Wednesday, December 9, 2009

कुसुम मावशी

सोमवार दि.१४/९ रोजी संध्याकाळी कुसुम मावशी कालवश झाली.महाजन्यांच्या घराण्यातील थोरली माहेरवाशीण गेली. मावशी त्या मानाने तब्येतीने खुपच चांगली होती.शेवटपर्यंत हिंडत फिरत होती. अंघोळ आदि आन्हिकेहि तिची तिच करत होती.पण तरीही वयपरत्वे त्रास होतोच. प्रत्येकजण आपापल्या व्यापात या लोकांसाठी द्यायला वेळ कुणाकडे नाही आणि त्यांना वेळेशिवाय दुसऱ्यांकडून काहीच नको असते.मग त्यांची तगमग आणि आपल्या सरख्यांची अगतिकता.
मावशी खुपच हौशी होती. आमचे दादा तर तिला हौशी मावशीच म्हणत.जगण्यातला आनंद भरभरुन घ्यायचा आणि इतरांनाही तो मिळावा म्हणून मदत करायची हा तिचा स्वभाव होता आणि तिला कुणी इतर, परके नव्हतेच.सगळे तिचे स्वतःचेच होते.म्हणून स्वतःला सख्खे भावंडं नसताना चुलत,मावस,आते भावंडांना तिने जवळ केले.आणि आपल्या आठ मुलांच्या संसाराच्या पसाऱ्यात सगळ्यांना सामावून घेतले.शुक्रवार पेठेतल्या मावशीच्या घराचे दार कायम उघडेच असे.घरात अखंड माणसांचा राबता.जेवायच्या वेळी तिच्या घरी गेलेली व्यक्ती जेवल्याखेरीज बाहेर जात नव्हती.किंबहुना कुठल्याही वेळेला तिच्या घरी गेलेली व्यक्ती जेवल्याशिवाय जात नव्हती. मंगल वहिनी, निर्मला वहिनी यांच्या मंगळागौरी मला आठवतात.रात्री दहा पर्यंत जेवणं चालली होती नंतर रात्रभर जागरणं. रात्री २-३ नतंर खेळून दमल्यावर गप्पा, नकला मजाच मजा.सगळे सण -वार कार्यक्रम अगदी दणक्यात.सतत कुणाना कुणाला तरी केळवण, कुणाचे डोहाळ्जेवण मावशी अगदी प्रेमाने करायची.महाजन्यांच्या घरातील सर्वांच्या अडीअडचणी मावशीच्या घरी सोडवल्या जात. आम्ही सहकारनगर मध्ये रहायचॊ.सुट्टीच्या दिवशी गावात कधी गेलो तर मावशी कडे जायचोच.आईला तर ती तिच्या आईच्या जागीच होती.एक तर आईपेक्षा ती असेल १८ ते २० वर्षांनी मोठी.आई लहानपणापासून तिच्याकडे बरेचदा राहिलेली.कुसुमताई तिला लहानपणी परकर पोलकं शिवायची हे ती कायम सांगते.आईच्या छोट्या मोठ्या हौशी कुसुमताईने पुरविल्या.अण्णांबद्दल तर आईला कोण अभिमान! कुसुमताई आणि अण्णांना आईच्या आयुष्यात फार मोठं स्थान आहॆ.तिच्या सगळ्या सुख दुःखाच्या प्रसंगांना ते कायम धावून आलेले आहेत. त्यामुळे सहाजिकच आमच्याही मनात कुसुम मावशीचे स्थान वेगळॆच, शब्दात न सांगण्याजोगे.आईला पुरानंतर त्या उभयतांनी आणि श्रीकांतदादा,अरुण दादांनी जी मदत केली त्याला तोड नाही.त्यांनी दिलेला मानसिक आधार फार मोठा होता.आमच्या तिघींच्या लग्नातही त्यांनी आपल्या घरचे कार्य समजून मदत केली, हे ऋण आम्ही कधीच विसरु शकत नाही, ते न फेडता येणारे आहे आणि त्यात राहण्यातच समाधान आहे.मावशीने सगळ्यांसाठी इतकं केलयं कि तिच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थनेची आवश्यकता नाही.
मावशीला शिकायला नाही मिळाले पण शिक्षणाविषयी तिला फार आदर.स्वातीचा लेक अमेरीकेला गेला, मंदाची वृषाली पॅथॊलॉजी शिकली, दादाचा लेक लंडनला गेला हे केवढ्या अभिमानानं ती सांगत असे.तिची मुलेही हुशार होती, परिस्थितीमुळे त्यांना म्हणावे तसे शिकता आले नाही.पण विद्यापिठातल्या मोठ्या डिग्र्य़ा नसल्या तरी जगाच्या शाळेत पहिले नंबर मिळतील असे सगळ्यांचे कर्तॄत्व आहे.कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची धमक, पटकन कुणाच्याही उपयोगी पडण्याची वृत्ती,पडतील ते कष्ट करण्य़ाची तयारी,धडाडी आणि जीवनाचा आस्वाद घेण्याचा स्वभाव असे अत्यंत दुर्मीळ गुण त्या सगळ्यांमध्ये पुरेपूर आहेत. त्यांच्या घरी मी असंख्य वेळ गेलीय, पण कुणी कधी दुर्मुखलेला, वैतागलेला , हताश्, निराश नाही बघितला.पटले नाही तर एकमेकांशी भांडतील,आरडाओरडा करतील आणि नंतर पुन्हा एकत्र येतील, उगीच एखाद्याबद्दल मनात राग धरुन कुढणॆ,कोणाच्या बद्द्ल मनात किल्मिश् बाळगणे नाही.वरवर् एखाद्याशी गोड बोलणे आणि पाठीवर त्याला शिव्या घालणॆ असा प्रकार नसल्याने मावशीचे घर कायम प्रसन्न असते. आई वडिलांकडून त्यांना मिळालेल्या या सुसंस्काराच्या ठेवीची कुठल्याही इस्टेटिशी तुलना होवूच शकत नाही.मावशी आणि अण्णांचे गुण , संस्कार जपणारी आमची हि भावंडे आहेत. मावशीची उणीव त्यामुळे जाणवणार नाही. मात्र त्यांचे अश्रू पुसण्याइतके आमचे हात समर्थ नाहित याची फार खंत वाटते.

Thursday, October 29, 2009

ते श्रीमंत दिवस

पुण्याविषयी आणि पुणेकरांविषयी इतकं लिहिलं गेलयं कि काही बोलायची सोय नाही. आता पुण्याचा चेहरा मोहरा बदलत चाललाय शिवाय वाढत्या आय.टी सेक्टर आणि नवनव्या शिक्षण संस्था तसेच नवनवे शैक्षणिक अभ्यासक्रम यामुळे अमराठी लोकांच्या पुण्यावरील अतिक्रमणामुळेही पुण्याच्या हवेइतकच पुण्य़ाचं पुणेरीपण जात चाललयं(पूर्वीचं पुणं राहिल नाही हे म्हणणारी ,पुण्याचा अभिमान बाळगणारी मी मात्र अस्सल पुणेकरच) बदल हे होतच राहणार.नोकरीच्या, व्यवसायांच्या संधींसाठी नाना ठिकाणांहून लोक ही येणार.पुण्यात राहून पुण्याला आणि पुणेकरांना नावे ठेवणारी मराठी आणि अमराठी माणसं पुणं काही सोडत नाहीत, एक दोन वर्षात पुण्यात घर घेतात.
पुण्यात राहण्याचा मला मिळालेला फायदा म्हणजे लहानपणी बघायला मिळालेले अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम आणि मोठमोठ्या व्यक्तिंची दर्शन! त्यावेळी वसंत व्याख्यानमालेत होणारी व्याख्यान असोत, की न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावरील गीत रामायण असो, बाबासाहेब पुरंदऱ्या्चं शिवचरीत्र,शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यानं, पु.ल देशपांड्यांची भाषणं तसेच व्यंकटेश माडगूळकर,द.मा.मिरासदार आणि शंकर पाटील या त्रयीचं कथाकथन असे किती प्रसंग सांगावेत?
मुक्तांगण बालविकास केन्द्र नवाची इमारत सहकारनगर मध्ये झाली त्याच्या साठी पु.ल.देशपांड्यांनी देणगी दिली होती.त्याच्या उद्घाट्न सोहळ्य़ाला पु.ल. येणार हि बातमी आमच्या येथे बरेच दिवस गाजत होती. सकाळी लवकर उठून आम्ही त्या कार्यक्रमाला आठ पासून जागा धरुन बसलो होतो.पु.लं.च ते पहिलं दर्शन आजही माझ्या लक्षात आहे.मी त्यावेळी तिसरी-चौथीत असेन ,त्यांचे भाषण काही सगळे समजले असेल असे नाही.पण 'इथे मुलांना कुणी गप्प बसा असे म्हणु नका, त्यांना नाचू दे,गाणं शिकू दे,चित्र काढू दे ,आपल्याकडे मुलांसाठी म्हणून काही केले जात नाही गोकुळाष्ट्मी हा वास्तविक मुलांचा सण, पण दहिहंडी फॊडायला चाळीस-चाळीस वर्षांचे बाप्ये असतात मला म्हणायचयं तुम्ही कराना धृतराष्ट्र जयंती मुलांच्या खेळात का येता?' असं ते बोललेले अजून आठवणीत आहे.माझ्या मनाला ते भाषण जे भिडलं कि त्या नंतर पु.ल माझं दैवतच बनले! दूरदर्शन चा जमाना त्यावेळी आलेला नव्हता, रेडीओवर ऎकलेली व्यक्ती प्रत्यक्ष बघायला मिळणं म्हणजे पर्वणीच वाटे.
वसंत व्याख्यान मालेमध्ये दरवर्षी मोठ्मोठ्या वक्त्यांची विविध विषयावर व्याख्याने होतं , अजूनही ती परंपरा चालू आहेच.मे महिन्याची सुट्टी असे, मग रोज 'सकाळ' आला कि आधी आज कोणाचे व्याख्यान आहे ते बघायचं आणि विषय किंवा वक्ता ओळखीचा असला की जायचं ऎकायला.'शिवाजी राव भोसल्यांची व्याख्यान'तिथेच प्रथम ऎकली.त्यांची शिवाजी, बाजीराव, रामदास ,विवेकानंद, योगी अरविंद अशा नाना विषयांवरची व्याख्यान ऎकताना भान हरपायचचं, पण त्यांची ओघवती वाणी,त्यांचा प्रत्येक व्यक्तिरेखेचा सखॊल अभ्यास,त्यांची स्मरणशक्ती या सगळ्याचं अतोनात कौतुक वाटायचं आणि व्याख्यान संपल्यावर एका अद्भुत जगतात जाऊन आल्यासारखं वाटायच, नंतरचे २-३ दिवस त्याच धुंदीत जायचे.रवींद्र नाथांवरील पु.लंची तीन व्याख्याने अशीच टिळक स्मारक मंदिरात अकस्मिक पणे ऎकायला मिळाली.अकरावीत एस.पी.कॉलेजमध्ये होते मी त्या वेळी ,कुणीतरी बोलताना ऎकलं आज पासून तीन दिवस टिळक स्मारक मंदिरात पु.लंची व्याख्याने आहेत.कॉलेज सुटल्यावर परस्पर तिकडेच धावलो आम्ही दोन -तीन मैत्रिणी साडेसात पावणेआठला भाषण संपल्यावर घरी गेलो,घरी काहीच महिती नसल्याने जरा रागवा रागवी झालीच असेल पण उशीर होण्याचे कारण समजल्यावर आईचा राग गेला, आणि त्या एवढ्या सुंदर व्याख्यानाच्या आनंदात बाकी सगळे कःपदार्थ होते.
मी नववीत असताना शिक्षकांचा प्रदीर्घ संप झाला होता,बेमुदतच होता तो, थोडे थोडके नाही तब्बल बावन्न दिवस चालला.हि सुट्टी मात्र तशी कंटाळवाणी ठरली असती कारण कुठल्या दिवशी शाळा सुरु होईल ह्याचा नेम नसल्याने घर सोडणे शक्य नव्हते,दिवाळीच्या सुट्टी नंतर संप झाल्याने गॅदरींग, ट्रीप सगळे बुडले,आणि माझ्या बाबतीत तर आमचे दादा ही राज्य शासनाचे कर्मचारी असल्याने ते ही संपावर! त्यामुळे घरात अभ्यास करत बसावे लागे, त्यांना हि इतका रिकामा वेळ बहुदा पहिल्यांदाच मिळाला असावा , एरवी ते घरी यायचे तेंव्हा रात्र झालेली असे.दादांनी बीजगणित ,भूमिती सगळे पुस्तक शिकवून एकूण एक गणिते सोड्वून घेतली(नववीच्या पुस्तकातले २ धडे दहावीला होते हे नंतर कळले)पण तरीही सुट्टी कंटाळवाणी न होण्याचे कारण त्याच वर्षी पुण्यात मराठी साहित्य संमेलन झाले होते आणि शाळेला सुट्टी असल्याने मी ३ दिवस सकाळ संध्याकाळ गरवारे कॉलेजच्या पटांगणावर पडीक होते.भाषणे, परीसंवाद, कवी-संमेलन कसली धमाल! पु.भा.भावे अध्यक्ष होते , ग.दि.माडगूळकर,मंगेश पाडगावकर, कवी अनिल,शांता शेळके अशा कित्ती कित्ती लोकांना जवळून बघायला मिळालं! एका लहानश्या डायरीत बऱ्याच जणांच्या सह्या देखील मिळवल्या, 'नावं काय तुझं? काय शिकतेस?' एवढे प्रश्ण त्यांच्या पैकी काहींनी विचारले तरी लेखक आपल्याशी बोलले या आनंदाते अस्मान ठेंगणं होवुन जायचं! ना.धॊं.महानोरांनी गाऊन दाखवलेल्या कवितांनी ,पाडगावकरांच्या सलाम कवितेच्या वाचनाने अंगावर उठलेले रोमांच आजही आठ्वतात.एकही पैसा न खर्चता मिळालेले हे लाखमोलाचे क्षण! त्या अनुभवांनी माझं चिमुकलं विश्व उजळून गेलं. त्यातूनच मला वाचनाची गोडी लागली.ह्या दिवसांच्या आठ्वणी माझ्य़ा आयुष्यातील सगळ्य़ात आनंदाच्या आहेत.
शिक्षण संपून नोकरी लागली ,लग्न झालं .पूर्वी सहसा बघायला न मिळणारा पैसा हातात सहज खेळू लागला आता आपण कुठलेही नाटक बघू शकतॊ, कुठल्याही समारंभाला तिकीट काढुन जाऊ शकतो असा विश्वास आला.पण..... आता पुण्यात कुठे काय चाललयं ते बघायलाच वेळ नव्हता. एखाद चांगलं नाटक आहे असं कळलं आणि जायचा विचार करायचा अवकाश !, नेमकं कुणीतरी घरी टपकायचं, कधी कुणाची आजारपणं,पाहुण्याची सरबराइ, रात्रीच्या कार्यक्रमाला बरोबर यायला कुणी नाही, दिवसाच्या वेळी ऑफीसच्या कामात रजा नाही एक ना दोन हजारो कारणं आणि सबबी ! सुरुवातीला असे चांगले काही बघायला जायचे हुकले कि जीवाची तगमग व्हायची, चिडचिड व्हायची मग नवरा म्हणायचा,"एवढं काय झालं चिडायला? कुठल्याही कार्यक्रमाच्या ऑडिओ /व्ही.डि ओ सी.डी/कॅसेट्स , मिळत असताना त्या कार्यक्रमाला जायची गरजच काय? घरी बसून आपल्याला पाहिजे तेंव्हा निवांत बघू " लहान मुलाची पटते तशी माझी समजूत पटली होती सुरुवातीला,"खरचं हे आपल्या लक्षातच नाही आलं!" मग कुठल्याशा सुमुहूर्तावर एखादी व्ही.डि ओ कॅसेट्स आणली जायची ती लावे पर्य़ंत रात्रीचे नऊ वाजून जायचे,सुरुवात होवून जरा कुठे बघण्यात मजा येतीय तोच फोन वाजायचा, बेल वाजायची. नाहीतर कुणाला पाणी दे, कुणाला खायला दे,
विरजण लावलं का?
उद्याच्या नाश्त्यासाठी तांदूळ भिजत टाकले का?
सकाळच्या डब्य़ाला भाजी काय करणार ? बसल्या बसल्या निवडून टाक.
आमच्या घरी त्याकाळी रात्री अपरात्री पाणी येत असे ,मग पाणी भरणे, बागेला पाणी घालणे हे सगळे उद्योग करताना त्या कार्यक्रमाचा पूर्ण विसर पडे आणि संपलेल्या कार्यक्रमानंतर टि.व्ही. बंद करण्यापुरता त्याच्याशी संबंध उरे.त्यातून मग घरी काही आणून बघण्यातला फोलपणा कळून चुकला.
आता सतत २४ तास वेगवेगळ्या रुपातून करमणूकीची बरसात करणाऱ्या वाहिन्यांचा जमाना आला.त्यातून जाहिराती गाळुन अर्ध्या तासांत होणाऱ्या कार्यक्रमातून करमणुक होते का हा संशोधनाचा विषय होईल.त्यांचे विषय,दर्जा यातील कशाबद्द्लच न बोलणेच शहाणपणचे ठरेल.तंत्रज्ञान आणि कलाकृती (मग ते गाणं असो, कविता , नाट्क किंवा सिनेमा)हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असावेत असे वाटते.टि.व्ही.चं स्थान घरातला एक प्रतिष्ठेचा सिम्बॉल एवढचं राहतं.घरात एकटं असताना देखील मला कधी तो लावावा असं वाटतच नाही.
अजूनही पुण्यात चांगले कार्यक्रम होतात, आता मुली मोठ्या झाल्याने त्यांना घेवून जायचा आटापिटा मी करते, मध्यंतरी माझी मोठी मुलगी नववीत असताना अविनाश धर्माधिकारी यांची वेगवेगळ्या विषयांवर सात दिवस व्याख्याने होती,मुलींना घेवून मी पहिल्या दिवशी गेले, त्यांना कितपत समजेल हि शंका होतीच. धाकटीला नाही समजले सगळे पण तनु मात्र फारच प्रभावित झाली,नंतरचे सगळे दिवस रोज जाणे मला जमणारे नव्हते (संसाराचे व्याप ताप ई...(ध्रृ.))मात्र उरलेले सगळे दिवस ती कुणाना कुणला बरोबर घेवून गेली आणि तिने त्याचा पूर्ण आस्वाद घेतला. आणि मीच तो कार्यक्रम बघीतल्याचे समाधान मला मिळाले.माझ्या वडिलांनी मला दिलेला वारसा मी माझ्या मुलीपर्यंत पोहचवू शकल्याचं ते समाधान होत!


