Tuesday, February 27, 2018

लळा जिव्हाळा शब्दच खोटे

काही व्यक्तींशी आपले नाते सहज जुळून जाते आणि काहींशी कितीही काळ गेला,कितीही प्रयत्न केला तरी अंतर जाणवतच राहते. माझे सासर कानडी.सासु-सासऱ्यांचे सक्खे,चुलत असे खूप मोठ्ठे गोत, मला माणसांची सवय होती तरी  भाषेच्या अडसराने काही वेळा नाती समजून घ्यायला वेळ लागायचा. आमच्या घरी सतत माणसांचा राबता होता त्यामुळे पहिल्या दोन -तीन वर्षात मला बरेचसे नातलग माहित झाले. नवऱ्याच्या एक चुलत मावशी कऱ्हाडला बरेच वर्षे असल्याने मराठी बोलू शकायच्या त्यांच्या यजमानाचे बालपण पुण्यात गेल्याने ते पण उत्तम मराठी बोलत . त्या पुण्यात रहायला आल्या आणि आमच्याघरी त्यांचे जाणे-येणे सुरु झाले.मराठी बोलू शकत असल्याने माझ्याशी त्या आवर्जुन बोलत. म्हणायला मावशी पण त्या माझ्या मोठ्या नणंदेच्या वयाच्या त्यामुळे मला त्यांचा सासू असा धाक वाटत नसे.त्यांची जुळी मुलेपण त्यावेळी कॉलेजमधे होती त्यांचेही सतत जाणे येणे होई.माझ्या मुलींचे वाढदिवस,गणपती अशा नाना कारणा प्रसंगांना जाणे-येणे झाल्याने आमचे सूर छान जुळले.माझ्या सासुबाईंच्या अकस्मिक निधनानंतर तर मला मावशी आणि काकांचा खूपच आधार वाटला. त्यावेळी आमचे घर त्यांच्या घराजवळच होते. सहाजिकच एकमेकांकडे जाणे,भेटणे सहज होई.

     या मावशींना ऐन तारुण्यात कॅन्सर सारख्या व्याधीने ग्रस्त केलं, सुदैवाने आजार वेळीच लक्षात आला.त्यांची जुळी मुले अगदीच अडनिड्या वयातली होती ,त्यांच्यातल्या आईने मनाच्या तीव्र निर्धाराने आजाराशी सामना केला, दोन्ही स्तन पाठोपाठ काढावे लागले पण लवकरच त्या आजारातून बऱ्या होवुन कामालाही लागल्या.याच वेळी त्या पुण्यात आल्या. माझ्या सासुबाई त्यांची मोठी बहीण त्यांनी आपल्या मुलीच्या वयाच्या या बहीणीला छान मानसिक,भावनिक आधार दिला.मुलांची शाळेची महत्वाची १० वी बारावीची वर्षे सुखरुप पार पडली दोन्ही मुले इंजिनियरींगला गेली ,आणि मावशींच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले, गर्भाशयात कॅन्सर पसरला. पण मावशी आता आजाराला अजिबात भित नव्हत्या. त्यांनी स्वतःच हॉस्पीटलमध्ये जायची बॅग भरली.मुलांसाठी स्वयंपाकाला बाई बघितली. माझ्या सासुबाई त्यावेळी या जगात नव्हत्या. मी ऑपरेशनच्या आदल्या दिवशी भेटायला हॉस्पिटल मध्ये गेले ,माझे मन खूप धास्तावलेले होते.पण मावशी सुरेख ड्रेस,केसात गजरा माळून आरामात कॉटवर बसलेल्या होत्या,नेहमीच्या हसतमुखाने त्यांनी माझे स्वागत केले. त्यांनी त्यांचा आणि यजमानांचा दोघांचा डबा आणला होता.मला म्हणाल्या, " घरी हे एकटे जेवणार नाहीत म्हणून मग त्यांच जेवण ही इथेच आणलयं" त्यांच्या पराकोटीच्या आशावादामुळे ,परमेश्वराच्या कृपेने अतिशय तज्ञ डॉक्टर मिळाले आणि यावेळी देखील ऑपरेशन यशस्वी झाले.मावशी पूर्ण बऱ्या झाल्या. मुलांची शिक्षणे पार पडली, त्यांना चांगल्या नोकऱ्या पण मिळाल्या. एव्हाना आम्ही जागा बदलून मावशींच्या घरापासून खूप दूर शहराच्या दुसऱ्या टोकाला रहायला गेलो. सहाजिकच गाठी-भेटी कमी झाल्या,फोनवरच बोलणे होऊ लागले. माझ्याही मुली मोठ्या होऊन त्यांची महत्वाची शैक्षणिक वर्षे सुरु झाली. घर,नोकरी,मुलींचे अभ्यास यात मला डोके वर काढणे कठीण होऊ लागले.

    यथावकाश मावशींच्या मुलांची लग्ने झाली. मावशींना मनाजोगत्या सुना आल्या. मुले आधी परगावी नंतर परदेशी गेली. मावशी आणि काकांना कधीच एकटेपणा जाणवला नाही कारण मावशींनी स्वतःला व्यस्त ठेवले होते.त्या रोज भजनी मंडळात जात. पुण्यात आणि पुण्याबाहेरच्या सगळ्या नातलगांच्या छोट्या मोठ्या समारंभाना जाणे,नवरात्रात सप्तशतीचा पाठ करणे यामुळे वेळ चांगला जाई.मोठ्या आजारांतून सुखरुप बाहेर आल्यामुळे कदाचित देवावरची श्रध्दा अधिकच दृढ झाली असेल, मुले जवळ नसल्याने आलेलं रिकामपण विसरायला त्याचाच आधार वाटत असेल, काही असेल पण मावशी आणि काकांच आयुष्य मजेत चालल होतं हे नक्की.गावाकडचा रामनवमीचा उत्सव असो कि गोंदवल्याचा उत्सव असो ,ब्रह्मानंद महाराजांचा उत्सव सगळीकडे मावशी व काका आवर्जुन जात .मावशींना पाच सख्ख्या बहिणी तीन भाऊ.काकांचे तीन भाऊ व एक बहीण प्रत्येकाच्या घरची कार्ये,पुण्यातील अनेक नातलग,मित्रपरीवार ,भजनी मंडळाचे कार्यक्रम, भिशीच्या मैत्रीणींबरोबर सहली यासगळ्यात दिवस छान चालले होते. यातच वर्षा -दोन वर्षातून मुलगे-सुना येत .एकावेळी एकच जोडी येई.मग त्यांच्या बरोबरचे आठ पंधरा दिवस तर पंख लावल्यासारखे निघून जात. मावशींना एक नातू आणि एक नात झाली होती मग काय ते आले कि एखादे गेट टु गेदर होई.

    पण या सगळ्या सुखाला दृष्ट लागावी अशी घटना घडली,मावशी परत आजारी पडल्या.एकदा संध्याकाळी जावेबरोबर कुठल्याशा कार्यक्रमाला जायला तयार होवुन त्या बाहेर पडल्या जिना उतरल्या आणि कुणला काही समजायच्या आत त्या खालीच बसल्या ,काय होतय हे त्यांना देखील कळले नाही, कुणीतरी रीक्षा दारात आणली त्यांना हाताला धरुन रिक्षात बसवले,तेंव्हा त्या ठिक झाल्या ."काय आचानक पायातली शक्ती गेल्यासारखे झाले वाटतं. डॉक्टर कडे नको जायला ",असे म्हणत  ठरलेल्या ठिकाणी त्या गेल्या. पण ती त्या भीषण आजाराची सुरुवात होती. मावशींना एक असाध्य आजार झाला .शरीरातील सगळे स्नायु हळूहळू निकामी होण्याचा आजार.ज्यावर काही ठोस वैद्यकीय उपाय नसलेला आजार.
मग नाना उपाय झाले,ऍलोपाथी,आयुर्वेदिक,होमिओपाथी सगळे झाले.मावशींचे हिंडणे फिरणे एकदम कमी झाले. त्या वॉकर घेवुन चालू लागल्या .त्याही परिस्थितीत उडपीला जावुन ट्रिटमेंट घेतली पण फारसा उपयोग नाही झाला.मावशींनी मग त्याचाही शांतमनाने स्विकार केला.आता घरातच रहावे लागणार होते. मदतीला बायका आल्या,नंतर चोवीस तासासाठी दोन आया ठेवल्या.मावशींच्या मैत्रीणी येत असत.आता त्यांच्या घरातच भजन होवु लागले. परिचित,नातलग भेटायला येत.सख्ख्या बहिणी,चुलत बहिणी राहुन जात. मी जेंव्हा जेंव्हा त्यांना भेटायला जाई,किंवा फोन करे, त्यांच्या तोंडून कधी निराशेचा सूर ऐकला नाही.घरी गेले तरी त्या पलंगावर नीट आवरुन बसलेल्या,फार तर पडलेल्या असत. स्वतःची प्रकृती सोडून इतर विषयांवर गप्पा मारत.
   
    नोकरी,घरकाम,माझ्या तब्येतीच्या कुरबुरी आणि त्यांचे लांब घर यामुळे मनात असूनही मला नेहमी जायला काही जमत नव्हते. माझा नवरा मात्र वेळात वेळ काढुन,वाकडी वाट करुन मावशीला भेटुन येई.दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावतच होती,आता बोलणे बंद झाले, हात काम करत नव्हतेच, पण भरवलेले अन्न खाणे कठिण होवु लागले. काकांची शुगर मावशींच्या ढासळत्या तब्येतीला बघून वाढू लागली. मावशींच्या काळजीने काका खंगू लागले.

    अखेर काल दुपारी मावशी गेल्या. त्यांचे खूप हाल होत होते,सुटका झाली त्यांची. साडेचार वाजता काकांचा मावशी गेली हि बातमी सांगणारा फोन आला, आम्ही दोघे तिकडे जाईपर्यंत साडेपाच पावणेसहा झाले होते. आजुबाजुची मंडळी येत होती.पुण्यातले नातलग येत होते.मावशींच्या मैत्रीणी येत होत्या. काकांना कमालीचा खोकला झालेला होता,पण ते म्हणत होते ,"मी देवाला विनवत होतो,माझ्या आधी तिला ने, मी आधी गेलो तर हिच्या कडे कोण बघणार? आता मी मरायला मोकळा झालो " .कोणीतरी मुले कधी ,कशी येणार याबद्दल विचारले, आम्हाला त्या गेल्याची बातमी काकांनी सांगितली त्यावेळी मुले येतील तोवर तिला हॉस्पीटलच्या कोल्ड स्टोअरेज मधे ठेवणार असल्याचे ते म्हणाले होते. पण आम्ही पोचलो त्यावेळी रात्रीच सगळे उरकणार असे समजले.आम्हाला फोन केल्या नंतर त्यांचे मुलांशी बोलणे झाले आणि दोघांनाही लगेच येणे शक्य नसल्याने निर्णय बदलला होता.

    मावशी आणि काकांची हि गोष्ट प्रातिनिधिक आहे असं मला वाटत. आमच्या पिढीतील बह्तेकांचे भविष्य याच अंगाने जाऊ शकते. एखाद-दुसरे मुल आणि त्याला मिळलेल्या उच्च शिक्षणानंतर त्याचे चांगल्या भवितव्याकरीता परगावी,परदेशी जाणे अगदी स्वाभाविक आहे. पण त्या मुलांमध्ये आपली होणारी भावनिक गुंतणूक काहिशी आजच्या काळानुरुप अस्वाभाविक आहे. दोन्ही मुलांचं परदेशात निघून जाणं हे तर मावशींच्या आजारामागच कारण नसेल ? शारीरिक आजारामागची मानसिक कारणे फारशी विचारात घेतली जात नाहीत. ज्या आईने आपल्या जिवघेण्या आजारावर मुलांच्या मायेपोटी मात केली त्या माउलीला मुले शिकून सवरुन स्वावलंबी झाल्यावर आपापल्या बायकांबरोबर निघून गेली याचा काहीतरी त्रास होतच असेल .वर्षा-दोन वर्षातून कसे-बसे आठ दिवस यायचे त्यातही एखादी ट्रीप, सासुरवाडी,मित्र-मैत्रीणी यातुन आईच्या वाट्याला किती येत असतील? बोलून दाखवता न येणाऱ्या अशा बऱ्याच घटनांचा एकत्रित परीणाम शरीरावर आजाराच्या रुपात दिसतही असेल.
   
    माणसाच्या मेंदू प्राण्यांचा मेंदूपेक्षा जास्त विकसित झालेला  असतो हे लहानपणापासून वाचलय,शिकलय. भावना आणि विचार हि मानवी मेंदुतील दोन केंद्रे.मानवाच्या मेंदुचा विकास हा त्याच्या वैचारिक मेंदुचा विकास आहे.इतर प्राणी माणसाइतका विचार करु शकत नाहीत भावनिक बुध्दीबद्दल वाचताना असे वाचले होते कि भावनिक मेंदू किंवा भाव भावना या माणसाला फार पूर्वीपासून आहेत  विचार करण्याचे केंद्र त्या मानाने अलिकडचे. ज्यावेळी माणसाला भिती,राग,किंवा अस्तिवाचा प्रश्ण येतो त्यावेळी भावनिक मेंदूकडून कार्य केले जाते वैचारिक मेंदूशी असलेले कनेक्शन् तात्पुरते तुटते आणि त्यामुळे माणूस काहीवेळा अघोरी वर्तन ही करू शकतो नंतर त्याच्यावर पश्चात्तापाची वेळही येते. बरेचदा  जिवघेणी भांडणे,एखाद्या व्यक्तीची हत्या हि  अविचारी कृत्ये माणसाच्या भावनेच्या भारात घडलेली असतात.विवेकी विचार आणि भावनांचे भान राखणारा माणूस समाधानाचे आयुष्य जगू शकतो असे विज्ञान सांगते. पण असे मनात येतयं की अतिप्रगत मानवाच्या या बुध्दीविकासामुळे त्याच  मन संवेदनाशील राहिलं नाही का? त्याच्या भावना बोथट झाल्यात का?  आईच्या मॄत्यूची बातमी समजल्यावर वडीलांच्या काळजीपोटी,तिला अखेरच तरी बघता यावं यासाठी काय वाट्टेल ते करायला मन सरसावत नाही कारण त्यावेळी विचारी मेंदू समजावतो ,"आता जाऊन काही उपयोग होणार नाहीये, गेलेली व्यक्ती परत येणार नाही,बाबांकडे बघायला बरेच लोक आहेत तेंव्हा उगीच अव्वाच्या सवा पैसे मोजून तिकिट काढा ,रजेसाठी धावपळ करा आणि असलेले प्रश्ण वाढवा हे करण्य़ापेक्षा जमेल तसे जाऊ "
विचारी मेंदूचा विजय होतो आणि इकडे फोनवर सांगितले जाते ,"लगेच निघणे शक्य नाही आमची वाट बघू नका, आईचे अंत्यविधी उरकून घ्या "

    भावनेच्या भारात वाहून न जाणे समजू शकते पण एखाद्याच्या दुःखात काडीमात्र सहभागी न होता आपल्या ठरलेल्या वैयक्तिक कार्यक्रमात बदल न करणे हे कशाचे लक्षण समजायचे?  असेच आणखी एक उदाहरण, अनेक वर्षे एकत्र काम करणाऱ्या दोन डॉक्टरांपैकी एकाच्या मुलाचे लग्न झाले  त्या समारंभाला दुसरा गेला.लग्नाची धामधूम झाली नंतर दुसरा डॉक्टर अचानक आजारी पडला त्याचे दुखणे इतके विकोपाला गेले कि त्यात त्याचा शेवटच झाला एका वयाचे ,अनेक वर्षे एकत्र काम करणारे त्यातला एक अकाली गेला पण दुसऱ्याने मुलाच्या लग्नानंतर श्रमपरिहाराकरीता ठरवलेली सिंगापूर सहल रहित केली नाही,आपला सहकारी अकाली गेला त्याच्या कुटुंबियांना मानसिक,भावनिक आधार देण्यापेक्षा आपला श्रमपरिहार महत्वाचा वाटणे हा कुठला बौध्दिक विकास आहे?

