Thursday, April 25, 2013

शांतीब्रह्म आत्या

माझी धाकटी आत्या, भावंडात सगळ्यात लहान. ती दिड वर्षाची असतानाच तिचे वडील गेले.तिला समजत नव्हतेच काही पण आधी मुलगी त्यात वडील गेलेले मग तिचे कुठले लाड आणि कसले कौतुक! जरा मोठी झाली तशी ती आईच्या हाताखाली लहान मोठी कामे करु लागली.पाच मुलगे आणि दोन मुलींचा प्रपंच  आजी एकटी चालवत होती. बडा घर पोकळ वासा असल्याने आपले दैन्य कुणाला न दाखवता संसार चालला होता.मुलगे शिकत होते, त्यांनी घरकाम करण्याची त्यावेळची रीत नव्हती. मोठी मुलगी वांड होती , सहाजिकच आजीने या धाकट्या लेकीला हाताशी धरले. आत्या स्वभावाने आईवर गेली होती, रागावणे,चिडणे तिला माहित नव्हते. परिस्थितीची जाणीव अगदी लहान वयात आल्याने तिचे बालपण तिने संपवून टाकले. कधी कुणाजवळ हट्ट केला नाही, कुणाला कसला त्रास दिला नाही. शाळेच्य़ा अभ्यासात मात्र ती मागे पडली.मुलींनी फार शिकायचा तो काळ नसल्याने  त्याबद्दल कुणी तिच्या फार मागे लागले नाही.

    भोरमधल्याच माझ्या काकांच्या मित्राशी लग्न होवुन आत्या सासरी गेली. ’एकादशीच्या घरी शिवरात्र’ असं सासर तिला मिळालं होत. पण रुप,शिक्षण,पैसा सगळ्याची वजाबाकी असल्याने निवडीला वाव असा नव्हताच. आत्याच्या भावांनी मुलाजवळचे गुण बघीतले होते, स्वभावाने माणसे फार चांगली होती. आत्याला सासरी कष्ट पडणार होते पण सासुरवास होणार नव्हता. आत्या सासरी सुखात होती.  तिच्या घराच्या अंधाऱ्या नागमोडी जिन्यातुन नुसते चढताना आमची दमछाक व्हायची तशा जिन्यावरुन ती खालून वापरायचे , प्यायचे सगळे पाणी भरायची. दहा -बारा माणसांचे एकत्र कुटुंब .कुठल्याच कामाला बाई नाही. आत्या सतत कामातच असे. तिचे दोन दिर मिलिटरीत गेले होते, त्यांच्या बायका आत्याच्या भोरच्या घरात असत. मोठ्या जावेची,आत्याची लहान मुले. आला गेला. आम्ही सुट्टीला भोरला गेलो कि आत्याकडे रोज चक्कर असायची. काहीतरी खाऊ हातावर ठेवल्याशिवाय ती आम्हाला परत जाऊ द्यायची नाही.मग एक दिवस खास आम्हा सगळ्या भाचरांना ती जेवायला बोलवायची. तिच्या घरचे सगळे आमच्या तैनातीला असायचे. आत्याचे सासरे त्यांना आम्ही दादा म्हणत असू , ते फार सुरेख रांगोळ्या काढायचे. आमच्या प्रत्येकीच्या पानाभोवती ते सुरेख रांगोळी काढीत. प्रत्येकीला गजरा, नाहितर चाफ्याचे किंवा मोगऱ्याचे फूल देत. आम्हाला आग्रह करकरुन जेवायला घालायचे काम आत्याचे यजमान बापूराव यांचे असे. तडस लागे तो आत्याच्या हातचे सुग्रास जेवण जेवले कि हातावर पाणी पडताच दादा आम्हाला स्वतः बनवलेला सुरेख विडा देत. चैत्रातल्या कुमारिका जेवल्या ना पोटभर? अशी प्रेमळ चौकशी कराय़चे. दुपारी बापूराव त्यांच्या खास शैलीत नवनव्या गोष्टी रंगवुन रंगवुन सांगायचे . त्यांच्या घरातल्या आदरातिथ्याने आणि कोडकौतुकाने आम्ही खुष होवुन जायचो. मुलांकडे फारसे खास लक्ष न पुरवण्याचा तो काळ होता. पानात काही टाकायचे नाही,जेवताना फार बोलायचे नाही अशी दमदाटी घरी असेच पण कुठेही गेले तरी मुले ही शिस्त आणि वळण लावण्यासाठीच आहेत अशा पक्क्या समजुतीने प्रत्येक जेष्ठ व्यक्ती आपला हक्क बजावित असे. अशा वेळी आत्याकडची आम्हाला मिळणारी ती शाही वागणूक माझ्या कायमची मनात राहिली आहे. आत्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे असे आम्हाला कधीच वाटले नाही , तिने कधी तसे जाणवुच दिले नाही. आम्हा सगळ्यांचा आर्थिक गट तसा फार काही उच्च नव्हताच तरी तिचा त्याहून कमी म्हणजे किती त्रास असेल ते आता समजते.

    आत्याचे यजमान रंग कारखान्यात कामाला होते, कारखान्यात संप, ले-ऑफ चालत. पाच सहा माणसांचा संसार आणि सततचा आला -गेला.मुलांची शिक्षणे. आत्याने कधी आपल्या भावांजवळ हात पसरले नाहीत कि रडगाणे गायले नाही. तिच्याजवळ शिक्षण नव्हते पण ती डबे करुन द्यायची, दुपारी मसाले बनवायची ते विकायची. दुध विकायची जमेल त्या मार्गाने तिने कष्ट करुन संसाराला हातभार लावला. तिची मुलेही कष्टाळू निघाली. मुली शिकल्या, चांगल्या घरी पडल्या. मुलगा-सून दोघे नोकरी व्यवसायाला लागली.बघता बघता दिवस पालटले. आत्या आणि बापूराव मुलाच्या संसारात नातवंडाचा सांभाळ करायला पुण्यात स्थाईक झाले.

    देवावर आणि गोंदवलेकर महाराजांवर आत्याची अपार श्रध्दा आहे. रामचे दर्शन घेतल्याशिवाय तिचा दिवस जात नाही.बारा-महिने तिचा नेम चुकत नाही. सकाळी देवदर्शन झाले कि ती दिवसभर घरकामात मग्न असते. जपाची माळ तिच्या जवळ असते. देवधर्माचं फारस अवडंबर न करता तिच्यापुरते नेम ती मनोभावे करीत असते. जमेल तेंव्हा गोंदवल्याला जावुन येते. माझ्या सगळ्या भाच्यांची काळजी घ्या असे महाराजांना सांगुन आले असे आम्हाला जावुन आल्यावर सांगते. आमच्या पैकी कुणच्याही घरात शुभकार्य असले कि ते निर्विघ्न पार पडावे म्हणून आत्या महाराजांना साकडे घालते. कुणी आजारी पडले कि त्याला रामाचा अंगारा आणून देते. तिला आता जे चांगले दिवस आलेत त्यामागे तिची ,बापूरावांची ,तिच्या मुलांची अपार मेहनत आहे. पण सगळ्याचे श्रेय ती रामाला आणि गोंदावलेकरमहाराजांना देते. आत्याच्या देवभोळेपणाची आम्ही क्वचित चेष्टाही करतो. आम्ही माहेरवाशणी तिला भेटायला गेलो कि निघताना नमस्कारासाठी वाकलो कि ती देवाला नमस्कार करायला लावते, गोंदवल्याचा अंगारा लावते, तिथला प्रसाद कायम तिच्या घरात असतो , तो देतेच.

