Friday, January 25, 2019

नक्राश्रु

WhatsApp वर पोस्टस् चा पाऊस पडत असतो, त्याच त्याच पोस्टस् इकडून तिकडे फिरत असतात. सणावारांची जाणीव WhatsApp मुळे प्रकर्षाने होऊ लागलीय. संकष्टी चतुर्थी असली कि गणपतीचे फोटो आलेच. महाशिवरात्रीला महादेव तर एकादशीला पांडुरंग. त्या निमित्ताने देवादिकांची ओळख राहते. इकडे सर्वधर्म समभावही असतो. ईद म्हणू नका, नानक जयंती म्हणू नका, ख्रिसमस  म्हणू नका ,महावीर जयंती, बुध्द पौर्णिमा आणि हिंदुंच्या सणंची तर गणतीच नको सगळ्या सणांना शुभेच्छांचा मारा. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे खास देशप्रेम उतु घालवायचे राष्ट्रीय सण त्या दिवसांना ही असेच देशभक्तीचे पूर. या खेरीज ’बायको’ हा विनोदाला पुरुन आठांगुळे उरणारा विषय.  त्या ’बायको ’ बद्दल सर्व भाषांमधुन ,सर्व ग्रुप्स वर फिरणारे तेच तेच विनोद ही असतातच. कुठलेही विनोद,  विचार पु.ल.देशपांड्यांच्या नावावर खपवून त्याच्या खिरापती हि असतात.  विडीओ आणि ऑडीओज ही भरपूर फिरत असतात.
      त्या शिवाय काही चांगल्या दर्जाचे लेख ही वाचायला मिळतात. त्यात स्मरणरंजनंच जास्त असते. आपले वय झाल्यावर तरुण वयातल्या आठवणी चांगल्या वाटायच्याच. पण त्यात देखील जुन्या काळातील गरीबीचे गोडवे गाताना आणि गरीबीचे माणुसकी,जिव्हाळा याच्याशी नाते जोडलेले पाहिले कि मी विचारात पडते. आमच्या पिढीतले सत्तर ते ऎंशी टक्के लोक आर्थिक चणचणीच्या अनुभवातुन गेले असतील. मी देखील ती सोसलीयं पण आज जर मला पुन्हा ते दिवस आले तर चालतील का? असं विचारलं तर माझं उत्तर हो असेल असं वाटत नाही. जर ते दिवसच चांगले होते तर मी त्यातुन बहेर पडायची धडपड कशाला केली असती? अगदी हालाखी नसली तरी कनिष्ठ मध्यमवर्गातच आम्ही मोडत होतो. वडील वारल्यावर तर तो दर्जा अजुनही खाली गेला होता.  कित्येक चांगल्या संधी केवळ परिस्थिती नाही या कारणामुळे सोडाव्या लागल्या होत्या. लहान जागा, अभ्यास करायला घरकामामुळे मिळालेला कमी वेळ,  वडीलांच्या आजारपणात पैशाअभावी त्यांना न मिळा्लेली वैद्यकीय मदत ,  साधारण कपडयांमुळे उच्च स्तरातल्या मुलींमध्ये वावरताना जाणवणारा न्युनगंड  , घरात पाहुण्यांची सतत वर्दळ त्यामुळे आता साध्या साध्या वाटणाऱ्या आणि त्या वयात अप्रुप असलेल्या कितीतरी चैनींवर सोडावे लागलेले पाणी अशी किती उदाहरणे ! . माझ्या बाबतीत जे घडलयं तेच माझ्या परिस्थितीतील बहुतेकांच्या वाट्याला आलं असणारं ,मग त्या सगळ्याचा विस्मरण होऊन फक्त त्याकाळच्या जिव्हाळ्याचेच कशाला गोडवे गायचे?
कुणाकडेही न सांगता गेल तरी प्रेमान स्वागत होई, जेवायला मिळे. गोष्ट खरी आहे. आमच्या घरी असे अगांतुक पाहुणे नेहमीच येत आणि माझी आई खरोखरीच प्रेमाने त्यांना जेवायला घाली. पण त्या कष्टांमुळे ,तिला मन मारुन कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टींमुळॆ पुढे तिच्या तब्येतीवर परीणाम झाला . तेंव्हा मात्र त्या पाहुण्यांपैकी कोणीही तिच्या चौकशीला आले नाही.मग ती माया त्या लोकांमधुन कुठे गेली?का ती फक्त या स्मरणरंजनाच्या लेखांतच राहिली? आणि जुन्या काळात आम्हाला प्रेम मिळालं ,माणुसकी दिसली ती आम्हाला मागच्या पिढीकडुन आम्हाला मिळत होती.आणि आता ती दिसत नसेल तर त्याला जबाबदार ही आमची पिढीच नाही का? आम्हीच आमच्या करियर मुळे असेल,आमच्या आई वडीलांच्या कचखाऊ(तथाकथित प्रेमळ,मायाळु) स्वभावाचा गैरफायदा घेतलेल्या लोकांच्या रागापोटी असेल ,पाश्चात्य संस्कृतीच्या ओळखीमुळे असेल कुठल्याही कारणाने लोकांना दूर ठेवले . आमची मुले ,पुढची पिढी असल्यामुळे आणखीनच तुटक झाली तर त्यात दोष कुणाचा ?

