Wednesday, May 19, 2010

गावाकडच्या गोष्टी... क्रमश:

(माझ्या आईचे माहेरचे कुटुंब मोठे , तशी जुन्या काळातील सगळीच कुटुंबे मोठीच असत, एकत्र राहत असल्याने त्यांच्यात संबंध असत, भांडणे, भाऊबंधक्याही असत.तसेच माया, प्रेमही असे. माझ्या आईकडून तिच्या घराण्यातील सगळ्या काका-आत्यांच्या, मामा मावशांच्या कथा मी वारंवार ऎकलेल्या आहेत.
सध्या आई आजारी असते, कंपवाताने ती घराबाहेरही पडू शकत नाही.रेडीओखेरीज दुसरी करमणुक तिला नसते, तिच्याशी बोलताना आजार सोडून बोलणे कठीण असते, मग परवा मी पुन्हा तिला तिच्या बालपणात नेऊन त्या आठवणींमध्ये तिला रमवण्याचा प्रयत्न केला त्यातुन तिचा वेळ चांगला गेलाच पण मला देखील काही गोष्टी नव्यानेच समजल्या.तिने सांगितलेल्या काही घटना या तिलाही केवळ ऎकुनच माहित आहेत, आता तिच्या घराण्यातली सगळ्यात मोठी अशी तिच शिल्लक आहे, बाकिची मंडळी तिच्याहून लहानच असल्याने या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहतील. गोदुची कथा त्या पैकीच एक. या गोष्टी ऎकताना मला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे तिला तर नाहीच माहित पण ती कुणालाच माहित असणार नाहीत. तिने सांगितलेल्या गोष्टीमंधले कच्चे दुवे कल्पनेने जोडण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा कथानकांवर खर तर चांगल्या मालिकाही बनू शकतील, पण सध्या तरी त्या ब्लॉगवाचकांपर्यंत पोचाव्यात या साठी हा लेखन प्रपंच.....)




तळ्य़ाच्या आत्याबाई अस त्यांना म्हणतं.कोकणातलं हे लहानस खेडं. पण गावचे खोत असल्यानं गावात दबदबा होता. लोकांची घरात उठबस.घरचे भात, नारळ भरपूर.पोफळीच्या बागा.खाऊन पिऊन सुखी कुटुंब.आत्याबाईंचे माहेर भोरचे.त्यांची मोठी अक्का दिसायला गोरी-ऊंच, नाजूक,तिचं लग्न चटकन जमलं,तिच्या यजमानांची सरकारी नोकरी.माई मात्र काळी सावळी,उंचीने बेताची तिचं बाशींगबळ जड.लग्न जमायला फार त्रास पडले.भो्रच्या अण्णा मामांनी तिच्याकरीता बरीच स्थळे बघितली पण योग नव्हता.अखेर शेवटी अलिबाग जवळ अक्षी नावाच्या अगदी लहान गावातील मुलाचे स्थळ समजले.सुदैवाने माणसे चांगली होती, परिस्थिती नव्हती तितकी चांगली, पण त्यांनी माईला पसंत केली आणि लग्न जमले.तळ्याची माई अक्षीला जाऊन पडली.तिथले वातावरणही कोकणचेच त्यामुळे माईला वातावरणाशी जुळवून घेणे कठीण गेले नाही. माईचे यजमान गोपाळाराव भिक्षुकी करीत.फारशी जमीन देखील नव्हती.पण माईला त्याचे दुःख नव्हते.कामाची तिला पहिल्यापासून सवयच नाही तर आवड होती.परसातल्या भाजीपाला आणि घरच्या भातामुळे खायप्यायची ददात नसे. तिने आंबे, फणस यांची देखभाल केली.उन्हाळ्यात त्यांच्या आंबापोळ्या, फणसपोळ्या करणे, कपडे शिवणे हे करुन तिने चार पैसे मिळवायलाही सुरुवात केली.पाठोपाठ दोन मुली झाल्याने घरात सगळेच नाराज झाले होते. मुलींच्या पाठीवर बरेच दिवस तिला मुल झाले नाही.मधल्या काळात मागे रहाणाऱ्या एका कुणब्याच्या बाईचे रात्री बोलावणे आले होते ती अपरात्री अडली होती. सुईणीला बोलावणे धाडले होते पण हि पहिलटकरीण घाबरली होती, माई लगोलग गेली, सुईण येई पर्यंत तिने चूल पेटवून पाणी तापवले इतरही तयारी केली.तान्हु सुईण पार वाकली होती तिला माईने सगळी मदत केली. या घटनेनंतर जवळपासच्या आडल्या बायकांना सोडवायला माई आपणहून जायला लागली.
मोठी सुमन मॅट्रीक झाली तिला आठवीनंतर आलीबागला ठेवावे लागले,पण माईला शिक्षणाचे महत्त्व असल्याने तिने मुलीला शिकवायचा निर्धार केला होता, मुलगी ही हुशार होती.पण आलीबागला पुढच्या शिक्षणाची सोय नसल्याने मुंबई नाहीतर पुण्याला पाठवायला हवे होते, हा खर्च मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर होता.

याच वेळी सुमनला नागपूर कडून एक स्थळ सांगून आले.घरची परिस्थिती उत्तम, मुलगा शिकलेला माणसं चांगली.माईच्या यजमानांनी भितभितच पत्रिका पाठवली.पत्रिका जुळतीय, मुलीला घेवुन पुढची बोलणी करायला या, असे पत्र आल्यावर माईला आनंद झाला तो शब्दात सांगता येण्याजोगा नव्हता, मात्र गोपाळाराव चिंतागती झाले. आपल्याला ही उडी झेपेल का? इतकी मोठी माणसं, आपल्या जवळ काय आहे?हुंड्य़ावरुन लग्न मोडायचं, की मुलीच्या सुखासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवायचं? काय करावं त्यांना सुचेना. माईला त्यांच्या मनःस्थितीची कल्पना आली.
ती म्हणाली,"मला वाटतं आपण एवढं हताश होवु नये, त्या मंडळींना आपल्या सुमनचा फोटो पाठवू बरोबर आपल्या परिस्थितीची कल्पनाही देवू. आम्ही आम्हाला झेपेल असं कार्य हौसेने करुन देवू म्हणावं, मात्र तुमच्या तोलामोलाचं करण आम्हाला जमणार नाही., त्यांना पटलं तर हो म्हणतील नाहीतर आपण सुमनसाठी दुसरे मुलगे बघू. पण त्यांच्याशी काहीच पत्रव्यवहार न करता गप्प बसणे बरोबर नाही"
माईचे बोलणे त्यांना पटले, सुमनचा फोटॊ आणि सविस्तर पत्र त्यांनी नागपूरला पाठवून दिले.पंधरा दिवसांत नागपूरहून उत्तर आले, आम्हांला मुलगी पसंत आहे.खर्चाची काळजी आपण अजिबात करु नये.आम्ही माणसांचे मोल मानतो.

