हटल काय झाल आबांना?"
" तुला काय वाटल झोपेतच आबांच काही बर वाईट?"
" छे छे... सकाळी सकाळी अस वाईट नका बोलू आबा..."
" अरे वाईट कुठे ? अस मरण यायला फार मोठ भाग्य लागत बाबा ...  आमच्या दैवात काय लिहून ठेवलय कुणास ठाऊक? "
" चहा घ्या आबा, थंड होतोय " विशुने विषय बदलायचा प्रयत्न केला
 चहा घेता घेता आबा एकदम गंभीर झाले , त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा काळजीचे सावट आले.

आयुष्याचा पट त्यांच्यापुढून झटकन सरकून गेला. आजवरच्या त्यांच आयुष्य तस सरळ मार्गी गेल. आईवडीलांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती ,खाऊन पिउन सुखी होती पण त्याकाळी त्याच काही वाटत नसे.वडील वाईच्या शाळेत शिक्षक. स्कॉलरशिपवर शिक्षण झाले पदवी मिळाल्यावर पुढे शिकायची फार इच्छा होती पण धाकटी भावंडे होती ,तात्यांना मदत करणे गरजेचे होते मग CWPRS ची जाहिरात वाचून अर्ज केला, लगेच बोलावणे आले मुलाखतीला मार्क बघून तिथल्या वरीष्ठांनी विचारले देखील एम.एसस्सी का करत नाहीस ? हसून नोकरीच करायची आहे अस सांगितल लगेच रीसर्च ऍसिस्टंट ची नोकरी मिळाली किती आनंद झाला आई,तात्यांना ! ऑफिस सकाळी ७ ते २ असायच.काम करायला उत्साह होता,वातावरणही छान होत ऑफिसमधल. म्हणता ,म्हणता तीन वर्षे गेली एक प्रमोशनही  मिळालं  क्लास टू ऑफिसर झालो, त्यावेळच्या नायर सरांनी पुढे शिकायला प्रवृत्त केल म्हणाले पुढल्या प्रमोशनला पोस्ट ग्रॅज्युएट झालास तर फायदा होईल.दुपारी अभ्यास करीत जा, ऑफिसच्या वेळेचा फायदा घेत गणित विषय घेऊन एम.एस्सी करता आल,पुस्तके मिळायची लायब्ररीमधे,घराजवळच्या पटवर्धन सरांच मार्गदर्शन मिळाल आणि त्यामुळेच एम.एस्सी करु शकलो त्याचा पुढच्या आयुष्यात फार फायदा झाला. लग्न,मुलं सगळ्याच बाबतीत दैवान साथ दिली. सुलभासारखी सालस पत्नी मिळाली. तिने संसारात चांगली साथ दिली.अगदी आखीव,रेखीव आयुष्य होत. आई,तात्या गावीच होते त्यांनी शेतात लक्ष घातल होतं वर्षाच धान्य पाठवायचे.श्रीधरच शिक्षण,मालूच लग्न सगळ्याला आपण मदत केली याची त्यांना जाणीव होतीच. श्रीधरन परजातीच्या लग्न केल्याने तात्या-आई जरा नाराज झाले ,त्यावेळी आपण मध्यस्थी केली लग्न झाल पण ते दोघे दुखावलेले राहिले. तो नोकरी निमित्ताने दूर मद्रासला गेला त्याच येण जाण कमीच राहिल. मालू बी.एस्सी झाली तिला चांगल स्थळ मिळाल ती नाशिकला गेली. आई,तात्या शेवटी आपल्याकडेच होते.पिकली पान पाठोपाठ गळून गेली ,त्यांची दुखणी बाणी सुलभानेच बघितली त्यावेळी ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमुळे घरात लक्ष देणे व्हायचे नाही पण तिने कधी फारशी तक्रार केली नाही. आईची तब्येत शेवट पर्यंत चांगलीच होती. सुदैवान सुलभाच आणि तिच पटायच, आईमुळे सुलभाला गाण्याच्या परीक्षा देता आल्या, मुलांना वाढवताना आजी आजोबांची मदतच झाली. माणसांत वाढल्यामुळे मुलेही शिस्तीत होती.तात्यांनी मुलांना शिकवायच काम आनंदान केल. ऑफिसमधे त्यामुळेच आपण निवांतपणे काम करु शकत होतो.

        समीर हुशार होता, आय.आय.टी त्याला सहज प्रवेश मिळाला तो कानपूरला गेल्यावर घर कस सुन सुन झाल होत. त्यावेळी मोबाइल्स नव्हते,तो आठवड्यातून एकदाच फोन करायचा बाकी सगळी खुशाली पत्रांतुनच समजायची. तो बी.टेक झाला आणि अमेरिकेत गेला पुढे शिकायला एम.एस झाला आणि तिकडेच नोकरी करु लागला.सुरुवातीला म्हणायचा येईन चार पाच वर्षांनी. अमोल इथे असल्याने त्याचे जाणे तितके जाणवले नाही,तोवर नोकरी होती .रीटायर्ड झाल्यावर अमेरीकेत जाऊन आलो. पुढे ते नित्याचेच झाले. अमोल ने पुण्यातून इंजिनियरींग केल तो ही भावाच्या मागोमाग अमेरीकेत गेला. मुलांनी इथे रहावे असे कुठल्याही आई वडीलांना वाटणारच पण इथे त्यांना तशा संधी नव्हत्या. आपल्या देशाबद्दल प्रेम वाटावे असे संस्कार करण्यात आम्हीच कुठेतरी कमी पडलो असू. तिकडच्या आरामदायी आयुष्याचा,अमर्याद स्वातंत्र्याचा मोह पडण्याच त्यांच वय होत .शिवाय आम्हालाही मुले तिकडे असल्याने स्वातंत्र्य होतेच की. वर्षा-दोन वर्षांनी मुल यायची ,भरपूर पैसा खर्च करायची,एक गेट-टूगेदर करुन सगळ्या नातेवाईंना बोलवायच.बाकी मुलांचा वेळ मित्र मंड्ळीत जाय़चा.कधी गोवा,तर कधी महाबळेश्वर ट्रिप्स व्हायच्या. मुल परत गेली कि घर खायला उठायच दोन चार दिवस.पण नंतर आमचे प्रोग्रॅम्स पण ठरलेले असायचे ,आमचा ग्रुप होता. सुलभाचा ग्रुप होता.शिवाय आमच्या मित्रांचा ग्रूप होता,आमच्या एकत्र ट्रिप्स व्हायच्या,जेवणे व्हायची. कधी श्रीधर यायचा,कधी आम्ही त्यांच्या कडे जायचो.मालू वर्षातून एकदोनदा यायची.आम्ही जायचो तिकडे. एकूण आयुष्य मजेत होते.सुलभाला अमेरीकेत जायलाही खूप आवडाय़च,एकतर मुल भेटायची त्यांच्या आवडीच त्यांना खाऊ-पिऊ घालायच. शनिवार-रविवार मनसोक्त भटकायच. माझ मात्र तिकडे मन फारस रमायच नाही.एखादा महिना मला आवडे नंतर मला इकडचे वेध लागायचे. पुण्यात राहत असलो तरी आई तात्या गेल्यानंतरही मी  गावी जातच होतो.वाईची हवा मला फार आवडायची. तिकडे गेल की घरी गेल्यासारख वाटायच. समीरने गाडी घेवुन दिल्यामुळे जाण ही सोईच झाल होत. शेत शांताराम बघत होता. आम्ही जाण्यापूर्वी त्याला कळवल कि तो घराची साफसफाई करुन ठेवायचा, त्याची बायको भाकरी करुन द्यायची. आठवडाभर तिथे राहून सगळी कामे मार्गी लावली कि पुण्याला यायचे. पंचविस -तीस वर्षांपूर्वी वाई तस गावच होत.इंटरनेट्चा जमाना अजून आलेला नव्हता. तिथल्या शाळाकॉलेजच्या मुलांना करीयरच्या संधींबद्दल मार्गदर्शनाच काम मी करायला घेतल होत माझाही वेळ चांगला जायचा ,मुलांनाही उपयोग व्हायचा.पुण्याहून येताना वेगवेगळी स्पर्धा परीक्षांची पुस्तक घेवुन जायचो. वाचनही खूप व्हायच. शेतात वेगवेगळे प्रयोगही करुन बघितले. एकूण निवृत्तीनंतरच आयुष्यही मजेत चालल होत.सुना आल्या नातवंड झाली.पण सुलभाला कॅन्सर झाला आणि सगळच आयुष्यच बदलल.तिने आजारपण मोठ धीरान घेतल पण मीच मनान खचलो.

        तिचा आजार झपाट्याने वाढला आणि दोन वर्षात ती गेली. मुले येवुन गेली .समीर म्हणाला ,"बाबा तुम्ही आता तिकडेच चला" इकडे एकटे काय कराल? अमेरीकेत जायचे ते ही कायमचे ,शक्यच झाले नसते. एका घरातुन दुसऱ्या घरात रुजायला बाईचाच जन्म असायला हवा कदाचित. मी म्हणालो, ’ नको रे बाळांनो मी इथेच राहीन, येत जाईन तुमच्याकडे पण कायम तिकडे राहण मला नाही जमायच .माझी काळजी करु नका.इथे माझा वेळ जाईल मी अजून व्यवस्थित हिंडू,फिरु शकतो. कधी मालू कडे जाईन , तिला बोलवेन. कशी श्रीधर कडे, शिवाय त्यांची मुले आहेत.माझे मित्र आहेत. वाईला जात जाईन. आता फोन आहे ,तुम्ही मोबाईल दिलाय त्याचा होईल ना उपयोग "
मुलांनी आग्रह केला पण त्यांनाही मी तिकडे आल्यावर माझा वेळ कसा जाणार हा प्रश्ण असेलच ती बिचारी आठवडाभर कामात, इथल्यासारखे तिकडे एकट्याने फिरणे तेवढे सहज नाही.शनिवार रविवार त्यांच्या ट्रिप्स,पार्ट्या नाहीतर कामे. अधुन मधुन जाणे निराळे.

        आबा सुलभानंतर आठ-दहा वर्षे एकटे पुण्य़ात राहिले. दरम्यान तीन चार दा समीर,अमोल येवुन गेले. आता ते एक एक करुन आले.आणि बराच काळ आबांबरोबर राहिले देखील. दोन-तीन वेळा आबा तिकडे जावुन आले. आबांची मुळची प्रकृती चांगली, शिवाय निर्व्यसनी,नेमस्त जीवन असल्याने किरकोळ तक्रारी सोडल्यास कुठलाच आजार त्यांना नव्हता. दिवसाचा वेळ आखून घेतल्याने त्यांना सुलभाशिवायचे जीवन जगायची सवय झाली. पण वयाची ऐंशी उलटल्यावर मुलांना आबांचे एकटे राहणे आणि आपले सातासमुद्रापार असणे त्रासदायक वाटू लागले.रोज फोन करुन समीर म्हणू लागला,"बाबा तुम्ही कुणाला तरी सोबत आणुन ठेवा.किंवा एखादे ओल्ड एज होम बघा " आबांनी डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर गाडी चालवणे कमी केले. वाईच्या त्यांच्या शेतावर त्यांना जाणे जमेना.शांताराम वारल्यानंतर त्याचा थोरला मुलगा रवी शेत बघत होता पण तो आबांशी तितक्या आपुलकीने वागत नव्हता. रविचे त्याच्या धाकटा भाऊ विशुशी पण जमत नव्हते. धाकट्या विशुने बारावी पास झाल्यावर पुण्य़ाचा रस्ता धरला.दरम्यान मुले शेतीत लक्ष घालणार नाहीत याचा आबांना अंदाज आल्यामुळे त्यांनी शेत विकायचा निर्णय घेतला. योग्य गिऱ्हाइक मिळताच श्रीधर,मालुशी आणि मुलांशी, बोलून त्यांनी शेत विकले. खूप दुःख झाले त्यांना पण आता हळूहळू सगळा कारभार आवरता घेणेच योग्य ठरणार होते. आबांनी शेताच्या पैशातला श्रीधर आणि मालूचा हिस्सा त्यांना दिल्यावर स्वतःच्या वाट्याला आलेल्या पैशात वाईच्या शाळेला देणगी दिली.पुण्यातील एक दोन माहित असणाऱ्या सेवाभावी संस्थाना देणग्या दिल्या. शांतारामच्या रवीला त्याच शेतावर वाटेकरी म्हणून लावले.विशुला  आणि त्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये दिले.   
   
        आबांच्या एकट्याच्या नोकरीमुळे पुण्यात त्यांनी दोन बेडरुमचा फ्लॅट पन्नाशीनंतर घेतला.तोपर्यंत ते भाड्याच्या घरातच रहात होते.दोन बेडरुमचा फ्लॅटही त्यांना व सुलभाला खूप मोठी कमाई वाटली होती.मुले परदेशात गेली त्यांनी चाळीशीच्या आतच मोठमोठाले बंगले बांधले याच त्यामुळेच फार कौतुक होत. त्याच वेळी आबांच्या बिल्डींगचे नूतनी करण करायचे ठरले होते वाढत्या एफ.एस.आय मुळे त्यांना एक खोली वाढवू्नही मिळणार होती.तशा मिटिंग्ज होत होत्या .वरचे पैसे घालायला आता मुलांजवळ मागायची जरुर नव्हती. वर्षा-दोन वर्षात तेही काम झाले.मालूच्या आर्किटेक्ट मुलाने सुरेख इंटिरीयर करुन दिले.घर सुंदर झाले पण त्यात रहायला मात्र एकटे आबाच. शांतारामचा विशु पुण्यात आबांच्या घराजवळ रहात होता.भोसरीला कुठल्याशा कंपनीत नोकरी करायचा.बर चालल होत त्याच.बायकोही कामाला जायची.मुल शाळेत जाय़ची. तो येत असे आबांना भेटायला अधुन मधुन.त्याची कंपनी अचानक बंद पडल्यान त्याला ब्रम्हांड आठवल आता परत वाईला जाण फार कठीण झाल असत.आबांकडे तो सल्ला मागायला गेला.
आबा म्हणाले, " तू वाईला जावुन तरी काय करणार? तिकडे नोकरी मिळेल का?"
" नाही ना आबा आणि वहिनी आणि सुरेखाच अजिबात पटत नाही,दादा पण फार हलक्या कानाचा आणि गरम डोक्याचा आहे.इथच कुठ जमल काही तर बर होईल"
" तुला गाडी चालवता येते?"
" हो येते की,वाईला असतानाच शिकलो होतो तिकडे वाई महाबळेश्वर टॅक्सी पण चालवलीय ना मी"
" मग माझ्या कडेच कामाला राहतोस का? गाडी चालवायची आणि इतर काम पण करायची"
" चालेल की आबा तुमच्या रुपान देवच पावला म्हणायचा"
"अरे देव बिव काही नाही तुला दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत आपण अस करु तुला मी पगार किती देवू?"
" काय तुम्ही द्याल तो"
" हे बघ हा व्यवहार आहे, मी कधी ड्रायव्हर ठेवलेला नाही पण मी चौकशी करतो,समीर,अमोलला विचारतो ,तू ये मग उद्यापासून"
" उद्या कशाला आबा आजपासून सुरु करु काम .तुम्हाला जायचय का कुठे?"
" नाही रे बाबा आताच मी फिरुन आलो आता रात्रीचा कुठे जाऊ? ये तू उद्या"
    
        आबांच्या सोबतीचा नाही तरी ड्रायव्हरचा प्रश्ण असा सहज सुटला.विशु माहितीतला होता,शिवाय आता त्याला नोकरीची निकडही होती. मुलगा खरच गुणी होता त्य़ाच्या वडीलांसारखाच. आबांचा त्याला आधार होता आणि आबांना त्याचा.
        "आबा,अंघोळ कराल ना? मी जाउ का घरी कि खायला काही आणून देवु तुम्हाला?" विशुच्या प्रश्णांनी आबा भानावर आले.
" जा तू घरी ये दहा-अकरापर्यंत .कुसुमताई येतील इतक्यात स्वयंपाकाला ,तेवढी भाजी आहे ना फ्रिजमधे बघ "
" ठिक आहे"
 विशु गेला.आबांना वाटले आता आपले कधी काय होईल सांगता येणार नाही. आयुष्य चांगले गेले तसे मरणही चांगले यावे एवढीच इच्छा आहे. विशुला आपल्याकडील नोकरीतून आपण काय देतोय? ना फंड,ना ग्रॅच्युइटी मग पेन्शनचे नावच सोडा.हा मुलगा इतक्या प्रेमाने मायेने आपली काळजी घेतो. कधी एक पैशाचा हिशेब चुकवत नाही,आपल्या खाण्यापिण्यापासून दुखण्याबाण्यापर्य़ंत सगळ्याची काळजी घेतो.त्याच्या बायकोला आपल्या ओळखीने जोशांच्या खानावळीत काम मिळाल त्याची ही त्याला जाणीव आहे.त्याच्या मुलांना आपण शिकवतो,त्यांच्या वह्या पुस्तकांचे पैसे देतो त्याबद्दलही तो कृतज्ञ असतो. एकदा अमेरीकेतुन येताना समीरच्या रोशनचे कपडे सिमरनकडून मागुन आणले.त्याच्या मुलांना कपाटभर कपडे,फारसे न वापरताच लहान होतात.सिमरनला भित भितच विचारल,पण तिने सहज दिले कपडे.रो्शनला कळल्यावर त्याने ढिगभर खेळणी,पुस्तके सगळच आणून दिल. त्या दिवशी विशुच्या सिध्दार्थची गोष्ट्च त्याने थक्क डोळ्याने ऐकली.
   
    पण तरी विशुच्या प्रामाणिकपणाची किंमत एवढ्याने होणार नाही. आबांना एकदम वाटले हे घर आपल्या पश्चात विशुच्या नावावर करावे. समीर आणि अमोल काही भारतात परत येणार नाहीत.शिवाय दोघांनी इकडे घरे घेतलेलीच आहेत. श्रीधर आणि मालुलाही देवदयेने काही कमी नाही. विचारानेच आबांच्या मनात उत्साह आला.  हा विचार लवकरात लवकर मुलांजवळ बोलायचे ठरवले त्यांनी. त्या उत्साहात आबांनी अंघोळ वगैरे आन्हिके उरकली.अंघोळ करतानाही त्यांच्या मनात विशुचेच विचार होते, आता सुरेशला फोन करतो, सुरेश म्हणजे आबांचा शाळु सोबती चांगला वकील आहे,त्याची प्रॅक्टीस मुलगा आणि सून पुढे चालवतात.त्याच्याकडून कायदेशीर बाबी समजावुन घेतलेल्या बऱ्या.

