Wednesday, December 8, 2010

काकू

काकुने अवघे पाऊणशे वयमान गाठले.आठवणींना किती मागे खेचले तरी काकुची पहिली भेट काही आठवत नाही. माझ्या जन्माआधीपासून ती होतीच त्यामुळे आई इतकाच तिचाही सहवास, आणि भोरला सततच्या जाण्याने काकुबद्दलची जवळिक निराळीच.लहानपणच्या सगळ्या सुट्ट्या भोरलाच गेल्या.
बायका फारश्या नोकऱ्या करत नसत त्या काळात काकू शाळेत नोकरी करीत होती. तिच्या नोकरी करण्याने घरातल्या कुठल्याही कामातून तिला सुटका मिळाली नाही, उलट शाळेला सुट्टी लागली की पाहुण्यांनी घर भरुन जायचे आणि काकू घर कामात बुडून जायची.मात्र ते सगळे ती अतिशय हसतमुखाने ,आनंदाने आणि हौशीने करीत असे.तिला कधी कंटाळलेली, चिडलेली,दुर्मुखलेली मी बघीतलीच नाही.शाळेतून आली की साडी बदलून ती ओट्यावर स्थानापन्न होत असे,मग एकामागोमाग एक चहा, खाणी आणि स्वयंपाक चालू असायचा.काकूभोवती बसून आमच्या गप्पा चालायच्या. गप्पा मारता मारता काकू आमच्या कडून जमेल तशी मदत करुन घ्यायची.
"बोलता बोलता तेवढी भाजी चिरतेस बाळा?"
"विळी आणशील तेव्हा मला तेवढा कणकीचा डबा दे,भाजी धुवून घे आणि चिरली की विळी जाग्यावर ठेव "
"कोशिंबीर करुया ना, मग शुभा तेवढ्या काकड्या पण घे ना कोचवायला"
अशा पध्दतीने ती कामे सांगायची कि आपण काम करतोय असं, मुळी वाटतच नसे, शिवाय आम्ही काही करत असताना तिचे हात हि कामातच असत,अगदी हसत खेळत,गप्पा मारता मारता स्वयंपाक होत असे.पाने घेणे, उष्टी काढणे,शेण लावणे,भांडी विसळणे अशी किरकोळ कामे आम्ही चढाओढीने करत असू.
उन्हाळ्याच्या सुट्टीत बटाट्याचा किस करणे, साबुदाण्याच्या पापड्या घालणे,पापड लाटणे हि कामे सुध्दा काकुने शिकवली.प्लॅस्टिकच्या पेपरवर ओळीत एकसारख्या पापड्या घालता आल्या पाहिजेत.तिच्यातल्या गृहिणीइतकीच तिच्यातली शिक्षिकेलाही सुट्टी कधीच नसे.घरकामाचे हे धडे आम्ही बहिणींनी काकूकडून घेतले.चैत्रातले हळदीकुंकू हा एक मोठा समारंभ असे. आधी एक यादी करुन आमंत्रणे करुन यायची.करंज्या, लाडू करायला मदत करायची.दुपारी हॉल आवरायचा,अंगणात सडा घालायचा. कलिंगड,टरबूज कापुन त्यांची कमळं बनवायची.गौरीपुढे मोठी आरास करायची.रात्री दहा वाजे पर्यंत गडबड चालू असायची.सुट्टीत एखाद्या संध्याकाळी शंकरहिल वर भेळ घेवून जायचे तिथे बसून भेळ खायची.सुट्टीचे दिवस कसे आनंदात ,मजेत जायचे.अजुनही ते दिवस तितकेच ताजे आहेत.

मोठ्या माणसांमधले मतभेद आमच्यापर्यंत या लोकांनी कधीच आणले नाहीत.त्यांच्यातल्या कुरबुरींचा आमच्याशी वागण्यात कधी पडसाद दिसला नाही.त्यामुळे आम्हा भावंडांमध्ये एक वेगळीच आपुलकी राहिली.आज मी आजुबाजुला बघते, आम्हा भावंडांमध्ये असणारा जिव्हाळा मला वेगळा जाणवतो.याचे श्रेय निःसंशय आम्हा सर्वांच्या आई वडीलांकडे जाते.काकुने भोरचे घर सांभाळले , म्हणजे त्या घराचे घरपण जपले, तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे इतके आपुलकीने केले कि पुन्हा पुन्हा त्या घराकडे जावेसे वाटावे. आपली नोकरी सांभाळून हे सारे करताना तिला किती त्रास पडला असेल याची आता आम्हांला जाणीव होते.घरात एखादा पदार्थ करण्यापेक्षा विकत आणावा असे वाट्ले की लगेच काकू डोळ्यासमोर येते, ती इतक्या साऱ्यांचं घरी करत होती मग आपल्यालाच चार माणसांचं करायला काय हरकत आहे ? असं जाणावतं. सासरच्या लोकांना आपलसं करुन त्यांचं करण्याचे संस्कार काकुकडून , आईकडून आम्हाला मिळाले.त्याचा आम्हांला झालेला फायदा शब्दात सांगता येणारा नाही.

काकुचं लहानपणही फार सुखात नाही गेलं,परीस्थिती बेताची हि त्या काळात बऱ्याच लोकांची असे, तिचे वडील फारसे मिळवत नव्हते,काकुने मॅट्रीक झाल्यावर नोकरी करुन पुढचे शिक्षण घेतले, आपल्या भावंडाना शिकवून आई-वडीलांना आधार दिला, माहेरच्या कामाच्या सवयीने सासरीही ती सगळे करत राहिली.सासरच्यांचे करताना तिला झालेला त्रास तिने निमुटपणे सोसला,किंबहुना तो त्रास नाहीच असे वाटून ती करत होती,आज काकुला अतिशय चांगले व्याही मिळाले आहेत. दिलदार जावई आणि गुणी सून मिळाली या मागे तिची आजवरची पुण्याईच आहे. पण काकुला मात्र विस्मरणाच्या विचित्र आजाराने घेरले आहे. भगवद्गीतेचे अठरा अध्याय तोंडपाठ असणारी, ताक करताना शिवमहिम्न स्तोत्र सुरेल आवाजात म्हणणारी, शाळेत मराठी, संस्कृत शिकवणारी काकू आमची नावे सांगू शकत नाही, समोर आलेल्या व्यक्तीला ओळखू शकत नाही,आमच्याशी संवाद साधू नाही शकत हे बघताना माझ्या पोटात तुटते.काका वारल्यानंतर भोरच्य़ा मोठ्या घरात ती एकटी राहू न शकल्याने ती पुण्यात मुलाकडे आलीय.आम्हाला सुरुवातीला तिच्या अबोलपणामागे काकाचे जाणे, भोरचे घर सोडून इथे रहावे लागणे याचा हा परीणाम असेल असे वाटत होते, पण वास्तव त्याहून भयानक आहे, काकू त्या सगळ्याच्या पलीकडे गेलीय.तिच्या नेहमीच्या हसतमुख चेहरा आणि बोलके, खेळकर डोळे यातली ओळख हरवलेली पाहून जीव गलबलतो. सगळ्य़ात दुःखाची बाब म्हणजे या आजाराला काही इलाज नाही, अगतिकपणे तिच्या आजाराकडे बघताना नाना विचारांनी मन भरुन येते.

आजवर काकुने केलेल्या अपार कष्टांचं तिला असं फळ का मिळाव? का ति्ला मनाविरुध्द कराव्या लागणाऱ्या अगणित गोष्टींविरुध्द तिच्या मनाने केलेले हे बंड असाव? पण वैद्यकीय परीभाषेत हा मानसिक आजार नाही, शिवाय मनाने ती खंबीर होती.अशा आजारांचे कार्यकारण भाव डॉक्टरही फारसे सांगू शकत नाहीत.नियती या एका गोष्टीवर मग येवुन ठेपावे लागते."देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार" करणाऱ्या वेड्य़ा विठ्ठ्लापुढे तरी तिच्याकरीता काय मागावे असा प्रश्ण पडतो.सुन्न पणे ती आणि कंपवाताने गलितगात्र झालेली माझी आई यांच्याकडे बघताना मन कातर होत जाते.


©


Wednesday, September 29, 2010

लेक मोठी होते

परवा परवा पर्यंत ती लहानच होती, परवाच का, आजही ती शेंडेफळ म्हणून लहानपणाचे सगळे फायदे घेत असते.अजूनही ती माझ्या कुशीतच झोपते.कुठलेही काम सांगितले तरी दिदीनेच ते कसे करायला पाहिजे असे पटवते.अजूनही वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या वाढदिवसाचे बेत आखायला घेते, म्हणजे कुणाकडून काय प्रेझेंट मागायचे इ. त्यामुळे ती दहावीत गेली हे अजून खरचं वाटत नाही.

तिच्यामध्ये दंगेखोर लहानपण आणि समजूतदार मोठेपण याचे एक अजब मिश्रण आहे, ती पावणेदोन वर्षांची असताना तिची आजी दवाखान्यात होती दोन आठवडे. घरी आणल्यावरही डॉक्टरांनी तिला विश्रांती आणि जनसंपर्क टाळायला सांगितले होते. घरातले वातावरण त्यामुळे काळजीमय असाय़चे. त्यातच हिचा वाढदिवस जवळ आला, हिची मोठी ताई तिला सांगत असे त्याबद्दल.पण एकदा तिच्या दादाचा फोन आला.फोन वाजल्या वाजल्या धावत जावून घेण्यात दोघी बहिणी पटाइत होत्या. त्याने तिला विचारले असावे वाढदिवसाबद्दल.त्याला अगदी मोठ्या माणसासारखे सांगू लागली,"अरे दादा,आजीला बरं नाहीये ना, म्हणून आम्ही कुणाला बोलावणार नाही, मग तिलाच त्रास होतो असं डॉक्तरनी सांगितलय आपण पुढल्यावर्षी करु या हं हॅपी बर्थ डे".तिचं बोलणं ऐकून आजीच्याच डोळ्यात पाणी आले.आपण होवुन वाढदिवस नको करायला असे तिने ठरवून टाकले आज्जीसाठी.सात-आठ महिन्यांची असल्यापासून उठल्या-उठल्या आजीच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करायची आणि मग दिवसभर आजीला दंगा करुन भंडावून सोडायची. आमच्या घराला आतून गच्चीत जाणारा जिना होता आणि त्याला रेलींग करायचे राहिले होते, हि बया चालायला नवव्या महिन्यातच लागली आणि त्याही आधीपासून भराभर पायऱ्या चढून वर जायची, अंगणातील भिंतीवर चढून चालायची.गेटच्या फटीतून डोकावून बघताना एकदा डोके अडकवून घेतले होते. आजी अंघोळीला गेली कि हिच्या कारभाराला उत यायचा.मी सकाळी नऊ-साडेनऊला बाहेर पडत असे.दिदी शाळेत गेलेली असे.नंतर तिचे आणि आज्जीचेच राज्य असे.एकदा स्वयंपाकघरात खुर्चीवर चढून टेबलावरील तुपाची भरलेली लोटी तोंडाला लावली,तुपाची अंघोळ झाल्यावर अंगावरचे तूप टेबल,खुर्चीला फासणे चालू असताना आजी अंघोळ करुन आली , त्यांचा बराच वेळ पुसापुशीत गेला.आजी फारच शांत होत्या, त्या कधीच तिला फारसे रागवत नसत. मी घरी आले, कि माझा मूड बघून कौतुकानेच तिच्या लिलांचे वर्णन करीत. आजींना दम्याचा त्रास होता,चालताना त्यांना धाप लागत असे, त्यामुळे त्या हिने कपडे मळवले, पाणी सांडले तर तिलाच दुसरा फ्रॉक आण, पुसायला फडके आण असे सांगत.तिचे स्वावलंबन त्यातुनच वाढत गेले.कुठेही काही आधी सांडायचे आणि नंतर तत्परतेने फडके आणून पुसायचे हे तिचे ठरुन गेलेले असे. कपडे देखील ती आपले आपण घालत असे, दुसऱ्याने मदत केलेली तिला अजिबात खपायची नाही. मग टि-शर्टाच्या बाहीतून डोके घालायचे ते अडकले की धडपडायचे श्वास कोंडू लागल्यावर रडायचे पण दुसऱ्याने मदत केली तर अजूनच थयथयाट करायचा,बराच वेळेच्या झटापटीनंतर एकदाचे कपडे घातले जायचे,ते घातल्यानंतर फारच थोड्या वेळात सांडमांड होवून बदलायची वेळ येत असे.दुपारी आजी झोपली कि दिदीच्या बांगड्या,माळा गळ्य़ात घाल,अल्बम मधले फोटॊ बघताबघता ते काढ असे उद्योग चालत. पेन पेन्सिल हातात यायचा अवकाश, तिला लिहायला कागद कधी पुरलेच नाहीत. एवढ्या मोठ्या भिंती कशासाठी असा प्रश्ण पडत असावा तिला. घरातल्या सगळ्य़ा भिंतींवर तिची कला बहराला आली होती.नुकत्याच रंग दिलेल्या भिंतींची वाट लागलेली बघून तिच्या बाबांच्या अंगाचा तिळापापड होई,"तुम्ही तिला पेन हातात देताच का?" असे म्हणून तो राग आमच्यावर निघे पण एकदा बाबा वाचत असताना त्यांच्या खिशातले पेन मिळवण्यासाठी तिने बालहट्ट आणि स्त्री-हट्टाचे असे काही प्रदर्शन केले, कि पेन देण्य़ाशिवाय त्यांना पर्याय नाही राहिला,आणि मग भिंतीवर आणखी नव्या कलाकृतींचा जन्म झाला.
घरातल्या वस्तू आणि माणसांवर तिचा जन्मसिध्द हक्क. टि.व्ही. लावणे बंद करणे हि कामे आजीला मदत म्हणून करताना तिला हवी तेंव्हा करण्य़ाचे स्वातंत्र्य तिने मिळवले. एकदा व्हि.सी.आर वर भाड्याने कॅसेट आणून लावताना तिने बघितले.नंतर थोड्या दिवसांनी व्हि.सी.आर बिघडला, दुरुस्तीला दुकानात नेला,दुकानदाराने तो उघडला तर आत त्याला टेपरेकॉर्डरच्या कॅसेटस सापडल्या, मुलीला नंतर काही बघावेसे वाटले असेल, व्हिडीयो कॅसेट घरात नसल्याने तिने असलेली कॅसेट त्यात घालून बघण्य़ाचा प्रयत्न केला, पण किती झालं तरी ते यंत्र, तिच्या इतक शहाणपण त्याच्याकडे कुठल? पुन्हा हे सगळे उद्योग ती कधी करी कुणाला पत्ता लागत नसे.

ती आडीच वर्षाची झाली आणि तिची आजी अचानक वारली.मग दुसऱ्या एक आजी तिला सांभाळायला येवू लागल्या,या आजीपण खूप प्रेमळ होत्या.पण हिच्या कारभाराबद्दल त्यांनी नाराजी दाखवली कि लगेच त्यांनाच,"माझी आई नाही ना घरात, मला रागावू नको ना" असे सुनवायची. त्यावेळी तिच्या दिदीची दिवसभर शाळा असे आणि या बाईसाहेब सकाळी तीन तास शाळेत जावून घरी दुपारी येत मग सगळी दुपार दिदीचे कपाट संपूर्ण रिकामे करण्य़ात जाई, दिदी शाळॆतून घरी आल्याबरोबर तो पसारा बघून संतापाने काळी निळी होई,हि शांतपणे आमच्या खोलीत झोपलेली असे.(अर्थात दमून).कधी शाईच्या बाटल्या डोक्यावर ओतून घेई,कधी डिंकाची बाटली फोनवर उपडी करी. दिदीने पाच वर्षे जपून वापरलेल्या एकूण एक खेळांची तिने धूळधाण उडवली प्रत्येक खेळणे उघडून बघितल्याशिवाय तिच्या जिवाला चैन पडत नसे.घरात फर्निचरचे काम चालले होते, अंगणातल्या कारशेडमध्ये सुतारकाम चाले, बाईसाहेबांचा मुक्काम शाळेतून आल्यावर तिथेच असे.भुस्सा,खिळे,चुका यातच फतकल मारुन त्या लोकांचे काम बघण्य़ात ती रममाण होवुन जाई. चिखल,माती सगळ्याबद्दल तिला विशेष माया. त्यामुळे मी घरी आले कि ती कुठल्या अवतारात दिसेल याची कल्पना करता येत नसे.

कोणीही बोलावले कि त्यांच्या घरी तिला लगेच जायचे असे, इतकेच नाही तर आमच्या कडे कोणी येवून गेले कि आपण त्यांच्याघरी कधी जायच? असं लगेच विचारायची.असं असूनसुध्दा शाळेत जायला तिने फारच त्रास दिला.हल्ली आडीच वर्षापासून शाळा सुरु होते, तिने पहिला आठवडा रडून गोंधळ घातलाच,घरी आली कि तिचा चेहरा लालबुंद असे आणि दुपारपर्यंत हुंदके ऐकू येत. सकाळी खुशीत उठे आणि अंघोळ करताना निरागसपणे विचारी,"आई, आज शाळा आहे?"
"हो,आहे ना" असं मी म्हणताच ती रडायला सुरुवात करी. रीक्षात बसवेपर्यंत ती रडत असे.माझ्या पोटात तुटत असे,पण तिला शाळेत नाही धाडले तर ठेवणार कुठे असा प्रश्ण असे, कारण तिला सांभाळणाऱ्या आजी अकरा नंतर येत. मन घट्ट करुन मी तिला पाठवी, मात्र तिचे रिक्षा काका सांगत,"अहो कोपऱ्यापर्यंत रडते, मग लागते बोलायला" ती स्वतः पण संध्याकाळी मूड असला तर म्हणे,"आई, मी रिक्षात बसले की सगळे म्हणतात भोंगा सुरु" शाळेत सुरुवातीचे काही दिवस हि डबा न खाता तसाच आणायची, खाण्य़ाची तिची तशी कधी तक्रार नसे, मग डबा का खात नाही? मी तिला रोज विचारी, मग एक दिवस मला जाणवले, तिला मी रिकामा बंद डबा उघडायला लावला तर तिला तो उघडताच येत नव्हता.मग लक्षात आले तिला डबा उघडता येत नसल्याने बिचारी न खाता येत होती.टिचर कडून उघडून घ्यावा असेही तिला सुचले नसावे. मग तिला मी तिला उघडता येइल असा डबा देवू लागले.
ज्युनियर केजी मध्ये ती तिच्या दिदीच्या शाळेत जायला लागली, मग मात्र तिने शाळेत जाण्य़ासाठी त्रास नाही दिला, दिदीची आणि तिच्या शाळेची वेळ वेगळी असली तरी दोघी एकमेकींना भेटत असत,दिदिच्या वर्गात जावून म्हणे "I am the didi's sister" त्यामुळे ती शाळेत खुशीत जायला लागली. माझ्या ऑफीसमध्ये माझ्या बॉस मॅडम होत्या.मी कधी कधी तिला "तू ऑफिसला नकॊ जाऊ" असे ती म्हणाली कि आमच्या मॅडम रागावतील असे सांगत असे.
एकदा म्हणाली "आई तुमच्या मॅडम तुला A for Apple कधी शिकवतात?"
"नाही गं, आमच्या मॅडम नाही शिकवत कधी"
"मग सगळा वेळ फक्त नाच आणि गाणीच म्हणता तुम्ही?"

तिचा मी अभ्यास कधी कसा घेतला मला काहीच आठवत नाही. ती दुसरीत होती त्यावेळी तिच्या वार्षिक परीक्षेच्या दोन-चार दिवस आधी तिच्या बाबांना नाशिकजवळ फार मोठा अपघात झाला, मला तिकडे जावे लागले, पंधरा दिवसांनी त्यांना घेवून मी पुण्य़ात आले,पुण्य़ातही एक आठ्वडा ते दवाखान्यात होते.मांडीचे हाड मोडल्याने महिनाभर घरी,पुढे त्यांचे वॉकर, कुबडी, काठी घेवून चालणे,डॊक्याला मार लागल्याने डोळ्याला आलेले तिरळॆपणा त्यासाठी विविध डॉक्टरांच्या भेटी.या सगळ्य़ा ताण-तणावात माझे तिच्याकडे फार दुर्लक्ष झाले, हि अपराधी भावना मला सतत टोचत असल्याने असेल कदाचित, मी तिला तिच्या दिदीइतकी शिस्त नाही लावू शकले. तिचे टि.व्ही.बघण्य़ाचे अमर्याद वेड यातूनच निर्माण झाले असावे.तिला देण्य़ासाठी माझ्याकडे वेळ नेहमीच कमी होता. आम्ही स्वतंत्र बंगल्याच्या सोसायटीत रहात असल्यामुळे तिच्या वयाची मुलेही कमी असत.आमच्याकडे केबल नव्हती पण दूरदर्शनवरील सगळे कार्यक्रम ती बघायची.सिनेमा , नाटक बघतानाही ती कमालीची एकरुप होवून बघत असे.ती तीन-साडेतीन वर्षांची असताना "जाणता राजा"चा प्रयोग बघायला आम्ही गेलो होतो.शिवाजी महाराजांच्या गोष्टी तिला माहित होत्याच.प्रयोग सुरु झाला,आणि त्या भव्य मंचावर जिवंत माणसे बघून ती इतकी थक्क झाली,
"आई हे सगळं खरं खरं इथे घडतयं? " असं म्हणत तीन तास खुर्चीवर उभी राहून तिने सगळा कार्यक्रम बघितला, पुढचा आठवडाभर त्याच आनंदात होती. बाळगंधर्व रंगमंदिरात तिला घेवुन ’लेकुरे उदंड झाली’ बघायला गेलो त्यावेळी ती असेल पाचएक वर्षांची.अगदी पहिल्या रांगेतून एकदाही इकडे तिकडे न बघता तिने नाटक बघितले. त्यातल्या गाण्यांवर, संवादावर इतकी मनमुराद हसत होती कि तिच्याकडेच बघावे वाटत होते. एका सुट्टीत मी दोघींना "श्यामची आई" वाचून दाखवत होते.शेवटच्या प्रकरणाच्या वेळी ’आई वाचू नको" म्हणून रडायला लागली.नंतर कितीतरी वेळ "आई , शामची आई देवाघरी गेली? तो किती एकटा पडला ना?" असे विचारत होती.