    परवाच्या पेपरमधे बातमी वाचली, आत्याचे नाव आले होते, पहाटे देवदर्शनाला ती निघाली होती वाटेत चोरांनी तिला गाठले , आम्ही पोलीस आहोत असे सांगून या भागात फार चोऱ्या होतात तुम्ही अंगावर दागिने कसे घालता? असे बोलून तिच्या हातातील बांगड्या आणि पाटल्या काढुन घेतल्या अशी बातमी होती. वाचल्यावर मला फार वाईट वाटले. आत्याने आयुष्यभर इतके कष्ट केले, पै-पै जमवुन मिळवलेले असे एका क्षणात जावे? स्वप्नात सुध्दा तिने कुणाचे वाईट केले नाही तर तिला असा त्रास का? आता कुठे गेला तिचा देव आणि गोंदवलेकर महाराज? काय उपयोग झाला आयुष्यभर देवाचे केल्याचा? असे ना ना विचार मनात आले. त्या दिवशी आत्याला फोन करायचे धाडस झाले नाही.पण निदान फोनवर चौकशी करावी तिला धीर द्यावा म्हणून रामनवमीच्या दिवशी सकाळी फोन केला.

 आत्यानेच फोन घेतला. नेहमीच्या शांत आवाजात म्हणाली ,’बोल’
  ’ काल वाचले पेपरमधे,फार वाईट वाटल, असं कसं झालं ग?’
  ’ वाईट तर वाटतच ना, जन्मभर साठवून मिळवलेले एका मिनिटात घालवून बसले, चूक माझीच झाली, सतत बातम्या येतच होत्या , मी मंगळ्सूत्र काढून ठेवलच होतं गं , बांगड्यापण खोट्याच होत्या, पाटल्या तेवढ्या खऱ्या होत्या, बाकी माझ्याकडे तेवढच सोनं होतं , त्या ही घरी काढून ठेवायला हव्या होत्या.पण घट्ट होत्या सहज निघण्यासारख्या नव्हत्या म्हणून ठेवल्या होत्या हातात. तरी मी दोन वेळा त्या लोकांना म्हणाले मला माझ्या रस्त्याने जाउ द्या पण त्यांनी मला एका कारपार्कींग मधे नेलं दमदाटी केली मी घाबरुन गेले. आणखी एक मोठी चूक झाली’
’ती कोणती?’
’मी आरडा-ओरडा केला नाही , ओरडायची सवयच नाही ना गं?’
’पुढे काय झालं?’
’ ते दोघे माझ्या बांगड्या आणि पाटल्या घेवुन गेले मी पुढे आले , एक ओळखीचा मुलगा भेटला, त्याला सगळं सांगितल तो म्हणाला आजी पोलीस कंप्लेंट करायला हवी’
’मग त्यानेच घरी कळवले आम्ही पोलीस चौकीत गेलो, त्या दिवशी अशा तीन घटना घडल्या आमच्या भागात, पण तुला सांगते आपण पोलिसांबद्दल इतक ऐकतो मला तर चौकित जायची भिती वाटत होती पण पोलिस फार चांगले वागले. मी म्हटल देखील पोलिसांना,’ तुम्ही वेळोवेळी सांगुनही आम्ही नागरिक तुमचं ऐकत नाही , अंगावर सोन घालतो, त्यामुळॆ चोऱ्या होतात आता आमच्या चुकीमुळे तुम्हाला केवढा त्रास! ’
’आत्या , अगं पोलिसांना कसला त्रास?’
’असं काय म्हणतेस, इतक्या मोठ्या शहरात हे चोर कुठे पळाले ते शोधायला किती त्रास नाही का ?"
’मग काय म्हणाले पोलीस?"
" ते म्हणाले आजी आमचे ते कामच आहे, तुम्हाला मात्र याव लागेल चौकीत"

मला हसावं कि रडावं कळेना ,आपल्या नुकसाना पेक्षा पोलिसांना होणाऱ्या त्रासाने दुःखी होणाऱ्या या बाईला काय म्हणावे?
" ठेवु का फोन आज रामनवमी आहे ना, देवळात जायचयं , किर्तन आहे, जन्माचा सोहळा आहे "
"आत्या , इतकं होवुन देवळात जायचच आहे?"
"माझ्या चोरी मधे रामाचा काय दोष आहे ? चूक माझीच होती शिक्षा मला मिळणारच ,रामाचा दोष नाही कि महाराजांचाही नाही, त्यांच्या मनात असेल तर चोर मिळेल, माझ्या पाटल्या मिळतील आणि आता चोरण्यासारख काही राहिलेलंच नाही "

    शांतीब्रह्म आत्याचे पाय धरावे असे मला वाटले. शिक्षण नाही म्हणून तिला आम्ही अडाणी म्हणतो पण केवढं शहाणपणं तिच्याठायी आहे.तिची देवावरची श्रध्दा केवढी गहन आहे. आपल्या चुकीची, कर्माची जबाबदारी घेण्याचं मोठेपण तिच्याकडे आहे. त्यामुळेच कुणावर चिडण्याचा,रागावण्याचा प्रश्णच येत नाही. तिच्या भक्तीची जातकुळी ,आपल्याला काही मिळावे म्हणून देवाजवळ नवस बोलणाऱ्या, संकट आल्यावरच देवाकडे धाव घेणाऱ्या, आपल्या यशाची फुशारकी गाणाऱ्या व्यवहारी भक्तांसारखी नाही. गोंदावलेकर महाराजांच्या प्रवचनाचे प्रत्यक्ष आचरण करणाऱ्या माझ्या आत्याचं मोठेपण मला फार प्रकर्षानं जाणवलं. तिचे अंगभुत शहाणपण,अंतरिक समाधान कुठल्याही चोराला चोरता येणार नाही.

Friday, April 12, 2013

पुस्तक परीचय

 बदलत्या जीवनशैलीमुळे व्यस्त पण सुशिक्षित पालक ,संगणकाच्या युगातील स्मार्ट पिढी , शिक्षणाच्या नानाविध संधी असे असताना खरंतर मुलांविषयी फारशा समस्या असण्याचं कारण नाही. पण  परीक्षेतील अपयशाने आत्महत्या करणारी मुले, प्रेमभंग झाल्याने दुसऱ्याच्या व स्वत्ःच्या जीवावर उठणारी मुले, पैसे न दिल्यामुळे स्वतःच्या आजी वा आजोबांच्या जीव घेणारे युवक अशा सुन्न करणाऱ्या बातम्या वाचनात येतात, टि.व्हीवर दिसतात आणि मग या साऱ्याला कोण जबाबदार असा विचार मनात येतो.

 अतिरेकी लाड, अती संरक्षण, जीवघेण्या स्पर्धा अशी ना -ना कारणे जाणवू लागतात मात्र त्यावर उपाय दिसत नाही. या सगळ्या समस्यांचे निराकरण शास्त्रशुध्द , वैद्यकीय आधार असलेले पण अतिशय सोप्या शब्दात ’जावे भावनांच्या गावा’ या  डॉ.संदीप केळकर यांच्या पुस्तकात मिळते.

