Sunday, July 20, 2014

पासपोर्ट ऑफिस : एक दाहक अनुभव

               पासपोर्ट ऑफिस मधे जायची वेळ आजकाल बहुतेकांवर येते. माझा पासपोर्ट मी पहिल्यांदा हौसेने काढला, पण त्याची मुदत संपेपर्यंत देशाची सीमा ओलांडायचे योग काही आले नाहीत. नंतर तो पुन्हा एकदा उत्साहाने री-न्य़ू करुन आणला. तरी परदेशात जायला जमले नाहीच. परत त्याची मुदत संपली.   पासपोर्ट री-न्यू करायला हवा असे नवरा म्हणू लागला ,आता मात्र मी वैतागले होते. उगीचच दर पाच दहा वर्षांनी पासपोर्ट ऑफिसला चकरा मारुन त्याचे नूतनीकरण करायचे आणि जायचे तर कुठेच नाही.मला नकोच तो पासपोर्ट असे मी जाहिर करुन टाकले.पण नेमके माझ्या पत्रिकेतले परदेशगमन घडवणारे ग्रह फिरले आणि युरोप अमेरीका नाही पण गेला बाजार साउथ -इस्ट अशियातले देश मला दाखवून आणण्याची नवऱ्याला इच्छा झाली. मी पासपोर्ट ऑफिसला जाणार नाही म्हटल्यावर त्यांनी एजंटकरवी माझा पासपोर्ट री-इश्यु करुन घेतला.

मुंबईच्या विमानतळावर फॉर्म भरताना नव्या पासपोर्ट वरील माझ्या नावाचे स्पेलींग चुकल्याचे माझ्या लक्षात आले. पासपोर्ट्वरील चुकी्च्या स्पेलींगप्रमाणेच फॉर्म भरुन मी थायलंड,मलेशिया,सिंगापुर असा सगळा प्रवास केला.मी पासपोर्ट उघडून बघितलेलाच नसल्याने सगळ्या प्रवासात चुकीच्या स्पेलींगची  टोचणी मला होती. इकडे आल्यावर हि दुरुस्ती लगेचच करुन घ्यायचे ठरविले.

पुण्याला आल्यावर मी जुना पासपोर्ट बघितला त्यावर माझ्या नावाचे स्पेलींग बरोबर होते. मग नव्या पासपोर्ट वर चुकीचे स्पेलिंग कसे? एजंटने फोर्म भरताना माझ्या नावाच्या स्पेलिंगमधले एक अक्षर खाऊन टाकले होते. नावात दहा अक्षरे असल्याने फॉर्म सही करताना माझ्या लक्षात आले नाही त्यामुळे अंतिमतः चूक माझीच होती. चूक खूपच किरकोळ होती काम सहज होऊन जाईल असे मला वाटले. इथे माझी दुसरी चूक झाली.

पासपोर्टच्या साईट्वर यासंदर्भात काय करावे याबद्दल वाचले तेंव्हा माझ्या लक्षात आले कि नव्याने पासपोर्ट काढण्याकरीत करावी लागणारी सगळी उठाठेव या क्षुल्लक वाटणाऱ्या दुरुस्तीसाठी करावी लागणार होती.  पूर्वी पुण्यात असलेले पासपोर्ट ऑफिस पुण्याबाहेर घोरपडीला नव्या जागेत हलवले आहे. जाण्यापुर्वी वेळ ठरवून घ्यावी लागते आणि दिलेल्या वेळेला हजर रहावेच लागते. पासपोर्ट ऑफिसचे संगणकीकरण एका खाजगी कंपनीने केल्याने काम अगदी वेळेत ,सहज होते अशा अनेक गोष्टी मला साईट वरुन ,काही लोकांकडून समजल्या.
मी  वेळ घेतली. दुपारी पावणेदोन ची वेळ मला मिळाली होती.मी वेळेवर सर्व कागदपत्रांसह पोचले.ऑफिसच्या बाहेर शंभर एक लोक उभे होते.आत गेल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तपासणी होऊन आत गेले तर सात आठ काऊंटरवर मारुतीच्या शेपटासारख्या रांगा होत्या. एका रांगेत उभी राहिले. माझा नंबर आल्यावर माझी कागदपत्रे पलिकडच्या मुलीने माझ्या हातातुन हिसकावुन घेतली.ती मुलगी तिच्या खास कमावलेल्या आवाजात समोरच्या प्रत्येक व्यक्तीवर नुसती ओरडत होती. ज्यांची कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्यांना झापत होती, काहींना झेरॉक्स काढायला पिटाळत होती. कागदपत्रे तिच्या ताब्यात दिलेल्या लोकांना वेगळ्या रांगेत उभे केले , मग साधारण अर्ध्या पाऊण तासांनंतर माझे नाव पुकारण्यात आले, मला माझ्या कागदपत्रांबरोबर एक कागद दिला तो माझा टोकन नंबर होता. ते सगळे घेवुन मी आतल्या हॉल मधे गेले.तेथील टि.व्ही.सारख्या पडद्यांवर टोकन नंबर आणि A1 ते A30 पर्यंत अक्षरे दिसत होती.आपल्या टोकन समोरील जो नंबर येईल त्या व्यक्तीकडे जायचे. मला A5 कडे जावे लागले.तिथे माझा फोटो काढला.सगळ्या कागदपत्रांची छाननी झाली.मला पुढे पाठवले.इथवरचा प्रवास तसा सरळ झाला. पुढच्या हॉल मधे पुन्हा तोच प्रकार आता A ऐवजी B ऑफिसर कडे जायचे.मी माझ्या टोकन समोर आलेल्या ऑफिसरच्या समोर गेले. माझ्या नावात झालेल्या छोट्या चुकीबाबत मी त्यांना सांगितले. माझ्या ऑफिसकडून पासपोर्ट् मिळण्याकरीता ’ना हरकत प्रमाण पत्र’  मी आणले होते पण त्या पत्राच्या दोन ओरीजनल प्रती आणणे अपेक्षित होते. माझ्याजवळ् एक  ओरीजनल  व एक झेरॉक्सप्रत होती, ती चालेल कि नाही याबाबतचा निर्णय ते घेवु शकत नव्हते. त्यांनी मला त्यांच्या वरीष्ठ् आधिकारी मॅडम कडे जाण्यास सांगितले. त्या मॅडम जागेवर नव्हत्या. त्यांना भेटायलाही शंभरएक लोक उभे होतेच. सुमारे एक तासाच्या प्रतिक्षेनंतर् मॅडम जाग्यावर आल्या.त्यांनीही टोकन नंबर प्रमाणॆ एकेकाला बोलवायला सुरुवात केली. माझा नंबर आल्यावर् मी गेले. मला नवा पासपोर्ट् का हवा आहे, म्हणजे माझ्या पासपोर्ट् वरील नावात कशी दुरुस्ती हवी आहे हे त्यांना समजावले.माझ्या जुन्या पासपोर्ट्वर नाव बरोबर असताना , तोच डेटा का घेतला जात नाही हि मला शंका होती त्याचेनिवारण त्या करु शकल्या नाहितच शिवाय तुमचे रेकॉर्ड मी मागवुन घेते असे खास सरकारी वाक्य बोलून त्यांनी मला थांबायला सांगितले. सुमारे एक तास बाहेर बसल्यावर् त्यांनी मला आत बोलावले आणि माझ्या एजंटने भरलेल्या फॉर्मची स्कॅन कॉपी त्यांनी मला दाखविली. (हि कॉपी त्यांना त्यांच्या स्क्रिनवर एक तासापूर्वीही दिसु शकली असती.कागदपत्रे मागवायची काही आवश्यकता नव्हती हे समजण्याइतका कॉम्प्युटरचा अनुभव मला आहे पण....) त्यात चुकीचे स्पेलिंग असल्याने त्याच नावाने पासपोर्ट् तयार झालेला आहे आणि तुमची सही असल्याने त्या चुकीला तुम्हीच जबाबदार आहात असे सिध्द करुन दाखविले. मला माझी चूक मान्य होतीच.पुढे काय करायचे एवढाच माझा प्रश्ण् होता. ,नावाच्या चुकीबाबत मी एक प्रतिज्ञापत्र आणले पाहिजे, दोन वर्तमानपत्रात छापुन त्यांच्या प्रती आणल्या पाहिजेत  असे त्यांचे म्हणणे होते. तुम्ही साईट् वर सगळे नीट् वाचले नाहीत असे त्या मला पुन्हा पुन्हा म्हणत होत्या. मग मात्र माझा संयम संपला. मी म्हणाले,"मी सगळे नीट वाचले आहे. नाव बदलावयाचे असेल तर म्हणजे एखाद्या मुलेचे लग्नानंतर् तिला नाव बदलून नव्या नावाचा पासपोर्ट् हवा असेल तर असे प्रतिज्ञापत्र करणे योग्य आहे. कारण त्या प्रतिज्ञापत्रात मी पूर्वी ....या नावाने ओळखत होते आता माझे नाव ....  झाले आहे  असा मजकूर आहे.माझ्या नावात असे काहीही झालेले नाही ,हि केवळ दुरुस्ती आहे, नाव बदल नाही" पुन्हा जुन्या पासपोर्ट वर बरोबर नाव, नव्या पासपोर्ट वर चुकीचे नाव असे सगळे त्यांना समजावल्यावर प्रातिज्ञापत्राची गरज नाही हे त्यांना पटले. पण आलेल्या व्यक्तीने आपल्याला समजावणे हे त्यांच्या पदाला मानवले नसणार , आता निमुटपणे सगळी कागदपत्रे घेवुन पासपोर्ट द्यावा असे लिहुन देणे त्यांना शक्य नव्हते मग  त्यांनी मला ऑफिसकडून दोन ओरीजनल ना हरकत प्रमाण पत्रे आणावयास सांगितली. मी नम्रपणे एक पत्र का चालत नाही असे विचारले तर् तुम्ही साईट्वर नीट् वाचत नाही   हे बघा असे म्हणून एक छापिल् पुस्तक दाखविले त्यात दोन ओरीजनल ना हरकत प्रमाण पत्रे आणावी असे लिहिले होते. साईटवरील् मजकुरा प्रमाणेच पत्र पाहिजे असे त्या म्हणाल्या. शिवाय़ मी आणलेल्या पत्रात एक मोठी चूकही त्यांना सापडली. माझ्या पत्रात मी भारतीय आहे असा उल्लेख नव्हता ! हे पत्र चालणारच नाही, नवी दोन पत्रे घेवुन परत या. मला हसावे कि रडावे समजेना, माझ्या हातात दोन पासपोर्ट होते, भारतातल्या केंद्र सरकारची मी थोडीथोडकी नाही तर पंचवीस वर्षे सेवा केली ती अभारतीय म्हणून? शिवाय माझ्या सहीने मी आजवर अनेकांना तात्काळ पासपोर्ट मिळावा म्हणून पत्रेही दिलेली आहेत. माझ्या सहीची पत्रे चालतात पण मी भारतीय आहे हे वाक्य पत्रात नसल्याने, मला पुन्हा यावे लागते. त्यांच्या जवळच्या माझ्या मागील रेकॉर्डस च्या स्कॅन कॉपीज त्यांच्या कडे होत्याच त्यात यापूर्वी माझ्या ऑफिसने दिलेली पत्रेही होती.पण आज त्यांना पुन्हा एक सोडून दोन पत्रे हवी होती. त्याच वरीष्ठ आधिकारी असल्याने पुढे जावुन तक्रार-अर्ज-विनंत्या करण्य़ाचा प्रश्ण नव्हता. आता पुन्हा अपॉंटमेंट घ्यायची का? हाच एक सवाल होता. त्यावर एखाद्या घोर अपराध्याला माफ केल्याच्या सुरात त्या म्हणाल्या, "तुम्हाला परत अपॉंटमेंट् घ्यायची जरुर नाही , सांगितलेली कागदपत्रे घेवुन परत या"

हे सगळे होइतोवर संध्याकाळचे पावणेसहा वाजले होते. तिकडे पाणी हॉलच्या शेवटच्या टोकाला होते. खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्सही होते, पण अतिशय महाग, साधा चहा २०ते २५ रु., सॅंडविच ५०रु. पासपोर्ट घ्यायला येणारे लोक उच्चभ्रूच असणार तेंव्हा त्यांना काय फरक पडतो? असे असले तरी त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेतला जात होता हि गोष्ट पण नाकारता न येण्यासारखीच. मला तर आपला नंबर कधीही लागेल त्यावेळी हातात चहाचा कप किंवा खात खात कसे जायचे या विचाराने मी काही न खाता पिता राहिले. आत ज्या व्यक्तिला पासपोर्ट हवा तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाला प्रवेश नसल्याने हातातील महत्त्वाची कागदपत्रे ठेवुन प्रसाधनगृहातही जाता आले नाही. एकुण काय तीन साडेतीन तास घालवुन मनःस्ताप घेवुन मी बाहेर पडले.

ऑफिसमधुन पुन्हा पासपोर्ट साईटवर दिल्याप्रमाणे पत्राच्या दोन प्रती घेवुन पुन्हा सकाळी नऊ वाजता पासपोर्ट ऑफिसात गेले.मला वाटले आता बाहेरच्या खिडाकीवर त्या पत्रांच्या दोन प्रती दिल्या कि माझे काम झाले. पण कसले काय? पुन्हा मागल्या वेळ सारखेच सगळे सोपस्कार करीत मला जावे लागले. यावेळी B ऑफिसरकडे माझा नंबर लागायलाच दिड तास थांबावे लागले तिथुन पुढे C ऑफिसरकडे माझी रवानगी झाली. त्यांनी ऑफिसचे पत्र बघितले आणि म्हणाले हे पत्र चालणार नाही. आमच्या साईट्च्या फॉर्म्याट सारखे हे पत्र नाही.माझे मागच्या खेपेस नाकारण्यात आलेले पत्र त्यांच्याजवळ होतेच , ते पत्र आता त्यांना योग्य वाटत होते. मला त्यांनी पुन्हा छापील पुस्तक दाखवले. मी म्हणाले ," ते पुस्तक मला दाखवु नका, मीच तुम्हाला इथुन तुमच्या साईटवरील नमुना दाखवते त्यानुसार हे पत्र नसल्यास सांगा"
"मॅडम , साईट वरील नमुना बरोबर नाही"
"मग योग्य नमुना साईट वर का नाही टाकला? आणि माझ्या ऑफिसने मागच्या वेळचे पत्र योग्य दिले असताना ते का नाकारलेत? मी पण सरकारी ऑफिसर आहे, मला नियम समजतात , तुम्ही विनाकारण त्रास देत आहात"
मी असे निर्वाणीचे बोलल्यावर त्यांनी माझी कागदपत्रे ठेवुन घेतली आणि तुमचा पासपोर्ट घरी येईल थोड्याच दिवसात असे सांगितले.

खाजगी कंपनीला पासपोर्ट ऑफिसचे काम देवुन काय साधले? वेळ वाचला नाहीच. खाजगी कंपनीमुळे ऑफिस चकाचक आहे. सरकारी  कार्यालयाची कळा त्याला आलेली वाटत नसली तरी आत मधे असणाऱ्या मोठ्या जनसमुदायामुळे कलकल गोंगाट असतोच. ऑफिसमधे ए.सी असल्याने सगळी दारे खिडक्या बंद. भर दिवसाही सगळीकडे ट्युब लाईट्सचा प्रकाश असतो. इतक्या लोकांच्या असण्याने ए.सीचा इफेक्ट अजिबात जाणवत नाही आणि वातावरणात एक प्रकारचा कोंदट्पणाच वाटतो. लहान मुले असतात, त्यांनी खाऊन टाकलेल्या बिस्कीटांच्या,चॉकेलेट्सच्या कागदांना कचरापेटी दाखवावी असे ना त्यांना वाटते ना त्यांच्या कंटाळलेल्या पालकांना. जेष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग आहे ती देखील खूपच मोठी असते.बसण्याकरीता बरेच बाकडी आहेत पण ती पुरणार नाहीत इतके लोक कुठल्याही वेळी आत असतातच.

तेथे एखाद्या दिवशी चारपाच तास घालवल्यावर माझी अशी अवस्था झाली मग तेथे रोज काम करणाऱ्य़ांचे काय होत असेल हि कल्पना मी करु शकते. हे काम अजिबात सोपे नाही. पण ते सोपे करणे शक्यच नाही असे नक्की नाही. एका ठिकाणी सगळ्यांना बोलावण्यापेक्षा पुण्य़ात चार-पाच ठिकाणी अशी कार्यालये काढता येणार नाहित का?
पासपोर्टचे नूतनी करण करताना असणारी पध्दत सोपी -सुटसुटीत करता येईल. नाव-पत्ता यांमधील चुका पुन्हा पुन्हा डेटा -एन्ट्री टाळुन कमी करता येतील. ऑनलाईन एंन्ट्री करु दिल्यास तर या चुका खूपच कमी करता येतील. साईटवर सर्व माहिती अद्ययावत ठेवल्यास लोकांचे हेलपाटे वाचतील.

पासपोर्ट हे अतिशय महत्त्वाचे दस्त आहे. तो देताना पराकोटीची काळजी घेणे आवश्यक आहे हे कुठलाही सुजाण नागरीक समजू शकतो.पण शासकीय कर्मचारी,शिक्षक,विद्यार्थी,जेष्ठ नागरिक यांना जास्तीत जास्त त्रास देणारे पासपोर्ट खाते कित्येक गुन्हेगार आणि अतिरेक्यांना पासपोर्ट देताना कुठली कागदपत्रे तपासते? अशी शंका मनात आल्यावाचून रहात नाही.

Tuesday, April 15, 2014

बदलत्या गृहरचना

तंत्रज्ञानाने सगळ्याच क्षेत्रात आपले हातपाय पसरले आहेत. नवनव्या सोयी-सुविधा बघताना डोळे दिपुन जातात. घरांचेच बघाना, कित्ती क्रांती झाली आहे बांधकाम शास्त्रात. खेडेगावातल्या ऐसपैस वाड्य़ांमधे जागेची मुबलकता होती,पण सोईचा विचार केलेला नसेच.पन्नास लोक जेवायला बसतील असे मोठे स्वयंपाकघर असायचे पण चुलीचा धुर जाण्याची व्यवस्था असेलच याची खात्री नसे. बसुन रांधायचे पण स्वयपांकाला लागणाऱ्या साधनांच्या जागा त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या खोलीच्या चार भिंतीतल्या फडताळात असत. भांडी घासायची मोरी जवळ नसे आणि तेथेही बसुनच भांडी घासावी लागत. त्याचा एक फायदा म्हणजे स्वयंपाक करतानाच सर्वांगाला भरपूर व्यायाम होई. त्या काळी बायकांना स्वयंपाक हे एकच व्यवधान असे आणि खेड्यात तरी वेळेशी कुणीच फारसे बांधलेले नव्हते त्यामुळे काम लवकर आटपायचे असा आटापिटा नव्हता.