©

Tuesday, October 20, 2009

नादचित्रे



माझ्या लहानपणी टि.व्ही. नव्हता.पुण्यात तो कधी आला ते माहित नाही.आमच्या ओळखीच्या लोकांकडे मी ७वी-८वीत असताना आला आणि आमच्या घरी मी नोकरीला लागल्यावरच.मात्र माझ्या लहानपणापासून घरात रेडीओ होता आणि तो अखंड चालू असायचा. विद्याताई लहान असताना म्हणे तो आणला होता.त्यावेळी रविवारी सकाळाचे बालोद्यान ती रेडीओला कान लावून ऎकत असे.एक तर आमच्या लहान जागेत भरपूर माणसे, काका, मामा, दादा सगळ्यांचेच आवाज भक्कम. सकाळच्या कामाच्या वेळी आईचा तारस्वर.आणि आम्ही लहान म्हणून आमचा दंगा यात तिला बिचारीला तो कार्यक्रम ऎकायचा म्हणजे दिव्यच करावे लागे. आधी रेडीओचा ताबा मिळवणे,त्यावेळी काका किंवा मामाला इतर काही गाणी वगैरे ऎकायची बुध्दी झाली की हिच्या कार्यक्रमाची काय मिजास, त्याच वेळी दादांना विद्याच्या अभ्यासाची आठवण झाली तर कुणालाच रेडीओ ऎकणे शक्य नाही. तिच्या लांब सडक केसांना आईने तेल लावलेले असे,आणि नहायला चल असा अधूनमधून पुकारा असे, मात्र आईच्या हाकेला दाद न देता ती स्टूलावर उभी राहून रेडीओ लावी(घरातील एकमेव करमणुकीची वस्तू सर्वात ऊंच फळीवर होती)आणि मग त्याला कान लावून ती बालोद्यान ऎकायची. मग सगळ्या बाजूंनी तिच्या नावाचा पुकारा झाला तरी तिला त्याची शुध्द् नसे. माझ्या डॊळ्यासमोर आजही तिची स्टूलवर उभी राहून एकचित्ताने ऎकणारी मूर्ती डॊळ्यासमोर आहे.
मी फारसे बालोद्यानसारखे लहान मुलांचे कार्यक्रम ऎकले नाहीत, कारण मी त्या वयाची झाले आणि विद्याताई कॉलेजला जायला लागली, ती अखंड विविध भारती नाहीतर सिलॊन लावून गाणी ऎकायची.मधल्या वेळात आई मराठी गाणी लावायची, रेडीओ बॅक-ग्राऊंडला नसेल तर अभ्यास व्हायचाच नाही.आता आपण मुलांना एकसारखे टि.व्ही.पुढे असतात म्हणून ओरडतो, पण आमचे देखील रेडीओशिवाय पान हालत नसे. मात्र रेडीओमुळे आभ्यासात व्यत्यय येत नसे ऊलट मूड बनत असे. कारण कानाने ऎकताना लिहिणे, वाचणे सहज जमते.गणिते देखील गाणी ऎकताना सोडवता येत. अगदीच किचकट डेरिव्हेशन असेल , डोक्यात शिरत नसेल तरच रेडीओ बंद करावा लागे, पण अशी वेळ नाही यायची कारण रेडीओवर प्रोग्रॅम नसतील त्या वेळात असा अभ्यास करायचा.
सकाळी उजाडताना पुणे केन्द्रच लावायचे,(सकाळी सकाळी कसली ती सिनेमातली चटोर् गाणी ऎकता इति आई) मग 'उत्तम शेती ' पासून सुरुवात होई, रामदास स्वामींचे मनाचे श्लोक किंवा तत्सम मारुतीबुवा रामदासी आणि मोहन बुवा रामदासींच्या स्वरात . ऎकताना डोळ्यापुढे भगवी वस्त्रे घातलेली, पायात खडावा आणि हातात झोळी, दुसऱ्या हातात भोपळ्याचा तुंबा घेवून उभ्य़ा असलेली मारुतीबुवा रामदासी आणि मोहन बुवा रामदासींची जोडी उभी राही.त्यानंतर भक्ती संगीत.या तालावर काम चाले. संस्कृत बातम्या सुरु झाल्या कि सात वाजले.सकाळची शाळा असेल तर या आधीच घर सोडलेले असे, एरवी संस्कृत बातम्या झाल्या तरी गाद्या काढलेल्या नसल्या तर आईच्या तोंडाचा पट्टा सुरु होई.संस्कृत बातम्यांच्या निवेदकाचा आवाज अजूनही आठ्वणीत आहे.'इयं आकाशवाणि संप्रति वार्ता: श्रुयंतां प्रवाचकः बलदेवानंद्सागरः' हे वाक्य पाठ होते, मला हा बलदेवानंद सागर नावाप्रमाणॆ बलवान आणि धोतर नेसून उपरणं अंगावर घेवुन, गंध-बिंध लावून बातम्या वाचतोय असचं चित्र डोळ्यापुढे यायचं ,कधी कधी प्रवाचिका 'विजयश्रीः' असायची, ती मात्र रागीट चष्मेवाली, मोठा अंबाडा असलेली बाई असणार असे वाटे,त्या बातम्यांमधलॆ एक अक्षरही कळत नसे , अगदी शाळेत संस्कृत शिकायला लागले तरीही . प्रधानमंत्री,राष्ट्र्पती असे ओळखीचे शब्द कानी पडत, तेवढेच कळत , कळून घ्यायची इच्छा नसे हेच खरे.नंतर प्रादेशिक बातम्या लागत, त्या संपल्या कि हळुच विविधभारती लावायचे.साडेसातला संगीत सरीता मग भुलेबिसरे गीत. यामध्ये जुनी गाणी लावित काही वेळा ती बोअर असत पण बरेचदा छानच असत. चित्रलोक मध्ये त्यावेळच्या नव्या सिनेमांतली गाणी लागत नऊ नंतर अनुरोध गीत असे,आवडीची गाणी लागली की रेडीओचा आवाज मॊठा करायचा,इतका कि अंघोळीला गेले तरी गाणं ऎकू आलं पाहिजे.त्यात आईने सांगितलेल्या कामांकडे कानाडोळा करण्याचा सुप्त हेतूही साध्य होत असे. दहा नंतर अकरा पेर्य़ंत रेडिओ बंद असे. अकरा वाजता मधुमालती कार्यक्रम ऎकत उरलेला गृहपाठ, दप्तर भरणे, जेवण करुन साडेअकरा पावणेबाराला सायकलवरुन शाळेत जायला निघायचे. जाताना मैत्रीणींबरोबर ही आज कुठली गाणी होती, आशा भोसलेची 'ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा' किंवा 'जाईये आप कहा जाएंगे' अशी गाणी ऎकली असतील तर त्याचीच चर्चा.संध्याकाळी सात वाजता 'फौजी भाईयोंकी फर्माईश' अर्थात 'जयमाला'.बुधवारची सिलोनवरची बिनाका गीतमाला आणि त्यातला तो अमीन सयानीचा अफलातुन आवाज आजही आठवतॊ. त्यांचं हिंदी फारसं समजत नसे पण ऎकत रहावं असं वाटे. विविध भारतीवर असणाऱ्या विविध गाण्यांच्या कार्यक्रमांची नावे देखील किती कल्पकतेने दिलेली असत. संगीत सरीता,भुलेबिसरे गीत काय किंवा जयमाला रात्री ११ वाजता 'बेला के फूल'.विनोदी श्रुतिका 'हवा महल'. ,'गागर में सागर'.अशी सगळीच नावे अर्थपूर्ण होती. मराठी कार्यक्रम ही दर्जेदार होते.मराठी श्रुतिका तर सुंदरच असत.व्यंकटेश माडगूळकरांची वाटसरू नावाची श्रुतिका अंगावर काटा आणायची.व.पु.काळ्य़ांचे टेकाडे भाऊजी अजून आठवतात.पु.लं.च्या मुलाखती, त्यांची भाषणे केवळ अप्रतिम.दिवाळीत नरकचतुर्दशीला पहाटे किर्तन असे.दुपारी संगीत नाटके असत.मोठमोठ्या लेखकांचे, कवींची भाषणे , त्यांचे विचार रेडीओमुळे परीचित झाले.
आजकाल 'एफ.एम.बॅंड ' मुळे पुन्हा तरुण पिढी रेडीओ ऎकु लागलीय.शिवाय हल्ली रेडीओ हा आमच्या वेळच्या रेडीओसारखा कोपऱ्यात राहणारा नाही, ट्रांझिस्टर हे त्याचं नाजुक रुपही बोजड वाटेल अशी लहान मॉडेल्स आहेत.गाडीमधील रेडीओ वर एफ.एम.बॅंड असतो,मोबाईल मध्येही एफ.एम.बॅंड असतो, त्यामुळे जळी स्थळी काष्ठीपाषाणी त्याची सोबत असते.शिवाय तो सतत २४ तास चालत असावा. मी मात्र त्याचा आनंद नाही घेऊ शकत. माझे वय हे कारण असू शकेल, मी एक वेळ आजकालची नवी गाणी एन्जॉय करु शकते, पण एफ.एम.बॅंडच्या रेडीओ जॉकी नामक व्यक्तिची अखंड चालणारी निरर्थक टकळी काव आणते. त्या बडबडीतून डोके दुखण्या खेरीज दुसरे काहीच होऊ शकत नाही.त्यामध्ये नविन माहिती मिळत नाही, कि काही मनोरंजन होत नाही.उगीचच हिन्दी, मराठी , इंग्रजी तिन्ही भाषांची खिचडी करत मधूनच आपणच केलेल्या पाचकळ विनोदाला फिदीफिदी हसत असतात.अधूनमधून मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे अशा दिवसांची आठवणही करतात आपण भारतात राहतो, आणि आपल्याकडेही साजरे करावयाचे दिवस असतात असे मला कधी कधी त्यांना सांगावेसे वाटते. गाणे चालू असताना त्यांची बडबड थांबते म्हणूनही कदाचित गाणी आवडत असावित. अर्थात हे तितकेसे बरोबर नाही. ए.आर.रहमानचे संगीत असलेली , किंवा गुलझारची नवीन गाणी खरोखरीच आवडतात.रेडीओ जॉकी मात्र अशक्य आहेत.
वास्तविक रेडीओ हे माध्यम खरचचं चांगलं आहे. मनोरंजन, माहिती सर्व त्यातुन मिळाते, कुठेही नेता येते.आजकाल हेडफोन्स आल्यामुळे त्याच्या वापराने इतरांना त्रास होत नाही.कामे करता करता रेडीओ लावला कि करमणूक होते, त्याच्या पाशी बसून राहण्याची गरज नसते. शिवाय असं म्हणतात दृक माध्यमापेक्षा श्राव्य माध्यम अधिक चांगले, त्यात आपली कल्पनाशक्ती वापरली जाते. एक राजा होता हे एकताना मूल राजा कसा असेल याचं चित्र मनाशी रंगवतॊ, तेच राजा पडद्यावर दिसला तर कल्पना करायची वेळ येतच नाही.त्यामुळे कल्पनाशक्ती कमी होवू लागते.
आजारी व्यक्तींनाही रेडीओची सोबत चांगली.माहितीच्या नावाखाली फालतू बडबड करण्यापेक्षा काहीतरी दर्जेदार मनोरंजन करणे अवघड असले तरी अशक्य नाही. कलाकारांची तर सध्या अजिबात कमतरता नाही. तेंव्हा अनेक नवनवे बॅंड काढण्याऎवजी मोजकेच पण चांगले बॅंड ठेवून त्यावर मनोरंजक,उद्बोधक कार्यक्रम ठेवावेत. त्यामुळे अबालवृध्द पुन्हा एकदा रेडीओ ऎकून त्यातला आनंद घेवू शकतील.