    अशा वेळी whatsapp वर वाचलेली एक घडलेली घटना आठवते, लाँरेंन्स  अँथनी नावाच्या व्यक्तीने वनचर प्राण्यांना वाचवून त्यांचे जगभरात पुनर्वसनाचे मोठे काम केले. सात मार्च २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.त्यांच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी ३१ हत्तीचा एक कळप दोन हत्तीणींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या घरी आला आणि दोन दिवस व दोन रात्री अन्नपाणी काहीही न घेता त्यांच्या अंगणात बसून राहिला , नंतर हे हत्ती आले तसेच निघूनही गेले.आपल्या रक्षणकर्त्याला मानवंदना करण्यासाठी हे गजगण थोडाथॊडका नाही तर २० किमी.चा प्रवास चालत करत आले.हे हत्ती त्यापूर्वी तीन वर्षात त्यांच्या घरी एकदाही आलेले नव्हते, इतकच नव्हे तर त्या हत्तींना लाँरेंन्स  अँथनींच्या मॄत्यूची बातमी कोणी सांगण्याची शक्यता नव्हती .केवळ आपल्याला जीवदान देणाऱ्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता मनात ठेवून त्याला अखेरचा निरोप द्यायला, हत्ती एवढ्या लांबवर इतक्या मोठ्या संख्येने चालत आले !
    शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेमध्ये त्यांच्या लाडक्या कुत्र्याने उडी मारुन आपल्या निष्ठेचा वास्तुपाठ दाखवला,साने गुरुजींच्या ’शामच्या आई ’ पुस्तकात ते लिहितात,त्यांच्या आई वारल्यानंतर तिच्या आवडत्या मांजरीने अन्न पाण्याचा त्याग केला आणि दोन -तीन  दिवसात ती पण मरुन गेली. कुत्री,मांजरे,हत्ती यांसारखे प्राणी माणसावर असे निरपेक्ष प्रेम करतात आणि पोटची मुले विचार करतात !

    विज्ञानयुगाचा हा शापच म्हणावा लागेल, हल्लीच्या शिक्षणाने माणूस आत्मकेंद्री होतोय असं माझे वडील म्हणत असत मला त्यावेळी त्याचा अर्थ समजत नव्हता पण आता तो फारच चांगल्या रितीने समजला आहे. कारण जुन्या पिढ्यांमध्ये असे क्वचित घडत होते. आपल्या आजारी आईला भेटावयास जाण्याकरीता रजा मिळाली नाही त्यावेळी ब्रिटीश सरकारच्या नोकरीचा तात्काळ राजिनामा देणारे ईश्र्वरचंद्र विद्यासागर आठवले.आपल्या मातृभूमीकरीता आपले  शिक्षण,घर-दार, संसार यांवर पाणी सोडणारे असंख्य क्रांतीवीर आठवले.

    सगळाच दोष नव्या पिढीला देणेही कितपत योग्य आहे? असा विचार पण येतोच,शेवटी आमचे संस्कार कमी पडत असतील. बाहेरच्या स्पर्धेच्या रेट्यात टिकायचे म्हणून ही पिढी सतत ताणाखाली  आहेच. त्यांना आई-वडीलांचे प्रेम नाही असे नाही पण त्याकरीता द्यावा लागणारा वेळ त्यांच्या कडे नाही. मावशींच्या औषधपाण्याला,त्यांच्या आया-दायांना लागणारा पैसा मुले पुरवित होतीच की? पण मावशींना त्यापेक्षा मुलांच्या सहवासाची गरज जास्त होती ती पुरवणे मुलांना जमले नाही.

    आता या सगळ्याचा आपणही स्विकार करुन घेणे जरुर आहे.मुलांना योग्य तेवढे शिक्षण देवुन त्यांच्या पंखात बळ देणे हे आपले कर्तव्य आहे,मग बळ आलेले पंख घेवुन पिल्ले दूर जाणार याची मानसिक तयारी आधीपासून करुन घेतली पाहिजे आणि सुरुवातीपासूनच मन हरीभजनात गुंतवले पाहिजे. मुलांमधली भावनिक गुंतणूक कमी करुन आपापल्या आवडीनुसार कुठल्यातरी व्यापात स्वतःला गुंतवुन घेणे जरुर आहे.

Wednesday, July 20, 2016

त्या बालिकेला बघून....

           सकाळी सकाळी whatsapp वर एक विडीओ बघितला( माझ whatsapp च वेड कमी झालय पण अजून पुरत गेल नाहीये) एक चार वर्षांची चिमखडी मुलगी इंग्रजी मधून आपल्या देशाबद्दलच्या प्रश्णांची धडाधड उत्तरे देत होती कुठल्याही राज्याचे नाव घ्यायचा अवकाश हि बेटी त्याची राजधानी सांगायची.सातही युनियन टेरीटरीज(केंद्रशासित प्रदेश) ची नावे तिच्या राजधान्यांसकट सांगितलेले बघून मला त्या बालसरस्वतीचे पाय धरावेसे वाटले ! शिवाय तिला शिकविणाऱ्यांचे सुध्दा.

        आपल्या देशात किती राज्ये आहेत हे समजायला मला किमान दहावे वर्ष उजाडले असेल ,केंद्र्शासित प्रदेश वगैरे शत्रुंपासून दहावीनंतरच सुटका झालेली नक्की माहित आहे. विडीओतल्या मुलीची स्मरणशक्ती अगाधच आहे आणि तिच्या या शक्तीचा वापर पुढच्या अभ्यासाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टीत करण्याच तिच्या पालकांच चातुर्यही वाखाणण्याजोगच आहे. मला त्या मुलीच जितक कौतुक वाटल त्याहूनही अधिक तिच्या वयाच्या इतर मुलांची काळजी ! कारण आता हा विडीओ सगळ्या जगभर फिरणार तिच्या किंवा तिच्या आसपासच्या वयाच्या मुलांच्या आई-वडील आणि आजी आजोबा (हो हल्ली बऱ्याचशा आजी आजोबांचा ही बाल संगोपनात वाटा असतो शिवाय तेही उच्चशिक्षित असतात) सगळ्यांनाच आपल्या मुलांनाही हे आल पाहिजे अस वाटून त्यांनी त्या लेकरांना वेठीला धरु नये. ती मुलगी कदाचित स्मरणशक्तीच वरदान घेवुन आली असेल ,तिला त्या बद्दल शिकवताना तिच्या पालकांनी काही आगळ्या वेगळ्या पध्दती वापरल्या असतील ज्या योगे तिला हे सारे खेळासारखे वाटले असेल, कदाचित तिच्या मोठ्या भावंडाच्या बरोबर ऐकताना तिच्या कानावर पडून तिला ते अवगत झाले असेल पण म्हणून इतरांनी आपल्या पिल्लांच्या पाठीस लागू नये अस मला फार फार वाटतय.

         आपोआप कानी पडून मुलांना अभ्यासाची गोडी लागण वेगळं आणि जोर जबरदस्ती करुन त्यांना पढवणं वेगळं. दुर्गाबाई भागवतांनी आपल्या लहानपणातल्या आठवणींमधे  लिहिलय त्यांच्याहून  त्यांचा काका दोन चार वर्षांनी मोठा होता त्याच्या  बरोबर सतत राहून  त्यांना लिहिता वाचता यायाला लागल,पाढे,अक्षर बाराखड्या सगळ त्या काका बरोबरोबर आवडीने लिहित शिवाय शाळेत जायचा हट्टही करत.मग त्या स्वतःच कशा शाळेत गेल्या,नाव घालायला वयाचा दाखला मागितल्यावर कशा निरुत्तर झाल्या मग काकाचे नाव घेतल्यावर बाईंनी काकाला बोलावुन घेतले मग त्याच्याच वर्गात जायचा हट्ट् त्यांनी कसा धरला याच मोठ रसाळ वर्णन बाईंनी केलय. त्यांच्यासारख्या असामान्य बुध्दीमत्तेच्या मुलीच्या बाबतित हे घडल. त्यावेळी घरोघरी अशीच बरीच मुल असत पण सगळ्य़ांचीच धाकटी भावंडे अशी शाळेत जाण्यासाठी हट्ट करत नव्हती. पण याच भान त्यावेळच्या पालकांना होत त्याला हल्ली पूर्वीचे पालक सजग नव्हते असही म्हणतील. त्या वेळच्या पालकांना वेळही नसे मुलांकडे इतके लक्ष द्यायला.हल्लीच्या करीयर मागे धावणाऱ्या लोकांकडे ही वेळ नसतोच पण असलेला वेळ मुलांनी प्रत्येक शर्यतीत पहिलच आल पाहिजे या अट्टहासाने त्यांच्यावर असंख्य ओझी घालण्यात जातो हे बघताना मन विचारात पडते.

      लहानपणी माझी स्मरणशक्तीही चांगली होती(आजही नको ते लक्षात ठेवण्य़ात ती वाया जाते इति नवरा) रामरक्षा,मारुतीस्तोस्त्र गीतेचे १२वा,१५ वा अध्याय अशा गोष्टी आई पाठ करुन घेई. दादांनी पाढे पक्के करुन घेतले,अनेक सुंदर कविता ते मला म्हणून दाखवत त्याचे अर्थही सांगत त्या मला सहज पाठ झाल्या. कित्येक संस्कृत श्लोकही ते म्हणून दाखवित ,सावरकरांचे प्रसिध्द "हे सिंधू एकटा महाराष्ट्र् तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही” हे भाषणही दादांनी दोन तीन दा वाचल्यानंतर माझे बरेच पाठ झाले होते. माझ्या आईच्या मामांनी मला कानडी भाषेतील १ ते १०० अंक म्हणायला शिकविले होते. रेडीओवरील गाणे एकदा किंवा फारफार तर दोन दा ऐकून माझे तोंडपाठ होत असे माझी मोठी ताई हिंदी गाणी लागली आणि तिच्या आवडीच गाण लागल कि वही पेन घेवुन् ते उतरवुन काढायची एखादी ओळ राहिली कि हळहळायची, मी मात्र माझ्या आवडीचे गाणे नीट ऐकत असे आणि माझे लवकर पाठ होत असे, शाळेतल्या कविताही मला कधी पाठ कराव्या लागल्या नाहीत पण या सगळ्याचे घरात विशेष कौतुक झाल्याचे मला आठवत नाही. मला अभ्यासातले काही शिकवावे असे कुणालाच वाटले नाही. शाळेत जवळजवळ सगळे विषय मला आवडत होते, भूगोलातील नकाशे मला समजाय़चे नाहीत पण पाठांतराचा त्रास न वाटल्याने कमीत कमी अभ्यास करुन मी दुसरा नंबर सहज मिळवित होते.पहिला नंबर मिळवणारी मुलगी माझी जवळची मैत्रीण असल्याने मला आपण तिच्याशी स्पर्धा करावी असे कधी वाटलेच नाही आणि इर्षेने काही करावे असा माझा स्वभाव नसल्याने मला मिळणाऱ्या मार्कांनी मला  कधी दुःख दिले नाही.  आमच्या घरात सतत पाहुण्यांचा राबता असे. घरकामाला बाई नसल्यामुळे आईला वरकामात बरीच मदत करावी लागे,दुकानातून सतत काही ना काही आणुन द्यावे लागे हे सगळी कामे मी आनंदाने करीत असे,आईचाही नाईलाज होता आणि या कामांमुळे माझे आभ्यासाचे नुकसान होत नसल्याने आई मलाच हक्काने कामे सांगत होती.इतके करुनही उरलेला रिकामा वेळ् मी हाताला येईल ते पुस्तक वाचण्यात घालवी. थोडक्यात माझ्या चांगल्या स्मरणशक्तीची ना मला किंमत होती ना माझ्या घरच्यांना. याबद्दल मला खंत नाही पण कधीतरी वाटून जाते आपल्या क्षमतेचा वापर हवा तितका झाला नाही. याबद्दल मी माझ्या आईवडीलांना दोष नाही देणार .त्यांच्याजवळ मला मार्गदर्शन करण्य़ाइतक शिक्षण नव्हत त्यामुळे असलेल्या निम्न आर्थिक दर्जामुळे पैसा खर्च करुन क्लासेसला पाठवायची क्षमताही नव्हती आणि माझ्याकडेही महत्त्वाकांक्षेची कमतरता होतीच. त्यातुनही मी जे शिक्षण घेतले त्यातून माझा बराच विकास झाला.मी आर्थिक दृष्ट्या स्वावल्ंबी तर झालेच पण केंद्र सरकारच्या माहिती प्रसारणासारख्या चांगल्या खात्यात आधिकारीपदही मिळवू शकले.
       
            हे बघताना मला आठवतात माझ्या मागल्या पिढीमधल्या काही बाय़का.माझी आई तिची पण स्मरणशक्ती चांगली होती. अनेक स्तोत्रे तिला पाठ होती. तिच्या शाळेतल्या कविता ती माझ्या मुलींना म्हणून दाखवी.तिने वाचलेले पुस्तक असो कि पाहिलेला नाटक ,सिनेमा सगळ्याची अतिशय बारकाव्यांसह कथन करण्याची कला तिला अवगत होती. अनेक गाणी ती सुरेल आवाजात गायची पण तिच्या हुशारीचे काही चिज झाले नाही.एकत्र कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना तिला कधी वाचन करणेही जमले नाही. सतत येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करताना ती दमुन जाई.आम्हाला मात्र तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धडे  दिले आणि चूलखंडातुन बाहेर पडून काहीतरी वेगळ करा अशी सतत शिकवण दिली. आज वाटते तिला संधी मिळती तर ती कुठल्याकुठे गेली असती.तिच्यामधे जिद्द होती, अपार कष्ट करायची तयारी होती.
       