तिला शाळेतील सगळ्य़ा उपक्रमात भाग घ्यायची आवड आहे.कॉम्प्युटर तर ती सराईतासारखा वापरते. त्यावर ती फारसे गेम नाही खेळत,पण मेल अकाऊंट उघडण्यापासून मेल लिहिणे, बघणॆ सगळे ती कधी शिकली पत्ता लागला नाही. फाल्गुनी पाठकचे एक गाणे ऐकून त्याचा अर्थ लावून तिने पेंट-ब्रश मध्ये एक चित्र काढले होते. तिला हवी ती माहिती नेटवरुन शोधून त्याची फाईल सेव्ह करुन त्याचे प्रिंट आणणे हे सगळॆ ती बिनबोभाट करते. हवी ती गाणी डाऊनलोड करुन घेते.ओरीगामी,स्ट्रींग गेम्स याची पुस्तके वाचून ती सगळे बनवू शकते, कुठलेही डोक्याने खेळायचे खेळ ती मनापासून खेळते पूर्वी सुट्टी सुरु झाली कि मी दुकानातून अशी कोड्यांची पुस्तके, खेळ आणीत असे,घरी येता येताच गाडीत ते सोडवून होत, अगदी चित्र रंगविणे,ग्लास पेंटींग,भरतकाम सगळे आणले तरी चारदिवस सतत तेच करुन पुन्हा उरलेल्या सुट्टीत काय करू? हा प्रश्ण असेच.पेपरातले सुडोकू असो कि शब्दकोडे ती चटकन सोडवून टाकते.माझा मोबाईल मी घरी गेले कि तिच्याच ताब्यात असतो.तो वापरायला मी तिच्याकडूनच शिकले, सुरुवातीच्या काळात तिने त्यात काही बदल केले(डिक्शनरी ऑन-ऑफ सारखे) कि मी तिलाच विचारी,ती घरुन माझ्या ऑफिसच्या फोनवर फोनकरुन ती मला सेटींग शिकवत असे.
शाळेच्या ग्रुप प्रोजेक्ट मध्ये ते ठरविण्यापासून ,ग्रुपमधल्या लोकांना कामे वाटून देणे, सगळ्य़ांनी एकत्र भेटण्याची वेळ,स्थळ ठरवणे सगळॆ ती स्वतः करते.परीक्षा संपण्य़ापूर्वीच शेवटच्या दिवशी काय मजा करायची याचे बेत तिचे तयार असतात. फार लहान असल्यापासून सगळ्य़ा गोष्टी ती आपल्या आपण करत आल्याने परवानगी विचारणे वगैरे गोष्टी तिच्या गावी नसतात.
"येत्या रविवारी मी मैत्रींणींबरोबर सिनेमाला चाललीय" असे ती जाहिर करते,
"कुठल्या, आणि कुठे?"
"सिटी-प्राईड्ला रंग दे बसंतीला जातीय"
"पण तेथे जाणार कशी?"
"बाबा सोडतील ना?"
"त्यांना विचारलेस का?"
"नाही अजून , पण सुट्टीच आहे ना त्यांना, मग सोडतील की, नाहीतर जाईन मी रिक्षाने."
सगळ्य़ा प्रश्णांची तिची उत्तरे तयार असतात.

शालेय अभ्यासात ती फार पुढे नसते, तिला समज चांगली आहे, पण एका जागी शांत बसून अभ्यास करणॆ तिला फारसे जमत नाही.आणि विषय समजला कि तिला ते पुरेसे असते, लिखाणाचा तिला कंटाळा आहे, सहाजिकच आपल्या शिक्षणपध्दतीचा विचार करता ती मार्क मिळवू शकत नाही.पण तिचे मला जाणवलेले मोठ्ठे वैशिष्ठ्य म्हणाजे मैत्रीणीला चांगले मार्क्स मिळाल्याचा तिला खूप आनंद होतो.पहिल्या नंबरला कित्ती मार्क मिळाले हे ती अगदी कौतुकाने सांगते.आपल्याला तसे मिळावेत असे तिला वाटले तरी दुसऱ्याबद्दल तिला असूया ,स्पर्धा वाटत नाही.
"तुला एवढेच का मिळाले?" असे विचारले कि
"आई , मागच्या वेळेपेक्षा यावेळी ४ मार्कस जास्ती आहेत ना? मिळतील ना फायनलच्या वेळी अजून" असे सांगून मलाच गप्प करते.
दहावीला भरपूर मार्क मिळाले तरच चांगल्या कॉलेजमधे प्रवेश मिळतो, मार्क्स हे आणि हेच आपल्याकडचे हुशारी मोजण्य़ाचे एकमेव मोजमाप असल्याने कधीकधी मला तिची अपार काळजी वाटे मग तिच माझ्या गळ्यात पडून म्हणे," डॊंट वरी ममा, माझ्या वेळेपर्यंत बोर्ड एक्झाम कॅन्सल होईल" तिच्या या कमालीच्या आशावादी दृष्टीकोनामुळेच सातवीपर्यंतची परीक्षा रद्द झाली आणि बोर्डाने पण मेरीट लिस्ट लावणे रद्द केले असावे.

परवा बोलता बोलता तिने तिच्या एका मैत्रीणीने दुसऱ्या मैत्रिणीला वाढदिवसानिमित्त कविता केलेली वाचून दाखवली, मी तिचे कौतुक करुन म्हणाले,"छान केलीय तुझ्या मैत्रीणीने कविता, तुला जमेल का?"
"आई , मी पण करु शकते"
" केली नाहिस कधी, आणि मला नाही दाखवलीस कधी? "
"तुला दाखवली नसली तरी मी करु शकते"
"मग कर बर माझ्यावर कविता" असे म्हणून मी कामाला लागले, पंधराव्या मिनिटाला ती कागद घेवून आली.
You are the great mom, ever known
without you, we have never grown

you taught me to be nice
and tell the truth at any price

अशी बरीच मोठी कविता तिने सहज लिहिली, वाचता वाचता डोळे पाणावले. माझी हि चिमणी एवढी मोठी कधी झाली? मी तिची उगीचच काळजी करते, हि मुलगी फार वेगळी आहे, मनात आणेल ते ती करु शकते. तिचे शहाणपण मोजायची पट्टी माझ्याजवळ नाही म्हणून मी तिला आजवर प्रत्येक रिझल्ट नंतर रागवत आले.माझ्या नकळत ती खूप मोठी झाली. मी शिकवलेल्या थोड्याफार गोष्टींचे श्रेय मला देण्याचे मोठेपण मात्र ती येतानाच घेवून आली आहे, तिचे सगळे आयुष्य आनंदयात्रा ठरो हाच माझा तिला आशीर्वाद.


©

Wednesday, August 25, 2010

गावाकडच्या गोष्टी...

परवा शेवटच्या मिटींगची फेरी झाली.मामलेदार कचेरीतून सह्या करुन मंडळी परतली.सगळ्यात तरूण मुलगा हातातल्या कॅमेऱ्याने घराच्या कान्या-कोपऱ्याचे फोटॊ काढीत होता.त्याचे सगळे बालपण इथे माझ्या अंगाखांद्यावर गेले.त्याचेच काय सह्या करुन आलेल्या सगळ्यांचेच. या दोघी बहीणी,त्या मुलाच्या आत्या,रडताहेत.खोल्यांमधून फिरुन आठवणींचे तुकडे गोळा करण चालू आहे.घरातली भांडी-कुंडी केंव्हाच गेली.आता राहिल्यात फक्त भिंती.

या बायकांचा मोठा चुलत भाऊ, त्याचीच ही कर्तबगारी, त्याच्या भावंडांपैकी आता तो एकटाच उरलाय, शेवटचा मालुसरा.वाडवडीलांनी मिळवलेल्या ,जतन केलेल्या वास्तु,शेती यांची देखभाल, वाढ करणं तर नाहीच जमलं त्याला पण आयुष्याच्या संध्याकाळी सगळ मोडून आपण फार मोठी लढाई जिंकल्याचा आविर्भावात गप्पा मारतोयं. त्याला एकट्याला तरी काय दोष द्यायचा म्हणा,या घरात त्याचे सख्खे,चुलत असे किती भाऊ होते.कुणी काय केलं घरासाठी,घरातल्या लोकांसाठी? बुध्दीमत्ता ही दैवजात असते,पण कष्ट, प्रयत्न तर माणसाच्या हातात असतात ना? झडझडून कष्ट करणारे फार थोडे निघाले, जे होते त्यांच्या अंगात हिम्मत नव्हती,काही करुन दाखवायची ईर्षा नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे घरावर माया नव्हती !. याचा परीणाम म्हणून आजचा हा दिवस !. करारपत्र झालेलचं आहे.पुढल्या आठवड्यात बिल्डरची माणसं येतील, ही जुनी पुराणी वास्तु जमीनदोस्त होईल.इथे, नव्या पध्द्तीची इमारत किंवा इमारती उभ्या राहतील.त्यात लोकांचे चिमुकले संसार फुलतील. कुणालाच या वास्तुच्या इतिहासाची माहिती नसेल.काय करायचीय ती असून? भूकंपात शहरेच्या शहरे नष्ट होतात, महापूरात मोठ्मोठे वाडे जमीनदोस्त होतात, वादळ,आग अशा आपत्तींमध्ये अनेकांचे संसार मातीमोल होतात, मग माझ्यासारख्या क्षुल्लक वाड्याने या गोष्टीचे एवढे भांडवल करायचे काय कारण?बदल हे होतच राहणार.बदल ही एकमेव गोष्ट्च शाश्वत आहे हे माहित असताना या शंभरी उलटून गेलेल्या जीर्ण,जुन्या देहाचा इतका लोभ कशासाठी? छे,छे! लोभ नाही या देहाचा पण अजून माया वाटते या मुलांबद्दल,अस्ं वाटतं यांच्या पुढच्या पिढ्यांना समजावं जुनी माणसं कशी रहायची, त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या कथा सांगाव्यात.त्यातुन चांगल्या गोष्टी त्यांनी शिकाव्या.परदेशातल्या सगळ्या गोष्टींच आपल्याला आकर्षण असतं ना! मग तिकडे जुन्या वास्तु,वस्तु कशा जतन करण्य़ाची पध्दत आहे, मग का बरं या मुलांना हि वास्तु सांभाळविशी नाही वाटली? आर्थिक अडचण असती तर इलाज नव्हता, पण किती हालाखी सोसून यांच्या आधीच्या पिढ्य़ांनी मला जपलं आणि या पैसेवाल्यांनी सहजपणे हा व्यवहार करुन टाकला याचं मनस्वी दुःख होतयं, वास्तविक यातला प्रत्येकजण एकेकटा मला सांभाळू शकत होता पण् इच्छा नव्हती हेच खरं. बरं मिळालेले पैसेही खूप आहेत असं नाही, वाटेकरी बरेच असल्याने प्रत्येकाला मिळालेली रक्कम त्यांच्या मिळकतीच्या मानाने नगण्य़च आहे, मात्र ती दान करायची सुध्दा त्यांची तयारी नाही. एवढी आत्मकेंद्री वृत्ती, इतकी स्वार्थबुध्दी ही आजच्या पिढीचेच लक्षण आहे की माझ्या वास्तुत झालेले संस्कार कमी पडले काही कळत नाही. हे सगळं पाहवत नाही म्हणून मग मन सारखं भूतकाळात रमतं या वाड्याची कथा एकदा सांगितली कि माझ्या आत्म्याला शांती लाभेल.देह जाणरच आहे आज ना उद्या त्याची आता फिकीर नाही. इथे घडलेल्या काही घटना गावाकडच्या गोष्टीमंधून समजल्याच आहेत, काही सांगण्याजोग्या गोष्टी ऎकवाव्याशा वाटत आहेत.एकदा मन मोकळं करुन टाकतो. वयाप्रमाणे आता स्मरणशक्ती क्षीण जालीय, एखादी गोष्ट पुन्हा,पुन्हा सांगितली जाईल नाहीतर सांगताना घटना पुढे मागे होतील,सांभाळून घ्या मला.

भोर संस्थानचे राजे पंतसचिव यांनी राज्यकारभार हाती घेतला त्यावेळी भोरमध्ये वस्ती अशी नव्हतीच.फडणीस यांच्याकडे भलीमोठी जागा होती.राजवाड्या पाठीमागे मोकळे माळरानच होते. फडणीसांचा एकमेव वाडा होता.रात्रीच्या किर्र अंधारात त्या वाड्यापर्यंत जायलाही भिती वाटे. फडणीस वाड्याच्या पाठीमागून निरामाई वहायची.एरवी प्रेमळ वाटणारी हि माय पावसाळ्यात रौद्र्रुप घ्यायची.पाण्याचा आवाजसुध्दा काळाजात धडकी भरवाय़चा. विजेचे नवे नसल्याने तिन्हीसंजा झाल्यावर घटकाभरात अंधाराचे साम्राज्य पसरायचे.भुतेखेते,सापकिरडू यांची भिती वाटायची.
फडणीसांनी त्यांच्या जवळच्या काही नातलग म्हणा,स्नेही म्हणा यांना बोलावले आपल्या मोठ्या जागेतला काही हिस्सा देवु केला आणि सांगितले तुम्ही इकडे रहायला या, घरे बांधा. इथल्या उजाड वास्तुवर वस्ती होवुदे, दिवे पेटुदे, आणि चार जणांचे संसार सुखाचे होवुदे. या मागे सोबत एवढा एकच हेतू होता.या जागेत गणेशपेठ वसली.आमराई आळी बनली.एका कपर्दिकेची अपेक्षा न ठेवता फडणीसांनी त्यांच्या जागेवर दहा बारा जणांना वस्तीला बोलावले.

आजवर सांगितलेल्या गावाकडच्या गोष्टींमध्ये असलेले मामलेदारसाहेबांचे घर हे या दहा-बरा घरांपैकीच.मामलेदारसाहेब त्यांच्या मावशीचे दत्तक पुत्र होते.त्यांनी स्वतःच्या हुशारी आणि कर्तबगारीवर शिक्षण मिळवले.तसेच लहानवयात मामलेदार पदाला गेले. फडणीसांकडून मिळालेल्या जागेवर वाडा बांधला त्यांनीच. वैभवशाली दिसेल असे त्याचे रुप होते. ऐसपैस ओसरी, तिच्यावर असणारा शिसवी झोपाळा, माजघर,स्वयपांकघर, सरपणाची खोली,कोठीची खोली,देवघर मागे मोठे परसु,त्यामध्ये गोठा, गोठ्यात गाई-वासरे. माडीवर खोल्या.शंभर माणसांसाठी लागणारे सामान म्हणजे पाट,ताटे,वाट्या,द्रोण,फुलपात्री तर होतीच पण मणभर म्हणजे चाळीसशेर दूध बसेल अशी पातेली, कढया सगळं होतं, उखळ मुसळापासून जात्यापर्यंत सार काही होतं.
परसात अबोली,शेवंती अशी फुलझाडे होती.केळीची कर्दळीची झाडं होती. भलीथोरली विहीर होती.तिच्या काठावर पपनसाचं झाड होतं, भरपूर हिरव्या पपनसांनी ते लगडून पार वाकून जायचं. आळूची खाचरं होती,तोडंलीचे,दुधीभोपळ्याचे वेल होते.धशीवर आंब्याची झाडे होती.बांबूचं बन होतं.पाडव्याला गुढीला तिथलाच कळक वापरीत.

मामलेदारसाहेबांचा दबदबा आणि दरारा होता.त्यांचं व्यक्तिमत्त्व होत तसं.सहाफूटाहून थोडी जास्तच ऊंची, गोरापान वर्ण,भेदक डोळे आणि धारदार नाक. लक्ष्मीकाकू त्यांच्यापुढे सावळ्याच.पण त्य़ाही उंच आणि शेलाट्या बांध्याच्या.जोडा शोभाय़चा सुरेख. काकू शिकल्या नसल्या तरी हुशार होत्या.पाच मुलगे चार मुली असा त्यांचा मोठा प्रपंच होता. पण घरात फक्त आपलीच मुले आणि नवरा-बायको अस कुठेच दिसायचं नाही, सख्खे-चुलत सगळे एकत्र् राहायचे, म्हातारी माणसं , मुलं, निराधार म्हातारी,शिकायला आलेली मुलं, वारावर जेवणारे विद्यार्थी असा मोठा कुटुंब कबीला असायचा.रोज पंक्तीला पन्नास माणूस असायचच. एवढा मोठा कारभार, म्हणजे भांड्याला भांड लागणारच, भांडण,रुसवेफुगवे,धुसफूस होणार,पण ते मर्यादेत रहाण्यासाठी मोठ्य़ा माणसाचा धाक असावा लागायचा.त्याच्या तंत्राने सगळ्य़ा गोष्टी झाल्या तर घरात शांती रहायची.म्हणूनच काकूंनी घराला आपल्या धाकात ठेवले होते, मामलेदार साहेबांच राज्य घराबाहेर पण घरात सत्ता काकुंचीच.पहिल्यापासून सुब्बत्तेत राहिल्याने त्यांना मोठेपणा घ्यायची सवय होती आणि पुढे त्या मोठेपणाचीही माणसाला झिंग येते.तसेच आपली सत्ता चालवायची सवय झाली कि आपण म्हणू ती पूर्व दिशा. यामुळे त्यांनी सुनांना फार धाकात ठेवले.

आबा हा त्यांचा मोठा मुलगा. त्याची बायको बाळंतपणाला माहेरी गेली तिला मुलगी झाली ती लगेचच वारली.मामलेदारंची पहिली वहिली नात तिच्या आजोळीच वाढली.इ्तक्या लहान लेकराला तिच्या मामीनेच सांभाळले पुढे तिला त्या घराचाच लळा लागला, ती भोरला आलीच नाही.आबांचे दुसरे लग्न झाले.दुसरेपणावर मिळालेली साळु दिसायला सुंदर होती, तिला भाऊ नव्हता वडील देखील नव्हते,त्यामुळेच तर तिला बिजवराला दिली. मुळच्या मऊ स्वभावाच्या साळूला,काकूंच्या धाकाने पारच गरीब करुन टाकले.माहेरचा फारसा आधार नव्हता, त्यामुळे निमुटपणे काम करण्यातच तिची सारी हयात गेली. त्यात तिच्या पोटी पुत्र संतान आले नाही, म्हणून तिला सतत बोलणी खावी लागली. तिच्या मोठ्या अनुचे लग्न झाले. नंतर दुसरी मुलगी सहा महिन्यांची झाली नाही तोच आबांचे दोन दिवसाच्या तापाचे निमित्त होऊन निधन झाले.इन्फ्लुएंझाची ती पहिली मोठी साथ.’इन्फंटाचा ताप’ असं त्याला खेडोपाडी म्हणत.मामलेदारसाहेब गेले आणि वर्षाच्या आत हे संकंट कोसळले.ऐन तरुण वयातला तो कर्ता पुरुष गेला.मोठी सून म्हणून साळूला बाई असे संबोधित. काकू सोवळ्या झाल्याच होत्या. त्यांनी तरूण साळूच्या मनाचा,वयाचा कश्शाचा विचार केला नाही.सोवळ्या-ओवळ्य़ाच्या नसत्या कल्पनांनी,त्यांनी साळूचे केशवपन करायलाच लावले, त्यांच्या उरलेल्या चारमुलांपैकी कुणाचीही आईला विरोध कराय़ची हिम्मत झाली नाही. तिशीच्या आत बाहेर असलेल्या त्या देखण्य़ा मुलीचा नरळाएवढा अंबाडा येईल असा केशसंभार नाभिकाने उतरवला तिला जावेने बोडक्या डोक्यावरुन पाणी घालून बाहेर आणली आणि लाल अलवण नेसता नेसताच ती उभी कोसळली.त्या दिवसापासून बाईंना फीट्स येवु लागल्या.तिच्या वेदनेने माझाही जीव पिळावटला.तिच्या धाकट्या जावाही खूप रडल्या. काकूंना मात्र आंबाबाई आता शांत झाली, म्हणून बरे वाट्ले. या घराने बायकांचे फार फार हाल केले.

जुन्या पध्द्तीनुसार सासुरवास सोसत इथल्या सुना नांदल्या.ज्या नाजूक होत्या, मनानं किंवा शरीरानं त्या तरुणवयात गेल्या, एकापरीनं सुटल्या.उरलेल्या सोसत राहिल्या.
त्या कुठल्याशा कवीश्रेष्ठानं म्हटल्याप्रमाणे या सुनांची गत होती

कर कर करा मरमर मरा
कर कर करा मरमर मरा
दळ दळ दळा, मळ मळ मळा
तळ तळ तळा , तळा आणि जळा
कुढ कुढ कुढा चिड चिड चिडा
झिज झिज झिजा, शिजवा आणि शिजा
कष्टाने काही माणूस झिजत नाही आणि स्वतःच्या प्रपंच्यासाठी केले तर ते काय कष्ट आहेत का? खर आहे, पण या सासुरवाशणींनी भोगला तो निव्वळ सासुरवास. त्या कामाचं चिज नाही झाल, त्याच कौतुक तर सोडाच पण वेळेवर पोटभर खायला देखील मिळले नाही त्यांना.