 मुले हळवी असतात वगैरे गोष्टी आपण जाणून असतो,   मुलांच्या शारीरिक तसेच बौध्दिक विकास करण्यासाठी आपली धडपड आपत्य जन्म क्वचित त्याआधी पासून चालू असते, मात्र मुलांच्या भावनिक विकासाकडे आपण तितकेसे लक्ष देत नाही.किंबहुना असे काही असते हेच बहुतांश पालकांना माहित नाही. लहानपणापासून भावनेच्या भरात काही करु नकोस, भावनेच्या आहारी जावुन निर्णय घेवु नये असे वाचले ,ऐकलेले असते. किरकोळ कारणाने रडणाऱ्यांना रडुबाई, पटकन चिडणाऱ्याला आग्या वेताळ अशी विशेषणे देण्याने "भावना" या विकासाच्या आड येणाऱ्या आहेत असे काहिसे मनाशी ठसलेले असते. बुध्दि आणि भावना या परस्पर विरोधी समजल्या गेल्या आहेत.आणि शालेय तसेच महाविद्यालयीन यश हे पेपरातील गुणांनी मोजत असल्याने बौध्दिक विकासास प्राधान्य दिले जाते.   हल्ली एक किंवा दोन मुले असल्याने त्यांचे लाड होतात. आई-वडील दोघे नोकरी करत असतील तर ते मुलांना वेळ देवु न शकल्याने त्यांचे अतिरेकी लाड होवु शकतात त्यातुनच हट्टी,एककल्ली दुराग्रही मुले बनतात असा सर्वसाधारण समज असतो
 ’जावे भावनांच्या गावा’ या पुस्तकातुन भावना या आपल्या शत्रू नसुन मित्र आहेत, आनंद,प्रेम ,समाधान यांच्य़ा इतक्याच दुःख, भिती,राग या भावना महत्त्वाच्या आहेत असा मोलाचा मंत्र आपल्याला मिळतो. भावनांमधे भरपूर माहिती साठवलेली असते, भावनिक मेंदू हा वैचारिक मेंदूच्या ८०,००० पट वेगाने काम करतो त्यामुळेच काहीवेळा अविचारी कृत्ये माणसाच्या हातुन घडतात.भावनिक व वैचारिक मेंदू या दोन्हीमध्ये सम्न्वय साधणे म्हणजे भावनिक प्रज्ञेचे संवर्धन होय.  लहानपणापासून अक्षर ओळखी बरोबरच मुलांना आपण या नानाविध भावनांबद्दल साक्षर केले तर त्यांचा भावनिक विकास होईल. बुध्दी आणि भावना यांचा योग्य वापर करुन आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करणे कसे शक्य आहे हे समजते. टीम वर्क , संभाषण कौशल्य, ऐकण्याची कला , आवेगांवर नियंत्रण या नोकरी वा व्यवसायात शैक्षणिक पात्रतेइतक्याच आवश्यक गोष्टी आहेत पण शालेय अथवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांचा समावेश नसतो. विभक्त कुटुंब पध्दती, मैदानी खेळांचा अभाव,टि.व्ही, संगणकांचा अतिरिक्त वापर यामुळे मुलांमध्ये त्यांचा अभाव आढळतो त्यातुन बऱ्याच समस्या उद्भवतात. हि कौशल्ये कशी वाढवावी याचे योग्य मार्गदर्शन पुस्तकात  मिळते.भावनिक कौशल्यांचा विकास हे तंत्र हि अधुनिक असून १९९० पासून अस्तित्वात आलेले आहे.भावनांबद्दलचे संशोधन पुष्कळ जुने असले तरी हे तंत्र अधुनिक आहे.

 पुस्तकात भावनांच्या भाषेची मशागत ,भावनिक सुजाण पालकत्व, टिन एजर्सच्या विश्वात, जग भावनांचं बुध्द्यांकापलीकडलं असे भाग आहेत .भावनिक बुध्दिमत्ता म्हणजे काय? भावनांक(emotional quotionent) म्हणजे काय तो कसा काढतात हे डॉक्टरांनी सोप्या शब्दात सांगितले आहे. त्यांच्या कडील पेंशंटची उदाहरणे देवुन अनेक मुलांच्या शारीरिक आजारांच्या मागे कुठली भावनिक कारणे होती हे वाचताना एक पालक म्हणून आपल्यालाही आपल्या मुलांच्या संदर्भात असे काही घडल्याचे जाणवत राहते. साध्या संवादातून किती समस्या सहज दूर होवु शकतात हे समजते  त्या करीता पालकांनाही भावनिक साक्षर व्हावे लागेल.  सुदैवाने भावनिक गुणवत्ता वयाच्या ४५ वर्षांपर्यंत वाढविता येते,त्यामुळे पालक ही या पुस्तकातुन स्वतःसाठी बरेच काही शिकु शकतात.

 विज्ञानाने प्रगती केली, समाज कितीही सुधारला तरी आपल्या मुलांची काळजी करणे हे कुठल्याच पिढीला चुकलेले नाही, काळजी करण्याऐवजी योग्य काळजी घ्या असे डॉ.संदीप केळकर सांगतात. त्यांचा या विषयातील अभ्यास किती सखोल आहे हे त्यांनी दिलेल्या अनेक संदर्भातुन जाणवते. ऑरिस्टॉट्ल, मार्टिन ल्युथर किंग,विवेकानंद यांसारख्या थोर व्यक्तिंची भावनांच्या बाबतीतील अवतरणे देवुन ते आपला विषय स्पष्ट करतात. पुस्तकाची भाषा ओघवती तर आहेच शिवाय आजकालच्या पिढीला समजणारी उदा. भावना या मेसेजस आहेत, पालकत्वाचा एक्प्रेस हायवे  या सारख्या उदाहरणांमधुन अवघड संकल्पना सोप्या पध्द्तीत समजावल्या आहेत. भावनांच्या भाषेची मशागत या भागात विविध भावनांची अक्षरओळख करुन देणारं घर हेच मुलांचं प्राथमिक शिक्षण केंद्र असल्याचं डॉक्टर सांगतात. त्यामुळे भावनांच हे प्राथमिक शिक्षण अधिकाधिक रंजक होण्याविषयी मार्गदर्शन हि करतात.’भावनिक सुजाण पालकत्व’ या भागात मुलांच्या भावना त्यांना योग्य रितीने व्यक्त करता याव्या, पालकांनी मुलांशी सुसंवाद कसा साधावा यावर भर दिलेला आहे.  पौगंडावस्थेतील मुलांचे भावनिक विश्व आणि त्यांच्या समस्यांना तोंड द्यावयास क्वचित हतबल ठरणारे पालक यांना खूप उपयुकत वाटेल असा ’टिन एजर्सच्या विश्वात’  हा विभाग आहे. मानवी मेंदूची रचना, वैचारिक आणि भावनिक मेंदुचे काम कसे चालते या विषयीची शास्त्रीय माहिती आकृत्यांद्वारे ’जग भावनांचं बुध्द्यांकापलीकडलं’ या भागात दिलेली आहे.

भावनिक बुध्दीमत्ता या विषयावरील हे पहिलेच मराठी पुस्तक वाचकांना एका नव्या विषयाची ओळख करुन देते. प्रत्येक मुलाने आपल्या भावनिक विकासाकरीता, प्रत्येक पालकाने त्याच्या व त्याच्या मुलांच्या करीता पुस्तक जरुर वाचावे आणि संग्रही ठेवावे.