        माझ्या चुलत सासुबाई देखील अशाच अतिशय हुशार होत्या. त्यांना मराठी समजत असे बोलता यायचे नाही,मला कन्नड कळे पण् बोलता येत नव्हते.आमच्या गावाकडे गेले कि मी मराठीतून आणि त्या कानडीमधून बोलत पण आमचा संवाद छान होई. त्यांचा मोठा भाऊ बंगलोरला मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट् होता त्या मला नेहमी सांगत त्यांचे वडील लवकर वारले त्यापूर्वी त्या भावाबरोबर शाळेत जात नेहमी त्यांचा पहिला नंबर येई.पण वडीलांच्या पश्चात काकाने त्यांचे तेराव्या वर्षी लग्न लावुन टाकले आणि कर्नाटकातल्या किऽर्र खेड्य़ात या थोरली सून म्हणून येवुन पडल्या. तिथे त्यांचा उभा जन्म शेतीची कामे,आलागेला आणि शेणगोठ्यात गेला.आमच्या मोठ्या कुटुंबातील प्रत्येक व्यत्क्तिची जन्मतारीख,लग्नाच्या तारखा त्यांना सांगता यायच्या. आमच्याकडे नात्यातल्या नात्यात लग्नसंबंध फार होत त्या प्रत्येकाची उकल मी त्यांच्याकडून करुन घेई.त्यावेळीदेखील मला वाटे किती ह्या माऊलीची हुशारी वाया गेली. अशा कित्येक स्त्रिया मागल्या पिढ्यांमधे होवुन गेल्या असतील.
       
        केवळ चांगली स्मरणशक्ती म्हणजे हुशारी नव्हे हे जरी खर असलं तरी आपल्याकडे चालत आलेल्या पूर्वापार शिक्षणपध्दतीचा विचार केला तर शैक्षणिक यशात तिचा सिंहाचा वाटा आहे यात वाद व्हायचे काहीच कारण नाही. सगळ्या स्पर्धा परीक्षांचा जोरही स्मरणशक्ती मापनात आहे असे वाटते.त्यामुळेच या बायकांची हुशारी कामी आली असते असे वाटते. शिवाय मला त्यांच्या सहवासातून तोच एक पैलू जाणवला कदाचित त्यांच्यात उत्तम ग्रहणशक्ती,सर्जनशिलताही असेल .कुठलेही शिक्षण ,स्ंस्कार नसतानाही त्यांची स्मरणशक्ती टिकली पण योग्य मार्ग न मिळाल्याने ती एका अर्थी वायाच गेली.

     या छोटीचा विडीओ बघताना वाटलं तिच्या स्मरणशक्तीचा उपयोग केला जातोय. मात्र त्याचाही अतिरेक होवु नये. तिच बालपण, कुतूहल, निर्व्याजता यात होरपळली जावु नये आणि तिला अहंकाराचा वारा पण लागू नये.

Tuesday, January 19, 2016

जिणे गंगौघाचे पाणी

  टि.व्ही. वर मुलीने लावलेला सिनेमा बघत होते ’पिकू’ नावाचा. सिनेमात वृध्द आणि विधुर अमिताभ आपल्या एकुलत्या एक मुलीला सळो कि पळो करुन सोडत होता.तिच्या ऑफिसमधे फोन कर,तिला पार्टीतून बोलावुन घे सतत तब्येतीची रडगाणी , एक ना दोन. मुलगी म्हणाली ,"बघ आई, म्हाताऱ्या माणसांना वृध्दाश्रमात पाठवणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही नावे ठेवता, पण इथे हा आजोबा त्या मुलीचा किती छळ करतोय तिच लग्नही होवु देत नाहीय "

        अस घडतही असेल, पण माझे वडील ५२ म्हणजे आजकालच्या भाषेत तरूण वयात गेले, आणि सासरेही ६५ व्या वर्षी अगदी निरोगी तब्येत असताना अचानक हार्ट्फेल होवुन गेले. त्यामुळे त्रासदायक म्हाताऱ्यांचा मला अनुभव नाही असे म्हणताना झटकन डोळ्यापुढे आता ऐंशींव्या वर्षात पदार्पण करणारे काका आले.   पिकू सिनेमाच्या पूर्णतः विरोधी अस त्यांच वागण असल्याने  त्याचे वय जाणवत नसावे असे वाटते. दहा वर्षापूर्वी माझी काकू अगदी ध्यानीमनी नसताना अचानक गेली.हा धक्का आम्हालाच एवढा होता कि काका आणि त्याच्या मुलींवर काय बेतले असेल याची कल्पनाही करवत नाही. काकांनी कपभर चहा देखील हाताने केलेला आम्ही कधी बघितले नव्हते. अर्थात ते दिवसभर त्यांच्या व्यापात असत आणि काकूनेही त्याबद्दल चुकूनही तक्रारीचा सूर काढला नव्हता. मात्र अचानक आलेल्या या प्रसंगाने काका फारच खचले. त्यांची एक मुलगी ठाण्यात डॉक्टर आणि दुसरी अमेरिकेत. काकांना एकट्याला पुण्यात ठेवायची मोठ्या मुलीची तयारी नसल्याने तिने त्यांना ठाण्याला नेले. मी दोन चार दिवसांनी फोन करुन चौकशी करायची त्यांची. एकदा ते फोनवर मला म्ह्णाले, " शुभा, माझी लेक माझी खूप काळजी घेते,सतत माझ्या बरोबर असते. मला एकटेपणा जाणवू नये यासाठी खूप करते ती .आता ती म्हणतीय मी माझी संध्याकाळची प्रॅक्टीस बंद करते तुमच्यासाठी. पण तू माझ्या वतीने तिला एक सांगशील का?"
" काय?"
" तिला म्हणावं माझी एवढी काळजी करू नको, हे दुःख खूप गहिरं आहे ते संपणार नाहीच,पण यातून मी हळूहळू बाहेर येईन त्याकरीता तिन तिच आयुष्य,करीयर वाया घालवणे बरोबर नाही.तिची आई गेली आहे याच दुःख विसरुन ती माझा विचार करतीय ह्याचा मला त्रास होतो. तेंव्हा तू तिला समजावुन सांग"
आपले दुःख जाणणाऱ्या मुलीला तिचे आयुष्य सुरु करायला सांगणारे माझे काका किती मोठ्या मनाचे ! अशा  लोकांच्या सहवासात असल्याने मला पिकू सिनेमा कसा पटणार?

    काका वयाने मोठे आहेतच पण ते पुण्याच्या नामांकित कॉलेजमधुन प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. एम.एस.स्सी ला सुवर्णपदक मिळवणारे, गणितावर पन्नासहून जास्त पुस्तके लिहिणारे, तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास असणारे आहेत.
   
      आमच घर लहान होत,  घरात माणसं जास्त होती.  आई नेहमी सांगायची कि  मी लहान असताना फार हट्टी आणि रडकी होते. सतत् मला घेऊन बसावे माझ्याकडे लक्ष द्यावे अशी माझी अपेक्षा असे आणि मला कुणी घेतले नाही तर् मी तारस्वरात रडायची. (हल्लीच्या लहान मुलांना जे आपसुख मिळते त्यासाठी मला बंड करावे लागत होते.)  आईला कामामुळे मला सतत् घेवुन बसणे शक्य नसे. त्यावेळी माझे काका् एस.पी. कॉलेजमधे प्राध्यापक होते. त्यांचे लग्न झालेले नव्हते. आम्ही कॉलेजच्या आवारातच राहत होतो. काका त्यांना वेळ मिळाला कि तडक घरी येत आणि मला घेवून् खेळवत बसत.  गोल्ड मेडल मिळविलेल्या, कॉलेजमधे शिकविणाऱ्या दिराला या पोरीपायी घरी येवुन तिला खेळवावे लागतय या गोष्टीचा आईला फार संकोच वाटायचा.पण काकांचा स्वभावच तसा होता, दुसऱ्याला समजून घेण्याच्या  अतिशय दुर्मिळ स्वभावाचे माझे काका. अर्थात ते कळायच माझ वयच नव्हतं.
   
    लहान पणी घरात वडील रागीट ,आईचा स्वभावही तापट  आणि काकांचा स्वभाव अतिशय शांत. आम्हाला त्यांनी मारणे सोडाच कधी आवाज चढवून बोललेले आठवत नाही सहाजिकच सगळ्या भाच्या पुतण्यांचे ते लाडका मामा आणि काका.  पुढे काकांच लग्न झालं, आम्ही सहकारनगरच्या घरी रहायला गेलो.काकांच घर डेक्कन जिमखान्यावर. सहकारनगरमधुन तिकडे जायला सोईच्या बस नव्हत्या.  काकांकडे जाणे येणे कमी झाले,काकाही कॉलेजमधे विभागप्रमुख झाले, ते पुस्तकेही लिहित त्यामुळे त्यांनाही दिवस कमी पडायचा. सहाजिकच आमच्या गाठी भेटी सणावारी,समारंभापुरत्या मर्यादित झाल्या. पुढे मी सायकल चालवू लागल्यावर काकांकडे जाऊ लागले.

    बारावीत गेल्यावर काकांना विचारुन क्लास लावले.फिजिक्स, काकांचे एक मित्र शिकवत होते, मॅथ्ससाठी काकांच्या कॉलेजमधील सहकारी प्रयाग मॅडमकडे मी जात होते.पण co-ordinate geometry काकांचा आवडता विषय होता. त्यावेळी काका व्हाइस प्रिन्सिपल होते पण त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढून त्यांनी त्यांचा लाडका विषय मला शिकवायचे कबुल केले. गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस मी ,माझी चुलत बहीण आणि  एक मैत्रीण  त्यांच्याकडे जात होतो. गुरुवारी संध्याकाळी सहा ते आठ आणि रविवारी दुपारी तीन ते सहा असं सलग आम्ही शिकत होतो.काका कुठल्याही पुस्तक अथवा नोटस हातात न घेता सहज शिकवत. circle,parabola,ellipse,hyperbola पासून सुरुवात करुन Three dimentional geometry पर्यंतचे सगळे धडे काकांनी तीन चार महिन्यात शिकवले. तीन तीन तास बसूनही मला कधी शिकायचा कंटाळा आला नाही याच श्रेय काकांना जितक आहे तितकच मधल्या वेळात दरवेळी काकू चहा आणि पोहे,उप्पीट,वडा असे चविष्ट खाय़ला काहीतरी आणून द्यायची त्यालाही आहेच. फार मजेचे दिवस होते ते. काकांच्या हुशारीबद्दल काका सोडून घरातील सगळ्यांकडून समजे.माझ्या दादांना तर् धाकट्या भावाच्या बुध्दीमत्तेचा प्रचंड अभिमान. दिवसातुन किमान एकदातरी त्याच्या हुशारीचं कौतुक व्हायचच.  काकांच्या बुध्दीमत्तेची जाणीव तेंव्हा मला प्रथमच झाली.अत्यंत अवघड प्रोब्लेम काका वेगवेगळ्या चारपाच पध्दतीने सोडवून दाखवीत आणि त्यातली शेवटच्या पध्दतीत तीन किंवा चार स्टेपसमधे रिझल्ट मिळे.  गणिताची गोडी मला होतीच पण त्यातली मजा मला काकांकडे आणि प्रयाग मॅडमकडे शिकल्यामुळे जास्त जाणवू लागली.काकांचा दिवस त्यावेळी पहाटे चारला सुरु होई. कॉलेजमधल्या जबाबदाऱ्या,आमची स्पेशल ट्युशन त्यांचे पुस्तक लिखाण हे सगळे सांभाळून भगवदगीतेचा अभ्यास चालू होता त्यांचा. पण हे सगळे असले तरी अभ्यास झाल्यावर काका सिनेमा,नाटक ,गाणी या पैकी कशावरही गप्पा मारीत .

    बारावीनंतर बी.एस्सी.ला मी काकांच्या कॉलेजमध्येच ऍडमिशन घेतली. माझ्या अडनावावरुन आणि तोंडावळ्य़ावरुन मी सरांची पुतणी आहे हे सगळ्या कॉलेजला माहित झाले. पण काकांच्या नावाचा गैरफायदा घ्यावा असे मला कधीही वाटले नाही. अतिशय शांत असणाऱ्या काकांचा  असा धाक होता ! मी एस.वाय ला असताना माझ्या दादांचे अकस्मिक निधन झाले. त्यावेळी काका आणि काकुने मला दिलेला मानसिक आणि भावनिक आधार मी कधीच विसरू शकणार नाही. कॉलेजमधे फि भरायची नोटीस लागताच काका मला बोलावुन पैसे आहेत कि मी भरू असे विचारायचे. मागितल्यावर पैसे देणारे भेटतात पण मागण्याची लाजिरवाणी वेळ  येवु   न  देण्याची काळजी घेणारे काका. अर्थात सुदैवाने त्यांना पैसे भरायची वेळ नाही आली.पण अडचण आली तर आपले कोणी आहे ही मोठा आधार त्यावेळी काकांनी दिला. मी तेंव्हा सकाळी ट्युशन्स घेत असे, संध्याकाळीही एखादी असायची. पण सुट्टीत कराय़ला काही नसे, मग काका त्याच्या पुस्तकाच्या हस्तलिखिताचे काम मला देत आणि त्याचे पैसे दे्त. माझा स्वाभिमान न दुखावता केलेली हि मदत मी कशी विसरु शकेन?
        पुढे एम.एस्सी ला ऍडमिशन घेतल्यावरही वेगवेगळ्या टप्प्यात काकांची मदत असेच.माझ्या नॅशनल स्कॉलरशिपचा फॉर्म आमच्या डिपार्ट्मेंटकडून मला मिळाला नव्हता, त्यांच्याकडून तो गहाळ झाला सबब माझा फॉर्म न मिळाल्याने मला स्कॉलरशिप न मिळाण्याची अडचण उभी राहिली. संकटकाळी सुटाण्याचा एकच मार्ग मला ठाऊक होता तो म्हणजे काका. त्यांना सगळे सांगितले त्यांनी त्यांच्या सगळ्या व्यापातुन चौकशा करुन मला कुलगुरुंना भेटायला सांगितले,माझ्यासाठी त्यांनी विद्यापिठाच्या कुलगुरूंकडे रदबदली केली आणि चुटकीसरशी माझे काम झाले.

        एम.एस्सी झाल्यावर मला लगेच नोकरी लागली आणि मी मार्गी लगले. काकांकडे अधुनमधुन चक्कर असेच.त्यांच्या मुलीही आता मोठ्या झालेल्या होत्या, मोठी मेडीकलला होती धाकटी  बी.एस्सी करत होती. मुली फारच  हुशार पण काका काकुंसारख्याच अतिशय साध्या आणि निगर्वी. काकाच्या तोंडून मी मुलींची फारशी स्तुती कधी ऐकली नाही. काका काकुंनी मुलींना रागावलेल ही मी कधी बघितल नाही.  काकांच्या मुली लाडक्या होत्या, कशा ते एकाच उदाहरणातुन लक्षात येईल.एका रविवारी मी काकांकडे गेले तर काका एकटेच घरी क्रिकेट्ची मॅच बघत बसले होते. मुली आणि काकू कुठे विचारल्यावर ते म्हणाले, "आज नेहरु स्टेडीयमवर मॅच आहे ना? मुलींना एकदा live match बघायची होती मग त्या तिघींना तिकिटे काढून दिली. गेल्यात तिकडे. "
" मग तुम्ही का नाही गेलात ?"
" घरी बघता येतेच ना? मग कशाला जाय़च म्हणून बसलोय घरी बघत, तुला नसेल बघायची मॅच तर टि.व्ही. बंद कर आपण गप्पा मारू "
 त्यावेळीही  मॅचचे तिकिट बरेच असेल , मुलींच्या हौशीसाठी काकांनी त्यांना पाठवले स्वतः मात्र घरात बघत होते.