बघायला गेलं तर काय कमी होतं, माझं वैभवशाली रुप होतच, दुध-दुभतं होतचं, थोडी-थोडकी नाही चांगली शंभर एकर शेती होती.समृध्दीच्या त्या काळातल्या कल्पनांचा विचार केला तर ती होतीच की भरभरुन. पण माणसंही किती घरात, आला गेला,पै-पाहुणा.आणि घरकामाला बाई-गडी ठेवायची पध्द्त नव्हतीच, मग बायकांचा जन्म कष्टात न जाईल तर नवल.त्यातही मुलांचे लाड, मुलींना दुय्यम वागणूक.त्यांना शिकायला मिळायला सुध्दा किती त्रास आणि यातायात. फायनल पर्यंत शिकल्या कि चढायच्या बोहल्यावर.भाऊंच्या दोन,बापूच्या सगळ्या मुली मॅट्रिक पर्यंत शिकल्या.बाकीच्यांना नाहीच मिळालं शिकायला, मुले मात्र चारचारदा मॅट्रिक नापास झाली तरी परीक्षा देत राहिली.

घरात सण वार होत. गौरी-गणपती,देवीचं नवरात्र तर किती साक्षोपानं होई, नऊ दिवस नैवेद्य, सवाष्ण, ब्राह्मण.सप्तशतीचा पाठ. सख्खे-सावत्र,चुलत,आते-मामे अशी भावंडे एकत्र राहिल्याने त्यांच्यात माया होती.कुसुमताईचे पुण्य़ातले घर सगळ्य़ा भावंडाना आपले वाटे, तिनेसुध्दा स्वतःला सख्खे कोणी नसून या भावंडांवर अपार माया केली.तिची मुले सुट्टीत आजोळी येवुन राहात. कुसुमताईचे यजमान आण्णा, त्यांचा आम्हाला जावई म्हणून काय अभिमान. माणूस होताच तसा. पुण्य़ापासून भोरपर्यंत पळत यायचा, सायकलवरुन बंदुक खांद्याला लावून कोकणात जायचा.कुणाच्याही अडचणीला धावुन जायचा.,डॊक्याला लाल फेटा बांधून चांदीची पदक लावलेलं जाकीट आणि धोतर नेसून पोवाडे गायला अण्णा उभे राहिले कि काय त्यांचं रुप दिसायचं ,आवाज सुध्दा कसा पल्लेदार.पोवाड्याचा कार्यक्र्म झाला की रमाकाकी त्यांची मीठ-मोहऱ्यांनी दृष्ट काढीत असे.बांळतपणाला आलेल्या माहेरवाशणींच सगळ्याजणी कौतुक करीत.सुट्ट्या सुरु झाल्या कि घर माहेरवाशणींनी भरुन जाई. तळ्य़ाच्या आत्याबाई, मिरजेच्या आत्याबाई मुलाबाळांना घेवुन येत. पुढे त्यांच्य़ा मुलीही येत, घरातल्या सासरी गेलेल्या मुली येत माहेरपणाला, बाळंतपणाला. दर उन्हाळ्यात कुणाची तरी मुंज, एखादे लग्न व्हायचेच. मागच्या आंगणात मांडव घालायचा. लग्न-कार्य घरातच व्हायची.एवढ्या मुलींची लग्नं झाली.दरवेळी कर्ज काढून लग्न करावी लागत पुढे पुढे. कमावणारे थोडे,खाणारे फार, मग काय होणार? शेती होती , पण ती जिरायत.तिच्यात कष्ट करणार कोण? बर पाऊस आला तर ठिक नाहीतर हालच. नंतरच्या पिढीतल्या मुलांनी मॅट्रीक व्हायचा अवकाश, पुणे नाहीतर मुंबई गाठली.मिळेल ती नोकरी करुन पैसे मिळवायला लागली. त्याकाळात सुध्दा नुसत्या मॅट्रीकला तशी फारशी किंमत नव्हती, त्यामुळे मिळणाऱ्या पगारात जेमतेम त्यांचेच भागे.इकडे शेती बघायला कोणीच तयार होइना.

भाऊंच्या दुसऱ्या पत्नी मनोरुग्ण होत्या. त्याकाळी हा शब्दसुध्दा माहित नसेल."उन्मत्त वात" किंवा "वेड" या नावानेच त्याची संभावना होई.आजारावर उपाय करणे माहितच नव्हते,काळानुरुप त्यांचा आजार बळावत गेला आणि त्याचा त्रास सगळ्य़ांना व्हायला लागला.भाऊंनी नोकरी सोडली, ते भोरला येवुन राहिले. मुले लहान धाकटी, मुली बिचाऱ्या घरकाम करुन शिकत होत्या, मुलाला नोकरी लागली होती, घरातल्या वातावरणाने तो सतत बाहेर राही.त्यातूनच तो वाईट मुलांच्या संगतीला लागला, नाना व्यसनांच्या आहारी गेला आणि शेवटी कचेरीतल्या पैशाचा अपहार करण्यापर्यंत त्याची मजल गेली.

आजवर घरावर अशी वेळ कधी आली नव्हती, मामलेदारसाहेबांची सगळी मुले हुशार,कर्तबगार नव्हती.पण चारित्र्य आणि प्रामाणिकपणा याबद्दल त्यांच्याबद्द्ल कोणी अगदी शत्रूदेखील वावगे बोलू शकला नसता.भाऊंना या गोष्टीचा अतोनात मनःस्ताप झाला.त्याने अपहार केलेली रक्कम भरायला त्यांच्याजवळ पैसा नव्हता.घरात कोणाजवळच इतकी रोख रक्कम नव्हती.अखेरशेवटी शेतीच्या,घराच्या वाटण्या केल्या.भाऊंनी त्यांच्या वाटणीची शेती-घर विकून रक्कम भरुन टाकली.मुलगा परागंदा झाला होता, पण बेअब्रुचा डाग पुसण्य़ासाठी त्यांना हि किंमत मोजावी लागली. भाऊंनी जवळच भिड्यांच्या वाड्य़त बिऱ्हाड केले. घरातल्या सगळ्य़ांनाच या गोष्टीचे फार वाईट वाटाले, पण कुणाचाच इलाज नव्हता. आता घराला उतरती कळाच लागली होती.स्वातंत्र्य मिळाले भारताला, मात्र भोर संस्थान विलीन झाले, संस्थानात नोकरी आसणाऱ्या सगळ्य़ा लोकांना सरकारी नोकरीत समाविष्ट केले नाही, त्यामुळॆ अण्णा, बापू यांना निवृत्त व्हावे लागले. अण्णांची मुले नोकरीला लागली होती, बापूंची मात्र सगळीच शिकत होती.शेताचेही तुकडे झालेले.त्यात घालायला पैसा नव्हता, राबायला बळ नव्हते. बायका कोंड्याचा मांडा करुन दिवस साजरे करत होत्या. एकूण वैभवाला पार उतरती कळा लागली.

एक-एक करत जुनी मंडळी इहलोक सोडून गेली.समृध्दीत बालपण-तारुण्य घालवलेल्यांना म्हातारपणी दारिद्र्य बघावे लागले. पैशाच्या अभावाने भांडणे, कडकडी- वादविवाद याने घराची शांती भंगली. या वातावरणाला कंटाळून बाई , घरातली मोठी सून त्यांच्या लेकीकडे कुसुमताईकडे गेली, तिथून त्यांना परत आपल्या वास्तूत यायचे होते, पण कुणीच त्यांना घरी आणले नाही, आयुष्यभर या घरात केवळ कष्ट करुन त्या माऊलीने जावयाच्या दारात प्राण सोडला. अण्णा, भाऊ,बाबा त्यांच्या बायका सगळे गेले.

बापुरावांची मुले हुशार होती पण ’दात आहेत तर चणे नाहित, चणे आहेत तर दात नाही’ अशी आता गत झालेली होती, मुलांना शिकवायला जवळ पैसा नव्हता.मुलींची लग्ने करुन दिली, त्या परिस्थितीत मिळालेल्या घरात त्या संसार करु लागल्या. बापुरावांच्या दुसऱ्या मुलाला भाट्घरच्या रंगाच्या कारखान्यात नोकरी मिळाली.नोकरी सांभाळून तो शेती बघू लागला.आता पुन्हा घराला जरा बरे दिवस येवू लागले.सुट्टीत माहेरवाशणी येवू लागल्या.आंब्याच्या आढ्या पडू लागल्या. गोठ्यातल्या गाई-म्हशींमुळे दुध-दुभते पुरेसे होते.शेतातले धान्य घराला पुरत होते. त्याची मुलेही शाळॆत पहिले नंबर मिळावत होती.पण तेथेही दैवाने घात केला, या मुलाला ऐन चाळीशीत ब्लडकॅन्सर सारख्या आजाराने गाठले.मुंबईत जावुन तो टाटा हॉस्पिटल मध्ये इलाज करुन घेवू लागला, मुंबई-पुणे दोन्ही ठिकाणी त्याच्या बहिणी होत्या, त्याच्या सगळ्य़ाच बहिणांनी मदत केली पण आजारच असा गंभीर होता की,पाच वर्षे त्याच्याशी झुंजून अखेर त्याला हार मानावी लागली. म्हातारपणात बापुराव आणि काकींना पुत्रशोक सहन करावा लागला. त्याची मुले अजून फारच लहान होती, सुदैवाने ती फारच हुशार होती, पुण्यात आत्याकडे राहून दोघेही उच्च शिक्षण घेवु शकली.मोठा परदेशी गेला, धाकटाही चांगल्या पदावर गेला. मुलांचे नीट होईपर्यंत आजी -आजोबांनी जीव धरुन ठेवले, थोरल्याचे लग्न ठरलेले बघून ते दोन्ही म्हातारे जीव महिन्याच्या आत पाठोपाठ देवाघरी गेले.

घरात आता कोणीच राहिले नाही.बापूरावांची विधवा सून आणि घराच्या दुसऱ्या भागात अण्णांचा धकटा मुलगा व सून ! घराचे वैभव म्हणजे त्यात राह्णारी माणसे, एवढ्या मोठ्या घरात आता कोणी नाही.बापुंची सून मुलांकडे , मग घराला सतत कुलूप.ज्या वास्तुने कुलूप कधी बघितले नाही तिला आता सतत त्याचेच दर्शन. घराची डागडुजी,मरम्म्त करायला आता पैसा आहे पण वेळ कुणालाच नाही.जो-तो आपल्या व्यापात. आता सुट्टी लागली कि मुले बायकांना घेवुन हिलस्टेशनला जातात, जुन्या घराकडे यावे असे त्यांना चुकूनही वाट्त नाही.त्यांच्या मुलांनी मला बघितलेच नाही तर माझा लळा कुठून लागणार?

इथे एकेकाळी पन्नास-पन्नास माणसे एकत्र राहिली.वामन सारख्या अनाथाला आश्रय मिळाला.वाईहून रामनवमीसाठी येणाऱ्या भिक्षुकांना इथे नऊ दिवस रात्रीचा आसरा मिळे. गोरगरीबांना ताक मिळे,वारावर विद्यार्थी जेवत. लग्नानंतर वर्षाच्या आत शामदादा वारला तर तेंव्हा त्याच्या बायकोला सालंकृत माहेरी पाठवताना तिचे दुसरे लग्न लावून देत असाल तरच पाठवतो असं म्हणणारे अण्णा इथलेच. गंगू् मरताना तुझ्या मुलाला आइची माया देईन असा शब्द दिल्याने आपले पुत्रवियोगाचे दुःख गिळून गंगूच्या मुलाच्या लग्नापर्यंत उमेद धरुन , त्याच्या लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसात प्राण सोडणारी रमाकाकी इथलीच.आपला मुलगा मॅट्रीकला नापास झाला तरी त्यांच्या बरोबर मॅट्रीक पास आपल्या चुलत-भावंडांचे मनापासून कौतुक करणारी माहेरवाशीण माई या घरातलीच. मॅट्रीक पास झालेल्या मुलीला घरातली पहिली मॅट्रीक पास म्ह्णून तिचे कौतुक करायला भाटघरहून चालत येवून तिचे अभिनंदन आणि आशीर्वाद देणारी तिची चुलती या घरातलीच. आपला-परका असा भेद न करता सगळ्य़ांवर माया करणारी माणसं होती. दुसऱ्याला सहज मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. दुसऱ्याची मुलगी इथे सून म्हणून आणताना किंवा आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात देताना रुप-पैसा यापेक्षा माणसं , त्यांचे माणूसपण बघण्याकडे कल असायचा. घरासाठी आपल्या माणसांसाठी झिजायची सहज प्रवृत्ती होती.म्हणूनच या घरातल्या सगळ्या माहेरवाशणींनी माहेरच्या अडी-अडचणींना नेहमीच मदत केली. इथले भाऊ सुध्दा बहिणींच्या पाठीशी वेळेला उभे राहिले.

आता सगळेच संपले आहे. उद्या या गावात या घरातील कोणी फिरकणारही नाहीत कदाचित, पुढच्या पिढ्यांना हे गाव, हा वाडा काहीच माहित असणार नाही. देशाचे इतिहास वाचायचे कष्ट कोणी घेत नाहीत, तर आमच्या सारख्या क्षुल्लक वाड्याची काय कथा! काळाच्या ओघात सगळे पुसलेच जाणार,पण कुणाला तरी इच्छा झाली तर माहिती असावी म्हणून सांगण्याचा हा अट्टहास. यातून घेता आले आले तर लोकांचे मोठे मन नव्या मुलांनी घ्यावे, त्यांच्या हातून झालेल्या चुका टाळाव्या आणि आपल्या घरातील लोकांना धरुन राहावे एवढीच माझी म्हाताऱ्याची इच्छा ! माझं थेरडं तोंड आता यापुढे दिसणारच नाहीय कुणाला, त्याच्यात नांदलेल्या लोकांची थोडकी ओळख ऐकल्याबद्दल आभारी आहे तुमचा ......


©

Friday, July 23, 2010

गावाकडच्या गोष्टी..

(माझ्या आईचे माहेरचे कुटुंब मोठे , तशी जुन्या काळातील सगळीच कुटुंबे मोठीच असत, एकत्र राहत असल्याने त्यांच्यात संबंध असत, भांडणे, भाऊबंधक्याही असत.तसेच माया, प्रेमही असे. माझ्या आईकडून तिच्या घराण्यातील सगळ्या काका-आत्यांच्या, मामा मावशांच्या कथा मी वारंवार ऎकलेल्या आहेत.
सध्या आई आजारी असते, कंपवाताने ती घराबाहेरही पडू शकत नाही.रेडीओखेरीज दुसरी करमणुक तिला नसते, तिच्याशी बोलताना आजार सोडून बोलणे कठीण असते, मग परवा मी पुन्हा तिला तिच्या बालपणात नेऊन त्या आठवणींमध्ये तिला रमवण्याचा प्रयत्न केला त्यातुन तिचा वेळ चांगला गेलाच पण मला देखील काही गोष्टी नव्यानेच समजल्या.तिने सांगितलेल्या काही घटना या तिलाही केवळ ऎकुनच माहित आहेत, आता तिच्या घराण्यातली सगळ्यात मोठी अशी तिच शिल्लक आहे, बाकिची मंडळी तिच्याहून लहानच असल्याने या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहतील. गोदुची कथा त्या पैकीच एक. या गोष्टी ऎकताना मला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे तिला तर नाहीच माहित पण ती कुणालाच माहित असणार नाहीत. तिने सांगितलेल्या गोष्टीमंधले कच्चे दुवे कल्पनेने जोडण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा कथानकांवर खर तर चांगल्या मालिकाही बनू शकतील, पण सध्या तरी त्या ब्लॉगवाचकांपर्यंत पोचाव्यात या साठी हा लेखन प्रपंच.....)




पुरोहितींकडच्या लग्नाला माई गेल्या होत्या. थोरामोठ्यांच्या तोलाचे कार्य होते. त्यामध्ये एक त्यामानाने साध्या पातळात लगबगीने वावरणारी मुलगी माईंच्या तीक्ष्ण नजरेने हेरली. मुलगी खरोखरीच नक्षत्रासारखी होती. माईंचा काशीनाथ नुकताच एम.एस्सी. परीक्षा पहिल्या वर्गात पास झाला होता. त्याच्यासाठी मुली सांगून येत होत्या.कुणाची पत्रिका जुळायची नाही, तर कुठे मुलगी पसंत पडायची नाही. पहिली सून घराला योग्य मिळाली कि पुढचे सारे सुरळित होईल अशी माईंची धारणा होती.

माईंजवळ येवून दोघी-तिघींनी आपल्या मुली, नाहीतर भाच्या,पुतण्य़ांची गुणवर्णने ऐकवली. एक दोघींनी पत्रिकाही दिल्या. पण मघाची मुलगी माईंनी मनातल्या मनात काशीनाथ साठी पसंतच केली होती जणू, इतरांच्या बोलण्याकडे त्यांचे फारसे लक्षच नव्हते. पुरोहितांच्या मालू बरोबर ती हळदी-कुंकू देत होती.मालूला त्या म्हणाल्या ,’अगं हळद-कुंकू लावून झाल्यावर ये गं, तुझ्याशी बोलायचयं’.मालू अर्ध्या तासात माईंजवळ आली.
’काय माई, काय काम काढलसं?’
’तुझ्या बरोबर अत्तर लावणारी मुलगी कोण गं?’
’ती वसुधा, आमच्या भालूमामाची धाकटी मुलगी.’
’काय करते? कुठे असते?’
’ती मधू मामांकडे असते मुंबईला, मामा वारले ना तेंव्हापासून. कॉलेजला जाते, इंटरला आहे शिवाय नोकरी पण करते’
माईंनी पुरोहित वहिनींकडून वसुधाची पत्रिका मागवली, पत्रिका नव्हतीच त्यांच्याकडे, वसुधा दोन वर्षाची असताना तिची आई गेली होती.भालूमामांनी दुसरे लग्न केले नव्हते. वसुधाची मॅट्रीकची परीक्षा झाली आणि भालूमामा अचानक वारले.हृदय-विकाराचा झटका असणार, त्या वेळी रोगाचे नाव माहित नव्हते. वसुधाला तिच्या काकांनी मुंबईला नेले. मुलगी हुशार होती,गुणी होती.मात्र तिला आई-वडील नव्हते. पहिल्या लेकाच्या लग्नात हौसमौज करुन देणारे व्याही नसणार एवढी एक गोष्ट सोडली तर मुलीत नावं ठेवायला जागा नव्हती. माईंनी पुरोहितींकडे निरोप पाठवून वसुधाला घरी बोलावून घेतले. त्या आपल्या यजमानांजवळ आणि काशीनाथजवळ मुलीबद्दल बोलल्या होत्या. त्यांच्या यजमानांचा काचकामाचा व्यवसाय होता, व्यवसायाचा व्याप ते एकटेच बघत असल्याने प्रपंचाची सगळी जबाबदारी माईंवर होती आणि माईंच्या कर्तबगारीवर त्यांचा पूर्ण विश्र्वास होता.घरातले लहानमोठे निर्णय माई घेत त्यात ते ढवळाढवळ करीत नसत.