    कुसुमताई आल्या त्यांनी स्वयंपाक केला. त्यांच्या मुलीने घराची साफ सफाई केली. आबांनी पेपर वाचून संपवला. त्या मायलेकी बाहेर पडल्या तेंव्हा दहा वाजले होते. फोन वाजला आबांनी फोन उचलला आणि चक्क फोनवर सुरेशच.आबांना फार बरे वाटले
"अरे मी तुलाच फोन करणार तेवढ्यात तुझाच फोन आला"
" मार थापा लेका ,माझा फोन आला कि तुझ हे वाक्य ठरलेल आहे"
" नाही रे ,आज मी तुला फोन करणार कारण माझ तुझ्याकडे महत्त्वाच काम आहे?"
" काय झाल ?"
" काही नाहीरे पण फोन वर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलू ना,येतोस का घरी माझ्या निवांत बोलू"
"पाऊस बघतोस ना किती पडतोय आत्ता जरा कमी झालाय"
" पण मी विशुला पाठवतो ना तुला आणायला मग तर झाल ,जेवायलाच ये म्हटल असत पण कुसुमताईंनी किती आणि काय केलय तेही बघितल नाही अजून"
" जेवणाच नाही रे तेवढ महत्वाच ,येतो मी पाठव विशुला तू येतो मी अकरापर्यंत
विशु आला साडेदहा वाजता.
"आबा आज बॅंकेत जायचय का?"
" नाही विशु आज सुरेश कडे जावुन त्याला इकडे घेऊन येतोस? हे बघ आणि पैसे घेऊन येताना जोशी स्वीट मधुन सुरळीच्या वड्या आणि काहीतरी गोड घेउन ये"
"ठिक आहे, सुरेशकाकांना सांगुन ठेवलय का त्यांना फोन करताय?"
"झालय बोलण त्याच्याशी निघ तू"
सुरेश आला.
बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे भरपूर गप्पा झाल्या,मग आबांनी घराबद्दलचा विचार सुरेशबद्दल बोलून दाखवला
 विशुच्या नावाने घर करुन देण्यात काही कायदेशीर अडचण नाही ना? असे विचारले.
" तुझी स्वकष्टार्जित मालमत्ता तू कुणालाही देवु शकतोस.पण मला विचारशील तर तू आत्ता त्याबद्दल विशुजवळ काहीच बोलू नको आणि मुलांना विश्वासात घेतल्याखेरीज काही करु नकोस"
"मुलांच्या कानावर घालणारच आहे,पण त्यांना सल्ला मागणार नाही तर निर्णय सांगणार आहे"
"ठिक आहे,तुझी मुले काही म्हणतील अस वाटत नाही,कारण त्या दोघांना काहीच कमी नाही हा भाग असला तरी मोह कुणाला सुटलाय? ,पण मुलांना न कळवता परस्पर  केलेस तर ती दोघे दुखावतील.शिवाय तुझ्या सुनांबद्दल मला काहीच माहित नाही."
"सिमरन आणि अमृता गोड मुली आहेत त्या दोघीही कमावत आहेत,मला नाही वाटत त्या काही बोलतील पण तू म्हणतोस तसे त्यांना विश्वासात घेवुन नक्की सांगतो, तुझ्याकडून कायदेशीर बाबी नंतर पूर्ण करू"
चांगले विचार मनात आले कि त्वरित आमलात नाही आणले तर ते नाहिसे होतात असे आबांनी वाचले होते. सुदैवाने तो शनिवार होता, मुलांशी दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांच्या शनिवारच्या रात्री सविस्तर बोलायचे त्यांनी ठरवले. त्या रात्री त्यांनी समीरला फोन करुन अमोलला पण बोलावून घ्यायला सांगितले आणि रविवारी सकाळी दोन्ही मुले आणि सुनांना एकत्र स्काईप कॉल लावला.मुले थोडी काळजीत पडली होती, आई सारखाच बाबांना काही आजार डिटेक्ट झालाय का? दोघांना एकत्र काय सांगायचे असेल? आत्या,काका ठिक असतील ना? नाना विचार त्या चौघांच्या मनात येवुन गेले
पण स्क्रिन वर बाबांचा नेहमीसारखा आनंदी चेहरा बघून त्यांचे टेन्शन एकदम कमी झाले
"बाबा ,आज अचानक चौघांशी एकत्र बोलावस का वाटल तुम्हाला ?" अमोलने सुरुवात केली
" तुमचा जास्त वेळ न घेता एकदम मुद्द्याचच बोलतो, माझे वय आता ८२ आहे, माझ्या दृष्टीने मी आयुष्य उत्तम जगलोय ,आता कुठली आशा ,अपेक्षा उरल्या नाहीत. माझे सध्याचे जगणे सुकर करण्यात विशुचा खूप मोठा वाटा आहे.तो माझा नुसताच ड्रायव्हर नाही तर माझी सगळी काळजी तो घेतो.माझे सगळे आर्थिक व्यवहार तो बघतोच पण माझे दुखले,खुपले तो प्रेमाने बघतो.मी त्याला जो पगार देतो त्याहुन कितीतरी पटीने तो माझ्यासाठी करतो माझा आधारच आहे तो. त्याला मी काही प्रोव्हींडट फंड देत नाही कि कुठला इंन्शुरन्स नाही त्याची बायको खानावळीत काम करते. मुलांचे शिक्षण मी करतो पण त्याच्या भविष्याची मलाच काळजी वाटते म्हणून मी ठरवलय माझे राहते घर मी त्याच्या नावाने करावे"
एका दमात बोलल्याने आबांनी पाणी प्यायला घेतले मधले दोन चार क्षण शांततेत गेले
सिमरन आणि अमृता एकमेकींकडे बघत होत्या,समीर आणि अमोलही शांत होते , ते चार दोन क्षण आबांना जिवघेणे वाटले ते काही बोलणार तेवढ्यात समीर म्हणाला ," आबा तुम्ही पूर्ण विचार करुन निर्णय घेताय ना? विशुने तुम्हाला धाक वगैरे नाही ना दाखवला ?"
"नाही रे मुलांनो.त्याला मी अजून काहीच बोललेलो नाही आणि बोलणार पण नाही एवढ्यात सुरेशशी सकाळी बोललो आणिआता तुम्हाला सांगतोय"
"बाबा, आम्हाला तुमची काळजी वाटते,सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तुम्ही तिकडे एकटे राहता हे क्रेडीटेबल आहे पण पैशासाठी माणसे काय काय करु शकतात हे वाचतो,पाहतो आणि मग वाटते का तुम्ही ओल्ड एज होम मधे जात नाही?"
" अरे माझे हात पाय अजुन चालत आहेत, स्वातंत्र्याची माणसाला किती सवय होते हे मी तुम्हाला सांगायला हवे का? अगदी विकलांग झालो तर मग आहेच तो पर्याय, सध्या तो विषयच नाही,विशु माझ्या करता किती करतो ते तुम्हाला माहित आहेच.माझ्या निर्णयावर तुमचे मत मला ऐकायच आहे ,तुम्हाला विचार कराय़ला वेळ हवा आहे का?"
" नाही बाबा, तुमचे घर आहे, तुम्हाला हवे ते तुम्ही करु शकता ,फक्त लिगल मॅटर काय ते बघा आणि त्याला कधी सांगाय़चे ते सुरेशकाकांच्या सल्ल्याने बघा " समीर म्हणाला
"हो बाबा, दादा म्हणतोय ते खरे आहे, आणि विशु खरचच चांगला मुलगा आहे त्याला घर दिलेत तर त्याचे खूप प्रोब्लेम्स सॉल्व्ह होतील " अमोल म्हणाला
"सिमरन ,अमृता तुमच काय म्हणण आहे?"
"आम्ही काय़ सांगणार ? विशु is genuine guy, and it's your property " सिमरन उद्गारली
" बाबा,खूप छान विचार आहे तुमचा, मला आवडला तुमच्यासाठी करणा़ऱ्या विशुला तुम्ही घर दिलेत तर त्याच्यासारख्या अनेक मुलांना तुमच्या सारख्या सिनियर लोकांसाठी काम करावेसे वाटेल" अमृता म्हणाली
अमृताच्या बोलण्याने आबांना दिलासा वाटला. हि सगळ्यात धाकटी सून आपल्याला किती अल्लड वाटायची पण इतका वेगळा विचार करते !
" मला छान वाटले ,समीर,अमोल मला खात्री होती तुम्ही माझ्या निर्णयाला पाठींबा द्याल आणि सिमरन,अमॄता पण वेगळ वागणार नाहीत तरीही तुम्हाला सांगितल्याशिवाय कुठलेहीआर्थिक व्यवहार कराय़चा नाही असे मी ठरवले होते.तुम्ही माझ्या निर्णयाला विरोध केला असतात तर काय करायचे हे मात्र मी ठरवले नव्हते "
"बाबा तुम्हाला काय कराय़चे ते तुम्ही जरुर करा,पण निरवानिरव कशाला ? तुम्ही आम्हाला हवे आहात " अमृता भरल्या गळ्याने म्हणाली
"आपण कुणाला तरी हवे आहोत हे शब्दच आम्हा म्हाताऱ्यांना जगण्याचे बळ देतात पण हव हव असताना जाण्यात मजा आहे "
"बाबा, तुम्ही काय त्या लीगल प्रोसिजर्स पूर्ण करुन इकडे या बर ,आपण इकडे मजा करु " समीर म्हणाला
"खरच बाबा,पुढच्या आठवड्यात मुलांच्या सुट्ट्या सुरु होतील ,गेल्या महिन्यापासून तुम्हाला सांगतोय या तुम्ही इकडे" सिमरन म्हणाली
"बघू, तुम्हीच का नाही येत इकडे"
"तुम्हीच या आपण ट्रिप ला जाऊ,तुमचे इनामदार आलेत इकडे"
गप्पा बऱ्याच रंगल्या.तासभर बोलून मुलांनीच इकडे येवुन जाताना आबांना  तिकडे नेण्याचे ठरुन कॉल संपला
आबांच्या डोक्यावरचे ओझे उतरले.नंतरचा आठवडा गडबडीत गेला त्यांनी कायदेशीर मॄत्यूपत्र करुन आपली वास्तू विशुच्या नावाने करायचे लिहून ठेवले. सुलूचे दागीने त्यांनी पूर्वीच सुनांना दिले होते.स्वतःची जंगम रक्कम काही संस्थांना,काही विशुच्या मुलांच्या नावानी करुन ठेवली.

    अमोल ,अमॄता मुलांना घेवुन येणार असल्याचे त्यांनी कळवले.समीरला नव्या प्रोजेक्ट मुळे वेळ होणार नव्हता.मुले,नातवंडे येणार म्हणून आबा खुषीत होते.विशुच्या मदतीने त्यांनी सगळी तयारी केली. अमोल ,अमॄता अबीर आणि अनुजा आले घर भरुन गेले.दोन दिवसांनी मालू आली.श्रीधरचा मुलगा सून एक दिवस आले,सगळ्यांनी पावसात रायगडावर जायचा बेत आखला.सगळ्या दगदगीने आबांना ताप भरला.अमोल  आबांना डॉक्टरकडे घेवुन   गेला.पण म्हणता म्हणता सर्दी-ताप वाढून दुखणे नोमोनियावर गेले हॉस्पिटल ,औषधे सगळे झाले आणि आबांनी चार दिवसातच जगाचा निरोप घेतला
    सगळ्यांनाच हा धक्काच होता,समीरला कळवले,तो पण लगेच निघुन आला. विशुच्या दुःखाला पारावार उरला नाही. त्याच्यावर आबांनी वडीलांप्रमाणेच प्रेम केले होते आणि आता तर त्याला त्यांचाच आधार होता.आबांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान केले. कुठलेही धार्मिक विधी करु नका असे त्यांनी लिहूनच ठेवले होते. आबा गेले, त्यानंतर ठरल्याप्रमाणे  एक आठवड्य़ानंतर अमोल,अमॄता जाणार होते.आता त्यांच्याबरोबर त्यांचे आबा नसणार .समीरही आलेला होता. दोन दिवसातच दोघांनी सुरेश काकांना बोलावुन घेतले.आबांच्या मॄत्यूपत्राचे वाचन कराय़चे ठरले.विशु खाली गाडीपाशी होता.त्याच्यासमोर आता अनेक प्रश्णचिन्हे होती. नोकरी अशी ध्यानिमनी नसताना गेली होती.आबांचा त्याला खूप आधार होता.मधुन मधुन बायको दुसरीकडे नोकरी बघा म्हणायची ,पण आबांबद्दल फार माया वाटायची आपण नसलो तर म्हाताऱ्याच कस होईल ,नोकरी करुन सकाळ ,संध्याकाळ फेरी मारली असती तरी भागल असतं त्यांच्याकडे काम फार नसायच पण त्यांच्यांशी गप्पा मारतानाही बर वाटायच. आता समीर भाऊंना विचारू गाडी द्याल का वापरायला, टूरीस्ट कार म्हणून वापरु.पण विचारयला जीभ रेटेल का? पोरांच काय सांगता येणार नाही.उगाच अपमान नको व्हायला

"विशु अंकल,तुम्हाला पप्पा बोलवतोय " अबीरच्या आवाजाने विशुच्या विचारांची साखळी तुटली
तो जिने चढुन वर गेला.हॉल मधे सगळे बसले होते तो कोपऱ्यात उभा राहिला
"बैस विशु " समीर म्हणाला
"बाबांचे मॄत्यूपत्र वाचल, त्यांनी हे घर तुझ्या नावानी करायला सांगितले आहे,तेंव्हा हे घर आता तुझे आहे विशु "
ऐकून विशुला हुंदकाच फुटला
"रडू नको विशु,तू बाबांच खूप प्रेमाने केलेस तुझ्या जीवावर आम्ही तिकडे निश्चिंत होतो,गेल्याच महिन्यात बाबा आमच्याशी सगळे बोलले होते " अमोल म्हणाला
"ती वेळ इतक्या लवकर येईल अशी आम्हाला कल्पना नव्हती " समीर
"कदाचित त्यांना आपल्या मॄत्यूची चाहूल लागली असेल " अमॄता
"विशु आम्हाला वाटते बाबांची गाडी पण तूच घे तू ती वापर तुझं ड्रायव्हींग चांगल आहे,बाबा नेहमी म्हणायचे  .हल्ली उबेर,ओला कंपन्या निघाल्य़ात मी तुला मदत करेन त्यांच्या तर्फे तुला पुण्यातच गाडी चालवून किमी वर पैसे मिळतील " अमोल म्हणाला
विशुला बोलवत नव्हते त्याचे डोळे गळतच होते
मोठ्या मुश्कलीने डोळे पुसत तो म्हणाला," आबा मला माझ्या वडलांच्या जागी होते त्यांनी काही द्याव म्हणून मी नव्हतो हो करत मला पगार मिळतच होता ना "
" अरे वडील मानत होतास ना ,म्हणूनच या घरावर त्यांनी तुझे नाव घातले आहे.आम्हाला त्यांनी भरपूर दिलय तू नाही म्हणू नको "
"समीर दादा,अमोल दादा माझ्या सख्या भावाहून तुम्ही माझ्यासाठी करताय कसे फेडू तुमचे उपकार ?"
"अरे आम्ही आबांची मुले,म्हणजे तुझे मोठे भाऊच ना, मग उपकार कसले मानतोस.भावासारखी माया कर म्हणजे झालं" अमोल म्हणाला
"आम्ही  पुढल्या आठ्वड्यात  निघणार,तोवर इथे राहिलो तर चालेल ना विशु?"
"असं बोलून मला लाजवता होय? रहा कि हवे तेवढे दिवस आणि आबा गेले तरी इकडे यायच सोडू नका "
" अरे येऊना आम्ही ,आई बाबा नसले तरी आमचे काका आत्या आहेत कि इथे आणि हा देश आमचा पण आहेच ना?"
सुरेश काका बाकीच्या फोर्म्यालिटिज पूर्ण करुन कागदपत्रे तुझ्या ताब्यात देतील आम्ही असतानाच सगळे काम होईल असे आम्ही बघू आणि जाताना आम्ही तुला घराची किल्ली देवू.



एका सत्यघटनेवर आधारित कथा आहे हि.आजकाल आम्ही स्वदेशात मुले परदेशात अशी घरोघरी गत झालेली आहे.पैसा आहे पण मुले जवळ नाहीत, असलेल्या पैशाचा उपभोग घ्यायला शरीर साथ देत नाही,कुठे जोडीदार गेल्याचे दुःख आहे. हि मंडळी मग इथल्या कुठल्या नातलगाच्या,नोकरांच्या साथीने जीवन कंठंत असतात.त्यांच्याजवळ असणा्री स्थावर-जंगम  मात्र मुलांनाच द्यायची यांची इच्छा असते.तिकडच्या मुलांनाही भरपूर मिळूनही आईवडीलांच्या मालमत्तेवर हक्क दाखवाय़चा असतो अशी अनेक उदाहरणे मी जवळून पाहिली .मग मला वरील घटना कथारुपात लिहाविशी वाटली.आबांनी विशुवर उपकार केलेत असं नाही पण त्याच्या प्रामाणिकपणाचे मोल जाणुन त्याचे योग्य बक्षिस त्यांनी दिले आणि त्यांच्या मुलांनी पण वडीलांच्या निर्णयाचे स्वागत केले हा मुलांचा मोठेपणा मला ठळकपणे जाणवला.आज एक भाऊ परदेशात असेल तर इथे राहणाऱ्या आपल्या सख्या भावाला आईवडीलांची मालमत्ता द्यायला त्याची तयारी नसते तेंव्हा त्याला हक्क आठवतो पण आई-वडीलांची दुखणी बाणी काढण्यातली कर्तव्यकसूर केली असते त्याकडे डोळेझाक असते आणि मग सुरु होतात भांडणे. अशा सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हि घटना मला फार भावली. आपण आपल्या विकासासाठी देशाच्या सीमा पार केली तशीच मनाची दारे विशाल करायला शिकलो तर किती प्रश्ण सुटतील ना?

Tuesday, December 3, 2013

दैव जाणीले कुणी

कोल्हापुरला बदली झाल्याची ऑर्डर घेवुन सदानंद जागेवर येऊन बसला. प्रमोशन वर बदली होणार याची कल्पना होतीच,फक्त ठिकाण समजायचे होते. पुण्यात बदली झाली असती तर बरे झाले असते, सुरेखाला दर आठवड्याला येता आले असते, किंवा आपल्यालाही ये-जा करणे सोपे झाले असते. प्रमोशन नाकारणे हातात होते, पण कशासाठी? वास्तविक ते मिळून पगारात फार वाढ होणार नव्हती उलट घरभाडे भत्ता मुंबईचा जास्त, कोल्हापुरात कमीच होणार तो, पण प्रमोशन म्हणजे नुसती पगारवाढ नसते, आता पत वाढणार घरात आणि ऑफिसमधेही. इतरांसारखी साहेबांपुढे लाळघोटे पणा कधी जमला नाही आपल्याला. म्हणून मागच्या दोन वेळा मिळाले नाही. हे करुर साहेब फार कडक. अतिशय शिस्तीचे, त्यांच्यासमोर जायला कसे सगळॆ चळाचळा कापत.माझ्या कामावर खुष होते ते. त्यांनी चांगले सी.आर. लिहिल्याने यावेळी प्रमोशन द्यावेच लागले. बदली पुण्याला मागायची त्यांच्या समोर टापही नाही. या बाबतीत ते कसे वागतील सांगता नाही येणार. घरच्या कुठल्या अडचणी सांगितलेल्या त्यांना खपायच्या नाहीत.ते स्वतः नऊच्या ठोक्याला जागेवर हजर असत. आठ-आठ वाजे पर्यंत काम करत. ते कुणावर कधी रागावलेत,कुणाला फार आवाज चढवुन बोललेत असं नाही, पण एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वात जरब असते तशी आहे त्यांच्यात. वागणे अतिशय नेमस्त. स्वच्छ आणि चोख कारभार. साहेब असावा तर असा.
 
              सदानंद जोशी, सरकारी आधिकारी.मुंबईमधेच जन्म शिक्षण आणि इतके वर्ष नोकरी देखील. घरात इतर भावंडांपेक्षा जरा कमी हुशार. मोठा भाऊ खूपच बुध्दीमान, स्वतःच्या हुशारीच्या जोरावर आर्थिक परिस्थितीवर मात करीत शिष्यवृत्त्या मिळवित गेला. आय.आय.टी तून इंजिनियर होवुन  उच्च शिक्षणाकरीता अमेरिकेत गेला आणि तिकडेच स्थायिक झालेला. त्याच्या पाठची उमा,हुशार तेजस्वी,सडेतोड. मेडीकलची ऍडमिशन एका मार्कांनी हुकली तेंव्हा खचून न जाता फिजिओथिरपी सारखा त्यावेळी फारसा परिचित नसलेला कोर्स करुन त्यात उच्च शिक्षण घ्यायला परदेशात जावुन इकडे परत आली.मुंबईतल्या जसलोक, के.इ.एम्. सारख्या इस्पितळातुन तिची प्रॅक्टिसही सुरु होती.लग्न करायचे नाही असे तिने शिकतानाच ठरवले होते. सदानंदही हुशार होता. त्याला घरात तसे कुणी जाणवू देत नसले तरी बाहेर, शाळा-कॉलेज मध्ये नातेवाईंकांत तशी तुलना व्हायचीच आणि उगाचच त्याच्या मनात न्य़ूनगंड निर्माण झाला. मेडीकल, इंजिनियरींग सारख्या प्रोफेशनल कोर्सला न जाण्याचा त्याचा निर्णय त्यातुनच जन्माला आला. एम्.एसस्सी झाल्यानंतर नोकरीसाठी बरेच झगडावे लागले त्याला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्याने सुरु केला आणि पहिल्या परीक्षेतच मिळालेले यश त्याला अनपेक्षित वाटले.