        माझ्या लग्नाचे देवक त्यांनीच बसविले. पुढे सासरी गेल्यावर मी घर,नोकरी आणि संसार यात पार बुडून गेले. घरापासून दूर ऑफिस नवीन नोकरी आणि नवा संसार सगळ्याशी जुळवून घेण्यात मला काकांकडे जायला जमेना .फोन ही नव्हता तेंव्हा आंम्हा कुणाकडेच. कधी लग्नाकार्यात काकांशी गाठ पडत असे. भेटल्यावर ते घर,संसार यातले काही न विचारता विचारीत ,"नवीन काय वाचलस?" सुरुवातीच्या काळात खरोखरीच पुस्तक वाचनाचा मला छंद आहे या गोष्टीचा मला विसर पडावा अशी परिस्थिती होती.काकांच्या प्रश्णाने मी खजील होई. नवीन पुस्तकच काय़ रोजचा पेपर वाचणे मला जमत नव्हते.
" अहो ती आता संसारी झालीय,नोकरी आणि घर सांभाळून पुस्तके कशी वाचेल?" कुणीतरी माझी बाजू सावरुन घेत.
" बरोबर आहे, घरकाम आणि नोकरी म्हणजे तारेवरची कसरत आहे खरी पण बघ त्यातुन वेळ काढत जा"
        मग हळूहळू मी खरचच लायब्ररी लावली पुस्तके वाचायला वेळ काढू लागले. काकांनी वेळोवेळी मला विचारले नसते तर मी वाचनाच्या अपूर्व आनंदाला नक्कीच मुकले असते. काकांच्या मोठी लेक डॉक्टर झाली, पुढे लग्न होवुन ठाण्याला गेली. धाकटीच्या लग्नाच्या वेळी काका निवृत्त झाले होते, तरीही कॉलेजच्या सोसायाटीचे अजीव सभासद असल्याने ते काम करीत होते. मी त्यांना माझ्या घरी केळवणाला येण्य़ाचा आग्रहच नाही तर हट्ट्च केला आणि ते सगळे माझ्या घरी जेवायला आले.माझ्या हातचे ते त्यांचे पहिलेच जेवण होते. त्यामुळे मी केलेल्या प्रत्येक पदार्थाचे त्यांनी इतके कौतुक केले कि त्या कौतुकानेच माझे पोट भरले. (माझ्या नवऱ्याला तर असे कुणाचे कौतुक करायची आणि बघायची सवय नसल्याने सगळे जरा अतीच होतय असं वाटल असेल) निघतानाही ते म्हणाले, " शुभा ,तुझा अभ्यास मी बघितला होता पण तू इतका सुरेख स्वयंपाक करत असशील याची मला कल्पना नव्हती .."

            माझ्या नवऱ्याला नाशिकला झालेल्या जिवघेण्या अपघाताची बातमी समजल्यावर काका फार कासाविस झाले, ते सतत फोनवर माझी चौकशी करत.त्यांची डॉक्टर मुलगी सतत माझ्या संपर्कात होतीच, पुढे पुण्यात त्यांना आणल्यावरही ते रोज हॉस्पीट्ल मधे भेटायला येत आणि मला धीर देत.त्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळेच मी त्या प्रसंगातुन सुखरुप बाहेर पडले.
           
            काकांना सहा भावंडे त्यातल्या एका भावाची मी मुलगी , माझ्या इतकेच बाकीच्या सगळ्या भाच्या पुतण्यांशी त्यांचे असेच सलोख्याचे संबध आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते असेच उपयोगी पडतात, प्रत्येकाच्या आनंदाच्या प्रसंगी आवर्जुन उपस्थित राहतात. त्यांचे स्वतःचे बाळपण वडील लवकर वारल्याने फार त्रासात गेले. देवाने अलौकिक बुध्दी दिली होती पण त्यावर शाळेखेरीज कुठले संस्कार नव्हते. पुढे पुण्यात आल्यावर माझ्या दादांकडून वाचनाचा वारसा मिळाला आणि त्यातून त्यांनी स्वतःचा विकास स्वतःच केला. घरातील सततच्या अडचणींवर शांत चित्ताने मात करीत आपल्या करीयरचा ग्राफ चढताच ठेवला. एम.एस्सी झाल्यावर त्यांना रिझर्व बॅंकेतील नोकरीचे नेमणुक पत्र मिळाले होते पण प्राध्यापक होण्याचा  निश्चय त्यांनी इंटर सायन्सलाच केला होता. त्यासाठी त्यावेळी सहज मिळालेला इंजिनियंरीगचा प्रवेश त्यांनी नाकारला असल्याने, त्यांनी एस.पी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी घेतली आणि नंतर माझ्या वडीलांबरोबर त्यांनी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या. त्यात धाकट्या भावाचे शिक्षण, दोन्ही बहिणींच्या लग्नाची कर्जे फेडणे अशा अनेक बाबी. त्यावेळी अमेरीकेत जावुन प्राध्यापकाची नोकरी मिळविणे हि त्यांना सहज शक्य होते आणि तसे केले असते तर आज ते किती वैभवात राहिले असते. पण घरच्या जबाबदाऱ्या टाकुन आणि आपल्या लोकांना सोडून ते गेले नाहीत.तिकडे राहूनही त्यांनी इकडे पैसे पाठवले असते पण त्यांच्या असण्याचा पुढे आम्हाला जो सतत फायदा झाला तो होवु शकला नसता. त्यांना झालेल्या या त्रासाचा  ते कधीही उल्लेख करत नाहीत. आम्हा प्रत्येक भावंडाला दहावी पास झाल्यावर काका बक्षिस देत. एकदा सहज बोलता बोलता त्यांनी सांगितले, " मी बी.एस.स्सी.ला विद्यापिठात पहिल्या क्रमांकाने पास झालो, मला सुवर्णपदक मिळाले. आमचे सगळे काका,मामा त्यावेळी सुस्थितीत होते पण मला कुणीही एक रुपयाही बक्षिस म्हणून दिला नाही. मी नोकरीला लागल्यावर ठरविले मी माझ्या भाच्यांना,पुतण्यांना महत्त्वाच्या परीक्षा पास झाल्यावर बक्षिस देईन. " परिस्थितीने काही माणसे कडवट होतात तर काही अशी. आम्हाला बक्षिस देणारे काका होते पण आमच्या पैकी कोणीच पुतणे,भाचे त्यांच्याइतके उज्ज्वल यश नाही मिळवू शकलो. तरी आमच्या यशाचे त्यांनी नेहमीच कौतुक केले. आजुनही दरवर्षी ते त्यांच्या दोघी बहिणींना वर्षातून एकदा घरी बोलावून त्यांचे माहेरपण करतात. त्यावेळी त्यांना चहा देखील ते करु देत नाहीत. पत्नीच्या वियोगाचे दुःख गिळून आपल्या मुलींच्या अड्चणींना ते खंबीर पणे उभे राहतात. त्यांच्या आनंदात सहभागी होतात. ठाण्याला पंधरा दिवस आणि पुण्याला पंधरा दिवस आस त्यांनी त्यांच साधारण वेळापत्रक आखलय, पुण्यात त्यांच्या कॉलेजच्या सोसायटीचे काम आजही ते उत्साहाने बघतात नुकतीच त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. तेथेही  त्यांच्या वागण्यामुळे सोसायटीतील सगळ्य़ांचे ते लाडके सर आहेत.

            काकांनी खूप मोठा काळ बघितला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून नंतरच्या जवळजवळ ७० वर्षांच्या पदीर्घ काळाचे ते साक्षीदार आहेत. जग किती झपाट्याने बदलतय. पण काकांसारख बदलत्या जगाशी जुळवून घेणं क्वचितच कोणाला जमेल. त्यांच्या अमेरीकेतल्या मुलीकडे त्यांचे जाणे होत असते. तिकडे गेल्यावर इकडच्या लोकांशी संपर्कात राहण्याकरीता त्यांनी इ-मेल शिकून घेतले. माझ्या ब्लॉगची लिंक पाठवल्यावर तो वाचून त्यातल्या लेखांवर सुरेख अभिप्राय ही ते मेल वरुन पाठवतात. मेल वरुन ते सगळ्य़ांची खुशाली विचारतात. मोबाईल फोन हल्ली सगळेच वापरतात.पण ग्रुप बनवून सगळ्यांना मेसेजेस करणे त्यांनी कधीच सुरु केले.आता स्मार्ट फोन घेतल्यावर whatsapp च्या माध्यमातुन ते सगळ्यांशी connected असतात. त्यांच्या माजी विद्यार्थ्यांचा ग्रूप बनवून ते दररोज ग्रुप वरील बातम्या रस घेवुन वाचतात.  त्यामुळे आमच्या मुलांचेही ते लाडके आजोबा आहेत. माझ्या घरी आले की माझ्या मुलींच्या अभ्यासाची ते चौकशी करतातच पण त्यांच्याजवळ एखाद्या नवीन सिनेमाबद्दलही ते चर्चा करु शकतात. मुख्य म्हणजे मुली सांगत असले्ली प्रत्येक नव्या गोष्ट कमालीच्या औत्सुक्याने ते ऐकतात आणि जुन्या लोकांसारखे हल्लीच्या प्रत्येक गोष्टीला नावे ठेवुन आमच्या वेळी कसे छान होते असे न म्हटल्यामुळे मुले खुष असतात. माझ्या धाकट्या मुलीला बारावीत अपेक्षेपेक्षा कमी मार्कस मिळाले. तेंव्हा मला फोन करुन त्यांनी सांगितले, " शुभा, तिला रागावु नको हं, मुल वर्षभर अभ्यास करतात,  आजकाल जीवघेण्या स्पर्धा आहेत ,मुलांना खूप टेन्शन्स असतात. ऐनवेळी काही झाले असेल,कदाचित तिचे प्रयत्नही कमी पडले असतील पण या वयात मुलांना बोलल तर ते त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहत. ती हुशार मुलगी आहे, पुढे नक्की चांगले यश मिळवेल " हल्लीच्या मुलांना किती क्लासेस असतात, किती सुख सुविधा असतात आमच्या वेळी ... असही ते म्हणू शकले असते.

            अमेरिकेतुन आल्यावरही ते तिकडच्या संपन्न आणि सुखासिन आयुष्याचे सतत कौतुक आणि आपल्याकडच्या गोष्टींना नावे ठेवणे असे करत नाहीत कि तिकडेही आपल्या कडील कुटुंबवत्सलतेचे गोडवे गात नाहीत. ते मला म्हणतात, " मी गीतेचा अभ्यास करीत असताना लोक मला म्हणायचे तुम्हाला पुस्तक लिहायचे आहे का? तेंव्हा मी म्हणे मी त्यातील शिकवण अंगिकारण्याचा प्रयत्न करणार आहे. "

        काकांचा प्रयत्न  यशस्वी झालेला आहे असं मी नक्कीच म्हणू शकते. माझं पूर्वसुकॄत मोठ आहे म्हणूनच अशा दिलदार माणसाची पुतणी होण्याच भाग्य मला मिळाल.  काकांबद्दल मनात इतक काही आहे, पण मन भावनेने भरुन गेल कि शब्द सुचत नाहीत तसच माझ झालय. मनात आलेले असंख्य विचार मी शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. माझ्या भावना व्यक्त कराय़ला मी कवीवर्य बोरकरांचे शब्द उसने घेते जणू माझ्या काकांच्या बद्दलच त्यांनी हि कवीता लिहिली आहे

                             नाही पुण्याची मोजणी,  नाही पापाची टोचणी
                              जिणे गंगौघाचे पाणी ,जिणे गंगौघाचे पाणी...


Tuesday, January 12, 2016

मला वेड लागले.....

तंत्रज्ञानातील वाढत्या सुधारणांमुळे जग झपाट्याने बदलत आहे. "दहा दिशांचे तट कोसळले ध्रृव दोन्ही आले जवळी" हि कवीकल्पना अक्षरशः वास्तवात उतरली आहे.मोबाईल फोन ने जी क्रांती केलीय तिला तोड नाही. या फोनवरुन बोलणे हा फोनचा उपयोग विसरावा इतके त्यावरील विविध ऍप्स ने आपल्याला वेडे करुन सोडलय. ई-मेल,फेसबुक यांना केव्हाच रद्दीत टाकत whats app नामक जादुगाराने आपल्या जादुने साऱ्या समाजाला अक्षरशः वेड लावलय. अशाच माझ्या whats app वेडाची कथा

    मोबाईल वापरायला मी खूपच उशीरा सुरुवात केली होती.मला त्याची फारशी जरुर भासत नव्हती हे प्रमुख कारण, मुली पुरेशा मोठ्या झालेल्या होत्या,ऑफिस घरापासून जवळ होते ,घर आणि ऑफिस दोन्हीकडील लॅंड्लाईन फोन वरून लोकांच्या संपर्कात राहता येत असे.ऑफिसमधील बहुतेकांजवळ मोबाईल आले. ऑफिसमधील टेलीफोन ऑपरेटर आमच्या क्लाएंट्सचे फोन द्यायला कंटाळा करु लागले. मुली ,आई मोबाईल घे असा आग्रह करतच होत्या पण तो घेतला कि सांभाळण्याची ,तो बरोबर बाळगण्याची जबाबदारी येणार त्याचाच मला त्रास वाटत  होता. एकदा मुलीला घेउन  भाजी आणायला मंडईत गेले. तिथल्या भाजीवाली कडे मोबाईल बघितल्यावर मात्र ती वैतागली."आई, या भाजी वाली पेक्षा तुला जास्त पैसे मिळत असतील तरी तू मोबाईल घेत नाहीस?"
"नाही अगं कदाचित ती माझ्याहूनही जास्त कमवित असेल"
"पण तू जास्त शिकलेली तर आहेस,ऑफिसर आहेस आणि तरी अशी राहतेस ....."
दरम्यान मोठी मुलगी पुढील शिक्षणासाठी होस्टेलवर गेली आणि तिच्याशी वेळी अवेळी बोलण्याकरीता मोबाईल हवा असे वाटू लागले.
मग मोबाइल घेतला. पण तो माझ्यापेक्षा धाकटीच्या ताब्यात जास्त वेळ असे.माझ्या फोनच्या रिंगटॊन बदलणे,त्यात स्वतःच्या आवडीचे गाणी घालणे असे उद्योग ती कराय़ची. एकदा दुपारी साडेचार वाजता माझा फोन वाजला.एका अनोळखी मुलीचा आवाज होता.
"कोण बोलतयं?" मी विचारले
"काकू , मैत्रेयीला द्याना फोन, मी तिची मैत्रीण बोलतीय"
" मैत्रेयी घरी आहे, मी ऑफिसमधे आहे, तिला कसा देवू फोन"
" ठिक आहे, मी करते घरी फोन". म्हणजे या पठ़्ठीने खुशाल माझा नंबर मैत्रीणींना स्वतःचा म्हणून दिला होता !