    शहरांमधे जागेची अडचण.चाळी आणि वाड्यांमधे लोकांच्या दोन-दोन पिढ्या सुखात नांदल्या.उभ्याचे ओटे,स्टोव्ह गॅस अशी साधने आली पण ती सोय म्हणून. लहान जागेत सामान मोजकेच. भांडी भरपूर असायची पण जास्तीची भांडी माळ्यावर असत आणि पाहुणे-रावळे आले कि ती बाहेर निघत कार्य उरकले कि परत जाग्यावर जात. शेजाऱ्यांकडून ताटे,वाट्या सर्रास आणली जात. मिक्सर,फ्रिज या वस्तू चैनीच्या समजल्या जात होत्या. गल्लीत एखाद्यांकडे फ्रिज असेल तर ती व्यक्ती श्रीमंत समजली जायची आणि कुणाचा ताप उतरत नसेल तर त्यांच्याकडून बर्फ मागणे उभयपक्षी गैर वाटत नसे.

    औद्योगीकरणानंतर पुण्याची चारी बाजुंनी वाढ झाली. फ्लॅट संस्कृती रुजू लागली. नव्वदच्या दशकात आय.टी क्षेत्रातल्या प्रचंड वाढीने तसेच शिक्षणसंस्थांच्या अचाट विस्ताराने पुण्याची वस्ती अफाट वाढली. वाडे पाडून तिथेही इमारती झाल्या .औंध,पाषाण,बाणेर,हडपसर,वाघोली,कात्रज,पिंपरी,चिंचवड अशा सगळ्या गावांचा महानगरपालिकेत समावेश झाला आणि सगळीकडे उपनगरे विकसित झाली. बांधकाम क्षेत्रातल्या विकासामुळे घरे अधिकाधिक सुंदर,सुखसोयींनी परीपूर्ण बनू लागली. जागांच्या वाढत्या किमतींमुळे बंगले बांधणे अवघड झाले,तसेच ज्यांचे बंगले होते त्यांनी सुध्दा ते बिल्डरला विकून अलिशान फ्लॅट घेण्याची फॅशन आली. वन रुम किचन सीनेमापुरते उरले. वन बी.एच.के ही फारसे नाही 2BHK, 3BHK यांच्याच जाहिराती जिकडे तिकडे बघायला मिळतात. दहा पंधरा बिऱ्हाडांमध्ये एकच संडास पासून घरातील प्रत्येक व्यक्तिसाठी स्वतंत्र टॉयलेट असा हा बदलाचा प्रवास आहे.

    सुरवातीच्या काळात इमारती दोन-तीन क्वचित चार मजली होत्या.कॉमन पार्किंग असे.प्रत्येक इमारत हि स्वतंत्र असल्याने त्याची स्वच्छता आणि सौंदर्य हे सभासदांच्या सहभागावर असे. हळूहळू पुण्यात बिल्डर्सनी मोठाले प्लॉटस घेवुन अनेक इमारतींच्या स्किम्स राबवायला सुरुवात केली.मग प्रत्येकाला स्वतंत्र पार्किंग, आतमधले पक्के रस्ते,मुलांना खेळायला बाग, एखादा लहानसा हॉल,स्विमिंग पूल, जिम अशा सुविधा पुरवायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्या बिल्डर्स मधली स्पर्धा वाढत गेली.जागांचे भाव वाढत होतेच,उंच उंच इमारती बांधायला परवानगी मिळाल्याने एखादी मोठी स्किम म्हणजे लहानशा गावाइतकी  वस्ती होवु लागली. घर म्हणजे केवळ निवारा न राहता एक सौंदर्यस्थळ कसं होईल हे ठरायला आता या क्षेत्रातली प्रगती आणि ग्राहकाच्या हातातला पैसा दोन्ही कारणीभूत आहे.
   
    अशाच एका नव्याने सुरु झालेल्या एका स्किममधील सॅंपल फ्लॅट बघायचा योग आला.हल्ली हे देखील नव्यानेच सुरु झालयं. पूर्वी कागदावर, इमारत तयार झाल्यावर कशी दिसेल याचे फोटो फारतर बघाय़ला मिळत. आता एक तयार फ्लॅट असतो त्यावरुन तुम्हाला बांधकाम,रचना सगळ्याचीच कल्पना येते. तर असा सॅंपल फ्लॅट बघायला गेले.वास्तविक आता मला घर घ्यायचे नाही पण नवीन काय केलय ते बघू तरी म्हणून गेले. प्रवेशापासूनच स्वच्छता आणि सौंदर्याची प्रचिती येवु लागली शिवाय सुरक्षिततेची ही अतोनात काळजी ! आपला चेहरा दिसेल इतक्या स्वच्छ् आणि चकाकणाऱ्या जिन्याच्या संगमरवरी पायऱ्यावरुन चालणेही नको वाटत होते. वरती गेल्यावर आमच्या चपला काढून तेथे ठेवलेल्या चपला पाय़ात घालायची सूचना मिळाली. बंद दरवाज्याला लागून एक कॅमेरा त्यात आलेल्याचा चेहरा आत दिसणार ,व्यक्ती परीचितांपैकी असेल तरच दरवाजा उघडायचा. वर येणारी व्यक्ती सुरक्षा कर्मचाऱ्याने पाठवलेली असली तरी तिला आत प्रवेश मिळणे खातरजमा झाल्याखेरीज शक्य नाही. आत शिरतानाच आपल्या उंचीइतक्या आरशात स्वतःला न्याहाळित आत शिरलो. उजवीकडे प्रशस्त दिवाणखाना म्हणता येईल असा हॉल. त्यातले कोच,खुर्च्या सगळेच उंची वैभवाची साक्ष देणारे. चित्रपटगृहात शोभावा इतका मोठा टि.व्ही. आकर्षक अशा लॅंपशेडस्. हॉलच्या बाहेर प्रचंड मोठी बाल्कनी.तिचे क्षेत्रफळ ५५० चौ.फूट (इति आम्हाला जागा दाखविणारा एक्झिक्युटिव्ह). त्या बाल्कनीत बांधलेल्या चौकोनी खड्ड्यात लावलेली झाडेही सुरेख होती. एका कोपऱ्यात झोपाळा होता. कठड्याला पाण्याची कारंजी होती. हॉलला लागुन एक बेडरुम होती. ती सर्व फर्निचरने सुसज्ज होती त्यातही लहान टि.व्ही. छोटे टेबल,एक आरामखुर्ची. खोलीला लागुन बाथरुम त्यात अत्याधुनिक नळांची फिटींग्ज. हॉलमधुन दोन पायऱ्या चढून डायनिंग आणि स्वयंपाकघर होते.स्वयंपाकघरात मोठा ओटा त्याखाली भांडी ठेवण्याकरीता ट्रॉलीज, मोठा फ्रिज स्वयंपाकघराच्या मागे वॉशिंगमशीन आणि डीशवॉशर ठेवायला जागा शिवाय एक छोटी स्टोअररुम अर्थात साठवणासाठी खोली.शिवाय धुणं,भांडी करण्याकरीता छोटी बाल्कनी. हॉलमधुन वरती जायला एक देखणा जिना आणि वरती दोन बेडरुम्स. त्यामध्येही तसेच सुरेख फर्निचर. वुडन फ्लोरींग. सरकत्या दरवाज्याची कपाटे. भिंतीवर छानशा फ्रेम्स. मोठा आरसा असलेले ड्रेसींग टेबल. निवडून आणलेल्या लॅंपशेडस. वरच्या एका बेडरुममधुन खालचे सगळे दिसेल अशी मोठी काच आणि प्रायव्हसी हवी असेल तर त्यावर असणारी सरकती लाकडी फ्रेम. सौंदर्य,कलात्मकता याची पुरेपूर जाणीव करुन देणारी देखणी वास्तू शिवाय त्याचे आकारमान आणि वापरलेले उच्च प्रतीचे सामान बघुन केवळ श्रीमंतांनाच घेता येणे शक्य होणार हे कळतच होते.

    या अती सुंदर कलाकृतीत वैगुण्य शोधायाला मी काही कुणी वास्तुविशारद, किंवा इंटिरियर डिझायनर नाही. बांधकामशास्त्रातले तर मला काहीच ज्ञान नाही त्यामुळे त्यातल्या चुका मी काढु शकत नाही. पण  एकदोन गोष्टींची उणीव ठळकपणे जाणवली याला कुणी  ’कोल्ह्याला द्राक्षे अंबट’ असंही म्हणू शकेल. तरीही त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. त्या विशाल वास्तुमध्ये ’देवघर’ किंवा देव ठेवण्य़ाकरीता कुठेही जागा दिसली नाही.सॅंपल फ्लॅट मधे त्यांनी नसतील ठेवले देव. पण देवाची स्थापना करण्याजोगी जागाही मला कुठे सापडली नाही. आपल्या निधर्मी देशात अशी अपेक्षा ठेवणे गैर मानावे तर हल्लीच्या दिवसात पूर्वीपेक्षा सगळ्या देवांचे सार्वजनिक पूजन आणि सगळ्या धर्मांचे सण इतक्या  जल्लोषात साजरे होताना दिसतात ते बघुन आस्तिक लोकांचे प्रमाण नक्कीच जास्त आहे मग देवाकरीता जागा का ठेवली नसेल?

    दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या महान घरात पुस्तक ठेवायलाही एकही कपाट नव्हते. आजकाल इ-बुकचा जमाना आलाय आणि तुम्ही कुठे पुस्तकांच सांगताय असं कुणी म्हणेल.पण एवढ्या सुंदर बाल्कनीतल्या झोक्यावर चहाचा घोट घेत एखादं सुंदर पुस्तक वाचाव असं इथे राहणाऱ्याला वाटणारच नाही का? एखाद्या रात्री आपल्या मित्र मंडळींना बोलावुन काव्य वाचन,कथावाचन असं या घरात होणार नाही का? ( रात्रीच्या ड्रिंकपार्ट्यांकरीता बार मला त्या बाल्कनीत दिसला)

    देव आणि पुस्तके या कदाचित माझ्या मध्यमवर्गीय वृत्तीच्या आवश्यक गरजा असतील.शिवाय त्या सॅंपल फ्लॅट सारखे फर्निचर इतर फ्लॅट्स मधे असणार नाही.तेंव्हा असलेल्या मोकळ्या घरात प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार फर्निचर करायला मुखत्यार आहेच. पण सॅंपल फ्लॅट बनवताना बिल्डरने या गोष्टी विचारात घेतल्या नाहीत म्हणजे आजकाल त्यांचे महत्त्व तेवढे नाही असे तर नसेल? कदाचित तसे फ्लॅट घेणाऱ्यांना त्यांची आवश्यकता नसेल !

Thursday, February 20, 2014

आमच्या लग्नाची रौप्य महोत्सवी गोष्ट

           एका लग्नाची गोष्ट पासून सुरु झालेल्या ’एका लग्नाची दुसरी गोष्ट’,’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा प्रसिध्द मराठी मालिका बघितल्यावर  आमच्या ’लग्नाची रौप्य महोत्सवी गोष्ट’ सांगण्याचा मला मोह झाला. आमच्या लग्नाची गोष्ट मालिकेसारखी रोमॅंटिक नाही. मुळात माझा ’प्रेमविवाह’ नाही ,दाखवुन ठरवुन झालेल्या लग्नाच्या गोष्टीत काय विशेष असणार? , त्यामुळे लग्न कसे जमले हे सांगण्याजोगे नाहीच. त्यापुढची कथा चारचौघांपेक्षा वेगळी नाही,तरीही सांगण्यासारखी नक्की आहे.

           पंचवीस वर्षांपूर्वी माझं लग्न ठरलं त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती साधारणच होती. मला वडील नव्हते, भाऊ नव्हता. माझे शिक्षण,नोकरी,बऱ्यापैकी रुप या जमेच्या बाजू असल्या तरी आर्थिक परिस्थिती मुळे आईला माझ्या लग्नाचा चांगलाच घोर लागला होता. त्यात कितीही उच्च शिक्षित मुलाकडे चौकशीला गेले कि ते पत्रिका मागत आणि ती जुळत नसल्याचा निरोप चार दिवसात येई. त्यामुळे तर आई फारच रंजीला आली होती. तो जमाना इंटरनेटचा नव्हता त्यामुळे विवाहेच्छू मुलांच्या माहित्या मिळवायचे एकमेव साधन विवाहसंस्था होते,त्याही त्यावेळी पुण्यात मोजक्याच होत्या. त्यातुन आणलेल्या दहा पत्त्यांपैकी पाचांची लग्ने झालेली वा ठरलेली असत(विवाहसंस्थेला कळवण्याची तसदी त्यांनी घेतलेली नसे) चारांच्य़ा पत्रिका जुळत नसत.एखादे स्थळ उरे ते मला आवडत नसे.

    तोपर्यंत माझ्या आईने ज्योतिषाचा उंबरठा शिवला नव्हता.माझ्या वडीलांचा पत्रिकेवरही विश्वास नव्हता आमच्या घरात माझ्या वेळेपर्यंत कुणाची लग्ने पत्रिका बघुन झाली नव्हती. माझ्या लग्नाचा प्रश्ण आईला जटील वाटल्याने तिने कुठल्याशा ज्योतिषाला माझ्या लग्नासंबंधी विचारले, तो सप्टेंबर महिना होता. त्यांनी कळविले लग्न जमले तर दोन महिन्यात जमेल अन्यथा पुढील चार वर्षे योग नाही. झाले... आईची काळजी दोनशे पटिने वाढली.माझ्या लग्नाची सगळी खटपट माझी मोठी बहिण करीत होती.दिवाळीच्या सुट्टित ती केरळ ट्रीपला जाणार होती तिचे बरेच आधीपासून ते ठरले होते. आक्टोबर अखेरीस ती ट्रीपला गेली,जाण्यापूर्वी बऱ्याच ठिकाणी तिने पत्रे धाडली होती,वा भेटुन माझी कुंडली देवुन आली होती. ती केरळला गेल्यानंतर आईने माझे डोके खायला सुरुवात केली. इतर परीक्षांइतकी  हि परीक्षा सोपी नाही असे मलाही वाटले,कारण माझ्या हातात नसणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा या परीक्षेत अंतर्भाव होता. वास्तविक आपले लग्न व्हावे असे मला मनापासून वाटतही नव्हते. आईची काळजी अनाठायी आहे असे मला फार वाटे,पण तिच्या जागी तिचेही बरोबर होते. माझ्या चुलत,मावस,आते बहिणी माझ्या आसपासच्या वयाच्या होत्या आणि त्यांची लग्ने झाली होती.

        आक्टोबर महिना आला.माझ्या लग्न झालेल्या दुसऱ्या बहिणीचा दिवाळसण होता, मी आणि आई त्या तयारीत होतो.आईच्या डोक्यात माझ्या लग्नाच्या काळजीचा किडा होताच पण दिवाळीच्या नादात त्याचा थोडा विसर तिला पडला असावा. त्या आठवड्यात बऱ्याच मुलांकडून माझ्या कुंडल्या जुळत असल्याची पत्रे आली. दिवाळीनंतर काही जणांनी भेटायला बोलावले होते. एकाच पत्रातील मुलाकडच्यांनी आमच्या घरी भेटायला येण्याचे कळविले होते. कळविल्याप्रमाणे ते एका संध्याकाळी आमच्या घरी आले. आई आणि मुलगा असे दोघे आले. माझी आई आणि मुलाची आई फार जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा मारीत होत्या. दिवाळीचे फराळाचे पदार्थच खायला ठेवले होते. अर्धा तासाच्या भेटीत मी काय बोलले किंवा मी काय विचारले मला आता काहिच आठवत नाही. माझ्या मैत्रीणीचे असे बरेच कार्यक्रम झालेले होते तिला मी विचारले होते, १५-२० मिनिटांच्या मुलाखतीत एखादी व्यक्ति पसंत कि नापसंत हे कसे कळणर? त्यावर तिने फार छान सांगितले होते ती म्हणाली, "पसंतीचा मला अजून अनुभव नाही आला,पण एखादी व्यक्ती नापसंत आहे हे कळायला पाच मिनिटेही पुरतात अगं"
आमच्या घरुन ते दोघे जायला निघाले जाताना आई त्यांना म्हणाली," आमची बाग मोठी आहे,मी खूप झाडे लावली आहेत आता काळोख झाला नाहीतर तुम्हाला दाखवली असती"
" पुन्हा येईन मी बघायला" त्या  म्हणाल्या
मला मनात हसूच आले, लग्न ठरल्यासारख्याच त्या दोघी बोलत होत्या.
मंड्ळी निघून गेल्यावर आईने सुरु केले," ह्या बाई फार चांगल्या आहेत, तू नाही म्हणू नको माणसं चांगली वाटतात......"
माझ्या मैत्रीणीच्या वाक्याचा विचार केला तर मला तो मुलगा नापसंत आहे असे वाटले नव्हते पण म्हणून पसंतच आहे असेही म्हणावेसे वाटले नाही.एकूण मला या मुलाखतीतून माझ्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय इतका झटपट घ्यावा हे पटत नव्हते. त्यांच्याकडचे उत्तर आल्यावर बघू असे म्हणून मी तिला झटकून टाकले.पण दोनच दिवसात त्यांच्याकडून मुलगी पसंत असल्याचा निरोप आला. आईने अखंड माझ्या मनावर तू नाही म्हणू नको असे बिंबवले. माझी मोठी बहीण दिवाळी झाल्यावर ट्रीपहून परत आली तिला आईने पुढील बोलणी करायला त्यांच्या घरी धाडले आणि अशा रितीने माझे लग्न एकदाचे ठरले!

      त्यावेळी कंत्राट पध्द्तीने लग्ने होत असत,पण आम्हाला तशा पध्द्तीने लग्न करुन देणॆ शक्य नव्हते. मुलाकडचे लोक कर्नाटकातले होते पण  त्यांची चाळीसाहून अधिक वर्षे पुण्यातच गेली होती त्यामुळे त्यांच्या बोलण्यातही कानडी हेल जाणवत नसत.पण दक्षिणेकडील लोक खूप हुंडा मागतात,चांदी-सोने खूप मागतात असे आम्हाला बऱ्याच लोकांकडून समजले होते तसे मागितले तर मी लग्न करणार नाही असे मात्र मी घरी स्पष्ट सांगितले होते.पण लग्नाच्या बैठकीत मुलाकडच्यांनी हुंडा,दागिने कशाकरीता अडविले नाही.
त्यांनी फक्त आमचे सातशे लोक लग्नाला येतील आदल्या दिवशी देखील कुठलेही कार्यक्रम नकोत असे सांगितले. शिवाय़ त्यांना लग्न फेब्रुवारी महिन्यातच हवे होते.माझ्या घरच्यांनी ते मान्य केले.एकूण हजार लोक तरी लग्नाला असणार.कारण आमचं गोत ही मोठच होतं अगदी काटछाट केली तरी आमची तीनशे माणसे तरी होत होतीच. दोन महिन्यात सगळी तयारी करणे आम्हाला खरोखरीच अवघड जाणार होते. मुख्य अडचण लग्नासाठी हॉल मिळविण्याची होती. पुण्यामधली सगळी कार्यालये बुक्ड होती. धनकवडी भागात सातारा रोडवर बरीच नवीन कार्यालये झालेली होती.त्यातले एक आम्हाला मिळाले.कार्यालय नवेकोरे,भरपूर ऐसपैस होते. आता बाकीची तयारी अवघ्या दोन महिन्यात कराय़ची होती. आमचे ओळखीचे आचारी होतेच त्यांच्या कडून यादी आणून सामान आणले. लाडू-चिवडा घरच्या अंगणातच केला. आदल्या दिवशी मार्केट यार्डातून भाजी आणून ठेवली.या सगळ्य़ातच साड्या खरेदी,केळवणे,लग्न पत्रिका छापुन आल्यावर आमंत्रणे आणि माझी नवी नोकरी सगळे चालुच होते.त्यावेळी मोबाइल तर नव्हतेच पण फोन देखील सगळ्यांकडे नव्हते त्यामुळे बाहेरगावची सोडली तर बाकी सारी आमंत्रणे समक्ष जावुनच करावी लागत. माझ्या दुसऱ्या बहिणीचे लग्न आधीच्या वर्षी झाले होते ती बाळंतपणाला आलेली होती. तिला कधीही दवाखान्यात न्यायची वेळ येईल अशी परिस्थिती होती. असा एकूण दोन महिने कामाचा गदारोळ चालू होता. यामधे नवऱ्या मुलीला मेंदी,नटवणे याकरीता ब्युटी पार्लर वा घरी ब्युटीशियन बोलावणे असले प्रकार नव्हतेच. मी लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑफिसला गेले होते त्यामुळे आदल्या दिवशी घरी आल्यावर मला बांगड्या भरल्या माझ्या एका मैत्रीणीने मला मेंदी काढली. आम्ही रात्रीच लग्नाच्या हॉलवर जेवण करुन झोपायला गेलो.