स्मरणरंजन



गतकाळाच्या जंगलात परत परत जायचा मोह पडतो
कारण तिथे भेटत राहते हरवलेले  बालपण

निरागस लोभस
निर्व्याज प्रेम करणारी जिव्हाळ्याची माणसं
छोट्या छोट्या गोष्टींमधे मिळणारे मोठे आनंद

त्या शाळेतल्या गमती, देवासारख्या वाटणाऱ्या बाई
उन पावसागत क्षणात भांडणाऱ्या अन दुसऱ्या क्षणी
गळ्यात पडणाऱ्या जिवाभावाच्या मैत्रीणी !

सगळेच काही सोनेरी नसते भूत काळात
दुःख,अपमानांच्या वेदनांच्या जखमाही असतातच कि
पण त्यांची भळभळ थांबलेली असते,
दुःखाची धार बोथट झालेली असते

दैन्याच्या उन्हाचे चटके विझुन गेलेले असतात
त्यामुळे त्यांची लाही जाणवत नाही
उलट त्यातून तावुन सुलाखून बाहेर आल्याचं समाधानच वाटतं!

बरीच वाट चालून आलो असं वाटायला लागतं
पुढं दिसणारं प्रौढ वय वाकुल्या दाखवायला लागतं
म्हणुनच मग या आठवणींच्या राज्यातच मन रमत राहतं

Saturday, February 2, 2013

माणसांची पारख

      जम्मुला निघालेल्या ट्रेनने आम्ही दोघे प्रवास करीत होतो. हिमालयात ट्रेकींगकरीता निघालो होतो.युथ होस्टेलच्या डलहौसी कॅंपला जायचे होते. चार वर्षाच्या मुलीला आजीकडे ठेवुन मी प्रथमच निघाले होते. रोज नोकरीसाठी तिला घरी सोडून जाणे वेगळे आणि हे तीन आठवडे तिला सोडून रहाणे वेगळे. जाण्याआधी तिच्याशी बोलताना मी माझ्याच मनाची तयारी करीत असे.
"मी खूप दिवस जाणार आहे, तू राहशील ना? आजीला त्रास द्यायचा नाही, हट्ट करायचा नाही"
" हो गं, किती वेळा तेच ते सांगतेस, शहाण्यासरखं वागायचं, पसारा करायचा नाही, न सांगता कुठे जायचं नाही.... "तीच सुरु कराय़ची.
"तुला काय आणू येताना ?."
दर वेळी तिची यादी वेगळी असे, एकदा म्हणाली "तुझ्यासारख्या साड्या, ड्रेस आण"
मी विचारले ,"कशाला?"
"अगं तू खूऽऽप दिवसांनी येणार ना.. मग मी तुझ्याएवढी मोठ्ठी झालेली असेन ना ! "
नवरा म्हणाला ," बघ तिची तुला १५ वर्षे सोडून रहायची तयारी झालीय आणि तू उगाच रडत आहेस"

 मला तिला सोडून रहाण्याचे, पहिल्यांदाच हिमालयात ट्रेकिंगला जायचे टेन्शन होतेच. लग्नानंतर घर संसार, नोकरी यातून व्यायामाला वेळ मिळतच नव्हता. मुळात व्यायामाची फारशी गोडी नव्हतीच. त्यामुळे रोज १५-२० किमी चालणे जमेल का? हि काळजी होती. तसा सिंहगडला चारपाच वेळा जावुन सराव केला होता पण खात्री वाटत नव्हती.नवरा शिवछत्रपती पुरस्कार विजेता, खो-खो, १०० मी धावणे यात वाकबगार, महाराष्ट्रातले सगळॆ गड पालथे घातलेला, दर रविवारी नेमाने सिंहगड चढून येणारा असल्याने नेहमी पहिला नंबर मिळवणाऱ्या मुलाबरोबर एखाद्या काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्याला रहायची वेळ आली कि त्याचे जसे होईल तसे माझे झाले होते. मनात प्रचंड न्यूनगंड होता. प्रवासातही माझ्या मनात तेच विचार होते. पुणे जम्मू तसा बराच मोठा प्रवास. गाडी नेहमीप्रमाणे लेट् होती. ट्रेकिंगचे सामान प्रचंड असल्याने वाचायला काही घेतले नव्हते. आम्हाला पठाणकोटला उतरुन पुढे बसने डलहौसीला जायचे होते. आता दोन तीस तासावर पठाणकोट आहे असे सहप्रवाशांकडून समजले. प्रवास संपत आला कि कंटाळा आणखीच वाढू लागतो.

 दोन दिवस एकत्र प्रवास केल्याने आजुबाजुच्या लोकांशी थोड्या ओळखी झाल्या होत्या. आमच्या समोर एक मध्यमवयीन गृहस्थ होते. ते एकटेच प्रवास करीत होते.  ते पठाणकोटलाच उतरणार असे समजले. ते इंडीयन नेव्हीमध्ये काम करीत होते. बोलता बोलता माझ्या वर्गातील एक मुलगा १२वी नंतर नेव्हीत गेला असे मी सांगितले, त्यांनी त्याचे नाव विचारले मी नाव सांगितल्यावर ते गृहस्थ माझ्या वर्गातील मुलाला नुसते ओळखतच नव्हते तर, त्याचे मित्रच निघाले.  मग ते आमच्याशी खूपच आपुलकिने बोलू लागले. आम्हाला म्हणाले तुम्ही माझ्या घरी चला आज मुक्काम करा उद्या सकाळी मी तुम्हाला डलहौसीच्या बस मध्ये बसवून देईन  वगैरे..

      समोरच्या माणसावर माझा पटकन विश्वास बसतो. आपल्याला कुणी फसवेल असे माझ्या सहसा मनात येत नाही. उगाच कोणी कुणाशी वाईट वागत नाही.असे माझे म्हणणे. माझे वडील देखील नेहमी म्हणत "माणसं वाईट नसतात, परिस्थिती त्यांना तसं बनवते." त्यामुळे "तुला माणसांची पारख नाही" असे मला कायम घरच्यांकडून ऐकावे लागते.