    मला माझा फोन, माझा वाटून त्यातील सगळी फ़्ंक्शन्स समजावून घेई घेई पर्यंत स्मार्ट फोन्स बाजारात आले. त्याच्या ट्च स्क्रीन आणि विविध नवनव्या सोयींमुळे तरूण पिढीच्या तो हातात ने येता तरच नवल. माझी धाकटी लेक आता दहावी पास होउन कॉलेजला जायला लागली होती त्यामुळे तिला फोन घेवुन देणे क्रमप्राप्तच होते. तिने नव्या साध्या फोन पेक्षा वडीलांचा जुना टच स्क्रीन फोन वापरण्याचा समजुतदारपणा दाखविला. हा समजुतदारपणा पुढे आम्हाला खूपच महागात गेला कारण एक नवे खेळणे मिळाल्यासारखे अकरावीचे निम्मे वर्ष तिने त्या फोनशी खेळण्यात घालविले. ती बाहेर गेल्यावर तिला फोन करावा तर् तो कधीच लागत नसे वा ती कधी उशीर होणार असल्यास फोन करण्याची तसदी घेत नसे. फोन करायचा सोडून इतर सगळे उपयोग तिने केले. पुढे बारावीला तिने फोन वापरणे बंद करुन अभ्यासाला सुरुवात केली. दरम्यान तो फोन टाकण्याच्या लायकीचाच झाला होता ! तिला इंजिनियरींगला ऍडमिशन घेतल्यानंतर स्कुटर हवी का मोबाईल असे विचारताच तिने पुन्हा शहाण्यासारखा मोबाईल मागुन आमचे बरेच पैसे वाचविल्याचा मोठेपणा घेतला. दरम्यान whatsapp या नव्या जादुगाराचे आगमन झाल्याची गंधवार्ताही मला नव्हती. नवा फोन आल्यानंतर घरात वायफाय ही आले. लेकीकडे आणि तिच्या वडीलांकडेही स्मार्ट फोन होते. दोघांचा मुक्काम  रेंज जास्त असलेल्या खोलीतच असे. त्याच वेळी मोठी मुलगी उच्च शिक्षणाकरीता इंग्लंडला गेली.मग तिच्याशी संपर्क साधायला मोबाईल हेच माध्यम सोईचे वाटू लागले. घरच्या डेस्कटॉपवर स्काईप वरुन तिच्याशी बोलता येई पण तिकडच्या आणि इथल्या वेळेमधील साडेचार तासांच्या फरकामुळे शनिवार रविवार खेरीज बोलणे जमत नसे. तिलाही नवीन देश,नवीन मित्र मैत्रीणी आणि नवीन युनिव्हर्सिटीचे अप्रूप होते. प्रत्येक खरेदी केलेली वस्तू,प्रत्येक बनविलेला पदार्थ ,भेट दिलेले प्रत्येक ठिकाण याचे फटाफट फोटो काढून ते whatsapp वर टाकायचा तिने सपाटा लावला.मला तिची खुशाली आणि फोटो बघण्यासाठी छोटीच्या फोन म्हणजे पर्यायाने तिची मदत घ्यावी लागे. त्या करीता तिच्या फोनच्या अनिर्बंध वापराबद्दल गप्प बसणे मला भाग होते. माझ्यापुढे whatsapp साठी स्मार्ट फोन घ्यावा कि न घ्यावा असा नेहमीचा सवाल होता, कितीही नाही म्हटले तरी मध्यमवर्गीय मूल्ये सुटत नसतात. जुना फोन चांगला आहे, अजून त्याची काही तक्रार नाही (कशाला असेल तक्रार त्याचा वापरच मर्यादित ,फक्त फोन करणे आणि तो घेणे.घरात रेंज नसल्याने घरात तो बिचारा मुकाच असे.फोटो काढणे ,मेसेज करणे असे उद्योग मी कधी केले नाहीत, त्याचा रंग, स्क्रिन इतकेच नाही तर कि-पॅड हि छान होते. ) आणि वस्तुचा सुध्दा आपल्याला लळा लागतो त्यामुळे स्मार्ट फोन घेण्याचा विचार मी पुढे ढकलत होते.

    अखेर शेवटी नवऱ्याने अचानक स्मार्ट फोन भेट देवुन माझी बोलती बंद केली, आणि लवकरच ती करण्यामागची भूमिकाही समजली. झालं होत असं कि मोठी लेक परदेशात आणि घरी हे दोघे सतत मोबाईल मधे डोके घालून, माझ्याशी बोलाय़ला घरात कोणीच नाही. सतत त्यांच्या मोबाईल वरील मेसेज वाचन,forwarding  ने माझं डोके फिरुन जाई. घरी कोणाला बोलावले तरी आलेली व्यक्ती पण मोबाइलवरच नजर ठेवुन. आपापसात संवाद न होता त्यांचे मोबाईलवरील चॅटींग बघण्यातच वेळ जायचा. ऑफिसमधल्या मैत्रीणींकडेही स्मार्ट फोन आलेले होते,whatsapp वरील मेसेजची चर्चा चालायची त्यात मी कुठेच नसे. आता माझ्याकडेही स्मार्ट फोन आला, ’ज्याचा केला कंटाळा ते आलं वानवळा’ अशी गत असली तरी तो शिकणे,सांभाळून ठेवणे आणि त्याचा वापर करणे गरजेचे होतेच. लेकीने न सांगताच शिकविण्याची जबाबदारी घेतली. whatsapp डाऊनलोड करुन दिले, देवनागरी कि-बोर्ड डाऊनलोड करुन दिला. मी देखील उत्साहाने काही नव्या गोष्टी करायला सुरुवात केली.शाळेतील आमचा मैत्रीणींचा ग्रूप हल्ली परत भेटू लागला होता, त्यांचा एक ग्रुप मी बनविला.मुलीला आश्च़र्याचा धक्काच होता. आपली आई स्वतःचे डोके वापरुन काही करु शकते यावर मुलींचा विश्वास बसणे जरा अवघडच असते. हळूहळू शाळेच्या मैत्रीणींचा एक ग्रूप, कॉलेजच्या मैत्रीणींचा वेगळा ग्रूप, चुलत भाऊ,बहिणींचा एक तर मामे-मावस बहीण भावांचा असे अनेक ग्रुप झाले. काही मी बनविले तर काहींमध्ये मला घेतले गेले. एकंदरीत माझे जबरदस्त नेटवर्क तयार झाले. सकाळच्या सुप्रभात मेसेज पासून सुरुवात होई रात्री पर्यंत प्रत्येक ग्रूपवरुन अनेक मेसेजचा ओघ सुरु होई. काही चांगले मेसेज मी इकडून तिकडे पाठवी.काही चांगल्या कविता,सुंदर चित्रे,सुविचार असे बरेच काही वाचायला मिळे. पण काही दिवसांतच माझ्या लक्षात आले कि बरेच मेसेजेस वेगवेगळ्या ग्रुप वरुन पुन्हा पुन्हा फिरत. तेच तेच विनोद, त्याच त्याच कविता , त्यावरील ठराविक प्रतिक्रीया !

    हल्ली शहरातील धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात मनात असूनही एकमेकांच्या घरी जाणे खरोखरीच शक्य होत नाही , सोशल नेट्वर्कच्या या नविन माध्यमाने आपण एकमेकांच्या संपर्कात राहू अशा विश्वासाने मी अनेक ग्रूप्सची सभासद झाले होते.पण संपर्कात राहणं साध्य झाल अस म्ह्णायला जीभ कचरते. एकमेकांची खुशाली समजत होती असही नाही. निरर्थक,वायफट बडबड (बडबड नाही म्हणता येणार कारण ते चॅटींग म्हणजे टायपिंगच असे) भरपूर चाले. एखादी मैत्रीण परदेशात जाऊन आली की तिचे फोटो बघून मजा यायची पण एखाद्या मैत्रीणीच्या आजारपणाची बातमी कशी समजणार? तिला बरे वाटल्यावर तिने काही लिहिले तरच कळणार. एखाद्याच्या घरातील मृत्यू्ची बातमी अशीच कुणकडून मेसेजच्या स्वरुपात समजे मग तिथेच सगळ्य़ांनी RIP लिहायचे( हि RIP ची भानगड समजायला मला थोडा वेळच लागला Rest in peace) पुण्यातल्या बहिणीला जावई आलाय हे अमेरीकेच्या बहिणीकडून समजले तेंव्हा मला या नेटवर्कची महती खऱ्या अर्थाने समजली. मंगेश पाडगावकरांसारखा कवी गेला कि त्यांच्या कवितांची बरसात सुरु झाली पण त्यातली किंवा त्यांची एक तरी कविता संपूर्ण   पाठ असणारे किती जण त्यात होते? ज्यांच्याकडे त्या कविता आल्या त्यातल्या किती जणांनी त्या मनःपूर्वक वाचल्या ?

    पण आता मला एक नवाच साक्षात्कार झालाय असं वाटत, जगाचे एकूणच संसाराचे आसारपण समजण्याकरीता whatsapp सारखं साधन नाही. तिथल्या निरर्थक मेसेजेसची गर्दी, खोटया फसव्या शुभेच्छा, वेगवेगळ्या स्माइली, एकमेकांची फार काळजी असल्याचे दाखवणे हे सार खऱ्या जगापासून आपल्याला दूर ठेवत असतं. आपल्या संत महंताना आपल्या सामान्यांचं रोजच जगण बघुन असच वाटत असेल का? आपण सारे परमेश्वराची खरी भक्ती करायची सोडून ,आत्म्य़ाला काय हवय याचा विचार करायचा सोडून नश्वर देहाच्या सुखामागे धावण्यात अवघे आयुष्य व्यर्थ घालवत असतोच.  त्यात आता हि virtual reality. म्हणजे आपला विकास होतोय असं आपण म्हणतो ती खरच प्रगती आहे कि अधोगती? या आणि अशासारख्या अनंत विचारांनी माझ मन व्याकुळ होत.

    whatsapp हे एक व्यसनच आहे ज्याच्या अगदी आहारी नाही तरी बऱ्याच अंशी मी आधिन झालेली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मी निकराचा प्रयत्न चालू ठेवला आहे. whatsapp सॉफ्ट्वेअर फोन मधुन काढुन टाकणे हा एक सोपा मार्ग आहे. पण तो खरा मार्ग नाही, कारण जे नाही ते असावे या साठी मन फारच बंड करुन उठते.   हळूहळू ग्रूपवरील गोष्टी forward न करणे, त्यावार प्रतिक्रिया न देणे अशी सुरुवात केली आहे. माझ्या मोबाईल वर whatsapp असून ते मी वापरले नाही तर मी माझ्या मनावर खऱ्या अर्थी विजय मिळविला असे होईल.
    फार वर्षांपूर्वी ’लाखाची गोष्ट’ नावाचा सिनेमा बघितला होता. राजा परांजपे आणि राजा गोसावींचा गाजलेला चित्रपट. या दोन कफल्लक कलावंत तरुणांना श्रीमंत मुलीचा बाप तुम्हाला पैसे मिळवण्याचीच नाही तर खर्च करायची देखील अक्कल नाही असे म्हणून एक लाख रुपये महिनाभरात खर्च करायला सांगतो आणि पुढे ते पैसे कसे उधळायला लागतात पण त्यांना अधिकाधिक पैसे मिळतच जातात याचे खूप छान चित्रण आहे, पण त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते दोघे त्या महिनाभरात आपली कला विसरतात,सतत त्यांच्या डोक्यात पैशाचेच विचार.मग ते मुलीच्या वडीलांकडे जावुन म्हणतात," नको हा पैसा  आम्हाला आमच्या कलेपासून तो आम्हाला दूर नेतो" आणि तीच खरी लाख मोलाची गोष्ट होती. whatsapp च्या नादाने चांगली पुस्तके वाचणे, आवडत्या कवितांचे पुस्तक घेवून त्या पुन्हा पुन्हा वाचणे.मनातले विचार कुठेतरी लिहून व्यक्त करणे या सगळ्याचा मला विसर पडत चालला आहे. तेंव्हा whatsapp ला विसरणे हे लवकरात लवकर केलेच पाहिजे.  नव्या वर्षाचा हा संकल्प असेही मी म्हणणार नाही कारण बहुतेकसे संकल्प अल्पजीवी असतात.लवकरात लवकर माझा संकल्प सिध्दीस जावो हि इश्वरचरणी प्रार्थना.

Monday, March 16, 2015

अनायासेन मरणं

 एका सुखवस्तु लग्न सोहळ्यातला भोजन समारंभ चालू होता. टेबलांवर तरतऱ्हेच्या पदार्थांची रेलेचेल होती. दागदागीने आणि सुरेख पोषाखांची पण विविधता होतीच. मात्र मोजकी टेबले आणि थोड्या जास्त खुर्च्या असल्याने ताटा आधी बसायला जागा मिळवायचीच प्रत्येकाची धावपळ होती. शक्यतो आपल्या माणसांबरोबर जेवणाचा आस्वाद घ्यायची प्रत्येकाची इच्छा असूनही मिळालेल्या जागेवर बसून जेवण घेणे चालु होते.जेष्ठ नागरिकांना त्यांचे मुलगे,भाचे पुतणे,सून मुलगी कोणी ना कोणी ताट देत होते.

   एक आजोबा म्हणाले,’ जेवताना डॉक्टर पासून चार हात दूर बसाव’
    ’बरोबर आहे पण  डॉक्टर माझ्या घरात( किंवा मी डॉक्टरच्या घरात)  अशी माझी गत आहे " एक डॉक्टर मुलीचे वडील उद्गारले. तिने त्यांना आणून दिलेल्या ताटात वडे  नव्हते हे ओळखून त्यांच्या पुतण्याने हळूच काकांना वडा वाढला.
 पलीकडच्या कोपऱ्यात त्यांची डॉक्टर लेक बसली होती. तिच्या कानावर मी आजोबांचे वाक्य घातल्यावर ती हसली. तिचा डॉक्टर नवराही हसला आणि म्हणाला ,’खर आहे, माझी आई म्हणते हि सकाळी नसल्याने आम्ही  मजेत जेवतो’
    ’ खरच इतक काटेकोर राहायला हवच का? " मी डॉक्टरांना विचारले.
   त्यावर डॉक्टरांनी दिलेले उत्तर फार छान होते ,’ तरुणवयात जिभेवर ताबा ठेवलात तर तुमची अखेरची ५-१० वर्षे चांगली जातात.’

    डॉक्टरांचा अनुभव मोठा,त्यांचा अभ्यास दांडगा त्यामुळे त्यावर वाद घालायचे कारण नाहीच. पण त्यांच्या वाक्याने मला विचारात पाडले. आपला शेवट चांगला व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते. अंथरुणावर पडून राहणे ,परस्वाधिन जगणे हे अतिशय क्लेषकारी आ्हे. सुखकारक वार्धक्य असावे असे प्रत्येकालाच वाटते, पण  त्याकरीता फक्त संतुलित आहार हा एकमेव उपाय खचितच नाही.