©

Monday, October 12, 2009

सल

पटवर्धन बागेतल्या गजबजलेल्या रस्त्यांतून जाताना, तीस पस्तिस वर्षांपूर्वी मी तिकडे येत होते, असे मुळीच वाटत नाही. दर दोन वर्षांनी बदलणऱ्या पुण्यात जन्मापासून राहून देखील कित्येक भागात बऱ्याच काळाने गेल्यावर भंजाळायला होतं. बंगले पाडून मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात, गल्ल्या जावून रुंद रस्ते बनतात.ओळखीच्या खुणा नष्ट होतात.
पटवर्धन बागेत रामकाकांच घर होतं, रामकाका माझ्या वडीलांचे, दादांचे बालमित्र. त्यांचे वडील दादांचे शाळेतले गणिताचे सर.त्यामुळे दर दोन -तीन महिन्यात त्यांच्याकडे दादांची चक्कर असायची. त्यावेळी फोन नसल्याने एकमेकांकडे भेटायला जाणे चालायचे. रामकाकाही अधूनमधून आमच्याकडे येत. त्यावेळी सहकारनगरमधून दादांबरोबर मी कधी चालत तर कधी सायकलवरुन जात असे.म्हात्रे पूल त्यावेळी नव्हता, आम्ही गरवारे कॉलेजच्या कॉज-वे वरुन गेल्याचे मला आठवते.शेतजमीनीवर अधूनमधून पटावर सोंगट्या पडाव्यात तशी घरे विखुरलेली होती.रस्तेही मातीचेच.काकांचा रवी माझ्य़ापुढे आणि प्रसाद हे मुलगे आणि सीमाच्या पुढे एक वर्ष असल्याने त्या दोघांची पुस्तके आम्ही वपरायचो. ती आणायला मला दादांबरोबर जावे लागे.एरवी त्यांच्याकडे जाणे मी टाळायची , एकतर तिथे बोलायला कुणी नसायचे.दादांच्या सरांबरोबरच्या गप्पात मला रस नसे.पण येता जाता दादा भोरच्या आठवणी, सरांच्या आठवणी त्यांच्या शाळेतल्या गमती सांगत, म्हणून जायला काही वाटत नसे.दहावी नंतर पुस्तकांसाठी जाण्याचा प्रश्ण संपला , अर्थात दादा जायचेच.
मी एफ.वाय ला असताना दादांचे अकस्मिक निधन झाले.रामकाकांना कुठुन समजले कोण जाणे? पण ते लगेचच घरी आले.बालमित्राच्या आठवणी सांगून घळाघळा रडले.नंतर अधूनमधून येत राहिले.आम्हाला दादांच्या ऑफीस प्रोसिजर्स काहीच माहित नव्हत्या.कुठे अर्ज करायचे, कुणाला भेटायचे यासगळ्या बद्द्ल काका मार्गदर्शन करीत. माझ्या बहिणीला दादांच्या जागी नोकरी लावण्यासाठी सुध्दा त्यांनी बरेच प्रयत्न केले. मंत्रालयात सतत जावुन पाठपुरावा करणॆ हि किती जिकिरीची गोष्ट आहे, हे त्यातून जाणाऱ्यालाच कळेल. हे सारे काकांनी केवळ मित्रप्रेमापोटी केले.घरी आले तरी चहाशिवाय ते काही घेतही नसत. आमच्या लग्नांना ते आले. नंतर ते ही सेवानिवृत्त झाले.अधूनमधून आईकडे येत, पण फार क्वचित. त्यांच्य़ा आई,वडीलांचे निधन झाले, त्यांची बायकॊ आजारी असे, ती हि गेली. आईकडे गेल्यावर बातम्या समजत. आईकडे फोन नव्हता, त्यामुळे या बातम्या आईलाही उशीरा समजत. आई देखील आजारी असल्याने पत्र पाठवण्या शिवाय काही करु शकत नव्हती. आम्हाला ती काकांकडे जा, असे सांगायची पण आमची नोकरी, संसार ,घरातल्या रोजच्या अडचणी यात राहून जायचे. मधल्या काळात आईच्या घराची दुरुस्ती केली त्यात जुनी कागदपत्रे,वह्या ,रद्दी फेकताना काकांचा पत्ताही गहाळ झाला.
गेल्या वर्षी पटवर्धन बागेतल्या बंगल्यांच्या सोसायटीत कुणाकडे तरी जायचा प्रसंग आला, तिथे मी करमरकर कुठे राहतात , माहित आहे का? असे विचारले. माझ्याजवळ पत्ता, खुणा काहिच नसल्याने जास्त विचारता येईना,आणि त्यांनाहि सांगता येइना. पण मला सारखे जवळच ते राहत असावे असे वाटत होते. त्यानंतर एक महिना उलटून गेला असावा. मी काही कामासाठी रजा घेतली होती, आणि मुलीला घेवून बाहेर गेले होते. अचानक मला वाटले चला, आज आपण काकांचे घर शोधायचेच. पुन्हा पटवर्धन बागेतल्या बंगल्यांच्या सोसायटीतल्या लहान लहान गल्ल्यांमधून मी फिरु लागले. दिसेल त्या माणासाला विचारु लागले. माझी मुलगी मला वेड्यात काढीत होती.तिच्याकडे दुर्लक्ष करीत माझा शोध चालू होता.पाऊण तास होवून गेला होता, लेक वैतागली होती
"आई , आता बास, उगीच प्रत्येक घरात जावून विचारत बसू नको, एक तर धड पत्ता नाही जवळ, आणि त्या काकांना किती वर्षात बघितलेलं नाहीस , समोर आले तरी ओळखू शकशील का? घरी जायचं का मी जाऊ एकटी? तू बस फिरत"
" अगं, थांब, हि शेवटची गल्ली बघू आणि निघुया" असं म्हणून एका सायकलवरुन जाणाऱ्या शाळ्करी मुलाला थांबवत मी विचारले ,"अरे करमरकर कुठे राहतात माहित आहे कारे?"
"मला दोन करमरकर माहित आहेत, तुम्हाला कोणते हवेत?"
" दोन्ही घरे दाखवतोस?, प्लीज"
" हो, चला ना " असे म्हणत त्याने सायकलवर टांग टाकली.त्याच्या मागे आम्ही गेलो. एका दुमजली घरापाशी तो थांबला. मी त्याला म्हटले इथेच थांब , मी आत जावुन येते.दारात तुळशी वृंदावन होते.पुढच्या दाराला कुलूप होते, पण आशा चिवट होती घराभोवती हिंड्ताना मागचे दार उघडे दिसले जिन्यात वरच्या मजल्यावरून बोलण्याचा आवाज ऎकू आला, कामवाली बाई जिना उतरत होती.तिला विचारले,"राम करमरकरांचे हेच घर का?"
"व्हयं, वैनी कोन आलयं बघा" असं म्हणत ती बाई बाहेर पडली.मुलीने त्या मुलाला हेच घर अशी खूण केली तो मुलगा गेला.
एक नाजूक चेहऱ्याची बाई बाहेर आली.तिच्या चेहऱ्यावर प्रश्णचिन्ह.काकांची सून असावी.
"रामकाका इथेच राहतात ना? मी त्यांच्या मित्राची मुलगी, भेटायला आलीयं त्यांना" एका दमात मी सांगितले.
" हो, याना आत. बसा, पण तुम्हाला समजलेलं दिसत नाही, ते वारले नुकतेच"
" केंव्हा? काय झालं होतं?" काहीतरी विचारायचं म्हणून तोंडतून गेलं, खरतरं मनं एका मोठ्या अपराधी भावनेनं मिटून गेलं होतं. तिनं मला नाव विचारलं. पाणी दिलं.
मी तुम्हाला कधीच पाहिल नाही, पण बाबांच्या तोंडून तुमचं, तुमच्या वडिलांच वर्णन ऎकलयं... ती बोलत होती, मी पण जमेल तसं बोलत राहीले.मनातल्या मनात स्वतःलाच लाख शिव्या मोजल्या.
आज जसा वेळ घालवला तसा काही महिन्यांपूर्वी का घालवला नाही? असा स्वतःला बोल लावत राहीले. काकांना भेटले असते तर त्यांना किती बरे वाटले असते.ज्या माणसाने निरपेक्ष भावनेने आम्हाला एवढी मदत केली त्यांना उतारवयात भेटून आनंद देणे माझ्य़ा हातात होते, ते मी नाही करू शकले.मनात काकांबद्दल कृतज्ञतेची भावना कायम होती, त्यांची आठवणही येत असे. पण त्याला कृतीची जोड नाही देता आली.आज समजतयं दादांचे त्यांच्या सरांना भेटायला जाणं किती मोलाचं होतं, सायकलवरून दादा जात होते, मी मात्र गाडी असूनही गेले नाही.दरवेळी काही ना काही कारणांनी जायचे राहत गेले.
माणसाच्या असण्याला किती गृहित धरतो आपण!, त्यामुळेच भेटण्यासारख्या गोष्टी पुढे ढकलत जातॊ. न संपणाऱ्या कामांच्या फेऱ्यात अडकुन महत्त्वाची कर्तव्ये चुकतात.मागे राहते एक अखंड सलणारी, ठसठसणारी जखम!