    सरकारी नोकरी मिळाली. क्लास टू ऑफिसर म्हणून नेमणूक ही झाली. यथावकाश त्याच्या लग्नाची चर्चा घरात सुरु झाली. मोठ्या विजयने अमेरिकेतल्या मुलीशीच लग्न केले होते, उमाच्या लग्नाचा प्रश्ण् नव्हता. ओळखीतून आलेल्या बॅंकेत नोकरी करणाऱ्या सुरेखाला त्याने पसंत केले आणि संसाराला सुरुवात झाली. नोकरीतल्या कामामुळे सदानंदचा आत्मविश्वास वाढीला लागला. त्याला आयुष्यात आपणही काही करु शकतो याची जाणीव झाली. सुरेखा कनिष्ठ मध्यमवर्गातून् आलेली मुलगी होती. तिला नवऱ्याच्या शिक्षणाचे, नोकरीचे अमाप कौतुक होते. विदुलाच्या जन्मानंतर तर सुखाचे वर्तुळ पुरे झाल्यासारखे वाटले. विदुलाच्या पाठोपाठ चार वर्षांनी मुलगा झाल्यावर तर सदानंद सुरेखाचे सुखी चौकोनी कुटुंब झाले. पण विवेक दोन महिन्याचा झाला आणि त्याची मेंदुची वाढ पुरेशी नसल्याचे लक्षात आले. तसा तो अशक्तही होताच. सुखाच्या संसारात मिठाचा खडा पडावा असं घडल. आपल्या मुलाचे हे अपंगत्व स्विकारायला सगळ्या कुटुंबालाच जड गेलं. त्याच्याकरीता नोकरी सोडावी असं किती वेळा सुरेखाच्या मनात येई,पण त्याच्या आजारपणाचीच नाही तर भविष्याची तरतूदही आत्तापासून करावी लागणार या जाणीवेने ती बॅंकेत जात होती. ऍलोपॅथी बरोबर आयुर्वेदिक, होमिओपाथी अश्या सगळ्या प्रकारच्या उपाययोजना चालू होत्या. घरात खूपच पुरोगामी वातावरण असून आजकाल सुरेखा उपास-तापास करु लागली होती. तिच्या चेहऱ्यावरचा टवटवितपणा मावळला होता.काळजीने काळवंडला होता. सदानंदही जास्तीत जास्त वेळ ऑफिसमधेच काढी. बिचाऱ्या विदुलेकडे आई-बाबांचे दुर्लक्ष होवु लागले होते.आजी-आजोबा,आत्या घरी होते म्हणून बरे. ती सगळावेळ आजीजवळच असे. आत्याही घरी असले कि तिच्याशी खेळे. घरातल्या या अडचणीमुळे सदानंदला ऑफिसमधे प्रमोशन न मिळाल्याचे दुःख फारसे जाणवले नव्हते. एका मोठ्या वेदनेपुढे या बारीक दुःखाची काय मात्तबरी? शिवाय प्रमोशन वर बदली झाली असती तर सुरेखाचे किती हाल झाले असते! तीन वर्षाचा विवेक तब्येतीने सुधारला होता, पण चालु शकत नव्हता. त्याचे सगळेच करताना घरचे दमत होते.
   
    प्रत्येक सीझन बदलताना विवेक आजारी पडेच, या वेळी थंडी सुरु झाली आणि तो सर्दी तापाने आजारी झाला.मुंबईतली थंडी तरी कसली? पण त्याच्या अशक्त देहाला वातावरणातले बदल तेवढे जाणवत. सदानंदने लगेच औषधे आणली. मात्र त्याच्या आजाराने बघता बघता गंभीर रुप घेतले.श्वास घ्यायला त्याला त्रास होवु लागला. उमाने लगोलग के.इ.एम. मधे ऍडमीट केले. पण न्युमोनिया झालाय असं डॉक्टर म्हणाले. दोन दिवसातच विवेकने जगाचा निरोप घेतला. त्याच्या असण्याचा घरच्यांना त्रास होत असला तरी त्याच्या जाण्याचे दुःख ही सगळ्यांना खूपच झाले. अशा मुलांना आयुष्य कमी असते हे उमाला माहित होते. तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर त्या अश्राप जीवाचं करताना आपण कमी पडलो का? अशी वेदना तिलाही जाणवली. सुरेखाला तर दुःखाने वेड लागेल का असं वाटू लागल. सदानंदलाही फार अपराधी वाटले.या मुलापायी आपले आयुष्य उध्वस्त होतयं असा विचार त्याच्या मनात अनेकदा आला होता ! त्याच्या जाण्याला आपले हे विचारच कारणीभूत आहेत असे त्याला वाटू लागले. या सगळ्यात शांत होत्या सदानंदच्या आई. त्या माऊलीने कधीच विवेकचा राग केला नव्हता.त्याला न्हाऊ घालणे, भरवणे त्या अगदी मायेने कराय़च्या.विदुलेलाही भावाबद्दल माया वाटावी म्हणून त्याच्याशी बोलायला लावित. सुरेखालाही त्या समजावित असत.
"आपल्या घरात त्याची चांगली देखभाल होते,म्हणून देवाने त्याला इथे धाडलयं. अगं सुधारणा सुध्दा होईल त्याच्यात हळूहळू.नवीन औषधे येतील. कित्ती शोध लागताहेत हल्ली "
तो गेल्यावर त्यांना दुःख झाले पण त्यात त्याच्या वियोगाची वेदना होती.आपण त्याचे सगळे नीट केले. त्याचे आयुष्यच तेवढे त्याला काय करणार? अशी त्यांनीच सगळ्यांची समजुत काढली.

    दिवस उलटु लागले तसे विवेकच्या मृत्युचे दुःख कमी होत गेले.सगळॆजण आपापल्या कामाला लागले. सदानंद कामावर जाऊ लागला. त्याच सुमारास करुर साहेब सदानंदच्या ऑफिसमध्ये आले. साहेबांमुळे ऑफिसचे वातावरण बदललेच.सगळा स्टाफ वेळेवर येवु लागला. कामे भराभर उरकु लागली. सदानंदवर त्यांचा विशेष लोभ होता.त्याची कामातली तत्परता ,कमी बोलणे, कुठल्याही नव्या कामाला आवडीने सुरुवात करणे ह्यामुळे दोघांची वेव्हलेंथ जुळली. त्याला इतकी वर्षे प्रमोशन का दिले नाही असा त्यांना प्रश्ण पडला होता.  त्याचे उत्तम सी.आर. लिहिल्याने प्रमोशन मिळायला अडचण आली नाही.
   
  " मि.जोशी, अभिनंदन! लवकरात लवकर चार्ज घ्या. कोल्हापूरच्या ऑफिसमधेही असेच काम करा."
  "यस सर.." सदानंदला पुढे बोलवेना.नंतरचे दिवस खूप भराभर गेले.ऑफिसमधे पार्टी दिली. कोल्हापूरला जावुन कामाचा चार्ज घेतला. नंतरच्या शनिवार-रविवार मधे तेथे जागा बघितली. एक दिवस सुट्टी घेवुन थोडेफार सामान मुंबईहुन आणले. कोल्हापूरचे जीवन मुंबईच्या मानाने अगदीच निवांत. काम संपवुन घरी यावे तर घरात तरी कोण होते? सदानंदचा वेळ जाता जात नसे. वाचन करावे म्हणून लायब्ररी लावली पण वाचनाची फारशी आवड नव्हतीच त्याला. इथे कुणी मित्रही नव्हते. ऑफिसमधे हळुहळू ओळखी व्हायला लागल्या. गल्लीतल्या रिकामटेकड्या लोकांनी सदानंदचा ताबा घेतला. यातुनच पत्ते खेळायची सवय लागली. अधुनमधुन पार्ट्या सुरु झाल्या. जोशी साहेब-जोशी साहेब म्हणत तिथल्या लोकांनी सदानंदच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. आजवर बाहेरचं जग न बघितलेल्या सदानंदला वागण्यातले छक्केपंजे ठावुक नव्हते. ऑफिसमधे साहेबीपणा दाखवायची त्याला सवय नव्हती. अगदी नकळत तो दारु,पत्ते याच्या नादी लागला. ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष होवु लागले. मुंबईला जाणे कमी होवु लागले.विदुलाची शाळा,सुरेखाची बॅंक यामुळे त्यांनाही सुट्टीखेरीज इकडे येणे शक्य नसे. ऑफिसमधे सदानंदला जी पोस्ट मिळाली होती ती न मिळाल्याने कोल्हापूरातले पाटील आणि देवरे  हे दोघेजण त्याच्यावर रागावुन होतेच.त्यांनी सदानंदचा काटा काढायचा ठरवले. गोड गोड बोलुन त्यांनी आधी सदानंदचा विश्वास संपादन केला. त्याच्यासाठी घरुन डबे आणणे, त्याला जेवायला घेउन जाणे असे करुन पाटील आणि देवरे त्याचे डावे -उजवे हात बनले. त्यांनी बनवुन आणलेल्या नोट्स,बिलांवर तो न वाचता सह्या करु लागला. ऑफिसमधील एक निवृत्तीला आलेले क्लार्क पिंगळे यांनी आडून आडून सदानंदला सावध कराय़चा प्रयत्न केला. पण किती झालं तरी तो मोठा साहेब होता, लहान तोंडी मोठा घास ठरेल म्हणून जास्त बोलणे त्यांना जमले नाही.

    विनाशाची वाट निसरडी असते. त्यावरुन घसरायला फारसा वेळ लागला नाही.सदानंदला कोल्हापूरात येवुन वर्ष झाले. ऑडीट कमीटी आली. ऑडीट्मधे सदानंदच्या सह्या असलेली काही अशी बिले सापडली ज्याची खरेदी झालेलीच नव्हती. अशा कुठल्या बिलांवर सह्या केलेल्या त्याला आठवत नव्हते.पण सह्या त्याच्याच होत्या. अलगदपणे सदानंद सापडला. लहान गावात असल्या गोष्टींच्या चर्चा व्हायला वेळ लागत नाही. पेपरमधे बातमी आली. सदानंदला काही समजायच्या आत त्याची सस्पेंशनची ऑर्डर देखील आली. आजपर्यंत अतिशय ताठ मानेने जगलेल्या सदानंदला हा धक्का पचवणे केवळ अशक्य होते.  पश्चात्तापाने पार खचुन गेला तो. मुंबईला कुठल्या तोंडाने परत जायचे त्याला समजेना. आत्महत्येचा विचारही  मनाला शिवुन गेला.पण डोळ्यासमोर  प्रेमळ सुरेखा, थकलेले आई-बाबा, आधार वाटावी अशी उमा  आणि गोजीरवाणी विदुला यायची त्यांच्या मायापाशाने तो आत्मघातकी कॄत्य कराय़ला धजावला नाही इतकच.

    मुंबई ऑफिसला सदानंदच्या सस्पेंशनची बातमी समजताच त्याच्या जवळचा मित्र सुरेश हबकुनच गेला.यात काहीतरी काळेबेरे असणार हे त्याला समजले.ऑफिसमधुनच त्याने आधी सदानंदला कोल्हापूरच्या ऑफिसमधे फोन लावला. तो ऑफिसमधे असणे कठीण होतेच पण त्याचा कॉंन्टॅक्ट नंबर मिळवणे जरुर होते. मोबाईल फोन त्याकाळी आलेले नव्हते. सुदैवाने पिंगळ्यानी फोन घेतला. त्यांनी सुरेशला सदानंद किती खचलाय, त्याची कशी चूक नाही हे हलक्या आवाजात सांगितले. सुरेशला परिस्थितीची कल्पना आली त्याने उमाला फोन लावला, हि बातमी सदानंदने कळवली नसेल पण ती घरी समजणे आवश्यक होते अशा वेळी आधार असतो तो आपल्या माणसाचाच. झाल्या प्रसांगाला तोंड द्यावेच लागणार. उमालाही बातमी ऐकुन धक्का बसला.पण कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता शांतपणे विचार करण्याचा तिचा स्वभाव होता.तिने सुरेशला जास्त प्रश्ण विचारले नाहीत कि सर्वनाश झाल्यासारखे दाखवले नाही.
"संध्याकाळी घरी यायला जमेल तुला,सविस्तर बोललो असतो. मी आज रात्रीच्या बसनेच कोल्हापूरला जाईन म्हणते"
"येईन मी, पण तुझ्या आईबाबांना काय सांगशील? आणि सुरेखा वहिनींचे काय? असे कसे झाले ? तो असे करणे शक्य नाही ..."
" कसे झाले,कुणाचे चुकले यावर चर्चा करण्यापेक्षा यातून मार्ग कसा काढाय़चा हे महत्त्वाचे आहे नाही का? घरच्यांना सांगायचे मी बघेन, भेटू मग संध्याकाळी"
ठरल्याप्रमाणॆ सुरेश सदानंदच्या घरी गेला.घरातले वातावरण नेहमीइतके नसले तरी बरेच शांत होते.
" सुरेश तू म्हणतोस आणि आमचीही खात्री आहे सदानंद गैरकृत्य करणार नाही.पण तो फार सरळ वागणारा आहे,घरापासून दूर एकटा असा पहिल्यांदा राहिल्य़ाने वाईट लोकांच्या संगतीत सापडला असेल. बिलांवर त्याच्या सह्या होत्या म्हणजे त्याने न वाचता त्या केल्या असणार किंवा कोणीतरी त्याच्या सह्या केल्या असतील. दोन्ही बाबतीत त्याची चूक आहेच.पण यातून मार्ग निघु शकतो. मी आज रात्रीच निघते.सकाळी त्याच्याशी बोलेन .चांगल्या वकीलाची चौकशी करावी लागेल,इतरही काही मदत लागेल ती तू करशील ना?"
" असं विचारतेस काय उमा? मी आहेच.मी देखील वकील शोधतो"
दुसऱ्या दिवशी सकाळी उमा कोल्हापूरला पोचली.सदानंदचा चेहरा बघवत नव्हता. जागरण आणि काळाजीने तो दहा-बारा वर्षाने म्हातारा झाल्यासारखा वाटत होता.
" सदानंद काय अवस्था करुन घेतली आहेस? चहा तरी घेतला आहेस का सकाळपासून, मी आधी आपला चहा करते मग शांतपणे बोलू आपण"
"सगळं संपलय उमा, फार मोठी चूक केलीय मी कुणाला तोंड दाखवायची लायकी नाही राहिली माझी...." ओंजळीत चेहरा लपवत सदानंद रडत म्हणाला.
"आधी चहा पी. एवढं काही आभाळ कोसळलेल नाही अरे,चुका कुणाच्या हातुन होत नाहीत? आम्ही आहोत ना सगळे? सार काही ठिक होईल"
चहा प्यायला नंतर उमा म्हणाली ,"आता पहिल्यापासून काय काय घडलं ते तसच माझ्यापासून काहीही न लपवता सांग."
सदानंदने उमाला जमेल तसं सांगायला सुरुवात केली. पत्ते खेळणॆ, दारु पिणे या गोष्टी त्यांच्याकडे कधी कुणी केलेल्या नव्हत्या, सांगताना सदानंद्ला मेल्याहून मेल्यासारखे होत होते.
"इतका कसा मी घसरलो? आई-बाबांचे संस्कार ,शिकवण , तुमचे प्रेम सगळ्याचा कसा विसर पडला मला? छे, मला कुणाला तोंड दाखवावेसे वाटत नाही.या चुकीला क्षमा नाही उमा "
"शांत हो सदानंद, तू चुकलास त्यात तुझ्या इतकीच परिस्थितीही कारणीभूत आहे. आज आपण सगळे इथे असतो तर कदाचित असं घडलं नसत. तुला जो एकटेपणा इथे वाटला त्यामुळे तू वाईट गोष्टींच्या नादी लागलास, या वेळाचा सदुपयोगही तुला करता आला असता पण या सगळ्या जर... तर च्या गोष्टी आहेत त्यावर चर्चा करुन वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. झाल्या गोष्टीचा तुला पश्चात्ताप आहे,यातच तुझे भले मला दिसत आहे. आपली चूक मान्य असेल तर ती सुधारणे शक्य होते माणसाला. चुकांबद्द्ल जास्त त्रास करुन घेवु नको.आम्ही कोणी तुला त्याबद्दल सतत दोष देणार नाही. आपण सगळे मिळून या संकटाला तोंड देवु. तू बिलांवर सह्या केल्यास पण पैशाचा अपहार केलेला नाहीस.तुझे या पूर्वीचे रेकॉर्ड चांगले आहे. आपण चांगला वकील बघू त्यांच्या सल्ल्याने वागु.तू नक्की सुटशील यातून"

"नाही उमा, माझ्या अपराधाला शिक्षा व्हायलाच हवी.मी माझी चूक कोर्टातही मान्य करणार "
" असं करु नको सदानंद आपण विचारु वकिलांना.."
" उमा या बाबतीत तडजोड नाही.गुन्हेगाराला सजा हवीच"
उमाने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. सदानंदने तिचे ऐकले नाही.उत्तम वकील देवुन केस लढविण्यात आली.सदानंदला २ वर्षाची सजा आणि १०००० रु. दंड ठोठावण्यात आला.केस वर्षभर चालली. त्यात सगळ्यांनाच खूप मानसिक त्रास झाला. हाय़कोर्टात जा, वेळ पडली तर सुप्रीम कोर्टापर्यंत जा असे विजयने कळविले होते.तो वेळोवेळी पैसेही पाठवत होता. पण झालेली शिक्षा मंजुर असल्याचे सदानंदने जाहिर केले. आणि येरवड्याच्या जेलमधे त्याची रवानगी झाली.

तोंडाने चूक कबुल करणे, शिक्षा मान्य करणे आणि  वेळ आल्यावर जेलमधील कपडे अंगावर चढवणे यात फार अंतर होते. आतल्या कुठल्याच माणसाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नव्हते.होता फक्त बिल्ला नंबर. आजपर्यंत सिनेमात बघितलेल्या प्रत्यक्ष जेलचे दर्शन फारच विदारक होते ! त्या छोट्या छोट्या बराकी, ते निर्ढावलेली कैदी, ते निर्विकार कर्मचारी सगळच कसं त्रासदायक. पहिल्या दिवशी दिलेल्या ऍल्युमिनियमच्या ताटली आणि मगाकडे बघुनच सदानंदला ढवळुन आले. भात आणि कसलीशी भाजी असलेल्या त्या कळकट बादल्या बघुन त्याची जेवणावरची वासनाच उडाली. लांबच लांब वाटणारे ते दिवस आणि भकास,उदास अशा न संपणाऱ्या रात्री ! दोन वर्षे कशी जाणार होती ?

मिळालेल्या रिकाम्या वेळात गतजीवनाबद्दल विचार करण्याखेरीज करता येण्य़ासारखे काही नव्हतेच. उमाच्या "तुला जो एकटेपणा इथे वाटला त्यामुळे तू वाईट गोष्टींच्या नादी लागलास, या वेळाचा सदुपयोगही तुला करता आला असता पण या सगळ्या जर... तर च्या गोष्टी आहेत" या वाक्याची त्याला आठवण झाली.  यातुन बाहेर पडायला आपणच मार्ग काढला पाहिजे. त्याने दिनक्रम ठरवुन घेतला. लवकर उठणे,सकाळी योगासने करणे, व्यायाम करणे सुरु केले. जेलमधील लिखापढीची कामे त्याला शिक्षित असल्याने दिली होती. जेलचे रेकॉर्ड त्याने नीट केले. हळूहळू कर्मचारी वर्ग, जेलर यांचा तो लाडका बनला. कैद्यांनाही आसने शिकवणे, गप्पा मारणे त्याने सुरु केले.

    महिन्यातुन एकदा सुरेखा भेटायला येई.तो दिवस मात्र त्याला नकोसा वाटे.तिच्या भेटीची ओढ होती पण तिला तोंड दाखवणे फार जड जाई त्याला.आपल्या अशा वागण्याचा तिला किती त्रास होतोय.बॅंकेत ,समाजात तिला वावरताना कशाकशाला तोंड द्यावे लागत असेल या विचाराने तो कष्टी होई. विदुलाला ती काय सांगत असेल? सुरेखाला आपण दुःखच दिले या विचाराने तो बेचैन होई. सुरेखा मात्र तसे दाखवत नसे.तिचा चेहरा त्याला बघताच फुलून येई. त्याच्या आवडीच्या चकल्या तिने आणलेल्या असत त्याला ती खायला लावी. आई-बाबांची खुशाली सांगे.विदुलाचे फोटो दाखवी.तिला कुठले बक्षिस मिळाले त्याचे वर्णन करी. बघता बघता हे दिवस संपतील, तुम्ही सुटाल.असे सांगुन ती त्याचा निरोप घेई. सुरेखा गेल्यावर पुन्हा उदास वाटू लागे.