गोपाळराव नागपूरला जावून घर, मुलगा बघून आले,त्यांनी आम्ही अक्षीला लग्न करुन देवू असे सांगितले, नागपूरकरांनी कुठल्याही मागण्या केल्या नाहीत.आम्ही पन्नास माणसे येवू भाड्याचा खर्च देखील त्यांनी मागितला नाही.सारे अक्षीगाव माईच्या मदतीला आले.माईने मोठ्या हौशीने तयारी सुरु केली.शेजारच्या पुरोहितांच्या वाड्यात मुलाकडच्यांना जानवसा दिला होता.विहिणीसाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.सिमांतपूजनाच्या जेवणाला उकडीचे मोदक केले होते.भोरहून माईच्या मामांनी वामनरावांना नेले होते, त्यांच्या स्वयंपाकावर व्याही मंडळी खूष होती.एकंदरीत कुठलेही रुसवेफुगवे भांडाभांडी न होता कार्य झकास पार पडले.माईच्या घरी पैशाची रेचचेल नव्हती, पण माणसांच्या आगत्याने, प्रेमाने सासरचे लोक भारावून गेले अर्थात त्यांनाही याच गोष्टीचे महत्त्व होते.त्यांच्या घरच्या मोठ्या कारभाराला अशी दहा माणसात वावरणारी मुलगीच हवी होती.

सुमन सासरी गेली.तिच्या कामसू स्वभावामुळे ती सासरी लाडकी बनली.सासरचे रितीरिवाज तिने चटकन आत्मसात केले.सासरच्या लोकांना आपलेसे केले ते आपल्या लाघवी स्वभावाने आणि कामाच्या झपाट्याने.

सुमन सासरी गेली, आणि अचानक माईची कुस पुन्हा उजवली.तिलाही प्रथम खरे वाटले नाही, थोडे संकोचल्यासारखेही झाले. पंधरा वर्षांनी पुन्हा घरात पाळणा हलला, या खेपेला तिला मुलगा झाला.बरेच वर्षांनी घरात बाळ आले, मुलगा झाल्याचा सगळ्यांनाच आनंद झाला."माई, तुम्ही लई बायकांची बाळंतपण केलीत म्हनुन द्येवानं तुम्हान्सी प्रसाद दिला" असं अजूबाजुच्या बायका म्हणू लागल्या. सुमन देखील सासरी सुखात होती. तिची तशी पत्रे येत, तिला पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजात देखील घातले होते.एकंदरीत दिवस चांगले चालले होते. माईच्या घरात सुबत्ता नसली तरी समाधान भरपूर होते.तिच्या घरातील सगळ्यांनाच माणसांचे आगत्य होते.आहे त्यात आनंदाने राहण्याची वृत्ती होती आणि आपले आंथरुण पाहून पाय पसरायचा स्वभाव असल्याने घरात वखवख नव्हती.

पण सगळे दिवस सारखे नसतात.संध्याकाळची पूजा सांगून गोपाळराव घरी येत असताना त्यांना साप चावल्याचे निमित्त झाले आणि वेळीच उपचार न मिळाल्याने चार पाच तासांतच ते गेले.अचानक घरावर संकट कोसळले. माईचा बाळ नुकताच चालायला लागला होता. त्याचे सगळे आयुष्य घडवायचे होते, एका मुलीचे लग्न व्हायचे होते, माईला आभाळ फाटल्यासारखे झाले तरी रडत बसायला वेळ नव्हता. तळ्याहून भाऊ,वहिनी आले.आई नाही येवु शकली तेच चार दिवस माईला माहेरी घेवून गेले.आईच्या कुशीत माईने रडून घेतले ते अखेरचे.आता मलाच खंबीर व्हायला हवे,नातेवाईक आणि त्यांची मदत किती दिवस पुरणार? असा विचार करुन आठ दिवसात माई परत आपल्या घरी आली.

सुमनला वडील गेल्याचे समजले होते,खरं तर ती माहेरी बाळंतपणाला यायची होती पण अचानक ही तार आली, तिच्या घरच्यांनी प्रथम तिला सांगितलेच नाही, तिची मनःस्थिती बघून सासूबाईंनी तिला जवळ घेवून सांगितले. सुमनला फार दुःख झाले, पण ती काही करु शकत नव्हती तिच्या या नाजुक अवस्थेत तिला अक्षीला पाठवायला घरचे तयार नव्हते.

माईने सगळा कारभार बघायला सुरुवात केली. भिक्षुकीतून मिळणारी आवक बंद झाली होती, मात्र तिने असलेल्या लहानशा शेताच्या तुकड्यावर लक्ष घालायला सुरुवात केली.गोड बोलून चार लोक तिने जोडलेले होतेच.तिने सुईणीची कामे देखील करायला सुरुवात केली.लांबलांबच्या वाड्या वस्त्यांवरुन लोक तिला बोलवायला येत, माई लगोलग जाई. रात्री अपरात्री देखील माई त्यांच्या बरोबर जात असे. तिने कधीच तोंडाने मोबदला मागितला नाही.कधी कधी तर काही लोक इतके गरीब असत, की त्यांच्या कडून आल्यावर अंघोळ करुन माई भाताच बुडकुल शिजवी,त्यावर तूप, लोणच्याची फोड घाली कधीतरी गुळाचा सांजा असं जेवण बाळंतीणीला पाठवी. मात्र ही माणसं, अडीनडीला माईच्या मदतीला येत, तिच्या भातलावणी, काढणीचा कधी खोळंबा होवु देत नसत.