वसुधाला घेवून पुरोहित वहिनी आल्या.दाखविण्य़ाचा कार्यक्रम झाला. पाहुण्यांशी चार शब्द बोलून माईंचे यजमान नाना, कामासाठी बाहेर पडले. काशीनाथने तिला चार प्रश्ण विचारले. काशीनाथला मुलगी पसंत असावी असे माईंना वाटले.एक-दोन दिवसांनी त्याला त्यांनी विचारले.
"आई, मला अजून पुढे शिकायचे आहे, इतक्यात लग्नाचं तू काय डोक्यात घेतलसं?"
"तू आता नोकरीला लागलास.वडीलांच्या धंद्यात लक्ष घालायच नाही म्हणालास, कशाला आम्ही अडकाठी केली नाही, एवढा एम.एस्सी.झालास, अजून किती शिकायच? आणि संसार कधी करायचा?,तुझ्याबरोबरची मुले लग्न करुन संसाराला लगली, अरे इतकी चांगली,शिकलेली मुलगी आहे. नको जास्त विचार करुस.आणि शिकायच तर नंतरही येईल शिकता. तुझ्या मनातलं मी ओळखलय, आवडलीय ना तुलाही वसुधा ! कळवून टाकते तिकडे मी. लवकारात लवकरचा मुहूर्त बघुया"
माईंनी काशीनाथचा होकार गृहित धरुन पुढल्या तयारीला सुरुवात केली.नानांनाही मुलगी पसंत होती.बाकी देण्याघेण्य़ाला त्य़ांचा पहिल्यापासून विरोध होता. माईंना वसुधा विषयी आपुलकी वाटायच एक कारण म्हणजे त्यांची गोष्ट तिच्यासारखीच होती. त्यांच्यातर जन्मानंतर का्ही तासात त्यांची आई गेली. मामीनेच त्यांना वाढविले. त्यांचे वडील त्यांना आजोळी भेटायला येत, पण त्या लहानपणी वडीलांबरोबर न गेल्या्ने त्यांना ते घर परकेच राहीले,आजॊळीच त्या वाढल्या, पुढे त्यांच्या वडीलांचे दुसरे लग्न झाले,मग त्यांचे येणे कमी झाले. माईंच्या लग्नाच्या आधी दोन वर्षे त्यांचे वडीलही गेले. त्यांच्या मामानेच त्यांचे कन्यादान केले.नाना लग्नाच्या वेळी नोकरी करीत होते, पण त्यांचा स्वभाव धडपडा होता, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर काचेचा कारखाना काढला व अतिशय मेहनतीने तो नावारुपाला आणला.अर्थात माईंच्या समर्थ साथीशिवाय हे शक्य झाले नसते.माईंनी घरातल्या सगळ्या गोष्टींची सर्व जबा्बदारी घेतलीच, शिवाय धंद्यातल्या चढ उतारांशी सामना करताना नानांना संपूर्ण साथ दिली. सुरुवातीच्या अडचणीच्या काळात त्या काटकसरीने रहात होत्या, धंद्यात बरकत आल्यावरही त्या मातल्या नाहीत, घरातली सर्व कामे त्या स्वतः करत. एकवर्षी दिवाळीत कुठलीशी मोठी ऑर्डर रद्द झाल्याने कारखान्याचे बरेच नुकसान झाले होते. दिवाळीत बोनस मिळणार नाही अशी बातमी पसरल्याने कारखान्यात वातावरण तापले होते.नानांची अस्वस्थता माईंना जाणवली,आपले दागिने त्यांनी नानांपुढे आणून दिले. आणि म्हणाल्या
’ हे माझे दागिने घ्या आणि लोकांच्या बोनसची व्यवस्था करा’ त्यांच्या माहेरहून आलेले आणि नानांनी हौशीने केलेले सगळे दागिने त्यात होते
’अगं , नको, तुझं स्त्री-धन आहे ते, मला ते घ्यायचा आधिकार नाही’
’वेळेला उपयोगी यावेत म्हणून तर असतं ना ते ! दागिने काय परत करता येतील. आज कामगारांना बोनस मिळाला कि ते जोमाने कामाला लागतील, नुकसान भरपाई झाली की त्यांचे संसारही मार्गी लागतील आज तुमच्या कारखान्यावर कित्येकांचे संसार चाललेत , त्यांचे शाप घेवून मला हे दागिने काय सुखं देणार?’
पत्नीच्या मनाच्या मोठेपणानं नाना भारावून गेले.त्यामुळेच तिच्यावरचा त्यांचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला.

काशीनाथचे लग्न थाटात झाले. वसुधाला माईंनी घरच्या रितभाती शिकवायला सुरुवात केली.त्यांचे कुटुंब मोठे होते.आला गेला सतत असे.त्या काळी सधन लोकांकडे शिक्षणासाठी मुले असत, वारावर जेवणारे विद्यार्थी असत.कुणी गावाकड्ची निराधार म्हातारी,एखादा लांबचा अपंग नातलग यांना ठेवून घ्यायची पध्दत होती. ’सामाजिक बांधिलकी’ हा शब्द न वापरता लोक ती मानित. पैसा जास्त असला तरी त्यांचे रहाणीमान सर्वसामान्यांप्रमाणेच असे.फक्त शिक्षणासाठी त्यांच्या मुलांना त्रास पडत नसे, आणि त्यांच्या बायकांच्या अंगावर जरा जास्त दागिने असत.वसुधा सासरी चांगलीच रुळली.काशीनाथसारखा हुशार,देखणा नवरा आणि माई-नानांसारखे प्रेमळ सासुसासरे.गोकुळासारख नांदत घर, सुख -सुख म्हणजे अजून दुसरं काय असत? तिच्या मुळच्या सुंदर रुपाला आणखीच झळाळी आली.

वसुधाचे बाळंतपण माईंनी सासरीच करायचे ठरविले.तिचे डॊहाळजेवण थाटात केले.वसुधाला मुलगा झाला.मुलगा तीन महिन्यांचा झाला.शंतनू असे त्याचे नाव ठेवले. काशीनाथने अचानक अमेरीकेला उच्च शिक्षणाला जाण्याचा निर्णय जाहीर केला.त्या दृष्टीने गेले काही महिने त्याचे प्रयत्न चालू होतेच.मात्र घरात त्याने कुणालाच काही सांगितले नव्हते, अगदी वसुधालादेखील.ऐकल्यावर वसुधा जरा खट्टू झाली, नाही म्हटले तरी तिला न सांगता हा निर्णय त्याने घेतला याचे तिला दुःख झाले.आपण काही इतक्या अडाणी नाही, शिवाय त्यांच्या प्रगतीच्या आड येण्य़ाचा कोतेपणाही आपण केला नसता, मग आपल्याला एका शब्दाने सांगावेसे का नाही वाटले यांना? माईंना सांगितल्याशिवाय नाना कुठलीच गोष्ट करीत नाहित.
रात्री काशीनाथ बाळंतीणीच्या खोलीत आला. पाळ्ण्यात पहुडलेल्या शंतनुला खेळवताना त्याचे लक्ष वसुकडे होते.ती मुद्दाम पाठ करुन झोपली होती.
बाजेच्या कडेशी बसत तो हलक्या आवाजात म्ह्णाला ," आमच्याशी बोलायचं देखील नाही का?"
"बोलण्यासारखं काही आहे का?" वळत वसुधा म्हणाली
रडून रडून तिच्या नाकाचा शेंडा लालबुंद झाला होता.
"अगं मी कुठे रणांगणावर चाललो नाही, शिकायला जातोय अमेरीकेला, इतकं रडायला काय झालं? "
"त्यासाठी नाही मी रडत, एवढी मोठी बाब, तुम्ही मला एका शब्दानं सांगितली नाही त्याच वाईट वाटतयं,"
"एवढचं ना, अगं लग्नाच्या आधीपासून मला तिकडे शिकायला जायचे मनात होते, सहा महिन्यांपूर्वी माझा मित्र तिकडे गेला त्याच्याशी पत्रव्यवहार करुन तिकडच्या विद्यापिठांशी संपर्क साधला,शिष्यवृत्ती मिळाली तरच जायचे असे ठरवले होते.तिकडून उत्तर यायला दोन तीन महिने गेले, तेंव्हा तू नुकतीच बाळंतीण झाली होतीस त्या आधी तुझी प्रकृती नाजूक होती म्हणून मुद्दाम नाही सांगितलं. हे पत्र आल्याबरोबर लगेच सांगितलच ना. समजल आता का नाही सांगितलं की अजून आहेच राग? तुम्हा दोघांना सोडून जायचं जिवावरही आलयं काय करू, एवढी चांगली संधी परत मिळेलच असं नाही"
"आम्हालाही न्या मग तुमच्या बरोबर" राग विसरुन वसुधा निरागसतेने म्हणाली
"नेल असतच गं, पण सध्या मला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिघांच कसं भागणार? आता आपल्या खर्चासाठी नानांजवळ पैसे मागण.."
" नको, नको, अहो मी गमतीने म्हणाले,तुम्ही अगदी निर्धास्त पणे जा, आणि लवकर शिकून परत या, आम्ही तुमची वाट बघू, , आपल्या शंतनुचा पायगुण बर हा "

पन्नास-साठ वर्षांपूर्वी अमेरिकेत शिकायला जाणं आजच्या इतक सहज नव्हतं, फार थोड्य़ा संधी होत्या आणि फार कमी लोक जात.संपर्क माध्यमं कमी असल्याने इतक्या दूर जाणे त्रासदायक वाटे. काशीनाथच्या जाण्याची तयारी झाली.त्याला निरोप द्यायला मुंबईला घरचे सगळे गेले.
काशीनाथचे पहिले पत्र आले.तिकडचे वर्णन वाचून सगळे अचंबित झाले.आल्यागेल्याला माई कौतुकाने काशीनाथच्या पत्राबद्दल सांगत.वसुधाही त्याला पत्रे लिहू लागली.पत्र मिळायला महिना -पंधरा दिवस लागत.काशीनाथचे पत्र आले कि त्याच्या पत्राची पारायणे करताना रात्री निघून जात. एरवी सगळा वेळ शंतनुच्या संगोपनात आणि घरकामात पटकन जाई.म्हणता -म्हणता दोन वर्षे जातील वसुधा रोज मनाला सांगे.

सुरुवातीला नियमित पणे येणारी काशीनाथची पत्रे उशीरा येवू लागली.वसुधाच्या दोन-तीन पत्रांनंतर त्याचे एखादे पत्र.ते ही त्रोटक. आता परीक्षा जवळ आली असेल, अभ्यासाचा ताण असेल, नसेल होत वेळ लिहायला. वसु मनाशी म्हणे.शंतनू चालायला लागला.त्याचा वर्षाचा वाढदिवस झाला.त्याचा स्टुडीयोत फोटो काढून त्याच्या बाबांना वसूने पाठविला. आता तो बोलू लागला, त्याच्या बोबड्या बोलांने घरादाराला बोबडे केले.दिवसा मागून दिवस, महिने जात होते. दोन वर्षे उलटून गेली.काशीनाथची पत्रे अगदी क्वचित येत, त्यात परत येण्याची भाषा नसे.पत्रातला सूरही किंचित परका,दूरचा वाटे. वाट बघण्य़ाशिवाय कुणाच्याच हातात काही नव्हते.

माईंच्या घरात बाकीची मुलेही मोठी होत होती, त्यांची शिक्षणे चालू होती.आता दुसऱ्या रघुनथचे लग्न ठरले. वसू लग्नाच्या तयारीत बुडली.शंतनू तीन वर्षाचा झाला.कशीनाथच्या येण्य़ाचे चिन्ह नव्हते.त्याच्या काळजीने,विरहाने वसू खंगत होती.तिचे दुःख माईंना जाणवत होते. त्या काही करु शकत नव्हत्या. उपास-तापास,नवस सगळं चालल होतं, बाहेरुन आनंदी चेहऱ्याच्या माई वसूला धीर द्यायच्या पण मनातून त्याही नाराज असत. दुसरी सून आली. माईच्या लेकीचेही लग्न झाले.नानांचे वय होत चालले. तरुण वयात अपार कष्ट केल्याने आता थकल्यासारखे होई, नाही म्हटले तरी त्यांनाही काशीनाथच्या न येण्य़ाची काळजी होतीच.

वसूने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईला नानांच्या भाड्याची जागा होती.तिथे त्यांची विधवा बहीण तिच्या मुलीबरोबर रहात असे.मुलगी सासरी गेली होती आणि ती बहीण म्हातारपणामुळे माईंकडे येवुन राहिल्याने ती जागा कुलूप लावून ठेवली होती.वसूने तिकडे जायचे ठरविले. तिला सुदैवाने शाळॆत नोकरी मिळाली. शंतनुला शाळेत घातले.माई नाहीतर तिची नणंद अधूनमधून जात. तिला मुंबईला पाठविणे माईंच्या अगदी जिवावर आले होते. पण तिचे म्हणणेही त्यांना पटले, "दीरांच्या वाढत्या संसारात पुढे मागे वाद होण्यापूर्वीच मार्ग काढलेला बरा. आपले हातपाय धड आस्ताना, आपल्या जवळ शिक्षण असताना दुसऱ्याच्या आभार-उपकारावर किती दिवस जगायचे? वेळेला मदत मागणे वेगळे आणि सतत अवलंबून राहणे वेगळॆ! शंतनुला समजायच्या आत मी पायावर उभी राहते, तुमच्या आधारची गरज आहेच, पण उद्या तुमच्या म्हातारपणाला मला तुम्हाला आधार देण्यासाठी मला बळकट व्हायला हवे" असे वसू त्यांना म्हणाली होती.काशीनाथचे न येणे तिने आता मनाने स्विकारले होते.

मधल्या काळात माईंचा दूरचा पुतण्य़ा अमेरिकेला कामासाठी जाणार असल्याचे नानांना समजले, त्यांनी त्याला काशीनाथची चौकशी करण्य़ाची विनंती केली.त्याने काशीनाथचा पत्ता शोधून काढला.त्याला भेटला. काशीनाथने तिकडच्याच मुलीशी लग्न केले होते, राजवाड्यासारख्या घरात तो रहात होता.विद्यापिठात तो प्रोफेसर होता. बंगला, गाडी असे वैभव होते. त्याच्या बायकोसमोर काशीनाथला तो काही विचारु शकला नव्हता.

ही सगळी बातमी समजल्यावर माईंच्या घरावर दुखाःचे सावट आले.वसूलाही हि बातमी कुणाकडून तरी समजली.दुःख करण्याच्या पलीकडे तिची अवस्था झाली.आता शंतनूकडे बघून सगळा राग,दुःख गिळायला हवे होते.शंतनू मोठा होत होता. वसूने नोकरी सांभाळून बी.ए, एम.ए. च्या परीक्षा दिल्या. माईंनी शंतनूची मूंज करायचे ठरविले, त्यांनी वसूला पुण्याला बोलावून घेतले. मुंजीची सगळी तयारी केली होती. मातृभोजनाची वेळ झाली. वसूला सुंदर साडी आणि साखळी देत माई म्हणाल्या,"वसू ही साडी नेसून मातृभोजनाला बैस"
वसूला हुंदकाच आला.
"डॊळे पूस वसू, माझा मुलगा करंटा, एवढी गुणी,सुंदर बायकॊ , मुलगा सोडून गेला, तुझी त्यात काय चूक? आजचा मान तुझाच आहे.मी तुझ्या सदैव पाठीशी आहे, मुलगा शिकून मोठा होईल, तुझे पांग फेडेल माझा तुला कायम आशीर्वाद आहे"

काळ कुणासाठी थांबत नसतो, नाना गेले.कारखाना आता रघुनाथ बघत होता. माई बहुतेकवेळा वसू कडेच असत. त्याही थकल्या होत्या.आजारी पड्ल्या. शेवटच्या आजारात त्या वसूजवळाच होत्या, तिने त्यांची सेवा केली.
"मी गेल्याचे काशिनाथला कळवू नका,त्याने मला तिलांजली देखील द्यायला नको. मी त्याला कधीही माफ करणार नाही" माईंचे हे अखेरचे शब्द होते.


वसूताई आता शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या. शंतनू अतिशय बुध्दिमान होता. एस.एस.सी परीक्षेत तो बोर्डात आठवा आला. त्याला मेडीकलला प्रवेश मिळाला.आता तो एम.बी.बी.एस.ची परीक्षा होवुन एम.एस. ही उत्तम रित्या उत्तीर्ण झाला होता.घरात नुकताच टेलीफोन घेतला होता.शंतनुला वेळी-अवेळी कॉल आला कि जावे लागे, त्याला उशीर झाला कि वसूताई काळाजी करीत, म्हणून त्याने नोकरी लागल्याबरोबर आधी टेलीफोन घेतला.

रविवारची संध्याकाळ, शंतनू बाहेर पडायच्या तयारीत होता.त्याचे लग्न ठरले होते, वर्गातल्याच मुलीशी त्याचे जमले होते.आज बरेच दिवसांनी दोघांना मोकळा रविवार मिळाला होता. फोनची बेल वाजली वसूताई देवापाशी दिवा लावत होत्या. निघता निघता शंतनूने फोन घेतला.
"हॅलो, मी रघुनाथ बोलतोय पुण्याहून "
"बोला काका"
"अरे शंतनू आई आहे का?"
" ती देवापाशी दिवा लावतीय काही निरोप आहे का? "
" अरे काशीनाथदादा, तुझे बाबा , येतोय इकडे, पंचवीस वर्षांनी त्याने सगळ्यांना एकत्र बोलावलय, पुढल्या रविवारी,म्हणून फोन केला होता"
"काका , तुम्ही भेटा त्यांना आम्ही येणार नाही.मी तर नक्कीच नाही आणि आईसुध्दा नाही येणार, इतकी वर्ष आम्ही राहिलोच ना त्यांच्या शिवाय आता त्यांना भेटायची अजिबात इच्छा नाही, ठेवू फोन?"
"अरे शंतनू, तुझा राग मी समजू शकतो पण वहिनींची इच्छा असेल तर.. "
"तिची पण नाही इच्छा..थेवतो फोन मी"
शंतनूने रागानेच फोन ठेवला. वसूताई बाहेर आल्या.त्यांनी आतून शंतनूचे बोलणे ऐकले होते
"आई काकांचा फोन होता, काशीनाथ येणार असे ते म्हणत होते आपल्याला भेटायला बोलावले होते तुझ्यावतीनेही मी त्यांना येणार नाही म्हणून कळविले आहे."
"असा नावाने उच्चार करु नये वडील आहेत ते तुझे"
"आई , मी त्यांना बघितले नाही.माझी आई-बाबा तूच होतीस आता सिनेमात दाखवतात तसे तुला त्यांच्या सोबत जायचे असेल तर जा, पण ज्या माणसाने तुला आयुष्यभर मनःस्ताप दिला त्याला भेटायची गरज नाही असे मला वाट्ते."
"मी नाही जाणार, तू म्हणतोस ते अगदीच काही खोटं नाही.आता त्यांना भेटून काय होणार? माझं मन पार मरुन गेलेलं आहे पण नाही गेले तरी बरं दिसणार नाही लोक काय म्हणतील?"
" हा विचार त्यांनी केला का? तू इकडे किती त्रासात दिवस काढलेस तेंव्हा त्यांनी काय केलं? आणि तसच वाट्त असेल तर आजी आठव, ती काय म्हणायची शेवटी ती असती तर कशी वागली आसती? आई आणि त्यांच्यासाठी मन मारायची काही जरुर नाही, मी आहे ना! आता तू अगदी आरामात रहा. हिंड , फिर मजा कर मी जाउन येतो"
शंतनू बाहेर पडला. वसूताई विचार करत बसल्या.खरचं आता त्या माणसाचा राग नाही पण त्याला भेटावं असंपण वाटत नाही.एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल वाटते तशी निर्विकार भावना आहे त्यांच्याबद्दल.शंतनूच मन मोडून जाण्यात काही अर्थ नाही. वडिलांबद्दल काही वाईट न सांगूनसुध्दा त्याच्या मनात त्यांच्याबद्दल आढीच राहिली.शाळेत त्याने मुलांना त्यांच्या वडीलांबरोबर बघितले असेल.आपले वडील नसतात, त्यांची पत्रे येत नाहीत.याचा त्याच्या बालमनावर परिणाम झालाच असेल.हुशार व समजूतदार असल्याने त्याने कुणाला तसे जाणवु दिले नाही.काशीनाथला भेटायला वसूताई आणि शंतनू गेलेच नाहीत.

महिनाभर काशीनाथ पुण्य़ात होता. वसु-शंतनू येतील असे त्याला वाटत होते, पण ना ते आले ना त्यांचा फोन, काशीनाथला वसूला तोंड दाखवायला लाज वाटत होती. त्याने केलेला अपराधच तेवढा मोठा होता.पण जाण्यापूर्वी एकदा तरी तिला भेटून तिची माफी मागायची इच्छा होती आणि शंतनुलाही बघायचे होते, त्याचा वर्षाच्या वाढदिवसाचा फोटो वसूने पाठविला होता, त्यानंतर काही संबंधच राहीले नव्हते(आपणच ठेवले नव्हते) त्याच्या हुशारीच्या गोष्टी सगळ्य़ांकडून ऐकलेल्या होत्या.

जायचा दिवस आला.मुंबईला पोचताना संध्याकाळ झाली होती.रात्री दहा वाजता विमानतळावर पोचायचे होते.रघुनाथ सोडायला आला होता.मनाचा हिय्या करुन काशीनाथ त्याला म्हणाला.
"वसू तेवढी नाही भेट्ली, निदान फोनवर तरी बोललो असतो"
"अरे त्यात काय अजून आहेत दोन-तीन तास फोन करु त्या दुकानातून घरी असतील तर जाऊनच येवु ना"
दुकानापाशी गाडी थांबवून रघुनाथने फोन लावला.वसूताई नुकत्याच शाळेतून येवुन टेकल्या होत्या.तो फोन वाजला, त्यांनि फोन उचलला
"हॅलो,मी रघुनाथ बोलतोय , कोण वहिनी का? काशीनाथदादा आणि मी आत्ता येतोय मुंबईत तुम्हाला भेटायला यायच होत..."
वसुताईना क्षणभर काही सुचेना. त्यांना शंतनुचे त्या दिवशीचे बोलणे आठवले.माईचे शेवटले बोलणे आठवले "मी त्याला कदापी माफ करणर नाही"
एक आई जर मुलाला माफ करणार नाही म्हणते तेंव्हा त्याची चूक तेवढीच मोठी आहे. आपण कॊण त्यांना क्षमा करणार?
’सॉरी रॉंग नंबर.. "असे म्हणून वसू ताईंनी फोन ठेवला् आणि त्यांनी रिसिव्हर काढूनच ठेवला, पुन्हा फोन नको ते बोलणे देखील नको.
आत जावून पाय धुवुन त्या देवापाशी गेल्या.

रघुनाथराव पुन्हा पुन्हा नंबर फिरवत होते. फोन लागत नव्हता.
"उचलत नाही रे फोन , मगाशी एकदा रॉंग नंबर लागला, अजून घरी आल्या नसतील वहिनी, आमच्या इकडचे फोन पण ना..."
"राहू दे रघुनाथ नाही योग भेटीचा , मानी आहे ती आईसारखीच, माफ नाही करणार मला ती या जन्मी तरी"

©

Thursday, July 15, 2010

भेट (गावाकडच्या गोष्टी..)