  सदर गृहस्थाने आम्हाला घरी येण्याचा आग्रह केला त्यावेळी मात्र माझ्या डोळ्यापुढे रेल्वेत सहप्रवाशांनी खायला घालून बेशुध्द केले नंतर लुबाडले, अशा आशयाच्या वाचलेल्या अनेक बातम्या आल्या. हा माणूस नेव्हीत असेल कशावरून? तो आपल्याला घरी नेवुन काय करेल? अशा अनेक शंका-कुशंका मनात येवु लागल्या. रमेश(नवरा) आणि तो माणूस खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे बोलत होते, त्यांच्या सततच्या आग्रहामुळे घरी येण्याचे रमेशने कबूल केले, आम्ही राहणार मात्र नाही चहा घेवु,फ्रेश होवु मग डलहौसीला जाऊ असे ठरले.. त्यावेळी मोबाईल फोन फारसे आलेले नव्हते. रमेशना उतरल्यावर त्यांच्या ऑफिसमधे फोन करायचा होता,
’तुमच्या घरी फोन आहे का?’ रमेशने विचारले
’आम्ही नव्या घरी नुकतेच शिफ्ट् झाल्याने फोनचे कनेक्शन आलेले नाही, पण घराजवळच एस्.टी.डी बूथ आहे.’
माझ्याकडे बघत रमेश म्हणाले, "ही तुमच्या घरात थांबेल, मी येईन फोन करुन"
माझ्या मनात पुन्हा कसले कसले विचार सुरु झाले,त्या माणसासमोर मला बोलता येईना. या माणसाची आपली ओळख ना देख , खुशाल त्याच्याघरी मला बसवून हा माणूस फोन करायला जाणार , इकडे माझा गळा दाबून खून सुध्दा होवु शकतो. नुसत्या कल्पनेने बसल्या जागी माझ्या घशाला कोरड पडली. कुठून मला बुध्दी झाली आणि मी या अनोळख्याला माझ्या वर्गमित्राची (मित्र तो नव्हताच माझा कधी, केवळ माहित होते) ओळख दिली.. माझा नवरा तरी असा कसा त्या माणसाच्या प्रत्येक बोलण्याला माना डोलावतोय. काय करावे मला सुचेनासे झाले होते.
’घरी कोण कोण आहे तुमच्या ’ धाडस करुन मी विचारले
’ बायको आहे, दोन मुली आहेत मुलगा आहे पण तो शिकायला परगावी असतो...’
तरीपण मनात शंकाची जाळी होतीच. आधी कधी एकदा पठाणकोट येतयं, असं वाटणाऱ्या मला शक्य तितक्या उशीराच येवुदे पठाणकोट असं वाटायला लागलं होतं. रमेश आणि तो माणुस दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या.खिडकी बाहेर हिरवीगार गव्हाची शेते लांबवर पसरलेली दिसत होती. वातावरणात प्रच्ंड गारठा होता. गेल्या पन्नास वर्षात नव्हती एवढी थंडी त्या वर्षी होती. वातावरण खर तर खूप छान होतं पण  मी वेड्यावाकड्या विचारांच्या आवर्तात सापडले होते, डोळे मिटले तरी आजवर वाचलेल्या,ऐकलेल्या फसवाफसवीच्या बातम्या आठवत होत्या. डिसेंबर महिना होता,दिवस लहान होते.सहा वाजत असतील नसतील , तरी काळोख झालेला होता. थंड वारे सुटले होते.खिडकीतून बाहेर बघण्यात काही अर्थ नव्हता.

      अखेर शेवटी पठाणकोट आले. सामान उतरवाय़लाही त्या गॄहस्थांनी मदत केली. शहराचे प्रथम दर्शन फारसे चांगले नव्हते. रस्त्यावर सायकल रिक्षांचीच गर्दी होती.आमचे सामन एका सायकल रिक्षेत ठेवायला सुरुवात केली, सामानानेच रिक्षा भरुन गेली होती.सामानाला टेकू म्हणून मी बसले. ते दोघे मागून चालू लागले. स्टेशनच्या जवळच घर आहे असे ते आधीच म्हणाले होते. १५-२० मिनिटांच्या प्रवासानंतर घर आले.
 त्यांच्या मुली बऱ्याच मोठ्या कॉलेजमधे शिकत असाव्यात,पटकन पुढे आल्या.आम्ही कोण असे विचारताच ’मित्र आहे माझा’असे त्यांनी सांगितले. त्यांच्या बायकोने मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले. मुलींना शेगडी पेटवायला सांगितली, गरम पाणी दिले हातपाय धुवायला. गरमागरम चहा प्यायलावर जरा बरे वाटले. रमेशबरोबर ते फोन करायला बाहेर गेले.  मुलींनी शेगडी आणुन ठेवली. मधल्या चौकात मी शेकत बसले. त्या दोघी माझ्याशी गप्पा मारता मरता कामे करत होत्या, त्यांची आई स्वयंपाकघरात स्वयंपाकाच्या तयारीत होती , बोलताना त्यांची कोणी नातेवाईक बाळंतीण झाल्याचे समजले तिला डबा करुन न्यायचा होता त्यांना, त्यातच आम्ही अगांतुकासारखे गेलो होतो, पण कुणाच्याच चेहऱ्यावर तसे भाव नव्हते उलट आमच्यासाठी काय करु आणि काय नको असे त्यांना झाले होते. त्या तिघी देखील तुम्ही आज रहा, उद्या सकाळी जा डलहौसीला, असे म्हणत होत्या. त्या दिवशी डलहौसीला रिपोर्ट करणे जरुरीचे होतेच.फारशी ओळख नसताना त्यांना त्रास देणे जिवावर आले होते.

       रमेश  फोन करुन आले, तोवर त्यांचा स्वयंपाक तयार झाला. वाफाळता बासमती तांदळाचा भात , हरबऱ्याच्या डाळीची आमटी आणि लाल भोपळ्याचे घारगे.हरबऱ्याच्या डाळीची आमटी मी पहिल्यांदाच खाल्ली. आपल्याकडे आपण पुरण पोळी केली कि कटाची आमटी करतो पण त्यात डाळ नसते. हरबऱ्याच्या डाळीच्या डाळींब्या मोठ्या दिसत होत्या, पण आमटीची चव मात्र झक्कास होती. हिरवी मिरची आणि आल्याचे बरीक तुकडे घातले होते त्यात. गरम गरम जेवणाची मजा थंडीत काही औरच असते. दोन दिवसांच्या प्रवासानंतर इतके सुग्रास जेवण ते देखील आयते ! वाढणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आगत्य,आपुलकी माया.
 मला मात्र जेवताना फारच अपराधी वाटत होते. किती वाईट विचार केले होते मी गेल्या दोन तासात. माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वास मी का घालवून बसले होते? कदाचित लहान मुलीचा विरह, ट्रेकींगबद्दलची भिती यामुळे माझे मन नकारात्मक विचारांनी भरुन गेले होते. आपण पेपरात, टि.व्हीवर देखील वाईट बातम्याच मोठ्या प्रमाणात वाचतो त्यामुळे देखील समोरचा माणूस चांगल्या भावनेने बोलतोय हे आपल्याला जाणवत नसावे.

 "जेवना पोटभर, मुलीची आठवण येते का?"  ती माऊली मोठ्या मायेने माझ्या पाठीवर हात ठेवीत म्हणाली. गळ्यातला हुंदका मोठ्या निकराने गिळून हसत हसत मी म्हणाले, "तसं नाही खूप छान झालाय़ स्वयंपांक "
"रहा ना आजच्या दिवस,सकाळी लवकर असेल ना गाडी.." मुलगी म्हणाली
तिचा अग्रह मोडवत नव्हता,पण जाणे जरुर होते.  आमच्या सामानातले खाऊचे पाकीट त्या मुलींजवळ देवुन जायला निघालो. येताना परत या असे त्या परत परत म्हणत होत्या. रीक्षा आणली बसून निघालो. ते सद्गृहस्थ आम्हाला सोडायला एस.टी.स्टॅंड वर आले. त्यांनी सामान चढवायलाही मदत केली. ट्रेकिंग संपल्यावर नक्की या असा त्यांनीही आग्रह केला.

   "तुला माणसांची पारख नाही" घरच्य़ांचे  विधान मी पुन्हा एकदा सिध्द केले.