    सदानंदच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याची शिक्षा ८ महिन्यांनी कमी झाली. वर्ष संपले. आता चारच महिने उरले होते. सदानंद सुटुन आला की त्याला या जागेत आपण नकोच आणायला असे घरच्यांनी ठरविले. इकडे नाही म्हटले तरी लोक कुजबुणार,चौकशा करणार,बोलणाऱ्यांचे तोंड धरता येत नाही. झाल्या घटना लवकरात लवकर विसरुन नवे आयुष्य सुरु केले पाहिजे.  बोरीवलीला एक ब्लॉक उमाने घेतलेला होता, तो भाड्य़ाने दिला होता. करार संपताच त्या रिकाम्या जागेत काही सामान हलविले. सदानंदने सुरेखा बरोबर रहायचे. विदुलाचे दहावीचे वर्ष इथेच होईल ११वी पासुन ती देखील तिकडेच जाईल असे ठरले. बोरीवलीच्या घरात सामन लागले.सदानंद येण्याचा दिवस जवळ येवु लागला. सुरेखा आणि उमा दोघी त्याला आणायला जाणार होत्या , त्याला टॅक्सीने बोरीवलीच्या घरी आणणार होते.त्या घरी सगळी जमली होती.

        सदानंद १२ तारखेला सुटणार, जेलर पासुन सगळे त्याचे अभिनंदन करीत होते. त्यालाही आयुष्यातले काळे पर्व संपल्याचे जाणवत होते. पुढे काय कराय़चे ते अजुन ठरत नव्हते. ऑफिस जॉइन कराय़चे कि दुसरे काही अजुन विचार होत नव्हता. ४ तारखेला सकाळपासुन सदानंदचे अंग दुखत होते. संध्याकाळी त्याला थंडी वाजुन ताप भरला. दुसऱ्या दिवशीही तसेच.जेल मधल्या डॉक्टरांनी औषध दिले. चार दिवस झाले तरी तोच प्रकार. शेवटी ससुन मधे ऍडमिट करण्य़ाचा सल्ला दिला. ऍम्ब्युलन्स मधुन सदानंदला ससुनमधे नेले. तिकडे सगळ्या तपासण्या केल्या. मलेरीयाचे निदान झाले. पण आजाराने गंभीर रुप घेतले होते. फुफ्फुसात प्रादुर्भाव झालेला होता. त्यावेळी फार प्रभावी औषधे उपलब्ध नव्हती. जेलमधुन सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झालेली होती

    १० तारखेला रात्री सदानंद अत्यवस्थ झाला. जेलमधुन त्याच्या घरी फोन करत होते पण घरचे सगळे बोरीवलीला असल्याने फोन कुणी उचलला नाही. दुसऱ्या कोणत्याच नंबरांची त्यांच्याकडे नोंद नव्हती. १० तारखेला रात्री उशीरा सदानंदचे प्राणोत्क्रमण झाले. त्याच्याजवळ त्यावेळी घरचे कुणीही नव्हते ! त्याच्या निधनाची बातमीही घरी कुणाला समजलीच नव्हती

    बोरीवलीच्या घरात आनंदी वातावरण होते. सदानंदला आणायला सुरेखा आणि उमा जाणार होत्या पण आयत्या वेळी सुरेखाला काही अर्जंट कामामुळे बँकेत रजा नामंजुर करण्यात आली.तशीही तिच्या या काळात बऱ्याच सुट्ट्या होत असत. उमा म्हणाली,"खरं तर तू आली असतीस तर त्याला बरं वाटलं असतं पण काही हरकत नाही , मी त्याला घेवुन येते. तू कमावरुन येइपर्य़ंत तो फ्रेश होवुन तुला भेटायला तयार असेल."

    उमा पहाटे निघाली साडेदहाच्य़ा सुमारास येरवड्याला पोचली. जेलमधे गेल्यावर तिला सदानंदच्या निधनाची बातमी समजली. तिला खरच वाटेना.
"सॉरी, आपला काहीतरी गैरसमज होतोय, सदानंद जोशींकरीता मी आलेली आहे, तुम्ही दुसऱ्या कुणाबद्दल बोलत आहात का? "
"नाही मॅडम, I am really sorry, पण ही बातमी खरी आहे,आम्ही तुमच्या घरी फोन लावला पण तो लागला नाही, दुसरा कोणताच नंबर आमच्याकडे नव्हता त्यामुळे आमचा नाइलाज झाला. सगळे पेपर्स तयार आहेत. तुम्ही बॉडी ताब्यात घेणार की अजुन कुणाला बोलावताय?"

आपल्या डोक्यात कुणीतरी घाव घालतय असं उमाला वाटु लागलं, इतक्या मनःस्तापात काढलेल्या या दिवसांचा शेवट असा का व्हावा?  हि बातमी घरी कशी कळवावी ?या प्रसंगाला तोंड द्यायला लागु नये म्हणून नियतीने सुरेखाची रजा नामंजुर केली असेल का?  असे नाना प्रश्ण घेवुन उमा खुर्चीतुन उठली आणि जेलरसाहेबांच्या केबीन मधुन बाहेर पडली.
    

Monday, November 25, 2013

निरोप

गोपाळरावांची प्रकृती हळू हळू ढासळायला लागली. ऐंशी वर्षे उलटली असावीत त्यांना. हा आपला अंदाजच. त्या काळात कोण लिहून ठेवायचे जन्मवेळा?. गोपाळरावांच्या अगदी लहानपणीच त्यांची आई मथुरा सोवळी झाली. वडीलांचा चेहरा त्यांना आठवतच नव्हता. कोकणातल्या दारीद्र्याला आणि कर्मठपणाला कंटाळून करारी मथुरेने आपल्या एकुलत्या एक मुलाला पोटाशी घेवुन चार कपडे गाठोड्यात बांधुन कुणा नातलगाच्या मदतीने पुण्याचा रस्ता धरला. शिक्षण नसल्याने एका सधन कुटुंबात स्वयंपाकाचे काम मिळाले. शंभर-दिडशे वर्षांपूर्वीचा तो काळ. सुखवस्तू कुटुंबातून अशा निराधार लोकांना आधार मिळे. मोठमोठ्य़ा वाड्य़ातील एकत्र कुटुंबात तीस चाळीस माणसे राहत, तेंव्हा स्वयंपाकाचे काम अशा बायकांना मिळॆ. त्यातच शहरात मधुकरी मागुन शिकणारे विद्यार्थी असत, वारावर जेवणारी मुले असत. एकूण आपल्याला मिळालेल्या पैशातून चैन न करता गरजुंना मदत करण्याची प्रथा असल्याने ही मोठी कुटुंबे संस्थाच होत्या जणु.

    गोपाळची आई मथुरा , वाड्यातील सगळ्यांची मथूताईच झाली होती. कामाला वाघ होती ती. बोलणॆ कमी पण समज अफाट.पुण्यातल्या ज्या वाड्यात तिला आसरा मिळाला, तिथे तिने आपल्या कष्टाने सगळ्यांना आपलेसे केले, गोड बोलून त्या वाड्यातली एक खोली स्वतःसाठी स्वतंत्र मिळविली. त्यात मुलाबरोबर ती वेगळी राहू लागली.वाड्यातले सगळे काम झपाटून ती चार घरी पोळ्या करू लागली , शिवण टिपण शिकू लागली. आपल्या मुलाला शिकवून मोठे करायचे या ध्यासाने तिने अहोरात्र कष्ट केले. गोपाळ मॅट्रीकची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाला. लहानपणापासून त्याने आईला काम करतानाच बघितले होते. पुढे शिकण्यापेक्षा नोकरीला लागून आईच्या जीवाला आराम द्यायचे त्याने ठरविले होते. त्याप्रमाणे त्याला सरकारी नोकरी मिळाली. आईच्या अपेक्षाही फार नव्हत्याच. मुलगा स्वतःच्या शिक्षणाने कामाला लागला आता आपण स्वाभिमानाने जगू या, या विचाराने ती माऊली सुखावली. तिची कामे तिने कमी केली, बंद काही केली नाहीत. वाड्याच्या मालकांशी त्यांचे संबंध कायमचे होतेच. तिकडच्या नव्या सुना मथूताईंना वडीलकीच्या नात्याने वागवित. मुले देखील त्यांना मान देत. वाड्याचे मालक आबासाहेब फार करारी होते. त्यांनी खूप मुलांना शिक्षणाला मदत केली. अनेक मुले त्यांच्याकडे वारावर जेवायला येत. त्यांच्याकडे आलेला याचक कधी विन्मुख गेला नाही. त्यांचा एकुलता एक मुलगा विश्वनाथ फार हुशार होता. आय.सी.एस. परीक्षा द्यावयास तो इंग्लंडला गेला. परीक्षा पास होवुन परत येण्याची त्याने तार केली. आबा साहेबांनी त्याला तुला प्रायश्चित्त करुन घ्यावे लागेल असे कळविले. त्या काळी विलायतेहून आल्यानंतर प्रायश्चित्त घ्यावयाची कर्मठ रीत होती.  उच्च शिक्षण आणि परदेश भ्रमण केल्यामुळे मुलाचे विचार आधुनिक होते, प्रायश्चित्त वगैरे थोतांड आहे असे तो मानत होता वडीलांना त्याने तसे कळविले. आबा काही बाबतीत आग्रही होते. "शिक्षणासाठी मी तुला परदेशी पाठविले आता माझ्या मनासाठी तुला प्रायश्चित्त करुन घ्यावे लागेल हे तुला मान्य नसेल तर तू इकडे आल्यावर घरी येण्याची तसदी घेवू नको. मी अनेक मुलांना शिकविले त्यातल्या एक मला विसरला असे मी समजेन" असे उत्तर त्यांनी उलट टपाली धाडले.विश्वनाथ वडीलांचे मन मोडू शकला नाही. त्याने मनाविरुध्द प्रायश्चित्त घेतले.

    अशा कडक आबासाहेबांच्या वाऱ्याला मुले फारशी राहत नसत. बायका त्यांच्या समोर जातच नव्हत्या. गोपाळ तर लहानपणापासून गरीब आणि भित्राच राहिला या अशा परिस्थितीमुळे. मिळालेली सरकारी नोकरी इमाने,इतबारे करु लागला. कोकणातल्या अशाच गरीब घरातली मुलगी रमा त्याला सांगुन आली. गोपाळचे लग्न झाले आणि तो गोपाळराव बनला. रमा दिसायला गोरी -गोमटी दहा जणीत उठून दिसणारी होती. मथूताईंना आता हक्काची विश्रांती मिळू लागली. तसे आजवर खाली मान घालून काढलेले आयुष्य,आता जरब दाखवायला हक्काची व्यक्ती मिळाली. रमेच्या प्रत्येक हलचालीवर मथूताईंची बारीक नजर असे, तिचे चुकतयं कुठे आणि आपण बोलतोय कधी असं चाले. सुनेनं सार मुकाट्यानं सोसण्याचा तो काळ होता. पण गोपाळरावांकडे तिने कधी सासुच्या चुगल्या केल्या नाहीत. त्यांना डोळ्यानी जे दिसे त्यातुन आईचे वागणे खटकले तरी आईला बोलायची त्यांची प्राज्ञा नव्हती पण त्यांनी कधी रमेलाही दुखावले नाही. घरात त्यामुळे शांती समाधान होते.

    काळाबरोबर गोपाळ-रमाचा संसार बहरला. मथुताईंचे वय झाले.आयुष्यभर कष्ट केलेल्या माउलीचे म्हातारपण सुखात गेले.लेकाने आणि सुनेने त्यांची सेवा केली.नातवंडे बघायला मिळाली. पिकले पान गळून पडले. गोपाळरावांची मुले सालस आणि हुशार निघाली. त्यांची एकट्याची कमाई आणि वाढत्या महागाईचा काच यामुळे मुलांना उच्च शिक्षणापासून वंचित रहाव लागल. एक मुलगा मिलिटरीत गेला. दुसऱ्याला नोकरी लागली.मुली मॅट्रिक झाल्याबरोबर लग्न करुन सासरी गेल्या. धाकट्या मुलाला मात्र पदव्युत्तर शिक्षण मोठ्या भावडांनी दिले. मोठ्या कंपनीत तो उच्च पदावर कामाला लागला. रमाबाईंचा स्वभाव जळाहून शितळ. अंगात अनेक गुण,कला.पण काडीचा गर्व नव्हता त्यांना.मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केलेच.पण सुनांवरही मुलींप्रमाणे प्रेम केले. कामाची टापटीप,नीट्नेटकेपणा यात त्यांचा हात धरला नसता कुणी.उकडीचे मोदक तर असे करायच्या कि पाकळ्या मोजून घ्याव्यात. एकावर एक असे तीन सुबक मोदक हि त्यांची खासियत होती. शेवया, फेण्या पण त्या फार सुरेख करीत. वाड्यात कुणाचे लग्न ठरले कि रमाबाईंच्या रंगीत शेवया,फेण्या रुखवतावर असायच्याच.वाड्यात सगळ्या कुटुंबात एकी होती.रमाबाईंच्या लाघवी आणि प्रेमळ स्वभावाने तर सगळ्यांमध्ये त्या लाडक्या होत्याच. अबासाहेबांच्या कुटुंबाशीही त्यांचे संबध सलोख्याचेच होते.
       
     रमाबाईच्या थोरल्या नानाला मुंबईला नोकरी लागली. दोन्ही मुली सासरी गेल्या. मिलीटरीत गेलेला राघव नोकरी संपवून आला. त्याला पुण्यात चांगली नोकरी मिळाली. सुंदर खाशी सुबक ठेंगणी हे वर्णन लागु होईल अशा लेल्यांच्या सुनंदाशी त्याचे लग्न ठरले.  रमाबाईंना खूप आनंद झाला.नाना नोकरी निमित्ताने मुंबईत होता सुनेचं येण जाण क्वचितच व्हायच.घर सोडून मुंबईला जाणं त्यांना जमायच नाही.राघव आता जवळच राहणार. सुनंदाचं त्यांनी खूप कौतुक केलं. तिची दोन्ही बाळंतपण स्वतः केली.नातवंडांनाही आजीचा फार लळा. धाकटा माधव बराच शिकल्यानं त्याला मोठ्ठी नोकरी मिळाली. त्याला मुली पण शिकलेल्या, मोठ्या घरच्या सांगुन येवु लागल्या. वाड्यातली जागा अपुरी पडू लागली. माधवने गावाबाहेर सुरेख ब्लॉक घेतला. लग्नानंतर तो तिकडेच राहणार होता. सुनंदाची मुलेही आता बऱ्यापैकी मोठी झाली होती. सुनंदाला बालवाडीत नोकरी मिळाली होती. राघवलाही नोकरीत बढत्या मिळत होत्या. सुनंदाला  वाड्यात राहणे गैरसोईचे वाटू लागले. बाकीच्या दोन जावा स्वतंत्र राहतात, मलाच सासुसासऱ्यांबरोबर रहावे लागते असाही भाव त्यात होताच. नव्या नव्या सोईंनी सजलेले लोकांचे ब्लॉक बघितल्यावर आपल्या वाड्यातल्या खोल्या तिला फारच त्रासदायक वाटत. तिने गोडीने,लाडाने,आडून आडून राघवला नवीन जागा बघायचा आग्रह करायला सुरुवात केली. राघवलाही तिचे म्हणणे पटत नव्हते असे नाही, पण आई-बाबांना काय सांगायचे? बाबा तर ही जागा सोडणे कठीण आहे.
आईजवळ शेवटी त्याने विषय काढलाच. रमाबाईंना नवलच वाटले. त्यांना वाड्याच्या जागेत कुठलीच उणीव दिसत नव्हती. हं जागा होती जुनी.पण शेवटी घर म्हणजे भिंती,रंग सजावट थोडीच असते? घरातली माणसं, त्यांच एकमेकांवरच प्रेम, जिव्हाळा याने वास्तु बनते ना? या वास्तुने आजवर त्यांना सगळं सुख समाधान दिल होतं. इथुन शाळा,बाजार देवळे सगळं जवळ.मग थोडी जुनी असली जागा म्हणून काय बिघडलं? 

    रात्री पडल्या पडल्या रमाबाई विचार करु लागल्या, हल्ली त्यांना सुनंदाच्या वागण्यातला फरक जाणवत होता. तिच्या चिडचिडीचं, आदळआपटी मागचं,मुलांवर उगाच रागावण्यामागच कारण त्यांना समजल . देवळात भेटणाऱ्या बायका, आजुबाजुच्या मैत्रीणी यांची मुले वेगळी राहत होती.आपल्या घरी सुध्दा मातीच्याच चुली आहेत.  कोकणातून पुण्यात आलो तेंव्हा हि आपल्याला जागा लहान वाटत होती,पण जमीनीऐवजी फरशी,नळाला येणारं पाणी, कोळशाची शेगडी याचं आपल्याला कौतुक होतचं की. तसच गुळगुळीत फरशा, स्वतंत्र झोपायच्या खोल्या, बाथरुममधल्या टाईल्स, भिंतीतली कपाटे याचं सुनंदाला अप्रुप वाटल तर त्यात तिची काय चूक? आपण सासुबाईंशिवाय राहण्याची कल्पनाच केली नाही कधी कारण त्याकाळी असा विचार मनातच येत नव्हता आता सुनंदेच्याच जावा राजा-राणी सारख्या स्वतंत्र राहतायत मग तिलाही तसं वाटल तर त्यात काय नवल? सुनंदाच्या बाजूने बघितले तर तिचेही बरोबरच होते असं त्यांना जाणवलं तसं त्यांनी ठरवल, निवांतपणे राघवशी बोलूया, गोडीत आहेत तोवर त्यांनाही वेगळ राहूदे, आम्ही दोघे राहू या जुन्या जागेत. अडीअडचणीला येऊ जाऊ एकमेकांकडे. गणपती तेवढा इथेच बसवू त्यावेळी सगळी एकत्र जमत जाऊ. ही जागा सोडणे आम्हाला शक्य नाही. आबा गेले तरी त्यांच्या पत्नी आता थकल्या होत्या , रमाबाई रोज दुपारी त्यांना ज्ञानेश्वरी वाचून दाखवायला जात. वयोमानामुळे डोळ्याने खूप कमी दिसे त्यांना. सगळं आयुष्य इथे गेल्याने या जागेबद्दलची माया वेगळीच होती. गोपाळरावांना तर वाटे इथे आल्यामुळेच आजचे दिवस दिसत आहेत. गोपाळराव मनाने हळवे,स्वभावाने गरीब. लहानपण आबांच्या आणि आईच्या धाकात गेल्याने आवाज चढवून बोलणं सुध्दा त्यांना कधी जमल नाही. राघवनं आग्रह केला तर त्याच्या नव्या जागेत जायला ते नाही म्हणू शकले नसते.पण तिथे रमलेही नसते. त्यामुळे त्यांच्या मनाचा विचार करता आपण दोघांनी या जागेतच रहायचं अस रमाबाईंनी मनाशी पक्क केल. गुरुवारी राघवला सुट्टी होती,सुनंदाला सकाळी शाळेत गेली होती. त्यावेळी रमाबाईंनी राघवजवळ विषय काढला.
 "तुम्हाला सोईची वाटत असेल अशी चांगली जागा बघा.आम्ही दोघे इथेच राहू"
"आई, तुम्हाला सोडून नाही रहायचं मला. तुम्हीही यायला हवच"
"असा हट्टीपणा करु नको राघव, अरे तुझं प्रेम काय दूर राहिल्याने कमी होणार आहे का? पण आमची हयात गेली या जागेत आणि माई आता थकल्या त्या मला सासुबाईंच्या जागी आहेत रे, त्यांना सोडून आम्ही नाही जाऊ शकत. घरं वेगळी असली तरी आबांच्या मुळे आज आपण इथे आहोत तेंव्हा तुझ्या बाबांना इथुन जाणे नाही सोसणार. तुम्ही रहा वेगळे, येत रहालच इथे. मनी आणि राजाला सोडून रहायला मलाही त्रास होईल थोडा , पण रविवारी आणत जाऊ इकडे. गणपती तेवढा इथेच बसवू त्यावेळी सगळी एकत्र जमत जाऊ, नाना आणि माधव नाही का येत तसचं "
बऱ्याच वेळानं राघवची समजूत पटली. पुढच्या पाच-सहा महिन्यात त्याने ब्लॉक बुक केला.नंतरच्या वर्षी वास्तुशांत करुन मंडळी नवीन जागेत रहायला गेली.