दुपारची शांत वेळ होती.सरस्वतीकाकू दळणाची तयारी करीत बसल्या होत्या. तात्या यंदा मॅट्रीकला बसणार, त्याचा अभ्यास चालू होता.बाकीची मुले शाळेत गेली होती.तान्हा कमलाकर पाळण्यात निजला होता. आज सकाळपासून हवा विचित्र होती.काकूंचा उजवा डोळा लवत होता.मनाला विचित्र हुरहुर लागून राहिली होती.नाना , काकूंचा थोरला मुलगा रामदुर्ग संस्थानात नोकरी लागला होता.त्याचे बरेच दिवसात पत्र नव्हते.काका, काकूंचे यजमान कामानिमित्त गावी गेले होते. सवयीने हात काम करत होते, पण काहीतरी अशुभाच्या शंकेने मन कासावीस होत होते.
’तार घ्या ’ दारातून हाक आली. तात्या पुढे झाला, त्याने तार घेतली.वाचली ’गंगूचे दुखःद निधन’. तार वाचून तो खालीच बसला.काकू हात पुशीत बाहेर आल्या. ’कोण होते रे? काय झालं तात्या, तुझा चेहरा असा का? बोल ना घडघड’
’आई आपली ताई गेली गं..’ डोळे पुशीत तात्या म्हणाला
’अरे देवा... सकाळ पासून मेला उजवा डोळा लवत होताच..काय करू आता माझी ताई अशी कशी रे गेली?’ काकूंना शोक अवरेना.पाळण्यातल्या कमलाकरने रडायला सुरुवात केली.घरात एकच आकांत झाला.शेजारच्या ठाकूर ताई आवाजाने आत आल्या.
’काय झाले?’
’माझी मोठी मुलगी ,गंगू वारली हो.. सहाच महिन्याचं लेकरू आहे तिचं, मोठी मुलगी आडीच वर्षांची, आताशी कुठे संसाराला सुरुवात आणि गेली हो’
ठाकूर ताईंनी गंगू बद्दल् फक्त ऎकलेच होते,या घरात सरस्वती काकूंना येवून वर्षच झाले होते. त्यांच्या स्वतःच्या पाच-सहा मुलांच्या धबडग्यात त्यांना कुणाकडे जाय-यायची फुरसत नसायचीच.ठाकूरताईच कधी दुपारच्या त्यांच्याकडे जात,निवडण-टीपण करता करता दोघींच्या गप्पा होत. काकूंकडून बरेच पदार्थ ठाकूरताई शिकल्या.एवढा मोठा प्रपंच, काका एकटे मिळवते पण काकूंचे दारिद्र्य कुणाला दिसले नाही.

भुकेल्या बाळाला शांत करायलाच हवे होते.त्याला काय आईच्या दुःखाची कल्पना?त्याला दूध पाजताना गंगूच्या आयुष्याचा पट काकूंच्या ओल्या डोळ्यापुढे साकारला.गंगू त्यांची थोरली मुलगी.तिच्या पाठीवर ओळीने चार मुलगेच झाले. काकूंचा पाळणा दीड वर्षांचा.काकांना सरकारी नोकरी होती.इंग्रज सरकारच्या नोकरीत ते होते, फार मोठा हुद्दा नव्हता.शेतीवाडी-घरदार काही नव्हते.दरमहा येणारी पगाराची रक्कम तेवढी होती.खाणारी तोंडे कमी असताना स्वस्ताई मुळे कुटूंब सुखात होते.गंगू पाच-सहा वर्षांची असल्यापासून आईच्या हाताखाली काम करु लागली.दिसायला बेताची होती, पण डोक्याने चलाख,शाळेत घातली होती.शाळेतून आली की पटकन सगळा अभ्यास करुन पाटपाणी घ्यायला यायची.भावंडाना खॆळवताना कविता म्हणायची.त्यावेळी काकांची भाटघर धरणाच्या बांधकामामुळे तिकडे बदली झाली होती.भोरला निमकरांच्या वाड्यात त्यांनी बिऱ्हाड केले होते. नानाला इंग्रजी शाळेत घातल्यावर गंगू म्हणाली होती,’मला मात्र मराठी शाळेत ठेवलस, त्याला कसं इंग्रजी शाळेत घातलत’
’तो मुलगा आहे, तुला काय इंग्रजी शिकवून मडमीण का व्हायचय? लग्न होवून तू सासरी जाणार फायनल पर्य़ंत शिकलीस ना! आमच्या सारखी अडाणी नाही राहिलिस. शिवाय आपली परिस्थिती बघ’
गंगूलाही त्याची जाणीव होतीच.शिवण -भरतकाम सगळ्यात ती हुशार होती.पुड्याच्या साठवलेल्या दोऱ्यातुन ती क्रोशाचे काम शिकली. आईला मदत करताना स्वयंपाकपण तिला येवु लागला होता.

मामलेदारांचे घर त्यांच्या शेजारीच होते. सरस्वती काकू यांच्याकडे फरशा जात नसत.एकतर घरकामातून त्यांना वेळ नसे आणि त्यांच्यासारख्या थोरामोठ्यांच्या घरात हळदीकुंकू किंवा सणवारी बोलावणे असेल तरच त्या जात. मामलेदारसाहेव आता नव्हते. पण त्य़ांच्या नावाच दबदबा अजूनही होताच. मामलेदार काकू देवळात किर्तनाला जात.स्वयंपाकघरात त्या नुसतीच देखरेख ठेवत, त्यांच्या नजरेच्या धाकात सुना दिवसभर कामे करीत. त्यांच्या बापूचेच तेवढे लग्न राहिले होते. दिसायला ती सगळीच मंडळी देखणी. ऊंची-पुरी सगळ्य़ांची नाके धारदार, डॊळे पाणीदार.बापू सगळ्यात धाकटा तो दहा वर्षांचा असताना मामलेदार साहेब गेले, पाठोपाठ त्यांचे थोरले चिरंजीवही. बापूवर काकूंची माया त्यामुळे अंमळ जास्तच. घरात पुरुषांनी कुठल्याही कामाला हात लावायची पध्द्त नव्हतीच.मॅट्रीकची परीक्षा द्यायच्या आधीच त्याचे लग्न करुया म्हणून त्याच्या आईने हट्ट धरला.
’त्याचे दोनाचे चार हात झाले कि मी संसारातून मुक्त होईन, त्याचे वडील असते तर केलचं असतं त्याच लग्नं, शिक्षण काय राहिलच चालू’
अण्णा,बापूचे थोरले भाऊ आता घरचा कारभार बघत होते.ते संस्थानच्या प्रेस मधे कामाला होते. निमकरांच्या वाड्यात राहाणारे सरस्वतीकाकूंचे बिऱ्हाड त्यांना माहित होते. गरीब असले तरी कुटुंब सालस होते. त्यांची मुले हुशार होती. नानाला संस्थानची शिष्यवृत्ती होती.अण्णांनी निमकरांकरवी बापूसाठी गंगूची पत्रिका मागवली.पत्रिका जुळते असे गुरुजींनी कळवताच, एक दिवस ते सरस्वतीकाकूंकडे स्वतः गेले आणि त्यांनी बापूसाठी गंगू आम्हांला पसंत आहे असे सांगितले. सरस्वतीकाकूंना आपण स्वप्नात तर नाही ना? असे वाटले. इतक्या थोरामोठ्यांकडून आपल्या लेकीला मागणी येईल असे त्यांना मुळीच वाटत नव्हते.
’हे घरी आले कि त्यांना पाठवते तुमच्याकडे’ एवढेच त्या बोलल्या, अण्णांना या बसा म्हणायचे देखील त्यांना सुचले नाही.

काका घाबरतच मामलेदारांच्या वाड्यात शिरले.अण्णांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केले.माजघरात ज्वारीची पोती रचून ठेवलेली होती.ओसरीवरुन मागच्या परसातली केळीची झाडे दिसत होती.पाणी आणि शेंगदाण्याचा लाडू रमाकाकी ठेवून गेल्या.
"काका, तुमच्या गंगूची पत्रिका बापूसाठी आम्ही बघितली , छान जुळतीय आंम्हाला मुलगी पसंत आहे, आमचा मुलगा ही तुमच्या बघण्य़ातला आहे ..’ अण्णांनी सुरुवात केली.
’हो, हिने मला सांगितले, पण मी साधा नोकरदार माणूस.आमची शेतीवाडी होती म्हणे पूर्वी, आता काही नाही, तुमच्यासारखे तालेवार घर, त्या तोलाचे कार्य करणे आम्हांला कसे झेपणार?’
’पैसा महत्वाचा नाही हो, माणसे मोलाची, तुमची मुले हुशार आहेत, तुमचे दिवसही पालटतील.आम्हाला गंगूची हुशारी आवड्ली आहे, तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्या, बाकी सगळ माझ्याकडे लागलं’
काका होकार देवून आले.गंगू किंवा बापू दोघांच्या आवडी-निवडीचा प्रश्ण नव्हताच.त्या काळी लग्ने मोठी माणसे ठरवित. इथे दोघांनी निदान एकमेकांना बघितले तरी होते,कित्येकदा अंतरपाठ बाजुला झाल्यावर जोडीदाराचे दर्शन होई.
गंगूचे लग्न झाले.लग्न ठरल्यापासून रोजच आईकडून मामलेदारांच्या श्रीमंतीच वर्णन तिनं ऐकलं होतं, गंगूच्या भाग्याचा आळीत सगळ्यांना हेवा वाट्ला होता.रखमाकाकू तर म्हणाल्या देखील होत्या,’बापू आणि गंगूची जोडी म्हणजे शालजोडीला पटकुराचं ठिगळं !’ एकून गंगूला फार वाईट वाटल होतं पण ती बोलू शकली नव्हती.
मामलेदारांच्या वाड्यात पन्नास माणसे रहात होती. आला गेला,पै-पाहुणा.रोजचा सोवळ्याचा स्वयंपाक. गंगूला कामाची सवय असली तरी त्यांच घर या मानानं किती लहान! तरी तिने परिस्थितीशी जुळवून घेतले.रमा वहिनी आणि मोठ्या जाऊबाईंकडून शिकायला सुरुवात केली. सासुबाईच्या कडकपणाच्या कथा तिने पूर्वीच ऎकल्या होत्या, त्यांना बोलायची वेळ शक्यतो येणार नाही अशा प्रकारे ती कामे उरकत असे. सासुबाईंना स्वतःच्या मुलांशिवाय कुणाचे कौतुक करणे माहित नसल्याने सुनांना कौतुकाचा शब्द मिळात नसे निदान बोलणी बसू नयेत एवढीच त्यांची अपेक्षा असे.

पहिल्या बाळंतपणाला गंगूला माहेरी धाडले नाही.एक तर तिच्या वडीलांची तोवर पुण्यात बदली झाली होती.
’वाड्यातल्या लहान जागेत काही जायची जरुर नाही, इथेच रहा’ काकूंनी हुकूम केला.पहिली मुलगी झाल्यामुळे बरीच बोलणीही तिला ऎकावी लागली. सुदैवाने मुलगी रंगरुपाने वडीलांवर गेली होती. सहा महिन्यांच्या कुमुदला घेवून गंगू माहेरी गेली, पहिल्या नातीला कुठे ठेवू नि कुठे नकॊ असे घरच्यांना झाले होते.चार दिवसात पोरीला ताप भरला, नानल वैद्यांकडून काकांनी औषध आणले.घरगुती उपायही होतेच पण दुखणे वाढले आणि कुमुद त्यातच गेली.
गंगुच्या दुर्दैवाला जणू सुरुवात झाली.काकूंनी बोलून बोलून नको केले, तिच्या माहेरचा, त्यांच्या गरीबीचा सगळ्यांचा उध्दार झाला. बापूरावांनी एका शब्दाने आईला टोकले नाही कि गंगूला समजावले नाही. आपला झाल्या घटनेशी सुतराम संबंध नाही असे त्यांचे वर्तन होते. बापूराव मॅट्रीकची परीक्षा नापास झाले होते. गंगूला वाटे त्यांनी पुन्हा अभ्यास करावा, परीक्षा द्यावी.पण त्यांना परीक्षा या प्रकाराची भितीच बसली होती. आपला नवरा नोकरी करत नाही, शेतीची कामे त्याला झेपणार नाहीत असे त्याची आई म्हणते या गोष्टीचा गंगूला त्रास होई. जावा तिला काही बोलत नसत, काकूंचा धाकच तसा होता.पण आपला प्रपंच वाढणारा आहे तर आपण कष्टाने चार पैसे मिळवले पाहिजेत असे गंगूला मनापासून वाटे.

एकदा भितभितच तिने अण्णांजवळ हि गोष्ट बोलून बघितली. एक मुलगी एवढा विचार करते याचेच त्यांना नवल वाटले, बायकांची बुध्दी चुलीपुरतीच, असा संस्कार असलेली ती पिढी होती. मात्र गंगूच्या मनाची घुसमट त्यांना जाणवली, त्याचवेळी बापुच्या निवांत वागण्याला वेळीच लगाम लावावा लागेल असे त्यांना वाटले. आईच्या नसत्या लाडाने त्याचे आयुष्य वाया जाईल या जाणीवेने त्यांनी बापुला संस्थानात कारकुनाची नोकरी लावून दिली.बापूरावांना नोकरी मिळाल्याचा गंगूला फार आनंद झाला. आपल्या हुशारीने आणि कष्टाने माणूस पुढे जातोच आता हळूहळू त्यांना परिक्षेला बसायला सांगू, कचेरीतील कामाने त्यांचा हरवलेला आत्मविश्र्वास परत येईल.गंगू स्वप्ने रंगवू लागली.

गंगूला दुसरा मुलगा झाला,पण तो दहा दिवसातच गेला.त्यानंतर वर्षभरात तिला पुन्हा मुलगी झाली.लहान वय त्यात पाठोपाठच्या बाळंतपणाने गंगूच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. तिला बारीक ताप असे, खोकला लवकर बरा होत नसे. भोरच्या सततच्या पावसात लांबून विहिरीवरुन पाणी आणावे लागे. ओल्या कपड्य़ातच कामे उरकावी लागत. जेवायला दुपारचे दोन वाजून जात.सगळ्याच सासुरवाशिणींची अशीच गत होती.त्यातच गंगूला पुन्हा दिवस गेले. या खेपेला मुलगा होवुदे म्हणून तिने आंबाबाईला नवस केला. तिला मुलगा झाला, पण बाळंतपणात तिच्या आजाराने उचल खाल्ली.ताप हटेना, खोकला कमी होईना. रामशास्त्री वैद्य बघून गेले. गंगूला क्षयाची बाधा झाली आहे, तिला मुलापासून दूर ठेवा असे सांगितले. तिला वेगळ्या खोलीत ठेवले.न बऱ्या होणाऱ्या आजाराने गंगूचा शेवटच केला.

सरस्वतीकाकू पुण्यात आल्या.शहरात प्रत्येक गोष्टीला पैसा मोजावा लागे.भोरात कमी भाड्यात मोठी जागा होती. मंगळवारच्या बाजारात भाजीपाला स्वस्त मिळे.दुध-दुभते सगळेच स्वस्त. इथे सारेच महाग. खाणारी तोंडे वाढलेली.मुलांच्या शिक्षणाला पैसा लागत होता. रोजचा दिवस कसा घालवायचा अशी विवंचना पडे. नाना एवढा हुशार जगन्नाथ शिष्यवृत्ती मिळवली त्यानं पण कॉलेजात घालायला काही जमलं नाही. रामदुर्ग संस्थानात त्य़ाची त्याने नोकरी बघीतली, आणि महिन्याकाठी तोच पैसे पाठवायला लागला. गंगूला एकदा माहेरी आणली आणि तिची लेक गेल्याने तिचे माहेर तुटले.इकडे आणून तरी तिची हौसमौज थोडीच करता येणार आहे तिच्या सासरी सुखात, तशीच राहो. तिच्या दुखण्याची,आजाराची काहीच बातमी त्यांनी कळवली नाही.तिचीच पत्रे येत. त्यात कधी तिने आजाराचे नाही कळवले, कायम खुशालीच्याच बातम्या. आणि आता एकदम ती गेल्याचीच तार. काय त्रास सोसला पोरीनं कोण जाणे? मी तरी कसली आई? मला माझ्या संसारातून तिच्याकडे बघायला झाले नाही.बिचारी मुक्यानेच गेली, सगळा सासुरवास सोसला पोरीने. काय आम्ही त्या वैभवाला भुललो! माझ्या लेकीला त्याचा काय उपयोग झाला! ऐन तारुण्यात पोरांना पोरकं करुन गेली. आता त्यांच्याकडे कशाला जाऊ? माझी मुलगीच गेली आता कुणाला भेटू? त्यांना काही कमी नाही, तिची मुलं वाढतील तिकडे सुखात, उगीच गेलं कि ते तान्ह लेकरु आणावसं वाटेल आणि इथे त्याची आबाळ व्हायची.नकॊ तिकडे जाणेच नकॊ, काय म्हणतील, नावे ठेवतील , ठेवुदे, आता मला त्या भोरात जायचय कशाला परत? काळजावर दगड ठेवून सरस्वती काकू भोरला गेल्याच नाहीत.

महागाईमुळे दिवसेंदिवस पुण्यात राहणे अशक्य झाल्याने नानाने सगळ्यांना रामदुर्गला बोलावून घेतले.एव्हाना सरस्वतीकाकूंना सात मुलगे आणि तीन मुली झाल्या होत्या.सततच्या बाळंतपणाने त्या टेकीला आल्या होत्या. मला आता मूल नकॊ असे त्या मनाशी म्हणत.कोल्हापुरला त्यांच्या दादा व तात्या दोन्ही मुलांना नोकऱ्या मिळाल्या.रामदुर्गला आल्यावर त्यांची सुशीला नावाची मुलगी वारली.दोन संस्थानांनी माझ्या दोन मुली गिळल्या असे त्या म्हणू लागल्या.त्यांचे मन रामदुर्गात रमेना.त्यांनी कोल्हापूरला बिऱ्हाड केले.काका अजून पुण्य़ात नोकरी करत होते.

गंगू वारली.मामलेदारांच्या वाड्यात दहा दिवस दुःखाचे सावट आले.नंतर सगळे आपापल्या व्यवहाराला लागले.एवढ्या मोठ्या घरात तिची मुले वाढत होती.अगदी लहान असल्यापासून गंगूचा मुलगा रमाकाकी तिच्या मोठ्या जाऊबाईच वाढवित होत्या, तिच्या आजाराने त्याच त्याचे करत होत्या.मुलगीही त्यांनाच आई म्हणे.मुलांना आपली आई गेल्याची जाणीव नव्हती.घरात इतर मुलांबरोबर ती दोघे वाढत होती. यथावकाश बापूचे दुसरे लग्न झाले. त्यांच्या पुतण्य़ांसारखी त्यांची मुले त्यांच्या बायकोला काकी म्हणू लागली.एकत्र कुटुंबात सगळीच मुले सारख्याच पध्द्तीने वाढत होती.कॊणत्याच मुलांचे लाड , कोतुक कुणीच करत नसे. आईला सुध्दा मुलाला घटकाभर घेवून बसता येत नसे.
गंगूच्या मुलाची मुंज त्याच्या चुलत भावाबरोबर झाली. काकी ही आपली आई असून आपण आई म्हणतो ती आपली आई नाही हे त्याला समजून घ्यायला बराच त्रास पडला. मातृभोजनाला तिच्या पानात जेवताना त्याला हे समजले. त्याचे मामा मुंजीला आलेच नव्हते, त्यांना कुणी कळवले नव्हते.त्या लोकांचा पत्ता देखील माहित नव्हता. गंगू गेल्यापासून त्या कुटुंबाशी संबंध तुटलेच होते.आण्णा आता संस्थानच्या जेलरचे कामही करीत होते, एकाच वेळी ते प्रेस आणि जेल दोन्ही कारभार सांभाळीत होते.रामदुर्ग संस्थानशी पत्रव्यवहार करताना अचानक त्यांना नानाचा पत्ता मिळाला. त्याच्याकडून त्यांनी सरस्वतीकाकूंचा कोल्हापूरचा पत्ता मिळविला.अण्णांना मिरजेला बहिणीच्या सासरच्या एका लग्नानिमित्ताने जायचे होते, त्यांनी कोल्हापूरला पत्र लिहिले.

सरस्वतीकाकू अशाच दुपारी काम करीत असताना , मनोहरने पत्र आणून दिले.
’अरे , वाच ना ते पत्र, मला मेलीला कुठे येतयं वाचायला’
मनोहरने पत्र वाचले.गंगूच्या मुलांना मी घेवून येत आहे, तुमची इच्छा असेल तर तुमच्याकडे दाखवायला आणॆन असे अण्णांनी लिहिले होते. पत्र हातात घेवून कितीतरी वेळ सरस्वतीकाकू रडत राहिल्या.मुलांना समजेना आईला असे अचानक काय झाले?
’ ही गंगू कोण, तिची मुले कोण” मनोहर विचारु लागला.
त्यांनी संध्याकाळी तात्या आल्या आल्या त्याला पत्र दाखवून उलट टपाली मुलांना जरुर आणा असे लिहिण्यास सांगितले.गंगूची मुले कधी बघू असे त्यांना झाले होते. धकट्या दोघा-चौघांना आपल्याला अजून एक बहीण होती हे देखील माहित नव्हते.पण सगळ्यांनाच आपल्या भाच्यांना बघण्याची उत्सुकता होती.आईकडून आता रोज गंगूताईच्या गोष्टी समजत होत्या.