         लग्नाचा मुहूर्त सकाळी साडेनऊच्या सुमारास होता.लग्न वैदिक पध्दतीने होणार होते त्यामुळे लग्नाचे सगळे विधी मुहूर्तापूर्वी झाले. सकाळी साडेसात पासून कार्यक्रमांना सुरुवात होणार होती. माझी मंडईजवळ राहणाऱ्या माझ्या मावशीने लग्नासाठी लागणारे फुले हार आणावयाची जबाबदारी घेतली होती. ती रीक्षातून मोठाले दोन हारे घेवुन आली.तिच्या लेकी,सुना आवरून बसने येणार म्हणून त्यांनी त्यांच्या दागिन्यांची पिशवी मावशीजवळ दिली.रीक्षातुन उतरुन फुलांच्या टोपल्या नीट उतरवुन घेण्याच्या नादात मावशीच्या हातुन दागिन्यांची पिशवी रीक्षातच राहिली. हॉलमध्ये कुणाच्यातरी ताब्यात फुले दिल्यानंतर तिला दागिन्यांची आठवण आली , आणि ती मटकन खालीच बसली. तिच्या मुलाला तिने डोळ्यात पाणी आणून घडलेली घटना सांगितली.
पण तो तिलाच म्हणाला," आई, मावशीच्या घरातलं शुभकार्य आहे, अजिबात रडायचं नाही. कुणाजवळ बोलायचंही नाही. नंतर बघू काय करायचं ते "
तरी सगळी गडबड माझ्या सासऱ्यांच्या कानावर गेली. ते माझ्या मावशीला म्हणाले, "इथे गोंदवलेकर महाराजांचा फोटो आहे त्यांना मी कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी प्रार्थना केली आहे.तुम्ही निर्धास्त रहा."
आणि दहा मिनिटांत तो रीक्षावाला हॉलवर आला, त्याला पद्मावतीपाशी रीक्षात राहिलेली पिशवी दिसली ती द्यायला  तो भला माणूस परत आला, माझ्या मावसभावालाच तो मावशी बद्दल विचारु लागला,भावाने त्याला ५०रु.बक्षिस दिले, आईने चिवडा-लाडूचे पाकिट त्याला दिले.

        सकाळचे साडेसात वाजले.लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. पावणे नऊ-नऊ वाजेपर्यंत विधी चालू होते. साडेनऊ वाजता मुहूर्त होता.मधल्या पंधरा मिनिटात मला साडी बदलून गौरीहार पुजायचा होता.त्यासाठी वरच्या मजल्यावरच्या खोलीत जायचे होते.खोलीकडे जायला हॉलच्या दुसऱ्या टोकाकडील जिना होता.जायला आणि यायला मिळून किमान  पाच -सात मिनिटे लागणार होती. (नवऱ्या मुलीने धावणे बरे दिसले नसते.) घाईगडबडीत मैत्रीणींनी साडी नेसविली.गौरीहाराजवळ बसून पुजा केली.तोवर माझा मामाने लवकर चला असा धोसरा लावला.मामाचा हात धरुन बाहेर आले तेंव्हा हॉल माणसांनी पुर्ण भरुन गेला होता. गर्दीतून वाट काढीत आम्ही स्टेजवर पोहोचलो तेंव्हा गुरुजी आंतरपाट धरुन उभे होतेच, त्यांच्या हातात एक फुलाचा हार होता. ते मला म्हणाले,"तुम्ही वराला घालायचा हार कुठे?"
त्यांच्या हाराकडे बघून मी म्हणाले ,"तुमच्या हातात आहे तोच"
"हा तुमचा हार नव्हे हा नवऱ्यामुलाचा आहे, तुमचा हार आणा" गडबडीत हार वरच्या खोलीतच राहिला होता. मी तो आणायला जायचे कसे अशा विचारात पडले तेवढ्यात
 माझ्या मागे उभी असलेल्या बहिणीने मला थांबविले आणि तिने कुणाला तरी हार आणायला पिटाळले. दरम्यान मंगलाष्टके सुरु झालेली होती. ’तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्र्बलं तदेव ..’ होईपर्यंत माझ्या हातात हार आलेला होता. अजुनही कधी कधी माझ्या मनात विचार येतो त्यावेळी हार वेळेवर आला नसता तर काय झाले असते?

       लग्नाची ही अशी गडबड चाललेली असतानाच तिकडे आमचे आचारी कामत स्वयंपाकाला लागणार,त्यांनी त्यांच्या मदतीला चार सहकारी आणि दहा वाढपी सांगितले होते.पण त्या दिवशी पुण्यातील सगळ्य़ाच कार्यालयांमध्ये लग्न असल्याने त्या लोकांना गावातच काम मिळाले त्यामुळे धनकवडीपर्य़ंत त्यांचा एकही सहकारी आला नाही. कामतांनी हि बातमी माझ्या मामांना सांगितली. साडेनऊला लग्न लागल्यानंतर साडेआकरापर्यंत स्वयंपाक होणे आवश्यक होते. एक हजार लोकांचा स्वयंपाक एकटा  माणूस तीन-चार तासात करणे अवघडच नव्हे तर अशक्य होते. कामत अगदी रडवेले झाले.पण माझे मामा अतिशय धीराचे आणि कुठल्याही प्रसंगाला शांतपणे सामोरे जाणारे आहेत.ते म्हणाले
"कामत, हे कार्य आपलं आहे, ते छानच झाल पाहिजे.तुम्हाला मदतनीस हवेत ना? आम्ही सगळे आहोत ना ! तुम्हाला हवी ती मदत आम्ही करतो"
म्हटल्याप्रमाणे माझ्या मामी,मावशा,काकू,आत्या,सख्या,चुलत,मामे,आते ,मावस बहिणी,मैत्रीणी सगळ्या आपल्या सुंदर साड्य़ांमधे स्वयंपाकघरात गेल्या भाज्या चिरणे,चटण्या वाटणे अशी कामत सांगतील ती कामे त्यांनी केली.आणि साडे अकरावाजता पहिली पंगत बसली. सगळ्य़ा पंगतींत वाढण्याचे काम माझे भाऊ,काका,मामा,मैत्रीणी यांनी केले. आपली पद,प्रतिष्ठा सगळे बाजुला ठेवुन केवळ माझ्यावरील प्रेमापोटी या साऱ्यांनी एवढे काम अगदी आनंदाने,आग्रहाने केले. एवढ्या आलेल्या पाहुण्या मंडळींपैकी कुणालाही लग्नात कसली उणीव दिसली नाही.

       आजकाल लग्ने मोठ्या झोकात पार पडतात.आता लोकांजवळ पैसा आहे,हौस आहे. ती पुरवायला साधनांची उपलब्धता आहे. कापड खरेदीकरीता केवढी मोठी बाजारपेठ आहे.देशाच्या कुठल्याही गावातून खरेदी ऑनलाईन करता येते. पु.ल.देशपांड्य़ांच्या ’नारायण’ ची जागा इव्हेंट मॅनेजमेंट ने घेतली आहे.ब्युटीपार्लर,मेक-अप,फोटो यांचे आजचे खर्च ऐकून धक्का बसतो,मग हॉल, जेवण, रिसेप्शन, कपडे याबद्दल तर बोलायलाच नको. आमच्या वेळी हे नव्हते ते बरेच म्हणायचे कारण खर्च करायला आमच्याजवळ तेवढा पैसा नव्हता.पण माझ्या आईवडीलांनी जोडलेल्या माणसांची किंमत अनमोल होती. त्यामुळे आम्हा बहीणींची लग्ने सुरेख पार पाडली.त्या कार्यात श्रीमंतीचे प्रदर्शन नसेल कदाचित पण प्रेम,माया आपुलकी आणि आदरातिथ्याचे ऐश्वर्य होते. आम्हा तिघी बहिणींची सासरचे लोक देखील माणसांना धरुन असलेले असल्याने सासरी आम्हाला विशेष जड गेले नाही.

    बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे संसारात आधी हाताला चटके घेत घेत भाकरी मिळाली. सुख दुःखांशी सामना करत म्ह्णता म्हणता पंचविस वर्षे संपली. मुली हल्लीच्या जमान्यातल्या असल्यामुळे आई-बाबांच्या लग्नाला पंचवीस वर्षे होण्याआधीच तुम्ही काय करणार? असे विचारु लागल्या.
"आई बाबांनी दोघांना कुठेतरी ट्रीपला जाऊदे"
"नको, ते बाहेर गेले तरी भांडत बसणार,त्यापेक्षा घरीच राहूदे" असे त्या दोघींचेच विचार विनिमय सुरु होते.
आपल्या देशात पंचविस वर्षे एकत्र राहण्यात फार मोठे विशेष असे अजुन तरी नाही . त्यामुळे खास काही करावे असे मला काही वाटत नव्हते. माझ्या नवऱ्याने संसाराच्या बाबतीतले सगळे निर्णय माझ्यावर सोपवले आहेत.( त्यांना इतर कामे बरीच असतात आणि ती घर, संसाराहून नेहमीच फार महत्त्वाची असतात त्यामुळे त्यांनी काही ठरवायचा प्रश्ण् नव्हताच.)
त्या दिवशी संध्याकाळी तरी बाहेर जेवायला जाऊ असे मुलींनी सुचविले.आमच्या घराजवळ नवऱ्याचा कॉलेजमधील मित्र राहतो. त्यांच्याकडे आमचे नेहमी जाणेयेणे असते.आमच्या मुलींच्या बडबड्या स्वभावामुळे त्या दोघींचेच ते जास्त मित्र बनले आहेत. त्यांच्या पत्नीची आणि माझीही छान मैत्री आहे. चौघांनीच जेवायला जाण्यापेक्षा आमच्या या स्नेह्यांना पण घेवुन जायचे ठरले. मग संध्याकाळी आम्ही त्यांच्या घरी गेलो. धाकटी लेक तेथेच येण्याचे ठरले होते. त्या काकांना ऑफिसमधुन यायला उशीर होत असल्याने ते परस्पर हॉटेलवर  येणार असे ठरले. सात नंतर धाकट्या मुलीचा फोन आला ती घरी आवरायला गेली होती आणि तिने आम्हाला परत घरी बोलावले तिला नेण्याकरीता. या सगळ्यामधे पाऊण ते एक तास गेल्यामुळे बराच वेळ वाया गेल्याने नवऱ्याची मनातुन खूप चिडचिड झाली.

        शेवटी आम्ही घरी गेलो. सगळ्यांनी वरच जाऊ असे मोठ्या मुलीने सांगितले. तिच्या सांगण्याला विरोध करुन वाद वाढायला नकोत म्हणून आम्ही वर गेलो. बेल वाजवली.मुलीने दार उघडले आणि आत बसलेल्या पाहुण्यांना बघुन आश्चर्य आणि आनंदाने मला खरोखरीच काही सुचेचना ! मुलींनी आम्हाला नकळत आमच्या सुमारे तीसपस्तीस  नातलग आणि मित्र मंडळींना बोलावले होते. मुलींनी आपल्या कटात घराजवळ राहणाऱ्या मावशी आणि काकाला सामील करुन घेतले होते,त्या उभयातांनीही दोघींना सर्वतोपरी मदत केली.दुपारी त्यांच्याच घरी पावभाजी केली होती. मुलींच्या हौसेसाठी त्या मावशीने बराच त्रास घेतला. तिच्याच मार्गदर्शनामुळे पावभाजी फारच छान झाली होती. एरवी घरात फारसे काम न करणाऱ्या माझ्या मुलींनी पावभाजी झाल्यावर मावशीचे स्वयंपाकघर चकाचक आवरुन ठेवले होते. केक आणला होता. कागदी -प्लेट्स, चमचे,ग्लास पासून सगळ्याची जमवाजमव केलेली होती. आमचा नातलग परीवार तसेच मित्र परीवारही खरचच खूप मोठा आहे. इतक्या साऱ्यांना आमच्या अपरोक्ष कळविणे आणि त्यांच्याकरीता काही बनविणे दोघींना शक्य नव्हते. धाकटी लेक अजुन शिकतच आहे, थोरली पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रयत्नात आहे म्हणजे एकूणात त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसल्याने एखादा छोटा हॉल बुक करुन केटरर बोलावणे आदी त्यांना जमणारे नव्हते.म्हणून त्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आम्हा उभयतांचे काही लोक बोलावले. त्यात माझ्या नवऱ्याला खोखो शिकवणाऱ्या सरांना जेष्ठ् व्यक्ति म्हणून बोलावण्य़ात त्यांनी जे औचित्य दाखविले त्याचे मला खूप कौतुक वाटले. धाकटीने मोजक्या पण सुरेख शब्दात आम्हाला एक पत्र लिहिले होते त्याचे वाचन केले. सर्वांना आल्याबद्दल त्या दोघींनी हातानी थॅंक्यु कार्डस् देखील बनविली होती !

        माझ्या लग्नात ज्या आपुलकीने कार्याला शोभा आली तशाच माया आणि आपुलकीने आमचे सगे-सोयरे मुलींच्या आग्रहाला मान देवुन लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला आले. मुलींचे कौतुक केले आणि न्यून ते पुरते करुन तो कार्यक्रम सुरेख पार पडला. माझ्या मुलींना आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस त्यांच्या लोकांना बोलावुन  साजरा करावासा वाटला याचा मला फार आनंद झाला. शेवटी सुख आणि आनंदाच्या कल्पना व्यक्तीसापेक्ष असतात. लग्नाचा रौप्य महोत्सवी वाढदिवस दोघांनीच कुठेतरी जावुन साजरा करण्यात मला तरी  कितपत आनंद वाटला असता याबद्दल शंकाच आहे. मुलींना सोडून रहायला मला जडच जाते आणि आपल्या आनंदाच्या प्रसंगात आपले जवळचे लोक आले तर तो द्विगुणित होतो असं मला वाटत. मुलींना आईचं मन समजलं, मुली मोठ्या झाल्या असं मला फार प्रकर्षाने जाणवले. जोडलेल्या माणसांची संपत्ती सर्वश्रेष्ठ हे आम्हा उभयतांच्या आईवडीलांचे संस्कार मुलींपर्यंत पोचल्याचं समाधानही खूप आहे.
   

Thursday, January 9, 2014

आईची समाजसेवा

          माझ्या आईचा घरादारालाच नाही तर आमच्या साऱ्या गल्लीलाच धाक होता. तिचं व्यक्तिमत्वही भारदस्त होतं. माझ्या लहानपणातली आठवण आहे, आम्ही तेंव्हा एस.पी. कॉलेज मागच्या चाळीमधे रहात होतो.पलीकडच्या चाळीत कॉलेजच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी रहायचे.त्यातील एका शिपायाचा मोठा मुलगा यशवंत उर्फ येशा दारु पिऊन धिंगाणा घालत असे. त्याच्या तरुण बायकोला मारहाणसुध्दा करायचा. आमच्या बाजुला नेहमीच आवाज येत नसे,पण एकदा बराच ओरडा झाल्याने त्यांच्या घरासमोर बरीच गर्दी जमली होती.तो खोलीत बायकोला मारत होता, माझ्या आईच्या कानावर जाताच ती घरातले काम टाकुन तिकडे गेली.गर्दीतुन त्यांच्या घरात शिरली आतल्या खोलीत दार लावुन तो शिव्या देत बायकोला बडवत होता.तिचा रडण्याचा आवाज येत होता.आईने दाराची कडी जोरात आपटली त्याहुन वरच्या पट्टीतल्या आवाजात त्याला हाक मारली आणि दार उघडायला लावले. दार उघडताच त्याच्या बायकोला हाताला धरुन बाहेर काढले आणि त्याला खोलीत ठेवुन खोलीचे दार बाहेरुन लावुन ती बाहेर पडली. बाहेर उभ्या असलेल्यांवरही तिने ," नुसते बघत काय बसला होतात? या पोरीचा जीव गेल्यावर तुम्ही पोलिसांना कळावणार होतात का?" असा जाब विचारत त्या मुलीला घेवुन ती आमच्या घरी आली.
दुसऱ्या दिवशी दारु उतरल्यावर येशा खली मान घलुन आमच्या घरी आला. आईची माफी मागत म्हणू लागला," माझं चुकलं, तुम्ही मला आईसारख्या आहात...."
त्याबरोबर उसळून आई म्हणाली, "तुझ्यासारखा दारुडा मुलगा मला नको, अरे चांगली हौशीनी एवढी गुणी पोर करुन आणालीस आणि तिला मारतोस? लाज कशी वाटत नाही तुला? माझ्या समोर शपथ घे पुन्हा असं वागणार नाही तस वागुन दाखव, मगच मला आई म्हण "

    पुरग्रस्तांसाठी वसविण्यात आलेल्या सहकारनगरमधे आम्ही रहायला गेलो त्यावेळी तो भाग पुण्याच्या बाहेर वाटायचा.सगळी शेतजमीनच होती ती.बांधकामे चालू होती.रस्ते देखील मातीचेच होते. रहावयास आलेले लोकही फार नव्हते. आमच्या घरासमोरच्या घरांमागे पटांगण होते तेथे बांधकामावर काम करणऱ्या कामगारांच्या झोपड्या होत्या. एक दिवस आईला बराचवेळ कुणी बाई रडत असल्याचा आवाज येत होता. तिची सकाळची कामे उरकल्यावर तिला आवाज जास्तच जाणवु लागला. घरात चैन पडेना तिला. घर  बंद करुन ती आवजाचा शोध घ्यायला बाहेर पडली. पटांगणातील झोपडीमधे एक लमाण बाई, बाई कसली वीस-बाविशीतली मुलगी रडताना तिला सापडली. तिचं तान्ह मुल देवाघरी गेलं होतं , वस्तीतली मोठी बायका आणि पुरुष माणसे कुठेतरी बांधकामावर गेलेली होती.तिच्या मांडीवर तिचं लेकरु गतप्राण झालेलं होतं.दुःखान उर फुटुन ती रडत होती, आजुबाजुला वस्तीतली एक दोन लहान मुलं कावरीबावरी होवुन बसलेली होती. ते दृष्य मोठं विदारक होतं, आईनं तिला शांत केलं हि घटना मोठी माणसं कामावर गेल्यावर झाली होती सकाळ पासुन त्य़ा पोरीच्या आणि त्या मुलांच्या पोटात काही गेलेल नव्हत. आई घरी आली घरातल अन्न घेवुन पुन्हा तिकडे गेली त्या सगळ्यांना तिन खाय़ला लावल. त्यावेळी फोनही फारसे नव्हते मग मोबाइल तर दुरच.शिवाय त्या पोरीला काम कुठे चाललय हेही माहित नव्हत , मग तिकडे जावुन त्या लोकांना आणण्याचा प्रश्ण नव्हताच. संध्याकाळी अंधार पडल्यावर त्या वस्तीतुन पुन्हा रडणे सुरु झाले, आई पुन्हा तिकडे गेली त्या मुलाला मोठी माणसे स्मशानात घेवुन गेली ती परत आल्यावर आईने त्यांना चहा नेवुन दिला, भात -पिठल पाठवल. मुलं आजारी पडली कि लगेच उपाय करा म्हणजे हि वेळ येणार नाही हे सांगाय़लाही ती विसरली नाही. पुढे बरीच वर्षे बांधकामाच्या निमित्तानं ह्या झोपड्या आमच्या भागात असायच्या, तिथली मुलं सर्दी -खोकल्यानं आजारी पडली तर आई बागेतला गवती चहा, पारीजातकाची पान,आल्याचा तुकडा देवुन त्याचा काढा कराय़ला सांगायची, आमच्या कडे काढा तयार असला तर तोच त्यांना द्यायची.