©

Friday, September 4, 2009

दादा

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा!
कुसुमाग्रजांची 'कणा' कविता कितिदाही वाचली तरी शेवटच्या या ओळी वाचताना डोळे भरुन येतात, आणि मनात दादांच्या आठवणी दाटून येतात. दादा , माझे वडील त्यांना जावुन या जून मध्ये सत्तावीस वर्षे झाली,पण आजही मनातील त्यांच्या आठवणी ताज्या आहेत.अवघे बावन्न वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले,पण तेवढ्या काळात त्यांनी कित्यॆक जन्माचे त्रास भोगले, कष्टं केले,संकटे झेलली मात्र हे सगळे अगदी हसत हसत.
लहान वयात त्यांचे वडील गेले, लहान धाकटी भावंडे, अडाणी आई कुणाचाच आधार नाही, अशा वेळी मॅट्रीकची परीक्षा पास झाल्यावर इंजिनियरींग कॉलेजचा डिप्लोमा करून सरकारी नोकरी मिळवली, डिप्लोमा करत असताना एका नातलगांनी आपली कसबा पेठेतली खोली रहायला दिली होती, रोज सकाळी कॉलेजला जायचे तेथून स्वरगेटवर चालत जायचे त्यांची आई भोर हून एस.टी ने डबा पाठवित असे, तो डबा घेउन खोलीवर् आल्यावर जेवायला मिळे, सकाळी लवकर उठून त्या माऊलीने केलेली आमटी भाकरी, कधी कधी उकाड्याने आमटी आंबून जात असे, मग पाण्या बरोबर ती भाकरी खायची, ऎन वाढीच्या वयात खाण्याची अशी आबाळ झाल्याने दादांना पानात अन्न टाकलेले चालत नसे, अन्नाला नावे ठेवणे खपत नसे, तसेच भुकेल्यांबद्दल विलक्षण कळवळा असे, त्यांच्या ऑफीसमधल्या परगावाहुन आलेल्या तरुण मुलांना कायम आमच्या घरून डबा नेत, स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्याला खाऊ घालण्याची त्यांना फार हौस.
खाण्यापिण्याच्या आबाळीचे त्यांनी कधी अवडंबर केले नाही, त्यांची शिक्षणाची भूक त्याहून जास्त होती.कुणाचेच मार्गदर्शन नाही, दारिद्र्यामुळे होणाऱ्या मानहानीला घाबरून शिकल्या सवरल्या,सुखवस्तू नातलगांकडे उठबस नाही.कसबा पेठेतल्या गुंड मुलांच्या संगतीत सतत राहूनही त्यांना वाचनाचे जबरदस्त वेड होते.त्यातूनच शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांना जाणवले असावे.प्राप्त परिस्थितीचा स्विकार करून मिळालेली सरकारी नोकरी त्यांना वरदान वाटली.मात्र आपल्या भावंडांना शिकवायचेच असा त्यांनी ध्यास घेतला.घरात वडील माणूस नाही, आई अगदीच गरीब त्यामुळे घरात कुणाला धाक, शिस्त नव्हती.दादांनी भावंडाना रागवून , कडक वागून प्रसंगी पुष्कळ वाईटपणा घेतला,कटूताही स्विकारली मात्र त्या सगळ्यामागे त्यांनी शिकून मोठे व्हावे, आपले घर वर यावे एवढा एकमेव हेतू होता.
दादांनी पी.ड्ब्लु.डी सारख्या खात्यात नोकरी केली. 'खाते' हे नाव सार्थ करणारे हे खाते, पण स्वातंत्र्यपूर्वकाळातील निष्ठावान,चारीत्र्यवान लोकांना पाहून, सतत चांगल्या गोष्टींच्या वाचनातून त्यांनी जी जीवनपध्दती स्विकारली त्याला ते सदैव चिकटून राहिले, घरात त्यांच्या पगाराखेरीज एक नवापैसाही आला नाही.आमच्या घरी सतत माणसांचा राबता असे,भोरहून आईचे किंवा दादांचे नातलग येत, दादांचे मित्र येत, इतक्या साऱ्यांची जेवणी खाणी करताना आईचा जीव दमून जाई,पैशाची कायमची चणचण.शिवण शिवून ,मुलांच्या शिकवण्या घेवून आई संसाराला हातभार लावी पण एकूण दिवस कठीणच होते.त्यातच पानशेत धरण फूटून पूर आला आणि आई दादांचा संसार त्यात पूर्ण वाहून गेला.आईच्या एका आते बहिणीकडे त्यांना आसरा मिळाला.दादांनी आपल्या शिकणाऱ्या भावंडांना भोरला पाठविले.ठिकठिकाणी पूरग्रस्तांसाठी मदत केंद्रे होती, पण दादांनी आईला स्पष्ट सांगितले होते, कुठेही जावून हात पसरायचे नाहीत.आपले हातपाय धड आहेत, पुरात कोणी बुडून गेले नाही हे काय कमी आहे? गेलेले सगळे परत मिळवू.पण लाचार नाही व्हायचे! त्यांनी कधी तोंडावाटे निराशेचा सूर काढला नाही, उलट आईला चेष्टेने म्हाणायचे ,'बघ सगळ्या घरादारावर पाणी सोडून तुला घेवून मजेत हिंड्तोय!'
रद्दीच्या दुकानातून पुस्तके आणण्याचा दादांना फार नाद होता.अतिशय उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह त्यांनी गोळा केला होता.त्यांना मराठी वाङमाची अतिशय आवड.गडकऱ्यांची नाटके,बालकवी, कवी बी,केशवसुत, कुसुमाग्रज,कवी चंद्रशेखर अशा जुन्या कवींबरोबरच, विंदा करंदीकर,मंगेश पाडगावकर यांचे कविता संग्रह आमच्या घरी होते.त्यांनी नोकरी घरातल्या नाना जबाबदाऱ्या सांभाळून केवळ आवड म्हणून टिळक विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या 'साहित्य विशारद' झाले, पुणे विद्यापिठाची 'बी.ए' पदवीही मिळवली.त्या सुमारास पूरग्रस्तांसाठी सहकारनगर मध्ये सरकार कडून लीज वर प्लॉट आणि कर्ज मिळाले होते, सोसायटी स्थापन करून घरे बांधण्याचे काम चालू होते, त्यासाठी दादांना सतत जावे लागे, सगळीकडे सायकल वरून हिंडावे लागे, स्टेशन जवळ त्यांचे ऑफीस, घर डेक्कनवर बांधकाम सहकारनगर मध्ये अशी सगळी रपेट ते करत आणि घरी आल्यावर आमच्याशी गप्पा,चेष्टा रात्री च्यांचे वाचन चाले.
सहकारनगर मध्ये आम्ही रहावयास गेलो त्यावेळी तो भाग आजच्यासारखा नव्हता. रस्ते मातीचे, दिवे नाहित, दुकाने नाहीत. काळ्या मातीत पावसाळ्यात सायकली आडकून बसत.साधे दळण आणायला २ किमी जावे लागे.७१-७२ साली दुष्काळामुळे धान्याची चणचण होती.महागाई घराच्या कर्जाचा हप्ता द्यावा लागे. मी त्यावेळी लहान होते दुसरी तिसरीत. मला परिस्थितीची जाणीव असे, पण घरातले वातावरण नेहमी प्रसन्न असे.आई दादांनी आमच्या घराभोवतीच्या जागेत कष्ट करून ईतकी सुंदर बाग केली होती नाना तऱ्हेच्या भाज्या,फळे फुले लावली बागेने आमचे सगळे लाड पुरविले.आधी त्या जमिनीवर एरंडाची झाडे ,कॉंग्रेस गवत होते.दादा ऑफीस मधून आले की गवत काढीत.एरंडाची काटेरी फळे फोडून बिया जमा करत, त्या घाण्यावर देवून त्यातून बागेसाठी बी-बियाणे आणत.बागेतल्या पाला-पाचॊळ्यावर पाणी तापवित.तोंडलीला गरम पाणी लागते असे समजल्यावर कुकरमधले पाणी देखील तोंडलीला घालायला लावत.स्वतः वेलाच्या मांडवाखाली अंघॊळ करत.चुलीतल्या निखाऱ्यावर वांगी,बटाते भाजून देत.काटकसरीचे,सतत उद्योगात राहण्याचे धडे त्यांनी आम्हाला नकळत दिले.बागेतल्या भाज्या,फळे सगळ्याना द्यायची त्यांना फार हौस होती.पेरू, जांभळे आम्ही शाळेत नेत असु.भेंडी,मेथी, करडई,वेगवेगळ्या घेवड्याच्य़ा वेली.घोसावळी अशा सगळ्या भाज्या त्यांनी लावलेल्या होत्या.रायावळे,पेरु,जांभळे,आंबे,चिकू अशी फळझाडेही होती.आळू,माका,ब्राम्ही एवढेच नाही तर कापसाचे झाड त्यांनी लावले होते.कापसाची बॊंडे सोलून सरकी भोरला आईच्या माहेरी गाई साठी पाठ्वत. तुरीची झाडेही होती.कोवळ्या तुरीच्या शेंगा आम्ही भतुकलीत घेत असू त्याच्या कोवळ्या दाण्यांची उसळ खुपच मस्त होई.
वाढती महागाई, आमची शिक्षणे पै-पाहुणे यामुळे वाढते खर्च ,ऑफीसच्या कामाचे ताण आणि स्वतः कडे कायम दुर्लक्ष या सगळ्याचा त्यांच्या तब्येतीवर परीणाम झाला. त्यांना डायबेटीस झाला, त्यावर ते ससून मध्ये जावून औषधे आणत, गोड खाणे त्यांनी बंद केले, डॉक्टरांनी सांगितले म्हणून सकाळी टेकडीवर फिरणे सुरु केले. रोजचे १०-१२ कि.मी सायकलींग करत तरी हा वेगळा व्यायाम करीत. मात्र जेवणाच्या वेळा सांभाळणे , चार वेळा थोडे-थोडे खाणॆ हे त्यांनी कधीच केले नाही. आम्ही लहान होतो, आंम्हाला त्या आजाराची फारशी माहिती नव्हती.त्यांनाही कुठलाच त्रास होत नसे, कि होणारा त्रास ते जाणवू देत नव्हते , कुणास ठाऊक? पण मी बारावीत असताना डायबेटीसने त्यांच्या डोळ्यावर परिणाम झाला.कमी दिसू लागले,त्यावेळी पुण्यात लेझर सर्जरी सारखे उपाय उपलब्ध नव्हते.ससून मध्ये त्यांना मुंबईच्या के.ई.एम.मध्ये उपचार होतील असे समजले. मग मुंबईच्या वाऱ्या सुरु झाल्या. मद्रासहून डॉ.मस्कती येतं , त्यांनी दादांच्या डोळ्यावर क्रायोसर्जरी केली.त्याने फायदा झाला. पण पुढे आईचे पोटाचे ऑपरेशन झाले. नंतर डायबेटीस ने त्यांच्या किडनीवरही परिणाम झाला. जेवण जात नसे, वजन कमी झाले. तशाही अवस्थेत ते ऑफीसला जात होते.आम्हाला त्यांच्या दुखण्याची कल्पना आली होती. मात्र आता औषध-उपचार चालू आहेत, पथ्य-पाणी आहे, बरे वाटेलच.अशी त्यांची आणि आमची खात्री असायची.
२जूनला दादा घरी आले , येताना त्यांनी त्यांच्या लाडक्या नातवासाठी आंबेही आणले होते.रात्री जेवणे झाली, रात्री त्यांना खोकला येत होता, झोपता येत नव्हते. मी रात्री जवळच्या डॉक्टरांना बोलवायला गेले. ते आले नाहीत. सकाळी जास्त त्रास होऊ लागला, आम्ही त्यांना जवळच्या हॉस्पीटल मध्ये नेले, तेथेही त्यांनी शेजारच्या राजाभाऊंजवळ ऑफीसच्या कामाची फाईल द्यायला सांगितली आणि २-३ दिवस येणार नाही असा निरोप दिला. हॉस्पीटल मध्ये त्यांना सलाईन लावले. तिथल्या डॉक्टरांनी दुसऱ्या मोठ्या डॉक्टरांना फोन केला. ते डॉक्टर आले, पण त्या आधीच दादा हे जग सोडून गेले होते. इतक्या जवळच्या व्यक्तीचा इतक्या जवळून मृत्यू बघताना माझे वय होते १७ वर्षे.हॉस्पीटल बाहेरच्या जिन्यात आई हताश पणे बसली होती. धाकटी बहीण कुणालातरी बोलवायला गेली होती.मोठी ताई लग्न होउन सासरी गेलेली, गावात माहेर असल्याने रहायला येत नसे, ती नेमकी त्यावेळी प्रथमच रहायला आली होती. आता वाटते, दादांना स्वतःच्या मृत्यूची कल्पना आल्याने तिला आग्रहाने बोलावले असेल.
'जगण्यासारखे काही आहे ,तोवर मरणात मौज आहे ' गडकऱ्यांचे वाक्य दादा नेहमी म्हणत. त्याप्रमाणे त्यांना मरण आले. त्यांना यातना झाल्या नाहीत असे नाही, पण आजारापेक्षाही अनेक मानसिक त्रास त्यांनी सोसले, त्यातून मृत्यूनेच त्यांची सुटका केली.
त्यांच्या पश्चात सुरुवातीचे दिवस फार कठीण गेले. एक तर घरातली एकमेव मिळवती व्यक्ती गेली. आमची शिक्षणे चालू होती.पैशा-अडक्याचे व्यवहार माहित नव्हते. पोरपण जावून पोरकेपण आले होते.वडीलांचे छत्र नसणे म्हणजे काय असते, याचा अनुभव फार कटू असतो.कुणा लहान मुलावर तो कधीही येऊ नये.मुळात मुलाचे लहानपण संपवणारी ती घटना आहे, आणि खरचं वय लहान असेल तर ती सगळ्या व्यक्तिमत्वावर परीणाम करुन जाते.
अगदी तान्ह्या बाळाचेही आई बापा वाचून काही अडत नसते. कुणी ना कुणी तरी त्याला वाढवतेच. म्हणून त्यांची उणीव भासत नाही असे नाही. आमचेही दिवस सरले, त्या दिवसांनी आम्हांला खूप शिकवले.आपले कोण, परके कोण समजले.कष्टांचे मोल कळले.दादांच्या ऑफिसमधल्या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, वरीष्ठांनी सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या जागी बहीणीला नोकरी मिळाली. माझेही शिक्षण झाले, कुठल्याही ओळखी, वशिल्याशिवाय चांगल्या नोकऱ्या मिळाल्या.दादांनी आमच्यसाठी भले पैसा नसेल ठेवला, पण आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं . आयुष्यभर कष्ट करत राहून मेहनतीचे बाळकडू दिले . कुठल्याही कामाची लाज न बाळगायला शिकवले . वाचनाची गोडी लावुन पुस्तकांसारखा सखा दिला . त्यांनी केलेल्या लाडाची आणि प्रेमाची शिदोरी पुढच्या साऱ्या आयुष्याला पुरेल आणि पुण्याई तर पुढचे अनेक जन्म.दादांच्या आठवणीशिवाय दिवस जात नाही.आजच्या काळात डायबेटीसवर इतके संशोधन झालय, इतक्या उपाय योजना झाल्यात, आज आमच्याकडे पैसा आहे,सारखे वाटते आज दादा हवे होते, त्यांना आम्ही सुखात ठेवले असते. नातवंडांमध्ये ते रमले असते. गाणी ऐकली असती. घरात बसून वाचन केले असते, टी.व्ही. बघितला असता. नवनव्या गोष्टी शिकण्याची, समजावून घेण्याची त्यांना फार हौस होती.मुलांमध्ये मूल होवून जाण्याचा दुर्मीळ गुण त्यांच्या मध्ये होता.आता त्यांच्या आठवणीत रमण्याशिवाय आमच्या हातात काहीच नाही.