  बालवाडीच्या वर्गात गेलं कि सगळी मुल एकसारखी वाटतात, गणवेषातील आपल मूल आईला देखील पटकन नाही ओळखता येत. कॉलेजच्या आवारात स्वैरपणे हिंड्णारी तरुणाई देखील खूप सारखी दिसते.मात्र जेष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर जा, त्यातला प्रत्येक वृध्द वेगळा असतो. अस का? कारण  प्रत्येक वृध्दाचा चेहरा जणू आयुष्यात त्याच्या वाट्याला आलेल्या सुखदुःखांचा आरसा असतो. परिस्थितीच्या ,नियतीच्या फटक्यानी त्याचा मेकप केलेला असतो !
   "माणसाच्या आयुष्यात येणारे बरे-वाईट प्रसंग देखील त्याच्या तब्येतीवर परीणाम करीत असतीलच ना?” मी डॉक्टरांना विचारले.
    " स्ट्रेस प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे,पण  व्यक्ती तो कसा फेस करते यावर ते अवलंबून असतं " डॉक्टर म्हणाले

   ते हि बरोबरच. पण सगळ्यांच्या वाट्याला सारखाच स्ट्रेस येत नाही. परीक्षेचा पेपर एकच असतो, प्रत्येक विद्यार्थ्याची बुध्दीमत्ता,तयारी वेगळी असते त्यामुळे कुणी पहिला येतो तर कुणी नापास होतो. पण पेपर तरी समान असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे प्रसंग वेगळेच  ’मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार’ अस माडगूळकर म्हणून गेलेलेच आहेत. लहान वयात आलेल पोरकेपण, दारीद्र्य, अवहेलना यातून जिद्दीने वर आलेल्यांना उतार वय बघायला मिळतेच असे नाही आणि मिळाले तरी काहीना काही आजार सोबतीला घेऊनच येते ते. अशातुनही ज्यांची तब्येत चांगली राहते त्यांनी त्यांच्या ताणतणावाचे व्यवस्थापन योग्य केले असे आपण म्हणू शकतो. पण मानवी जीवनातील विविधता आणि माणसांमधले वैचित्र्य बघावे तेंव्हा कुठलेही गणिती नियम सरसकट लावणे फार अवघड होते.

मागे एकदा अशाच एका समारंभात आम्ही शाळेतल्या सगळ्या मैत्रीणी जमलो होतो. आमच्यातल्या एकमेव डॉक्टर मैत्रीणीला जी -ती आपल्या बारीकसारीक तक्रारी सांगत होती .डॉक्टर बिचारी सगळ्यांना सल्ले देत होती.एवढ्यात आमची एका परदेशस्थ मैत्रीण, जी खूपच हेल्थ कॉन्शस,डायट कॉन्शस इ.इ.आहे तिने विचारले,’ अगं ते अमूक डॉक्टर परवा सूर्यनमस्कार घालताना गेले,वय फक्त ५०, हे कसं?"
मैत्रीणीने हृदय विकाराबद्दल सांगितले, मग कुणी पंचेचाळीशीचा निर्व्यसानी ,नियमित व्यायाम करणारा माणूस कसा तडकाफडकी गेला याच वर्णन केल. कुणी असाच एक  ट्रेकिंग करणारा तरुण झटक्यात गेला हे सांगितल.
डॉक्टर मैत्रीणीनेही तिच्या माहितीतल्या अशा अजून केसेस सांगितल्या.
"यावरुन असं अनुमान निघतं कि भरपूर व्यायाम करुन फिट राहणारे तरुण वयात फट्कन जातात " मी म्हणाले.
 आमची परदेशी मैत्रीण कडाडलीच ," असं काय बोलतेस? फीट्नेस साठी exercise must आहेच"
 " आहे ना पण सुखेनैव मरणासाठीही तो तितकाच जरुर आहे असं वरील चर्चेवरुन दिसतयं" मी
" पण हे काय वय आहे त्यांच जाण्याच?"
 " म्हणजेच व्यायामाचा दीर्घायुष्याशी संबंध नाही पण मरताना फिट राहण्याशी असावा "
 "तसा कशाचाच कशाशी संबंध नाही "
 " ए जाऊद्या ग , कशाला या अशा आनंदाच्या प्रसंगी असल्या मरणाच्या गोष्टी करताय, चला जेवु या मस्तपैकी " एकीने शहाण्यासारखा विषय संपवला

विषय संपला तरी विचार संपत नसतात, त्याचे चक्र चालूच राहते डोक्यात कुठेतरी. 'याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा ’ अस तुकाराम महाराज म्हणाले आहेत, ते व्यायाम आणि योग्य आहाराबाबत धराव असा विचार केला तरी  कित्येक परस्पर विरोधी उदाहरणे माझ्या अवतीभवती बघितलेली आहेत. रोज् किमान १०० सूर्य् नमस्कार घालणारे, साठाव्या वर्षी ६० वेळा पर्वती चढणारे, मनाने आणि देहाने कणखर असे माझ्या मावशीचे यजमान मोतिबिंदुच्या ऑपरेशन नंतर् दृष्टी गमावून बसले आणि नंतर् तीन चार वर्षे अंथरुणाला खिळून गेले. याउलट् माझ्या सासुबाई. लहान वयापासून दमा होता त्यांना. पन्नाशीनंतर् डायबेटीस,बी.पी असे आजार देहामधे वस्तीला आले. व्यायामाचा त्यांना अतोनात कंटाळा. पथ्य पाळायला डॉक्टर सांगत पण "माझं आता काय राहिलय? मला भात सोडणं जमणार नाही, दही ताकाशिवाय जेवण होणे नाही " असं सरळ म्हणत. वर्षातून एकदोनदा अगदी ऍडमिट् करण्यापर्यंत वेळ येई. दोनचार दिवस दवाखान्यात मुक्काम् करुन बऱ्या होऊन आल्या कि उत्साहाने कामाला लागत. हिंडून फिरुन तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करुन स्वतः खात सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालत. पथ्य पाणी न केल्यास आणि श्वसनाचे व्यायाम न केल्यास त्यांचे यापुढचे ऍटॅक अजून गंभीर असतील असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. मात्र वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांना अगदी झोपेत शांत मरण आले.  सिगरेट, तंबाखू, गुटखा पान आदींच्या व्यसनाने घसा,तोंड,फुफुस्साचा कॅन्सर होतो असं सतत वाचतो, पण कित्येक चेन स्मोकर्स, पट्टीचे तंबाखू खाणारे मजेत जगताना दिसतात, तर माटे सरांसारख्या निर्व्यसनी लेखकाला, कित्येक बायकांना घशाचे कॅन्सर झालेले दिसतात. मधुमेह, रक्तदाबासारखे आजार अनुवंशिक असतात. त्यांना आपण काही करु शकत नाही, वडिलोपार्जित इस्टेटीसारखेच ते मिळतात, शिवाय त्यासाठी कुठलीही यातायात करावी लागत नाही.या आजारांवर एवढं संशोधन झालय, चाललय तरी या आजाऱ्यांबद्दलही सरसकट विधाने करता येत नाहित. माझ्या वडीलांना मधुमेह होता. डॉक्टरांच्या सल्यानुसार ते भरपूर व्यायम करायचे, गोड खायचे नाहित.तरीही डायबेटीसने त्यांच्या डोळ्य़ांवर,किडनीवर परीणाम झाला, ३०-३५ वर्षांपूर्वी डायलिसिस सारख्या सुविधा सहज नव्हत्या. वयाच्या ५२व्या वर्षी ते वारले. आईला त्यानंतर मधुमेह झाला.तो स्ट्रेसमुळे असे डॉक्टरांचे मत होते. आईने कधी व्यायाम केला नाही, फारशी पथ्ये पाळली नाहीत, तरीही डायबेटीसने डोळे,किडनी ,हृदय आदी कुठल्याही अवयवांवर परीणाम न होता ती पुढे ३० वर्षे जगली. मी डॉक्टर नसल्याने दोघांच्या डायबेटीसमधे काय फरक होता ते मला कळत नाही पण आईलाही ताण होतेच. याचा अर्थ पथ्य पाळू नयेत,औषधे घेवु नयेत असे नाही पण शेवटी ’इश्वर करनी को कौन टाल सकता है?’ अस आहे अस मानायच का?

आजार होवु नयेत म्हणून काळजी घेणे,झाले तर योग्य उपाय योजना करणे,वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करुन घेणे हे तर आपल्या हातात असते ते आपण करतो.हल्ली टि.व्ही, इंटरनेट्च्या माध्यमातुन सर्वसामान्यांना बरीच वैद्यकीय माहिती सहज उपलब्ध होते. वृत्तपत्रांमधुनही ’फॅमिली डॉक्टर’,’आजीबाईचा बटवा’ वगैरे सदरातुन बरीच माहिती सतत कानावर पडते. कधी कधी या माहितीचाही अतिरेक होतो. वाचलेल्या प्रत्येक आजाराची लक्षणे आपल्यात दिसतात कि काय अशी भिती वाटू लागते. कोणी म्हणतात खोबरे आणि खोबरेलतेल अजिबात खाउ नये त्याने कोलेस्टेरॉल वाढते. तर नवीन संशोधन, हे धादांत खोटे असून रोज खोबरेल तेल खाल्ल्यास मेंदू तल्लख राहतो असे सांगते. तेल,तूप अजिबात खाऊ नये असे ऍलोपॅथीचे मत तर गायीचे तूप आहारात जरुर ठेवा असा आयुर्वेदाचा आग्रह. कधी इंटरनेट्वर येते रोज किमान ३-४ लिटर पाणी प्या, तर कुणी सांगत पाणी गरजेपेक्षा जास्त बिल्कुल पिऊ नये. या मतमतांच्या गलबल्यात आपली केवढी पंचाईत होते!  काही व्हायला लागल तर कुणाची तरी आज्ञा आपण नक्कीच पाळलेली नसते, त्यामुळे आपल्या आजाराला आपणच जबाबदार असतो. महागडी औषध, किमती तपासण्या करुन सुध्दा पूर्ण बरे होण्याची शाश्वती नसते.हॉस्पीटल्स भरलेलीच असतात. हॉटेल्स इतकीच औषधांची दुकाने,कन्सटींग रुम्स, हॉस्पीटल्स गर्दीने ओसंडत असतात. वाढत्या संशोधनामुळे आयुर्मान वाढत चाललय अस एकीकडे दिसतानाच हृदयविकार,कॅन्सर अशा आजारांनी किंवा अपघातात तरूणांचे बळी जाताना आढळतात.

 धर्मराजाने यक्षाला दिलेले उत्तर आठवते."जगातील सगळ्य़ात मोठे आश्चर्य कोणते?" या यक्षाच्या प्रश्णाला युधिष्ठिराने उत्तर दिले होते ," जन्माला येणारा प्रत्येक जीव मरणार आहे हे माहित असुन सुध्दा आपण अमर आहोत अशा थाटात प्रत्येक व्यक्ती जगत असते. हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे.
मरणाचे स्मरण असावे असे संत सांगतात. ते ठेवायचे तर व्यायाम,डाएट या कटकटी कशाला केंव्हातरी जायचच तर चांगल खाऊन पिवुन घ्याव असा विचार कारणाऱ्यांच तरी काय चुकल? डॉक्टर म्हणतात तशी शेवटची वर्षे चांगली जाण्यासाठी एवढा आटापिटा कराय़चा पण शेवट कधी ते माहित नाही , व्यायाम,डाएट  करुनही  शेवट चांगला होईल याची खात्री बाळगली तरी तो केंव्हा होईल याची शाश्वती नाही. कॅन्सर सारखा आजार होण्याची कारणे माहित नाहित, तो होवु नये म्हणून घ्यायची लस उपलब्ध नाही. स्वाईन फ्लू, डेंग्यु सारख्या साथी आल्या कि धडधाकट माणसेही जाताना दिसतात, एकूण शेवट कधी ,कसा होईल त्याबद्द्ल इतकी अनभिज्ञता असताना जिभेवर सतत लगाम घालणे, व्यायामासाठी वेळ काढणे याचा देखील मनावर ताण येतोच. मन शांत,प्रसन्न ठेवा अस मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात ते वेगळच.

    त्यापेक्षा आमच्या आधीच्या पिढ्या सुखीच म्हणायच्या. आरोग्य विषयक माहितीचा विस्फोट नसल्याने परवडेल ते खायचे, जमेल तेवढे व्यायाम करायचे,शारीरिक श्रम असतच बऱ्याच जणांना. सणावारीच गोडधोड जेवायचे, बाहेरचे खाणे शक्यतो टाळायचे.मग ठराविक वयानंतर तब्येतीच्या कुरबुरी सुरु होत, त्याला वयच जबाबदार असं मानून त्याचा निमूट स्विकार करायचा.औषधपाणी घ्यायचे जमेल तेवढे पथ्य पाळायचे आणि अगदी जास्त झाले कि घरचे लोक डॉक्टरांआधी सगळ्या जवळच्या नातलगांना बोलावुन घेत. सगळ्यांशी भेटी घेतल्या कि पिकली पाने गळून जात. त्यावेळीही लोक अकाली जात. प्लेग,इन्फ्लुएंझा,देवी अशा साथींमध्ये घरेच्या घरे, वाड्या वस्त्या उजाड होत. बाळंतपणात बायका मरत. टि.बी सारखे आजारही मरणाला कारणीभूत होते. याशिवाय कुणी अचानक दगावला तर  त्याच्यावर मुठ मारली,करणी केली,दृष्ट लागली अशी आपल्या हातात उपाय नसलेली कारणे घडल्याचे समजत त्यामुळॆ मागे राहणाऱ्यांना त्यांच्या जाण्यामागचे कार्यकारण भाव शोधावे लागत नसत. सरासरी आयुर्मान कमी असल्यामुळे अल्झायमर,पर्किन्सन्स ,डिमेन्शिया अशा वृध्दांमधे सध्या दिसणाऱ्या आजारांच प्रमाण कमी होत.

यामध्ये विज्ञानाने केलीली प्रगती,वैद्यकीय संशोधन याला काहीच किंमत नाही अस मला मुळीचच म्हणायच नाही. १०० वर्षांपूर्वी बाळंतपणात दगावणाऱ्या बायका,देवी,प्लेग सारख्या आजारांनी घेतलेले बळी,पोलिओसारख्या आजारांनी लुळीपांगळी झालेली आयुष्ये. आज ऐकले तरी काटा येतो अंगावर. या सगळ्यातुन मानवजातीला मुक्त करणारे वैद्यकीय संशोधक देवतुल्यच आहेत.  वाढते आयुर्मान हि त्याचीच देणगी असली तरी त्यामुळे आरोग्य वाढलय असं म्हणताना जीभ अडखळते. शहरांमध्ये वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्य़ा अयोग्य सवयी, धकाधकीचे जीवन हे अनारोग्याला कारणीभूत आहे. खेडेगावात प्रदूषण मुक्त निसर्ग आहे,पण अज्ञान,दारिद्र्य यामुळे पसरणाऱ्या रोगराईशी सामना करायला वैद्यकीय सेवेचा अभाव असल्याने तेथेही अनारोग्य आहे.