Friday, December 7, 2012

सुडोकु

चाळीशीनंतर घडणाऱ्या शारीरिक बदलांबद्द्ल आणि त्यावरील उपायांबाबतही सतत कानी पडत असते. शारीरिक फिटनेस साठी चालणे,जॉगिंग पासून जिम योगा,ट्रेकिंग याबद्द्ल लोक किती जागरुक झालेत हे सकाळ, संध्याकाळच्या टेकड्या, जॉगिंग ट्रॅक्स वरील गर्दी आणि जिमच्या वाढत्या संख्येवरुन दिसून येतच आहे. पण शरीराच्या तंदुरुस्ती इतकेच मनाचे आणि मेंदुचे स्वास्थ हि महत्त्वाचे आहे हे सुध्दा आता जाणवू लागलेले आहे. उतार वयात होणारे पार्किसन्स, डीमेन्शिया,अल्झायमर यांसारखे मेंदुचे आजार  परदेशांइतकेच आपल्या देशातही दिसू लागले आहेत. अर्थात पूर्वीपण असे आजार नसतीलच असे नाही,पण त्यांची हि नावे आपल्याला माहित नव्हती.शिवाय सरासरी आयुर्मान हे गेल्या पन्नास वर्षात वाढलेले दिसते. शंभर वर्षांपूर्वी साठी गाठणे अवघड होते त्यामुळे एखाद्याने वयाची साठ वर्षे मोठा आजार,अपघात न होता घालवली कि त्याची ’साठीची शांत ’ म्हणून मोठा समारंभ करीत असावेत अन्यथा वाढदिवस साजरे न करण्याच्या आपल्या रितीत हा सोहळा बसलाच नसता. त्या काळी जास्त जगणाऱ्यांची संख्या कमी होती तरी कंपवात, भ्रमिष्ट्पणा , म्हातारचळ या नावाने  पार्किसन्स, डीमेन्शिया,अल्झायमर हे आजार माहित होते.पण त्याचे प्रमाण मात्र फारच कमी होते. आजकाल या आजारांचे प्रमाण बरेच वाढलयं आणि विभक्त कुटुंब पध्दती ,शहरीकरण यामुळे अशा आजारांनी पिडित व्यक्ती आणि त्यांचे करावे लागणारी त्यांची मुले यांचे हाल वर्णनाच्या पलिकडे आहेत.

        विस्मरणाचा आजार भविष्यात टाळायचा असेल तर योगाभ्यासाबरोबर मेंदुचे व्यायाम करा असे डॉक्टर सांगत असतात. म्हणजे शब्द्कोडी सोडविणे, डायरी लिहिणे, सुडोकु सारखी गणिती कोडी सोडविणे . ज्या योगे मेंदुला चालना मिळते. मला हल्ली बरेचदा महत्त्वाच्या कामांचा विसर पडतो, वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ आठवायला वेळ लागतो, सकाळी स्वयंपाक करताना फ्रिजपाशी जा्वुन फ्रिज उघडला तर आपण काय़ घ्यायला आलो ते चटकन आठवत नाही मग पुन्हा ओट्यापाशी जायचे आठवायचे आणि लगेच फ्रिजकडे जायचे असे उद्योग करावे लागतात. त्यामुळे मुलींनी ,"आई, तू रोज सुडोकु सोडव ,शब्दकोडी सोडव" असा धोशा लावला. शब्द्कोडी मी पूर्वीपासून सोडवत होते, ती सोडवायला मला काहीच त्रास नव्हता उलट मजाच यायची आणि आताही माझा हा विसराळूपणा शब्दकोडे सोडवताना मला अजिबात त्रास देत नव्हता. ’सुडोकू’ हि भानगड मात्र नविनच होती. एका 9x9  च्या मोठ्या चौरसात ९ लहान चौरस आखलेले. प्रत्येक चौरस पुन्हा 9x9 मध्ये विभागलेला.म्हणजे एका मोठ्या चौरसाचे  ८१ छोटे भाग पाडलेले. त्यात एक ते नऊ असे अंक कोडे घालणाऱ्याने मधे मधे लिहिलेले असतात, खेळाचा नियम म्हणजे प्रत्येक आडव्या उभ्या रेषेत एक ते नऊ असे नऊ अंक आले पाहिजेत आणि नऊ चौरसातल्या प्रत्येक चौरसातही एक ते नऊ असे नऊ अंक आले पाहिजेत.  सुरुवातीला हे कोडे फारसे अवघड नाही वाटले. एकही आकडा आडव्या उभ्या रांगेत पुन्हा आला नाही कि झाले इतके सोप्पे, यात कसला आलाय मेंदुला व्यायाम आणि ताण म्हणून पेन्सिल घेतली आणि बसले सोडवायला. पण जसे सोडवू लागले तसा त्यातला गणिती हिसका जाणवू लागला. आडव्या रांगांवर लक्ष ठेवून अंक भरायला घ्यावे तर उभ्या रांगांमध्ये आकडे रीपीट होत. उभ्यांकडे बघावे तर आडव्या रेघांमधे गडबड. तर कधी एखाद्या लहान चौरसात एक आकडा दोनदा. पुन्हा पुन्हा खोडून पेपर फाटून जायचा , मग मी हे कोडे एका कागदावर उतरवून घेई. पेपरामधले त्यांनी लिहिलेले आकडे लाल आपण लिहिलेले काळे असत , मी उतरवून काढलेल्या कागदावरचे सगळे आकडे काळे मग तर माझा खूपच गोंधळ उडे आधी दिलेले आकडे आणि मी लिहिलेल्या आकड्यांमधून मूळचे कोडे बाजूला राही वेगळ्याच जंजाळात मी अडकून जायची.गणिताला भोंगळपणा, कामचलाऊ पणा किंवा दे दणकवुन असे काही मंजूर नसतेच. त्यामुळे एका चौरसात पाच आकडे असतील तर उरलेले चार आपल्याला हवे तसे लिहिताच येत नाहित, त्यावेळी उभ्या आडव्या रेघांचा विचार करावाच लागतो.एका रिकाम्या जागेत २ किंवा ४ यापैकी कोणताही आकडा चालेल असे असेल तर आदमासाने दोन लिहून टाकू असे म्हणून लिहिले कि संपले. पुढचे सगळे कोडे चुकलेच म्हणून समजा.त्या दोन शक्यता मधून एकच पक्का आकडा येण्याकरीता चारी बाजूनी विचार करणे जरुर असते.