शेवटी तो दिवस उगवला.सकाळ पासून सगळे या नव्या पाहुण्यांच्या वाटेला डोळे लावून होते.नऊ वाजून गेले असावेत. वाड्याच्या दींडीदरवाजातून एक ऊंचेपुरे गृहस्थ आत आले.पांढरेशुभ्र दुटांगी धोतर, काळ कोट आणि डोक्यावर पगडी असा त्यांचा वेश होता.त्यांच्या हाताशी एक लहान मुलगा होता.त्याच्या डोक्याचा घेरा केलेला होता.दुसऱ्या बाजूला परकर पोलके घातलेली एक नऊ-दहा वर्षांची मुलगी होती.तात्याने अण्णांना ओळखले त्याने आईला ते आल्याची वर्दी दिली आणि तो त्यांना बोलवायला पुढे झाला. बाहेरची खोली आवरलेली होती. बैठकीवर स्वच्छ चादर घातली होती.लोड आणि दोन उषा ठेवल्या होत्या.पितळ्याच्या लखलखित तांब्यात पाणी भरुन त्यावर फुलपात्र ठेवले होते. भिंतीवर तसबिरी होत्या. आण्णा आले.मुले त्यांच्या जवळच बसली, अनोळखी लोकांना बघून ती दोघे बावचळली होती.भोर सोडून ती दोघे पहिल्यांदाच मोठ्या शहरात आली होती.तुमच्या आजी कडॆ मी तुम्हाला नेत आहे असे आण्णांनी सकाळीच सांगितले होते
’ पण काकू आहे ना आमची आजी? ती भोरला आहे’
’काकू आमची आई, हि तुमच्या आईची आई. तुमचे मामा-मावशा सगळे भेटणार आहेत, तिथे शहाण्यासारखं वागायचं’
सरस्वती-काकूंनी मुलांना आत बोलावले. तात्या, दादा यांच्याशी अण्णा बोलू लागले
मुले आत गेली काकूंनी दोघांना मांडीवर घेतले आणि त्यांना पोटाशी धरुन त्या रडू लागल्या, मुले अगदीच बावरुन गेली,हि आपली आज्जी आणि ती रडतीय, आपल्या काकू आज्जी्ला कधी रडताना त्यांनी बघितले नव्हते.
पाच-एक मिनिटांनी मुलगी म्हणाली,’आज्जी, अगं तुझी मांडी दुखेल ना, मी खाली बसते.आणि आम्हाला जायचय लग्नाला’
काकू सावरल्या.
’नाही गं, मी आज पहिल्यांदाच बघितल ना, तुम्हाला तशी नाही जाऊ द्यायची, शिरा केलाय ना तुमच्या साठी.खायला देते’
कशी नक्षत्रासरखी मुलं आहेत,मुलगी बोलण्य़ात अगदी गंगूवर गेलीय.काकूंनी भराभरा बशा भरल्या.प्रमिलेला हाक मारुन बाहेर खाणे पाठवले, मुलांना खायला देवुन ती खाताना त्या पुन्हा त्यांना न्याहाळू लागल्या. काकूंची, रमाकाकीची चौकशी त्या करत होत्या, मुलगी उत्तरे देत होती.
दुसऱ्या दिवशी त्यांनी अण्णांना मुलांना घेवुन जेवायला येण्याचे आमंत्रण दिले,त्यादिवशी त्यांना लग्नाला जायचे होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी साग्रसंगित स्वयंपाक केला. नातीसाठी सुरेख जरीकाठाचे परकर-पोलके,नातवाला जरीची टोपी,शर्ट-चड्डी आणि मुंजीची म्हणून चांदीची वाटी दिली.मामांनी पेन,मावशांनी रंगित चित्रे अशा अपूर्वाईच्या वस्तू दिल्या.या लोकांना आपण यापूर्वी कधी बघितले नव्हते याचा मुलांना विसर पडला.त्यांच्या मायेने आणि आपुलकीने मधले अंतर नाहिसे झाले.

निघायची वेळ झाली.पुन्हा एकदा काकूंना गहिवर आला. त्या अण्णांना म्हणाल्या,’आमची चूक झाली,एवढे दिवसात आम्ही मुलांची साधी चौकशीही केली नाही, पण आमचा खरोखरीच नाईलाज होता, तुमच्या घरात ती सुखात असणार याची खात्री होती, पण खरं सांगते एकही दिवस या मुलांची आठवण झाली नाही असा गेला नाही.मुलांना सुट्टीत आजोळी पाठवा.आमच्या बरोबर राहतील तशी त्यांना आमच्याबद्दल माया वाटेल, गंगूचं मी आजारपण ,बाळंतपण नाही करु शकले, निदान तिच्या मुलांना आजीची माया देईन,नाही म्हणू नका’
’काकू मी तुमची परिस्थिती समजू शकतो, अहो,आमचा राग नाही बरं तुमच्यावर, म्हणून तर पत्ता शोधून मुलांना आणलं मी तुमच्याकडे,आम्हालाही वाटतं गंगू अशी अकाली जायला नको होती, फार गुणी होती बिचारी आमच्या मोठ्या घरात तिच्या कलागुणांचं चिज नाही झाल.असो, तुम्ही काही वाटून घेवू नका, मुलं तुमच्याकडे येतील सुट्टीत.

तेंव्हापासून दरवर्षी, तर कधी वर्षाआड मुले मे महिन्याच्या सुट्टीत कोल्हापूरला जावू लागली.त्यांचा एक मामा त्यांना आणायला येई.दुसरा परत सोडायला.त्यांच्या मामाचा वाडा काही चिरेबंदी नव्हता,ना शेतीवाडी ना दूध-दुभते.मात्र मुलांना तेथे भरपूर माया मिळाली.लाड आणि कौतुक याची त्यांना नव्याने ओळख झाली. न बघितलेल्या बहिणाच्या मुलांवर मामा -मावशांनी प्रेम केले. आजी-आजोबांनी लाड केले.या मायेच्या जोरावर पुढील आयुष्यात आलेल्या अवघड प्रसंगांना तोंड देताना त्यांना नैराश्य, वैफल्य अशा विकारांनी ग्रासले नाही. न चाखलेल्या आईची मायेची गोडी आजोळच्या ओळखीने मिळाली.


©

Friday, July 9, 2010

ब्लॉगचा वाढदिवस

म्हणता म्हणता दोन वर्षे झाली. ब्लॉग या संकल्पनेची माहिती होती. दुसऱ्यांचे ब्लॉग वाचत होते.आपण लिहावे किंवा आपण लिहिलेले कोणी वाचेल असे वाटत नव्हते.माझ्या भाच्याने मला भरीस घातले.त्याच्या कडून ’देवनागरी’ लिहिण्याचे सॉफ्ट्वेअर घेण्यापासून सुरुवात होती.कॉम्प्युटरशी ओळख होवुन वीसाहून अधिक वर्षे झाली होती.कार्ड पंचींगच्या जमान्यापासून आम्ही त्याला ओळखतो.कोबोल,फ़ोर्ट्रान अशा संगणकीय भाषांमधून प्रोग्राम लिहून आपल्याला हवे तसे आऊट्पुट काढण्याची झटापट करण्य़ाचे काम आम्ही करत आहोत या क्षेत्रातील झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना कधी मजा आली तर कधी दमछाक झाली.

मला आठवतयं, आम्ही तेंव्हा युनिक्स ऑपरेटींग सिस्टीमवर काम करत असू.प्रत्येक सूचना संगणकाला टाईप करुन द्यावी लागे, त्यावेळी आमच्या ऑफीसमध्ये मल्टीमिडीया संगणकावर व्याख्यान झाले होते.आणि कॉम्प्युटरवर तुम्ही गाणी ऎकू शकाल,सिनेमे बघू शकाल अशा गोष्टी ऐकून आम्ही चकित झालो होतो, पण ही किमया आपल्याला इतक्या लवकर बघायला मिळेल अशी कल्पना नव्हती. मायक्रोसॉफ्टच्या ’विंडोज’ ने तंत्रज्ञानाची जी अद्भूत खिडकी उघडली आणि हा हा म्हणता याने साऱ्या जगावर जादू केली. सर्वसामान्यापासून सगळे सह्ज हा वापरू लागले. माहितीजालाने जग जवळ आले.ई-मेल ने सगळे संपर्कात आले. आता इंग्रजीसारखेच इतर भाषांमधुन लिहिता येवु लागल्याने भाषांचे अडसरही दूर झाले.या बदलाचे नुसतेच साक्षीदार न बनता त्याचा उपयोग करुन कामे तर करता आलीच पण विसाव्याचे दोन क्षणही त्यातून मिळवता आले हे मी माझे भाग्य समजते.

संगणक या क्षेत्रातील वेगाच्या प्रगतीचा विचार करता यात टिकण्याचा सोप्पा मार्ग मला मिळाला,’गुरुविण कोण दाखवील वाट..’ हे खरे असले तरी इथे तुम्ही तुमचा गुरु हा वयाने लहानच(तुमच्यापेक्षा) बघावा लागतो.कारण त्यालाच सगळ्यात अद्ययावत ज्ञान असते.माझ्या भाच्याला तो लहान असताना मी एकदा माझ्या ऑफिसमध्ये नेले होते, तेंव्हा मी पुणे विद्यापिठाच्या संख्याशास्त्र विभागात काम करीत होते, तेथे प्लॉटरवर आम्ही ग्राफ काढीत होतो,ते बघून तो एवढा खूश झाला. पेन होल्डरमधे पेन घेवुन कागदावर चित्र उमटते ते बघून तो थक्क झाला होता.
"मावशी त्या कागदावर आता हत्ती काढ ना !"
"अरे, हत्ती नाही येत काढता "
"का? तो कॉम्प्युटर हया रेघा कशा मारतो , तसाच काढेल ना हत्ती, घोडा काही पण"
मग मी त्याला प्रत्येक रेघ काढण्यासाठी कसा प्रोग्रॅम लिहावा लागतो वगैरे समजविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा
" मावशी , मग सोप्प आहे, आता हत्तीचे चित्र काढायचा प्रोग्रॅम लिही म्हणजे हत्ती काढता येईल"
मावशी अर्थातच निरुत्तर झाली. मावशी नुकतीच त्या कॉम्प्युटर वर शिकायला लागली होती,आणि भाच्याने डायरेक्ट पदवी परिक्षेचा प्रश्ण सोडवायला दिला होता, आपले अज्ञान न दाखवता त्याचे समाधान कसे करावे असा मला पेच पडला.अर्थात माझा भाचा बराच चतुर होता, त्याने मावशीची स्थिती ओळखली असावी, त्याने हत्तीचा नाद सोडून कॉम्प्युटर वर इतर गोष्टी कशा करता येतात, पाने कशी प्रिंट होतात ते बघायला सुरुवात केली.
आता वीस वर्षांनी हाच मुलगा कम्युनिकेशन आणि ग्राफिक डिझाइन मधला मास्टर झाला(याला मी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे काही म्हणणार नाही), तो माझा गुरु ठरला ब्लॉग बनविण्यासाठी.

त्याने स्वतःच्या ब्लॉगची मला लिंक पाठवली आणि मी ब्लॉगविश्र्वाची सभासद, नियमित वाचक झाले.नंतर त्याचे मला आवडलेले लेख मी त्याला प्रसिध्द कर असे म्हणू लागले,या पिडेतून सुटका मिळावी म्हणून कदाचित त्याने मला मावशी तू पण तुझा ब्लॉग बनव असा सल्ला दिला.मी गुगलच्या मदतीने सुरुवात केली.मला आडेल तेंव्हा मी त्याला फोन करायची.तो पण बिचारा अतिशय पेशन्स ठेवुन मला उत्तरे द्यायचा.अगदी लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रात सांगितल्याप्रमाणे, त्या जशा नव्याने कादंबरी लिहिताना बालकवींना सतत विचारीत तशी मी त्याला विचारत होते. तो लहान असताना मी त्याला जे काही शिकविले त्याची त्याने परतफेड केली.मी त्याला रागावले असेन त्याने मात्र वयाचा मान ठेवून शांतपणे मावशीचे प्रश्ण ऎकून तिला समजतील अशा शब्दात उत्तरे दिली.
शेवटी एकदाचा ब्लॉग बनला. म्हणजे त्याची बाह्य रुपरेखा बनली.मजकूर तयार होताच, पण तो भरायचा कसा? हा बेसिक प्रश्ण होता.ब्लॉगच्या डॅशबोर्डवर जावुन नवीन पोस्ट भरणे हा ऑप्शन सापडेना.अलिबाबाच्या गुहेतून बाहेर पडताना त्याच्या भावाला जसे ’खुल जा सिम सिम ’ आठवेना , तशी अवस्था झाली.पुन्हा एकदा दादाला(भाच्याला मी माझ्या मुलींप्रमाणेच दादा म्हणते या क्षेत्रात तो तसाही आहेच दादा,नाव मुद्दाम सांगत नाही चिडेल माझ्यावर एखादवेळी)
फोन , तो (म्हणजे फोन आणि पर्यायाने तो पण) आऊट ऑफ रेंज.माझी तडफड , धडपड चालू होतीच अखेरीस केंव्हा तरी योग्य ऑप्शन मिळाला आणि एकदाची सुरुवात झाली !

दोन वर्षांमध्ये पांढऱ्यावर बरेच काळे करुन झाले. बरेच शिकायला मिळले.खूप जणांनी चिकाटीने वाचले.काहींनी आवडल्याचे अभिप्रायही पाठविले.एकूणात ही सगळी आनंदयात्रा ठरली.आपले मूल मोठे होताना बघण्याचा जो आनंद असतो त्याच प्रकारचा आनंद ब्लॉगने दिला.आपले विचार व्यक्त करता येणारे हे मुक्तपीठ आहे. याचा वाचकवर्ग जगभरातील आहे.आणि स्वांतसुखाय अशी ही निर्मिती आहे.कुणाकडे प्रसिध्दिला पाठविण्याची कटकट नाही आणि साभार परत आल्याचे दुःख नाही.

समस्त ब्लॉगवाचकांचे मनःपूर्वक आभार आणि आमच्या लाडक्या दादाचेही.

Wednesday, June 30, 2010

आमची पिढी -ऎकणाऱ्यांची

दर वीस ते पंचवीस वर्षांनी बदलणाऱ्या माणसांच्या वय विचार-आचार यातील बदलाला पिढी म्हणण्याच्या काळापासून दर चार वर्षांत हेच बदल झपाट्याने होताना बघणाऱ्या काळाचे साक्षीदार म्हणजे आमची पिढी.

आमच्यापैकी बहुतेकांचे वाडवडील खेडेगावी. आमच्या पिढीतल्या लोकांचे वडील शहरात आले, शिकले नोकऱ्या मिळवल्या.बहुतेकांनी हलाखी सोसली.आपल्या आर्थिक,बौध्दिक कुवतीप्रमाणे त्यांना कामे मिळाली आणि त्यानुरुप त्यांची आयुष्ये घडली.या लोकांना आपल्या घरच्यांसाठी, भावंडांसाठी थोड्याफार प्रमाणात झिजावे लागले. शहरात हे आल्याने खेड्यातून त्यांच्याकडे अडी-अडचणींना माणसे येत.त्यांना जमेल तशी मदत करावी लागे.त्यामुळे आमच्या पिढीत एकत्र कुटुंबात कुणी राहिले नसले तरी माणसांची सवय , त्यांच्यासाठी करावी लागणारी तडजॊड, पदरमोड याचे शिक्षण सहज मिळाले.आमच्या वेळी आजुबाजुच्या बऱ्याच घरात, शाळेतल्या मैत्रीणींत, नातलगांमध्ये नोकरी करणाऱ्या बायकांचे प्रमाण फार थोडे होते. ज्या नोकरी करत त्या बरेचदा घराला आर्थिक हातभार लागावा या साठीच आणि न करणाऱ्या सुध्दा खूप सुखवस्तु होत्या अशातला भाग नव्हता, त्यांचे तेवढे शिक्षण नव्हते अथवा त्यांना योग्य संधी मिळालेली नव्हती. एकूणात अजुबाजूचा वर्ग पैसेवाला नव्हता.त्यामुळे स्वावलंबनावर भर असे.धुण्य़ाभांड्याला बाई म्हणजे फार झाले आणि पोळ्याला बाई हे तर पैसा जास्त झाल्याचे लक्षण असे. शाळेत असताना क्लास(याला तेंव्हा शिकवणी म्हणत)ला फक्त ’ढ’ मुले जात, ती देखील पैसेवाल्यांची.घरकाम म्हणजे केर -फरशी धुणे भांडी या सगळ्यात मुलींना मदत करावी लागे.त्याशिवाय दळण आणणे,सामान-भाजी इ.आणावे लागे.मे-महिन्याच्या सुट्टीत पापड,पापड्या कुरडया, बटाट्याचा किस,सांडगे आदि करण्य़ात मस्त वेळ जात असल्याने सुट्टी बोअर होत नसे आणि सुट्टीत थंड हवेच्या गावी जाण्याचा खर्चही होत नसे.सुट्टीत बहुतेक जण आपापल्या गावी जावुन येत.

शिक्षणाचे महत्त्व समजलेला हा वर्ग होता, किंबहुना त्याशिवाय दुसरे काही माहित नसलेला असेल कदाचित, शाळेव्यतिरिक्त इतर ठिकाणी जावुन काही शिकणे माहित नव्हते(किंवा पारवडत नव्हते). खेळ, वक्तृत्त्व, लेखन -वाचन, गायन,चित्रकला सगळ्याची भिस्त शाळेवर असे. मुलांच्यामध्ये असणाऱ्या अंगभूत गुणांचा झालाच तर विकास शाळेत होई आणि त्याचा प्रकाश शाळेच्या स्नेहसंमेलनात किंवा जास्तित जास्त गल्लीतल्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात पडे.या गुणांना दाखवायला आजच्या सारखे रियालिटी शॊ नसल्याने त्यांचे म्हणावे तेवढे महत्त्व् जाणवत नसे, म्हणूनच त्याच्यात वेळ घालवणे वा त्यावर वेळ घालवणे म्हणजे वाया जाणे असे बहुतेक पालकांना वाटे.त्याचा तोटा असला तरी एक फायदा म्हणजे आज कालच्या मुलांना रियालिटी शो करता जे काय कष्ट पडतात ते आंम्हाला पडले नाहित आणि बक्षीस मिळाले नाही की त्यांचे आई-बाप जसे रडतात तशी आमच्या पालकांवर पाळी आली नाही.मेडीकल किंवा इंजिनियरींगला प्रवेश मिळणे हे हुशार असल्याचे एकमेव लक्षण होते. मेडीकल आणि इंजिनियरींगची संपूर्ण महाराष्ट्रात मोजकीच शासकीय महाविद्यालये होती.त्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बरीच स्पर्धा होती्.त्यामुळे बारावीमध्ये क्लासेस लावण्याचे लोण आले होते. मोजके क्लासेस फार प्रसिध्द होते. त्यांच्या जाहिराती पेपरमध्ये येत. प्रवेश मिळाला कि तो विद्यार्थी हुशार न मिळालेला अर्थात ’ढ’ हे ठरुन गेलेले असे.प्रवेश न मिळालेले विद्यार्थी खूप निराश होत पण आत्महत्येचे प्रमाण कमी होते.(कदाचित मिडीयाचा महिमा नसल्याने ते बाहेर कळत नसेलही), मात्र आमच्या आजुबाजुला तरी अशा घटना काही बघायला ऎकायला नाही मिळाल्या. इतरत्र फारशा संधी उपलब्ध नसताना, त्यांची फारशी माहिती नसताना सुध्दा मुले बी.एस्,स्सी. किंवा तत्सम कोर्स करुन कुठल्यातरी मार्गाला लागायची.पालक देखील या गोष्टीचा फारसा बाऊ करुन घेत नव्हते.मुलांच्या शैक्षणिक जीवनात त्यांचा सहभाग फक्त फी देण्यापुरता असल्यामुळे त्याच्या यशापयाशाला तो एकटाच जबाबदार असे, म्हणूनच त्याला प्रवेश मिळणे वा ना मिळणे हा पालकांचा ’इगो पॉईंट’ ठरत नव्हता.

आम्ही अभ्यास करत होतो, घरातली कामे सांभाळून.आमचे कॉलेजच्या शैक्षणिक जीवनातले प्रश्र्ण् आम्हीच सोडवत होतो घरी कुठलीही अडचण सांगायची नाही.असे असूनही आम्ही आमच्या आई-वडीलांचे ऎकत होतो, म्हणजे ऎकावेच लागे.आमच्या घरात तसे बरेच मोकळे वातावरण होते. म्हणजे मी बरेचदा आई -किंवा दादांशी न पटणाऱ्या गोष्टींबाबत वाद घालत असे.पण बाजू त्यांच्यावर उलटू लागली तर ते त्यांच्या वडीलकीचे अस्त्र बाहेर काढीत. आई तर चक्क
’ काय बाई तुम्ही मुली , खुशाल मोठ्य़ंच्या अरे ला कारे करता! माझे ऎकलेच पाहिजे. तू मला झालीस कि मी तुला?’ असे विचारुन निरुत्तर करत असे. एकूण काय कितीही बडबड केली तरी त्याला मर्यादा होती. आईला शिक्षण मिळवण्यासाठी घरातुन खूप विरोधाला तोंड द्यावे लागले होते, म्हणून मुलगी असून शिकायला सहज मिळते याचे तिला अप्रुप होते. पण ती विहिरीचे पाणी काढून,घरकाम , झाडलोट, शेणगोळा सगळे करुन शाळेत जायची तर आम्ही कॉलेजला जाण्यापूर्वी केरफरशी केली आणि नळावर धुणे धुतले तर कुठे बिघडले असा तिचा सवाल असे. घरकामाला पर्याय नव्हता. ते सांभाळून अभ्यास करावा आणि चांगले मार्क मिळवावे आशीच अपेक्षा होती.