    सोसायटीत घराघरांतुन छोट्या-मोठ्या कुरबरी चालत. येथे रहायला आलेली मंडळी बहुतेक नारायण-शनिवार पेठांमधल्या वाड्य़ातुन, चाळीतुन आलेली त्यामुळे फ्लॅट,बंगले संस्कृती त्यांच्या अंगवळणी पडलेली नव्हती. दारे -खिडक्या उघड्याच असत सगळ्या घरांच्या. त्यामुळे आवाज गल्लीभर ऐकायला येत, शिवाय वाहने नव्हतीच त्यावेळी. समोरच्या घरांतील एकांकडे नवीन सून आली होती आणि तिच्याशी घरचे पटवुन घेत नसत. एकदा त्यांच्या घरातुन बराच आरडाओरडा ऐकू येत होता. आजुबजुच्या घरातुन सगळे तमाशा बघत होते. आई तिकडे गेली, तिच्या ठेवणीतल्या आवाजाने तिने सगळ्यांना शांत केले. नव्या सुनेला घेवुन ती आमच्या घरी आली. तिने सासरच्या लोकांचा तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली. तिचे माहेर दूर भुसावळला होते. भावाने कर्ज काढुन लग्न करुन दिले होते. माहेरी कळवुन त्या लोकांना त्रास देणे तिला नको वाटत होते. तिचा बी.ए. चा एक पेपर राहिला होता. आई तिला म्हणाली, " तुझ्या घरच्या भांडणांबद्दल मला काही सांगु नको, घरोघरी तेच चालत. तू रिकामी बसू नको, अभ्यास करुन पदवी मिळव, माझ्या घरी अभ्यासाला येवुन बस. जवळ कामगार कल्याण केंद्र आहे, तिथे जावुन शिवण शिक. चार पैसे कमवायला लाग. भांडण आपोआप कमी होतील"

    आमच्या पलिकडच्या सोसायटीत एक सरकारी ऑफिसर रहात होते ते सैन्यातुन निवृत्त होवुन मग एका डिफेन्स ऑफिसमधे नोकरीला होते, त्यांच्या मुलाला जन्मतः कानामध्ये दोष होता, त्याला कमी ऐकू येई, शाळेत अभ्यासात कमी पडल्यावरच हि बाब त्यांच्या लक्षात आली. तो मुलगा आमच्या घरी शिकायला येत होता. आई त्याला शिकवत असे. घरी केलेला प्रत्येक खाऊ त्याच्याकरता आई ठेवत होती. पुढे तो मोठा होवुन बॅंकेत नोकरी लागला. आईकडे पेढे द्यायला आला होता.तेंव्हा म्हणाला, " बाई मी लहानपणी किती दंगा करायचो, शाळेत मुले मला चिडवायची. शाळेत शिकवलेले मला समजायचे नाही , मार्क मिळायचे नाहित त्यामुळे  मी माझ्या बाबांचा खूप मार खाल्लाय. तुम्ही एकट्या मला कधी रागावला नाहीत माझ्याशी नेहमीच प्रेमानी वागलात. तुमच्यामुळेच मी आज नोकरी मिळवू शकलो."

    सोसायटीत आमच्या शेजारी सातारचे एक बिऱ्हाड आले त्यांच्या बायकोला के.ई.एम मधे नोकरी होती त्या नर्स होत्या. त्यांना शिफ्ट ड्युटी असे. त्यांच्या लहान मुलाचा सांभाळण्याचा प्रश्ण होता. त्यावेळी पाळणाघरे फारशी नव्हती. आणि त्यांच्या वेळात म्हणजे अवेळी असलेल्या नोकरीमुळे पाळणाघर मिळत नव्हते. त्या आईकडे आल्या आईने सहज त्यांच्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली.

        मी एन.आय.बी.एम.मधे नोकरीला असताना आमच्या ग्रुपमधे एक केरळी ख्रिश्चन ऑफिसर आले होते त्यांचे पहिले नाव विल्सन होते. त्यांना मुलगा झाला, तो वजनाने कमी होता आणि त्यांच्या बायको्ची तब्येतही गंभीर होती.हे ऑफिसर पुण्यात नवीनच असल्याने त्यांचे कुणी नातलग पुण्यात नव्हते, पुण्यात त्यांचे कुणी मित्रही नव्हते. त्यांच्या बाळाला सारसबागेजवळील अजेय जोशींच्या हॉस्पीटल मधे ठेवले होते, बायको के.इ.एम. मधे ऍडमीट होती. दोन्ही ठिकाणी थांबणे त्यांना जमणार नव्हते. त्यांची अडचण मी सहज आईला सांगितली. ती लगेच म्हणाली, " मी जाईन की जोशी हॉस्पीटलमधे बाळाजवळ थांबेन मी, त्यांना सांग काही काळजी करु नका मी तू ऑफिसला गेलीस कि आवरुन डबा घेवुन तिथे जाऊन बसेन" म्हटल्याप्रमाणे ती तेथे गेली. विल्सन साहेबांना इंग्लिश आणि मल्याळी येत होते, त्यांना हिंदी मराठीचा गंध नव्हता.  ते आल्यावर आई त्यांच्याशी कुठल्या भाषेत बोलली तिलाच माहित. पुढे मी एन.आय.बी.एम. सोडली. नंतर दोन -तीन वर्षांनी माझे लग्न झाल्यानंतर माझ्या नवीन ऑफिसचा नंबर शोधुन त्यांनी मला फोन केला आणि ते परदेशात जात असल्याचे सांगितले जाण्यापूर्वी त्यांना मला आणि माझ्या आईला भेटायचे होते. वेळ ठरवुन ते माझ्या घरी आले, आईलाही मी माझ्या घरी(सासरी) बोलावले होते. त्यांनीच माझ्या घरी सगळी कथा सांगितली आणि त्यांचा तो लहानगा आता चांगला  तीन-चार वर्षांचा गोंडस मुलगा झाला होता, त्यालाही ते आईबद्दल सांगत होते.

     कित्येक ओळखीच्या मुलींची लग्ने तिने जमवली. दूर गावाहून नव्याने सासरी आलेल्या आमच्या सोसायटीतल्या सुनांना आमच्या कडे आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटे. आमची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हतीच, दादांची सरकारी नोकरी होती.घरात नेहमीच पाहुणे असत.आम्ही तिघी बहिणी. आई संसाराला हातभार म्हणुन शिवण शिवायची. छोट्या-मोठ्या शिकवण्या घ्यायची. पण कुणालाही मदत करताना तिने आपल्या फाय़द्याचा कधी विचार केला नाही. तिने मदत केल्यामुळे कल्याण झालेल्या अनेकांनी नंतर तिची विचारपुसही केली नाही याचा कधीतरी तिला त्रास होई ,पण तरी तिने तिचा दुसऱ्याला उपयोगी पडण्याचा मार्ग तिने सोडला नाही. हे सगळं ती चांगुलपणा मिळावा म्हणून करत होती असंही नाही.वेळ प्रसंगी वाईटपणा घ्यायची देखील तिची तयारी होती.  अतिशय परखड आणि स्पष्ट बोलण्याचा तिचा स्वभाव होता. माझ्या बहिणीची एक मैत्रीण कॉलेजमधे जाऊ लागली आणि नकळत्या वयात एका मुलाच्या प्रेमात पडली.घरी हि बातमी समजली होती आणि तिच्या घरुन तिला अभ्यास कर हे वय नाही लग्नाचं अशी समज दिली जात होती.ती त्या मुलाबरोबर पळून जाणार होती आणि या कामात तिला माझ्या बहिणीची किंवा माझी मदत हवी होती. एक दिवस ती घरी आली आणि मला तिने घराच्या बाहेर नेले अंगणात हलक्या आवाजात ती मला सांगत होती आई आतुन कधी बाहेर आली आम्हाला समजलेच नाही.तिने आमचे बोलणे थोडेफार ऐकले असावे.तिने मैत्रीणीचा हातच धरला आणि तिला तिच्या घरी नेले. तिच्या बाबांच्या ताब्यात तिला देवुन आई घरी आली या गोष्टीची तिने कुठेही वाच्यता केली नाही. तो मुलगा लफंगा होता,वयाने बराच मोठा फारसा न शिकलेला उनाडक्या करणारा होता असे नंतर समजले. तिच्या वडीलांनी नंतर घरी येवुन आईचे आभार मानले , आईच्या अगदी पायाच पडायचे त्यांनी शिल्लक ठेवले होते. त्यांच्या मुलीला आईने मोठ्या संकटातुन वाचवले होते. मैत्रीणीच्या नजरेत आई बरेच दिवस खलनायिकाच होती. आमच्या मैत्रीवर त्याचा परीणाम झालाच काही दिवस. अशा असंख्य आठवणी आहेत. काही आमच्या समोर घडलेल्या तर कित्येक आम्हाला माहितही नसलेल्या.

    मला काय करायचय? त्यांचं ते बघुन घेतील असा विचार करणारी आजची पिढी, नव्हे आमचीही पिढी बघताना आईच्या या वागण्यातलं मोठेपण फार जाणवतं. हल्ली मुलांच्या आत्महत्या, तरूण वयात येणा्रे वैफल्य,नैराश्य यांसारखे वाढते मानसिक आजार आणि वाढत्या समुपदेशकांची संख्या बघताना मला आईची सतत आठवण येते. आपण आजुबाजुला न बघता आपल्या कोषात वावरतो, शेजारच्यांच्या अडचणी आपल्याला दिसत नाहीत, दिसल्या तरी तिथे बोलावल्याशिवाय जाणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे असे आपल्याला वाटते. शेजारच्या गल्लीत झालेल्या आत्महत्येची बातमी आपल्याला पेपरमधे किंवा टि.व्ही वरुन समजते.त्याबद्दल हल्लीच्या पिढीला, बदलत्या समाजाला आपण दुषणे देतो.पांढरपेशा समाजातील कातडीबचाऊ वृत्ती आम्ही अंगी बाणवल्यामुळे समाजात हे वाढते प्रश्ण निर्माण होत आहेत.अशा वेळी आईचे अडचणीत असलेल्यांच्या घरात विचार न करता घुसुन त्यांची अडचण निवारण्यासाठी मार्ग सुचविणे, प्रसंगी कठोर होणे हे केवढ मोठं काम होत ते आता समजतं. माझी आई काही फार शिकलेली नव्हती, जुन्या काळात मुलींना शिकवायची फारशी तयारी नसे, तिने घरच्यांशी भांडुन मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण मिळवले होते.पुढे लग्नानंतर आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने  शिकायची आवड असून तिला शिकायला मिळाले नव्हते. पण तिच्याजवळ दुरदृष्टी होती. शिक्षण नसलं तरी तिची हुशारी तिच्या कामात, वागण्यात दिसायचीच. सामजिक बांधिलकीचा तर तिला कधीच विसर पडलेला नव्हता. आम्हाला कधी कधी आई हे कशाला करतीय असं वाटे. पण ती आमची पर्वा न करता सगळ्यांच्या मदतीला धावायचीच.  आईमधले हे कुठलेच गुण माझ्यात आले नाहीत.तिचा तोंडावर आमचे कौतुक न करण्याचा स्वभाव मात्र मी घेतला. आज ती या जगात नाही. तिच्या सतत दुसऱ्याच्यासाठी काही करणाऱ्या हातांना कंपवात झाला होता. तिच्या वेदना आम्हाला बघवत नव्हत्या. दिड वर्षापूर्वी त्यातुन तिची कायमची सुटका झाली. संक्रातीच्या आदला म्हणजे भोगी हा तिचा जन्मदिवस होता. त्यामुळेच कदाचित तोंडावर गोड बोलणे, तोंडदेखले गोड बोलणे किंबहुना गोड बोलणे तिला कधी जमलेच नाही. तिच्या पश्चात तिच्या असंख्य गुणांपैकी काहींचे स्मरण आणि वर्णन करावे असे आज मनापासुन वाटले. तिच्या जयंतीला माझ्याकडुन  तिला ही शाब्दिक श्रध्दांजली !

Friday, December 6, 2013

मी मायक्रोवेव्ह ओव्हन घेते

 लहानपणापासून मला खाण्याची खूप आवड. तरेतऱ्हेचे खाद्यपदार्थ मोठ्या चवीने खायची हौस. त्यातही गोडाच्या जेवणाची तर फारच आवड. रोज जेवणात गोड पदार्थ लागायचाच.अगदी गुळांबा,साखरांब्यापासून काहीच नसेल तर तूप साखर पोळी तरी लागेच मला. मात्र स्वयंपाक करायचा तेवढाच कंटाळा. घरात आई करायला भक्कम होतीच, आजीचाही मुक्काम असे, मोठी ताई होती त्यामुळे माझ्यावर कामाची वेळ येत नसे आणि आली तरी टाळण्यात मी तरबेज होते. काम न करण्यावरुन मी आईची खूप बोलणी खायची. आजीला फक्त विश्वास होता, "मनात आणल तर ती इकडचा डोंगर तिकडे करेल"  असे ती माझ्या वतीने आईला सांगायची. " हो,पण तिच्या मनात यायच कधी?" चिडून आई विचारी. "येईल गं, वेळ आली कि सगळं करेल ती, बघशील तू" असं समजावत ती मला खेळायला किंवा वाचायला पाठवुन देई.

    चांगली आठवी-नववीत जाईपर्य्ंत  चहा देखील केलेला मला आठवत नाही. नववीत असताना शाळेत आंम्हाला ’कार्यानुभव’ असा विषय होता त्यात एका सहामाहीला ’बेकरी’ नावाचा विषय होता. दुपारच्या तासांना बाई केक, ब्रेड, नानकटाई अशा विविध चविष्ट (आणि त्याकाळी आम्हाला अप्रुपाच्या वाटणाऱ्या) पदार्थांच्या कृती(आजच्या भाषेत रेसिपीज) लिहून द्यायच्या. त्यानंतर मुलींचे गट पाडून हे पदार्थ करावे लागत, त्यासाठी लागणारे सामान शाळेकडून मिळत असे. एखाद्या दक्ष गृहिणीच्या वेषात बाई प्रत्येक गटाला नीट मोजून सामान देत आणि कृतीत दिल्याप्रमाणे नीट करा, वाया घालवू नका अशी समज देत. आमच्या गटात काही मुली भलत्याच हौशी होत्या, अभ्यासात त्या थोड्या मागे होत्या, मग आमच्यात एक गुप्त करार झाला, या तासाचे काम त्यांनी करायचे त्याबदली त्यांना गृहपाठाच्या वह्या आम्ही द्यायच्या. मग काय कार्यानुभवाच्या तासाला आमचा तीन चार जणींचा उनाड ग्रुप गप्पा मारत बसायचा. तयार झालेला पदार्थ आम्हांलाही खायला मिळेच, कधीकधी बाईंची बोलणी पण खावी लागत. पण सगळ्यांनी तेथे गर्दी करण्याने होणाऱ्या गलक्यापेक्षा आमचे गप्पा मारणे बाईंनाही सोईचे ठरे. शेवटी परीक्षा आली, आम्हा प्रत्येकीला एक पदार्थ घरुन करुन आणायला सांगण्यात आले. वार्षिक परीक्षा, पास होणे अनिवार्य. मला केक करायचा होता. आईने त्यात अंडे असल्याने पूर्ण असहकार दाखवला , (शिवाय तिला वाटले असेल ,’बरी सापडली,आता न करुन सांगते कुणाला?’ ) शेवटी वही उघडली, त्यात लिहिलेले साहित्य, अंडे सोडून बहुतेक गोष्टी घरात होत्याच, वहित वाचून सगळे जसेच्या तसे केले, मातोश्री स्वयंपाकघरात आल्या देखील नाहीत. तयार केलेले मिश्रण एका सपाट बुडाच्या पितळी भांड्यात(आईच्या भाषेत त्या भांड्याचे नाव लंगडी होते) घातले, गॅसवर एक तवा ठेवला त्यावर ती लंगडी ठेवली वरून झाकण ठेवले, तव्यावर थोडी वाळू पसरली होती. वहीत लिहिल्याप्रमाणे साधारण तीस-चाळीस एक मिनिटांनी गॅस बंद केला, घरभर केकचा खमंग वास सुटला होता, केक चक्क सुंदर फुगलाही होता.पण तो खाता येत नव्हता कारण शाळॆत दाखवायला न्यायचा होता. दुसऱ्या दिवशी शाळेत नेवुन दाखवला, चांगले मार्क मिळवले.  तो घरी आणून कधी खाऊ असेच झाले होते मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला. वडीलांनी , मोठ्या बहिणीने माझे खूप कौतुक केले, आजीनेही ’बघ, मी म्हटल नव्हतं मनात आणल की ती सगळ करते ’ या विधानाची खात्री झाल्याबद्द्ल शाबासकी दिली. आई म्हणाली," जमलयं तुला पण करत जा असच नेहमी, ....." पण इतके होवुनही आपल्याला वहित वाचून पदार्थ करता येतो हा विश्वास वाटल्याने पुन्हा मी त्या वाटेला फारशी कधी गेले नाहीच.