एकंदरीत काय आपले सर्व जीवन निरोगी रहावे यासाठी योग्य आहार,भरपूर व्यायाम करा पण भगवदगीतेत म्हटल्याप्रमाणे फळाची अपेक्षा न धरता सगळ करा. कारण शेवटी तुम्हाला कशामुळे कधी काय होईल ते कुणीच सांगू शकणार नाही. विज्ञानाची कितीही कास धरली तरी या अशा काही प्रश्णांना उत्तरे मिळणे अवघड असते.

मरण म्हणजे देहाचा पिंजरा तोडून आत्म्याची मुक्ती असं असेल तर त्या पिंजऱ्याची डागडुजी करण्यात आणि तो बिघडेल म्हणून उगाच काळजी तरी कशाला ? शिवाय या आत्म्याला कुठल्याही शस्त्राने इजा होत नाही वा अग्नीने चटका बसत नाही असंही गीता सांगते. मग कशानेच काही न होणाऱ्या या आत्म्याला देहातून कधीही सुटका करुन घेता यायला हवी आणि तरीही तो त्या पिंजऱ्यात राहतो हेच आश्चर्य आहे, "मरणं प्रकृति: शरिरीणाम्” मरण हि शरीराची प्रकृती म्हणजे नैसर्गिक घटना आहे, जीवन हिच विकृती आहे असही वचन आहे.
       कुणा न माहित सजा किती ते
       कोठुन आलो ते नच स्मरते
       सुटकेलाही मन घाबरते
       जो आला तो रमला.  माडगूळकरांच्या या ओळी किती सार्थ आहेत !
म्हणून शेवटी आपल्या हातात नसलेल्या गोष्टींकरता व्यर्थ धडपड करण्यापेक्षा ज्या विधात्याच्या कृ्पेने आपल्याला हे जग दिसत आहे त्याच्याजवळ एवढीच प्रार्थना कराविशी वाटते

अनायासेन मरणं विनादैन्यं च जीवनम्
एतच्च देहि मे देव ,तव भक्तिं निरन्तरम्


Friday, November 7, 2014

अजब तुझे सरकार

         अकबर बादशहा आणि बिरबलच्या कथा अबालवृध्दांमध्ये लोकप्रिय आहेत, शिवाय त्या आजच्या काळातल्या प्रसंगाना लागु होणाऱ्या आहेत. अशीच एक कथा.
एकदा विरबलाचा दुःस्वास करणाऱ्या लोकांनी बादशहाचे कान भरले. त्यांनी अकबराला सांगितले.बिरबल हा अतिशय भ्रष्ट आहे. तो पैशाची अफरातफर करतो, प्रत्येक कामात स्वतःचा खिसा कसा भरेल यावर त्याची नजर असते इ.इ. बादशहा्ला संताप आला.बिरबल आणि असं वागतो? त्याने दोन दिवस विचार केला.  चतुर बिरबलाच्या नजरेतुन बादशहाच्या वागणुकितला फरक सुट्णे शक्य नव्हते. त्याने त्याचा कार्यकारण भाव शोधुनही ठेवला होता.पण आपण होवुन बादशहाला काही विचारायचे नाही असे त्याचे धोरण होते. बादशहाने बऱ्याच विचारांती बिरबलला बोलावले आणि सांगितले," उद्यापासून तू दरबारातील कुठलेच काम करायचे नाहीस. सकाळी उठून नदीवर जायचे दिवसभर तेथेच बसायचे"
"जशी आज्ञा ,सरकार" बिरबल उत्तरला.
बादशहा मनाशी म्हणाला ," आता बिरबल कसे पैसे खाईल तेच बघतो" त्याने त्याचा एक गुप्तहेर बिरबलावर नजर ठेवायला पाठविण्याचीही खबरदारी घेतली.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबल  नदीकाठावर जावुन बसला. लोक बिरबलाकडे नवलाने बघत होते तो शांतपणे पाण्याकडे पहात होता
हळूहळू नावाडी येवु लागले, पलिकडे जाण्याकरीता लोक येवु लागले.नावाडी आपल्या नावा सोडू लागले तसे बिरबल ओरडला ,"थांबा. कुणीही नावा पाण्यात सोडायच्या नाहित. "
"का? "
"तशी सरकारची आज्ञा आहे"
"पण मग आम्ही पलिकडे जायचे कसे?" लोकांनी एकच गलका केला
"आमचा धंदा कसा चालणार?" नावाडी विचारु लागले
"पण नावा न जावु द्यायच कारण काय?, हि आज्ञा कशासाठी?"
"संथ पाण्यातील लाटा मोजायच काम चालू आहे, नावा सोडल्या कि लाटा नीट मोजता येत नाहीत... बिरबलाने पाण्याकडे पहातच उत्तर दिले."
"किती वेळ चालेल हे काम?"
"न संपणार काम आहे हे? किती वेळ कसं सांगता येईल?"
"मग आंम्ही कराव तरी काय?"
"ते मी काय सांगु, चला बाजुला व्हा ,मला माझ काम करु द्या"
लोकांनी जरा वेळ वाट पाहिली, आपापसात विचारविनिमय केला. आणि त्यातल्या एकाने अक्कलहुशारीने एक तोडगा काढला
बिरबलाजवळ जावुन तो म्हणाला
"हे बघा,बिरबलसाहेब मला जरा फार महत्वाचं सामान पलिकडे पोचवायचयं, तुम्ही परवानगी द्या आणि हे जवळ असुद्या, एक नाव गेली तर लाटांवर जास्त परीणाम होणार नाही"
बिरबलाने त्याच्याकडे पाहिले त्याने हळूच दहा नाणी बिरबलाच्या हातात सरकवली .सराईतासारखी ती आपल्या अंगरख्यात टाकून त्याला परवानगी देवुन बिरबल नदीकडे बघू लागला.
एक होडी गेली. बाकिच्यांनीही त्याचीच युक्ती वापरली आणि थोड्या थोड्या वेळाने एक एक करीत सगळ्या नावा निघुन गेल्या आणि बिरबलाचा खिसा नाण्यांनी भरुन गेला.
बादशहाचा माणूस चकित नजरेने हे सगळे पहात होता. त्याने संध्याकाळी राजाला सगळा वृत्तांत सांगितला. राजा अवाक झाला.

त्याने बिरबलालाच स्पष्ट जाब विचारायचे ठरवले आणि दुसऱ्या दिवशी खाजगी मुलाखतीस हजर व्हायला सांगितले. बिरबल सकाळी बादशहाकडे गेला
बादशहाने त्याला आधी त्याच्याबद्दल काय समजले म्हणून त्याला सजा म्हणून नदीतीरी जाण्यास सांगितले वगैरे सगळे सांगितले आणि तो म्हणाला
"नदी किनाऱ्यावर नुसते बसायला सांगितले तरी तू त्यातुन पैसे काढलेस? इतक्या खालच्या पातळीवर तू कसा गेलास? "
"खाविंद, माझ्याविरुध्द कुणीतरी  तुमचे कान भरलेत हेच मला तुम्हाला दाखवुन द्यायच होतं, मुळात मी पैसे खाणाराच असतो तर आज माझ्या नाहीतर माझ्या बायकामुलांच्या नावावर मी आजवर अमाप दौलत जमा केली असती.माझं घर तुम्ही बघताच आहात. मला हे सिध्द करायच होतं कि पैसे खाणारा माणुस त्याला कुठेही ठेवलत तरी ते मिळवायचे मार्ग शोधतो. तेंव्हा त्याच्या कामाच्या जागा बदलणं हा त्यावर उपाय नव्हे. ती वृत्ती कमी कशी करता येईल ते बघितल पाहिजे. हे कालच्या दिवसात मिळालेले पैसे , सरकारजमा करा. तसेच ज्यांनी ते दिलेत त्यांनाही समज द्या कारण पैसे खाण्याइतकाच खाय़ला घालण हा गुन्हा आहे हे रयतेला समजल पाहिजे."
बादशहाला अर्थात स्वतःची चूक समजली.त्याने परत बिरबलाला प्रधानपदी बसवलं.

       हि कथा आत्ता आठवायच कारण ,सध्या आलेलं नव सरकार. भ्रष्टाचार मुक्त भारत बनवणं इतक सोप आहे? मुळात लोकांच्या मनात वर्षानुवर्षे मुरलेल्या सवयी सहजासहजी जातील? सरकारी कामांच्या,ते कारण्याच्याही काही पध्दती आहेत. मा.पंतप्रधान स्वतः 'task master ' आहेत. मी हेडमास्टर नाही, टास्कमास्टर आहे असं ते शिक्षकदिनी संवाद साधताना म्हणाले. ते आहेतच तसे. पण गेल्या सहा दशकात सरकारी खात्यांमधे कामापेक्षा काम करण्याचा दिखावा करायची जी सवय लागलीय ती मोडण गरजेचं आहे. हि सवय घालवण हे या टास्क मास्टरला मोठं टास्क ठरणार आहे !

आक्टोबरमधे महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधुन मा.पंतप्रधानजींनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले.अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. कुठल्याही कामाची सुरुवात घरापासून करायची या तत्त्वानुसार सर्व सरकारी कार्यालयांमधे ’स्वच्छ भारत अभियान’ चे फतवे गेले. झाले, सर्क्युलर आले कि मिटींगा सुरु झाल्या, चर्चा झाल्या,बैठका झाल्या.’स्वच्छ भारत कमिट्या’ तयार झाल्या. त्यांनी जोरदार कामाला सुरुवात केली. आधी भरपूर बजेट सॅंक्शन करुन घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या बजेट मधुन पोस्टर्स,बॅनर्स बनविली. स्वच्छ भारत बनविण्याच्या शपथपत्रांच्या शेकडो प्रती काढल्या. त्या कर्मचाऱ्यांना वाटल्या.शपथ घेवुन झाल्यावर त्या कागदावर त्यांच्या सह्या घेवुन त्याची फाईल बनविली.
प्रत्येकाला ’स्वच्छ भारत’  असे लिहिलेले बॅचेस दिले.बॅचेस लावुन ,प्रतिज्ञा म्हणून,पोस्टर्स,बॅनर्स लावुन लोकांनी उरलेल्या वेळात जमेल तेवढी स्वच्छता केली त्याचे असंख्य फोटो आणि व्हिडीओ बनवले. ते दुसऱ्या दिवशी फेसबुक आदी सोशल साईट्स वर झळकले. यात बॅनर्स, पोस्टर्स,बॅचेसचा जो कचरा तयार झाला त्याची आवश्यकता होती का?

सरकारी कार्यालयातला शिपाई,सफाईवाला देखील किमान दहावीपर्यंत गेलेला असतो. त्याच्याकडे टि.व्ही आहे,मोबाईल आहे.’स्वच्छ अभियानाबद्दल’ सगळ्यांना सगळे माहित आहेच तर  मग बॅनर्स,  पोस्टर्स,बॅचेसचा खर्च आणि पसारा का? आपला देश स्वच्छ असावा असं आपल्याला मनापासून वाटतं, कधीकधी ऑफिसमधेसुध्दा असलेला कचरा पटकन झाडून साफ करावा असं कित्येकांच्या मनात येतही असेल,पण आपल्या पोस्ट्ला,पोझिशन ला ते काम करणे शोभणार नाही,काहीजण आपली चेष्टा करतील अशी भीड बरेचदा वाटते.मा.पंतप्रधानांनीच स्वतः हातात झाडू घेतलाय म्हणल्यावर मनातील अशी जळमटे झटकुन फक्त सफाई करणे जमायला काय हरकत होती? पण नाही, सरकारी खात्यांमधे प्रत्येक गोष्टीचा असा बोजवाराच करायची वर्षानुवर्षाची हि सवय लागलीय ती कशी जाणार?  प्रत्येक कृती करताना त्यातुन मला काय मिळणार? माझ्या सी.आर.मधे काय लिहिले जाइल? माझ्या कामाने माझा बॉस खुष कसा होईल आणि मला प्रमोशन कसे मिळेल या अट्टहासापायी सगळ्या गोष्टी कागदावर आणण्याची सवय लागते. कामाचा मूळ उद्देश्य बाजुला राहतो त्याचा उपयोग आपल्या वैयक्तिक विकासाची शिडी म्हणून कसा करता येईल एवढच बघितल जातं. आणि म्हणूनच या आणि अशा अनेक चांगल्या योजनांच निव्वळ हसं होत. हि सुरुवात मंत्री महोदयांपासून होते. कालच टि.व्ही.वर दिल्लीमधील ’स्वच्छता अभियान’ अंतर्गत एका कार्यक्रमाला गेलेल्या सत्ताधारी राजकीय पक्षातील एका जेष्ठ व्यक्तिबद्द्ल दाखवित होते. ती व्यक्ती ’स्वच्छता अभियान’ ला जाणार म्हणून एका स्वच्छ जागेवर आधी कचरा पसरला आणि नंतर त्यांनी तो झाडला त्याचे फोटो काढून सोशल मिडीयावर टाकले. पण त्या आधी कचरा टाकणाऱ्यांचे फोटो कुण्या पेपरवाल्याने टिपले आणि मग काय मिडीयाच्या हाती कोलितच मिळाले. सगळा वेळ तिच चर्चा! त्यावर त्या जेष्ठ व्यक्तिची सारवासारव . एका अतिशय चांगल्या सर्वसामान्यालाही पटणाऱ्या, जमणाऱ्या आणि जगात आपल्या देशाची प्रतिमा चांगली बनवली जाणाऱ्या उपक्रमाची वाताहात आपलेच निवडून दिलेले नेते कशी करतात याच हे बोलक उदाहरण.

यात त्यांची तरी चूक कशी म्हणावी? ’स्वच्छता अभियान’ अंतर्गत मा.पंतप्रधानांनी झाडू घेवुन स्वच्छता कशाला करायला सांगायची? जगात इतके स्वच्छ सुंदर देश आहेत त्यांचे दौरे करायला पाठवायला हव होतं.त्यानिमित्ताने युरोप,अमेरीका,चीन,जपान,सिंगापूर,मलेशिया अशा नानाविध स्वच्छ सुंदर देशांची पहाणी करायला हे मंत्रीमहोदय, सरकारी आधिकारी गेले असते. पहाणी केली असती, रीपोर्ट लिहिले असते. सुधारणा सुचविल्या असत्या. देश नाही तरी देशाचा खजिना थोडाफार स्वच्छ झाला असता. ते सोडून खुशाल त्यांना सफाई कराय़ला लावली.ज्यांनी घरात कधी पाण्य़ाचा ग्लास हातानी घेतला नाही त्यांच्या हातात चक्क झाडू, फारच झाल हे? यासाठी केला होता का अट्टहास?

जे ’स्वच्छ भारत अभियानाचे’ तसेच एकता अभियानाचे. सरकारी कार्यालयात आधीच कामाला वेळ पुरत नाही आणि आता तर काय दर महिन्याला नव्या शपथा. स्वच्छ भारत घेवुन झाली. मग दक्षता सप्ताह सुरु झाला , त्यात भ्रष्टाचार करणार नाही अशी शपथ घेवुन झाली.मग सरदार पटेलांची जयंती एकता दिन घेवुन आली, कि घेतली एकतेची प्रतिज्ञा. इतक्या शपथा आणि प्रतिज्ञा घेऊन त्याचा उपयोग होणार आहे का? शपथा या केवळ एक उपचार ठरतो, त्याचा व्यवहारात उपयोग करायचा आहे ह्याचाच मुळी विसर पडतो.