घरीच इतके तावून सुलाखून निघाल्याने सासरी जड जाण्याची वेळ आली नाही. सासरच्यांशी जमवून घेतलेच पाहिजे.नोकरी करुन घरचे सगळे करायलाच हवे असे धडे मिळाले होते. गावातच सासर असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कुरबुरी,तक्रारी इतरांकडून माहेरी येता कामा नयेत असे आधीच बजावले होते.आमच्या पिढीतल्या मुलींचे नवरे देखील जवळपास सगळे श्रावणबाळाचे वंशज.लग्नाआधी ते ही आमच्यासारखेच आई-वडीलांचं ऎकणारे, नंतरही तसचं, त्यामुळे घरात सासु-सासऱ्यांशी झालेल्या छोट्या-मोठ्या मतभेदांबद्दल नवऱ्याजवळ बोलण्यात अर्थ नसे.तिकडून सहानुभूतीची सुतराम शक्यता नसे.आणि स्वतःच्या आई-वडीलांजवळ बोलण्याची प्राज्ञाच नव्हती. त्यामुळे सासरच्यांशी जुळवून घेत, आपल्याच पातळीवर कधी गोडीत, कधी दुर्लक्ष करुन,तरी कधी मनातल्या मनात चिडून एकत्र राहीलो आम्ही. त्याचे फार दुःख झाले अशातला भाग नाही, पण एकाच गावात सासु-सासऱ्यांपासून स्वतंत्र राहणाऱ्या आमच्या पैकी काही जणी फटकळ,तुसड्या, माणूसघाण्या ठरल्या. ज्यांचे सासु-सासरे गावी रहात होते, ते नोकरी करणाऱ्या सुनेच्या अडचणींना क्वचित आले, त्यांच्या गरजांसाठी सुनांनी ऑफीसमधून रजा काढल्या पाहिजेत अशी अपेक्षा बाळगून राहिले.

आमच्या पिढीत आम्हाला एखाद-दुसरे भावंड असल्याने आई-वडील आणि सासु-सासरे यांच्या म्हातारपणाची, आजाराची सर्व जाबाबदारी आमच्यावर पडली. ती जमेल तितक्या निष्ठेने बहुतेकांनी पार पाडली वा पाडत आहेत.

आता आमच्या पिढीतल्या लोकांनीही चाळीशी ओलांडली,पन्नाशी गाठली आज आमच्यापैकी काहींची मुले शिकत आहेत्, काहींची शिक्षणे संपली,कुणाला जावई आले, कुणाला येऊ घातलेत. नव्या पिढीतली आमची मुले स्वतंत्र विचारांची आहेत.त्यांच्याकडे आचार -विचाराचे स्वातंत्र्य आहे मात्र स्वावलंबन नाही.आजूनही स्वत्ःचे कुठलेही काम ती आई-वडीलांना बिनदिक्कत सांगू शकतात. नव्हे तो त्यांचा हक्कच आहे. आम्ही त्यांना धाकात नाही ठेवले हा दोष आमचाच आहे. आपल्या मुलांनी स्पर्धेत टिकावे यासाठी आमच्या पिढीने त्यांच्याकडे लक्ष दिले, (कदाचित नकॊ तेवढे).त्यांना अभ्यास आणि अभ्यासेतर गोष्टींना वेळ मिळावा याकरता घरातली कुठलीही कामे,अडचणी त्यांच्यापर्यंत जाऊ दिल्या नाहीत.पैशाची बाजू बहुतेक ठिकाणी आई-वडील मिळवते असल्याने ठिक होती, घरात कामाला बायका होत्या.त्यामुळे मुलांना शारीरिक ,आर्थिक कुठलेच ताण नव्हते.त्यांना अभ्यास,परीक्षा यांचे भरपूर टेन्शन असे नाही असे नाही. पण या मुलांवर जागतिकीकरणाचा बराच प्रभाव पडला, म्हणजे पाश्चात्य संस्कृती विशेषतः अमेरीकन यांमध्ये चांगलीच रुजू लागली.आचार,विचारांचे स्वातंत्र्य, वेळी-अवेळी फिरण्याचे, मजा करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी घेतले.आपले जोडीदार निवडायचे स्वातंत्र्यही त्यात आले.आई-वडीलांचे न ऎकणॆ,त्यांच्याजवळ न राहणॆ इतकेच नाही तर त्यांनी मुलांकडून कुठलीही अपेक्षा ठेवणे ही किती चुकीची गोष्ट आहे, परदेशात आई-वडील मुलांना कसे पूर्ण स्वातंत्र्य देतात, त्यांच्या कडून कुठलीच आर्थिक, मानसिक, भावनिक कुठलीच मदत मागत नाहीत आणि आपले आई-वडील आपल्या सगळ्य़ा बाबींमध्ये लक्ष घालतात असे त्यांना वाटते.पण त्याच वेळी तिकडची मुले वयाच्या सोळाव्या वर्षापासून एकटी राहतात, पडेल ती कामे करुन मिळेल ते शिक्षण घेतात, आपण पंचविशी पर्यंत आई-वडीलांच्या खर्चाने मनसोक्त शिकू शकतो हि गोष्ट ते सोयीस्करपणे विसरतात. स्वातंत्र्यांची किंमत मोजावी लागते असे म्हणतात. मुलांना दिलेल्या स्वातंत्र्य़ाची किंमत आम्हीच मोजत आहोत. आज आमची मुले आमचे ऎकत नाहीत याचा विषाद आहे कि आजही आम्हाला आमच्या आई-वडीलांचे ऎकावे लागते याचे दुःख आहे, काही कळेनासे झाले आहे.

वृध्दापकाळामुळे माझी आई सध्या माझ्या घरी आहे. माझ्या मुली घरात कपड्यांचा पसारा करतात, खाल्लेल्या ताटल्या तशाच टाकून शाळा-कॉलेजला पळतात. घरी कुणाला बोलावले तरी त्यांना वेळ असेल तरच घरी थांबतात.वडीलांशी चढ्या सुरात बोलतात, माझ्या बडबडीकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.परवा आईच्या खोलीत मुलींचे कपाट मी आवरत होते.ती मला म्हणाली, " काय गं, तू अगदीच तुझ्या मुलींना शिस्त लावली नाहीस, त्यांना तुझा काडीचा धाक नाही. किती पसारा करतात. अभ्यासात आहेत हुशार, ती देवाची कृपा. पण तू काही त्यांना वळण नाही लावलसं ! , मला आज फक्त दूध दे कालच्या इतकं गरम नको, त्यात सुंठ घाल न विसरता"
मी म्हणाले, " आई माझ सगळं आयुष्य ऎकण्यात गेलं, लहानपणी तुमचं ऎकलं, नंतर सासु-सासऱ्यांच आणि आता मुलांच. अजूनही तुमच ऎकतेच आहे, मुलींचही ऐकते. लहानपणी तुम्ही पाणी आणून दे म्हटल्यावर पळत जावून देत होते, आता मुली टि.व्ही. समोर नाहीतर कॉम्प्युटर समोर बसून म्हणतात आई पाणी दे , कि त्यांना ही पाणी देते आम्हाला मात्र शेवटपर्यंत पाणी आमच्याच हातांनी प्यायचे आहे त्यासाठी देवाने कायम धडधाकट ठेवावे एवढीच प्रार्थना आहे. "


©

Wednesday, May 19, 2010

गावाकडच्या गोष्टी... क्रमश:

(माझ्या आईचे माहेरचे कुटुंब मोठे , तशी जुन्या काळातील सगळीच कुटुंबे मोठीच असत, एकत्र राहत असल्याने त्यांच्यात संबंध असत, भांडणे, भाऊबंधक्याही असत.तसेच माया, प्रेमही असे. माझ्या आईकडून तिच्या घराण्यातील सगळ्या काका-आत्यांच्या, मामा मावशांच्या कथा मी वारंवार ऎकलेल्या आहेत.
सध्या आई आजारी असते, कंपवाताने ती घराबाहेरही पडू शकत नाही.रेडीओखेरीज दुसरी करमणुक तिला नसते, तिच्याशी बोलताना आजार सोडून बोलणे कठीण असते, मग परवा मी पुन्हा तिला तिच्या बालपणात नेऊन त्या आठवणींमध्ये तिला रमवण्याचा प्रयत्न केला त्यातुन तिचा वेळ चांगला गेलाच पण मला देखील काही गोष्टी नव्यानेच समजल्या.तिने सांगितलेल्या काही घटना या तिलाही केवळ ऎकुनच माहित आहेत, आता तिच्या घराण्यातली सगळ्यात मोठी अशी तिच शिल्लक आहे, बाकिची मंडळी तिच्याहून लहानच असल्याने या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहतील. गोदुची कथा त्या पैकीच एक. या गोष्टी ऎकताना मला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे तिला तर नाहीच माहित पण ती कुणालाच माहित असणार नाहीत. तिने सांगितलेल्या गोष्टीमंधले कच्चे दुवे कल्पनेने जोडण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा कथानकांवर खर तर चांगल्या मालिकाही बनू शकतील, पण सध्या तरी त्या ब्लॉगवाचकांपर्यंत पोचाव्यात या साठी हा लेखन प्रपंच.....)




तळ्य़ाच्या आत्याबाई अस त्यांना म्हणतं.कोकणातलं हे लहानस खेडं. पण गावचे खोत असल्यानं गावात दबदबा होता. लोकांची घरात उठबस.घरचे भात, नारळ भरपूर.पोफळीच्या बागा.खाऊन पिऊन सुखी कुटुंब.आत्याबाईंचे माहेर भोरचे.त्यांची मोठी अक्का दिसायला गोरी-ऊंच, नाजूक,तिचं लग्न चटकन जमलं,तिच्या यजमानांची सरकारी नोकरी.माई मात्र काळी सावळी,उंचीने बेताची तिचं बाशींगबळ जड.लग्न जमायला फार त्रास पडले.भो्रच्या अण्णा मामांनी तिच्याकरीता बरीच स्थळे बघितली पण योग नव्हता.अखेर शेवटी अलिबाग जवळ अक्षी नावाच्या अगदी लहान गावातील मुलाचे स्थळ समजले.सुदैवाने माणसे चांगली होती, परिस्थिती नव्हती तितकी चांगली, पण त्यांनी माईला पसंत केली आणि लग्न जमले.तळ्याची माई अक्षीला जाऊन पडली.तिथले वातावरणही कोकणचेच त्यामुळे माईला वातावरणाशी जुळवून घेणे कठीण गेले नाही. माईचे यजमान गोपाळाराव भिक्षुकी करीत.फारशी जमीन देखील नव्हती.पण माईला त्याचे दुःख नव्हते.कामाची तिला पहिल्यापासून सवयच नाही तर आवड होती.परसातल्या भाजीपाला आणि घरच्या भातामुळे खायप्यायची ददात नसे. तिने आंबे, फणस यांची देखभाल केली.उन्हाळ्यात त्यांच्या आंबापोळ्या, फणसपोळ्या करणे, कपडे शिवणे हे करुन तिने चार पैसे मिळवायलाही सुरुवात केली.पाठोपाठ दोन मुली झाल्याने घरात सगळेच नाराज झाले होते. मुलींच्या पाठीवर बरेच दिवस तिला मुल झाले नाही.मधल्या काळात मागे रहाणाऱ्या एका कुणब्याच्या बाईचे रात्री बोलावणे आले होते ती अपरात्री अडली होती. सुईणीला बोलावणे धाडले होते पण हि पहिलटकरीण घाबरली होती, माई लगोलग गेली, सुईण येई पर्यंत तिने चूल पेटवून पाणी तापवले इतरही तयारी केली.तान्हु सुईण पार वाकली होती तिला माईने सगळी मदत केली. या घटनेनंतर जवळपासच्या आडल्या बायकांना सोडवायला माई आपणहून जायला लागली.
मोठी सुमन मॅट्रीक झाली तिला आठवीनंतर आलीबागला ठेवावे लागले,पण माईला शिक्षणाचे महत्त्व असल्याने तिने मुलीला शिकवायचा निर्धार केला होता, मुलगी ही हुशार होती.पण आलीबागला पुढच्या शिक्षणाची सोय नसल्याने मुंबई नाहीतर पुण्याला पाठवायला हवे होते, हा खर्च मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर होता.

याच वेळी सुमनला नागपूर कडून एक स्थळ सांगून आले.घरची परिस्थिती उत्तम, मुलगा शिकलेला माणसं चांगली.माईच्या यजमानांनी भितभितच पत्रिका पाठवली.पत्रिका जुळतीय, मुलीला घेवुन पुढची बोलणी करायला या, असे पत्र आल्यावर माईला आनंद झाला तो शब्दात सांगता येण्याजोगा नव्हता, मात्र गोपाळाराव चिंतागती झाले. आपल्याला ही उडी झेपेल का? इतकी मोठी माणसं, आपल्या जवळ काय आहे?हुंड्य़ावरुन लग्न मोडायचं, की मुलीच्या सुखासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवायचं? काय करावं त्यांना सुचेना. माईला त्यांच्या मनःस्थितीची कल्पना आली.
ती म्हणाली,"मला वाटतं आपण एवढं हताश होवु नये, त्या मंडळींना आपल्या सुमनचा फोटो पाठवू बरोबर आपल्या परिस्थितीची कल्पनाही देवू. आम्ही आम्हाला झेपेल असं कार्य हौसेने करुन देवू म्हणावं, मात्र तुमच्या तोलामोलाचं करण आम्हाला जमणार नाही., त्यांना पटलं तर हो म्हणतील नाहीतर आपण सुमनसाठी दुसरे मुलगे बघू. पण त्यांच्याशी काहीच पत्रव्यवहार न करता गप्प बसणे बरोबर नाही"
माईचे बोलणे त्यांना पटले, सुमनचा फोटॊ आणि सविस्तर पत्र त्यांनी नागपूरला पाठवून दिले.पंधरा दिवसांत नागपूरहून उत्तर आले, आम्हांला मुलगी पसंत आहे.खर्चाची काळजी आपण अजिबात करु नये.आम्ही माणसांचे मोल मानतो.

गोपाळराव नागपूरला जावून घर, मुलगा बघून आले,त्यांनी आम्ही अक्षीला लग्न करुन देवू असे सांगितले, नागपूरकरांनी कुठल्याही मागण्या केल्या नाहीत.आम्ही पन्नास माणसे येवू भाड्याचा खर्च देखील त्यांनी मागितला नाही.सारे अक्षीगाव माईच्या मदतीला आले.माईने मोठ्या हौशीने तयारी सुरु केली.शेजारच्या पुरोहितांच्या वाड्यात मुलाकडच्यांना जानवसा दिला होता.विहिणीसाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.सिमांतपूजनाच्या जेवणाला उकडीचे मोदक केले होते.भोरहून माईच्या मामांनी वामनरावांना नेले होते, त्यांच्या स्वयंपाकावर व्याही मंडळी खूष होती.एकंदरीत कुठलेही रुसवेफुगवे भांडाभांडी न होता कार्य झकास पार पडले.माईच्या घरी पैशाची रेचचेल नव्हती, पण माणसांच्या आगत्याने, प्रेमाने सासरचे लोक भारावून गेले अर्थात त्यांनाही याच गोष्टीचे महत्त्व होते.त्यांच्या घरच्या मोठ्या कारभाराला अशी दहा माणसात वावरणारी मुलगीच हवी होती.

सुमन सासरी गेली.तिच्या कामसू स्वभावामुळे ती सासरी लाडकी बनली.सासरचे रितीरिवाज तिने चटकन आत्मसात केले.सासरच्या लोकांना आपलेसे केले ते आपल्या लाघवी स्वभावाने आणि कामाच्या झपाट्याने.

सुमन सासरी गेली, आणि अचानक माईची कुस पुन्हा उजवली.तिलाही प्रथम खरे वाटले नाही, थोडे संकोचल्यासारखेही झाले. पंधरा वर्षांनी पुन्हा घरात पाळणा हलला, या खेपेला तिला मुलगा झाला.बरेच वर्षांनी घरात बाळ आले, मुलगा झाल्याचा सगळ्यांनाच आनंद झाला."माई, तुम्ही लई बायकांची बाळंतपण केलीत म्हनुन द्येवानं तुम्हान्सी प्रसाद दिला" असं अजूबाजुच्या बायका म्हणू लागल्या. सुमन देखील सासरी सुखात होती. तिची तशी पत्रे येत, तिला पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजात देखील घातले होते.एकंदरीत दिवस चांगले चालले होते. माईच्या घरात सुबत्ता नसली तरी समाधान भरपूर होते.तिच्या घरातील सगळ्यांनाच माणसांचे आगत्य होते.आहे त्यात आनंदाने राहण्याची वृत्ती होती आणि आपले आंथरुण पाहून पाय पसरायचा स्वभाव असल्याने घरात वखवख नव्हती.

पण सगळे दिवस सारखे नसतात.संध्याकाळची पूजा सांगून गोपाळराव घरी येत असताना त्यांना साप चावल्याचे निमित्त झाले आणि वेळीच उपचार न मिळाल्याने चार पाच तासांतच ते गेले.अचानक घरावर संकट कोसळले. माईचा बाळ नुकताच चालायला लागला होता. त्याचे सगळे आयुष्य घडवायचे होते, एका मुलीचे लग्न व्हायचे होते, माईला आभाळ फाटल्यासारखे झाले तरी रडत बसायला वेळ नव्हता. तळ्याहून भाऊ,वहिनी आले.आई नाही येवु शकली तेच चार दिवस माईला माहेरी घेवून गेले.आईच्या कुशीत माईने रडून घेतले ते अखेरचे.आता मलाच खंबीर व्हायला हवे,नातेवाईक आणि त्यांची मदत किती दिवस पुरणार? असा विचार करुन आठ दिवसात माई परत आपल्या घरी आली.

सुमनला वडील गेल्याचे समजले होते,खरं तर ती माहेरी बाळंतपणाला यायची होती पण अचानक ही तार आली, तिच्या घरच्यांनी प्रथम तिला सांगितलेच नाही, तिची मनःस्थिती बघून सासूबाईंनी तिला जवळ घेवून सांगितले. सुमनला फार दुःख झाले, पण ती काही करु शकत नव्हती तिच्या या नाजुक अवस्थेत तिला अक्षीला पाठवायला घरचे तयार नव्हते.

माईने सगळा कारभार बघायला सुरुवात केली. भिक्षुकीतून मिळणारी आवक बंद झाली होती, मात्र तिने असलेल्या लहानशा शेताच्या तुकड्यावर लक्ष घालायला सुरुवात केली.गोड बोलून चार लोक तिने जोडलेले होतेच.तिने सुईणीची कामे देखील करायला सुरुवात केली.लांबलांबच्या वाड्या वस्त्यांवरुन लोक तिला बोलवायला येत, माई लगोलग जाई. रात्री अपरात्री देखील माई त्यांच्या बरोबर जात असे. तिने कधीच तोंडाने मोबदला मागितला नाही.कधी कधी तर काही लोक इतके गरीब असत, की त्यांच्या कडून आल्यावर अंघोळ करुन माई भाताच बुडकुल शिजवी,त्यावर तूप, लोणच्याची फोड घाली कधीतरी गुळाचा सांजा असं जेवण बाळंतीणीला पाठवी. मात्र ही माणसं, अडीनडीला माईच्या मदतीला येत, तिच्या भातलावणी, काढणीचा कधी खोळंबा होवु देत नसत.

आपल्या सहा महिन्यांच्या मुलाला घेवुन सुमन अक्षीला आली.पांढऱ्या कपाळाच्या माईकडे बघून तिला हुंदका आवरला नाही.माईला देखील सुमनला बघून भरुन आले.बराच वेळ मायलेकी निःशब्द पणे अश्रू ढाळत राहिल्या.माईने नातवाला उराशी धरले,याचे बारसे इथे व्हायला हवे होते, पण काय करणार? सुमनने हि तिच्या भावाला पहिल्यांदाच पाहिले होते. आठ पंधरा दिवस सुमन राहिली.मग तिच्या सासरहून एक पत्र आले.पत्रात तिच्या नवऱ्याने लिहिले होते तुझ्या बहिणीला तू इकडे घेवुन ये तिच्या पुढच्या शिक्षणाची आपण व्यवस्था करु, सध्या आपण त्यांना एवढी मदत करु शकतो.