    ’मराठीने केला कानडी भ्रतार’ अशी माझी गत होती.सासर कन्नड असल्यामुळे तिकडच्या स्वयंपाकाच्या रितीभाती इकडच्यापेक्षा अगदीच वेगळ्या. माझी पाटी कोरी असल्याचा मला फायदाच झाला. माझ्या सासुबाई खूपच सुगरण होत्या, सगळ्या प्रकारचे पदार्थ करायची आणि लोकांना खाऊ घालायची त्यांना हौस होती, मी  नोकरी करत होते. पण मी शिकण्याचे धोरण धरले,त्यांनी पण कौतुकाने मला इडली-डोशापासून सार,सांबार,नारळाच्या पोळ्या आणि मंगळूरकडचे खास पदार्थ ही शिकविले. मराठी मुलींना स्वयंपाक जमत नाही असा आपल्यावर बट्टा येवू नये या मराठीच्या अभिमानापोटी आपल्याला सगळे आले पाहिजे या हेतूने का होईना मी सगळे शिकले आणि नकळत स्वयंपाकाच्या पाशात गुरफटले. तरी टि.व्ही वरील शो बघून ,किंवा मासिक-पुस्तक वा वर्तमानपत्रातील पदार्थ वाचून करुन बघण्याची सवय मला अजूनही लागलेली नाही. पण सुदैवाने (कि दुर्दैवाने?) माझे पदार्थ फारसे कधी बिघडले नाहीत. लाडवाचा पाक असो, कि पोळीचा गूळ मला जमतो, तिळगूळाची मऊ वडी खुसखुशीत होते आणि कडक वडी कुरकुरीत बनते,चिरोट्याला पापुद्रे सुटतात, पुरणपोळीही न तुटता तव्यावर चढते. मोदकाची उकड छान होते.थोडक्यात सुगरण म्हणावे इतपत सगळे जिन्नस मला करायला येतात. माझ्या सासुबाईंना याचे श्रेय जाते कारण त्यांनी योग्य मापात मला पदार्थ शिकविले. माझी आईदेखील सुरेख स्वयंपाक करायची पण तिला विचारले तर तिला कधीच प्रमाण सांगता यायचे नाही. अंदाजानेच ती सगळे घेत असे आणि चव न बघता सुध्दा तिचा पदार्थ चविष्ट होत असे, शिवाय कधीही तिच्या भाजी आमटीची चव बदलत नसे. तिला नेहमीच किमान १०-१५ लोकांचा स्वयंपाक करावा लागल्याने तीन -चार जणांचे माप तिला सांगता येत नसे. स्वयंपाकाची सवय झाल्यानंतर मी देखील अंदाजानेच सगळे करु लागलीय आणि मला पण कुणाला चटकन मापाने सांगायला येत नाही आता.
एकंदरीत माझी मुळ प्रवृत्ती ’सुगृहिणी’ नव्हती. मात्र अंगावर पडलेले काम मनापासून, आनंदाने करण्याची वृत्ती असल्याने मी स्वयंपाक करते. तो सगळ्यांना आवडतो. आले-गेले,पै-पाहुणे ,नातलग माझ्या पदार्थांवर खुष असतात .कुणालाही तोंडदेखले चांगले न म्हणणाऱ्या स्पष्ट्वक्त्या माझ्या आईने मला चांगला स्वयंपाक करतेस असे प्रशस्तीपत्रक दिले यातच सगळे आले. माझ्या मुलींना मी केलेले पदार्थ आवडत असल्याने मी नवनवे पदार्थ शिकत गेले , करुही लागले. अगदी चायनीज, पंजाबी , इटालियन असे वेगावेगळे प्रकारही जमु लागले. शेवटी कुठल्याही पदार्थातील घटकांचे प्रमाण योग्य पडले आणि तो नेमकेपणाने शिजला कि चव चांगली होणारच. हल्ली मिक्सर, फुड प्रोसेसर,इलेक्ट्रिक रगडा अशा विविध साधनांच्या सहाय्याने पदार्थ करणे खरोखरीच खूप सोपे झालेले आहे.  या आधुनिक साधनांमुळे कुठलाही पदार्थ सहज होवु शकतो. खलबत्ता,पाटा-वरवंटा,उसळ-मुसळ,जाती अशी साधने वापरुन चुली शेगड्यांवर जमीनीवर बसुन रुचकर स्वयंपाक करणाऱ्या पूर्वीच्या बायकांची आणि त्यांच्या शारीरिक कष्टांची कमालच वाटते.

     माझ्या सासुबाई फारच हौशी होत्या त्यांनी सगळ्या प्रकारची अनेक भांडी, मिक्सर, इलेक्ट्रिक रगडा ,ओव्हन सगळे जमा केलेले होते. माझ्या लग्नानंतरही स्वयंपाकघरात त्यांचेच राज्य असल्याने नवीन काही उपकरण बाजारात आले कि ते घेण्याकरीता त्या त्यांच्या मुलाच्या मागे लागत आणि वस्तू घरात आली कि त्याचा वापरही केला जाई. सोलर कुकर असाच आला.मग गच्चीवर त्यात दाणे भाज, भाजणी भाज सुरु झाले.सुट्टीच्या दिवशी वरण,भात ही बनु लागला. त्याला लागतात म्हणून बाहेरुन काळे असणारे ऍल्युमिनियमचे डबे आले. त्यात केक करुन झाला, ढोकळा करुन झाला. मग दरवेळी गच्चीवर जाणे, उन फिरेल तसे कुकर फिरवणे या गोष्टी त्रासदायक होवु लागल्या आणि त्याचा वापर थांबला. कुठल्याही प्रकारच्या लाह्या बनवणारे एक मशीनही आणले होते त्याचा ही तोच प्रकार,नव्य़ाची नवलाई संपली की वस्तू पडायची अडगळीत.  आणलेले कुठलेच भांडे टाकायचे नाही या मायलेकांच्या तत्त्वाने मला तो पसारा आवरणे फार मुश्किल होवुन जाई. जुना मिक्सर देवुन नवीन आला, फुडप्रोसेसर आला, जुना रगडा जावुन ओट्यावर बसणारा लहान रगडा आला. स्वयंपाकघर भांड्य़ांनी अगदी ओतप्रोत भरुन गेले आहे.

    यातच काही वर्षांपुर्वी ’मायक्रोवेव्ह’ नामक चीज बाजारात आली. सासुबाई या जगात नव्हत्या. मी त्या वस्तूबद्दल अजिबात स्वारस्य दाखवले नाही. मैत्रीणींकडे, बहिणींकडे मायक्रोवेव्ह आले.त्यांचे फायदे, गुणगानही कानावर येवु लागले. नवऱ्याने तुला हवा असल्यास सांग घेऊन टाकू अशी उदार ऑफर  दिली पण माझा निर्धार कायम होता.एक तर तो ठेवायला जागा लागणार, पुन्हा त्यात ठेवायची भांडी वेगळी म्हणजे पुन्हा ती घ्या. शिवाय त्याकरीता काचेची किंवा चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टीकची भांडी लागतात असे कळले, ती भांडी कामवालीला घासायला देता येणार नाहीत म्हणजे आपलेच काम वाढवा. नकोच ते. म्हणून बरीच वर्षे मी या नव्या उपकरणापासून निग्रहाने दूर राहिले.

    माझ्या धाकट्या मुलीचे खाण्यापिण्याचे फार नखरे. तिला गरम पदार्थ खायची आवड. सकाळची पोळी रात्री नको म्हणेल पण करुन देवु का विचारलं तर तव्यावरची ताटात असेल तर दोन पोळ्या आवडीने खाणार. खायला काही करुन ऑफिसला गेले कि ती कॉलेजमधुन आली तरी खाणार नाही कारण  ते गरम नव्हते. मग तिच्या सगळ्या मैत्रीणींकडे कसे मायक्रोवेव्ह आहेत, त्या कशा गरम करुन घेतात याची मला सतत वर्णने ऐकवू लागली. वडीलांनाही तिने आपल्या पार्टीत ओढले. मायक्रोवेव्ह वापरल्याने वेळ किती वाचतो हे पण मुली मला सांगू लागल्या, त्यात पदार्थ कसे कमी तेला तुपात होतात म्हणून ते अन्न किती हेल्दी आहे , हे पण सुनवू लागल्या. माझा मनोनिग्रह हळूहळू ढळू लागला. मी पण आजुबाजुला मायक्रोवेव्ह बद्द्लची माहिती गोळा करु लागले. त्यात पोळ्या सोडून बाकीचे सगळे पदार्थ काही सेकंदात होतात असे सगळीकडून समजू लागले. त्यात साबुदाण्याची खिचडी कशी सुरेख होते, खोबऱ्याच्या वड्या कशा खमंग होतात. चिवडा किती झट्पट होतो. केक कसा मिनिटात होतो इथपासून ते मनात यायचा अवकाश मायक्रोवेव्ह मधे पदार्थ तयार होतो इथपर्य़ंत त्याचे वर्णन ऐकल्यामुळे  अशा जादु-ई-उपकरणापासून इतकी वर्ष वंचित राहिल्य़ाने माझे कित्ती नुकसान झालयं असं मला वाटू लागलं. घरात असलेल्या कित्येक काचेच्या भांड्यावर ’मायक्रोवेव्ह’ मधे वापरता येतील अशी सूचना असल्याने मुलींनी आई भांडी नाही घ्यावी लागणार असे सांगितले. मग मायक्रोवेव्हचा शोध सुरु झाला, शोध म्हणण्यापेक्षा सर्वेक्षण ( मराठीत सर्व्हे ! ) सुरु झाला. बाजारात अनेक कंपन्यांचे विविध मायक्रोवेव्ह उपलब्ध होते. विचारावे त्या प्रत्येकाकडे आणखी वेगळ्याच नावाचे असत. शेवटी मुली आणि त्यांच्या वडीलांनी बऱ्याच चौकशा करुन एक भलामोठा मायक्रोवेव्ह ऑर्डर केला. दुसऱ्याच दिवशी तो घरी आला आणि ओट्यावर स्थानापन्नही झाला. पण त्याचा डेमो दाखवायला येणारा माणूस त्याच्या सवडीने येणार होता. त्यामुळे दोन-तीन दिवस त्याच्याकडे बघण्यातच समाधान मानणे चालू होते. एके संध्याकाळी कंपनीचा माणूस डेमो दाखवायला आला. त्याने भराभर बटणे दाबून ,मायक्रोवेव्ह,ओव्हन,ग्रील मोड. कुठल्या मोडवर कोणते भांडे, कसे किती वेळ ठेवायचे हे धडाधड सांगितले.
"भाजी शिजायला किती वेळ लागतो?" माझा बेसिक प्रश्ण
" ते कोणती भाजी आणि किती क्वांटीटी त्यावर अवलंबुन आहे"
"पण इथे तर तुम्ही आधीच टायमिंग सेट करायचं म्हणता ना, मग किती वेळ ठरवायचा?"
" ठरवा तुमच्या अंदाजानं , मधेच स्टॉप करुन बघायचं, आणि मॅडम याच्यासाठी स्पेशल क्लास आहेत त्याचा नंबर देतो मी तुम्हाला. तो क्लास अंटेंड करा, सगळं समजुन जाईल बघा. निघतो मी, सही करा या पेपर्सवर"
मला जास्त बोलू न देता सही घेऊन आणि त्या क्लासचा नंबर देवून तो मुलगा निघुन गेला.
मुलीने मॅन्युअल वाचून पापड वगैरे भाजुन बघितले.
त्या क्लासच्या वेळा माझ्या वेळांशी जमत नसल्याने थोरल्या मुलीने मी जाईन असे जाहीर केले. मी ही तिने आपण होवुन जबाबदारी घेतल्यामुळे खुष झाले. पण तिचाही जाण्याचा मुहुर्त येईना . हळूहळू त्या बंद यंत्राकडे बघुन त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे या विचाराने आपणच सुरुवात करायचे ठरवले. नाही म्हटले तरी दोन-आडीच दशकाचा स्वयंपाकाचा अनुभव गाठीशी होताच. मुलींचे दुध गरम कर, पाणी गरम कर अशी सुरुवात केली. साबुदाण्याची खिचडी त्यात कराय़ची होती, पण तेवढे मोठे काचेचे वा प्लॅस्टिकचे भांडे माझ्याकडे नव्हते मग बटाटे त्यात उकडायचे ठरवले. पाण्यात बटाटे घालुन ३ मिनिटे सेट करुन ठेवले. तीन मिनिटे झाल्याबरोबर बझर वाजु लागला, भांडे बाहेर काढले.पाणी उकळत होते.बटाटे काढले सोलायला घेतले तर फारच जाड साल निघू लागली.सालीला बराच बटाटा गेला. नणंद म्हणाली ,’सालं काढुन बटाटे ठेवायचे असतात’, बहिण म्हणाली ’पाणी न घालता ठेवले तर सालं पातळ निघतात’  एकूण बराच बटाटा वाया घलवुन खिचडी गॅसवर केली. मोठी मुलगी  नाश्ता करायला उशीरा आली. तिला खिचडी गरम करुन देण्याकरीता काचेचा बाउल शोधला,आणि त्यात खिचडी घालुन मायक्रोवेव्ह मधे गरम केली,बाऊल गरम झाला म्हणून ताटलीत काढायला गेले तर बाउलच्या आकाराची खिचडीची मुद तयार झाली होती! सगळा साबुदाणा चिकटुन गोळा झालेला बघुन ती माझ्यावर भडकलीच.
"हे काय केलय? "
"खिचडीच आहे गरम केली आत्ताच मायक्रोवेव्ह मधे"
"कुणी सांगितल होतं तुला गरम करायला? मला नको तो गोळा, तूच खा थंड खिचडी उरली असली तर मी खाते"
मग ती खिचडी कशी ,किती वेळ कुठल्या भांड्यात ठेवायला हवी होती यावर  तिघांनी माझे बौध्दिक घेतले.
भाज्या उकडायला ठेवाव्या म्हटल, तर कधी कमी शिजत, थोडा जास्त वेळ लावावा तर पार शिजुन काला होई.
एकदा  बरेच पाहुणे येणार होते, इडली सांबार करायचे होते.सांबारच्या सगळ्या भाज्या चिरुन पटकन शिजाव्या म्हणून प्लॅस्टिकच्या डब्यात पाणी घलुन ठेवल्या, बाकीच्या कामाच्या नादात बझर झाल्यावर मेन स्विच बंद करुन ठेवले,कुकरमधली डाळ शिजली होती, फोडणी करण्यापूर्वी भाज्या बघाव्या म्हणून मायक्रोवेव्ह उघडला आणि डोक्याला हात लावला....
डब्याचे झाकण वितळले होते आणि आतले पाणी कोमट देखील झाले नव्हते ! गुपचूप झाकण कचरापेटीत फेकले आणि पारंपारिक पध्द्तीने सांबार करायला घेतले.
पुन्हा सगळ्यांनी तुझे कसे चुकले असेल यावर माझी खरडपट्टी काढलीच. एव्हाना काही प्लॅस्टिकच्या ताटल्यांचे द्रोण झाले,  काही काचेच्या भांड्य़ांना तडे गेले, शेंगदाणे करपले आणि दर वेळी मी आरोपीच्या पिंजऱ्यात.मी चुकीचे भांडे, चुकीचे ऑप्शन, चुकीचे टायमिंग लावल्याचे सिध्द झाले. 

    या मायक्रोवेव्हचे मी काय घोडे मारले? का दर खेपेला काही करायला जाव तर माझा पचका होतोय या विचाराने मला अगदी बेचैन करुन सोडले.विचार करता करता बऱ्याच गोष्टींचा उलगडा होवु लागला. आजवर रामायण,महाभारत पुराणे,इतिहास यांत ’गर्वहरणाच्या’ अनेक गोष्टी वाचल्या होत्या. आपल्याला चांगला स्वयंपाक विनासायास करता येतो असा मला गर्व झाला असेल, त्यामुळे माझे गर्वहरण करण्यासाठी मायक्रोवेव्हची योजना झाली असावी. चूल,बंब,स्टोव्ह या सा्धनांशी माझा अगदीच संबंध आला नाही असे नाही. भोरच्या आमच्या घरी किंवा माझ्या माहेरी देखील चूल,बंब यावर मी पाणी तापवले आहे. माझ्या मंगळूरच्या सासऱच्या घरी चुलीवर इड्ल्या आणि तांदळाचे अनेक प्रकार शिजवले आहेत. गॅसवर  स्वयंपाक करण्यात तर हयात गेलीच. एकूण माझे आजवरचे आयुष्य आणि हि साधने यात साम्य होते. ते म्हणजे कुठल्याच पूर्वनियोजना खेरीज  आयुष्य येत गेले तसं मी जगत गेले. या साधनांमधुन पदार्थ करताना त्याच्याकडे शिजताना बघत बघत तो होत असे.पदार्थ किती वेळात होईल ते आधीच ठरवावे लागत नव्हते .आधीच पदार्थ बनण्याला किती वेळ लागेल हे निश्चित करायचे आणि त्याप्रमाणे सेटींग करायचे हे माझ्या जीवनशैलीला मानवणारे नव्हतेच. कुकरची शिट्टी झाली कि बारीक करुन गॅस बंद कर, वाफ आली कि भाजी शिजली समज. पोळी,भाकरी भाजलेली तर डोळ्याला दिसतेच. मायक्रोवेव्ह मधे आधी सगळे तयार करा त्याला किती वेळ लागेल हे तुम्हीच नक्की करा तसे सेटींग करा मग तेवढ्या सेकंदात पदार्थ बनेल,पण त्या काही सेकंदांसाठी आधी किती वेळ जातोय याचा हिशेब केलाच जात नाही, उगाच इतक्या सेकंदात अमुक होतं अशा जाहिराती !. मायक्रोवेव्ह मधल्या इड्ली स्टॅंड मधे एका वेळी लहान आकाराच्या आठ इडल्या होतात.घरातल्या चार मोठ्य़ा माणसांना सरासरी पाच इडल्या लागत असतील तर या वीस इडल्यांना मायक्रोवेव्ह मधे लागणारा एकूण वेळ आपल्या एकावेळी २४ इडल्या करणाऱ्या स्टॅंडपेक्षा कमी कसा असेल? कारण इडल्या जरी चटकन शिजल्या तरी झालेल्या काढून नव्या लावणे याला लागणारा वेळ दोन्ही कडे सारखाच.परत २४ इडल्यांच्या स्टॅंडवर एका झटक्यात १२ ते १५ मिनिटात इडल्या बनुन एकावेळी सगळ्यांना खायलाही मिळतात. मग मायक्रोवेव्हमुळे वेळ वाचला कुठे? भाजी आमटी त्यात करायची तर फोडणी गॅसवर करा, तिखट मीठ घालुन परतुन घ्या, पुन्हा काचेच्या भांड्यात घालुन मायक्रोवेव्ह मधे ठेवा.नंतर कढई,ते काचेचे भांडे सगळॆ पुन्हा घासा. त्यापेक्षा कढईत पडलं शिजत तर काय फरक पड्णार आहे? 
       
    सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मायक्रोवेव्ह घेतल्यावर आम्ही सगळे करु असे सांगुन मला पटवणाऱ्या मुली तो आणल्यावर माझ्यावर सोपवुन  नामानिराळ्या झाल्या.वर तुलाच कसं जमत नाही हे सांगुन पदोपदी इतरांकडे कसे सग्गळे मायक्रोवेव्ह मधे करतात हे सांगायला मोकळ्या. धाकटी तर दुध देखील त्यात गरम करुन घेत नाही. मुली माझ्यावर गेल्यात हे मी कबुल करते. मी सुध्दा त्यांच्या वयात स्वयंपाकघरात फिरकले नाही, पण माझ्या आईला काही शिकवायला गेले नाही आणि वेळ पडल्यावर मी सगळे केले. या बाबीचा देखील मला त्रास होत असेल . तो राग त्या यंत्रावर निघुन त्यात प्राविण्य मिळवण्याकरीता माझे प्रयत्न कमी पडत असतील. बरं सगळी दुनीया तो वापरुन त्याचं कौतुक करतीय म्हणून आपणही वापरायला धडपडायचे आणि दर वेळी काहीतरी वेगळेच निष्पन्न होईल कि काय या टेन्शनखाली रहायचे .