आपल्या सहा महिन्यांच्या मुलाला घेवुन सुमन अक्षीला आली.पांढऱ्या कपाळाच्या माईकडे बघून तिला हुंदका आवरला नाही.माईला देखील सुमनला बघून भरुन आले.बराच वेळ मायलेकी निःशब्द पणे अश्रू ढाळत राहिल्या.माईने नातवाला उराशी धरले,याचे बारसे इथे व्हायला हवे होते, पण काय करणार? सुमनने हि तिच्या भावाला पहिल्यांदाच पाहिले होते. आठ पंधरा दिवस सुमन राहिली.मग तिच्या सासरहून एक पत्र आले.पत्रात तिच्या नवऱ्याने लिहिले होते तुझ्या बहिणीला तू इकडे घेवुन ये तिच्या पुढच्या शिक्षणाची आपण व्यवस्था करु, सध्या आपण त्यांना एवढी मदत करु शकतो.

सुमनने माईला पत्रबद्दल सांगितले. माई म्हणाली," गौरीला तू घेवुन जा, जावयांच्या शब्दाचा मान राखायला हवा, पण त्यांना म्हणावं तिच्यासाठी मुलगाच बघा उगीच शिक्षणाचा खर्च नको,तुम्ही करताय हेच खूप आहे, अजून बाळचं सगळचं व्हायचं आहे, तेव्हा लागेलच मदत. मऊ लागल, म्हणून कोपरापासून खणू नये" सुमन म्हणाली ,"आई आता माझी कॉलेजची दोन वर्ष झाली, दोन संपली की मी पण नोकरी करेन, मग काय हरकत आहे? आणि आमची माणसं, खरच फार चांगली आहेत"
" हो आहेत गं, ह्यांची पुण्याई म्हणून अशी देवमाणसं भेटली आहेत, पण चांगल्याचं चांगुलपण आपण टिकवायचं असतं,उगीच आपला भार इतरांवर टाकणं मला नाही आवडतं गौरीसाठी तुमच्यासारखी चांगली माणसं बघं"

सुमन बरोबर गौरी गेली, कामाचाही हात कमी झाला, पण आज ना उद्या ती जाणारच होती. माईला उद्योगांमुळे दिवसाचे चोवीस तास कमी पडत. बाळच्या बाललीला बघायलाही सवड नसे. लेकरू फार गुणी होतं, कुणाकडेही जाई, देवु ते खाई, हट्ट नाही की रडणं नाही.परिस्थिती माणसाला शहाणं बनवते.
गौरी देखील सुमन सारखीच गुणी होती, माईच्या हाताखाली राहुन घरकामात ती तयार झाली होतीच, शिवाय शिवण, भरतकाम यातही ती तरबेज होती.सुमनच्या सासरचे खटले मॊठे होते, संत्र्याच्या बागा होत्या, कापसाची शेती होती.सुमनच्या सासऱ्यांच्या पश्चात तिच्या सासुबाई सगळा कारभार समर्थपणे बघत होत्या.सगळे त्यांना अक्का म्हणत ही मंडळी सधन होतीच पण त्याही पेक्षा त्यांची मनाची श्रीमंती जास्त होती.सुमनने गौरीसाठी मुलगे बघण्याचा आईचा निरोप सासुबाईंना सांगितला,त्यांच्या परिचितांपैकी दोन तीन ठिकाणी ती पत्रिकाही देवुन आली.पत्रिका जुळत नसल्याचे निरोप आले.
एक दिवस सुमनच्या सासुबाई तिला म्हणाल्या,"अगं आपल्या नानासाठी आपण गौरीची पत्रिका बघुयात का?" नाना हा त्यांचा धाकटा मुलगा होता, नुकताच पदवीधर होवुन नोकरीला लागला होता. म्हटल्याप्रमाणे त्यांनी गुरुजींना बोलावून पत्रिका दाखवल्या,पत्रिका जुळत होत्या.
त्यांनी नानालाही विचारले,"गौरी तुला पसंत आहे का? मला तर ही मुलगी फारच आवडली आहे, शिवाय माणसे माहितीतली आहेत.दोघी बहिणी जावा झाल्या तर घरात पुढे कुरबुरी पण कमी होतील"
सुमनच्या नवऱ्यालाही हा विचार पटला.नानानेही गौरीला होकार दिला.
सुमन भितभितच सासुबाईंना म्हणाली,"हे सगळ ठिक आहे,पण आता आईची परिस्थिती तुम्ही जाणताच, लग्न करुन देणं .."
"मला सगळं ठाऊक आहे, माईंनी माझी सगळी हौस तुझ्या लग्नात केली आहे,त्यांना जड होईल असे आपण नकोच करायला, गौरीचे लग्न आपण नोंदणी पध्दतीने करु, म्हणजे खर्चाचा प्रश्ण उरणार नाही. आपण दोन्ही अंगी लग्न करुन घेवू पण ते तुझ्या आईला पटणार नाही, त्या काही करुन लग्न देतील करुन पण अजून तुझ्या भावाचे सगळेच व्हयचयं आणि आई-वडीलांची जागा कुणी घेवु शकत नाही, देवक दुसरे कुणी बसवणार हे बघून त्या माऊलीला केवढं दुःख होईल, त्या पेक्षा नोंदणी पध्दतीने लग्न करु , सगळेच प्रश्ण सुटतील , मी नाना आणि दादाशी बोललीय आधीच, मुले माझ्या शब्दाबाहेर नाहित, हे नोंदणी लग्नाचं मला दादानचं सांगितलय."

सुमनने माईला पत्राने सविस्तर हकिकत कळवली.माईचे मन सुमनच्या सासरच्या लोकांच्या विशेषतः तिच्या सासुबाईच्या मनाच्या मॊठेपणाने भरुन आले.अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन या उक्तिचा प्रत्यय आला.गोपाळरावांच्या निधनानंतर अक्का दहा दिवसात समाचाराला आल्या होत्या, माईच्या पाठीवरुन हात फिरवून ,"माई, धीर सोडू नका, झालं ते फार वाईट झालं.पण स्वतःला एकटं समजू नका, आम्ही आहोत" अस बोलल्या होत्या.फार बडबड कराय़ची त्यांची सवय नव्हती.पण कृतीतून त्यांनी करुन दाखवलं.गौरीचं लग्न त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच झालं.

