Wednesday, August 20, 2008

पंढरीची वारी : एक अनुभव.


लहानपणापासून पंढरीच्या वारीबद्दल ऎकून वाचून होते. शाळेत असताना पालखी बघायला गेलेलेही आठवतयं. वर्षांनुवर्षे लाखो वारकरी ऊन,पाऊस कशाकशाची पर्वा न करता दोन आडीचशे कीलोमीटरचे अंतर पायी कसे तुडवीतात? ते हि मोठ्या आनंदाने, ऒढीने! कुठलाही आर्थिक लाभ नाही, वैयक्तिक स्वार्थ नाही.नाना जातीचे, वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातील हे वारकरी पंधरा दिवस एकत्र राहतात.स्वतःचा फायदा नसेल तर काहिही न करण्याच्या आजच्या जमान्यातही ही प्रथा टिकून आहे. हा केवढा चमत्कार आहे! या साऱ्या कुतूहलापोटी वारीबरोबर चालायचं आणि हा अनुभव प्रत्यक्षच घ्यायचा असे ठरविले.दरवर्षी पावसाळा सुरु झाला, वारीचे दिवस आले कि हे विचार उसळी मारायचे.एवढे दिवस घर सोडून जाणे शक्य नव्हते.(अशा वेळी ’आधी प्रपंच करावा नेटका’ म्हणणारे रामदास स्वामी जवळचे वाटत.) पण निदान दरवर्षी वारीचा एक-एक टप्पा करायला काय हरकत् आहे? असा सोइस्कर विचार आला, पण त्यातही काहीतरी अडचणी उभ्या रहायच्या आणि माकडाच्या घरासारखे माझे वारीचे बेत मनातच रहायचे.मात्र ’काशीस जावे, नित्य वदावे’ या चालीवर पुढल्या वर्षी नक्की जाऊ असे दरवर्षी घोकायचे.
यंदाहि सालबादाप्रमाणे जून महिना आला, नेहमीप्रमाणे वारीचे विचार मनात घुमू लागले.नवऱ्याजवळ मी माझी इच्छा बोलून दाखवायचा अवकाश, त्याने हि कल्पना उचलून धरली. आपण दोघेहि नक्की जाऊच, मी सगळी चौकशी करतो, असे सांगून तो तयारीलाही लागला. (त्याने विचार केला असेल हा स्त्री हट्ट् तसा खूपच फायद्याचा, चालतच यायचयं, त्यामुळे खर्चाचा प्रश्ण नाही, शिवाय बायकॊला अध्यात्माची गॊडी लागली तर इतर अनेक खर्च आपोआपच कमी होतील.) तो ’नूमवीय’ आहे त्यामुळे ’हाती घ्याल ते तडीस न्या’ हे शाळेचे बोधवाक्य त्याच्या हाडीमाशी खिळलयं. या सगळ्यामुळे आता मलाही पाऊल मागे घेणे शक्यच नव्हते. आपल्याला आळंदी पासून पुण्यापर्यंत २२ कि.मी चालणे जमेल का? हा आता खरा कळीचा मुद्दा होता.

(क्रमशः)