    एकंदरीत काय मायक्रोवेव्ह हा घरात असून अडचण ,नसुन खोळंबा या गटात मोडणारी चीज बनला आहे ! 

Tuesday, December 3, 2013

दैव जाणीले कुणी

कोल्हापुरला बदली झाल्याची ऑर्डर घेवुन सदानंद जागेवर येऊन बसला. प्रमोशन वर बदली होणार याची कल्पना होतीच,फक्त ठिकाण समजायचे होते. पुण्यात बदली झाली असती तर बरे झाले असते, सुरेखाला दर आठवड्याला येता आले असते, किंवा आपल्यालाही ये-जा करणे सोपे झाले असते. प्रमोशन नाकारणे हातात होते, पण कशासाठी? वास्तविक ते मिळून पगारात फार वाढ होणार नव्हती उलट घरभाडे भत्ता मुंबईचा जास्त, कोल्हापुरात कमीच होणार तो, पण प्रमोशन म्हणजे नुसती पगारवाढ नसते, आता पत वाढणार घरात आणि ऑफिसमधेही. इतरांसारखी साहेबांपुढे लाळघोटे पणा कधी जमला नाही आपल्याला. म्हणून मागच्या दोन वेळा मिळाले नाही. हे करुर साहेब फार कडक. अतिशय शिस्तीचे, त्यांच्यासमोर जायला कसे सगळॆ चळाचळा कापत.माझ्या कामावर खुष होते ते. त्यांनी चांगले सी.आर. लिहिल्याने यावेळी प्रमोशन द्यावेच लागले. बदली पुण्याला मागायची त्यांच्या समोर टापही नाही. या बाबतीत ते कसे वागतील सांगता नाही येणार. घरच्या कुठल्या अडचणी सांगितलेल्या त्यांना खपायच्या नाहीत.ते स्वतः नऊच्या ठोक्याला जागेवर हजर असत. आठ-आठ वाजे पर्यंत काम करत. ते कुणावर कधी रागावलेत,कुणाला फार आवाज चढवुन बोललेत असं नाही, पण एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वात जरब असते तशी आहे त्यांच्यात. वागणे अतिशय नेमस्त. स्वच्छ आणि चोख कारभार. साहेब असावा तर असा.
 
              सदानंद जोशी, सरकारी आधिकारी.मुंबईमधेच जन्म शिक्षण आणि इतके वर्ष नोकरी देखील. घरात इतर भावंडांपेक्षा जरा कमी हुशार. मोठा भाऊ खूपच बुध्दीमान, स्वतःच्या हुशारीच्या जोरावर आर्थिक परिस्थितीवर मात करीत शिष्यवृत्त्या मिळवित गेला. आय.आय.टी तून इंजिनियर होवुन  उच्च शिक्षणाकरीता अमेरिकेत गेला आणि तिकडेच स्थायिक झालेला. त्याच्या पाठची उमा,हुशार तेजस्वी,सडेतोड. मेडीकलची ऍडमिशन एका मार्कांनी हुकली तेंव्हा खचून न जाता फिजिओथिरपी सारखा त्यावेळी फारसा परिचित नसलेला कोर्स करुन त्यात उच्च शिक्षण घ्यायला परदेशात जावुन इकडे परत आली.मुंबईतल्या जसलोक, के.इ.एम्. सारख्या इस्पितळातुन तिची प्रॅक्टिसही सुरु होती.लग्न करायचे नाही असे तिने शिकतानाच ठरवले होते. सदानंदही हुशार होता. त्याला घरात तसे कुणी जाणवू देत नसले तरी बाहेर, शाळा-कॉलेज मध्ये नातेवाईंकांत तशी तुलना व्हायचीच आणि उगाचच त्याच्या मनात न्य़ूनगंड निर्माण झाला. मेडीकल, इंजिनियरींग सारख्या प्रोफेशनल कोर्सला न जाण्याचा त्याचा निर्णय त्यातुनच जन्माला आला. एम्.एसस्सी झाल्यानंतर नोकरीसाठी बरेच झगडावे लागले त्याला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्याने सुरु केला आणि पहिल्या परीक्षेतच मिळालेले यश त्याला अनपेक्षित वाटले.

    सरकारी नोकरी मिळाली. क्लास टू ऑफिसर म्हणून नेमणूक ही झाली. यथावकाश त्याच्या लग्नाची चर्चा घरात सुरु झाली. मोठ्या विजयने अमेरिकेतल्या मुलीशीच लग्न केले होते, उमाच्या लग्नाचा प्रश्ण् नव्हता. ओळखीतून आलेल्या बॅंकेत नोकरी करणाऱ्या सुरेखाला त्याने पसंत केले आणि संसाराला सुरुवात झाली. नोकरीतल्या कामामुळे सदानंदचा आत्मविश्वास वाढीला लागला. त्याला आयुष्यात आपणही काही करु शकतो याची जाणीव झाली. सुरेखा कनिष्ठ मध्यमवर्गातून् आलेली मुलगी होती. तिला नवऱ्याच्या शिक्षणाचे, नोकरीचे अमाप कौतुक होते. विदुलाच्या जन्मानंतर तर सुखाचे वर्तुळ पुरे झाल्यासारखे वाटले. विदुलाच्या पाठोपाठ चार वर्षांनी मुलगा झाल्यावर तर सदानंद सुरेखाचे सुखी चौकोनी कुटुंब झाले. पण विवेक दोन महिन्याचा झाला आणि त्याची मेंदुची वाढ पुरेशी नसल्याचे लक्षात आले. तसा तो अशक्तही होताच. सुखाच्या संसारात मिठाचा खडा पडावा असं घडल. आपल्या मुलाचे हे अपंगत्व स्विकारायला सगळ्या कुटुंबालाच जड गेलं. त्याच्याकरीता नोकरी सोडावी असं किती वेळा सुरेखाच्या मनात येई,पण त्याच्या आजारपणाचीच नाही तर भविष्याची तरतूदही आत्तापासून करावी लागणार या जाणीवेने ती बॅंकेत जात होती. ऍलोपॅथी बरोबर आयुर्वेदिक, होमिओपाथी अश्या सगळ्या प्रकारच्या उपाययोजना चालू होत्या. घरात खूपच पुरोगामी वातावरण असून आजकाल सुरेखा उपास-तापास करु लागली होती. तिच्या चेहऱ्यावरचा टवटवितपणा मावळला होता.काळजीने काळवंडला होता. सदानंदही जास्तीत जास्त वेळ ऑफिसमधेच काढी. बिचाऱ्या विदुलेकडे आई-बाबांचे दुर्लक्ष होवु लागले होते.आजी-आजोबा,आत्या घरी होते म्हणून बरे. ती सगळावेळ आजीजवळच असे. आत्याही घरी असले कि तिच्याशी खेळे. घरातल्या या अडचणीमुळे सदानंदला ऑफिसमधे प्रमोशन न मिळाल्याचे दुःख फारसे जाणवले नव्हते. एका मोठ्या वेदनेपुढे या बारीक दुःखाची काय मात्तबरी? शिवाय प्रमोशन वर बदली झाली असती तर सुरेखाचे किती हाल झाले असते! तीन वर्षाचा विवेक तब्येतीने सुधारला होता, पण चालु शकत नव्हता. त्याचे सगळेच करताना घरचे दमत होते.
   
    प्रत्येक सीझन बदलताना विवेक आजारी पडेच, या वेळी थंडी सुरु झाली आणि तो सर्दी तापाने आजारी झाला.मुंबईतली थंडी तरी कसली? पण त्याच्या अशक्त देहाला वातावरणातले बदल तेवढे जाणवत. सदानंदने लगेच औषधे आणली. मात्र त्याच्या आजाराने बघता बघता गंभीर रुप घेतले.श्वास घ्यायला त्याला त्रास होवु लागला. उमाने लगोलग के.इ.एम. मधे ऍडमीट केले. पण न्युमोनिया झालाय असं डॉक्टर म्हणाले. दोन दिवसातच विवेकने जगाचा निरोप घेतला. त्याच्या असण्याचा घरच्यांना त्रास होत असला तरी त्याच्या जाण्याचे दुःख ही सगळ्यांना खूपच झाले. अशा मुलांना आयुष्य कमी असते हे उमाला माहित होते. तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर त्या अश्राप जीवाचं करताना आपण कमी पडलो का? अशी वेदना तिलाही जाणवली. सुरेखाला तर दुःखाने वेड लागेल का असं वाटू लागल. सदानंदलाही फार अपराधी वाटले.या मुलापायी आपले आयुष्य उध्वस्त होतयं असा विचार त्याच्या मनात अनेकदा आला होता ! त्याच्या जाण्याला आपले हे विचारच कारणीभूत आहेत असे त्याला वाटू लागले. या सगळ्यात शांत होत्या सदानंदच्या आई. त्या माऊलीने कधीच विवेकचा राग केला नव्हता.त्याला न्हाऊ घालणे, भरवणे त्या अगदी मायेने कराय़च्या.विदुलेलाही भावाबद्दल माया वाटावी म्हणून त्याच्याशी बोलायला लावित. सुरेखालाही त्या समजावित असत.
"आपल्या घरात त्याची चांगली देखभाल होते,म्हणून देवाने त्याला इथे धाडलयं. अगं सुधारणा सुध्दा होईल त्याच्यात हळूहळू.नवीन औषधे येतील. कित्ती शोध लागताहेत हल्ली "
तो गेल्यावर त्यांना दुःख झाले पण त्यात त्याच्या वियोगाची वेदना होती.आपण त्याचे सगळे नीट केले. त्याचे आयुष्यच तेवढे त्याला काय करणार? अशी त्यांनीच सगळ्यांची समजुत काढली.

    दिवस उलटु लागले तसे विवेकच्या मृत्युचे दुःख कमी होत गेले.सगळॆजण आपापल्या कामाला लागले. सदानंद कामावर जाऊ लागला. त्याच सुमारास करुर साहेब सदानंदच्या ऑफिसमध्ये आले. साहेबांमुळे ऑफिसचे वातावरण बदललेच.सगळा स्टाफ वेळेवर येवु लागला. कामे भराभर उरकु लागली. सदानंदवर त्यांचा विशेष लोभ होता.त्याची कामातली तत्परता ,कमी बोलणे, कुठल्याही नव्या कामाला आवडीने सुरुवात करणे ह्यामुळे दोघांची वेव्हलेंथ जुळली. त्याला इतकी वर्षे प्रमोशन का दिले नाही असा त्यांना प्रश्ण पडला होता.  त्याचे उत्तम सी.आर. लिहिल्याने प्रमोशन मिळायला अडचण आली नाही.
   
  " मि.जोशी, अभिनंदन! लवकरात लवकर चार्ज घ्या. कोल्हापूरच्या ऑफिसमधेही असेच काम करा."
  "यस सर.." सदानंदला पुढे बोलवेना.नंतरचे दिवस खूप भराभर गेले.ऑफिसमधे पार्टी दिली. कोल्हापूरला जावुन कामाचा चार्ज घेतला. नंतरच्या शनिवार-रविवार मधे तेथे जागा बघितली. एक दिवस सुट्टी घेवुन थोडेफार सामान मुंबईहुन आणले. कोल्हापूरचे जीवन मुंबईच्या मानाने अगदीच निवांत. काम संपवुन घरी यावे तर घरात तरी कोण होते? सदानंदचा वेळ जाता जात नसे. वाचन करावे म्हणून लायब्ररी लावली पण वाचनाची फारशी आवड नव्हतीच त्याला. इथे कुणी मित्रही नव्हते. ऑफिसमधे हळुहळू ओळखी व्हायला लागल्या. गल्लीतल्या रिकामटेकड्या लोकांनी सदानंदचा ताबा घेतला. यातुनच पत्ते खेळायची सवय लागली. अधुनमधुन पार्ट्या सुरु झाल्या. जोशी साहेब-जोशी साहेब म्हणत तिथल्या लोकांनी सदानंदच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. आजवर बाहेरचं जग न बघितलेल्या सदानंदला वागण्यातले छक्केपंजे ठावुक नव्हते. ऑफिसमधे साहेबीपणा दाखवायची त्याला सवय नव्हती. अगदी नकळत तो दारु,पत्ते याच्या नादी लागला. ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष होवु लागले. मुंबईला जाणे कमी होवु लागले.विदुलाची शाळा,सुरेखाची बॅंक यामुळे त्यांनाही सुट्टीखेरीज इकडे येणे शक्य नसे. ऑफिसमधे सदानंदला जी पोस्ट मिळाली होती ती न मिळाल्याने कोल्हापूरातले पाटील आणि देवरे  हे दोघेजण त्याच्यावर रागावुन होतेच.त्यांनी सदानंदचा काटा काढायचा ठरवले. गोड गोड बोलुन त्यांनी आधी सदानंदचा विश्वास संपादन केला. त्याच्यासाठी घरुन डबे आणणे, त्याला जेवायला घेउन जाणे असे करुन पाटील आणि देवरे त्याचे डावे -उजवे हात बनले. त्यांनी बनवुन आणलेल्या नोट्स,बिलांवर तो न वाचता सह्या करु लागला. ऑफिसमधील एक निवृत्तीला आलेले क्लार्क पिंगळे यांनी आडून आडून सदानंदला सावध कराय़चा प्रयत्न केला. पण किती झालं तरी तो मोठा साहेब होता, लहान तोंडी मोठा घास ठरेल म्हणून जास्त बोलणे त्यांना जमले नाही.

    विनाशाची वाट निसरडी असते. त्यावरुन घसरायला फारसा वेळ लागला नाही.सदानंदला कोल्हापूरात येवुन वर्ष झाले. ऑडीट कमीटी आली. ऑडीट्मधे सदानंदच्या सह्या असलेली काही अशी बिले सापडली ज्याची खरेदी झालेलीच नव्हती. अशा कुठल्या बिलांवर सह्या केलेल्या त्याला आठवत नव्हते.पण सह्या त्याच्याच होत्या. अलगदपणे सदानंद सापडला. लहान गावात असल्या गोष्टींच्या चर्चा व्हायला वेळ लागत नाही. पेपरमधे बातमी आली. सदानंदला काही समजायच्या आत त्याची सस्पेंशनची ऑर्डर देखील आली. आजपर्यंत अतिशय ताठ मानेने जगलेल्या सदानंदला हा धक्का पचवणे केवळ अशक्य होते.  पश्चात्तापाने पार खचुन गेला तो. मुंबईला कुठल्या तोंडाने परत जायचे त्याला समजेना. आत्महत्येचा विचारही  मनाला शिवुन गेला.पण डोळ्यासमोर  प्रेमळ सुरेखा, थकलेले आई-बाबा, आधार वाटावी अशी उमा  आणि गोजीरवाणी विदुला यायची त्यांच्या मायापाशाने तो आत्मघातकी कॄत्य कराय़ला धजावला नाही इतकच.

    मुंबई ऑफिसला सदानंदच्या सस्पेंशनची बातमी समजताच त्याच्या जवळचा मित्र सुरेश हबकुनच गेला.यात काहीतरी काळेबेरे असणार हे त्याला समजले.ऑफिसमधुनच त्याने आधी सदानंदला कोल्हापूरच्या ऑफिसमधे फोन लावला. तो ऑफिसमधे असणे कठीण होतेच पण त्याचा कॉंन्टॅक्ट नंबर मिळवणे जरुर होते. मोबाईल फोन त्याकाळी आलेले नव्हते. सुदैवाने पिंगळ्यानी फोन घेतला. त्यांनी सुरेशला सदानंद किती खचलाय, त्याची कशी चूक नाही हे हलक्या आवाजात सांगितले. सुरेशला परिस्थितीची कल्पना आली त्याने उमाला फोन लावला, हि बातमी सदानंदने कळवली नसेल पण ती घरी समजणे आवश्यक होते अशा वेळी आधार असतो तो आपल्या माणसाचाच. झाल्या प्रसांगाला तोंड द्यावेच लागणार. उमालाही बातमी ऐकुन धक्का बसला.पण कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता शांतपणे विचार करण्याचा तिचा स्वभाव होता.तिने सुरेशला जास्त प्रश्ण विचारले नाहीत कि सर्वनाश झाल्यासारखे दाखवले नाही.
"संध्याकाळी घरी यायला जमेल तुला,सविस्तर बोललो असतो. मी आज रात्रीच्या बसनेच कोल्हापूरला जाईन म्हणते"
"येईन मी, पण तुझ्या आईबाबांना काय सांगशील? आणि सुरेखा वहिनींचे काय? असे कसे झाले ? तो असे करणे शक्य नाही ..."
" कसे झाले,कुणाचे चुकले यावर चर्चा करण्यापेक्षा यातून मार्ग कसा काढाय़चा हे महत्त्वाचे आहे नाही का? घरच्यांना सांगायचे मी बघेन, भेटू मग संध्याकाळी"
ठरल्याप्रमाणॆ सुरेश सदानंदच्या घरी गेला.घरातले वातावरण नेहमीइतके नसले तरी बरेच शांत होते.
" सुरेश तू म्हणतोस आणि आमचीही खात्री आहे सदानंद गैरकृत्य करणार नाही.पण तो फार सरळ वागणारा आहे,घरापासून दूर एकटा असा पहिल्यांदा राहिल्य़ाने वाईट लोकांच्या संगतीत सापडला असेल. बिलांवर त्याच्या सह्या होत्या म्हणजे त्याने न वाचता त्या केल्या असणार किंवा कोणीतरी त्याच्या सह्या केल्या असतील. दोन्ही बाबतीत त्याची चूक आहेच.पण यातून मार्ग निघु शकतो. मी आज रात्रीच निघते.सकाळी त्याच्याशी बोलेन .चांगल्या वकीलाची चौकशी करावी लागेल,इतरही काही मदत लागेल ती तू करशील ना?"
" असं विचारतेस काय उमा? मी आहेच.मी देखील वकील शोधतो"
दुसऱ्या दिवशी सकाळी उमा कोल्हापूरला पोचली.सदानंदचा चेहरा बघवत नव्हता. जागरण आणि काळाजीने तो दहा-बारा वर्षाने म्हातारा झाल्यासारखा वाटत होता.
" सदानंद काय अवस्था करुन घेतली आहेस? चहा तरी घेतला आहेस का सकाळपासून, मी आधी आपला चहा करते मग शांतपणे बोलू आपण"
"सगळं संपलय उमा, फार मोठी चूक केलीय मी कुणाला तोंड दाखवायची लायकी नाही राहिली माझी...." ओंजळीत चेहरा लपवत सदानंद रडत म्हणाला.
"आधी चहा पी. एवढं काही आभाळ कोसळलेल नाही अरे,चुका कुणाच्या हातुन होत नाहीत? आम्ही आहोत ना सगळे? सार काही ठिक होईल"
चहा प्यायला नंतर उमा म्हणाली ,"आता पहिल्यापासून काय काय घडलं ते तसच माझ्यापासून काहीही न लपवता सांग."
सदानंदने उमाला जमेल तसं सांगायला सुरुवात केली. पत्ते खेळणॆ, दारु पिणे या गोष्टी त्यांच्याकडे कधी कुणी केलेल्या नव्हत्या, सांगताना सदानंद्ला मेल्याहून मेल्यासारखे होत होते.
"इतका कसा मी घसरलो? आई-बाबांचे संस्कार ,शिकवण , तुमचे प्रेम सगळ्याचा कसा विसर पडला मला? छे, मला कुणाला तोंड दाखवावेसे वाटत नाही.या चुकीला क्षमा नाही उमा "
"शांत हो सदानंद, तू चुकलास त्यात तुझ्या इतकीच परिस्थितीही कारणीभूत आहे. आज आपण सगळे इथे असतो तर कदाचित असं घडलं नसत. तुला जो एकटेपणा इथे वाटला त्यामुळे तू वाईट गोष्टींच्या नादी लागलास, या वेळाचा सदुपयोगही तुला करता आला असता पण या सगळ्या जर... तर च्या गोष्टी आहेत त्यावर चर्चा करुन वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. झाल्या गोष्टीचा तुला पश्चात्ताप आहे,यातच तुझे भले मला दिसत आहे. आपली चूक मान्य असेल तर ती सुधारणे शक्य होते माणसाला. चुकांबद्द्ल जास्त त्रास करुन घेवु नको.आम्ही कोणी तुला त्याबद्दल सतत दोष देणार नाही. आपण सगळे मिळून या संकटाला तोंड देवु. तू बिलांवर सह्या केल्यास पण पैशाचा अपहार केलेला नाहीस.तुझे या पूर्वीचे रेकॉर्ड चांगले आहे. आपण चांगला वकील बघू त्यांच्या सल्ल्याने वागु.तू नक्की सुटशील यातून"

"नाही उमा, माझ्या अपराधाला शिक्षा व्हायलाच हवी.मी माझी चूक कोर्टातही मान्य करणार "
" असं करु नको सदानंद आपण विचारु वकिलांना.."
" उमा या बाबतीत तडजोड नाही.गुन्हेगाराला सजा हवीच"
उमाने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. सदानंदने तिचे ऐकले नाही.उत्तम वकील देवुन केस लढविण्यात आली.सदानंदला २ वर्षाची सजा आणि १०००० रु. दंड ठोठावण्यात आला.केस वर्षभर चालली. त्यात सगळ्यांनाच खूप मानसिक त्रास झाला. हाय़कोर्टात जा, वेळ पडली तर सुप्रीम कोर्टापर्यंत जा असे विजयने कळविले होते.तो वेळोवेळी पैसेही पाठवत होता. पण झालेली शिक्षा मंजुर असल्याचे सदानंदने जाहिर केले. आणि येरवड्याच्या जेलमधे त्याची रवानगी झाली.