    रमाबाईंना सुरुवातीला जरा जड गेले.नातवंडाची माया वेगळीच असते, मनी त्यांच्य़ात जवळ झोपा्यची. राजाला आजीनेच कालवलेला भात लागायचा. शाळेतुन आली कि मुले आजीच्या भोवतीच असायची. रविवारी मनीला सुनंदाला तेल लावून न्हावु घालायचे, आता अगदीच रिकामपण आले. त्य़ांची मोठी ताई गावातच होती पण दहा माणसांच्या सासरच्या गोतावळ्यात तिचं माहेरी येणं होतच नसे. तिचे सासुसासरे वारले. दिर वेगळे राहू लागले. तिला जरा निवांतपणा आला.ती अधुनमधुन रमाबाईंकडे येऊ लागली. बाकी वाड्यात लोकांची वर्दळ असेच. बिऱ्हाडांमधे एकोपा होता म्हणून गोपाळराव आणि रमाबाईंना एकाकी कधी वाटलच नाही. दुपारी रमाबाई ज्ञानेश्वरी वाचायला आबांच्या माईंकडे जाऊन येत. देवळात चांगले किर्तन असले कि माईंना घेऊन त्याही गोपाळरावांबरोबर देवळात जात. वाड्यात कुणाला मोदक शिकव, कुणाला लोणचं घालू लागायला जा.असा त्यांचा वेळ जाई. गोपाळरावांचा दिनक्रमही ठरलेला होता.पहाटे सारसबागेच्या गणपतीपर्यंत फिरुन याय़चे. येताना मंडईत चक्कर मारुन भाजी आणायची .अंघोळ करुन यथासांग पुजा कराय़ची.जेवण झाल्यावर दुपारी वामकुक्षी घ्यायची.मग देवळात किर्तन,प्रवचन ऐकायला जायचे.संध्याकाळी थोडे समवयक्सांबरोबर गप्पा. रात्री ८ वाजता जेवण,मग वाचन आणि झोप असा नेमस्त दिनक्रम चाले. बॅंकेची कामे, बाजारहाटही ते करत. २-३ महिन्यातुन एकदा दोघे ताई आणि माईकडे चक्कर मारुन त्यांची खुशाली बघुन येत. माधव ,राघवकडेही जात. नातवंडाना सुट्टीत घरी घेवुन येत. त्यांना मंडईतुन फळे आणणे. खाऊ करण्य़ासाठी सामान आणून देणे हि कामे हौसेने करीत. माधवने त्यांना फोनही घेवुन दिला. त्यामुळे रोज नातवंडाशी बोलणे होवु लागले. नानाची खुशाली समजु लागली. एकूण उभयतांचा वाड्य़ात राहुन वानप्रस्थाश्रम चालू होता.

    अशी दहा-पंधरा वर्षे गेली. कष्टाची शरीरे म्हणून बराच काळ तग धरुन राहिली.पण शेवटी वय होणारच. गोपाळ रावांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढू लागल्या. प्रत्येक ऋतुबदलाला सर्दी-खोकला सुरु होई तो लवकर बरा होत नसे. खोकताना दम लागे. रात्र-रात्र बसून काढावी लागे,मग दिवसा फार अशक्तपणा येई.जेवण खूप कमी झाल. रमाबाई सतत गरम पाणी देत. गवती चहाचा,आडुळशाचा काढा देत. राघव गुरुवारी आला कि बाबांना डॉक्टरकडे घेवुन जाई,औषधे आणून ठेवी.पण एकूण प्रकृती तोळामासाच झाली होती. यंदाच्या थंडीत गोपाळरावांच्या आजाराने उचल खाल्ली. फॅमीली डॉक्टरांनी आजाराच्या गांभीर्याची कल्पना राघवला दिली. त्यांनी गोपाळरावांना हॉस्पीटलमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला. जवळच्या चांगल्या हॉस्पीटलमध्ये गोपाळरावांना दाखल केले. नाना मुंबईहुन आला. माधव,राघव ,नाना आणि दोनही जावयांनी रात्री राहण्याच्या वेळा ठरवुन घेतल्या. ताई आईच्या सोबत राहायला आली.सुना-मुली डबे देवु लागल्या. वाड्यातली मंडळी आलटुन पालटुन गोपाळरावांना भेटायला जावु लागली. रमाबाई दिवसभर त्यांच्याजवळच असत. रात्री मोठ्या मुश्किलीने मुले त्यांना घरी पाठवित.
"आई, तुला विश्रांती घ्यायलाच हवी, रात्रीची झोप स्वस्थ झाली कि दिवसभर तू इथे बसू शकशील, नाहीतर तू आजारी पडशील ना"
" बर बाबांनो, पण तुम्ही दिवसभर कामावर जाता, तुम्हाला नको का विश्रांती? मला घरी तरी कुठे झोप येणार आहे? तिथे पडायचं तर इथे पडले असते"
" नको आई, रात्री काही औषधं लागली, काही लागल, तर आम्ही इथे असलेलं बर, ते आमचे पण बाबा आहेतच ना, थोडा त्रास आम्हाला झाला तर काही बिघडत नाही, मुळात आम्हाला तो त्रास वाटातच नाही आजवर त्यांचं काहीच कराव लागल नाही आम्हाला"
" ठिक आहे, तुम्ही म्हणाल तसं. ताई आहे घरी सोबतीला, राहिन मी घरी "
येते , येते बरका असं चार चारदा गोपाळ रावांचा हात हातात घेत रमाबाई म्हणत आणि जड पावलांनी ताई बरोबर घरी येत. आल्यावर दोघी जुन्या आठवणी काढत बोलत बसत. ताई  रमाबाईंना जेवायला लावी. अधुनमधुन फोन करुन बाबांच्या तब्येतीची खबर घेई.
गोपाळरावांची नोकरी फार मोठी नव्हती, त्यांच्याजवळ पुंजी ती केवढी असणार पण दोघांनी आजवर कुटुंबासाठी आणि परिचितांसाठी केलेल्या चांगुलपणाची ठेव मोठी होती, त्यांच्या आजारपणात ती कामी आली. लेकी सुना मुलगे जावई तर होतेच त्यांच्या सेवेला पण वाड्यातले शेजारी, आबांच्या घरातले सगळे हॉस्पीटल मधे जात.रमाबाईंना धीर देत. पैशाची काळजी करु नका असा आबांच्या नातवाचा निरोप तर गोपाळरावांना हॉस्पीटल मधे ठेवल्यादिवशीच आला. माधवने हॉस्पीटलमधे स्पेशल खोली घ्यायला लावली होती.सगळ्यांच्या मायेने आणि आस्थेने गोपाळरावांना भरुन येत होते. तुम्हा साऱ्यांना माझ्यामुळे किती त्रास असं ते भेटायला आलेल्यांना वारंवार म्हणत.

    दवाखान्यात ठेवुनही म्हणावी तशी त्यांच्या प्रकॄतीत सुधारणा नव्हती. पाच-सहा दिवसांनी तर गुंतागुंत वाढू लागली. अन्न जाईना, श्वास घेणे त्रासदायक होवु लागले. डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना गोपाळरावांची अखेर जवळ आल्याची कल्पना दिली. गुरुवारचा दिवस होता. रमाबाई गोपाळरावांच्या जवळ जप करत बसलेल्या होत्या. रात्रीचे आठ वाजून गेले होते. ताई आणि तिचे यजमान गोपाळरावांसाठी गरम पेज घेवुन आले.रमाबाईंनी त्यांना ती भरवली.तिन्ही मुलगे जवळच होते. धाकटी माई पण आली होती. रमाबाईंना घेवुन ताई घरी जायला निघाली.त्या दोघींना भावांनी डॉक्टरांशी झालेल्या बोलण्याबद्दल काही सांगितले नव्हते. गोपाळरावांचा निरोप घेवुन रमाबाई निघाल्या. दोघी घरी आल्या. ताईने रमाबाईंना जेवायला बसविले.
"नको गं , आज भूक नाही, खावस वाटतच नाही बघ"
"आई, असं नको करु, घासभर भात खा, गरम सार केलय बघ अमसुलाचं , बाबांनाही पेजेत घालून दिल त्यांच्या तोंडालाही चव आली"
बळेबळेच दोघी जेवल्या. ताईने मागच आवरल.बाहेरच्या खोलीत कॉटवर रमाबाई आडव्या झाल्या. ताईने खाली अंथरुण घातलेलं होत
मध्यरात्र होवुन गेली असावी. ताईचा जरा डोळा लागला होता. रमाबाई गादीवर उठुन बसल्या आणि बोलायला लागल्या.
" इतका त्रास होतोय का जीवाला, मग नका हो सहन करू ! माझीच काळजी वाटतीय ना? राहिन मी एकटी , आणि एकटी तरी कुठे, मुलं आहेत ना आपली? माई आहेत तोवर इथे राहिन मग पुढच पुढे बघू.तुम्ही माझी चिंता नका करु. मला नाही करमणार तुमच्या शिवाय, पण आपल्या हातात काय आहे? जिवाची उलघाल नका करु हो.नाही सहन होत तुमची तळमळ, मला बोलावणं आलं कि मी येइनच तुमच्याकडे"
ताई उठून बसली, आई काय बोलतीय तिला कळेचना, आईला कसला भास झाला कि झोप नसल्याने काही त्रास होतोय अशा विचाराने ती आईजवळ गेली.
"आई, काय होतय तुला, कुणाशी बोलत आहेस, स्वप्न पडल का ग?"
" स्वप्न पडायला झोप लागायला हवी ना, काही नाही पड तू"
तेवढ्यात फोन वाजला ताईने फोन घेतला
"हॅलो, ताई , बाबा गेले गं आत्ताच खुप प्रयत्न केले सगळ्या डॉक्टरांनी पण काही उपयोग नाही झाला शेवटी थोडावेळ तळ्मळ झाली आणि मग सगळेच शांत झाले. मी ,नाना आणि माधवला पाठवतोय पुढे आईला कसं सांगायच बघ नाहीतर ते दोघे आल्यावर सांगा तुम्ही" एवढे बोलून राघवने फोन ठेवला.

 फोन ठेवुन ताई वळली.तिच्या भरलेल्या डोळ्याकडे बघत रमाबाई म्हणाल्या
"गेले ना हे, तेच सांगत होता ना फोनवर राघव ? अत्ता माझा निरोप घेवुन गेले. त्यांच्याशीच तर बोलत होते.
"असं काय म्हणतेस आई, तुला भास होतोय, मी डॉक्टरांना बोलवु का?"
" नको, भास नाही, काही नाही, अगं साठ वर्ष झाली आमच्या संसाराला. पंधरा वर्षाची असताना आले या घरात. कधी मला एका शब्दानं दुखवलं नाही त्यांनी. दुखल खुपल न सांगता समजत एकमेकांच आंम्हाला.मला सांगितल्याशिवाय देवळात पण गेले नाहीत कधी तर एवढ्या मोठ्या प्रवासाला जाताना निरोप घेतल्याशिवाय़ कसे जातील? जीव तळमळत होता गं त्यांचा. माझ्यात अडकत होता त्यांचा प्राण,म्हणून मीच समजुत घातली अखेरी. आपलं माणूस आपल्याला नको असतं का? पण शेवटी त्या कुडीत त्रास होत होता त्यांना. मग माझ्या स्वार्थासाठी त्यांना कशाला यातना सोसायला लावु ? ज्ञानेश्वरीत सांगितलय ना वस्त्र जुने झाले कि ते टाकुन नवे वस्त्र आत्मा धारण करतो. म्हणून मी त्यांना सांगितले माझी चिंता करु नका. तुम्ही जा .माझी वेळ आली कि मी येईन."

आईची समजुत कशी घालणार असा प्रश्ण सगळ्याच मुलांना पडला होता. पण तिच्या अलौकिक प्रेमाच्या ताकदीने तिने स्वतःच आपल्या पतीला निरोप दिलेला होता. यमाच्या दारातुन पतीचे प्राण परत आणणारी सावित्री जितकी मोठी तितक्याच आपल्या मायापाशात अडकून यातना सोसणाऱ्या पतीला माझी काळजी करु नका असे सांगुन मुक्त करणाऱ्या रमाबाई मोठ्या.

Friday, July 8, 2011

खरा तो प्रेमा

नुकतीच एक घडलेली घटना ऐकली. पुण्य़ाजवळील लोणी-काळभोर नामक गावातली.

एक वृध्द जोडपे रहात होते तिथे. त्यांचे पोट पिकले नव्हते.एकमेकांच्या आधाराने चालला होता संसार.लहान गाव असल्यामुळे अजुबाजुचे लोकांची सोबत चांगली होती. चरितार्थासाठी त्यांचं एक टपरीवजा दुकान होतं, चहा-बिस्कीटं, बिड्या-काड्य़ा अशी किरकोळ सामानाची विक्री करीत तेथे.रोज पहाटे आजोबा उठून टपरीवर येत, दरवाजा उघडून देवाच्या तसबिरीपुढे उदबत्ती लावत.समोरचा चौक झाडून पाणी मारुन ठेवत आणि एकीकडे गॅसवर आधण ठेवत.गवळ्य़ाने दूध आणून दिले कि ते तापवुन घेत पाण्य़ात साखर,चहापत्ती टाकुन उ्कळी येईतो, मजूर, रात्रपाळीहून परतणारे कामगार टपरीशी येत, आजोबा त्यांना गरम गरम चहा देतात तो आजी गुडघ्यावर हात ठेवत ठेवत दुकानाशी येत.कपबश्या विसळणे, लागेल तसा चहा गाळणे हि कामे त्या करु लागत. सकाळची गडबड कमी झाली कि आजी पुन्हा घरी जात, दुपारी आजोबा जेवायला घरी जात. चार वाजता परत दुकानात येत.असा त्यांचा गेले कित्येक वर्षाचा दिनक्रम होता. तुकोबांची पालखी टपरीवरुन जायची तेंव्हा आजी आजोबा जमेल तेवढ्या वारकऱ्यांना चहा आणि केळी देत.तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेत.दोघांच्या कपाळी बुक्का,गळ्यात तुळशीची माळ.

वयाप्रमाणे आजींच्या तब्येतीच्या कुरुबुरी सुरु असत.कधी गुडघे दुखत, कधी खोकला फार दिवस टिके.चालताना हल्ली धापही लागे,दुकानापर्यंत येताना वाटेत दोनदा त्या कुठेतरी टेकत. फार झालंतर जवळचा डॉक्टर गोळ्या देई,क्वचित सुई टोचे.आजोबा मात्र ताठ होते.म्हातारीला ते विश्रांती घ्यायला लावत.तिला बर नसलं तर् आपणच घरी चक्कर टाकुन तिला औषध देवुन येत.

यंदा पालखीचे दिवस जवळ येवु लागले.आजींची तब्येत नरमच होती.माझ्या हातुन यंदा वारकरी चहा पितील का?पालखीचे दर्शन घ्यायला मिळलं का ?असं त्या वारंवार म्हनू लागल्या. आजोबा म्हणत," काळजी कशापायी करतीस? काय बी न्हाई झाल तुला.तुकोबा आनी माऊली हायतं ना, सम्दं झाक हुईल. अन् न्हाई वाटलं तुला बरं तर कुनी तुला शिक्षा करनारे का? जमलं तेव्हढं मी करीन. घरात बसुन नमस्कार केलास तर त्यो बी पोचल ना तुकोबांना.नको तरास करुन् घेऊ त्यानं दुखनं वाढलं "

पालखी आली, आजी विठ्ठ्लाचं नाव घेत, उठत बसत आल्याच.बसल्या बसल्या त्यांनी दोन पातेली चहा उकळला,शेजारच्या शांतीला हाताशी घेवुन वारकऱ्यांना चहा दिला. देवळात पालखीचा मुक्काम असतॊ तिथे पहाटे चारलाच अंघोळ करुन जाऊन दर्शनही घेतल त्यांनी. दोन तीन दिवस तयारीत आणि नंतर सगळं मनासारखं झाल्याच्या समाधानानं आनंदात गेले. आजोबा म्हणाले," बघ, झालं ना संम्द नीट, आता तू पण बरी होशील बघ.चार दिवस दुकानात नको येवू.घरी आराम कर लई धावपळ केलीस" आजी समाधानानं हसल्या."आपल्या मानसांसाठी आनी देवासाठी केलेल्या कामानं कुठं दमायला होतं व्हय.बर वाटतय मला, अन् मी घरी राहिले तर तुम्हाला एकट्याला दुकनात धावपळ किती करावी लागती, येत जाईन मी बसत उठत, घरी तरी काम काय असतय?"
आजींचा उत्साह चार दिवस राहिला.पुन्हा दुखण्यानं मान वर काढली. चालताना थकवा वाटे,थोडं चाललं कि धाप लागायची. डॉक्टरन भारी गोळ्या दिल्या आणि आजोबांना सांगितले आजींना मोठ्या दवाखान्यात घेवुन जा, त्यांच्या छातीचा फोटॊ काढायला हवा, हार्टचं दुखण आहे, खर्च बराच येईल. ससून हॉस्पीटल मधे गेलात तर तुम्हाला परवडेल, मी चिठ्ठी देतो, माझ्या ओळखीचे मोठे डॉक्टर आहेत.त्यांना भेटा.

आजोबांचा चेहरा उतरला इतके दिवस आजींना धीर देणाऱ्या आजोबांचा स्वतःचाच धीर खचला.
"हार्टचं दुखणं लई वंगाळ असतं न्हव? मानुस न्हाई उठतं त्यातुन, पर माझ्या पार्वतीला कशापाई झालं असं?"

"घाबरु नका आजोबा,आता खूप नवे नवे शोध लागलेत, औषधं पण भारी निघालीत आजी बऱ्या होतील, वयाप्रमाणे असे आजार व्हायचे, त्यांच्या घराण्यात असेल कुणाला हा आजार. पण तुम्ही आजिबात काळजी करु नका. पैशाची सोय मात्र करा,औषध-पाण्याला लागतील"
"पैशाची वेवस्था मी करेन ,पण ती बरी व्हाया हवी"

डॉक्टरांशी बोलून आजोबा निघाले.विठोबाच्या देवळाजवळ पोहोचले.रोजच्या लोकांचा घोळका बाहेरच्या पारावर होता, त्यांना हातानेच राम राम करुन ते आत गेले.कटीवर हात ठेवुन विठोबा शांतपणे उभा होता, त्याच्या पायावर आजोबांनी डोकं ठेवलं.
"इठ्ठ्ला,हे काय संकट आनलसं, आमच्या पोटी लेकरु न्हाई दिलस, त्याचं कायबी वाईट वाटून न्हाई घेतलं, भावाच्या लेकरांवर जीव लावला, त्यांना मदत केली. त्यांची काम झाल्यावर त्यांनी पाठी फिरवल्या त्ये बी न्हाई मनावर घेतलं या गावात कष्टाची भाजी भाकरी खाऊन राहतोयं तरं आता हिला हे कुठलं दुखनं लावलस? आता मला बळ दे यातुन तिला वाचवायचं, माज्या जवळचं सगळ घे, वेळ पडली तर् दुकान विकिन पर तिला बर करं"

देवळात बसल्यावर आजोबा थोडे शांत झाले, आजींना आपण आजार किती मोठा हाय ते सांगता उपेगी न्हाई काळजीनं अजुन खंगायची.

’इतका उशीर कशापाई झाला? काय म्हनाला डॉक्टर?’ आल्या आल्या आजींनी विचारल.
’काई इषेश न्हाई, पर ससून मधे जाऊन मोठ्य़ा डॉक्तराला दाखवा म्हनत होता, सारख सारखच व्हाया लागलय ना तुला काय ना काई?"
"मी न्हाई आता कुठे जायची, आता काय राह्यलय माजं, उगी मोठा डाक्तर नि महागडी औषध नका आनु"
" त्ये बघु उद्या आपुन आता जेवायाच बघुया का? मी पिठल भात करु ?"
"आत्ता गं बया, ऐकेल कुनी, तुम्ही अन् कधी पास्न कराया लागला? शेवंतान दिल्यात भाकऱ्या करुन, भाजी आमटी केली मी भात बी झालाय"
"मी केला नसला तरी शिकेन बघ,आता तू आराम कर अगदी, च्या तर करतोच् कि मी रोज, भात आमटी बी करत जाईन"
जेवण झाल्यावर आजोबांनी आजींना झोपायलाच लावले, मागचं सगळ आवरुन त्यांनी भांडीपण घासून टाकली.