हि घटना आहे पन्नास एक वर्षांपूर्वीची.आज आपण समाज खूप सुधारलाय म्हणतो पण हौशीच्या नावाखाली लग्न समारंभांमध्ये लाखो रुपये उधळले जातात.आजही हुंडाबळी वाचायला मिळतात. मुलीच्या लग्नापायी त्यांचे बाप कर्जबाजारी होतात आणि त्या खर्चाला भिऊन मुलीचा जन्म नको म्हणून गर्भातच तिला मारली जाते. या सगळ्या गोष्टी बघून गावाकडची हि गोष्ट मला सांगाविशी वाटली.पैशाची समृध्दी मिळवताना मनाची श्रीमंती आपण गमावत नाही ना? याचा विचार केला पाहिजे.

Tuesday, May 11, 2010

गावाकडच्या गोष्टी... क्रमश:

वामन पोरका झाला.त्याची आई बाळंतपणातच वारली होती तेंव्हापासून तो आजोळीच रहात होता, वडीलही प्लेगच्या साथीत गेले.आजोळची परिस्थितीही बेताचीच.या मुलासाठी त्याचे वडील सटीसहामाशी पाठवत असणारी रक्कमही आता मिळणार नव्हती.सहाजिकच त्याचा भार वाटू लागला.त्याच्या मामाला घरातून वामनची काहीतरी सोय करा अशी वारंवार बोलणी होवु लागली.मामांनाही पटत होते, पण एवढ्या लहान मुलाला कुठे सोडणार?

मामलेदार साहेबांकडे पूजा होती मामांना ब्राह्मण म्हणून बोलावले होते.जेवणे झाल्यावर विडा खाताना मामलेदार साहेबांनी विचारले,"मामा, घरी सगळे ठिक आहे ना?, आज तुमची तब्येत बरी वाटत नाही. कसली काळजी लागलीय ?"
" काही नाही हो, आमचं आपलं नेहमीचचं रडगाणं.प्रपंचाच्या न संपणाऱ्या कटकटी "
"तरीपण,आजवर तुम्ही कधी असं देखील बोलला नाहीत? मला मोकळेपणनं सांगा , अनमान बाळगू नका"
" अहॊ, वामन , माझ्या सक्ख्या बहिणीचा मुलगा, बहीण गेली तेंव्हापासून इथेच आहे, गेल्या महिन्यात त्याचे वडील आमचे मेहुणे वारले,आता त्याच्या संगोपनाचा प्रश्ण आला.घरी त्यावरुन सतत कटकटी होत आहेत, आता आमच्या मुलांसारखा तो, त्याला का रस्त्यावर सोडून देवू?"
"नको नको, असं नका करु, तुम्ही त्याला आमच्या घरी पाठवा.आमची मुले लहान आहेत, तो त्यांना सांभाळेल,आम्ही त्याची मुंज करु.आमच्या मॊठ्या बारदानात सहज सामावला जाईल., एवढी छोटी बाब, तुम्ही आधीच सांगायची"
मामलेदार साहेबांचे आभार कसे मानावे, मामांना समजेना.

मामलेदारांच्या घरी वामन रहायला आला.त्यांच्या आबा आणि भाऊ बरोबर त्याची ही मुंज झाली.त्याला शाळेतही घातले होते, पण अभ्यासात त्याला विशेष गती नव्हती.घरकामात मात्र तो तरबेज होता. विहिरीवरुन पाणी आणणॆ, बंब पेटवणे,अंगण झाडणॆ ही कामे तो बिनबोभाट करी. पुजेला भटजी यायच्या आत पूजेची तयारी करुन ठेवी.काकूंच्या लहान धाकट्या मुलांना खेळवी.इतकेच नव्हे तर काकूंकडून त्याने स्वयंपाक ही शिकून घेतला.मामलेदार साहेबांना दौऱ्यावर खेडोपाडी जावे लागे.तिकडे जेवणाचे हाल होतात असे त्याने ऎकले होते.
एकदा ते दौऱ्यावर निघताना तो म्हणाला,"काका , मी येऊ तुमच्या बरोबर?"
"तू काय करणार तिकडे?"
"तुमच्या साठी स्वयंपाक करेन,तुमचे कपडे धुवेन."
"आणि तुझा अभ्यास? त्याच काय?"
"रागावणार नसाल तर बोलू?"
"बोल"
" मला नाही जमत गणित आणि इंग्रजी,तीनदा नापास झालो.तुमच्यावर तरी किती बोजा देवू? झाले तेवढे शिक्षण पुरे."
" ठिक आहे तुझी मर्जी, पण स्वयंपाक करण्यात तरी हातखंडा मिळव, उद्या त्यावर तरी पोट भरु शकशील, चल माझ्या सोबत"
वामन मामलेदारसाहेबांबरोबर गेला, त्याने त्यांची चोख व्यवस्था ठेवली, त्यांचे कपडे धुणे, सामन आवरणे, ते यायच्या आत गरम गरम जेवण तयार ठेवणे हे सारे तो आवडीने करी, मागचे सगळे आवरुन टाकी.त्याच्या हाताला चवही छान होती.आठ दिवस आंबवडे,उतरवली,आंबेघर, गोळ्याची वाडी असा दौरा आटोपून वामन आणि साहेब भोरला आले.
आल्याबरोबर मामलेदार साहेबांनी काकूंना बोलवून सांगितले,"वामन फार दमला आहे.माझी सारी काळजी तो घेत होता, आज त्याला बिलकूल काम सांगू नका त्याला आमच्या बरोबर जेवायला वाढा."पुढे मामलेदार साहेबांबरोबर वामनला दौऱ्यावर न्यायचे असा शिरस्ताच झाला.वामन असाच मोठा होत होता.मामलेदारांच्या घरात आपण आश्रित आहोत हि जाणीव त्याला कुणी करुन दिली नसली तरी तो आपली पायरी जाणून वागत होता.घरातल्या कुठल्याच कामाला तो मागे नसे.त्यामुळे सगळ्यांना तो हवाहवासा वाटे.