©

Monday, May 11, 2009

रीक्षावाल्यांची अरेरावी

अखेरीस रीक्षांचा संप मिटला.या वेळी शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे हा संप बरेच दिवस टिकला.सहा दिवस हा म्हटल तर कमी,म्हटलं तर् जास्त दिवसांचा काळ. पण एकंदरीत रीक्षा हा चर्चेचा विषय व्हावा अशी परिस्थीती झाली आहे.वास्तविक आता घरोघरी वाहनांचा सुकाळ आहे.घरातील माणसांपेक्षा वाहनांची संख्या जास्त असे पुण्यात तरी दिसतेच, त्याला कारणेही आहेतच.घरातील प्रत्येकाला बाहेर जाताना वाहन हवे, शिकणाऱ्या मुलांना स्वतंत्र वाहन हवे, आई वडील दोघांसाठी वेगवेगळ्या दुचाक्या हव्यात शिवाय सगळ्यांनी एकत्र जाण्यासाठी एक चारचाकी हवीच.ईतकी वाहने असूनही रीक्षाची जरुर लागतेच.पुण्यात गर्दीच्या वेळी कार चालवणे कठीण त्याहीपेक्षा पार्कींग मिळणे अवघड.लक्ष्मी रोड, मंडईत आठवड्यातून एकदा तरी न जाणारा माणूस हा पुणेकर नाहीच.त्यामुळे अशा गर्दित जाताना वाहने घरी ठेवून रिक्षाने जाणॆ बरे असे मानणाऱ्यांची संख्याही वाढत जात आहे. जेष्ठ नागरीकांना तर रिक्षा लागतेच, आजारी माणसे, लेकुरवाळ्या बायका,या सगळ्यांना रीक्षा प्रवास अपरिहार्य आहे.आजकाल पुणे चहूबाजुंनी वाढ्त चाललयं, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शाळेची बस नसेल तर रीक्षा शिवाय पर्याय नाही. बाहेर गावाला जाताना किंवा गावाहून आलेल्यांना रीक्षा करावीच लागते.एकंदरीत रीक्षावाल्यांचा धंदा जोरात असतॊ.
रीक्षांची संख्या वाढूनही , पुण्याची लोकवस्ती वाढल्यामुळे त्यांच्या धंद्यावर परीणाम झालेला नाही.दिवसेंदिवस रीक्षावाले हे आपण रीक्षा चलवून समस्त पुणेकरांवर उपकार करत आहोत, आपल्याला या व्यवसायाची मुळीच जरुर नाही अशा थाटात वागत असतात. गेल्या वीस पंचवीस वर्षात पुण्याचा चेहरा मोहरा बदलला, अस्सल पुणेरी म्हणून वर्णिलेले पुणेकराचे खास मासले (पु.लं.चे पुणेरी लोक) आता कमी दिसत असले तरी रीक्षावाल्यांनी आपला पुणेरी बाणा सोडलेला दिसत नाही. कुठल्याही रस्त्याच्या कोपऱ्यावर ही मंडळी कोणत्याही वेळेला निवांत बसलेली असतात.कुठलेही गिऱ्हाईक आले तर त्याच्या कडे ढुंकुनही पाहायचे नाही असा त्यांची रीत असते. मात्र त्या व्यक्तिने स्टॅंड वरच्या रीक्षाऎवजी रस्त्यावरच्या चालत्या रीक्षाला हात करण्याचा अवकाश ही सगळी मंडळी खडबडून ऊठतात, त्या व्यक्तिला स्टॅंड वरचीच रीक्षा घेतली पाहिजे तसा नियम आहे इ. सुनावतात. ती व्यक्ती बिचारी चालती रीक्षा सोडते.मग स्टॅंडवरचे रीक्षावाले ओळीने त्या व्यक्तिच्या इछ्ति स्थळी आपण येणार नसल्याचे सांगतात.हातचे सोडून पळ्त्या पाठी जाऊ नये असे म्हणतात, मात्र इथे पळ्ती सोडून हातचा (स्थीर अशा अर्थी) रिक्षावाला धडा देतो.
फार जवळच्या अंतराला हे येत नाहीत, फार दुरचे अंतर त्यांना नको असते.फार काय आपण आपल्या मर्जीच्या ठिकाणी जाण्याऎवजी त्याच्या मनात असेल तिथे जावे अशी त्यांची इच्छा असावी.यात त्यांच तरी काय चूक आहे ? माणूस धंदा का करतॊ? आपल्या मर्जीप्रमाणे वागता यावे म्हणूनच ना!दुसऱ्याच्या मनासारखे वागायला ते काय तुम्हा आम्हा सारखे नोकरदार आहेत? वाटल तर ते तुम्हाला नेतील. त्यांना हव्या त्या मार्गाने,पाहीजे तशा वेगाने,रहदारीच्या स्वतःच्या नियमांनी नेतील, आणि या साऱ्याबद्दल तुम्ही त्यांना ते मागतील तितके पैसे दिलेच पाहिजेत, हक्कच आहे त्यांचा तो.सुट्टे पैसे जवळ ठेवणे हे तुमचेच काम आहे, रीक्षात बसताना तेवढी खबरदारी घेतलीच पाहिजे.अगदी सतरा रुपये झाले तरी वरचे सात सुटे द्या, नाहीतर ३ रुपयांवर पाणी सोडा.दोन तीन रुपयांसाठी कुरकुर करणारी गिऱ्हाइके घेणार नाही असा नवा नियम करायला हे रीक्षा संघटना वाले मागे पुढे बघणार नाहीत. रीक्षात पेट्रोल भरण्यासाठी तिच्यात गिऱ्हाइक बसलेले असावे हाही त्यांचा नियम असावा.चार पाच कि.मी.च्या अंतरावर जाण्यासाठी तुम्ही रीक्षात बसलात की रीक्षावाला प्रथम जवळचा पेट्रोलपंप गाठतो.जर तुम्ही काही बोलण्याचे धाडस केलेत तर "पेट्रोल अगदीच संपलयं, वाटेत बंद पडली तर मी नाही जबाबदार " अशी दरडावणीच्या आवाजात समज दिली जाते.जणू काही बसल्या बसल्या आपण त्या रिक्षाच्या टाकीतले पेट्रोल ज्युस सारखे प्यायलोय आणि त्यामुळेच ते संपलय !
हॉस्पीटल आणि कोर्ट याची पायरी चढावी असं सामान्य माणसाला चुकूनही वाटत नाही.पेशंट म्हणून किंवा त्याचे नातेवाईक म्हणून हॉस्पीटलमध्ये जायची वेळ प्रत्येकावर कधी ना कधी येतेच.दीनानाथ हॉस्पीटल मध्ये जाण्याचा प्रसंग माझावर गेले २-३ वर्षात आला. हॉस्पीटलच्या बाहेर रीक्षांची भलीमोठी रांग आणि हॉस्पीटलमधून चालत,खुरडत जाणारे अनेक असहाय चेहरे त्यात काही पेशंटस, तर काही त्यांचे नातलग.संध्याकाळ्ची सात साडेसातची वेळ आणि दहा पैकी आठ रीक्षावाले या लोकांना न्यायला नाही म्हणत शांत पणे बसलेले.कोथरुडला येणार नाही,पौड्फाट्याला जमणार नाही. औंध फार दुर आहे, सहकार नगर -तिकडून येताना एम्टी यावं लागेल.अशी उत्तरे देत सर्वांना वाटेला लावणाऱ्या रीक्षावाल्यांचा तिथे थांबण्याचा हेतू काय असेल? असा मला प्रश्ण पडला.एक तर हॉस्पीट्लमधून बाहेर पडणारी व्यक्ती प्रचंड काळजीत असते,प्रकृती-पैसा,मनुष्यबळ अशा नानाविध बाबी असतात.हॉस्पीट्लमध्ये मिळणारी वागणूकही फारशी चांगली नसते,अशा अगतिक माणसाला जाण्यासाठी रीक्षा दिसत असूनही तो येत नसेल तर त्याची काय अवस्था होत असेल?
अशीच रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅंड च्या बाहेर उभ्या असलेल्या रीक्षावाल्यांची कथा डेक्कन क्वीन, प्रगतीने येणाऱ्यांपैकी रोज पुणे-मुंबई प्रवास करणारे सोड्ले तर बरेचसे ऑफीसच्या कामासाठी गेलेले असतात, सहाजिकच माणूस दमलेला असतो, घरी जाण्याची ऒढ असते आणि रस्त्यावर आले कि हे रीक्षावाले आडमुठे धोरण दाखवायला लागतात, ज्यादा भाडे मागणे, इच्छित स्थळी यायला नकार देणे.माणसाच्या असहायतेचा फायदा उठवणाऱ्य़ांनी गिऱ्हाईकांकडून माणुसकी आणि सौजन्याची अपेक्षा ठेवायची हा केवढा विरोधाभास आहे! केवळ यांच्या संघट्ना आहेत आणि ग्राहक असंघटित, म्हणून यांची मनमानी चालते.
शाळेत रीक्षाने जाणाऱ्या मुलांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.रीक्षात किती मुले घ्यावी यावर सुरुवातीच्या काळात बंधन नसे, मध्यंतरी एक-दोन अपघात झाले त्यानंतर ह्या संख्येवर बंधन आले.पण बंधन आणि नियम हे तोडण्यासाठीच असतात ह्या जन्मसिध्द हक्कानुसार ते सारे धाब्यावर बसवून रीक्षात आठ-दहा पासून पंधरा पर्य़ंत कितीही मुले भरतात.प्रत्येकाची दप्तर,डब्याची पिशवी हे सारे पुढे असते आणि मागच्या जागेत ही सगळी मुले कोंबलेली असतात.कडेच्या मुलांची निम्मे शरीर रीक्षाबाहेर असते.मधल्या मुलांच्या मांडीवर मुले असतात, पुण्याच्या बेशिस्त रहदारीमधून अशा रीक्षा ऎन गर्दिच्या वेळेला भरधाव वेगाने धावत असतात.शाळा दहा महिने असते, त्यांना अकरा महिन्याचे पैसे द्यावे लागतात.शिवाय ट्रीप,१५-ऑगस्ट,२६ जानेवारी, गॅदरींग, रीपोर्ट -डे अशा वेगवेगळ्या निमित्ताने शाळेच्या वेळपत्रकात बदल असेल तेंव्हा रीक्षा येणार नाहीत, हे त्यांनी आधीच स्पष्ट केलेले असते.माझी मुलगी शाळेत रीक्षानेच जाते.
ती एकदा मोठ्या कौतुकाने सांगत होती,’आई ,आज ना,शाळेत जाताना आमच्याकडे सगळे बघत होते आणि हसत होते’
’का गं?’
’अगं, आमच्या रीक्षाला ट्पच नव्हते,काकांनी ते नवीन करायला टाकलयं, आम्हाला डायरेक्ट आकाश दिसत होते’
मला हसावे कि रडावे कळेना, शाळेला इतक्या सुट्ट्या असताना शाळॆच्या वेळातच रीक्षाची डागडुजी करायची जरुर आहे का? बर, हे त्यांना विचारायची सोय नसते, एकतर आपल्या नोकरीमुळे त्यांच्याशी गाठ घेणे मुश्कील.काही बोलले तरी मला हे कसे परवडतच नाही,केवळ तुमच्यावर मेहेरबानी म्हणून मी हा आतबट्ट्याचा धंदा करीत आहे असा बोलण्याचा सूर असतो.माझा मुलीच्या शाळेत शाळा सुटल्यावर एक तास मैदानावर कुठ्लाही खेळ खेळावाच लागेल अशी सूचना आली.मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्यच आहे असे सगळ्या पालकांचे मत होते.मुलांचाही या सूचनेला विरोध असण्याचे काहीच कारण नव्हते.
आमच्या रीक्षाकाकांनी आम्हाला सरळ सांगितले,’ते खेळ -बिळ तुमच्या मुलीला खेळु देवू नका ’
’अहो, पण ते कम्प्लसरी आहे, आणि त्यात वाईट काय आहे?’
’अहो त्यात काय एक खोटं, मेडिकल सर्टिफिकेट द्यायच, मी देतो हवं तर,रीक्षातल्या सगळ्यांना मी हेच सांगितलय,मला वेळ नाही ना पाच नंतर’
’पण हा काही आजचा नियम नाही,खोटे सर्टिफिकेट आम्ही देणार नाही,मुलांनी रोज खेळलच पाहिजे’
’खेळुद्याना मुलांना, तुम्ही घरुन घराजवळील ग्राऊंडवर पाठ्वा, पैसे भरले कि कुठेही घालता येतं, तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या मुलीची सोय तुम्ही करा’
म्हणजे या काकांच्या सोयीसाठी आम्ही आमच्या मुलीला शाळेत फुकट मिळणाऱ्या खेळापासून वंचित करायचं, खोटे सर्टिफिकेट देवून शाळेला फसवायचं आणि पदरमोड करून वेगळिकडे खेळायला पाठवायचं आहे कि नाही कमाल !
सगळेच रीक्षावाले असे असतात असे नाही.काही फार चांगले असतात.लोकांच्या विसरलेल्या बॅगा त्यांच्या कडे प्रामाणिक पणाने नेवून देणारे रीक्षावाले, रस्त्यावर अपघात झाला तर जखमी व्यक्तिला रीक्षातून दवाखान्यात नेणारे,अनोळखी जागी गेल्यावर पत्ता शोधायला मदत करणारे,शाळेच्या शेवट्च्या दिवशी मुलांना खाऊ खायला घालणारे असे चांगले रीक्षावाले असतात.माणुसकीचे दर्शन देणाऱ्या अशा रीक्षावाल्यांना जाहीर धन्यवाद आपण पेपर मध्ये वाचतोच.त्यांचे कौतुक करायला आपण नेहमीच तयार असतो.मात्र असे प्रसंग फार फार क्वचित येतात. एरवी नेहमीच खिशाला खार लावून त्यांची मिरासदारी सोसायची.रीक्षावाल्यांच्या संघट्ना पेट्रोलचे दर एक रुपयाने वाढल्यावर तत्परतेने किलोमीटर मागे एक रुपयाने भाडे वाढवून घेतात.मात्र पेट्रोलचे दर दहा रुपयांनी कमी होवून देखील भाडे वाढ एक रुपयांने कमी करायला यांची तयारी नाही.इलेक्ट्रॉनिक मीटर बसवायला यांचा विरोध,सी.एन.जी कीट बसवायला नाराजी.यातुनच त्यांना सध्याच्या पध्दतीत किती फायदा होतो हे न कळ्ण्याइतके पुणेकर अडाणी नाहीत.पण म्हणतात ना ’अडला हरी.....’