पावसानी दोन चार दिवस इतका जोर धरला कि आजोबांना आजींना ससूनला घेवुन जाता येईना, डॉक्टरच्या गोळ्य़ांनी आणि आरामाने आजींची तब्येतही सुधारल्यासारखी झाली,शिवाय त्यांची ससुनला जायची तयारी नव्हतीच.पावसाचा जोर ओसरला. आजोबांनी नेहमी दुकानात येणाऱ्या येशा रिक्शावाल्याला ससूनला घेवुन जाशील का विचारले. येशा म्हणाला,"आजोबा, जाऊया की.परवा चालेल तुम्हाला, उद्या मला जरा उरळीकांचनला जायचय"

"चालल ना, उद्याच्याला मी डॉकटरकडून चिठ्ठी आणतो, पैशे बी काढायला हवेत."
"उद्या संध्याकाळी मी येतो इथे, मग सांगा मला परवा कधी निघायच ते"
आजोबा घरी आले. रात्रीची जेवणं झाली.आजींना ते म्हणाले,"उद्या आपल्या डॉकतरन बोलावलय, तो चिठ्ठी देणारे,आपण परवा ससुनला जाऊ, येशा रिक्षावाला घेवुन जाईल आपल्याला"
"आता कशापाय़ी जायचं? बर वाटेल मला या गोळ्य़ांनी,नका उगी त्रास करुन घेवु. मी न्हाई कुठे जायची"
"अगं , नुसतं जाउन येऊ.लवकर बरी होशील तू"
"पैसा बराच लागतो , माहित हाय मला. माझं ऐका, माजी आता कायबी इच्छा नाही राह्यली अहेवपणी मरण आल तर् बरच आहे"
"तू नको काळजी करु आनि वेड वाकड बोलू नको"
" बरं आता पडा , दमला असाल,सकाळी बघू"

रात्री विचार करता आजोबांचा डॊळा कधी तरी लागला. आजींना गोळ्यांमुळे झोप लागली. रात्रीत केंव्हातरी यमदूताने डाव साधला.झोपेतच त्यांचा जीव गेला. त्यांनी हु कि चू देखील केले नाही.पहाटे आजोबा जागे झाले, आजी शांत झोपल्या होत्या. पहाटेच्या काळोखात त्यांनी सावकाश अन्हिके आवरली.आजींची काहीच हलचाल नाही हे पाहून त्यांच्या मनात पाल चुकचुकली. जवळ जावुन त्यांनी हलकेच त्यांना हाका मरल्या , हलवले...अंग थंड पडलेलं,श्वास थांबला होता.आजोबांना सत्य पचवायला जड गेले.दहा मिनिटे ते त्यांच्या जवळ असहायपणे बसुन राहिले.वस्तुस्थितीची जाणीव त्यांना जशी होत गेली तसे त्यांचे मन एक निर्धार करु लागले, त्यांनी शांतपणे कपाटातुन आजींच जरीच लुगडं काढलं त्यांना नेसवल, कुंकवाचा मळवट भरला.तोंडात तुळशीचे पान ठेवले. स्वतः कपडे करुन घराला कुलूप लावुन बाहेर पडले.
दुकानात आले, नेहमीप्रमाणे चहा केला.लोकांना दिला.आठ वाजताच सगळं आवरुन दुकानाला कुलूप घातले, शेजारच्या सायकल वाल्याने विचारले,"आजोबा, आज लवकर चाललात, आजी बऱ्या आहेत ना?"

" तिच्यासाठीच चाललोय"
आजोबा घरी आले, दरवाजा लावुन घेतला. त्यांनी पुजा केली, आपणही नवे कपडे घातले आणि बायकोच्या शेजारी पंख्याला दोरी बांधुन फास लावुन घेतला.
दहा वाजून गेले, घराचा दरवाजा बंद कसा म्हणून शेजारी जमा झाले, हाका मारु लागले, दुकानाजवळचे लोकही आले, बराच वेळ हाका मारुन कुणी दार उघडत नाही हे पाहुन लोकांनी दार तोडले,आतले दृष्य बघून त्यांचे काय झाले असेल त्याची कल्पनाच केलेली बरी!

आजोबांनी असे का केले असेल यावर खूप विचार केला मी. आपला जीव अशा प्रकारे द्यायला हिम्मत तर हवीच.तिच्यासाठी आपण काही करु शकलो नाही हि अपराधी भावनाही त्यामागे असेल. कुणाचाच आधार नसल्याने आता कुणासाठी मागे रहायचे अशा टोकाच्या निराशेने त्यांना घेरले असेल. पण त्याहून् आजींशिवाय जगण्याची कल्पनाच त्यांना सहन झाली नसेल हि शक्यताच अधिक असावी.आपले प्रेम बोलून आणि चारचौघात त्याचे प्रदर्शन न करणाऱ्या पिढीतले होते आजोबा पण त्यांच्या प्रेमाची जात ज्योतीवर झडप घेऊन प्राण देणाऱ्या पतंगाच्या प्रेमाची होती!


©

Wednesday, August 25, 2010

गावाकडच्या गोष्टी...

परवा शेवटच्या मिटींगची फेरी झाली.मामलेदार कचेरीतून सह्या करुन मंडळी परतली.सगळ्यात तरूण मुलगा हातातल्या कॅमेऱ्याने घराच्या कान्या-कोपऱ्याचे फोटॊ काढीत होता.त्याचे सगळे बालपण इथे माझ्या अंगाखांद्यावर गेले.त्याचेच काय सह्या करुन आलेल्या सगळ्यांचेच. या दोघी बहीणी,त्या मुलाच्या आत्या,रडताहेत.खोल्यांमधून फिरुन आठवणींचे तुकडे गोळा करण चालू आहे.घरातली भांडी-कुंडी केंव्हाच गेली.आता राहिल्यात फक्त भिंती.

या बायकांचा मोठा चुलत भाऊ, त्याचीच ही कर्तबगारी, त्याच्या भावंडांपैकी आता तो एकटाच उरलाय, शेवटचा मालुसरा.वाडवडीलांनी मिळवलेल्या ,जतन केलेल्या वास्तु,शेती यांची देखभाल, वाढ करणं तर नाहीच जमलं त्याला पण आयुष्याच्या संध्याकाळी सगळ मोडून आपण फार मोठी लढाई जिंकल्याचा आविर्भावात गप्पा मारतोयं. त्याला एकट्याला तरी काय दोष द्यायचा म्हणा,या घरात त्याचे सख्खे,चुलत असे किती भाऊ होते.कुणी काय केलं घरासाठी,घरातल्या लोकांसाठी? बुध्दीमत्ता ही दैवजात असते,पण कष्ट, प्रयत्न तर माणसाच्या हातात असतात ना? झडझडून कष्ट करणारे फार थोडे निघाले, जे होते त्यांच्या अंगात हिम्मत नव्हती,काही करुन दाखवायची ईर्षा नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे घरावर माया नव्हती !. याचा परीणाम म्हणून आजचा हा दिवस !. करारपत्र झालेलचं आहे.पुढल्या आठवड्यात बिल्डरची माणसं येतील, ही जुनी पुराणी वास्तु जमीनदोस्त होईल.इथे, नव्या पध्द्तीची इमारत किंवा इमारती उभ्या राहतील.त्यात लोकांचे चिमुकले संसार फुलतील. कुणालाच या वास्तुच्या इतिहासाची माहिती नसेल.काय करायचीय ती असून? भूकंपात शहरेच्या शहरे नष्ट होतात, महापूरात मोठ्मोठे वाडे जमीनदोस्त होतात, वादळ,आग अशा आपत्तींमध्ये अनेकांचे संसार मातीमोल होतात, मग माझ्यासारख्या क्षुल्लक वाड्याने या गोष्टीचे एवढे भांडवल करायचे काय कारण?बदल हे होतच राहणार.बदल ही एकमेव गोष्ट्च शाश्वत आहे हे माहित असताना या शंभरी उलटून गेलेल्या जीर्ण,जुन्या देहाचा इतका लोभ कशासाठी? छे,छे! लोभ नाही या देहाचा पण अजून माया वाटते या मुलांबद्दल,अस्ं वाटतं यांच्या पुढच्या पिढ्यांना समजावं जुनी माणसं कशी रहायची, त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या कथा सांगाव्यात.त्यातुन चांगल्या गोष्टी त्यांनी शिकाव्या.परदेशातल्या सगळ्या गोष्टींच आपल्याला आकर्षण असतं ना! मग तिकडे जुन्या वास्तु,वस्तु कशा जतन करण्य़ाची पध्दत आहे, मग का बरं या मुलांना हि वास्तु सांभाळविशी नाही वाटली? आर्थिक अडचण असती तर इलाज नव्हता, पण किती हालाखी सोसून यांच्या आधीच्या पिढ्य़ांनी मला जपलं आणि या पैसेवाल्यांनी सहजपणे हा व्यवहार करुन टाकला याचं मनस्वी दुःख होतयं, वास्तविक यातला प्रत्येकजण एकेकटा मला सांभाळू शकत होता पण् इच्छा नव्हती हेच खरं. बरं मिळालेले पैसेही खूप आहेत असं नाही, वाटेकरी बरेच असल्याने प्रत्येकाला मिळालेली रक्कम त्यांच्या मिळकतीच्या मानाने नगण्य़च आहे, मात्र ती दान करायची सुध्दा त्यांची तयारी नाही. एवढी आत्मकेंद्री वृत्ती, इतकी स्वार्थबुध्दी ही आजच्या पिढीचेच लक्षण आहे की माझ्या वास्तुत झालेले संस्कार कमी पडले काही कळत नाही. हे सगळं पाहवत नाही म्हणून मग मन सारखं भूतकाळात रमतं या वाड्याची कथा एकदा सांगितली कि माझ्या आत्म्याला शांती लाभेल.देह जाणरच आहे आज ना उद्या त्याची आता फिकीर नाही. इथे घडलेल्या काही घटना गावाकडच्या गोष्टीमंधून समजल्याच आहेत, काही सांगण्याजोग्या गोष्टी ऎकवाव्याशा वाटत आहेत.एकदा मन मोकळं करुन टाकतो. वयाप्रमाणे आता स्मरणशक्ती क्षीण जालीय, एखादी गोष्ट पुन्हा,पुन्हा सांगितली जाईल नाहीतर सांगताना घटना पुढे मागे होतील,सांभाळून घ्या मला.

भोर संस्थानचे राजे पंतसचिव यांनी राज्यकारभार हाती घेतला त्यावेळी भोरमध्ये वस्ती अशी नव्हतीच.फडणीस यांच्याकडे भलीमोठी जागा होती.राजवाड्या पाठीमागे मोकळे माळरानच होते. फडणीसांचा एकमेव वाडा होता.रात्रीच्या किर्र अंधारात त्या वाड्यापर्यंत जायलाही भिती वाटे. फडणीस वाड्याच्या पाठीमागून निरामाई वहायची.एरवी प्रेमळ वाटणारी हि माय पावसाळ्यात रौद्र्रुप घ्यायची.पाण्याचा आवाजसुध्दा काळाजात धडकी भरवाय़चा. विजेचे नवे नसल्याने तिन्हीसंजा झाल्यावर घटकाभरात अंधाराचे साम्राज्य पसरायचे.भुतेखेते,सापकिरडू यांची भिती वाटायची.
फडणीसांनी त्यांच्या जवळच्या काही नातलग म्हणा,स्नेही म्हणा यांना बोलावले आपल्या मोठ्या जागेतला काही हिस्सा देवु केला आणि सांगितले तुम्ही इकडे रहायला या, घरे बांधा. इथल्या उजाड वास्तुवर वस्ती होवुदे, दिवे पेटुदे, आणि चार जणांचे संसार सुखाचे होवुदे. या मागे सोबत एवढा एकच हेतू होता.या जागेत गणेशपेठ वसली.आमराई आळी बनली.एका कपर्दिकेची अपेक्षा न ठेवता फडणीसांनी त्यांच्या जागेवर दहा बारा जणांना वस्तीला बोलावले.

आजवर सांगितलेल्या गावाकडच्या गोष्टींमध्ये असलेले मामलेदारसाहेबांचे घर हे या दहा-बरा घरांपैकीच.मामलेदारसाहेब त्यांच्या मावशीचे दत्तक पुत्र होते.त्यांनी स्वतःच्या हुशारी आणि कर्तबगारीवर शिक्षण मिळवले.तसेच लहानवयात मामलेदार पदाला गेले. फडणीसांकडून मिळालेल्या जागेवर वाडा बांधला त्यांनीच. वैभवशाली दिसेल असे त्याचे रुप होते. ऐसपैस ओसरी, तिच्यावर असणारा शिसवी झोपाळा, माजघर,स्वयपांकघर, सरपणाची खोली,कोठीची खोली,देवघर मागे मोठे परसु,त्यामध्ये गोठा, गोठ्यात गाई-वासरे. माडीवर खोल्या.शंभर माणसांसाठी लागणारे सामान म्हणजे पाट,ताटे,वाट्या,द्रोण,फुलपात्री तर होतीच पण मणभर म्हणजे चाळीसशेर दूध बसेल अशी पातेली, कढया सगळं होतं, उखळ मुसळापासून जात्यापर्यंत सार काही होतं.
परसात अबोली,शेवंती अशी फुलझाडे होती.केळीची कर्दळीची झाडं होती. भलीथोरली विहीर होती.तिच्या काठावर पपनसाचं झाड होतं, भरपूर हिरव्या पपनसांनी ते लगडून पार वाकून जायचं. आळूची खाचरं होती,तोडंलीचे,दुधीभोपळ्याचे वेल होते.धशीवर आंब्याची झाडे होती.बांबूचं बन होतं.पाडव्याला गुढीला तिथलाच कळक वापरीत.

मामलेदारसाहेबांचा दबदबा आणि दरारा होता.त्यांचं व्यक्तिमत्त्व होत तसं.सहाफूटाहून थोडी जास्तच ऊंची, गोरापान वर्ण,भेदक डोळे आणि धारदार नाक. लक्ष्मीकाकू त्यांच्यापुढे सावळ्याच.पण त्य़ाही उंच आणि शेलाट्या बांध्याच्या.जोडा शोभाय़चा सुरेख. काकू शिकल्या नसल्या तरी हुशार होत्या.पाच मुलगे चार मुली असा त्यांचा मोठा प्रपंच होता. पण घरात फक्त आपलीच मुले आणि नवरा-बायको अस कुठेच दिसायचं नाही, सख्खे-चुलत सगळे एकत्र् राहायचे, म्हातारी माणसं , मुलं, निराधार म्हातारी,शिकायला आलेली मुलं, वारावर जेवणारे विद्यार्थी असा मोठा कुटुंब कबीला असायचा.रोज पंक्तीला पन्नास माणूस असायचच. एवढा मोठा कारभार, म्हणजे भांड्याला भांड लागणारच, भांडण,रुसवेफुगवे,धुसफूस होणार,पण ते मर्यादेत रहाण्यासाठी मोठ्य़ा माणसाचा धाक असावा लागायचा.त्याच्या तंत्राने सगळ्य़ा गोष्टी झाल्या तर घरात शांती रहायची.म्हणूनच काकूंनी घराला आपल्या धाकात ठेवले होते, मामलेदार साहेबांच राज्य घराबाहेर पण घरात सत्ता काकुंचीच.पहिल्यापासून सुब्बत्तेत राहिल्याने त्यांना मोठेपणा घ्यायची सवय होती आणि पुढे त्या मोठेपणाचीही माणसाला झिंग येते.तसेच आपली सत्ता चालवायची सवय झाली कि आपण म्हणू ती पूर्व दिशा. यामुळे त्यांनी सुनांना फार धाकात ठेवले.

आबा हा त्यांचा मोठा मुलगा. त्याची बायको बाळंतपणाला माहेरी गेली तिला मुलगी झाली ती लगेचच वारली.मामलेदारंची पहिली वहिली नात तिच्या आजोळीच वाढली.इ्तक्या लहान लेकराला तिच्या मामीनेच सांभाळले पुढे तिला त्या घराचाच लळा लागला, ती भोरला आलीच नाही.आबांचे दुसरे लग्न झाले.दुसरेपणावर मिळालेली साळु दिसायला सुंदर होती, तिला भाऊ नव्हता वडील देखील नव्हते,त्यामुळेच तर तिला बिजवराला दिली. मुळच्या मऊ स्वभावाच्या साळूला,काकूंच्या धाकाने पारच गरीब करुन टाकले.माहेरचा फारसा आधार नव्हता, त्यामुळे निमुटपणे काम करण्यातच तिची सारी हयात गेली. त्यात तिच्या पोटी पुत्र संतान आले नाही, म्हणून तिला सतत बोलणी खावी लागली. तिच्या मोठ्या अनुचे लग्न झाले. नंतर दुसरी मुलगी सहा महिन्यांची झाली नाही तोच आबांचे दोन दिवसाच्या तापाचे निमित्त होऊन निधन झाले.इन्फ्लुएंझाची ती पहिली मोठी साथ.’इन्फंटाचा ताप’ असं त्याला खेडोपाडी म्हणत.मामलेदारसाहेब गेले आणि वर्षाच्या आत हे संकंट कोसळले.ऐन तरुण वयातला तो कर्ता पुरुष गेला.मोठी सून म्हणून साळूला बाई असे संबोधित. काकू सोवळ्या झाल्याच होत्या. त्यांनी तरूण साळूच्या मनाचा,वयाचा कश्शाचा विचार केला नाही.सोवळ्या-ओवळ्य़ाच्या नसत्या कल्पनांनी,त्यांनी साळूचे केशवपन करायलाच लावले, त्यांच्या उरलेल्या चारमुलांपैकी कुणाचीही आईला विरोध कराय़ची हिम्मत झाली नाही. तिशीच्या आत बाहेर असलेल्या त्या देखण्य़ा मुलीचा नरळाएवढा अंबाडा येईल असा केशसंभार नाभिकाने उतरवला तिला जावेने बोडक्या डोक्यावरुन पाणी घालून बाहेर आणली आणि लाल अलवण नेसता नेसताच ती उभी कोसळली.त्या दिवसापासून बाईंना फीट्स येवु लागल्या.तिच्या वेदनेने माझाही जीव पिळावटला.तिच्या धाकट्या जावाही खूप रडल्या. काकूंना मात्र आंबाबाई आता शांत झाली, म्हणून बरे वाट्ले. या घराने बायकांचे फार फार हाल केले.

जुन्या पध्द्तीनुसार सासुरवास सोसत इथल्या सुना नांदल्या.ज्या नाजूक होत्या, मनानं किंवा शरीरानं त्या तरुणवयात गेल्या, एकापरीनं सुटल्या.उरलेल्या सोसत राहिल्या.
त्या कुठल्याशा कवीश्रेष्ठानं म्हटल्याप्रमाणे या सुनांची गत होती

कर कर करा मरमर मरा
कर कर करा मरमर मरा
दळ दळ दळा, मळ मळ मळा
तळ तळ तळा , तळा आणि जळा
कुढ कुढ कुढा चिड चिड चिडा
झिज झिज झिजा, शिजवा आणि शिजा
कष्टाने काही माणूस झिजत नाही आणि स्वतःच्या प्रपंच्यासाठी केले तर ते काय कष्ट आहेत का? खर आहे, पण या सासुरवाशणींनी भोगला तो निव्वळ सासुरवास. त्या कामाचं चिज नाही झाल, त्याच कौतुक तर सोडाच पण वेळेवर पोटभर खायला देखील मिळले नाही त्यांना.

बघायला गेलं तर काय कमी होतं, माझं वैभवशाली रुप होतच, दुध-दुभतं होतचं, थोडी-थोडकी नाही चांगली शंभर एकर शेती होती.समृध्दीच्या त्या काळातल्या कल्पनांचा विचार केला तर ती होतीच की भरभरुन. पण माणसंही किती घरात, आला गेला,पै-पाहुणा.आणि घरकामाला बाई-गडी ठेवायची पध्द्त नव्हतीच, मग बायकांचा जन्म कष्टात न जाईल तर नवल.त्यातही मुलांचे लाड, मुलींना दुय्यम वागणूक.त्यांना शिकायला मिळायला सुध्दा किती त्रास आणि यातायात. फायनल पर्यंत शिकल्या कि चढायच्या बोहल्यावर.भाऊंच्या दोन,बापूच्या सगळ्या मुली मॅट्रिक पर्यंत शिकल्या.बाकीच्यांना नाहीच मिळालं शिकायला, मुले मात्र चारचारदा मॅट्रिक नापास झाली तरी परीक्षा देत राहिली.