     सुरुवातीला हे नियम समजून कोडे सोडवणे अवघड जात होते,पण ते सोडवण्याचा मोह मात्र कमी होत नव्हता. आता जिंकून खूप मोठे काही मिळवायचे नव्हते त्यामुळे जिंकण्याची इर्षा नव्हती आणि हरल्यावर कुणी काही म्हणणारही नव्हते. माझी धाकटी लेक खूपच पटकन सुडोकू सोडवते. ती मला कधी चिडवायची तर कधी मोठेपणाने चल मी तुला पुढचे सोडवून देते असे म्हणून कागद हातात घ्यायची. मला पण आता या खेळाचे अगदी व्यसनच म्हणाना लागले. पेपर आला कि बाकिच्या कुठल्याच बातम्या न बघता सुडोकुचा कागद घ्यायचा आणि पेन घेवुन सुरु व्हायचे. हळूहळू मलाही जमायला लागले. आडव्या,उभ्या रेघा आणि चौकोनांमध्ये पुनरावृत्ती न करता एक ते नऊ आकडे बसविणे मला येवु लागले. पुढे पुढे मला या खेळाचा छंद लागला. एखाद दिवशी चहा पिता-पिता कोडे सोडवूनही होई , तर कधी सकाळची पहिली गडबड संपली कि निंवात बसल्यावर कोडे जमून जाई. कधी ऑफिसला लवकर जायचयं, एखाद्या मिटींगची तयारी किंवा तत्सम काही टेन्शन असले कि त्याच्या विचारांमध्ये खेळाकडे दुर्लक्ष होई मग ते कोडे सुटायला वेळ लागे आणि ते न सुटणारे कोडे मला इतर का्मांत अडथळा बनुन जाई. बाकीची कामे करताना ही डोक्यात विचार सुडोकुचाच असे. रात्री सगळी कामे उरकल्यावर हातात कागद घेवुन मी परत सोडवायला घेई आणि कोडे सुटले कि सारा दिवसभराचा शिण नाहिसा होवुन मी उत्साहाने दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागे.सुडोकु सोडवायचे तंत्र एकदा समजले कि खरं तर ते सोडवायची मजा संपली. पण बघताक्षणी ते सोडवून टाकण्याइतका सराईतपणा माझ्यात अजून आला नाही म्हणून कदाचित अजूनही ते सोडवण्याची मला अजून गोडी वाटतीय.
  सुडोकुच्या त्या चौकोनांकडे आणि त्यातील आकड्यांकडे बघून माझ्या मनात वेगळेच विचार सुरु होतात हल्ली. नऊ चौरसातल्या एखाद्या चौरसात तीन आकड्यांची बाकी असते आणि एखादा चौरस एक आकडा घेवुन बसलेला असतो.योग्य अंक भरताना हा रिकामा चौरस पटकन भरुन जातो आणि तीन आकडे हवा असणारा शेवटपर्यंत रखडतो. ते पाहून मला वाटते, एखाद्याला आयुष्यात बरेच मिळालेले असते थोड्याच गोष्टी हव्या असतात , त्यामुळे त्या गोष्टी अमुक अशा, आणि तशाच हव्यात असा त्याचा आग्रह असतो, उलट एखादया जवळ काहीच नसते, मग तो मिळेल त्यात समाधान मानतो.किंबहुना मिळेल ते त्याला हवे वाटते आणि लवकरच तो भरुन पावतो. एखादी एक, दोन अंकासाठी अपूर्ण रेघ देखील अडून राहते आणि आर्ध्याहून जास्त रिकामी रेघ तिच्या आधी भरते. एखाद्या ऊंच-गोऱ्या सडपातळ आणि सधन कुटुंबातल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न लांबावं आणि अगदी बेताच्या परिस्थितीतल्या रुपाने सामान्य मुलीला चांगले स्थळ मिळून तिचं घर भरावं असं वाटतं ते बघताना.

      ’सुडोकू’ हे मानवी जीवनाचं प्रतिक आहे असंही वाटतं कधीतरी. प्रत्येकाच्या नऊ कप्प्यांच्या घरात किती  आकडे आधीच लिहून आलेत ते आपल्या हातात नाही. कुठल्याच आकड्याची पुनरावृत्ती न करता नऊ कप्प्यात नऊ अंक भरायचे.आजुबाजूचे चौकोन म्हणजे आपल्या आजुबाजुची परिस्थिती,आपले सगेसोयरे, मित्र, समाज. सगळ्यांना समान पातळीवर ठेवता आले म्हणजे तुम्ही खेळाचे नियम पाळून आयुष्यात यशस्वी झालात. आपले कोडे आपणच सोडवायचे. नियम पाळणे न पाळणेही आपल्यावरच.पण आजुबाजुचे चौकोन आपल्यासारखेच भरता येण्याची कला साधता आली कि जमले म्हणायचे. ’सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्चन्तु मा कश्चित दुःखवाप्नुयात’ असे सांगणारे आपले ऋषी मुनी तरी वेगळं काय सांगतात?

      सुडोकू सोडवताना अंकांची मांडणी बरोबर यावी यासाठी आडव्या,उभ्या आणि चौरसातल्या अशा तिन्ही ठिकाणचा विचार करीत अंक भरुन मजा आलीच, त्याच्याकडे वेगळ्या बाजूने बघतानाही एका गोष्टीकडे बघाय़चे वेगवेगळे दृष्टिकोन समजले हाच असेल ना मेंदूचा व्यायाम? अशा व्यायामाने मेंदू तंदुरुस्त राहणार असेल तर करावाच रोज हा व्यायाम.   ’सुडोकू’ या कोड्याचा जनक कोण असेल आणि त्याचा मेंदू किती तल्लख असेल. सुडोकुच्या जनकाला आपले लाख सलाम !
©

Thursday, May 17, 2012

हा भारत माझा

सुनिल सुखथनकर आणि सुमित्रा भावे या द्वयीने आजवर एकापेक्षा एक सुंदर चित्रपट दिले त्या तीलच ’हा भारत माझा’ हा चित्रपट. मायबोलीच्या खास प्रयोगाच्या वेळीच तो पाहण्याचा योग लाभला हे माझे सद्भाग्यच. कारण त्या चित्रपटापूर्वी त्याची पार्श्वभूमी सुनिल सुखथनकरांनी नेमक्या शब्दात मांडली आणि चित्रपटानंतर सुमित्रा भावे, सुनिल सुखथनकर,उत्तरा बावकर, दीपा लागू यांनी प्रेक्षकांशी संवादही साधला.
 अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे अवघा भारत देश ढवळून निघालेल्या दिवसात घडलेली घटना हि चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना असली तरी मध्यमवर्गीय माणसाची भ्रष्टाचाराबद्दल चिड,मात्र नितीमत्तेला धरुन राहण्यासाठी जी  किंमत मोजावी लागते, ती मोजण्याची तयारी नसणं या मुळे कात्रीत सापडलेल्या मध्यमवर्गीय माणसाचं उत्तम चित्रण आहे.

 आजच्या तरुण पिढीने जरुर बघावा हा चित्रपट. कारण कुठलेही अनैतिक काम पैसे देवुन करुन घेणे यात गैर आहे असे हल्ली बहुतेकांना वाटतच नाही. सिग्नल तोडायचा, विना लायसन्स गाडी चालवायची आणि पोलिसांनी पकडले कि दंड न भरता त्याला ५०-१०० रु.देवु करायचे, वर पोलिस कसे पैसे खातात म्हणून त्यांना ,देशाला शिव्या घालायच्या.सिग्नल तोडणे किंवा विना लायसन्स गाडी चालविणे हि कामे गैर आहेत,अनैतिक आहेत असे वाटतच नाही. डोनेशन देवुन ऍडमिशन घेणे,बिल्डरकडून फ्लॅट घेताना २ नंबरचे पैसे देणे, महानगरपलिकेतील,मामलेदार कचेरीतील कुठलेही काम पैसे देवुन करुन घेणे,इतकेच नव्हे तर ड्रायव्हींग लायसन्स एजंटला पैसे देवुन काढण्यात आपण अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहोत याचा आपल्याला विसर पडत आहे. ज्या भ्रष्ट साखळीचे आपणही एक घटक आहोत ती तोडणे फार कठीण आहे.कारण दुसऱ्याला दोषी ठरवणे नेहमीच सोपे असते.