गोदु सासरी गेली आणि चार सहा महिन्यातच मामलेदार साहेब आजारी पडले.औषधपाणी सुरु होते, पण गुण येत नव्हता.वामन अखंड सेवा करीत होता.मामलेदारांना आतुन जाणावले आता आपले काही खरे नाही. एक दिवस रात्री त्यांनी काकू आणि आपले मुलगे आबा,अण्णा यांना जवळ बोलावले.
ते म्हणाले, " मी बरा होईन असे मला वाटत नाही.आपल्याला काही कमी नाही शेती वाडी आहे, मुले शिकून मोठी होतील दहा हातांनी उदंड मिळेल. पण प्रत्येकाचे प्रपंच वाढतील, पैशाला वाटा फुटतील, पैशाच्या मागे धावू नका, प्रपंचासाठी तो जरुर मिळावा मात्र त्या करीता माणुसकी सोडू नका. होता होईल तो अडलेल्यांना मदत करा आणि मुख्य म्हणजे वामनला कधीही अंतर देवू नका. तुम्ही पाच भाऊ नसून सहा आहात असे समजा.आपल्या सुखात तसेच दुःखातही त्याला बरोबर ठेवा. त्याच्या मामाला मी शब्द दिलेला आहे, मुलगा गुणी आहे. आता शिकला नाही फारसा.पण त्याने काही बिघडत नाही.कष्टाला तो कमी पडणार नाही.तो स्वतःहून जात नाही तोवर तो या घरातच राहील त्याला कुणी घराबाहेर काढणार नाही असं मला वचन द्या.,मला त्याशिवाय सुखाने मरण येणार नाही"
आबा म्हणाले,"काका, असं बोलू नका, तुम्ही बरे व्हाल.आणि आम्हाला वामन भावासारखाच आहे, त्याला आम्ही सांभाळू"

मामलेदारसाहेब नंतर आठ्वड्याभरातच गेले.ते गेले आणि घराच्या वैभवाला जणू दृष्टच लागली.एन्फ्ल्युएंझाच्या साथीत दोन दिवसाच्या तापाचे निमित्त होवुन आबाही अकस्मिकरित्या वारले.एकापाठोपाठ एक असे दोन कर्ते पुरुष गेल्याने घराची रयाच गेली.मोठ्या घराचा कारभार चालवायला अण्णा मुंबईची नोकरी सोडून आले.बाकीची मुले मोठी होत होती,घरात लग्नं कार्ये होत होती.घरातल्या मुली लग्न होवुन सासरी जात होत्या.परक्याच्या मुली या घरात सुना म्हणून येत होत्या.घरातल्या लहान मोठ्या समारंभाचा स्वयंपाक करायची जबाबदारी वामनवरच असे.त्याच्या स्वयंपाकाची सगळे स्तुती करीत.वामनच्या लग्नाबद्दल मात्र कुणीच विषय काढला नाही.काकूंना वाटे याचेही लग्न केले पाहिजे, पण नवरा आणि मुलगा पाठोपाठ गेल्याने त्यांचा पूर्वीचा उत्साह कमी झाला होता.

खुद्द वामनला ह्या घराचा आधार वाटत होता, वेगळं राहण्याची त्याची मानसिक तयारी नव्हती.आपण आश्रित मग कशाला लग्न करुन बायकॊला इथे कामाला लावायची? बरं आहे आहे तेच आयुष्य ! इथल्या सासुरवाशणींचे हाल तो बघत होताच, तीन -तीन पर्य़ंत काम करुन सुखाचा घास मिळायचा नाही.सोवळी-ऒवळी सांभाळताना जीव थकायचा.कामात थॊडी कसूर झाली की काकूंचा पट्टा चालु व्हायचा.बाळंतपणात पुरेशी विश्रांती नाही की वेळेवर जेवण नाही. आबा, भाऊ दोघांच्या बायका बाळंतपणातच गेल्या.आपली आईपण तशीच गेली, नको ते संसाराचं लोढणं. आपलं हे परस्वाधीन जगणं आपल्याबरोबरच संपुदे.

दिवस असेच जात होते, काळ बदलत चालला होता.मामलेदारांची मुले आपल्या पिढीजात श्रीमंतीच्या ऎटीतच होती.सणवार,व्रतवैकल्ये शिस्तित चालत.मुलींची लग्ने, मुलांच्या मुंजी थाटामाटत पार पडत.रामनवमीच्या उत्सवाला भोरच्या राजवाड्यात वाईहून भिक्षुक येत.त्यांच्या रात्रीच्या फराळाची, मुक्कामाची व्यवस्था मामलेदारांच्या वाड्यात होई. खर्च पूर्वीसारखाच, पण आवक मात्र कमी होती.मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढावी लागली होती.शेतात कष्ट करायची कुणाचीच तयारी नव्हती, आणि खॊटी प्रतिष्ठा आड यायची. कुळे देतील त्यावर समाधान मानायचे, त्यांच्यावर देखरेख करायला बाबाला ठेवले होते, पण त्याचा सगळा वेळ गावात पांढरेशुभ्र कपडे घालून लोकांशी गप्पा, चर्चा करण्यात जाई.या सगळ्याचा व्हायचा तोच परीणाम झाला.बडा घर पोकळ वासा.वामनला हे दिसत होते.पण तो बोलू शकत नव्हता.अडाणी असून तो गावातील लग्नाकार्याला आचारी म्हणून जाऊन पैसे मिळवत होता.आपला भार तो घरावर टाकत नसे, शेतात देखील त्याने स्वतः खड्डे खणून आंब्याची रोपे लावली, कळश्या डोक्यावर घेवून तो पाणी घाली.घरातल्या सगळ्यांनी कष्ट केले पाहिजेत असे त्याला वाटे, पण सांगण्याचा त्याला अधिकार नव्हता.
बापू सगळ्यात धाकटा, काकूंचा लाडका.मॅट्रीकला नापास झाला.अण्णांनी राजांकडे शब्द टाकून संस्थानात त्याला कारकुनाची नोकरी मिळवून दिली.कारण परीक्षेला बसला तेंव्हाच त्याचे लग्न काकूंनी करायला लावले होते.आता चार पैसे मिळवणे क्रमप्राप्त होते.बापूची बायको देखील दोन मुले झाल्यावर गेली.तिचा मुलगा अवघा सहा महिन्यांचा होता.शेवटच्या आजारत ती वामनला म्हणाली होती,"वामनराव, तुम्ही मला मोठ्या भावासारखे, माझ्या मुलाला सांभाळाल ना? ह्यांचे दुसरे लग्न होईल, प्रत्येकाला आपला संसार. त्याच्याकडे तुम्ही बघा"
वामननेही या बाळाला जीव लावला.प्रत्येक माणसाला कुणावर तरी माया करायची ऊर्मी असते.या बाळच्या रुपाने वामनला ती व्यक्ती मिळाली.त्याने त्याचे लाड केले.
यथावकाश बापूचे दुसरे लग्न झाले.घराला त्यावेळी उतरती कळा लागायला सुरुवात झालेली होती.बापुरावांची हि बायको, काकी हुशार होती,व्यवहारी होती.फायनल पर्यंत शिकलेली देखील होती.तिला घराच्या अवस्थेची कल्पना आली. घरात वामन हा उपरा आहे, आपलेच नीट भागत नसताना हि बाहेरची ब्याद हवीय कशाला? असा तिचा स्वच्छ प्रश्ण होता. त्यातून तो बाळचे जास्त लाड करतो हि देखील टोचणारी बाब होती.काही ना काही कारण काढून काकी वामनशी भांडत. वामनने मागच्या परसदारी बरीच भाजी लावली होती. तो स्वतः पाणी घालून त्यांची देखभाल करी. घरात देवून उरलेली भाजी तो विकत असे. त्या्चे किरकोळ खर्च तो त्या पैशातुन भगवत असे. पण एक दिवस त्यावरुन काकी चिडल्या आमच्या परसातल्या भाज्या विकून ते पैसे तुम्ही घेता हे चुकीचे आहे, सगळे पैसे माझ्याजवळ दिले पाहिजेत असा त्यांनी फर्मान काढले.वामन वरुन घरात रोज भांडणे होत असत.