घरात सण वार होत. गौरी-गणपती,देवीचं नवरात्र तर किती साक्षोपानं होई, नऊ दिवस नैवेद्य, सवाष्ण, ब्राह्मण.सप्तशतीचा पाठ. सख्खे-सावत्र,चुलत,आते-मामे अशी भावंडे एकत्र राहिल्याने त्यांच्यात माया होती.कुसुमताईचे पुण्य़ातले घर सगळ्य़ा भावंडाना आपले वाटे, तिनेसुध्दा स्वतःला सख्खे कोणी नसून या भावंडांवर अपार माया केली.तिची मुले सुट्टीत आजोळी येवुन राहात. कुसुमताईचे यजमान आण्णा, त्यांचा आम्हाला जावई म्हणून काय अभिमान. माणूस होताच तसा. पुण्य़ापासून भोरपर्यंत पळत यायचा, सायकलवरुन बंदुक खांद्याला लावून कोकणात जायचा.कुणाच्याही अडचणीला धावुन जायचा.,डॊक्याला लाल फेटा बांधून चांदीची पदक लावलेलं जाकीट आणि धोतर नेसून पोवाडे गायला अण्णा उभे राहिले कि काय त्यांचं रुप दिसायचं ,आवाज सुध्दा कसा पल्लेदार.पोवाड्याचा कार्यक्र्म झाला की रमाकाकी त्यांची मीठ-मोहऱ्यांनी दृष्ट काढीत असे.बांळतपणाला आलेल्या माहेरवाशणींच सगळ्याजणी कौतुक करीत.सुट्ट्या सुरु झाल्या कि घर माहेरवाशणींनी भरुन जाई. तळ्य़ाच्या आत्याबाई, मिरजेच्या आत्याबाई मुलाबाळांना घेवुन येत. पुढे त्यांच्य़ा मुलीही येत, घरातल्या सासरी गेलेल्या मुली येत माहेरपणाला, बाळंतपणाला. दर उन्हाळ्यात कुणाची तरी मुंज, एखादे लग्न व्हायचेच. मागच्या आंगणात मांडव घालायचा. लग्न-कार्य घरातच व्हायची.एवढ्या मुलींची लग्नं झाली.दरवेळी कर्ज काढून लग्न करावी लागत पुढे पुढे. कमावणारे थोडे,खाणारे फार, मग काय होणार? शेती होती , पण ती जिरायत.तिच्यात कष्ट करणार कोण? बर पाऊस आला तर ठिक नाहीतर हालच. नंतरच्या पिढीतल्या मुलांनी मॅट्रीक व्हायचा अवकाश, पुणे नाहीतर मुंबई गाठली.मिळेल ती नोकरी करुन पैसे मिळवायला लागली. त्याकाळात सुध्दा नुसत्या मॅट्रीकला तशी फारशी किंमत नव्हती, त्यामुळे मिळणाऱ्या पगारात जेमतेम त्यांचेच भागे.इकडे शेती बघायला कोणीच तयार होइना.

भाऊंच्या दुसऱ्या पत्नी मनोरुग्ण होत्या. त्याकाळी हा शब्दसुध्दा माहित नसेल."उन्मत्त वात" किंवा "वेड" या नावानेच त्याची संभावना होई.आजारावर उपाय करणे माहितच नव्हते,काळानुरुप त्यांचा आजार बळावत गेला आणि त्याचा त्रास सगळ्य़ांना व्हायला लागला.भाऊंनी नोकरी सोडली, ते भोरला येवुन राहिले. मुले लहान धाकटी, मुली बिचाऱ्या घरकाम करुन शिकत होत्या, मुलाला नोकरी लागली होती, घरातल्या वातावरणाने तो सतत बाहेर राही.त्यातूनच तो वाईट मुलांच्या संगतीला लागला, नाना व्यसनांच्या आहारी गेला आणि शेवटी कचेरीतल्या पैशाचा अपहार करण्यापर्यंत त्याची मजल गेली.

आजवर घरावर अशी वेळ कधी आली नव्हती, मामलेदारसाहेबांची सगळी मुले हुशार,कर्तबगार नव्हती.पण चारित्र्य आणि प्रामाणिकपणा याबद्दल त्यांच्याबद्द्ल कोणी अगदी शत्रूदेखील वावगे बोलू शकला नसता.भाऊंना या गोष्टीचा अतोनात मनःस्ताप झाला.त्याने अपहार केलेली रक्कम भरायला त्यांच्याजवळ पैसा नव्हता.घरात कोणाजवळच इतकी रोख रक्कम नव्हती.अखेरशेवटी शेतीच्या,घराच्या वाटण्या केल्या.भाऊंनी त्यांच्या वाटणीची शेती-घर विकून रक्कम भरुन टाकली.मुलगा परागंदा झाला होता, पण बेअब्रुचा डाग पुसण्य़ासाठी त्यांना हि किंमत मोजावी लागली. भाऊंनी जवळच भिड्यांच्या वाड्य़त बिऱ्हाड केले. घरातल्या सगळ्य़ांनाच या गोष्टीचे फार वाईट वाटाले, पण कुणाचाच इलाज नव्हता. आता घराला उतरती कळाच लागली होती.स्वातंत्र्य मिळाले भारताला, मात्र भोर संस्थान विलीन झाले, संस्थानात नोकरी आसणाऱ्या सगळ्य़ा लोकांना सरकारी नोकरीत समाविष्ट केले नाही, त्यामुळॆ अण्णा, बापू यांना निवृत्त व्हावे लागले. अण्णांची मुले नोकरीला लागली होती, बापूंची मात्र सगळीच शिकत होती.शेताचेही तुकडे झालेले.त्यात घालायला पैसा नव्हता, राबायला बळ नव्हते. बायका कोंड्याचा मांडा करुन दिवस साजरे करत होत्या. एकूण वैभवाला पार उतरती कळा लागली.

एक-एक करत जुनी मंडळी इहलोक सोडून गेली.समृध्दीत बालपण-तारुण्य घालवलेल्यांना म्हातारपणी दारिद्र्य बघावे लागले. पैशाच्या अभावाने भांडणे, कडकडी- वादविवाद याने घराची शांती भंगली. या वातावरणाला कंटाळून बाई , घरातली मोठी सून त्यांच्या लेकीकडे कुसुमताईकडे गेली, तिथून त्यांना परत आपल्या वास्तूत यायचे होते, पण कुणीच त्यांना घरी आणले नाही, आयुष्यभर या घरात केवळ कष्ट करुन त्या माऊलीने जावयाच्या दारात प्राण सोडला. अण्णा, भाऊ,बाबा त्यांच्या बायका सगळे गेले.

बापुरावांची मुले हुशार होती पण ’दात आहेत तर चणे नाहित, चणे आहेत तर दात नाही’ अशी आता गत झालेली होती, मुलांना शिकवायला जवळ पैसा नव्हता.मुलींची लग्ने करुन दिली, त्या परिस्थितीत मिळालेल्या घरात त्या संसार करु लागल्या. बापुरावांच्या दुसऱ्या मुलाला भाट्घरच्या रंगाच्या कारखान्यात नोकरी मिळाली.नोकरी सांभाळून तो शेती बघू लागला.आता पुन्हा घराला जरा बरे दिवस येवू लागले.सुट्टीत माहेरवाशणी येवू लागल्या.आंब्याच्या आढ्या पडू लागल्या. गोठ्यातल्या गाई-म्हशींमुळे दुध-दुभते पुरेसे होते.शेतातले धान्य घराला पुरत होते. त्याची मुलेही शाळॆत पहिले नंबर मिळावत होती.पण तेथेही दैवाने घात केला, या मुलाला ऐन चाळीशीत ब्लडकॅन्सर सारख्या आजाराने गाठले.मुंबईत जावुन तो टाटा हॉस्पिटल मध्ये इलाज करुन घेवू लागला, मुंबई-पुणे दोन्ही ठिकाणी त्याच्या बहिणी होत्या, त्याच्या सगळ्य़ाच बहिणांनी मदत केली पण आजारच असा गंभीर होता की,पाच वर्षे त्याच्याशी झुंजून अखेर त्याला हार मानावी लागली. म्हातारपणात बापुराव आणि काकींना पुत्रशोक सहन करावा लागला. त्याची मुले अजून फारच लहान होती, सुदैवाने ती फारच हुशार होती, पुण्यात आत्याकडे राहून दोघेही उच्च शिक्षण घेवु शकली.मोठा परदेशी गेला, धाकटाही चांगल्या पदावर गेला. मुलांचे नीट होईपर्यंत आजी -आजोबांनी जीव धरुन ठेवले, थोरल्याचे लग्न ठरलेले बघून ते दोन्ही म्हातारे जीव महिन्याच्या आत पाठोपाठ देवाघरी गेले.

घरात आता कोणीच राहिले नाही.बापूरावांची विधवा सून आणि घराच्या दुसऱ्या भागात अण्णांचा धकटा मुलगा व सून ! घराचे वैभव म्हणजे त्यात राह्णारी माणसे, एवढ्या मोठ्या घरात आता कोणी नाही.बापुंची सून मुलांकडे , मग घराला सतत कुलूप.ज्या वास्तुने कुलूप कधी बघितले नाही तिला आता सतत त्याचेच दर्शन. घराची डागडुजी,मरम्म्त करायला आता पैसा आहे पण वेळ कुणालाच नाही.जो-तो आपल्या व्यापात. आता सुट्टी लागली कि मुले बायकांना घेवुन हिलस्टेशनला जातात, जुन्या घराकडे यावे असे त्यांना चुकूनही वाट्त नाही.त्यांच्या मुलांनी मला बघितलेच नाही तर माझा लळा कुठून लागणार?

इथे एकेकाळी पन्नास-पन्नास माणसे एकत्र राहिली.वामन सारख्या अनाथाला आश्रय मिळाला.वाईहून रामनवमीसाठी येणाऱ्या भिक्षुकांना इथे नऊ दिवस रात्रीचा आसरा मिळे. गोरगरीबांना ताक मिळे,वारावर विद्यार्थी जेवत. लग्नानंतर वर्षाच्या आत शामदादा वारला तर तेंव्हा त्याच्या बायकोला सालंकृत माहेरी पाठवताना तिचे दुसरे लग्न लावून देत असाल तरच पाठवतो असं म्हणणारे अण्णा इथलेच. गंगू् मरताना तुझ्या मुलाला आइची माया देईन असा शब्द दिल्याने आपले पुत्रवियोगाचे दुःख गिळून गंगूच्या मुलाच्या लग्नापर्यंत उमेद धरुन , त्याच्या लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसात प्राण सोडणारी रमाकाकी इथलीच.आपला मुलगा मॅट्रीकला नापास झाला तरी त्यांच्या बरोबर मॅट्रीक पास आपल्या चुलत-भावंडांचे मनापासून कौतुक करणारी माहेरवाशीण माई या घरातलीच. मॅट्रीक पास झालेल्या मुलीला घरातली पहिली मॅट्रीक पास म्ह्णून तिचे कौतुक करायला भाटघरहून चालत येवून तिचे अभिनंदन आणि आशीर्वाद देणारी तिची चुलती या घरातलीच. आपला-परका असा भेद न करता सगळ्य़ांवर माया करणारी माणसं होती. दुसऱ्याला सहज मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. दुसऱ्याची मुलगी इथे सून म्हणून आणताना किंवा आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात देताना रुप-पैसा यापेक्षा माणसं , त्यांचे माणूसपण बघण्याकडे कल असायचा. घरासाठी आपल्या माणसांसाठी झिजायची सहज प्रवृत्ती होती.म्हणूनच या घरातल्या सगळ्या माहेरवाशणींनी माहेरच्या अडी-अडचणींना नेहमीच मदत केली. इथले भाऊ सुध्दा बहिणींच्या पाठीशी वेळेला उभे राहिले.

आता सगळेच संपले आहे. उद्या या गावात या घरातील कोणी फिरकणारही नाहीत कदाचित, पुढच्या पिढ्यांना हे गाव, हा वाडा काहीच माहित असणार नाही. देशाचे इतिहास वाचायचे कष्ट कोणी घेत नाहीत, तर आमच्या सारख्या क्षुल्लक वाड्याची काय कथा! काळाच्या ओघात सगळे पुसलेच जाणार,पण कुणाला तरी इच्छा झाली तर माहिती असावी म्हणून सांगण्याचा हा अट्टहास. यातून घेता आले आले तर लोकांचे मोठे मन नव्या मुलांनी घ्यावे, त्यांच्या हातून झालेल्या चुका टाळाव्या आणि आपल्या घरातील लोकांना धरुन राहावे एवढीच माझी म्हाताऱ्याची इच्छा ! माझं थेरडं तोंड आता यापुढे दिसणारच नाहीय कुणाला, त्याच्यात नांदलेल्या लोकांची थोडकी ओळख ऐकल्याबद्दल आभारी आहे तुमचा ......


©

Friday, July 23, 2010

गावाकडच्या गोष्टी..

(माझ्या आईचे माहेरचे कुटुंब मोठे , तशी जुन्या काळातील सगळीच कुटुंबे मोठीच असत, एकत्र राहत असल्याने त्यांच्यात संबंध असत, भांडणे, भाऊबंधक्याही असत.तसेच माया, प्रेमही असे. माझ्या आईकडून तिच्या घराण्यातील सगळ्या काका-आत्यांच्या, मामा मावशांच्या कथा मी वारंवार ऎकलेल्या आहेत.
सध्या आई आजारी असते, कंपवाताने ती घराबाहेरही पडू शकत नाही.रेडीओखेरीज दुसरी करमणुक तिला नसते, तिच्याशी बोलताना आजार सोडून बोलणे कठीण असते, मग परवा मी पुन्हा तिला तिच्या बालपणात नेऊन त्या आठवणींमध्ये तिला रमवण्याचा प्रयत्न केला त्यातुन तिचा वेळ चांगला गेलाच पण मला देखील काही गोष्टी नव्यानेच समजल्या.तिने सांगितलेल्या काही घटना या तिलाही केवळ ऎकुनच माहित आहेत, आता तिच्या घराण्यातली सगळ्यात मोठी अशी तिच शिल्लक आहे, बाकिची मंडळी तिच्याहून लहानच असल्याने या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहतील. गोदुची कथा त्या पैकीच एक. या गोष्टी ऎकताना मला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे तिला तर नाहीच माहित पण ती कुणालाच माहित असणार नाहीत. तिने सांगितलेल्या गोष्टीमंधले कच्चे दुवे कल्पनेने जोडण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा कथानकांवर खर तर चांगल्या मालिकाही बनू शकतील, पण सध्या तरी त्या ब्लॉगवाचकांपर्यंत पोचाव्यात या साठी हा लेखन प्रपंच.....)




पुरोहितींकडच्या लग्नाला माई गेल्या होत्या. थोरामोठ्यांच्या तोलाचे कार्य होते. त्यामध्ये एक त्यामानाने साध्या पातळात लगबगीने वावरणारी मुलगी माईंच्या तीक्ष्ण नजरेने हेरली. मुलगी खरोखरीच नक्षत्रासारखी होती. माईंचा काशीनाथ नुकताच एम.एस्सी. परीक्षा पहिल्या वर्गात पास झाला होता. त्याच्यासाठी मुली सांगून येत होत्या.कुणाची पत्रिका जुळायची नाही, तर कुठे मुलगी पसंत पडायची नाही. पहिली सून घराला योग्य मिळाली कि पुढचे सारे सुरळित होईल अशी माईंची धारणा होती.

माईंजवळ येवून दोघी-तिघींनी आपल्या मुली, नाहीतर भाच्या,पुतण्य़ांची गुणवर्णने ऐकवली. एक दोघींनी पत्रिकाही दिल्या. पण मघाची मुलगी माईंनी मनातल्या मनात काशीनाथ साठी पसंतच केली होती जणू, इतरांच्या बोलण्याकडे त्यांचे फारसे लक्षच नव्हते. पुरोहितांच्या मालू बरोबर ती हळदी-कुंकू देत होती.मालूला त्या म्हणाल्या ,’अगं हळद-कुंकू लावून झाल्यावर ये गं, तुझ्याशी बोलायचयं’.मालू अर्ध्या तासात माईंजवळ आली.
’काय माई, काय काम काढलसं?’
’तुझ्या बरोबर अत्तर लावणारी मुलगी कोण गं?’
’ती वसुधा, आमच्या भालूमामाची धाकटी मुलगी.’
’काय करते? कुठे असते?’
’ती मधू मामांकडे असते मुंबईला, मामा वारले ना तेंव्हापासून. कॉलेजला जाते, इंटरला आहे शिवाय नोकरी पण करते’
माईंनी पुरोहित वहिनींकडून वसुधाची पत्रिका मागवली, पत्रिका नव्हतीच त्यांच्याकडे, वसुधा दोन वर्षाची असताना तिची आई गेली होती.भालूमामांनी दुसरे लग्न केले नव्हते. वसुधाची मॅट्रीकची परीक्षा झाली आणि भालूमामा अचानक वारले.हृदय-विकाराचा झटका असणार, त्या वेळी रोगाचे नाव माहित नव्हते. वसुधाला तिच्या काकांनी मुंबईला नेले. मुलगी हुशार होती,गुणी होती.मात्र तिला आई-वडील नव्हते. पहिल्या लेकाच्या लग्नात हौसमौज करुन देणारे व्याही नसणार एवढी एक गोष्ट सोडली तर मुलीत नावं ठेवायला जागा नव्हती. माईंनी पुरोहितींकडे निरोप पाठवून वसुधाला घरी बोलावून घेतले. त्या आपल्या यजमानांजवळ आणि काशीनाथजवळ मुलीबद्दल बोलल्या होत्या. त्यांच्या यजमानांचा काचकामाचा व्यवसाय होता, व्यवसायाचा व्याप ते एकटेच बघत असल्याने प्रपंचाची सगळी जबाबदारी माईंवर होती आणि माईंच्या कर्तबगारीवर त्यांचा पूर्ण विश्र्वास होता.घरातले लहानमोठे निर्णय माई घेत त्यात ते ढवळाढवळ करीत नसत.

वसुधाला घेवून पुरोहित वहिनी आल्या.दाखविण्य़ाचा कार्यक्रम झाला. पाहुण्यांशी चार शब्द बोलून माईंचे यजमान नाना, कामासाठी बाहेर पडले. काशीनाथने तिला चार प्रश्ण विचारले. काशीनाथला मुलगी पसंत असावी असे माईंना वाटले.एक-दोन दिवसांनी त्याला त्यांनी विचारले.
"आई, मला अजून पुढे शिकायचे आहे, इतक्यात लग्नाचं तू काय डोक्यात घेतलसं?"
"तू आता नोकरीला लागलास.वडीलांच्या धंद्यात लक्ष घालायच नाही म्हणालास, कशाला आम्ही अडकाठी केली नाही, एवढा एम.एस्सी.झालास, अजून किती शिकायच? आणि संसार कधी करायचा?,तुझ्याबरोबरची मुले लग्न करुन संसाराला लगली, अरे इतकी चांगली,शिकलेली मुलगी आहे. नको जास्त विचार करुस.आणि शिकायच तर नंतरही येईल शिकता. तुझ्या मनातलं मी ओळखलय, आवडलीय ना तुलाही वसुधा ! कळवून टाकते तिकडे मी. लवकारात लवकरचा मुहूर्त बघुया"
माईंनी काशीनाथचा होकार गृहित धरुन पुढल्या तयारीला सुरुवात केली.नानांनाही मुलगी पसंत होती.बाकी देण्याघेण्य़ाला त्य़ांचा पहिल्यापासून विरोध होता. माईंना वसुधा विषयी आपुलकी वाटायच एक कारण म्हणजे त्यांची गोष्ट तिच्यासारखीच होती. त्यांच्यातर जन्मानंतर का्ही तासात त्यांची आई गेली. मामीनेच त्यांना वाढविले. त्यांचे वडील त्यांना आजोळी भेटायला येत, पण त्या लहानपणी वडीलांबरोबर न गेल्या्ने त्यांना ते घर परकेच राहीले,आजॊळीच त्या वाढल्या, पुढे त्यांच्या वडीलांचे दुसरे लग्न झाले,मग त्यांचे येणे कमी झाले. माईंच्या लग्नाच्या आधी दोन वर्षे त्यांचे वडीलही गेले. त्यांच्या मामानेच त्यांचे कन्यादान केले.नाना लग्नाच्या वेळी नोकरी करीत होते, पण त्यांचा स्वभाव धडपडा होता, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर काचेचा कारखाना काढला व अतिशय मेहनतीने तो नावारुपाला आणला.अर्थात माईंच्या समर्थ साथीशिवाय हे शक्य झाले नसते.माईंनी घरातल्या सगळ्या गोष्टींची सर्व जबा्बदारी घेतलीच, शिवाय धंद्यातल्या चढ उतारांशी सामना करताना नानांना संपूर्ण साथ दिली. सुरुवातीच्या अडचणीच्या काळात त्या काटकसरीने रहात होत्या, धंद्यात बरकत आल्यावरही त्या मातल्या नाहीत, घरातली सर्व कामे त्या स्वतः करत. एकवर्षी दिवाळीत कुठलीशी मोठी ऑर्डर रद्द झाल्याने कारखान्याचे बरेच नुकसान झाले होते. दिवाळीत बोनस मिळणार नाही अशी बातमी पसरल्याने कारखान्यात वातावरण तापले होते.नानांची अस्वस्थता माईंना जाणवली,आपले दागिने त्यांनी नानांपुढे आणून दिले. आणि म्हणाल्या
’ हे माझे दागिने घ्या आणि लोकांच्या बोनसची व्यवस्था करा’ त्यांच्या माहेरहून आलेले आणि नानांनी हौशीने केलेले सगळे दागिने त्यात होते
’अगं , नको, तुझं स्त्री-धन आहे ते, मला ते घ्यायचा आधिकार नाही’
’वेळेला उपयोगी यावेत म्हणून तर असतं ना ते ! दागिने काय परत करता येतील. आज कामगारांना बोनस मिळाला कि ते जोमाने कामाला लागतील, नुकसान भरपाई झाली की त्यांचे संसारही मार्गी लागतील आज तुमच्या कारखान्यावर कित्येकांचे संसार चाललेत , त्यांचे शाप घेवून मला हे दागिने काय सुखं देणार?’
पत्नीच्या मनाच्या मोठेपणानं नाना भारावून गेले.त्यामुळेच तिच्यावरचा त्यांचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला.