©

Wednesday, April 22, 2009

पत्रपुराण

भाषेच्या देणगीतून माणसाला संवादाचे वरदान लाभलयं. समोरासमोर असताना न सुचणारे बरेचसे लिहायला मिळाल्यावर तर काय ? लिपीचा शोध कुणी लावला असेल? मी कधी त्या दृष्टीने विचारच केला नव्हता, असे मूलभूत शोध लावणारे असामान्य बुध्दीमत्तेचे लोकं, त्यांच्या अलौकिक प्रतीभेची आपल्याला दादही नसते. समजायला लागल्यापासून आपण शाळेत जाऊ लागतॊ आणि अक्षरे गिरवता गिरवता लिहा वाचायला लागतो.
कागदाचा शोध लागण्याआधीपासूनच पत्र लिहिण्याची प्रथा चालू आहे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेले पत्र, किंवा दमयंतीने नळराजाला लिहिलेले पत्र हि पुराणतली प्रेमपत्रे पत्रकलेची साक्ष तर देतातच शिवाय त्याकाळतील स्त्री-शिक्षणच नव्हे तर स्त्री-स्वातंत्र्याचा पुरावा देतात.
चांगदेवांनी ज्ञानदेवांना पाठवलेले कोरे पत्र त्यानंतर त्यांनी लिहिलेली चांगदेव पासष्टी अध्यात्मातील पत्रव्यवहारावर प्रकाश टाकतात, अफजलखान येत आहे अशी सूचना देणारे रामदासस्वामींचे शिवरायांना पाठविलेले पत्र, बाळाजी आवजी चिटणिसांनी कोऱ्या कागदावर वाचून दाखविलेला खलिता, आनंदीबाईंनी केलेला ’ध चा मा’ राजकारणातील पत्रांची महती दर्शवितात.
पंडीत नेहरूंनी तुरुंगामधून ईंदिराला(ईंदिरा गांधींना) लिहिलेली पत्रे प्रसिध्द आहेत. न्या.राम केशव रानड्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेली अध्यात्मिक पत्रे तर केवळ अप्रतिम. शाळकरी वयात साने गुरुजींची सुधास पत्रे वाचलेली आठवतात? कोकणाचे,तिथल्या निसर्गाचे फुलांचे वर्णन वाचताना गुरुजींच्या निसर्ग प्रेमाची,निरीक्षणाची पदोपदी कमाल वाटते.
’पत्राने’ किती तरी कवींना काव्यासाठी विषय पुरविला आहे. हिंदी सिनेसंगीतात पत्रावरच्या गाण्यांची गणती करता येणार नाही. ’ये मेरा प्रेमपत्र पढकर’ , ’खत लिख दे सावरीया के नाम बाबू’, ’फूल तुम्हे भेजा है खतमें’ , ’तेरा खत लेके सनम पांव कही रखते हैं हम’ अशी एकाहून एक गाणी आठवू लागतात.निनावी पत्रे म्हणजे एकप्रकारचे खलनायकच. ठरलेली लग्ने मोडणे, भांडणे , बेबनाव अशा अनेक गोष्टींना कारणीभूत ठरलेली हि पत्रे.ऊशीरा मिळाल्यामुळे काहींची जीवने उध्वस्त करणारी तर अजिबात न मिळाल्याने एखाद्याचे भले करणारी अशी ना ना जातीची आणि ना ना स्वभावाची पत्रे.जुन्या काळी एखाद्या दूरच्या आड गावी नोकरी-धंद्याच्या निमित्ताने राहणाऱ्या व्यक्तिला घरचे खुशालीचे पत्र केवढा दिलासा देत असेल ! दूर गावी शिक्षणासाठी राहिलेल्या मुलाला घरच्या पत्राची किती अपूर्वाई वाटत असेल.लांब गावी सासुरवास सोसणाऱ्र्या मुलीच्या आयुष्यात माहेरी बोलावणारं पत्र केवढा आनंद देत असेल! खेडेगावात एकाकी जीवन कंठणाऱ्र्या थकलेल्या म्हाताऱ्यांना मुला -नातवंडांची पत्रे म्हणजे रखरखीत उन्हात थंडगार सावली ठरत असतील.डॉ.अनिल अवचटांच्या मुलीने लिहिले होते, त्यांची आई म्हणजे डॉ.सुनंदा अवचट त्यांना दरवर्षी वाढदिवसाला पत्र लिहित असे आणि ईतर सगळ्या भेटींपेक्षा हि भेट त्या मुलींना फार आवडत असे. खरच, वाढीच्या संस्कारक्षम वयात त्यामुलींना आईने लिहिलेली पत्रे हा त्यांच्या आयुष्यातला केवढा मोलाचा ठेवा ठरतील!
हि सगळी चर्चा झाली अनौपचारिक पत्रांबद्दल.औपचारिक पत्रे आजही येतात. सरकारी कामकाजाचा डोलारा त्यांच्यांवरच उभा असतो. कुठलेही काम लेखी ऑर्डर आल्याशिवाय करायचेच नाही असा अलिखित्(?) नियम असतो, त्यामुळे खालच्या ऑफीस पासून वर आणि वरून खाली पत्रव्यवहार चालू असतात. पत्रावर कुठलीही ऍक्शन घेण्याआधी त्याचे उत्तर म्हणजे पुन्हा पत्रच लिहावे लागते.पत्रांच्या प्रती काढाव्या लागतात त्या संबधित व्यक्तींना पाठवाव्या लागतात , शिवाय त्याची स्थळ प्रत जपावी लागते.एवढे सगळे केले की मग वेळ मिळाला तर पत्रावर कृती करता येते, दरम्यान या साखळीतल्या कोणाचीही बदली झाली तर त्या पत्रांचे संदर्भच बदलू शकतात.अशा कारभारात सर्वसामान्य नागरीक भरडला जातो असे नाही तर खुद्द सरकारी कर्मचारी,मग तो कोणत्याही पदावर असो, त्यालाही या पत्रव्यवहाराचे चटके सोसावे लागतात.या बाबतीत शासकीय कारभारात सर्वधर्म समभाव दिसतो.सरकारी कर्मचारी किंवा त्याच्यावर अवलंबून असणारी त्याच्या कुटुंबातली व्यक्ती आजारी असल्यास आणि सरकारने नेमून दिलेल्या दवाखान्यात ऊपचार घेत असल्यास त्याच्या खर्चाचा काही भाग कर्मचाऱ्याला मिळतो.वरील सर्व नियमात बसणारे असूनही ही बिले मिळण्यासाठी कर्मचाऱ्याला ज्या पत्रव्यवहाराला तोंड द्यावे लागते त्यामुळे तो स्वतः पेशंट असेल तर पुन्हा आजारी पडेल आणि घरच्या कोणासाठी करत असेल तरी त्याला दुखणे येईल.त्याचे अर्ज , पत्रे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत फिरत सगळ्या ऑफिसमधून फिरून झाल्यावर हेड ऑफिसला जातात, त्यावर बरीच टिका-टिप्पण्णी होते, बिलांना वेगवेगळ्या कात्र्या लागतात, वेगवेगळे रिपोर्टस , वैद्यकीय आधिकारी-हॉस्पीटलाचे मेडीकल शॉप यांच्या चिठ्या काहीना काही मागत राहतात, तिकडे हॉस्पीटलही शासकीय त्यांचाही तसाच कारभार,थोडक्यात काय तर एखाद्याने पत्नीच्या प्रसूतीचे बिल ऑफिसकडे सादर केले तर् ते त्याच्या मुलाच्या मुंजीपर्यंत मिळाले तरी फारच लवकर मिळाल्याचा त्याला आनंद होतो.संगणक युगातही शासकीय कारभारात हेच चालते. फक्त हि पत्रे पूर्वी हाताने किंवा टाइपरायटरवर लिहिली जात ती आता संगणकावर टाईप् होतात लेझर प्रिंटर वर प्रिंट होतात इतकाच काय तो बदल. संगणक बिघडला , त्यावर काम करणारा माणूस रजेवर गेला, प्रिंटर मोडला हि नवी कारणे दप्तर दिरंगाईला प्राप्त झालेली आहेत. आपल्या ’माझे पौष्टिक जीवन’ या लेखातून पु.लं.नी पोष्ट खाते,तिथला कर्मचारी वर्ग, पोष्टाची भाषा ,पत्रांची महती याचं फारच सुरेख चित्र उभ केलं आहे, त्यांचे ’माझे पौष्टिक जीवन’ अभिवाचन तर निखळ विनोदा मुळे निर्भेळ आनंदाचा प्रत्यय देते.
पण मी सहज विचार करायला लागले आजच्या पिढीला हा विनोद जाणवेल का? आज पत्र लेखन जवळजवळ थांबलेलेच आहे.सुशिक्षितच नव्हे तर अशिक्षित लोकही पत्र लिहून घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. फोनने सगळ्यांचेच जीवन सोपे करून टाकले आहे. मोबाईलमुळे तर विचारायलाच नकॊ , सगळॆच एकमेकांच्या रेंजमध्ये अर्थात हवे तेंव्हा, हवे त्यावेळी. मुलांना आई बाबांची गरज असेल(पैशा-बिशासाठी) तर फोन अचूक लागतोच.आणि त्यांची कटकट् नकॊ असेल तेंव्हा तो स्विच ऑफ करता येतो, बॅटरी डाऊन असते, रेंज नसते, नेटवर्क फेल असते, ट्रॅफिक(नेटचा) जॅम असतो, छप्पन कारणे असतात. आजच्या इन्स्टंटच्या जमान्यात पत्र लिहीणे,त्याला पोस्टाची तिकिटे लावणे, मग ते टाकणे इतके व्याप करायला सवड कुठे आहे त्याहीपेक्षा पत्राच्या उत्तराची वाट पहाणे हे तर फारच बोअरींग.
सध्याच्या कॉम्प्युटरच्या जमान्यात ’ई-मेल’ हि स्वस्त आणि मस्त सोय आहे. जवळपासच्या मित्रापासून सातासमुद्रापलिकडल्या संबधिंताबरोबर संपर्कात राहण्याचे एवढे सोयीचे साधन नसेल. हल्ली देवनागरीमधून, किंबहुना बहुतेक इंग्रजीतर भाषांच्या लिपींमधून लिहावयाचे शोध लागल्यामुळे तर आपल्या भाषेतूनदेखील लिहिता येऊ लागले आहे. म्हणून संगणकसारखा सखा दुसरा नाही असे वाटते. शिवाय सुवाच्च अक्षर, पाहिजे तसे बदलही भराभर करता येतात. एकच मजकूर अनेकांना पाठवायचा ( कुठल्या कार्यक्रमाचे आमंत्रण इ.) तर पुन्हा पुन्हा लिहायला नको.असे फायदेच फायदे.
मात्र हाताने पत्र लिहिणे, ते पोष्टात टाकणे, उत्तराची वाट पहाणे.पत्राचे उत्तर आल्यावर मिळणारा आनंद, आपले पत्र मिळाल्याचा त्या व्यक्तिला झालेला आनंद याची मजा वेगळीच आहे.अक्षरामधून जाणवणारी पत्र पाठवणाऱ्याची मनःस्थिती, आणि आवडत्या व्यक्तिचे पत्र त्याच्या पत्त्यावरील अक्षरातून समजताच फुटणाऱ्या आनंदाच्या उकळ्या हे सारे ’ई-मेल’ कसे देणार? इंदिरा संत म्हणतात तस,
पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे. - हे सगळं मेलमधून कुठून जाणवणार ?
माझ्या आजीच्या बॅगेच्या तळाशी माझ्या वडीलांनी, म्हणजे तिच्या मुलाने तिला लिहिलेली पत्रे आम्हाला सापडली होती, पत्रे वाचताना दादा बोलत आहेत, असा भास होत होता, त्या जीर्ण कागदांवरील दादांचे अक्षरातून त्यांचा चेहरा दिसत होता.
असे अनुभव ई-मेल नाही देवू शकत, पण त्याला काही ईलाज नाही. बदल होत राहणार, चुलीवरचे अन्न कितीही रुचकर लागले तरी रोजच्या जेवणासाठी गॅस,आजच्या जमान्यात मायक्रोवेव्ह वापरावा लागतोच. माणसा-माणसांना एकमेकाशी संवाद साधावा वाटतोय, हे काय कमी आहे? साधने बदलली तरी चालतील, माणसा-माणसांत नाती रहावीत, एकमेकांची सुख दुःखे वाटून घेता यावीत. ’शब्देविण संवादु’ कला साधण्यासाठी ज्ञानदेवांइतकी आपली पात्रता कुठे?
तेव्हा दहा दिशांचे तट फोडून दोन्ही ध्रुवांना जवळ आणणाऱ्या आंतरजालाच्या मदतीने संपर्कात राहून आपण आपला मित्रपरीवार विशाल करु या.