एक दिवस दुपारची वेळ होती, पोस्ट्मन घरात पत्र टाकून गेला.म्हसवडहून काकींच्या भावाचे पत्र होते.पत्र वाचून काकी पदराने डॊळे पुसू लागल्या.त्यांची थोरली जाऊ जवळ आली,म्ह्णाली,"काय लिहलय गं पत्रात ? काय झाल?"

" अहो माझा धाकटा भाऊ, डोक्याने जरा कमी आहे त्याला मोठ्या वहिनींनी घराबाहेर काढला. कुठे जाइल हो तो? डोक्यानं कमी हा काय त्याचा दोष आहे?"
"बघितलस, तुझ्या भावाला घराबाहेर काढल्यावर झालं ना तुला दुःख, हा वामन तसाच आहे हो! शिकला नाही बिचारा लहानपणापासून इथंच वाढलाय, त्याला कुणी नाही.या वयात कुठे जाईल बिचारा? मामंजींना ह्यांनी शब्द दिलाय आम्ही अर्धपोटी राहू पण आमच्या हयातीत आम्ही त्याला नाही हकलून दे्णार. तू पण तसे मनात आणू नको.त्याने ही या घरासाठी, इथल्या माणसांसाठी खूप केलयं. अगं भाकड गाईला , म्हाताऱ्या बैलालाही आपण सांभाळतो हा तर माणूस आहे, तुझ्या माझ्यासारखा आणि कष्ट करतोय तो, फुकट नाही ना खात. त्याला असं तोडून नको बोलत जाऊ. त्याच्यावरुन भरल्या घरात नको वाद घालू. घर फिरलं कि घराचे वासे फिरतात असं म्हणतात मात्र हा वामन इतकी वर्ष इनामेइतबारे आपल्या घरात राहतोयं, मी काही तु्झ्यासारखी शिकलेली नाही.पण मला अडाणीला वाटत ते बोलले हो, मोठेपणाचा मान देत असशील तर ऎक माझं एवढं"

तेंव्हापासून वामनला हकलण्याच्या गोष्टी कमी झाल्या, भांडणे संपली मात्र नाहीत.वामनराव अखेरपर्य़ंत त्या घरातच राहीले.फारसे आजारी न पाडता त्यांना मरण आले. त्यांच्या प्रामाणिकपणाची दखल अशा तऱ्हेने तरी देवाने घेतली म्हणायची.गेल्यावर त्यांचे शव उचलले, आणि त्यांच्या उशीखाली दहा-दहा रुपयांच्या चार-पाच नोटा मिळाल्या.आपल्या क्रियाकर्मांचे पैसे देखील त्यांनी ठेवले होते.

वामनरावांनी शेतात लावलेल्या आंब्याना कित्येक वर्षे शेकड्यांनी आंबे आले आणि पुढच्या दोन पिढ्यांनी ते आवडीने खाल्ले, पण त्यातल्या फार थॊड्या मुलांना ती झाडे लावणारा , जगवणारा माहित आहे. आपल्याला भरभरुन देणाऱ्या देवाचा आपल्याला विसर पडतॊ मग वामन सारख्या अनाथाची काय कथा?


©

Tuesday, May 4, 2010

गावाकडच्या गोष्टी

(माझ्या आईचे माहेरचे कुटुंब मोठे , तशी जुन्या काळातील सगळीच कुटुंबे मोठीच असत, एकत्र राहत असल्याने त्यांच्यात संबंध असत, भांडणे, भाऊबंधक्याही असत.तसेच माया, प्रेमही असे. माझ्या आईकडून तिच्या घराण्यातील सगळ्या काका-आत्यांच्या, मामा मावशांच्या कथा मी वारंवार ऎकलेल्या आहेत.
सध्या आई आजारी असते, कंपवाताने ती घराबाहेरही पडू शकत नाही.रेडीओखेरीज दुसरी करमणुक तिला नसते, तिच्याशी बोलताना आजार सोडून बोलणे कठीण असते, मग परवा मी पुन्हा तिला तिच्या बालपणात नेऊन त्या आठवणींमध्ये तिला रमवण्याचा प्रयत्न केला त्यातुन तिचा वेळ चांगला गेलाच पण मला देखील काही गोष्टी नव्यानेच समजल्या.तिने सांगितलेल्या काही घटना या तिलाही केवळ ऎकुनच माहित आहेत, आता तिच्या घराण्यातली सगळ्यात मोठी अशी तिच शिल्लक आहे, बाकिची मंडळी तिच्याहून लहानच असल्याने या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहतील.गोदुची कथा त्या पैकीच एक. या गोष्टी ऎकताना मला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे तिला तर नाहीच माहित पण ती कुणालाच माहित असणार नाहीत. तिने सांगितलेल्या गोष्टीमंधले कच्चे दुवे कल्पनेने जोडण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा कथानकांवर खर तर चांगल्या मालिकाही बनू शकतील, पण सध्या तरी त्या ब्लॉगवाचकांपर्यंत पोचाव्यात या साठी हा लेखन प्रपंच. )