सुमनने माईला पत्रबद्दल सांगितले. माई म्हणाली," गौरीला तू घेवुन जा, जावयांच्या शब्दाचा मान राखायला हवा, पण त्यांना म्हणावं तिच्यासाठी मुलगाच बघा उगीच शिक्षणाचा खर्च नको,तुम्ही करताय हेच खूप आहे, अजून बाळचं सगळचं व्हायचं आहे, तेव्हा लागेलच मदत. मऊ लागल, म्हणून कोपरापासून खणू नये" सुमन म्हणाली ,"आई आता माझी कॉलेजची दोन वर्ष झाली, दोन संपली की मी पण नोकरी करेन, मग काय हरकत आहे? आणि आमची माणसं, खरच फार चांगली आहेत"
" हो आहेत गं, ह्यांची पुण्याई म्हणून अशी देवमाणसं भेटली आहेत, पण चांगल्याचं चांगुलपण आपण टिकवायचं असतं,उगीच आपला भार इतरांवर टाकणं मला नाही आवडतं गौरीसाठी तुमच्यासारखी चांगली माणसं बघं"

सुमन बरोबर गौरी गेली, कामाचाही हात कमी झाला, पण आज ना उद्या ती जाणारच होती. माईला उद्योगांमुळे दिवसाचे चोवीस तास कमी पडत. बाळच्या बाललीला बघायलाही सवड नसे. लेकरू फार गुणी होतं, कुणाकडेही जाई, देवु ते खाई, हट्ट नाही की रडणं नाही.परिस्थिती माणसाला शहाणं बनवते.
गौरी देखील सुमन सारखीच गुणी होती, माईच्या हाताखाली राहुन घरकामात ती तयार झाली होतीच, शिवाय शिवण, भरतकाम यातही ती तरबेज होती.सुमनच्या सासरचे खटले मॊठे होते, संत्र्याच्या बागा होत्या, कापसाची शेती होती.सुमनच्या सासऱ्यांच्या पश्चात तिच्या सासुबाई सगळा कारभार समर्थपणे बघत होत्या.सगळे त्यांना अक्का म्हणत ही मंडळी सधन होतीच पण त्याही पेक्षा त्यांची मनाची श्रीमंती जास्त होती.सुमनने गौरीसाठी मुलगे बघण्याचा आईचा निरोप सासुबाईंना सांगितला,त्यांच्या परिचितांपैकी दोन तीन ठिकाणी ती पत्रिकाही देवुन आली.पत्रिका जुळत नसल्याचे निरोप आले.
एक दिवस सुमनच्या सासुबाई तिला म्हणाल्या,"अगं आपल्या नानासाठी आपण गौरीची पत्रिका बघुयात का?" नाना हा त्यांचा धाकटा मुलगा होता, नुकताच पदवीधर होवुन नोकरीला लागला होता. म्हटल्याप्रमाणे त्यांनी गुरुजींना बोलावून पत्रिका दाखवल्या,पत्रिका जुळत होत्या.
त्यांनी नानालाही विचारले,"गौरी तुला पसंत आहे का? मला तर ही मुलगी फारच आवडली आहे, शिवाय माणसे माहितीतली आहेत.दोघी बहिणी जावा झाल्या तर घरात पुढे कुरबुरी पण कमी होतील"
सुमनच्या नवऱ्यालाही हा विचार पटला.नानानेही गौरीला होकार दिला.
सुमन भितभितच सासुबाईंना म्हणाली,"हे सगळ ठिक आहे,पण आता आईची परिस्थिती तुम्ही जाणताच, लग्न करुन देणं .."
"मला सगळं ठाऊक आहे, माईंनी माझी सगळी हौस तुझ्या लग्नात केली आहे,त्यांना जड होईल असे आपण नकोच करायला, गौरीचे लग्न आपण नोंदणी पध्दतीने करु, म्हणजे खर्चाचा प्रश्ण उरणार नाही. आपण दोन्ही अंगी लग्न करुन घेवू पण ते तुझ्या आईला पटणार नाही, त्या काही करुन लग्न देतील करुन पण अजून तुझ्या भावाचे सगळेच व्हयचयं आणि आई-वडीलांची जागा कुणी घेवु शकत नाही, देवक दुसरे कुणी बसवणार हे बघून त्या माऊलीला केवढं दुःख होईल, त्या पेक्षा नोंदणी पध्दतीने लग्न करु , सगळेच प्रश्ण सुटतील , मी नाना आणि दादाशी बोललीय आधीच, मुले माझ्या शब्दाबाहेर नाहित, हे नोंदणी लग्नाचं मला दादानचं सांगितलय."

सुमनने माईला पत्राने सविस्तर हकिकत कळवली.माईचे मन सुमनच्या सासरच्या लोकांच्या विशेषतः तिच्या सासुबाईच्या मनाच्या मॊठेपणाने भरुन आले.अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन या उक्तिचा प्रत्यय आला.गोपाळरावांच्या निधनानंतर अक्का दहा दिवसात समाचाराला आल्या होत्या, माईच्या पाठीवरुन हात फिरवून ,"माई, धीर सोडू नका, झालं ते फार वाईट झालं.पण स्वतःला एकटं समजू नका, आम्ही आहोत" अस बोलल्या होत्या.फार बडबड कराय़ची त्यांची सवय नव्हती.पण कृतीतून त्यांनी करुन दाखवलं.गौरीचं लग्न त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच झालं.

हि घटना आहे पन्नास एक वर्षांपूर्वीची.आज आपण समाज खूप सुधारलाय म्हणतो पण हौशीच्या नावाखाली लग्न समारंभांमध्ये लाखो रुपये उधळले जातात.आजही हुंडाबळी वाचायला मिळतात. मुलीच्या लग्नापायी त्यांचे बाप कर्जबाजारी होतात आणि त्या खर्चाला भिऊन मुलीचा जन्म नको म्हणून गर्भातच तिला मारली जाते. या सगळ्या गोष्टी बघून गावाकडची हि गोष्ट मला सांगाविशी वाटली.पैशाची समृध्दी मिळवताना मनाची श्रीमंती आपण गमावत नाही ना? याचा विचार केला पाहिजे.

Tuesday, May 11, 2010

गावाकडच्या गोष्टी... क्रमश:

वामन पोरका झाला.त्याची आई बाळंतपणातच वारली होती तेंव्हापासून तो आजोळीच रहात होता, वडीलही प्लेगच्या साथीत गेले.आजोळची परिस्थितीही बेताचीच.या मुलासाठी त्याचे वडील सटीसहामाशी पाठवत असणारी रक्कमही आता मिळणार नव्हती.सहाजिकच त्याचा भार वाटू लागला.त्याच्या मामाला घरातून वामनची काहीतरी सोय करा अशी वारंवार बोलणी होवु लागली.मामांनाही पटत होते, पण एवढ्या लहान मुलाला कुठे सोडणार?

मामलेदार साहेबांकडे पूजा होती मामांना ब्राह्मण म्हणून बोलावले होते.जेवणे झाल्यावर विडा खाताना मामलेदार साहेबांनी विचारले,"मामा, घरी सगळे ठिक आहे ना?, आज तुमची तब्येत बरी वाटत नाही. कसली काळजी लागलीय ?"
" काही नाही हो, आमचं आपलं नेहमीचचं रडगाणं.प्रपंचाच्या न संपणाऱ्या कटकटी "
"तरीपण,आजवर तुम्ही कधी असं देखील बोलला नाहीत? मला मोकळेपणनं सांगा , अनमान बाळगू नका"
" अहॊ, वामन , माझ्या सक्ख्या बहिणीचा मुलगा, बहीण गेली तेंव्हापासून इथेच आहे, गेल्या महिन्यात त्याचे वडील आमचे मेहुणे वारले,आता त्याच्या संगोपनाचा प्रश्ण आला.घरी त्यावरुन सतत कटकटी होत आहेत, आता आमच्या मुलांसारखा तो, त्याला का रस्त्यावर सोडून देवू?"
"नको नको, असं नका करु, तुम्ही त्याला आमच्या घरी पाठवा.आमची मुले लहान आहेत, तो त्यांना सांभाळेल,आम्ही त्याची मुंज करु.आमच्या मॊठ्या बारदानात सहज सामावला जाईल., एवढी छोटी बाब, तुम्ही आधीच सांगायची"
मामलेदार साहेबांचे आभार कसे मानावे, मामांना समजेना.

मामलेदारांच्या घरी वामन रहायला आला.त्यांच्या आबा आणि भाऊ बरोबर त्याची ही मुंज झाली.त्याला शाळेतही घातले होते, पण अभ्यासात त्याला विशेष गती नव्हती.घरकामात मात्र तो तरबेज होता. विहिरीवरुन पाणी आणणॆ, बंब पेटवणे,अंगण झाडणॆ ही कामे तो बिनबोभाट करी. पुजेला भटजी यायच्या आत पूजेची तयारी करुन ठेवी.काकूंच्या लहान धाकट्या मुलांना खेळवी.इतकेच नव्हे तर काकूंकडून त्याने स्वयंपाक ही शिकून घेतला.मामलेदार साहेबांना दौऱ्यावर खेडोपाडी जावे लागे.तिकडे जेवणाचे हाल होतात असे त्याने ऎकले होते.
एकदा ते दौऱ्यावर निघताना तो म्हणाला,"काका , मी येऊ तुमच्या बरोबर?"
"तू काय करणार तिकडे?"
"तुमच्या साठी स्वयंपाक करेन,तुमचे कपडे धुवेन."
"आणि तुझा अभ्यास? त्याच काय?"
"रागावणार नसाल तर बोलू?"
"बोल"
" मला नाही जमत गणित आणि इंग्रजी,तीनदा नापास झालो.तुमच्यावर तरी किती बोजा देवू? झाले तेवढे शिक्षण पुरे."
" ठिक आहे तुझी मर्जी, पण स्वयंपाक करण्यात तरी हातखंडा मिळव, उद्या त्यावर तरी पोट भरु शकशील, चल माझ्या सोबत"
वामन मामलेदारसाहेबांबरोबर गेला, त्याने त्यांची चोख व्यवस्था ठेवली, त्यांचे कपडे धुणे, सामन आवरणे, ते यायच्या आत गरम गरम जेवण तयार ठेवणे हे सारे तो आवडीने करी, मागचे सगळे आवरुन टाकी.त्याच्या हाताला चवही छान होती.आठ दिवस आंबवडे,उतरवली,आंबेघर, गोळ्याची वाडी असा दौरा आटोपून वामन आणि साहेब भोरला आले.
आल्याबरोबर मामलेदार साहेबांनी काकूंना बोलवून सांगितले,"वामन फार दमला आहे.माझी सारी काळजी तो घेत होता, आज त्याला बिलकूल काम सांगू नका त्याला आमच्या बरोबर जेवायला वाढा."पुढे मामलेदार साहेबांबरोबर वामनला दौऱ्यावर न्यायचे असा शिरस्ताच झाला.वामन असाच मोठा होत होता.मामलेदारांच्या घरात आपण आश्रित आहोत हि जाणीव त्याला कुणी करुन दिली नसली तरी तो आपली पायरी जाणून वागत होता.घरातल्या कुठल्याच कामाला तो मागे नसे.त्यामुळे सगळ्यांना तो हवाहवासा वाटे.

गोदु सासरी गेली आणि चार सहा महिन्यातच मामलेदार साहेब आजारी पडले.औषधपाणी सुरु होते, पण गुण येत नव्हता.वामन अखंड सेवा करीत होता.मामलेदारांना आतुन जाणावले आता आपले काही खरे नाही. एक दिवस रात्री त्यांनी काकू आणि आपले मुलगे आबा,अण्णा यांना जवळ बोलावले.
ते म्हणाले, " मी बरा होईन असे मला वाटत नाही.आपल्याला काही कमी नाही शेती वाडी आहे, मुले शिकून मोठी होतील दहा हातांनी उदंड मिळेल. पण प्रत्येकाचे प्रपंच वाढतील, पैशाला वाटा फुटतील, पैशाच्या मागे धावू नका, प्रपंचासाठी तो जरुर मिळावा मात्र त्या करीता माणुसकी सोडू नका. होता होईल तो अडलेल्यांना मदत करा आणि मुख्य म्हणजे वामनला कधीही अंतर देवू नका. तुम्ही पाच भाऊ नसून सहा आहात असे समजा.आपल्या सुखात तसेच दुःखातही त्याला बरोबर ठेवा. त्याच्या मामाला मी शब्द दिलेला आहे, मुलगा गुणी आहे. आता शिकला नाही फारसा.पण त्याने काही बिघडत नाही.कष्टाला तो कमी पडणार नाही.तो स्वतःहून जात नाही तोवर तो या घरातच राहील त्याला कुणी घराबाहेर काढणार नाही असं मला वचन द्या.,मला त्याशिवाय सुखाने मरण येणार नाही"
आबा म्हणाले,"काका, असं बोलू नका, तुम्ही बरे व्हाल.आणि आम्हाला वामन भावासारखाच आहे, त्याला आम्ही सांभाळू"

मामलेदारसाहेब नंतर आठ्वड्याभरातच गेले.ते गेले आणि घराच्या वैभवाला जणू दृष्टच लागली.एन्फ्ल्युएंझाच्या साथीत दोन दिवसाच्या तापाचे निमित्त होवुन आबाही अकस्मिकरित्या वारले.एकापाठोपाठ एक असे दोन कर्ते पुरुष गेल्याने घराची रयाच गेली.मोठ्या घराचा कारभार चालवायला अण्णा मुंबईची नोकरी सोडून आले.बाकीची मुले मोठी होत होती,घरात लग्नं कार्ये होत होती.घरातल्या मुली लग्न होवुन सासरी जात होत्या.परक्याच्या मुली या घरात सुना म्हणून येत होत्या.घरातल्या लहान मोठ्या समारंभाचा स्वयंपाक करायची जबाबदारी वामनवरच असे.त्याच्या स्वयंपाकाची सगळे स्तुती करीत.वामनच्या लग्नाबद्दल मात्र कुणीच विषय काढला नाही.काकूंना वाटे याचेही लग्न केले पाहिजे, पण नवरा आणि मुलगा पाठोपाठ गेल्याने त्यांचा पूर्वीचा उत्साह कमी झाला होता.

खुद्द वामनला ह्या घराचा आधार वाटत होता, वेगळं राहण्याची त्याची मानसिक तयारी नव्हती.आपण आश्रित मग कशाला लग्न करुन बायकॊला इथे कामाला लावायची? बरं आहे आहे तेच आयुष्य ! इथल्या सासुरवाशणींचे हाल तो बघत होताच, तीन -तीन पर्य़ंत काम करुन सुखाचा घास मिळायचा नाही.सोवळी-ऒवळी सांभाळताना जीव थकायचा.कामात थॊडी कसूर झाली की काकूंचा पट्टा चालु व्हायचा.बाळंतपणात पुरेशी विश्रांती नाही की वेळेवर जेवण नाही. आबा, भाऊ दोघांच्या बायका बाळंतपणातच गेल्या.आपली आईपण तशीच गेली, नको ते संसाराचं लोढणं. आपलं हे परस्वाधीन जगणं आपल्याबरोबरच संपुदे.

दिवस असेच जात होते, काळ बदलत चालला होता.मामलेदारांची मुले आपल्या पिढीजात श्रीमंतीच्या ऎटीतच होती.सणवार,व्रतवैकल्ये शिस्तित चालत.मुलींची लग्ने, मुलांच्या मुंजी थाटामाटत पार पडत.रामनवमीच्या उत्सवाला भोरच्या राजवाड्यात वाईहून भिक्षुक येत.त्यांच्या रात्रीच्या फराळाची, मुक्कामाची व्यवस्था मामलेदारांच्या वाड्यात होई. खर्च पूर्वीसारखाच, पण आवक मात्र कमी होती.मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढावी लागली होती.शेतात कष्ट करायची कुणाचीच तयारी नव्हती, आणि खॊटी प्रतिष्ठा आड यायची. कुळे देतील त्यावर समाधान मानायचे, त्यांच्यावर देखरेख करायला बाबाला ठेवले होते, पण त्याचा सगळा वेळ गावात पांढरेशुभ्र कपडे घालून लोकांशी गप्पा, चर्चा करण्यात जाई.या सगळ्याचा व्हायचा तोच परीणाम झाला.बडा घर पोकळ वासा.वामनला हे दिसत होते.पण तो बोलू शकत नव्हता.अडाणी असून तो गावातील लग्नाकार्याला आचारी म्हणून जाऊन पैसे मिळवत होता.आपला भार तो घरावर टाकत नसे, शेतात देखील त्याने स्वतः खड्डे खणून आंब्याची रोपे लावली, कळश्या डोक्यावर घेवून तो पाणी घाली.घरातल्या सगळ्यांनी कष्ट केले पाहिजेत असे त्याला वाटे, पण सांगण्याचा त्याला अधिकार नव्हता.
बापू सगळ्यात धाकटा, काकूंचा लाडका.मॅट्रीकला नापास झाला.अण्णांनी राजांकडे शब्द टाकून संस्थानात त्याला कारकुनाची नोकरी मिळवून दिली.कारण परीक्षेला बसला तेंव्हाच त्याचे लग्न काकूंनी करायला लावले होते.आता चार पैसे मिळवणे क्रमप्राप्त होते.बापूची बायको देखील दोन मुले झाल्यावर गेली.तिचा मुलगा अवघा सहा महिन्यांचा होता.शेवटच्या आजारत ती वामनला म्हणाली होती,"वामनराव, तुम्ही मला मोठ्या भावासारखे, माझ्या मुलाला सांभाळाल ना? ह्यांचे दुसरे लग्न होईल, प्रत्येकाला आपला संसार. त्याच्याकडे तुम्ही बघा"
वामननेही या बाळाला जीव लावला.प्रत्येक माणसाला कुणावर तरी माया करायची ऊर्मी असते.या बाळच्या रुपाने वामनला ती व्यक्ती मिळाली.त्याने त्याचे लाड केले.
यथावकाश बापूचे दुसरे लग्न झाले.घराला त्यावेळी उतरती कळा लागायला सुरुवात झालेली होती.बापुरावांची हि बायको, काकी हुशार होती,व्यवहारी होती.फायनल पर्यंत शिकलेली देखील होती.तिला घराच्या अवस्थेची कल्पना आली. घरात वामन हा उपरा आहे, आपलेच नीट भागत नसताना हि बाहेरची ब्याद हवीय कशाला? असा तिचा स्वच्छ प्रश्ण होता. त्यातून तो बाळचे जास्त लाड करतो हि देखील टोचणारी बाब होती.काही ना काही कारण काढून काकी वामनशी भांडत. वामनने मागच्या परसदारी बरीच भाजी लावली होती. तो स्वतः पाणी घालून त्यांची देखभाल करी. घरात देवून उरलेली भाजी तो विकत असे. त्या्चे किरकोळ खर्च तो त्या पैशातुन भगवत असे. पण एक दिवस त्यावरुन काकी चिडल्या आमच्या परसातल्या भाज्या विकून ते पैसे तुम्ही घेता हे चुकीचे आहे, सगळे पैसे माझ्याजवळ दिले पाहिजेत असा त्यांनी फर्मान काढले.वामन वरुन घरात रोज भांडणे होत असत.

एक दिवस दुपारची वेळ होती, पोस्ट्मन घरात पत्र टाकून गेला.म्हसवडहून काकींच्या भावाचे पत्र होते.पत्र वाचून काकी पदराने डॊळे पुसू लागल्या.त्यांची थोरली जाऊ जवळ आली,म्ह्णाली,"काय लिहलय गं पत्रात ? काय झाल?"

" अहो माझा धाकटा भाऊ, डोक्याने जरा कमी आहे त्याला मोठ्या वहिनींनी घराबाहेर काढला. कुठे जाइल हो तो? डोक्यानं कमी हा काय त्याचा दोष आहे?"
"बघितलस, तुझ्या भावाला घराबाहेर काढल्यावर झालं ना तुला दुःख, हा वामन तसाच आहे हो! शिकला नाही बिचारा लहानपणापासून इथंच वाढलाय, त्याला कुणी नाही.या वयात कुठे जाईल बिचारा? मामंजींना ह्यांनी शब्द दिलाय आम्ही अर्धपोटी राहू पण आमच्या हयातीत आम्ही त्याला नाही हकलून दे्णार. तू पण तसे मनात आणू नको.त्याने ही या घरासाठी, इथल्या माणसांसाठी खूप केलयं. अगं भाकड गाईला , म्हाताऱ्या बैलालाही आपण सांभाळतो हा तर माणूस आहे, तुझ्या माझ्यासारखा आणि कष्ट करतोय तो, फुकट नाही ना खात. त्याला असं तोडून नको बोलत जाऊ. त्याच्यावरुन भरल्या घरात नको वाद घालू. घर फिरलं कि घराचे वासे फिरतात असं म्हणतात मात्र हा वामन इतकी वर्ष इनामेइतबारे आपल्या घरात राहतोयं, मी काही तु्झ्यासारखी शिकलेली नाही.पण मला अडाणीला वाटत ते बोलले हो, मोठेपणाचा मान देत असशील तर ऎक माझं एवढं"

तेंव्हापासून वामनला हकलण्याच्या गोष्टी कमी झाल्या, भांडणे संपली मात्र नाहीत.वामनराव अखेरपर्य़ंत त्या घरातच राहीले.फारसे आजारी न पाडता त्यांना मरण आले. त्यांच्या प्रामाणिकपणाची दखल अशा तऱ्हेने तरी देवाने घेतली म्हणायची.गेल्यावर त्यांचे शव उचलले, आणि त्यांच्या उशीखाली दहा-दहा रुपयांच्या चार-पाच नोटा मिळाल्या.आपल्या क्रियाकर्मांचे पैसे देखील त्यांनी ठेवले होते.

वामनरावांनी शेतात लावलेल्या आंब्याना कित्येक वर्षे शेकड्यांनी आंबे आले आणि पुढच्या दोन पिढ्यांनी ते आवडीने खाल्ले, पण त्यातल्या फार थॊड्या मुलांना ती झाडे लावणारा , जगवणारा माहित आहे. आपल्याला भरभरुन देणाऱ्या देवाचा आपल्याला विसर पडतॊ मग वामन सारख्या अनाथाची काय कथा?


©