इकडे जनतेने एकतेच्या शपथा घ्यायच्या, आणि पंचविस वर्ष युतीत राहिलेल्या राजकीय पक्षांनी सत्तेच्या हव्यासापोटी एकी तोडून राज्याचे भले करण्याऐवजी आपापसात भांडायचे या विरोधाभासाला काय म्हणायचे?

लोकांची मानसिकता बदलणे हे अशक्य नसले तरी अवघड काम जमले तरच ’अच्छे दिन ’ येतील न पेक्षा आहेत त्या दिवसांना ’अच्छे दिन’ समजायची तयारी आपण ठेवावी हे चांगले .

Monday, November 3, 2014

जन्माची गाठ

लहानपणी माझी आजी मला एक गोष्ट सांगत असे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात या संदर्भात ती गोष्ट होती.
रुपवती नावाची एक राजकन्या होती ,ती एकदा नदीवर स्नानाला निघाली. बरोबर नोकर चाकर ,दास-दासी असा लवाजमा होता. नदीच्या  तीरावर जरासे लांब एक ऋषी बसले होते, ते दर्भाच्या काड्या घेवुन पाण्यात टाकत होते. राजकन्येचे कुतूहल  जागॄत झाले. तिने आपल्या नोकराला सांगितले ," जा त्या ऋषींकडे आणि ते काय करताहेत हे विचारुन ये"
नोकर गेला आणि त्यांनी विचारले त्या मुनींना ," महाराज आमच्या राजकन्या विचारत आहेत तुम्ही काय़ करीत आहात?"
ऋषी दर्भाच्या दोन काड्या घेवुन त्याची गाठ मारत होते आणि ती पाण्यात सोडत होते. त्याच्या कडे न बघताच ते म्हणाले," मी जन्माच्या गाठी बांधतो आहे."
नोकराने राजकन्येला जावुन ऋषी काय करताहेत ते सांगितले.
राजकन्येला फारच मजा वाटली. ती म्हणाली," जा त्यांना विचार माझी गाठ कुणाशी आहे?"
नोकर पुन्हा ऋषीजवळ गेला आणि म्ह्णाला ," महाराज, आमच्या राजकन्या विचारत आहेत त्यांची जन्माची गाठ कुणाशी आहे?"
ऋषींनी एकवार त्याच्याकडे पाहिले, राजकन्येकडे पाहिले हातात दोन काड्या घेतल्या त्याची गाठ मारुन पाण्यात टाकली आणि म्हणाले, " तिला सांग तिची गाठ तुझ्याशीच आहे"

नोकर चाट पडला. थोडा घाबरला, राजकन्येला सांगाव तरी पंचाईत न सांगाव तरी पांचाईत. तो पाय ओढत ओढत तिच्या जवळ गेला. तिने उत्साहातच विचारले," मग काय म्हणाले मुनीवर? कुणाशी आहे माझी गाठ?, सांग लवकर"
नोकर मान खाली घालून म्हणाला ," ते म्हणाले... तुमची गाठ ...माझ्याशी आहे !"
राजकन्या संतापाने लाल बुंद झाली तिच्या तोंडातून शब्द फुटेना क्षणभर तिला आपण कुठून विचारले असंही झालं या यःकिंचित नोकराबरोबर मी जन्म काढायचा? त्या ऋषींना काही कळतय का नाही? आणि या मूर्खाला तरी काही अक्कल आहे का? खुशाल येवुन मला सांगतोय माझ्याशीच तुझी गाठ आहे ..
राजकन्येच्या हातात स्नानासाठी आणलेली चांदिची लोटी होती. संताप अनावर झाल्याने तिने ती नोकराच्या अंगावर फेकून मारली आणि म्हणाली, " चालता हो माझ्या राज्यातून,तोंड दाखवू नको मला, लायकी आहे का तुझी माझ्याबरोबर जन्म काढायची?"

नोकर बिचारा.., लोटी कपाळाला लागून त्याला खोक पडली.भळभळत्या जखमेने आणि तेवढ्याच जखमी मनाने तो वाट फुटेल तसा चालायला लागला.
बराच भटकला. लहान मोठी कामे करत शिकत गेला, अशीच काही वर्षे गेली.
भटकत भटकत तो एका राज्यात आला . त्या राज्याचा राजा वारला होता .राजा निपुत्रिक होता.राज्यावर कुणाला बसवायचे असा प्रश्ण होता. मग मंत्र्यांनी एक युक्ति काढली.राजाच्या आवडत्या हत्तीच्या सोंडेत माळ दिली आणि दवंडी पिटवुन सगळ्या प्रजाजनांना एका पटांगणात बोलावले. हत्तीला तेथे सोडले, हत्ती ज्याच्या गळ्य़ात माळ घालेल त्याला गादीवर बसवायचे असे ठरले.
     हा नोकर तेथे आलेला होता.गर्दीत उभा राहून तो मजा बघत होता, अचानक हत्ती त्याच्या जवळ आला आणि त्याच्याच गळ्यात माळ घातली ! आणि योगायोगाने तो त्या राज्याचा राजा झाला. चंद्रसेन या नावाने राज्यकारभार बघु लागला.
   
    इकडे राजकन्या  रुपवती उपवर झाली.राजाने तिच्या स्वयंवराची तयारी केली. आजुबाजुच्या राज्यांच्या राजपुत्रांना, सरदारांना आमंत्रणे धाडली. चंद्र्सेनालाही आमंत्रण आले होते. ठरल्या दिवशी राजाच्या राज्यात स्वयंवरासाठी सगळे जमले.  रुपवती वरमाला घेवुन आली. एकेका राजपुत्रांना बघत त्यांच्याबद्दलची माहिती ऐकत ती पुढे आली , सगळ्य़ांमधे तिला चंद्रसेन आवडला.तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. राजाने थाटामाटात विवाह करुन दिला. रुपवती चंद्र्सेनाची राणी बनुन त्याच्या राज्यात आली.

    लग्नाच्या पहिल्या रात्री चंद्रसेनाच्या कपाळावरील जखमेची खूण बघुन ती म्हणाली," हे काय, कधी लागल तुम्हाला? कसली हि खूण?"
त्यावर चंद्रसेन हसत म्हणाला ," तूच फेकून मारलेल्या लोटीच्या जखमेची हि खूण आहे .."
एवढं सांगून आजी म्हणत असे ," अशा लग्नाच्या गाठी बांधलेल्या असतात. तुमची ज्याच्याशी गाठ आहे, तो तुम्हाला शोधत येतो किंवा तुम्ही त्याला शोधत जाता. योग्य वेळ तेवढी यावी लागते."
   
     गोष्टी  ऐकण्याच्या (पुढे वाचण्याच्या) छंदामुळे सहसा फारशा गोष्टी न सांगणाऱ्या आजीकडून हि गोष्ट मी लहानपणी खूप वेळा ऐकली.त्यावेळी मी तिच्यावर फारसा विचार केला नव्हता. माझ्या स्वतःच्या लग्नाच्यावेळी मला या कथेचा विसर पडला होता. आम्हा बहुतेक सगळ्या बहिणी-भावांची लग्ने चहापोहे कार्यक्रमातुनच ठरली.मुलींना निवडीला फारसा वाव द्यायची पध्दत नव्हती. मुलाकडून होकार आला कि जुजबी चौकशा करुन लग्ने पार पाडली आणि बहुतेक सगळी निभावली देखील.
   
    आता आमच्या पुढच्या पिढ्या लग्नाच्या वयाच्या झाल्या आणि मला अचानक आजीच्या गोष्टीचा आठव आला. आजकाल पन्नास-साठ टक्के लग्ने मुले स्वतःच ठरवित असतील.तरी अजूनही ठरवुन लग्ने होतात.पूर्वीचा चहा-पोहे कार्यक्रम नसेल, नेट वरुन माहिती मिळते  किंवा मॉडर्न विवाह संस्था, विविध मॅट्रिमोनी डॉट कॉम आहेत. लग्ने अशा पध्दतीने ठरताना निकष कसे लावले जातात हे बघताना रुपमतीची आठवण झाली. नोकर असताना ज्याला तिने मारले तोच राजा झाल्यावर तिला आवडला. आजकालच्या मुली सुध्दा मुलगा बघताना त्याचे पॅकेज बघतात. त्या स्वतः लाखोंनी मिळवत असतात. समानतेच्या युगातही मुलाचा पगार स्वतःपेक्षा जास्त हवा असतो आणि त्याचे वर्चस्व मात्र नको असते.मुलाचा स्वतःचे घर हवे,गाडी हवी ह्या तर मूलभूत अटी आहेत.
    रुपमतीच्या वेळी स्वयंवर होत, हल्ली मुलींची संख्या कमी झाल्यामुळे जवळजवळ पुन्हा तशीच परिस्थिती आली आहे. मुलींना खूप चॉईस आहे.अगदी जेमतेम पदवी मिळवलेली मुलगी पण इंजिनियरच मुलगा हवा शक्यतो आय.टी.मधलाच हवा.किमान लाखभर पगार महिन्याला कमावणारा हवा अशा अपेक्षा सांगतात.मग उच्चशिक्षित मुलींबद्दल तर काय बोलावे?
    माझं सासरच घर दक्षिण कर्नाटाकात अगदी लहानशा खेड्यात आहे. अत्यंत निसर्गसंपन्न,प्रदूषण विरहित शांत,सुंदर असा तो प्रदेश आहे.पण आता घराघरातली तरुण मुले शिक्षण झालं कि बंगलोर,पुणे ,हैद्राबाद गाठतात.तिथल्या उपनगरात भाड्याच्या घरात राहतात.तासंनतास प्रवास करुन नोकऱ्या करतात. मी एकदा तिकडे गेले त्यावेळी म्हणाले," आपली वास्तू, शेती जतन करण्यासाठी मुलांनी इथे राहिले पाहिजे"
त्यावर एक बाई अगतिकतेने म्हणाली," आम्हाला आमची मुलं जवळ राहिली तर आनंदच आहे पण करणार काय? इथे राहिलं तर त्यांची लग्न होत नाहीत. शहरातल्या मुलींना तर खेड्यात आवडतच नाही पण इथल्या मुलींनाही शहरातच जायला आवडतं, त्यांना शहरात नोकरी करणारा मुलगा हवा आसतो ,मग काय नाइलाजानं आमची मुल जातात शहरात"

    आजीच्या गोष्टीतला लग्नगाठी बांधणारा ऋषी हल्ली कंटाळलेला दिसतो, त्याने बांधलेल्या गाठी पक्क्या नसतात, कारण इतकी चिकित्सा करुनही झालेली लग्ने टिकतीलच याची खात्री नसते. लग्न करुन दिल , मुलगी सासरी गेली की आपली जबाबदारी संपली. दिल्या घरी ती राहणारच. आपण ती सुखीच आहे असे मानायचे हे दिवसही गेले. एकमेकांशी नाही पटले कि वेगळे होणेही सध्या सर्रास झालयं. लग्नानंतर पहिल्या चारपाच वर्षात विभक्त झालेली जोडपीच बघायला मिळतात असे नाही तर आमच्या पिढीतीलही वीस-पंचवीस वर्षाहून एकत्र राहिलेल्यांना अचानक आपलं पटत नसल्याचा साक्षात्कार होवुन ते विभक्त झाल्याची बरीच उदाहरणे मी बघत आहे. अर्थात अचानक असं म्हणण ही तितकस बरोबर नाही. कारण अचानक दिसून येतात ते विभक्त झालेत असे परीणाम,कारणे हळूहळू घडलेलीच असतील. पण अस वेगळ होण्य़ाचा निर्णय घ्यायला सध्याचं वातावरण,परिस्थिती कारणीभूत असणार. नाहीतर आमच्या आधीच्या पिढ्यांमधे सुध्दा काय सगळे प्रेमातच चालल होतं असं थोडीच आहे? वर्षनुवर्ष मन मारुन कित्येकांनी संसार केले. म्हणजे त्यावेळी ऋषींच्या गाठी तेवढ्या पक्क्या होत्या कि कुणाची बिशादच नव्हती एकदा बांधलेली गाठ सोडायची !.

    रुपवतीला तरी वर निवडायचा आधिकार होता. नंतरच्या कित्येक पिढ्यांनी आंतरपाटापलिकडील व्यक्तिला तो दूर झाल्यावर पहिल्यांदा पाहिले आणि नंतरचा सारा जन्म त्याच्याबरोबर घालवला. मुलीचा नवरा गेला तर तिने त्याचे नाव उरलेला जन्मभर लावले आणि एकाकी आयुष्य काढले. बायको वारली तर पुरुषाने पुन्हा दुसरीबरोबर तसाच संसार केला. लग्नापूर्वी एकमेकाशी अजिबात ओळख नसलेल्या नवरा -बायकोंच्या स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक असे,  रागीट नवऱ्याला शांत स्वभावाची बायको, उधळ्या माणासाला काटकसरी बाय़को आणि रसिक कवीमनाच्या माणसाला अरसिक बायको अशा अनेक जोड्या आपल्या आजुबाजुला बघितलेल्या आहेत.तरी त्यांचे प्रपंच सुखाचे झाले कदाचित परस्परांच्या विरुध्द स्वभावांमुळेच त्यांच्या संसाराच्या नौका पलीकडच्या तीराला लागत असतील. तडजोड कारण्याची,जमवुन घ्यायची सवय लहानपणापासून बरीच भावंडे असल्यामुळे, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ,एकत्र कुटुंब पध्दतीमुळे लागलेली असायची. लग्न झाल्यावरही बहुतेकांना किमान सासु-सासऱ्यांबरोबर रहावे लागत होते. संस्कारांमुळे म्हणा,समाजाच्या भितीने म्हणा नवराबायकोंनी आईबापांपासून वेगळॆ रहाणे हेच क्रांतीकारक मानले जात होते मग त्या दोघांनी पटत नाही म्हणून विभक्त होणे हि फार दूरची बाब होती.

    यात त्या पिढ्या किंवा आमच्या पिढ्या फार सुखात आणि गुण्यागोविंदाने नांदल्या असं म्हणण हि धाडसाच ठरेल. ते फारस खरही नाही पण आताही विभक्त होण्यामुळे ते सुखी होतात का? हा प्रश्ण आहेच. अगदी एखाद्या मुलीचा सासरी छळ होत असेल, एखाद्याची फसवणुक झाली असेल तर तो त्रास सहन न करता वेळीच विभक्त होणं केंव्हाही श्रेयस्कर. पण बारीक सारीक कारणांसाठी, स्वतःच्या अहंकारापोटी भांडणारी आणि घटस्फोट घेणारी जोडपी पाहिली कि नवल वाटते.

आजीच्या गोष्टीतल्या रुपमती सारख्या निव्वळ बाह्यात्कारी प्रतिष्ठेवर भुलून जाणाऱ्या आजच्या मुलींसाठी ऋषीच्या जन्माच्या गाठी पुरेशा नाहीत असेच म्हणावे लागेल.