जेवणीखाणी उरकेपर्यंत दोन वाजून गेले.मागचे आवरुन बायका जेवायला बसल्या त्यांचे आवरायला अजून अर्धा तास गेला.शेणगोळा उरकून माजघरात जरा आडवे व्हावे असे म्हणेपर्यंत तीनाचे ठोके पडले.लहान मुले बाहेर कालवा करत होती, त्यांना रागावून घरात आणले.आता मला निघायला हवं लक्ष्मी आईला म्हणाली.
"अगं जाशील काय घाई आहे एवढी?"
"नाही , तसं नाही पण उशीर नकॊ व्हायला"
"पण मी म्हणते आजच निघायचं काही नडलयं का? राहिली असतीस अजुन चार दिवस,कित्ती दिवसांनी आलीस, दोन वर्ष होवुन गेली असेतील ना? नानाच्या लग्नालाही आली नाहीस"
आत्ताच कशी आले माझं मला माहित, लक्ष्मी मनाशीच म्हणाली.मागच्या खेपेला राहिले आणि परत निघताना आबाच्या पाठीवर छोटा फोड झालेला होता, तो पाहिला होता, पण चावलं असेल काही डास, पिसू म्हणून लक्ष दिलं नाही.सासरी गेले आणि बघता बघता काट्याचा नायटा व्हावा तसा तो फोड वाढला.तांब्यांचं तामल पालथं घालावं अस ते गळू झालं , रात्र रात्र रडून मुलानं आकांत मांडला, तापानं अंग चटचटत होतं वेदनेने पोरगं कळवळत होतं. रामशास्त्री वैद्यांचं ऒषध आणलं पण गुण येत नव्हता.सासुबाईंच्या तोंडाचा पट्टा चालू होता, " माहेरी गेली कि दर खेपला असच होतं, पोरांकडे दुर्लक्ष करत असेल, त्या लोकांना तरी कुठे जावयाची पोराची कदर? आता ह्या पोराला कसलं दुखणं झालं म्हणायचं ! आंबाबाई तुच बघ गं! "
लक्ष्मीला काही सुचेना, मुलाच्या काळजीने जीव कळवळलेला , त्यात सासुबाईंच्या बोलांची भर.भर दुपारच्या उन्हात लक्ष्मीनं रामशास्त्रींचे घर गाठलं.
"शास्त्रीबुवा, काहीही करा, पण माझ्या मुलाला बरं करा" बोलताना तिचा स्वर रडवेला झाला होता.
"तुमच्या मुलाला काळ्पुळी झाली झाली आहे, एक प्रकारचे गळूच म्हणाना, पण त्याचे तोंड आतल्या बाजूस आहे, माझ्या जवळ एक जालीम उपाय आहे, करुन घेणार का?"
" काय वाट्टॆल ते करुन घेईन"
" मग मी आत्ताच येतो" त्यांनी बरोबर एक डबा घेतला.घरी आल्यावर त्या डब्यातुन त्यांनी लहान लहान असे सहा किडे बाहेर काढले.
"काय आहे ते?"
"या जळवा आहेत, त्या दुषित रक्त पिऊन टाकतील. " असे म्हणत त्यांनी गळवावर जळवांचा वेढा दिला. मी येईन परत असे सांगून शास्त्रीबुवा गेले. पाच दहा मिनिटांतच आबा शांत झाला. दोन -तीन तास झाले तशा त्या जळवा लठ्ठ फुगून गेल्या आणि गळू बसू लागले.
शास्त्रीबुवा परत आले.त्यांनी जळवा काढून घेतल्या त्या गळवावर कसलीशी माती लावली.चार दिवसांनी बाळ शांत झोपला,त्याचा तापही कमी झाला.
दोन दिवसांच्या उपायानी मुलगा बरा झाला, पुन्हा हसू खेळू लागला.
पण तुझ्या माहेरी मुलांची अबाळ होते असे पालुपद लक्ष्मीला सतत ऎकावे लागले.
नानाच्या लग्नाच्या वेळीही अशाच क्षुल्लक कारणाने तिला पाठवले नाही.सासर इतकी माहेरी सुब्बत्ता नव्हती. म्हणूनही तिकडे पाठवायला कुरकूर असायची.
यंदा बरीच वादावादी करुन तिने माहेरी जायची परवानगी मिळवली.वहिनीच्या डोहाळजेवणाचे निमित्त काढून आठ दिवस राहून येते असे सांगून ती आली होती. आठाचे पंधरा दिवस झालेच होते. उद्या आवस आणि सूर्यग्रहण. आज निघायलाच हवे. हरतालिका, गौरी गणपतीची तयारी लक्ष्मीपुढे घरची कामे दिसू लागली होती. रात्री आठ पर्यंत पोहचू.तिने आईला बजावले ,"आता नकॊ बाई आग्रह करुस.तिकडे गौरी गणपतीची तयारी राहिलीयं, परत इकडे यायला हवय ना मी? मग आज निघूदे"
" पण रात्री अपरात्री जाल, मुल, लहान धाकटी आहेत, जावई-बापू असते तर प्रश्ण नव्हता ,नाना परवाच मुंबईला गेला तात्या आणि अप्पा शिकायला पुण्याला तुला सोडायला यायला हि कुणी नाही गं"
"काही होत नाही, रस्ता नेहमीचा आहे, गणू घरचा गाडीवान आहे, मला कॊण खातय? वाटेत कुठे थांबणारही नाही चार तासात भोरला पोहचू."
मुलांना गाडीत बसवून लक्ष्मी निघाली.आईने वाटेत खायला ओल्या शेंगा उकडुन दिल्या होत्या, बेसनाचे लाडू,गूळपापडीचे लाडू,आल्याच्या वड्या आणि बरच काही.
सरत्या श्रावणाचे दिवस होते, हवेत गारवा होता,पाऊस उघडलेला होता. शेते हिरवीगार झाली होती. गाडीवाट ओली असल्याने धुरळाही उडत नव्हता.मुले गाडीत खुशीत होती.धाकटी अंबु तान्ही होती.तिला मांडीवर घेतले होते.बाकीची तिघं अवती भवती होती.बघता बघता शिवापूर आलं.ओढा ओलांडला की मोठा रस्ता लागेल, मग कापूरहोळचा फाटा. अगदीच वेळ झाला तर भाटघरला करु मुक्काम, लक्ष्मी मनाशी म्हणाली. ओढ्याला पाणी अंमळ जास्ती होते.