 चित्रपटामध्ये अण्णा हजाऱ्यांच्या आंदोलनाने ढवळून निघालेला देश दिसतो. समाजाच्य़ा सगळ्या थरांमधील त्याचे पडसाद बघतानाही जाणवते कि त्याची खरी जाणीव होते ती मध्यमवर्गालाच.आजवर बहुतेक क्रांत्या या मध्यमवर्गामुळेच घडल्या असे इतिहास सांगतो. श्रीमंतवर्गातील लोकांना असे विषय चघळायला बरे वाटतात.वेळ आल्यावर स्वतःच्या फायद्यासाठी कुठलाही मार्ग,कोणतीही किंमत(अर्थात पैशाची) मोजायची त्यांची तयारी असते.अगदी तळागाळातल्या माणसाची सगळी शक्ती जगण्याच्या धडपडीत जात असल्याने एवढा विचार,विवेक करायला वेळ नसतो. शिवाय त्याच्या अस्तित्वासाठी त्यालाही भ्रष्टाचाराचे मार्ग अवलंबावे लागतात. जसे त्यांच्या झोपड्या पाडायला आलेल्या त्याला महानगरपालिकेच्या माणसाला पैसे द्यावे लागतात, आणि त्यामुळेच गॅस सिलेंडर लवकर आणुन देण्याबद्दल पैसे घेण्यात त्याला गैर वाटत नाही.
 चित्रपट हि एका सुखात्मे कुटुंबाची कथा न रहाता, प्रत्येक व्यक्ती त्यातल्या प्रसंगाशी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घटना नकळत पडताळत राहते . म्हणूनच तो मनाला खूप भिडतो. चित्रपटाचा शेवट सकारात्मक करुन भविष्याबद्दल दर्शविलेला आशावाद हे देखील चित्रपटाचे वैशिष्ठ्य फार आवडले. हिंसात्मक चित्रपटांमधून तरूणांच्या मनावर परिणाम होतात, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळते असे म्हणतात. ते जर खरे असेल तर ’हा भारत माझा’ बघुन  मनावर चांगले संस्कार नक्कीच घडतील आणि काही थोडे त्याचे आचरण जरुर करतील.

©

Wednesday, March 21, 2012

नष्ट नीड - उध्वस्त घरटे

 रविंद्र्नाथ टागोरांच्या तीन कादंबऱ्यांचा तीन दीर्घ कथांमध्ये निलिमा भावे यांनी ’नष्ट नीड’ नावाच्या पुस्तकात  अनुवाद केलेला आहे. या कथांचे विषय  कादंबरी,प्रेमकथा यात आढळणारे प्रेमाचे त्रिकोण इ.नेहमीचेच आहेत. मात्र त्यामधून मानवी मनाच्या भावनांची गुंतागुंत,नात्यांमधले नाजुक भावबंध, स्वभावाचे चित्रण इतकं अप्रतिम आहे कि त्या कथा मनाला नुसत्या भिडतच नाहीत तर कायमच्या घर करुन राहतात. रविंद्र्नाथांचे साहित्य कालातीत आहे हे पटतं.
 विवाहबाह्य प्रेम हा आजकाल दूरदर्शन मालिकांमधुन चावुन चोथा झालेला विषय आहे, त्याबद्दल कुणालाच काही वाटेनासे झालयं, पति-पत्नी मधले प्रेम हाच सध्या आश्चर्याचा मुद्दा ठरु शकेल. टागोरांच्या या तीन कथांमध्येही  "विवाहबाह्य प्रेम” हाच वि्षय आहे, त्यांनी रंगवलेले प्रेम हे जरी भावनिक पातळीवरचे आहे तरी त्या काळी या कादंबऱ्या बऱ्याच वादग्रस्त ठरल्या होत्या. .
   ’नष्ट नीड’  या कथेत वयाने जरा जास्त मोठ्या आणि व्यवसायात मग्न असणाऱ्या नवऱ्यामुळे आपल्या वयाच्या  अमल नावाच्या दिरा बरोबर चारुलता मन रमवित असते.दोघांचे एकत्र वाचन, लेखन, साहित्यिक चर्चा चालू असतात. त्या बरोबर एकमेकांची चेष्टा, रुसवे-फुगवे. दिराबरोबर रमणारी चारुलता तिच्याही नकळत त्याच्या प्रेमात पडते. त्याचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वहिनी, कदाचित एक मैत्रीण इतकाच असतो. अमल त्यांच्या घरात आश्रित असतो. त्याला जेंव्हा चारुलतेचा नवरा मोठ्या आर्थिक संकटात असल्याचे समजते, त्यावेळी तो खडबडून जागा होतो. वहिनी बरोबरच्या साहित्यिक गप्पा, वाचन,चर्चा यातला फोलपणा त्याला जाणवतो,अपराधीही वाटते. दादाने स्वतःच्या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला थोडीसुध्दा कल्पना दिली नाही आपल्या शिक्षणाला मदतच करत राहिला याबद्दल त्याच्या मनात दादाच्या मोठेपणाबद्दल कृतज्ञता दाटुन येते. त्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे या  भावनेतून तो दादाने सुचवलेल्या धनिकाच्या मुलीला न बघताच होकार देतो  आणि  शिकून येवुन दादाला मदत करण्याच्या हेतूनेच सासऱ्याच्या खर्चाने विलायतेस उच्च शिक्षणासाठी जातो.

 चारुलता नवऱ्याच्या वृत्तपत्र व्यवसायाशी पूर्ण अनभिज्ञ असते.संस्कारांमुळे नवऱ्याच्या सेवेत ती कुठलीही कसूर ठेवत नसली तरी त्याच्या मनातली घालमेल,त्याचे ताणतणाव तिला कधी जाणवत नाहीत.  नवऱ्याला   आपल्या व्यवसायातील चढ उतार चारुलतेजवळ सांगायचे असतात मात्र तिला ते सांगायची वेळ जमुन येत नाही. ती सगळा वेळ ’अमल’च्याच विचारात रममाण असते. सहाजिकच त्याच्या अकस्मिक जाण्याने बसलेला धक्का आणि पोकळी तिचे जीवन वैराण करते.
 चारुलतेच्या आपल्यावरच्या प्रेमाबद्दल कणमात्र शंका नसलेल्या तिच्या नवऱ्याला जेंव्हा तिचे मन अमलमधे गुंतलेले समजते, त्यावेळी त्याला दुःख होते तेही  तिच्यासाठीच. अमलचे  लग्न त्यानेच करुन दिलेले आहे. चारुलतेचा त्याला राग येत नाही, आपण तिला फार गॄहित धरले ,तिला मनाविरुध्द आपले करायला लागले यामुळे त्याला स्वतःचा राग येतो. इथेच टागोरांचे थोरपण जाणवते. कुणाचे मन कधी, कुठे जडेल हे समजणे खरचं कठीण आहे. एखाद्याला आपल्यावर प्रेम कर अशी बळजबरी नाही करता येत. समाजाची बंधने पाळणारेच जास्त असतात,चौकटी मोडून जगणे तेवढे सोपे पण नसते, अशा वेळी चारुलतेला घरी एकटी सोडून कामाच्या निमित्ताने दुसऱ्या गावी कायमचे निघुन जाण्याचा तिच्या नवऱ्याचा निर्णय पटतो.


 चारुलतेची अमलमधली पराकोटीची भावनिक गुंतवणूक हल्लीच्या परिस्थितीत अवास्तव वाटू शकते. ती एका बाजुला नवऱ्याला खुष करु पहात असते.पण अमलला विसरणे तिला अशक्य असते, एका बाजुला अमलवरचे प्रेम आणि दुसरीकडे नवऱ्याशी आपण प्रतारणा करीत असल्याची अपराधी जाणीव यातुन  होणारी तिची  मानसिक होरपळ आपल्याला जाणवते. प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर असताना प्रत्येकाच्या वाट्याला आलेली वेदना वाचकाला सुन्न करते. मानवी जीवन हे नियतीच्या हातातल्या बाहुल्यासारखं आहे असं वाटतं राहते.

©