   आमच्या पडत्या काळात आमच्याशी ममत्वाने वागलेले (अगदी तो जुना काळ असतानाही) फार थोडे लोक होते. बाकी ठिकाणी शुक्रवारच्या कहाणीचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे.आज सुस्थितीतल्या मला माझे अनेक नातलग आवर्जुन बोलावतात,ज्यांनी त्या दिवसांत फारशी वास्तपुस्त केलेली नव्हती.मग कुठला काळ चांगला होता ?
टि.व्ही,फोन आता मोबाईल्स या अत्याधुनिक साधनांनाही  दोष देण्यात फारसा अर्थ नाही. माणसे होती तशीच आहेत ,त्या काळातही पोटात माया असलेली होती तशीच अगदी सख्या भावाचे तोंडही न पाहणारी होतीच.  अपपर भावाच्या कक्षा त्याकाळी थोड्या रुंद असल्यामुळे आपलेपणा थोडा जास्त असेल इतकचं. उगीच त्या काळातील मायेच्या ओलाव्यानी आज डोळे गाळायचे काही कारण नाही.

       आम्हाला मोबाईल्स,कॉम्प्युटर्स सारखी साधने नव्हती म्हणून आम्ही मैदानावर खेळत होतो, आमच्यापैकी फार थोड्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना मैदानावर जावे म्हणून प्रयत्न केले असतील. एक मान्यच करावे लागेल कि आमच्यावर शाळेचे संस्कार खूप खोल झाले.आमच्या शिक्षकांनी आमच्यावर अपार प्रेम केले,चांगल्या सवयी लावल्या,संस्कार केले. पण आमच्यापैकी फार थोड्यांनी शिक्षकाचा पेशा आवडीने स्विकारला यात आम्हाला त्या पेक्षा इतर  संधी मिळाल्या ज्या आम्हाला शिक्षकांहुन चांगल्या वाटल्या. सबब शिक्षण क्षेत्रात चांगल्या व्यक्तिंच्या अभावामुळे परिस्थिती  बिघडली असावी.
     
       आजच्या virtual reality च्या जगात पालकत्व हि फार मोठी कसोटी आहे. आजची आव्हाने वेगळी आहेत.आपल्या मुलांना , त्यांच्या मुलांचे योग्य संगोपन करण्याकरीता फार कष्ट घ्यावे लागणार आहेत.  याचा विचार करावा लागेल. त्यांना आपली मदत नाही झाली तरी उगीच भूतकाळातील मायेच्या आठवणींनी गळे काढुन आणि आताच्या तंत्रज्ञानाला नावे ठेवत त्याचाच वापर करुन पोस्ट टाकायचे टाळणे तरी आपल्या हातात आहे , खरे कि नाही ?