©

Tuesday, March 24, 2009

आजी

’अतिपरीचयात अवज्ञा’ हि उक्ती कोणतीही व्यक्ती काय, वस्तू काय किंवा ठिकाण काय सगळ्यांच्या बाबतीत अगदी खरी आहे. जवळच्या व्यक्तींबाबत, त्यांच्या गुणांबाबत तर फारच.
सध्याच्या विभक्त कुटुंब पध्द्तीत स्वंतत्र बाण्याने राहणे आपल्या आणि आपल्या मुलांच्या इतके आंगवळणी पडलयं,की कुणाकडे जायचे ते ही रहायला म्हणजे मुलांच्या अंगावर काटा आलाच. तिकडे स्वतंत्र खोली,स्वतंत्र टॉयलेट मिळणार का?,जेवायला काय असेल? अशा प्रश्णांपासून तेथे कोणाशी कसे,काय किती बोलावे लागेल ? अशा अनंत शंका.
हल्ली बहुतेकांना एक-दॊन मुलेच असतात त्यामुळे एक मुलगा असण्याची शक्यताही जास्तच असते, मुलगा सून दोघेही नोकरी करत असतील तर सगळयांनी एकत्र राहणे उभयपक्षी सोयीचे असते, तरीही तसे राहणे दोघांनाही अतिशय त्रासदायक ठरते हि वस्तुस्थिती आहे.सासू-सुनेचे न पटणे हे त्रिकालाबाधित सत्य आहे, त्याला कोणी जनरेशन गॅप म्हणा किंवा सत्तेची हाव म्हणा.
या साऱ्या गोष्टी बघताना मला माझ्या आजीची राहून राहून आठवण येते. तिच्या असामान्य गुणांची( जे अता असामान्य वाटतात) सतत जाणीव होते. आणि आपण किती कमी आहोत ते जाणवते.
माझी आजी पूर्वीच्या काळाप्रमाणेच फारशी शिकलेली नव्हती,तिला वाचता यायचे पण लिहिता येत नाही असे म्हणायची.सही करायची वेळ आलीच तर स्वतःचे नाव लिहिलेला कागद समोर ठेवून त्यात बघत लिहिताना मी तिला पाहिले आहे, पण एकंदरीत लिहिणे नाहीच. व्यवहारज्ञान तिला फारसे नव्हतेच. जहांबाजपणाचा पूर्ण अभाव. खेड्यात वाढलेल्या लोकांमध्ये आढळणारा बेरकीपणाही तिच्यात नव्हता.थोडक्यात अगदी साधी -भोळी ,फारशी न शिकलेली ,व्यवहारशून्य अशी ती होती.पण तिच्यात काही असे गुण होते कि ते केवळ अनमॊल होते.
फार लहान वयात तिच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली तिच्या पदरी सात मुले आणि कुणाचाच आधार नाही.अगदी माहेरच्यांचा देखील. मोठा मुलागा १६ वर्षांचा धाकटी मुलगी दिड वर्षाची. अशा परिस्थितीत तिने आपले दुःख, दारिद्र्य कुणालाच न दाखवता दिवस काढले.तिच्या सुदैवाने मुले चांगली होती.त्यांनी जबाबदाऱ्या उचलल्या, तिने मुलांना चांगले वागा, चांगल्या मार्गाने जा एवढेच सांगितले.
मला आठवते त्यावेळी आमची परिस्थिती खूपच बरी होती, माझे वडील आजीचा मोठा मुलगा असल्याने त्यांनी व माझ्या आईने कुटुंब वर आणण्यासठी बरेच कष्ट घेतले,माझ्या दुसऱ्या काकांनीही त्यांना साथ दिली. धाकट्या भावांना शिकवले,बहिणींची लग्ने केलेली होती. आजीला पाच सुना आल्या होत्या, लेकी सासरी गेल्या होत्या. बरीच नातवंडे होती. आजीचा मुक्काम पाचही मुलांकडे आलटून पालटून असे. आजी आली की आम्हांला किती आनंद व्हायचा. घरात आली की ती घरचीच होऊन जाई. समोर दिसेल ते काम करणार, समोर येईल ते आनंदाने खाणार. तिच्या सगळ्या मुलांची आर्थिक परिस्थिती काही सारखी नव्हती. माझे धाकटे काका शिकल्याने त्यांची सांपत्तिक स्थिती आमच्या पेक्षा चांगली असे, पण आजीला सगळे सारखे होते. तिने नातवंडाशी वागताना कधी भेदभाव केला नाही. आमच्याकडे पाटावर जेवली, काकांकडे डायनिंग टेबलावर. भोरची जमीन सारवणारी आजी पुण्यात फरशी पुसायलाही पुढे असायची, कामाचा तिला कंटाळा नसायचाच आणि कुणाकडूनही आली तरी तिकडच्या चहाड्या केल्यात, चुगल्या सांगितल्या असे मला कध्धीच आठवत नाही. कुणी विचरले तरी चांगले तेवढे सांगणार, आज वाटतं तिने हे कसे जमवले असेल! पाच वगवेगळ्या घरांतून आलेल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या सुनांशी पट्वून घेताना तिला काहीच जडं गेलं नसेल का? तिचे कुणाशीच भांडण झाले नाही, वादविवाद तर तिला जमतच नव्हते. तिने आपल्या जुन्या दिवसांची दुःखे कधी कुणाजवळ गायली नाहीत. आमच्या आत्याकडून ,आईकडून आम्हाला तिच्या कष्टांच्या,वाईट दिवसांबद्दलच्या कथा कळल्या.आजीने मात्र भूतकाळातील त्रासाचा कधी चुकुन पाढा वाचला नाही. नव्या पिढीला मिळणाऱ्या (म्हणजे तिच्या सुनांना) मिळणाऱ्या सुखाबद्द्ल बोटे मोडली नाहीत.
आजी खूप वाचायची.तिचे मन मोठे रसिक होते.तिला सिनेमा,नाटक,गाण्याचे कार्यक्रम यांची फार आवड होती. मात्र ती स्वतः हुन एखाद्या कार्यक्रमाला मला न्या,असे कुणाला म्हणत नसे. माझे दादा तिला आवर्जून गणपती दाखवायला नेत, त्यावेळी अतिशय उत्साहाने ती निघे,माझे पायच दुखतात, आता मी कशाला येऊ? तरूण वयात माझी हौस नाही झाली आता कशाला? असे रडगाणे तिने कधी गायले नाही. आजीची कुठलीच हौस मौज झाली नाही याची तिच्या मुलांना इतकी जाणीव होती की माझे काका,दादा तिला समजून तिला सिनेमाला नेत,नाट्क दाखवत.ती पण त्या साऱ्यांचा मनापासून आस्वाद घेत असे.मी लहान असताना सारस बागेजवळील सणस पटांगणात ते विजेवर चालणारे जाएंट व्हिल आले होते, मला आठवतयं आम्ही सगळे गेलॊ होतो,आजी आमच्या बरोबर होती.दादा म्हणाले,’इंदा(आजीचे नाव इंदिरा तिला सगळे इंदा म्हणत) बसतेस का या पाळण्यात? ’ आजी तयार झाली.आमच्या बरोबर बसलीसुध्दा. एकमेकांना समजून वागण्याचा आजीचा गुण अगदी घेण्यासारखा आहे. तिच्या हौशीपेक्षा मुलगे आपल्यासाठी एवढं करताहेत, याच तिला फार समाधान असे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होताना ती पूर्वायुष्याचा उल्लेख टाळत असे.
दुसऱ्याचे मन जाणणे जसे तिला जमे तसे मुलांच्या संसारात घरच्या सारखे काम केले तरी तिने कधी कुठ्ले नियम कुणावर लादले नाहीत. तिचे देवधर्म तिच्यापुरते असत. जेवणापूर्वी देवदर्शनाला जायचे असा तिचा नेम होता.कुठलाही देव तिला चालत असे.जिथे रहायची त्या घराजवळचे जे देऊळ असेल तेथे जाऊन मगच ती जेवायची.तिने मुलांना कधी देवाचे अमूक करा,तमुक करा असे सांगितले नाही,सुनांनाही तसेच. माझी एक काकू खूप धार्मिक आहे, ती सोवळे-ऒवळे,देवधर्म खूप साक्षॊपाने करीत असे. आजीने तिला विरोध केला नाही, आणि ती करते तसे तुम्ही करा म्हणून इतर सुनांनाही सांगितले नाही. भोरला आमचे घर आहे. माझे काका तिथे राहात . काका काकू दोघेही शाळेत नोकरी करीत.दर सुट्टीला आम्ही भोरला जायचो. मी कॉलेजला जाऊ लागे पर्यंत यात खंड पडला नव्हता. आजीशी गप्पा मारायला मला आवडे. मी आजीची जरा जास्त लाडकी असल्याचा माझ्या इतर भावंडांचा आरोप असे.पण मला वाटतं , मी सगळ्यात जास्त तिच्याशी बोलत असे,त्यामुळे तिला माझ्या बद्दल जास्त प्रेम वाटत असावं. तक्रार करण्याचा तिचा स्वभावच नसल्याने वय झाल्यावर माणसाला रिकामपण खायला ऊठ्तं. कोणी बोलायला नसतं असं आपण सध्या सतत वाचतो, ऎकतॊ. आजीलाही तसं होत असेल. मी तिच्याशी बोलत असल्याने ती मला सतत रहायचा आग्रह करायची. सोमवारी सकाळी निघायचं , म्हट्लं की म्हणायची अगं जेवून जा, जेवण झाल्यावर म्हणायची , उन्हं उतरु दे मग निघ. आता चारचा चहा झाला की जा, मग आता दिवेलागणीला कशाला जातीस? पुण्याला जाईतॊ अंधार पडेल, उद्या माझा मंगळवार आहे, साबुदाण्याची खिचडी करू, खाऊन जा.मंगळ्वार असाच जायचा, बुधवारी म्हणायची जाशी बुधी येशील कधी? नको गं , बुधवारी नको जाऊ. असं करीत ती मला ठेऊन घ्यायची.मला तिच्याकडे रहायला आवडायचे.
तिच्या लहानपणीच्या आठवणी ती सांगायची, माझ्या नवऱ्याबद्दल, संसारिक जीवनाबद्दल मला काही विचारु नकोस या अटीवर ती पक्की होती.तिचे कटू अनुभव तिने कधीच कुणाला नाही सांगितले. कधी कधी मला म्हणे,’मी रोज इथे संध्याकाळी ओट्यावर बसते ना, किती जोडपी फिरायला जात असतात, आमच्यावेळी नवऱ्याबरोबर बोलायला मिळायची मारामार. हल्लीच्या मुलींना रोज नवऱ्याबरोबर फिरायला मिळतं, पण बघ, बोलत काय असतात, तुमची आई मला अस्सं म्हणाली, तुमची बहीण परवा तस्सं वागली! ’ मी विचारी,’मग, आजी त्यांनी काय बोलायला हवं?’ आजी म्हणायची,’अगं,घरच्याच कटकटी बाहेर कशाला? जरा काही वेगळं बोलावं, झाडं,पक्षी, निसर्ग किती विषय आहेत!’ तिला बहुदा त्यांनी रोमॅंटिक गप्पा माराव्या असं म्हणायच असेल, पण मी नात त्यातून लग्नं न झालेली. आजच्या पिढीला जे फिरण्याच सुखं मिळतयं , त्याचा त्यांनी योग्य वापर करावा, आनंदानं जगावं असं तिला वाटे.
आज सकारात्मक दृष्टीकॊन ठेवा, म्हणून मानसोपचार तज्ज्ञ, सामुपदेशक सांगत असतात. वेगवेगळ्या मासिकांमधून,वर्तमानपत्रांमधूनही याबद्द्ल सतत वाचायला मिळते.आजीचा अतिशय सकारात्मक दृष्टीकॊन असे.ती म्हणे घरात नेहमी चांगलं बोलावं, वास्तुपुरुषाचा घरात वास असतो, तो तथास्तु म्हणत असतो. खरं, खोटं त्यावेळी कळतं नसे. आमच्या आत्यांची लग्न जमायला बरेच त्रास पडले, परिस्थिती हे एक कारण होतचं, पण आजी शांत असे, म्हणे, तुम्हाला देवाने इथे पाठवलयं, त्यावेळी तुमच्या नवऱ्यालाही पाठवलयं तो आपल्याला मिळत नाही इतकचं, वेळ आली की जमेल.तिची सौंदर्याची व्याख्या सुद्धा अगदी सोपी होती, नाक,कान डॊळे जागच्या जागी असले कि झाले, ती व्यक्ति सुंदर, त्यामुळे आम्ही सगळी नातवंडे सुंदरच, त्यात डावं,उजवं करायचा प्रश्णच यायचा नाही. तिला पाच मुलगे होते,पण पुढच्या पिढीत आम्ही मुली संख्येने जास्त होतो.आम्ही तर तीन बहिणी. आजीने त्या बद्दल खंत दाखवली नाही.मुलींचाच नाहीतर सुनांनाही जुन्या काळातली असून तिने त्याबाबत दुखावले नाही.मुली म्हणून घरात आम्हांला कधी दुय्यम वागणूक मिळाली नाही. माझी सगळ्यात लहान बहीण जन्मतः कमी वजनाची होती.त्यामुळे तिचे बारसे करायला नको,असे आईचे म्हणणे होते.आजी म्हणाली,’तुमची तिसरी मुलगी असली तरी तिचा पहिलाच जन्म आहे, बारसे हा संस्कार असतो, तो करु या. उद्या ती मोठी होईल, हुशार निघेल, शिकेल,मग आपल्याला वाटेल,हिचे बारसे काही आपण केले नाही आणि दुर्दैवाने ती नाहीच जगली तर तिचे काही झाले नाही अशी खंत नको.’
आजीला लहान मुलांचा फार लळा असे. कुणाचही मुलं ती प्रमाने घ्यायची,त्याला घरात असेल तो खाऊ त्यांना देणार. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांची, बांधकामावरच्या वडाऱ्यांची पाण्याचा स्पर्श न झालेल्या अस्वच्छ मुलांशी प्रेमाने बोलताना बघून मला नवल वाटे, क्वचित आजीचा रागही येई, कुणालाही घरात बोलावून खाऊ द्यावा म्हणजे काय? पण आज तिच्यातले संतपण जाणवतं. आपण कुत्र्याच्या मागे तूप घेऊन जाणाऱ्या नामदेवाच्या गोष्टी वाचल्या, महाराच्या पोराला कडेवर घेणाऱ्या एकनाथांचे चरीत्र वाचले पण यातले फार थोडे वाचूनही सहज आचरणात आणणारी आजी किती थोर होती. नवरा गेल्यावर तिचे फार हाल झाले होते, तिच्या चुलत जावा,चुलत सासु,सासरे तिला त्रास देत, टाकून बोलत, तिच्या मुलांबद्दलही कोणी फारसे प्रेमाने बोलत नसत. मात्र त्या चुलत घरातला मुलगा (माझा काका) आजीच्या घरी तिच्या मुलांमध्ये खेळायला येई आणि आजी त्याला मुलांबरोबर प्रेमाने जेवायला घाली. मला बोलता बोलता सांगे,’अगं त्यांच्या घरचं, दुधा तुपातलं जेवणं सोडून तो आमच्या बरोबर आमटी भात खायचा’
’आजी , तुला त्याचा राग नाही यायचा?’
’कशाबद्दल ?’ ’
’तुला त्याच्या घरचे सगळे किती बोलायचे, अपमान करायचे ना!’
’अगं, त्याबद्दल या लेकरावर कातावून काय होणार? त्याचा काय दोष ?’
घरातल्या मोठ्य़ा माणसांवरचा राग आपल्या मुलांवर काढणारे लोक असतात. ऑफीसमधे त्रास झाला की बायका मुलांवर खेकसणारे महाभाग असतात, आणि आजी तिला सासुरवास करणाऱ्या माणसांच्या मुलांवरही कधी कातावली नाही. तिच्या संस्कारमुळे म्हणा, तिच्या सहवासाने म्हणा आमच्या चुलत, आते भावंडामध्येही एकमेकांबद्दल जिव्हाळा आहे. मोठ्य़ा माणसांमध्ये मतभेद झाले, रुसवे फुगवे झाले तरी संबंध तोडून टाकण्याइतकी वेळ कधी आली नाही.आज आम्ही एकमेकांकडे फारसे जात येत नसू, प्रत्येकाच्या व्यापामुळे ते जमतही नाही पण कुणाच्याही अडीअडचणीला आणि समारंभाला गेल्यावाचून रहात नाही. दुसऱ्याच्या दुःखात माणूस सहभागी होऊ शकतॊ, पण त्याच्या आनंदात तितक्याच आनंदाने जायला मनाचा मोठेपणा लागतो. आजीमध्ये तो पुरेपूर होता. मलाही तो वारसा थोड्या प्रमाणात मिळाला असावा, कुणाच्याही उत्कर्षाचा मला हेवा वाटत नाही.
सुखाने चढून जाणेही आजीला माहीत नव्हते, तिचे मुलगे चांगले शिकले. माझे एक काका तर B.Sc, M.Sc(stats). दोन्ही परीक्षांमध्ये विद्यापीठामध्ये पहिले आले, सुवर्ण पदक् मिळविले, पुण्यातल्या नामवंत कॉलेज मध्ये प्रचार्य झाले, आजीला या गोष्टीचे कौतुक होते.पण तिने कधीही मुलाच्या नावावर मीपणा दाखवला नाही. देवाची कृपा आणि त्याचे परिश्रम यालाच तिने श्रेय दिले.
असे किती गुण सांगावे, आठ्वावे तितके थोडेच आहेत.एक आणखी आठवण, मला आत्याकडून समजलेली.नंतर आजीला विचारलेली. आजीला सात बहिणी होत्या, हिच सगळ्यात धाकटी.आणि एक भाऊ होता. आजीच्या आईला सात भाऊच म्हणजे आजीला सात मामा होते.त्यांनी आपल्या एकुलत्या एक बहिणीचा मुलगा स्वतः कडे ठेवून त्याला शिकविले.त्या काळात तो डॉक्टर झाला होता. मध्यप्रदेशात इंदौर ला तो असे. २-३ वर्षातून एकदा तो आजीला माहेरपणाला घेवुन जाई. त्यावेळी सासरचे लोक एखाद दुसरे मूल (अगदी तान्हे ,दुसरे जरा मोठे) घेऊन जा, असे सांगत. भोरहुन पुण्याला बसने आले, कि पुढील प्रवास रेल्वेने. आजीचा भाऊ स्वतः फर्स्ट क्लासमध्ये बसे आजीचे थर्ड क्लासचे तिकीट काढलेले असे. हे ऎकुनच माझा संताप झाला. आजीला तरी कसा स्वाभिमान नसावा! कशाला जावे तिने भावाबरोबर? मी तिला चिडूनच विचारले. ती थंडच
’शुभे, माझा भाऊ मला न्यायला यायचा हे काय कमी होते? त्यामुळे माझी , माझ्या आई-वडिलांशी भेट होत होती ना?’
’पण मग तो स्वतः फर्स्ट क्लासमध्ये..’
’अगं, एवढा मोठा डॉक्टर तो, तो कसा ग, थर्ड क्लासमध्ये बसेल? आणि मला काय फरक पडतॊ कुठेही बसले तरी , कायम थोडच गाडीत बसायचय? शिवाय कुठ्ल्याही डब्यात बसले तरी गाडी अखेरी मुक्कामाला जाणारच ना?’
’मग तुला का नाही न्यायचा फर्स्ट क्लासमधून?, होता ना मोठा डॉक्टर तो?’
’होता ना, पण असं बघ, त्याला काय मी एकटीच बहीण होते, आम्ही सात जणी, तो किती करेल? शिवाय त्याची बायको, तिलाही सांभाळुन घ्यायला नको का? नाहितर तिला वाटायच, या एवढ्या नणंदांचं माहेरपण करुन आम्हाला काय शिल्लक राहणार? शेवटी जिच्याबरोबर आयुष्य काढायचं तिचं मन सांभाळणं महत्वाचं, आपण आपल्या भावाला समजून घ्यायला नको का? माझा त्याच्यावर काडीचा राग नाही बरं’
कुठ्ल्याही डब्यात बसले तरी गाडी अखेरी मुक्कामाला जाणारच हेच आजीचे समाधानी जगण्याचे रहस्य होते.त्यामुळेच तिला बंगला, वाडा, चाळ कुठेही राहताना आडचण नसे.तिचा शेवट्चा दिस गोड व्हावा, म्हणून तिने अट्टहास केला नाही.सहज जगत होती, पण तिचे असे जगणे ही देवाला बघवले नाही. तिच्या उतारवयात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला.हा घाव सोसणे तिला फार जड गेले. तिचे पूर्वायुष्यातील आठवणींनी कधीही न भरणारे डोळे सतत गळू लागले. माझं काय चुकलं? देवाला मी कशी नाही दिसले? माझ्या आधी त्याला का नेलं? असं ती वारंवार म्हणायची. कुठल्याही विषयाचा शेवट दादांच्या जाण्यापाशी आणायची. त्यांच्या पश्यात आमच्या घरी ती फारशी नाही आली, त्या घरात मला अपराधी वाटतं असं म्हणे. तरी तिच्या डोळ्याची ऑपरेशन्स झाली होती तेंव्हा आमच्याघरी आली. मी तिच्या डोळ्यात औषध घालायची. तेव्हां मला तुला बंगलेवाला, मोटारवाला नवरा मिळेल, असा तोंड भरून आशीर्वाद द्यायची. तिच्या बॅगेच्या तळाशी माझ्या दादांनी तिला लिहिलेली पत्रे तिने जपून ठेवलेली दिसली. मुलाची तेवढी आठ्वण तिने जपली होती.तिचा एक नातूही ऎन तारुण्यात गेला, तेही दुःख तिला सोसावे लागले.
माझ्या लग्नाला ती नाही येवू शकली. वय झाले होतेच, पण तिची जगण्याची ऊमेद कमी झाली होती हेच खरे कारण होते. सासरी गेल्यावर माझे भोरला जाणे काही झाले नाही. लग्नानंतर वर्षाभरात माझे सासरे वारले, सासुबाई सतत आजारी पडत, एकूणच नोकरी-घर,संसार या व्यापात मी पुरती गुरफटले. आजीच्या आजारपणाच्या बातम्या कळत, पण वयाप्रमाणे तसे चालणार, म्हणून त्याकडे फरसे लक्ष नाही दिले. माझ्या मुलीच्या संगोपनात वेळ जात असे. आजी म्हणायची ’हे सहाजिकच आहे, पाणी पुढेच वाहते, नदी समुद्राकडेच जाणार, मागे बघणॆ जमणार नाही’ पण एकदा अशीच धावत पळत आईकडे गेले असता आई म्हणाली,’आजी तुझी आठवण काढतीयं, जाउन ये ना एकदा, एवढा कसा वेळ नाही ? काय जगावेगळे संसार आणि नोकऱ्या तुमच्या?( आईचा स्वभाव आजीच्या एकदम उलट, फारच स्पष्ट्वक्ता आणि सडेतोड) ’ मलाही फार अपराधी वाटले. येत्या शनिवारी नक्की जाते असे सांगून तिचा निरोप घेतला. घरी अडचणी होत्याच, नवरा टूर वर गेला होता.पण मी मुलीला घेउन गेले.खरं तर पुणे -भोर तासा दिड तासाचा प्रवास. घरी गेले, काकू शाळेत जायला निघाली होती. ती म्हणाली,’बरं झालं आलीस, तुझी आठवण काढताहेत, त्यांच्या जवळ थांब,कुठे जाऊ नको’ आजी जवळ गेले, अगदीच सुकून गेली होती. मला ऒळखले,’तूच तेवढी राहिली होतीस ,सगळे भेटून गेले.’ माझ्या पॊटात गलबलून आले, ’आजीच्या चेहऱ्यावर समाधान होते, माझ्या लेकीला जवळ घेतले, ’बघ, मिळाला ना तुला बंगला , गाडी? मी म्हणालेच होते ना!’
’तू नाही आलीस गं , माझं घर बघायला’
’असू दे, तुझ घरं छानच असणार, माणसंही चांगलीच असणार, तुझे वडील हवे होते ,तुमच चांगल झालेल बघायला!’
मग इतर बरच बोललो, म्हणजे मी बोलले ती ऎकत होती.दुपारी चहा करायला सुध्दा मला उठू नकॊ म्हणाली, काकू आल्यावर करेल, तू माझापाशी बैस.तुला तांदळाची उकड आवडते ना, शाळेतून आल्यावर तिला करायला सांगते.
’आजी , नकॊ आता मला काही. काकू दमून येईल, मी पटकन चहा करते, आपण पिऊ या’
’बरं, खरं आहे, ती दमते, तिला माझं फार करावं लागत.’
दुसऱ्या दिवशी मी आणि काकूनी तिचे अंग पुसले, कपडे बदलले.नंतर तिची शुध्द गेली, संध्याकाळी मी निघाले तर तिने मला ऒळ्खले नाही, जागृती-सुशुप्तीच्या सीमेवर होती, माझा पाय निघत नव्ह्ता पण जाणॆ जरुरीचे होते. रविवारी मी पुण्याला आले. आणि सोमवारी संध्याकाळी आजी गेली. माझ्या भेटीसाठी तिने जीव धरुन ठेवला होता.
आज आम्हांला चांगले दिवस आले,त्या मागे तिची पुण्याई आहे असं मला नेहमी वाटतं.इतक साधेपणानं राहणं,सगळ्यांच्या आनंदात आनंद मानणं,कुणाचा राग,द्वेष,मत्सर न करता राहणं किती अवघड आहे हे आता जाणवतं. कुठलीही तक्रार न करता,स्वतः कडे कमीपणा घेऊन राहणे फार कठीण आहे. शिकलेल्या, न शिकलेल्या कोणालाच न जमणारे सहजीवन आजीने जगून दाखवले.त्यामुळे तिला जाऊन पंधरा वर्षे होऊन गेली पण अजूनही तिची पदोपदी आठवण होते.कुठल्याही रंगाचे होउन जाण्याचा पाण्यासारखा तिचा स्वभाव होता, पाण्याइतकच पारदर्शक निर्मळ मन होतं आणि म्हणूनच तिच्या सगळ्या मुलां-सुनांच्या,लेकी-जावई आणि यच्चयावत नातवंडांच्या जीवनात तिचे स्थान अढळ आहे.