तोंडाने चूक कबुल करणे, शिक्षा मान्य करणे आणि  वेळ आल्यावर जेलमधील कपडे अंगावर चढवणे यात फार अंतर होते. आतल्या कुठल्याच माणसाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नव्हते.होता फक्त बिल्ला नंबर. आजपर्यंत सिनेमात बघितलेल्या प्रत्यक्ष जेलचे दर्शन फारच विदारक होते ! त्या छोट्या छोट्या बराकी, ते निर्ढावलेली कैदी, ते निर्विकार कर्मचारी सगळच कसं त्रासदायक. पहिल्या दिवशी दिलेल्या ऍल्युमिनियमच्या ताटली आणि मगाकडे बघुनच सदानंदला ढवळुन आले. भात आणि कसलीशी भाजी असलेल्या त्या कळकट बादल्या बघुन त्याची जेवणावरची वासनाच उडाली. लांबच लांब वाटणारे ते दिवस आणि भकास,उदास अशा न संपणाऱ्या रात्री ! दोन वर्षे कशी जाणार होती ?

मिळालेल्या रिकाम्या वेळात गतजीवनाबद्दल विचार करण्याखेरीज करता येण्य़ासारखे काही नव्हतेच. उमाच्या "तुला जो एकटेपणा इथे वाटला त्यामुळे तू वाईट गोष्टींच्या नादी लागलास, या वेळाचा सदुपयोगही तुला करता आला असता पण या सगळ्या जर... तर च्या गोष्टी आहेत" या वाक्याची त्याला आठवण झाली.  यातुन बाहेर पडायला आपणच मार्ग काढला पाहिजे. त्याने दिनक्रम ठरवुन घेतला. लवकर उठणे,सकाळी योगासने करणे, व्यायाम करणे सुरु केले. जेलमधील लिखापढीची कामे त्याला शिक्षित असल्याने दिली होती. जेलचे रेकॉर्ड त्याने नीट केले. हळूहळू कर्मचारी वर्ग, जेलर यांचा तो लाडका बनला. कैद्यांनाही आसने शिकवणे, गप्पा मारणे त्याने सुरु केले.

    महिन्यातुन एकदा सुरेखा भेटायला येई.तो दिवस मात्र त्याला नकोसा वाटे.तिच्या भेटीची ओढ होती पण तिला तोंड दाखवणे फार जड जाई त्याला.आपल्या अशा वागण्याचा तिला किती त्रास होतोय.बॅंकेत ,समाजात तिला वावरताना कशाकशाला तोंड द्यावे लागत असेल या विचाराने तो कष्टी होई. विदुलाला ती काय सांगत असेल? सुरेखाला आपण दुःखच दिले या विचाराने तो बेचैन होई. सुरेखा मात्र तसे दाखवत नसे.तिचा चेहरा त्याला बघताच फुलून येई. त्याच्या आवडीच्या चकल्या तिने आणलेल्या असत त्याला ती खायला लावी. आई-बाबांची खुशाली सांगे.विदुलाचे फोटो दाखवी.तिला कुठले बक्षिस मिळाले त्याचे वर्णन करी. बघता बघता हे दिवस संपतील, तुम्ही सुटाल.असे सांगुन ती त्याचा निरोप घेई. सुरेखा गेल्यावर पुन्हा उदास वाटू लागे.

    सदानंदच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याची शिक्षा ८ महिन्यांनी कमी झाली. वर्ष संपले. आता चारच महिने उरले होते. सदानंद सुटुन आला की त्याला या जागेत आपण नकोच आणायला असे घरच्यांनी ठरविले. इकडे नाही म्हटले तरी लोक कुजबुणार,चौकशा करणार,बोलणाऱ्यांचे तोंड धरता येत नाही. झाल्या घटना लवकरात लवकर विसरुन नवे आयुष्य सुरु केले पाहिजे.  बोरीवलीला एक ब्लॉक उमाने घेतलेला होता, तो भाड्य़ाने दिला होता. करार संपताच त्या रिकाम्या जागेत काही सामान हलविले. सदानंदने सुरेखा बरोबर रहायचे. विदुलाचे दहावीचे वर्ष इथेच होईल ११वी पासुन ती देखील तिकडेच जाईल असे ठरले. बोरीवलीच्या घरात सामन लागले.सदानंद येण्याचा दिवस जवळ येवु लागला. सुरेखा आणि उमा दोघी त्याला आणायला जाणार होत्या , त्याला टॅक्सीने बोरीवलीच्या घरी आणणार होते.त्या घरी सगळी जमली होती.

        सदानंद १२ तारखेला सुटणार, जेलर पासुन सगळे त्याचे अभिनंदन करीत होते. त्यालाही आयुष्यातले काळे पर्व संपल्याचे जाणवत होते. पुढे काय कराय़चे ते अजुन ठरत नव्हते. ऑफिस जॉइन कराय़चे कि दुसरे काही अजुन विचार होत नव्हता. ४ तारखेला सकाळपासुन सदानंदचे अंग दुखत होते. संध्याकाळी त्याला थंडी वाजुन ताप भरला. दुसऱ्या दिवशीही तसेच.जेल मधल्या डॉक्टरांनी औषध दिले. चार दिवस झाले तरी तोच प्रकार. शेवटी ससुन मधे ऍडमिट करण्य़ाचा सल्ला दिला. ऍम्ब्युलन्स मधुन सदानंदला ससुनमधे नेले. तिकडे सगळ्या तपासण्या केल्या. मलेरीयाचे निदान झाले. पण आजाराने गंभीर रुप घेतले होते. फुफ्फुसात प्रादुर्भाव झालेला होता. त्यावेळी फार प्रभावी औषधे उपलब्ध नव्हती. जेलमधुन सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झालेली होती

    १० तारखेला रात्री सदानंद अत्यवस्थ झाला. जेलमधुन त्याच्या घरी फोन करत होते पण घरचे सगळे बोरीवलीला असल्याने फोन कुणी उचलला नाही. दुसऱ्या कोणत्याच नंबरांची त्यांच्याकडे नोंद नव्हती. १० तारखेला रात्री उशीरा सदानंदचे प्राणोत्क्रमण झाले. त्याच्याजवळ त्यावेळी घरचे कुणीही नव्हते ! त्याच्या निधनाची बातमीही घरी कुणाला समजलीच नव्हती

    बोरीवलीच्या घरात आनंदी वातावरण होते. सदानंदला आणायला सुरेखा आणि उमा जाणार होत्या पण आयत्या वेळी सुरेखाला काही अर्जंट कामामुळे बँकेत रजा नामंजुर करण्यात आली.तशीही तिच्या या काळात बऱ्याच सुट्ट्या होत असत. उमा म्हणाली,"खरं तर तू आली असतीस तर त्याला बरं वाटलं असतं पण काही हरकत नाही , मी त्याला घेवुन येते. तू कमावरुन येइपर्य़ंत तो फ्रेश होवुन तुला भेटायला तयार असेल."

    उमा पहाटे निघाली साडेदहाच्य़ा सुमारास येरवड्याला पोचली. जेलमधे गेल्यावर तिला सदानंदच्या निधनाची बातमी समजली. तिला खरच वाटेना.
"सॉरी, आपला काहीतरी गैरसमज होतोय, सदानंद जोशींकरीता मी आलेली आहे, तुम्ही दुसऱ्या कुणाबद्दल बोलत आहात का? "
"नाही मॅडम, I am really sorry, पण ही बातमी खरी आहे,आम्ही तुमच्या घरी फोन लावला पण तो लागला नाही, दुसरा कोणताच नंबर आमच्याकडे नव्हता त्यामुळे आमचा नाइलाज झाला. सगळे पेपर्स तयार आहेत. तुम्ही बॉडी ताब्यात घेणार की अजुन कुणाला बोलावताय?"

आपल्या डोक्यात कुणीतरी घाव घालतय असं उमाला वाटु लागलं, इतक्या मनःस्तापात काढलेल्या या दिवसांचा शेवट असा का व्हावा?  हि बातमी घरी कशी कळवावी ?या प्रसंगाला तोंड द्यायला लागु नये म्हणून नियतीने सुरेखाची रजा नामंजुर केली असेल का?  असे नाना प्रश्ण घेवुन उमा खुर्चीतुन उठली आणि जेलरसाहेबांच्या केबीन मधुन बाहेर पडली.
    

Monday, November 25, 2013

निरोप

गोपाळरावांची प्रकृती हळू हळू ढासळायला लागली. ऐंशी वर्षे उलटली असावीत त्यांना. हा आपला अंदाजच. त्या काळात कोण लिहून ठेवायचे जन्मवेळा?. गोपाळरावांच्या अगदी लहानपणीच त्यांची आई मथुरा सोवळी झाली. वडीलांचा चेहरा त्यांना आठवतच नव्हता. कोकणातल्या दारीद्र्याला आणि कर्मठपणाला कंटाळून करारी मथुरेने आपल्या एकुलत्या एक मुलाला पोटाशी घेवुन चार कपडे गाठोड्यात बांधुन कुणा नातलगाच्या मदतीने पुण्याचा रस्ता धरला. शिक्षण नसल्याने एका सधन कुटुंबात स्वयंपाकाचे काम मिळाले. शंभर-दिडशे वर्षांपूर्वीचा तो काळ. सुखवस्तू कुटुंबातून अशा निराधार लोकांना आधार मिळे. मोठमोठ्य़ा वाड्य़ातील एकत्र कुटुंबात तीस चाळीस माणसे राहत, तेंव्हा स्वयंपाकाचे काम अशा बायकांना मिळॆ. त्यातच शहरात मधुकरी मागुन शिकणारे विद्यार्थी असत, वारावर जेवणारी मुले असत. एकूण आपल्याला मिळालेल्या पैशातून चैन न करता गरजुंना मदत करण्याची प्रथा असल्याने ही मोठी कुटुंबे संस्थाच होत्या जणु.

    गोपाळची आई मथुरा , वाड्यातील सगळ्यांची मथूताईच झाली होती. कामाला वाघ होती ती. बोलणॆ कमी पण समज अफाट.पुण्यातल्या ज्या वाड्यात तिला आसरा मिळाला, तिथे तिने आपल्या कष्टाने सगळ्यांना आपलेसे केले, गोड बोलून त्या वाड्यातली एक खोली स्वतःसाठी स्वतंत्र मिळविली. त्यात मुलाबरोबर ती वेगळी राहू लागली.वाड्यातले सगळे काम झपाटून ती चार घरी पोळ्या करू लागली , शिवण टिपण शिकू लागली. आपल्या मुलाला शिकवून मोठे करायचे या ध्यासाने तिने अहोरात्र कष्ट केले. गोपाळ मॅट्रीकची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाला. लहानपणापासून त्याने आईला काम करतानाच बघितले होते. पुढे शिकण्यापेक्षा नोकरीला लागून आईच्या जीवाला आराम द्यायचे त्याने ठरविले होते. त्याप्रमाणे त्याला सरकारी नोकरी मिळाली. आईच्या अपेक्षाही फार नव्हत्याच. मुलगा स्वतःच्या शिक्षणाने कामाला लागला आता आपण स्वाभिमानाने जगू या, या विचाराने ती माऊली सुखावली. तिची कामे तिने कमी केली, बंद काही केली नाहीत. वाड्याच्या मालकांशी त्यांचे संबंध कायमचे होतेच. तिकडच्या नव्या सुना मथूताईंना वडीलकीच्या नात्याने वागवित. मुले देखील त्यांना मान देत. वाड्याचे मालक आबासाहेब फार करारी होते. त्यांनी खूप मुलांना शिक्षणाला मदत केली. अनेक मुले त्यांच्याकडे वारावर जेवायला येत. त्यांच्याकडे आलेला याचक कधी विन्मुख गेला नाही. त्यांचा एकुलता एक मुलगा विश्वनाथ फार हुशार होता. आय.सी.एस. परीक्षा द्यावयास तो इंग्लंडला गेला. परीक्षा पास होवुन परत येण्याची त्याने तार केली. आबा साहेबांनी त्याला तुला प्रायश्चित्त करुन घ्यावे लागेल असे कळविले. त्या काळी विलायतेहून आल्यानंतर प्रायश्चित्त घ्यावयाची कर्मठ रीत होती.  उच्च शिक्षण आणि परदेश भ्रमण केल्यामुळे मुलाचे विचार आधुनिक होते, प्रायश्चित्त वगैरे थोतांड आहे असे तो मानत होता वडीलांना त्याने तसे कळविले. आबा काही बाबतीत आग्रही होते. "शिक्षणासाठी मी तुला परदेशी पाठविले आता माझ्या मनासाठी तुला प्रायश्चित्त करुन घ्यावे लागेल हे तुला मान्य नसेल तर तू इकडे आल्यावर घरी येण्याची तसदी घेवू नको. मी अनेक मुलांना शिकविले त्यातल्या एक मला विसरला असे मी समजेन" असे उत्तर त्यांनी उलट टपाली धाडले.विश्वनाथ वडीलांचे मन मोडू शकला नाही. त्याने मनाविरुध्द प्रायश्चित्त घेतले.

    अशा कडक आबासाहेबांच्या वाऱ्याला मुले फारशी राहत नसत. बायका त्यांच्या समोर जातच नव्हत्या. गोपाळ तर लहानपणापासून गरीब आणि भित्राच राहिला या अशा परिस्थितीमुळे. मिळालेली सरकारी नोकरी इमाने,इतबारे करु लागला. कोकणातल्या अशाच गरीब घरातली मुलगी रमा त्याला सांगुन आली. गोपाळचे लग्न झाले आणि तो गोपाळराव बनला. रमा दिसायला गोरी -गोमटी दहा जणीत उठून दिसणारी होती. मथूताईंना आता हक्काची विश्रांती मिळू लागली. तसे आजवर खाली मान घालून काढलेले आयुष्य,आता जरब दाखवायला हक्काची व्यक्ती मिळाली. रमेच्या प्रत्येक हलचालीवर मथूताईंची बारीक नजर असे, तिचे चुकतयं कुठे आणि आपण बोलतोय कधी असं चाले. सुनेनं सार मुकाट्यानं सोसण्याचा तो काळ होता. पण गोपाळरावांकडे तिने कधी सासुच्या चुगल्या केल्या नाहीत. त्यांना डोळ्यानी जे दिसे त्यातुन आईचे वागणे खटकले तरी आईला बोलायची त्यांची प्राज्ञा नव्हती पण त्यांनी कधी रमेलाही दुखावले नाही. घरात त्यामुळे शांती समाधान होते.

    काळाबरोबर गोपाळ-रमाचा संसार बहरला. मथुताईंचे वय झाले.आयुष्यभर कष्ट केलेल्या माउलीचे म्हातारपण सुखात गेले.लेकाने आणि सुनेने त्यांची सेवा केली.नातवंडे बघायला मिळाली. पिकले पान गळून पडले. गोपाळरावांची मुले सालस आणि हुशार निघाली. त्यांची एकट्याची कमाई आणि वाढत्या महागाईचा काच यामुळे मुलांना उच्च शिक्षणापासून वंचित रहाव लागल. एक मुलगा मिलिटरीत गेला. दुसऱ्याला नोकरी लागली.मुली मॅट्रिक झाल्याबरोबर लग्न करुन सासरी गेल्या. धाकट्या मुलाला मात्र पदव्युत्तर शिक्षण मोठ्या भावडांनी दिले. मोठ्या कंपनीत तो उच्च पदावर कामाला लागला. रमाबाईंचा स्वभाव जळाहून शितळ. अंगात अनेक गुण,कला.पण काडीचा गर्व नव्हता त्यांना.मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केलेच.पण सुनांवरही मुलींप्रमाणे प्रेम केले. कामाची टापटीप,नीट्नेटकेपणा यात त्यांचा हात धरला नसता कुणी.उकडीचे मोदक तर असे करायच्या कि पाकळ्या मोजून घ्याव्यात. एकावर एक असे तीन सुबक मोदक हि त्यांची खासियत होती. शेवया, फेण्या पण त्या फार सुरेख करीत. वाड्यात कुणाचे लग्न ठरले कि रमाबाईंच्या रंगीत शेवया,फेण्या रुखवतावर असायच्याच.वाड्यात सगळ्या कुटुंबात एकी होती.रमाबाईंच्या लाघवी आणि प्रेमळ स्वभावाने तर सगळ्यांमध्ये त्या लाडक्या होत्याच. अबासाहेबांच्या कुटुंबाशीही त्यांचे संबध सलोख्याचेच होते.
       