पाण्यात थोडं पुढं गेल्यावरच बैल बुजले.जागच्या जागी चुळबूळू लागले.गणूही गडबडला.म्हणाला,"वैनीसाबं, पान्याला लई ऒढं हाय, आपन माघारी जाउया का?, उद्याच्याला पहाटंच निगूया की, बैलं बी जाइना म्हणत्यात"
" गणू काही होत नाही, किती वर्षं गाडी हाकतोस? एवढ्या पाण्यानं काय झालय, उतरवलीच्या नाल्यात कमरे एवढ्या पाण्यातन गेलो आठवतय ना? आजच काय तुला धाड भरली, चल लवकर रात्र पडायच्या आत पोचायला हवं"
गणू बापडा हुकुमाचा ताबेदार, त्याने बैलांच्या पाठीवर कासरा ओढला आणि गाडी पुढं घातली.
पण वरच्या घळीतून जोरात पाण्याचा लोट आला अचानक, बघता बघता पाणी चाकांच्या वर गेलं, बैलगाडीत पाणी शिरु लागल, गाडी वेडीवाकडी झाली.लक्ष्मीच्या तोंडच पाणी पळालं. आधी हसून खेळणारी मुल अचानक पाणी बघून कावरी-बावरी झाली.अबा आणि अण्णा पाण्यातही खेळू लागले.
गणू बैलांना हाकत होता पण पाणी वाढत होत, गाडी बुडत होती, बैल दमले होते.
एवढ्यात समोरुन एक उंचापुरा काळा सावळा माणूस आला.बघता बघता तो पाण्यात शिरला.बैलांच जू त्याने बळकट हातान धरल. आपल्या हातात दोन मुलांना घेतलं आणि बैलांना जवळजवळ ऒढतच पलिकडे आणून ठेवलं, रडणाऱ्या लक्ष्मीला तो म्हणाला,"बहनजी डरॊ मत , कुछ नही होनेवाला"
पलीकडच्या काठावर येईपर्यंत पोरांची चिरगुटं भिजून चिंब झाली होती.बैलगाडीतली पोती , बसकरं भिजली होती, थंडीने आणि भितीनं सगळेच गारठले होते.
त्या माणसानं काटक्याकुटक्या आणल्या आणि पेटवून दिल्या तो गणूला म्हणाला, " इधर रुकना थोडी देर, बच्चोंके कपडे सुखादो बाद में चले जाना"
लक्ष्मीला वाटले प्रत्यक्ष देवदूतच आला माझ्या मदतीला, त्याला थोडा खाऊ द्यावा म्हणून तिने बोचकी सोडली , कडोसरीचा रुपया काढला, गणूला म्हणाली अरे त्याला थांबाव.भाषेचा प्रश्ण होता पण गणुच्या हाती त्याला सगळ द्यावं असा विचार करुन तिने चार-सहा लाडू एका कोरड्या फडक्यात बांधले, आजुबाजूला बघितले तो काय तो माणुस गायब! तिने गणूला हाक मारली, " अरे गणू तो माणूस गेला कुठे असा कसा रे तू , जरा त्याला थांबवायच नाही का?
गणूने धावत जावुन बघीतले पण छे ! त्या माणसाचा ठाव ठिकाणाच लागला नाही, मघारी येताना शेतात काम करणाऱ्या दोघा तिघांना गणूने विचारले
" इकडून एक उंच काळा माणूस गेलेला बघितला का? डोइला हिरवा रुमाल व्हता आणि दुसरीच भाषा बोलत होता"
लोक म्हणाले , "न्हाइ बा, न्हाई गेलं कुनी इकडुन पन तुम्ही सांगता त्यावरुन त्यो पिरच असावा, इथल्या मशीदितला आजवर ऎकलय बरचं. दिसतो त्यो, कुणाकुनाला, हां पर त्रास न्हाइ द्येत मदतच करतो म्हनं"
गणू हेच सांगत आला. लक्ष्मीनं शेकोटीवर मुलांचे कपडे शेकले होते. ती म्हणाली,"कुणी का असेना आज माझ्या मदतीला तो कृष्णा सारखा धावुन आला, माझा पाठीराखा"
भोरला येइतो रात्र बरीच झाली होती.मामलेदार साहेबांना बायका मुलं निघाल्याचा सांगावा मिळाला होता, अजून मंडळी कशी पोहोचली नाहीत म्हणून घरात सगळे काळजीत होते. शिवापूरच्या ऒढ्याला पाणी असेल तर ते उलटे माघारी गुंजवण्याला गेले असतील असे पण वाटुन गेले.
बैलांच्या घुंगरांचा आवाज आला.मुलं धावतच घरात आली.आजी माजघरात होती.अण्णा आजीला बिलगून म्हणाला,"आज्जी आम्ही केवढं पाणी बघितल माहितियं, माझ्या गळ्यापोत्तर पाणी आलं, भाऊ यडा रडायला लागला.आई पण रडली बैलगाडीत पाणी आल, कपडे भिजले"
झालं पोरट्यानं घात केला, चोंबडेपणान बोलायची काही जरुर होती का?
लक्ष्मीन काही बोलायचा अवकाश , मामलेदार साहेबांनी खुंटीवरचा पट्टा काढला आणि गरजले," गणू आधी इकडे ये"
" काय करताय तुम्ही?" लक्ष्मीने पुढे होवुन विचारलं
" दिसत नाही? पट्ट्यानं झॊडून काढतो याला,लेकराबाळांना घेउन आधी उशीरा निघाला आणि पाण्यात गाडी घातली कशी? साधी अक्कल नाही?"
गणू बिचारा थरथर कापत पुढे आला.
लक्ष्मी म्हणाली," थांबा, त्याची काही चूक नाही, मारायचच असेल तर मला मारा, तो म्हणत होता, परत फिरू, मीच हट्टानं गाडी पुढे घालायला लावली"
मामलेदार साहेबांनी हाततला पट्टा संतापाने खाली टाकला. माजघरातून त्यांच्या आईचा तोंडाचा पट्टा चालू झाला होता .लक्ष्मीच्या हट्टाचे कारण त्यांना समजले.

लगेचच्या खेपेला पुन्हा ती गुंजवण्याला गेली तेंव्हा आठवणीने तिने शिवापूरच्या मशिदीत चादर दिली . पुढे कधीही माहेरी जाताना शिवापूर आले कि लक्ष्मीला हा प्रसंग आठवायचाच आणि मशिदीपाशी तिचे हात नकळत जोडले जायचे.


©