Tuesday, February 24, 2009

पंढरीची वारी : एक अनुभव.- भाग ३


सकाळचे नऊ वाजून गेले असावेत, आम्ही पुन्हा चालावयास सुरुवात केली.वाटेत ठिकठिकाणी वारकऱयांसाठी चहा, केळी,पोहे असे विविध स्टॉल्स दिसत होते.बहुतेक वारकरी तिकडे जात नव्हते, जत्रा म्हटली कि जसे हौशे, नवशे,गवशे येतात तसेच वारी बरोबरही असावेत. अनेक तरूण,लहाने मुले अशा ठिकाणी केवळ गर्दी करुन मिळेल ते पदरात पाडून घेत होती. एका जागी तर कुठल्याशा कंपनीतर्फे बिस्कीटांचे पुडे वाटप चालू होते, एका मुलाने आपल्या मित्रांनाहि रांगेत उभे केले असावे सगळी गॅंग मिळलेले पुडे एका पोत्यात भरत होती.दारीद्र्य माणसाला अगतिक बनवते हे खरे असले तरी इथे गरीबीपेक्षा फुकटी वृत्ती वाढत चाललीयं असं जाणवतं. आपल्याला आयकरात सवलती मिळाव्यात यासाठी दान देण्यास तयार होणाऱ्या कंपन्या, आणि त्या फुकट मिळणाऱ्या पदार्थांवर तुटून पडणारी आपली नवी पिढी, कुणाला विठ्ठ्ल पावेल्? किंबहुना त्या विठ्ठ्लासाठी हे चाललयं हे तरी त्यांच्या गावी आहे कि नाही हे तॊ विठ्ठ्लच जाणे !
या साऱ्या स्टॉल्सकडे न जाता ’गुढी उभारावि, टाळी वाजवावी वाट हि चालावि पंढरीची’ असे म्हणत जाणारा वारकऱ्यांचा मेळा होताच. विश्रांतवाडीचा पहाटे सुनसान असणारा रस्ता आता माणसांनी फुलून गेला होता. मध्येच पावसाची एखादी सर यायची सारे वातावरण थंड व्हायचे. आमच्यासारखी शहरी पांढरपेशी मंड्ळी छ्त्र्या उघडून किंवा रेनकोट, जर्कीन घालायला लागे पर्यंत पावसाचा जोर पार कमी होऊन जाई. बरे हा सारा जामानिमा अंगावर बाळगावा तर लगेच पडणाऱ्या लख्ख उन्हामुळे ऊकडुन जीव हैराण होवून जाई. शेवटी हा सारा पसारा पिशवित कोंबला आणि ऊन पावसाचा खेळ अंगावर घ्यायचे ठरविले. इथे आपल्याला ओळखणारे कुणीच नाही आणि आपल्या कडे बघायला कुणाला वेळच नाही हे लक्षात आले आणि मग एकदम हलके हलके वाटायला लागले.नाहीतरी पडण्यापेक्षा पडताना आपल्याला कुणी बघितले तर जास्त दुःख होते, तसे भिजण्यापेक्षा आपले भिजलेले ध्यान कुणी बघेल याचीच काळजी असते. शिवाय भिजत भिजत चालत असल्याने थंडी वाजत नव्हती,ऊन पड्ल्याने कपडे आपोआप सुकतही होते. आषाढ महिना असून श्रावणातल्यासारखा पाऊस होता.
पण हा ऊन पावसाचा खेळ ही फार तर तास दिड तास चालला. नंतर कडक ऊन पडले. पायाखलचा सिमेंटचा रस्ता प्रचंड तापत होता, सहापदरी मोठ्या रस्त्यावर औषधालाही झाड नव्हते! डोक्यावर ऊन मी म्हणत होते. थोडक्यात ’पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे’ अशी अवस्था होऊ लागली , अध्यात्माच्या बिकट वाटेचा प्रत्यय येवु लागला.
शहरीकरणामुळे जंगलतोड झालीयं. दोन्ही बाजूला झाडांच्या महिरपीतून जाणारे रस्ते नाहिसे होत चाललेत. गाडीतून जाताना हे जाणवत नाही अस नाही, पण त्यामुळे होणारी तगमग चालतानाच जास्त जाणवली. पालखी येणार म्हणून दुतर्फा मांडव घातले होते, प्रत्येक वॉर्डातले मा.नगरसेवक, क्वचित ठिकाणी महापौर येत होते, त्यांच्या हस्ते खाद्यपदार्थांचे वाटप होत होते, त्यापैकी कुणालाच ह्याबरोबरच रस्त्याच्या कडेने वृक्षारॊपण करून वारकऱ्यांचा मार्ग सावलीचा करावा असे का वाटत नाही? पण मघा म्हटल्याप्रमाणे त्यासाठी काही पावले तरी पाय़ी चालायला हवे!
बॅंक ऑफ महाराष्ट्र तर्फे उभारलेल्या एका मांडवापाशी आल्यावर मी थांबले. फूटपाथवर मांडव होता, बाजूच्या कट्ट्यावर थोडी टेकले. बाटलीतले पाणी प्यायल्यावर जरा हुशारी वाटली.तिथल्या काही रहिवासी सोसायटीतल्या उत्साही लोकांची एकच गडबड उडाली होती. बायका, मुले वारकऱ्यांना केळी,राजगिऱ्याचे लाडू वाटत होती. पुरुष मंडळी त्यांच्या वर लक्ष ठेवून होती. आतिशय शिस्तबध्दतेने सगळे काम चालू होते. आम्हांलाही त्यांनी मोठ्या प्रेमाने सगळे देऊ केले, पण असे घेणे मनाला पटेना एक तर आम्ही कुठल्याच अर्थाने वारकरी नाही. केवळ हौशीसाठी आम्ही आलॊ, आणि संध्याकाळी तर घरी जाणार! ज्यांनी बरेच दिवसांपासून घर सोडलयं, आणि पंढरपूर पर्यंत जायचयं त्यांना देणे योग्य आहे. बारा वाजून गेले होते, निम्मे अंतर संपले होते. आतापर्यंचा प्रवास चांगला झाला होता, पुढील रस्ता रुक्ष असल्याने त्रास होईल का असे वाटत होते.पण चालायला लागल्यावर वाट संपतेच , बरोबरच्या वाटकऱ्यांच्या सोबतीने वेळ जातो, आणि वाटेवर सावल्या सापडल्या कि प्रवास सुखाचा होतो. वारी सारखेच हे सारे आयुष्याच्या बाबतीतही खरे आहे नाही का?

समाप्त

Friday, January 30, 2009

पंढरीची वारी : एक अनुभव.- भाग २


वारीला जायची तयारी सुरु केली.तयारी फारशी नव्हतीच.पहाटे आडीच वाजता उठून पोळी भाजी करुन घेतली(आधी पोटोबा मग...), अंघोळ आदि आन्हिके उरकून निघलो.एका परिचिताने आमच्या उपक्रमाने प्रभावित होवून आंम्हाला आळंदीला सोडण्याची जबाबदारी घेतली.त्यांच्या गाडीतून आळंदीला निघालो. विश्रांतवाडी पर्यंत अगदीच शुकशुकाट होता. मोकळे रस्ते अगदीच नवे आणि खूपच मोठ्ठे ,रुन्द वाटत होते. आळंदी जवळ येवू लागली तशा तिकडून पुण्याकडे ट्र्कच्या रांगा दिसू लागल्या, क्वचित माणसांचे जथेही चालताना दिसू लागले. पावणेपाचच्या सुमारास आम्ही आळंदिच्या अलिकडे एक-दिड कि.मी.वर उतरलो. सर्व परिसर माणसांनी फुलून गेला होता. इंद्रायणीच्या पूलावरुन देवळात जाताना, नदीमध्ये शेकडॊ वारकरी स्नान करताना दिसले.ज्ञानेश्वरांची पालखी गांधीवाड्यात त्यांच्या आजोळी असते, तेथून सहा वाजता तिचे प्रस्थान होते, तत्पूर्वी भक्त तिचे दर्शन घेवू शकतात, हे तेथेच आम्हाला समजले. मग तेथे गेलो, रांगेमधून शांतपणे लोक दर्शन घेत होते.आम्हीही पदुकांचे दर्शन घेतले, पालखीला वाकून वंदन करतानाच मनाला जी शांती वाट्ली,तिचे वर्णन शब्दात नाही करता येणार. माऊलींबरोबर सहज चालू असा विश्वास वाटला. पालखीचे प्रस्थान साडेसहाला होते.इंद्रायाणीच्या अरूंद पूलावर प्रचंड गर्दी आणि खेचाखेच असते, असे कळले होते. बरेच वारकरी पादुकांचे दर्शन घेऊन चालावयास सुरुवात करतात. आम्ही देखील तसेच करायचे ठरविले. ज्ञानेश्वरांचे आणि तुकारामांचे अभंग गात वारकरी जात होते. आम्हीही त्यांच्या बरोबर जात होतो. आता चांगलेच उजाडले होते. आजुनही पुण्याकडून लॊक आळंदीकडे जात होते. त्यांना वाटेत पालखीचे दर्शन होणार आणि ते परत पालखी बरोबर येणार. बऱयाच दिंड्या निघाल्या होत्या. एका दिंडी मधून आमचा प्रवास सुरु झाला. झांजा आणि टाळांच्या तालावर चालताना बरेच अंतर चाललो तरी जाणवत नव्हते. पाच किलो.मी. चाललो, साई मंदिराच्या आसपास बरीच मोकळी जागा आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजुंना किंचित उंच टेकाडे होती. आम्ही तेथे जाऊन बसलो. आठ वाजले असावेत.बरीच वारकरी मंडळी तेथे बसली होती. काही बायका कपडे वाळत घालत होत्या. आमच्या सारखे पुण्याहून आलेले लोक डबे उघडून नाष्ता करायला लागले होते. रोज मलाही सकाळी आठ -आडेआठला खाण्याची सवय आहे, पण कसे कोण जाणे आज भूक लागली नाही. सोलापूर जवळील खेड्यातुन आलेल्या बायका माझ्याशी बोलायला आल्या, त्या तिकडून आंळदिला चालत आल्या होत्या आणि आता वारीबरोबर चालत पंढरपूरला जाउन मग घरी जायच्या होत्या.माझ्या कपाळावर् त्या बाईने काडी कुंकवात बुड्वून बरीच कलाकुसर केली. (आरसा नसल्याने मला दिसली नाही), माझ्या शहरात राहण्याचे, ऑफीसात जाण्याचे तिला अप्रूप , आणि तिच्या इतके दिवस घर सोडून चालत जाण्याचे, तिच्या कष्टाचे मला कौतुक ! मला स्वतः जवळिल बुंदीचा लाडू तिने, नको नको म्हणतानाही खायला दिला.बरेच शेतकरी पेरण्या उरकून वारीला आले होते,मला जाणवले, शेतात पेरण्या झाल्या की, पावसाची वाट बघायची .जास्त पाउस पिकांचं नुकसान करणार, नाहीच आला तर् तोंड्चं पाणी पळवणार. एकूण हा मधला काळ म्हणजे नुसता ताण! रिकाम मन म्हणजे सैतानच घर, त्यापेक्षा विठ्ठ्लावर भार टाकून माऊलींच्या बरोबर त्याच्याच नामात दंग होउन वारीला जाणे म्हणजे एक प्रकारची 'stress management' आहे! पंधरा दिवस घर, दार संसार आणि त्याच्या काळज्या दूर ठेऊन पंढरीला जाण्याचा तो उद्देश असावा ’आवडीने भावे हरीनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे’ असे म्हणणारा वारकरी ’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ या वर्गातील नक्की नाही. आपले काम मनापासून केल्यानंतरही आपल्या हातात नसलेल्या काही गॊष्टींमुळे झालेल्या त्रासावर मात करता यावी यासाठी लागणारी मानसिक शक्ती त्याला वारीला जाण्य़ाने मिळत असेल. कारण त्याची श्रध्दा त्याला सांगते ’सकळ जनांचा करि तो सांभाळ तुज मोकलिल ऐसे नाही एका जनार्दनी भोग प्ररब्धाचा हरीकृपे त्याचा नाश झाला’
क्रमशः