     रमाबाईच्या थोरल्या नानाला मुंबईला नोकरी लागली. दोन्ही मुली सासरी गेल्या. मिलीटरीत गेलेला राघव नोकरी संपवून आला. त्याला पुण्यात चांगली नोकरी मिळाली. सुंदर खाशी सुबक ठेंगणी हे वर्णन लागु होईल अशा लेल्यांच्या सुनंदाशी त्याचे लग्न ठरले.  रमाबाईंना खूप आनंद झाला.नाना नोकरी निमित्ताने मुंबईत होता सुनेचं येण जाण क्वचितच व्हायच.घर सोडून मुंबईला जाणं त्यांना जमायच नाही.राघव आता जवळच राहणार. सुनंदाचं त्यांनी खूप कौतुक केलं. तिची दोन्ही बाळंतपण स्वतः केली.नातवंडांनाही आजीचा फार लळा. धाकटा माधव बराच शिकल्यानं त्याला मोठ्ठी नोकरी मिळाली. त्याला मुली पण शिकलेल्या, मोठ्या घरच्या सांगुन येवु लागल्या. वाड्यातली जागा अपुरी पडू लागली. माधवने गावाबाहेर सुरेख ब्लॉक घेतला. लग्नानंतर तो तिकडेच राहणार होता. सुनंदाची मुलेही आता बऱ्यापैकी मोठी झाली होती. सुनंदाला बालवाडीत नोकरी मिळाली होती. राघवलाही नोकरीत बढत्या मिळत होत्या. सुनंदाला  वाड्यात राहणे गैरसोईचे वाटू लागले. बाकीच्या दोन जावा स्वतंत्र राहतात, मलाच सासुसासऱ्यांबरोबर रहावे लागते असाही भाव त्यात होताच. नव्या नव्या सोईंनी सजलेले लोकांचे ब्लॉक बघितल्यावर आपल्या वाड्यातल्या खोल्या तिला फारच त्रासदायक वाटत. तिने गोडीने,लाडाने,आडून आडून राघवला नवीन जागा बघायचा आग्रह करायला सुरुवात केली. राघवलाही तिचे म्हणणे पटत नव्हते असे नाही, पण आई-बाबांना काय सांगायचे? बाबा तर ही जागा सोडणे कठीण आहे.
आईजवळ शेवटी त्याने विषय काढलाच. रमाबाईंना नवलच वाटले. त्यांना वाड्याच्या जागेत कुठलीच उणीव दिसत नव्हती. हं जागा होती जुनी.पण शेवटी घर म्हणजे भिंती,रंग सजावट थोडीच असते? घरातली माणसं, त्यांच एकमेकांवरच प्रेम, जिव्हाळा याने वास्तु बनते ना? या वास्तुने आजवर त्यांना सगळं सुख समाधान दिल होतं. इथुन शाळा,बाजार देवळे सगळं जवळ.मग थोडी जुनी असली जागा म्हणून काय बिघडलं? 

    रात्री पडल्या पडल्या रमाबाई विचार करु लागल्या, हल्ली त्यांना सुनंदाच्या वागण्यातला फरक जाणवत होता. तिच्या चिडचिडीचं, आदळआपटी मागचं,मुलांवर उगाच रागावण्यामागच कारण त्यांना समजल . देवळात भेटणाऱ्या बायका, आजुबाजुच्या मैत्रीणी यांची मुले वेगळी राहत होती.आपल्या घरी सुध्दा मातीच्याच चुली आहेत.  कोकणातून पुण्यात आलो तेंव्हा हि आपल्याला जागा लहान वाटत होती,पण जमीनीऐवजी फरशी,नळाला येणारं पाणी, कोळशाची शेगडी याचं आपल्याला कौतुक होतचं की. तसच गुळगुळीत फरशा, स्वतंत्र झोपायच्या खोल्या, बाथरुममधल्या टाईल्स, भिंतीतली कपाटे याचं सुनंदाला अप्रुप वाटल तर त्यात तिची काय चूक? आपण सासुबाईंशिवाय राहण्याची कल्पनाच केली नाही कधी कारण त्याकाळी असा विचार मनातच येत नव्हता आता सुनंदेच्याच जावा राजा-राणी सारख्या स्वतंत्र राहतायत मग तिलाही तसं वाटल तर त्यात काय नवल? सुनंदाच्या बाजूने बघितले तर तिचेही बरोबरच होते असं त्यांना जाणवलं तसं त्यांनी ठरवल, निवांतपणे राघवशी बोलूया, गोडीत आहेत तोवर त्यांनाही वेगळ राहूदे, आम्ही दोघे राहू या जुन्या जागेत. अडीअडचणीला येऊ जाऊ एकमेकांकडे. गणपती तेवढा इथेच बसवू त्यावेळी सगळी एकत्र जमत जाऊ. ही जागा सोडणे आम्हाला शक्य नाही. आबा गेले तरी त्यांच्या पत्नी आता थकल्या होत्या , रमाबाई रोज दुपारी त्यांना ज्ञानेश्वरी वाचून दाखवायला जात. वयोमानामुळे डोळ्याने खूप कमी दिसे त्यांना. सगळं आयुष्य इथे गेल्याने या जागेबद्दलची माया वेगळीच होती. गोपाळरावांना तर वाटे इथे आल्यामुळेच आजचे दिवस दिसत आहेत. गोपाळराव मनाने हळवे,स्वभावाने गरीब. लहानपण आबांच्या आणि आईच्या धाकात गेल्याने आवाज चढवून बोलणं सुध्दा त्यांना कधी जमल नाही. राघवनं आग्रह केला तर त्याच्या नव्या जागेत जायला ते नाही म्हणू शकले नसते.पण तिथे रमलेही नसते. त्यामुळे त्यांच्या मनाचा विचार करता आपण दोघांनी या जागेतच रहायचं अस रमाबाईंनी मनाशी पक्क केल. गुरुवारी राघवला सुट्टी होती,सुनंदाला सकाळी शाळेत गेली होती. त्यावेळी रमाबाईंनी राघवजवळ विषय काढला.
 "तुम्हाला सोईची वाटत असेल अशी चांगली जागा बघा.आम्ही दोघे इथेच राहू"
"आई, तुम्हाला सोडून नाही रहायचं मला. तुम्हीही यायला हवच"
"असा हट्टीपणा करु नको राघव, अरे तुझं प्रेम काय दूर राहिल्याने कमी होणार आहे का? पण आमची हयात गेली या जागेत आणि माई आता थकल्या त्या मला सासुबाईंच्या जागी आहेत रे, त्यांना सोडून आम्ही नाही जाऊ शकत. घरं वेगळी असली तरी आबांच्या मुळे आज आपण इथे आहोत तेंव्हा तुझ्या बाबांना इथुन जाणे नाही सोसणार. तुम्ही रहा वेगळे, येत रहालच इथे. मनी आणि राजाला सोडून रहायला मलाही त्रास होईल थोडा , पण रविवारी आणत जाऊ इकडे. गणपती तेवढा इथेच बसवू त्यावेळी सगळी एकत्र जमत जाऊ, नाना आणि माधव नाही का येत तसचं "
बऱ्याच वेळानं राघवची समजूत पटली. पुढच्या पाच-सहा महिन्यात त्याने ब्लॉक बुक केला.नंतरच्या वर्षी वास्तुशांत करुन मंडळी नवीन जागेत रहायला गेली.

    रमाबाईंना सुरुवातीला जरा जड गेले.नातवंडाची माया वेगळीच असते, मनी त्यांच्य़ात जवळ झोपा्यची. राजाला आजीनेच कालवलेला भात लागायचा. शाळेतुन आली कि मुले आजीच्या भोवतीच असायची. रविवारी मनीला सुनंदाला तेल लावून न्हावु घालायचे, आता अगदीच रिकामपण आले. त्य़ांची मोठी ताई गावातच होती पण दहा माणसांच्या सासरच्या गोतावळ्यात तिचं माहेरी येणं होतच नसे. तिचे सासुसासरे वारले. दिर वेगळे राहू लागले. तिला जरा निवांतपणा आला.ती अधुनमधुन रमाबाईंकडे येऊ लागली. बाकी वाड्यात लोकांची वर्दळ असेच. बिऱ्हाडांमधे एकोपा होता म्हणून गोपाळराव आणि रमाबाईंना एकाकी कधी वाटलच नाही. दुपारी रमाबाई ज्ञानेश्वरी वाचायला आबांच्या माईंकडे जाऊन येत. देवळात चांगले किर्तन असले कि माईंना घेऊन त्याही गोपाळरावांबरोबर देवळात जात. वाड्यात कुणाला मोदक शिकव, कुणाला लोणचं घालू लागायला जा.असा त्यांचा वेळ जाई. गोपाळरावांचा दिनक्रमही ठरलेला होता.पहाटे सारसबागेच्या गणपतीपर्यंत फिरुन याय़चे. येताना मंडईत चक्कर मारुन भाजी आणायची .अंघोळ करुन यथासांग पुजा कराय़ची.जेवण झाल्यावर दुपारी वामकुक्षी घ्यायची.मग देवळात किर्तन,प्रवचन ऐकायला जायचे.संध्याकाळी थोडे समवयक्सांबरोबर गप्पा. रात्री ८ वाजता जेवण,मग वाचन आणि झोप असा नेमस्त दिनक्रम चाले. बॅंकेची कामे, बाजारहाटही ते करत. २-३ महिन्यातुन एकदा दोघे ताई आणि माईकडे चक्कर मारुन त्यांची खुशाली बघुन येत. माधव ,राघवकडेही जात. नातवंडाना सुट्टीत घरी घेवुन येत. त्यांना मंडईतुन फळे आणणे. खाऊ करण्य़ासाठी सामान आणून देणे हि कामे हौसेने करीत. माधवने त्यांना फोनही घेवुन दिला. त्यामुळे रोज नातवंडाशी बोलणे होवु लागले. नानाची खुशाली समजु लागली. एकूण उभयतांचा वाड्य़ात राहुन वानप्रस्थाश्रम चालू होता.

    अशी दहा-पंधरा वर्षे गेली. कष्टाची शरीरे म्हणून बराच काळ तग धरुन राहिली.पण शेवटी वय होणारच. गोपाळ रावांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढू लागल्या. प्रत्येक ऋतुबदलाला सर्दी-खोकला सुरु होई तो लवकर बरा होत नसे. खोकताना दम लागे. रात्र-रात्र बसून काढावी लागे,मग दिवसा फार अशक्तपणा येई.जेवण खूप कमी झाल. रमाबाई सतत गरम पाणी देत. गवती चहाचा,आडुळशाचा काढा देत. राघव गुरुवारी आला कि बाबांना डॉक्टरकडे घेवुन जाई,औषधे आणून ठेवी.पण एकूण प्रकृती तोळामासाच झाली होती. यंदाच्या थंडीत गोपाळरावांच्या आजाराने उचल खाल्ली. फॅमीली डॉक्टरांनी आजाराच्या गांभीर्याची कल्पना राघवला दिली. त्यांनी गोपाळरावांना हॉस्पीटलमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला. जवळच्या चांगल्या हॉस्पीटलमध्ये गोपाळरावांना दाखल केले. नाना मुंबईहुन आला. माधव,राघव ,नाना आणि दोनही जावयांनी रात्री राहण्याच्या वेळा ठरवुन घेतल्या. ताई आईच्या सोबत राहायला आली.सुना-मुली डबे देवु लागल्या. वाड्यातली मंडळी आलटुन पालटुन गोपाळरावांना भेटायला जावु लागली. रमाबाई दिवसभर त्यांच्याजवळच असत. रात्री मोठ्या मुश्किलीने मुले त्यांना घरी पाठवित.
"आई, तुला विश्रांती घ्यायलाच हवी, रात्रीची झोप स्वस्थ झाली कि दिवसभर तू इथे बसू शकशील, नाहीतर तू आजारी पडशील ना"
" बर बाबांनो, पण तुम्ही दिवसभर कामावर जाता, तुम्हाला नको का विश्रांती? मला घरी तरी कुठे झोप येणार आहे? तिथे पडायचं तर इथे पडले असते"
" नको आई, रात्री काही औषधं लागली, काही लागल, तर आम्ही इथे असलेलं बर, ते आमचे पण बाबा आहेतच ना, थोडा त्रास आम्हाला झाला तर काही बिघडत नाही, मुळात आम्हाला तो त्रास वाटातच नाही आजवर त्यांचं काहीच कराव लागल नाही आम्हाला"
" ठिक आहे, तुम्ही म्हणाल तसं. ताई आहे घरी सोबतीला, राहिन मी घरी "
येते , येते बरका असं चार चारदा गोपाळ रावांचा हात हातात घेत रमाबाई म्हणत आणि जड पावलांनी ताई बरोबर घरी येत. आल्यावर दोघी जुन्या आठवणी काढत बोलत बसत. ताई  रमाबाईंना जेवायला लावी. अधुनमधुन फोन करुन बाबांच्या तब्येतीची खबर घेई.
गोपाळरावांची नोकरी फार मोठी नव्हती, त्यांच्याजवळ पुंजी ती केवढी असणार पण दोघांनी आजवर कुटुंबासाठी आणि परिचितांसाठी केलेल्या चांगुलपणाची ठेव मोठी होती, त्यांच्या आजारपणात ती कामी आली. लेकी सुना मुलगे जावई तर होतेच त्यांच्या सेवेला पण वाड्यातले शेजारी, आबांच्या घरातले सगळे हॉस्पीटल मधे जात.रमाबाईंना धीर देत. पैशाची काळजी करु नका असा आबांच्या नातवाचा निरोप तर गोपाळरावांना हॉस्पीटल मधे ठेवल्यादिवशीच आला. माधवने हॉस्पीटलमधे स्पेशल खोली घ्यायला लावली होती.सगळ्यांच्या मायेने आणि आस्थेने गोपाळरावांना भरुन येत होते. तुम्हा साऱ्यांना माझ्यामुळे किती त्रास असं ते भेटायला आलेल्यांना वारंवार म्हणत.

    दवाखान्यात ठेवुनही म्हणावी तशी त्यांच्या प्रकॄतीत सुधारणा नव्हती. पाच-सहा दिवसांनी तर गुंतागुंत वाढू लागली. अन्न जाईना, श्वास घेणे त्रासदायक होवु लागले. डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना गोपाळरावांची अखेर जवळ आल्याची कल्पना दिली. गुरुवारचा दिवस होता. रमाबाई गोपाळरावांच्या जवळ जप करत बसलेल्या होत्या. रात्रीचे आठ वाजून गेले होते. ताई आणि तिचे यजमान गोपाळरावांसाठी गरम पेज घेवुन आले.रमाबाईंनी त्यांना ती भरवली.तिन्ही मुलगे जवळच होते. धाकटी माई पण आली होती. रमाबाईंना घेवुन ताई घरी जायला निघाली.त्या दोघींना भावांनी डॉक्टरांशी झालेल्या बोलण्याबद्दल काही सांगितले नव्हते. गोपाळरावांचा निरोप घेवुन रमाबाई निघाल्या. दोघी घरी आल्या. ताईने रमाबाईंना जेवायला बसविले.
"नको गं , आज भूक नाही, खावस वाटतच नाही बघ"
"आई, असं नको करु, घासभर भात खा, गरम सार केलय बघ अमसुलाचं , बाबांनाही पेजेत घालून दिल त्यांच्या तोंडालाही चव आली"
बळेबळेच दोघी जेवल्या. ताईने मागच आवरल.बाहेरच्या खोलीत कॉटवर रमाबाई आडव्या झाल्या. ताईने खाली अंथरुण घातलेलं होत
मध्यरात्र होवुन गेली असावी. ताईचा जरा डोळा लागला होता. रमाबाई गादीवर उठुन बसल्या आणि बोलायला लागल्या.
" इतका त्रास होतोय का जीवाला, मग नका हो सहन करू ! माझीच काळजी वाटतीय ना? राहिन मी एकटी , आणि एकटी तरी कुठे, मुलं आहेत ना आपली? माई आहेत तोवर इथे राहिन मग पुढच पुढे बघू.तुम्ही माझी चिंता नका करु. मला नाही करमणार तुमच्या शिवाय, पण आपल्या हातात काय आहे? जिवाची उलघाल नका करु हो.नाही सहन होत तुमची तळमळ, मला बोलावणं आलं कि मी येइनच तुमच्याकडे"
ताई उठून बसली, आई काय बोलतीय तिला कळेचना, आईला कसला भास झाला कि झोप नसल्याने काही त्रास होतोय अशा विचाराने ती आईजवळ गेली.
"आई, काय होतय तुला, कुणाशी बोलत आहेस, स्वप्न पडल का ग?"
" स्वप्न पडायला झोप लागायला हवी ना, काही नाही पड तू"
तेवढ्यात फोन वाजला ताईने फोन घेतला
"हॅलो, ताई , बाबा गेले गं आत्ताच खुप प्रयत्न केले सगळ्या डॉक्टरांनी पण काही उपयोग नाही झाला शेवटी थोडावेळ तळ्मळ झाली आणि मग सगळेच शांत झाले. मी ,नाना आणि माधवला पाठवतोय पुढे आईला कसं सांगायच बघ नाहीतर ते दोघे आल्यावर सांगा तुम्ही" एवढे बोलून राघवने फोन ठेवला.

 फोन ठेवुन ताई वळली.तिच्या भरलेल्या डोळ्याकडे बघत रमाबाई म्हणाल्या
"गेले ना हे, तेच सांगत होता ना फोनवर राघव ? अत्ता माझा निरोप घेवुन गेले. त्यांच्याशीच तर बोलत होते.
"असं काय म्हणतेस आई, तुला भास होतोय, मी डॉक्टरांना बोलवु का?"
" नको, भास नाही, काही नाही, अगं साठ वर्ष झाली आमच्या संसाराला. पंधरा वर्षाची असताना आले या घरात. कधी मला एका शब्दानं दुखवलं नाही त्यांनी. दुखल खुपल न सांगता समजत एकमेकांच आंम्हाला.मला सांगितल्याशिवाय देवळात पण गेले नाहीत कधी तर एवढ्या मोठ्या प्रवासाला जाताना निरोप घेतल्याशिवाय़ कसे जातील? जीव तळमळत होता गं त्यांचा. माझ्यात अडकत होता त्यांचा प्राण,म्हणून मीच समजुत घातली अखेरी. आपलं माणूस आपल्याला नको असतं का? पण शेवटी त्या कुडीत त्रास होत होता त्यांना. मग माझ्या स्वार्थासाठी त्यांना कशाला यातना सोसायला लावु ? ज्ञानेश्वरीत सांगितलय ना वस्त्र जुने झाले कि ते टाकुन नवे वस्त्र आत्मा धारण करतो. म्हणून मी त्यांना सांगितले माझी चिंता करु नका. तुम्ही जा .माझी वेळ आली कि मी येईन."

आईची समजुत कशी घालणार असा प्रश्ण सगळ्याच मुलांना पडला होता. पण तिच्या अलौकिक प्रेमाच्या ताकदीने तिने स्वतःच आपल्या पतीला निरोप दिलेला होता. यमाच्या दारातुन पतीचे प्राण परत आणणारी सावित्री जितकी मोठी तितक्याच आपल्या मायापाशात अडकून यातना सोसणाऱ्या पतीला माझी काळजी करु नका असे सांगुन मुक्त करणाऱ्या रमाबाई मोठ्या.