काशीनाथचे लग्न थाटात झाले. वसुधाला माईंनी घरच्या रितभाती शिकवायला सुरुवात केली.त्यांचे कुटुंब मोठे होते.आला गेला सतत असे.त्या काळी सधन लोकांकडे शिक्षणासाठी मुले असत, वारावर जेवणारे विद्यार्थी असत.कुणी गावाकड्ची निराधार म्हातारी,एखादा लांबचा अपंग नातलग यांना ठेवून घ्यायची पध्दत होती. ’सामाजिक बांधिलकी’ हा शब्द न वापरता लोक ती मानित. पैसा जास्त असला तरी त्यांचे रहाणीमान सर्वसामान्यांप्रमाणेच असे.फक्त शिक्षणासाठी त्यांच्या मुलांना त्रास पडत नसे, आणि त्यांच्या बायकांच्या अंगावर जरा जास्त दागिने असत.वसुधा सासरी चांगलीच रुळली.काशीनाथसारखा हुशार,देखणा नवरा आणि माई-नानांसारखे प्रेमळ सासुसासरे.गोकुळासारख नांदत घर, सुख -सुख म्हणजे अजून दुसरं काय असत? तिच्या मुळच्या सुंदर रुपाला आणखीच झळाळी आली.

वसुधाचे बाळंतपण माईंनी सासरीच करायचे ठरविले.तिचे डॊहाळजेवण थाटात केले.वसुधाला मुलगा झाला.मुलगा तीन महिन्यांचा झाला.शंतनू असे त्याचे नाव ठेवले. काशीनाथने अचानक अमेरीकेला उच्च शिक्षणाला जाण्याचा निर्णय जाहीर केला.त्या दृष्टीने गेले काही महिने त्याचे प्रयत्न चालू होतेच.मात्र घरात त्याने कुणालाच काही सांगितले नव्हते, अगदी वसुधालादेखील.ऐकल्यावर वसुधा जरा खट्टू झाली, नाही म्हटले तरी तिला न सांगता हा निर्णय त्याने घेतला याचे तिला दुःख झाले.आपण काही इतक्या अडाणी नाही, शिवाय त्यांच्या प्रगतीच्या आड येण्य़ाचा कोतेपणाही आपण केला नसता, मग आपल्याला एका शब्दाने सांगावेसे का नाही वाटले यांना? माईंना सांगितल्याशिवाय नाना कुठलीच गोष्ट करीत नाहित.
रात्री काशीनाथ बाळंतीणीच्या खोलीत आला. पाळ्ण्यात पहुडलेल्या शंतनुला खेळवताना त्याचे लक्ष वसुकडे होते.ती मुद्दाम पाठ करुन झोपली होती.
बाजेच्या कडेशी बसत तो हलक्या आवाजात म्ह्णाला ," आमच्याशी बोलायचं देखील नाही का?"
"बोलण्यासारखं काही आहे का?" वळत वसुधा म्हणाली
रडून रडून तिच्या नाकाचा शेंडा लालबुंद झाला होता.
"अगं मी कुठे रणांगणावर चाललो नाही, शिकायला जातोय अमेरीकेला, इतकं रडायला काय झालं? "
"त्यासाठी नाही मी रडत, एवढी मोठी बाब, तुम्ही मला एका शब्दानं सांगितली नाही त्याच वाईट वाटतयं,"
"एवढचं ना, अगं लग्नाच्या आधीपासून मला तिकडे शिकायला जायचे मनात होते, सहा महिन्यांपूर्वी माझा मित्र तिकडे गेला त्याच्याशी पत्रव्यवहार करुन तिकडच्या विद्यापिठांशी संपर्क साधला,शिष्यवृत्ती मिळाली तरच जायचे असे ठरवले होते.तिकडून उत्तर यायला दोन तीन महिने गेले, तेंव्हा तू नुकतीच बाळंतीण झाली होतीस त्या आधी तुझी प्रकृती नाजूक होती म्हणून मुद्दाम नाही सांगितलं. हे पत्र आल्याबरोबर लगेच सांगितलच ना. समजल आता का नाही सांगितलं की अजून आहेच राग? तुम्हा दोघांना सोडून जायचं जिवावरही आलयं काय करू, एवढी चांगली संधी परत मिळेलच असं नाही"
"आम्हालाही न्या मग तुमच्या बरोबर" राग विसरुन वसुधा निरागसतेने म्हणाली
"नेल असतच गं, पण सध्या मला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिघांच कसं भागणार? आता आपल्या खर्चासाठी नानांजवळ पैसे मागण.."
" नको, नको, अहो मी गमतीने म्हणाले,तुम्ही अगदी निर्धास्त पणे जा, आणि लवकर शिकून परत या, आम्ही तुमची वाट बघू, , आपल्या शंतनुचा पायगुण बर हा "

पन्नास-साठ वर्षांपूर्वी अमेरिकेत शिकायला जाणं आजच्या इतक सहज नव्हतं, फार थोड्य़ा संधी होत्या आणि फार कमी लोक जात.संपर्क माध्यमं कमी असल्याने इतक्या दूर जाणे त्रासदायक वाटे. काशीनाथच्या जाण्याची तयारी झाली.त्याला निरोप द्यायला मुंबईला घरचे सगळे गेले.
काशीनाथचे पहिले पत्र आले.तिकडचे वर्णन वाचून सगळे अचंबित झाले.आल्यागेल्याला माई कौतुकाने काशीनाथच्या पत्राबद्दल सांगत.वसुधाही त्याला पत्रे लिहू लागली.पत्र मिळायला महिना -पंधरा दिवस लागत.काशीनाथचे पत्र आले कि त्याच्या पत्राची पारायणे करताना रात्री निघून जात. एरवी सगळा वेळ शंतनुच्या संगोपनात आणि घरकामात पटकन जाई.म्हणता -म्हणता दोन वर्षे जातील वसुधा रोज मनाला सांगे.

सुरुवातीला नियमित पणे येणारी काशीनाथची पत्रे उशीरा येवू लागली.वसुधाच्या दोन-तीन पत्रांनंतर त्याचे एखादे पत्र.ते ही त्रोटक. आता परीक्षा जवळ आली असेल, अभ्यासाचा ताण असेल, नसेल होत वेळ लिहायला. वसु मनाशी म्हणे.शंतनू चालायला लागला.त्याचा वर्षाचा वाढदिवस झाला.त्याचा स्टुडीयोत फोटो काढून त्याच्या बाबांना वसूने पाठविला. आता तो बोलू लागला, त्याच्या बोबड्या बोलांने घरादाराला बोबडे केले.दिवसा मागून दिवस, महिने जात होते. दोन वर्षे उलटून गेली.काशीनाथची पत्रे अगदी क्वचित येत, त्यात परत येण्याची भाषा नसे.पत्रातला सूरही किंचित परका,दूरचा वाटे. वाट बघण्य़ाशिवाय कुणाच्याच हातात काही नव्हते.

माईंच्या घरात बाकीची मुलेही मोठी होत होती, त्यांची शिक्षणे चालू होती.आता दुसऱ्या रघुनथचे लग्न ठरले. वसू लग्नाच्या तयारीत बुडली.शंतनू तीन वर्षाचा झाला.कशीनाथच्या येण्य़ाचे चिन्ह नव्हते.त्याच्या काळजीने,विरहाने वसू खंगत होती.तिचे दुःख माईंना जाणवत होते. त्या काही करु शकत नव्हत्या. उपास-तापास,नवस सगळं चालल होतं, बाहेरुन आनंदी चेहऱ्याच्या माई वसूला धीर द्यायच्या पण मनातून त्याही नाराज असत. दुसरी सून आली. माईच्या लेकीचेही लग्न झाले.नानांचे वय होत चालले. तरुण वयात अपार कष्ट केल्याने आता थकल्यासारखे होई, नाही म्हटले तरी त्यांनाही काशीनाथच्या न येण्य़ाची काळजी होतीच.

वसूने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईला नानांच्या भाड्याची जागा होती.तिथे त्यांची विधवा बहीण तिच्या मुलीबरोबर रहात असे.मुलगी सासरी गेली होती आणि ती बहीण म्हातारपणामुळे माईंकडे येवुन राहिल्याने ती जागा कुलूप लावून ठेवली होती.वसूने तिकडे जायचे ठरविले. तिला सुदैवाने शाळॆत नोकरी मिळाली. शंतनुला शाळेत घातले.माई नाहीतर तिची नणंद अधूनमधून जात. तिला मुंबईला पाठविणे माईंच्या अगदी जिवावर आले होते. पण तिचे म्हणणेही त्यांना पटले, "दीरांच्या वाढत्या संसारात पुढे मागे वाद होण्यापूर्वीच मार्ग काढलेला बरा. आपले हातपाय धड आस्ताना, आपल्या जवळ शिक्षण असताना दुसऱ्याच्या आभार-उपकारावर किती दिवस जगायचे? वेळेला मदत मागणे वेगळे आणि सतत अवलंबून राहणे वेगळॆ! शंतनुला समजायच्या आत मी पायावर उभी राहते, तुमच्या आधारची गरज आहेच, पण उद्या तुमच्या म्हातारपणाला मला तुम्हाला आधार देण्यासाठी मला बळकट व्हायला हवे" असे वसू त्यांना म्हणाली होती.काशीनाथचे न येणे तिने आता मनाने स्विकारले होते.

मधल्या काळात माईंचा दूरचा पुतण्य़ा अमेरिकेला कामासाठी जाणार असल्याचे नानांना समजले, त्यांनी त्याला काशीनाथची चौकशी करण्य़ाची विनंती केली.त्याने काशीनाथचा पत्ता शोधून काढला.त्याला भेटला. काशीनाथने तिकडच्याच मुलीशी लग्न केले होते, राजवाड्यासारख्या घरात तो रहात होता.विद्यापिठात तो प्रोफेसर होता. बंगला, गाडी असे वैभव होते. त्याच्या बायकोसमोर काशीनाथला तो काही विचारु शकला नव्हता.

ही सगळी बातमी समजल्यावर माईंच्या घरावर दुखाःचे सावट आले.वसूलाही हि बातमी कुणाकडून तरी समजली.दुःख करण्याच्या पलीकडे तिची अवस्था झाली.आता शंतनूकडे बघून सगळा राग,दुःख गिळायला हवे होते.शंतनू मोठा होत होता. वसूने नोकरी सांभाळून बी.ए, एम.ए. च्या परीक्षा दिल्या. माईंनी शंतनूची मूंज करायचे ठरविले, त्यांनी वसूला पुण्याला बोलावून घेतले. मुंजीची सगळी तयारी केली होती. मातृभोजनाची वेळ झाली. वसूला सुंदर साडी आणि साखळी देत माई म्हणाल्या,"वसू ही साडी नेसून मातृभोजनाला बैस"
वसूला हुंदकाच आला.
"डॊळे पूस वसू, माझा मुलगा करंटा, एवढी गुणी,सुंदर बायकॊ , मुलगा सोडून गेला, तुझी त्यात काय चूक? आजचा मान तुझाच आहे.मी तुझ्या सदैव पाठीशी आहे, मुलगा शिकून मोठा होईल, तुझे पांग फेडेल माझा तुला कायम आशीर्वाद आहे"

काळ कुणासाठी थांबत नसतो, नाना गेले.कारखाना आता रघुनाथ बघत होता. माई बहुतेकवेळा वसू कडेच असत. त्याही थकल्या होत्या.आजारी पड्ल्या. शेवटच्या आजारात त्या वसूजवळाच होत्या, तिने त्यांची सेवा केली.
"मी गेल्याचे काशिनाथला कळवू नका,त्याने मला तिलांजली देखील द्यायला नको. मी त्याला कधीही माफ करणार नाही" माईंचे हे अखेरचे शब्द होते.


वसूताई आता शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या. शंतनू अतिशय बुध्दिमान होता. एस.एस.सी परीक्षेत तो बोर्डात आठवा आला. त्याला मेडीकलला प्रवेश मिळाला.आता तो एम.बी.बी.एस.ची परीक्षा होवुन एम.एस. ही उत्तम रित्या उत्तीर्ण झाला होता.घरात नुकताच टेलीफोन घेतला होता.शंतनुला वेळी-अवेळी कॉल आला कि जावे लागे, त्याला उशीर झाला कि वसूताई काळाजी करीत, म्हणून त्याने नोकरी लागल्याबरोबर आधी टेलीफोन घेतला.

रविवारची संध्याकाळ, शंतनू बाहेर पडायच्या तयारीत होता.त्याचे लग्न ठरले होते, वर्गातल्याच मुलीशी त्याचे जमले होते.आज बरेच दिवसांनी दोघांना मोकळा रविवार मिळाला होता. फोनची बेल वाजली वसूताई देवापाशी दिवा लावत होत्या. निघता निघता शंतनूने फोन घेतला.
"हॅलो, मी रघुनाथ बोलतोय पुण्याहून "
"बोला काका"
"अरे शंतनू आई आहे का?"
" ती देवापाशी दिवा लावतीय काही निरोप आहे का? "
" अरे काशीनाथदादा, तुझे बाबा , येतोय इकडे, पंचवीस वर्षांनी त्याने सगळ्यांना एकत्र बोलावलय, पुढल्या रविवारी,म्हणून फोन केला होता"
"काका , तुम्ही भेटा त्यांना आम्ही येणार नाही.मी तर नक्कीच नाही आणि आईसुध्दा नाही येणार, इतकी वर्ष आम्ही राहिलोच ना त्यांच्या शिवाय आता त्यांना भेटायची अजिबात इच्छा नाही, ठेवू फोन?"
"अरे शंतनू, तुझा राग मी समजू शकतो पण वहिनींची इच्छा असेल तर.. "
"तिची पण नाही इच्छा..थेवतो फोन मी"
शंतनूने रागानेच फोन ठेवला. वसूताई बाहेर आल्या.त्यांनी आतून शंतनूचे बोलणे ऐकले होते
"आई काकांचा फोन होता, काशीनाथ येणार असे ते म्हणत होते आपल्याला भेटायला बोलावले होते तुझ्यावतीनेही मी त्यांना येणार नाही म्हणून कळविले आहे."
"असा नावाने उच्चार करु नये वडील आहेत ते तुझे"
"आई , मी त्यांना बघितले नाही.माझी आई-बाबा तूच होतीस आता सिनेमात दाखवतात तसे तुला त्यांच्या सोबत जायचे असेल तर जा, पण ज्या माणसाने तुला आयुष्यभर मनःस्ताप दिला त्याला भेटायची गरज नाही असे मला वाट्ते."
"मी नाही जाणार, तू म्हणतोस ते अगदीच काही खोटं नाही.आता त्यांना भेटून काय होणार? माझं मन पार मरुन गेलेलं आहे पण नाही गेले तरी बरं दिसणार नाही लोक काय म्हणतील?"
" हा विचार त्यांनी केला का? तू इकडे किती त्रासात दिवस काढलेस तेंव्हा त्यांनी काय केलं? आणि तसच वाट्त असेल तर आजी आठव, ती काय म्हणायची शेवटी ती असती तर कशी वागली आसती? आई आणि त्यांच्यासाठी मन मारायची काही जरुर नाही, मी आहे ना! आता तू अगदी आरामात रहा. हिंड , फिर मजा कर मी जाउन येतो"
शंतनू बाहेर पडला. वसूताई विचार करत बसल्या.खरचं आता त्या माणसाचा राग नाही पण त्याला भेटावं असंपण वाटत नाही.एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल वाटते तशी निर्विकार भावना आहे त्यांच्याबद्दल.शंतनूच मन मोडून जाण्यात काही अर्थ नाही. वडिलांबद्दल काही वाईट न सांगूनसुध्दा त्याच्या मनात त्यांच्याबद्दल आढीच राहिली.शाळेत त्याने मुलांना त्यांच्या वडीलांबरोबर बघितले असेल.आपले वडील नसतात, त्यांची पत्रे येत नाहीत.याचा त्याच्या बालमनावर परिणाम झालाच असेल.हुशार व समजूतदार असल्याने त्याने कुणाला तसे जाणवु दिले नाही.काशीनाथला भेटायला वसूताई आणि शंतनू गेलेच नाहीत.

महिनाभर काशीनाथ पुण्य़ात होता. वसु-शंतनू येतील असे त्याला वाटत होते, पण ना ते आले ना त्यांचा फोन, काशीनाथला वसूला तोंड दाखवायला लाज वाटत होती. त्याने केलेला अपराधच तेवढा मोठा होता.पण जाण्यापूर्वी एकदा तरी तिला भेटून तिची माफी मागायची इच्छा होती आणि शंतनुलाही बघायचे होते, त्याचा वर्षाच्या वाढदिवसाचा फोटो वसूने पाठविला होता, त्यानंतर काही संबंधच राहीले नव्हते(आपणच ठेवले नव्हते) त्याच्या हुशारीच्या गोष्टी सगळ्य़ांकडून ऐकलेल्या होत्या.

जायचा दिवस आला.मुंबईला पोचताना संध्याकाळ झाली होती.रात्री दहा वाजता विमानतळावर पोचायचे होते.रघुनाथ सोडायला आला होता.मनाचा हिय्या करुन काशीनाथ त्याला म्हणाला.
"वसू तेवढी नाही भेट्ली, निदान फोनवर तरी बोललो असतो"
"अरे त्यात काय अजून आहेत दोन-तीन तास फोन करु त्या दुकानातून घरी असतील तर जाऊनच येवु ना"
दुकानापाशी गाडी थांबवून रघुनाथने फोन लावला.वसूताई नुकत्याच शाळेतून येवुन टेकल्या होत्या.तो फोन वाजला, त्यांनि फोन उचलला
"हॅलो,मी रघुनाथ बोलतोय , कोण वहिनी का? काशीनाथदादा आणि मी आत्ता येतोय मुंबईत तुम्हाला भेटायला यायच होत..."
वसुताईना क्षणभर काही सुचेना. त्यांना शंतनुचे त्या दिवशीचे बोलणे आठवले.माईचे शेवटले बोलणे आठवले "मी त्याला कदापी माफ करणर नाही"
एक आई जर मुलाला माफ करणार नाही म्हणते तेंव्हा त्याची चूक तेवढीच मोठी आहे. आपण कॊण त्यांना क्षमा करणार?
’सॉरी रॉंग नंबर.. "असे म्हणून वसू ताईंनी फोन ठेवला् आणि त्यांनी रिसिव्हर काढूनच ठेवला, पुन्हा फोन नको ते बोलणे देखील नको.
आत जावून पाय धुवुन त्या देवापाशी गेल्या.

रघुनाथराव पुन्हा पुन्हा नंबर फिरवत होते. फोन लागत नव्हता.
"उचलत नाही रे फोन , मगाशी एकदा रॉंग नंबर लागला, अजून घरी आल्या नसतील वहिनी, आमच्या इकडचे फोन पण ना..."
"राहू दे रघुनाथ नाही योग भेटीचा , मानी आहे ती आईसारखीच, माफ नाही करणार मला ती या जन्मी तरी"

©