Friday, January 30, 2009

पंढरीची वारी : एक अनुभव.- भाग २


वारीला जायची तयारी सुरु केली.तयारी फारशी नव्हतीच.पहाटे आडीच वाजता उठून पोळी भाजी करुन घेतली(आधी पोटोबा मग...), अंघोळ आदि आन्हिके उरकून निघलो.एका परिचिताने आमच्या उपक्रमाने प्रभावित होवून आंम्हाला आळंदीला सोडण्याची जबाबदारी घेतली.त्यांच्या गाडीतून आळंदीला निघालो. विश्रांतवाडी पर्यंत अगदीच शुकशुकाट होता. मोकळे रस्ते अगदीच नवे आणि खूपच मोठ्ठे ,रुन्द वाटत होते. आळंदी जवळ येवू लागली तशा तिकडून पुण्याकडे ट्र्कच्या रांगा दिसू लागल्या, क्वचित माणसांचे जथेही चालताना दिसू लागले. पावणेपाचच्या सुमारास आम्ही आळंदिच्या अलिकडे एक-दिड कि.मी.वर उतरलो. सर्व परिसर माणसांनी फुलून गेला होता. इंद्रायणीच्या पूलावरुन देवळात जाताना, नदीमध्ये शेकडॊ वारकरी स्नान करताना दिसले.ज्ञानेश्वरांची पालखी गांधीवाड्यात त्यांच्या आजोळी असते, तेथून सहा वाजता तिचे प्रस्थान होते, तत्पूर्वी भक्त तिचे दर्शन घेवू शकतात, हे तेथेच आम्हाला समजले. मग तेथे गेलो, रांगेमधून शांतपणे लोक दर्शन घेत होते.आम्हीही पदुकांचे दर्शन घेतले, पालखीला वाकून वंदन करतानाच मनाला जी शांती वाट्ली,तिचे वर्णन शब्दात नाही करता येणार. माऊलींबरोबर सहज चालू असा विश्वास वाटला. पालखीचे प्रस्थान साडेसहाला होते.इंद्रायाणीच्या अरूंद पूलावर प्रचंड गर्दी आणि खेचाखेच असते, असे कळले होते. बरेच वारकरी पादुकांचे दर्शन घेऊन चालावयास सुरुवात करतात. आम्ही देखील तसेच करायचे ठरविले. ज्ञानेश्वरांचे आणि तुकारामांचे अभंग गात वारकरी जात होते. आम्हीही त्यांच्या बरोबर जात होतो. आता चांगलेच उजाडले होते. आजुनही पुण्याकडून लॊक आळंदीकडे जात होते. त्यांना वाटेत पालखीचे दर्शन होणार आणि ते परत पालखी बरोबर येणार. बऱयाच दिंड्या निघाल्या होत्या. एका दिंडी मधून आमचा प्रवास सुरु झाला. झांजा आणि टाळांच्या तालावर चालताना बरेच अंतर चाललो तरी जाणवत नव्हते. पाच किलो.मी. चाललो, साई मंदिराच्या आसपास बरीच मोकळी जागा आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजुंना किंचित उंच टेकाडे होती. आम्ही तेथे जाऊन बसलो. आठ वाजले असावेत.बरीच वारकरी मंडळी तेथे बसली होती. काही बायका कपडे वाळत घालत होत्या. आमच्या सारखे पुण्याहून आलेले लोक डबे उघडून नाष्ता करायला लागले होते. रोज मलाही सकाळी आठ -आडेआठला खाण्याची सवय आहे, पण कसे कोण जाणे आज भूक लागली नाही. सोलापूर जवळील खेड्यातुन आलेल्या बायका माझ्याशी बोलायला आल्या, त्या तिकडून आंळदिला चालत आल्या होत्या आणि आता वारीबरोबर चालत पंढरपूरला जाउन मग घरी जायच्या होत्या.माझ्या कपाळावर् त्या बाईने काडी कुंकवात बुड्वून बरीच कलाकुसर केली. (आरसा नसल्याने मला दिसली नाही), माझ्या शहरात राहण्याचे, ऑफीसात जाण्याचे तिला अप्रूप , आणि तिच्या इतके दिवस घर सोडून चालत जाण्याचे, तिच्या कष्टाचे मला कौतुक ! मला स्वतः जवळिल बुंदीचा लाडू तिने, नको नको म्हणतानाही खायला दिला.बरेच शेतकरी पेरण्या उरकून वारीला आले होते,मला जाणवले, शेतात पेरण्या झाल्या की, पावसाची वाट बघायची .जास्त पाउस पिकांचं नुकसान करणार, नाहीच आला तर् तोंड्चं पाणी पळवणार. एकूण हा मधला काळ म्हणजे नुसता ताण! रिकाम मन म्हणजे सैतानच घर, त्यापेक्षा विठ्ठ्लावर भार टाकून माऊलींच्या बरोबर त्याच्याच नामात दंग होउन वारीला जाणे म्हणजे एक प्रकारची 'stress management' आहे! पंधरा दिवस घर, दार संसार आणि त्याच्या काळज्या दूर ठेऊन पंढरीला जाण्याचा तो उद्देश असावा ’आवडीने भावे हरीनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे’ असे म्हणणारा वारकरी ’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ या वर्गातील नक्की नाही. आपले काम मनापासून केल्यानंतरही आपल्या हातात नसलेल्या काही गॊष्टींमुळे झालेल्या त्रासावर मात करता यावी यासाठी लागणारी मानसिक शक्ती त्याला वारीला जाण्य़ाने मिळत असेल. कारण त्याची श्रध्दा त्याला सांगते ’सकळ जनांचा करि तो सांभाळ तुज मोकलिल ऐसे नाही एका जनार्दनी भोग प्ररब्धाचा हरीकृपे त्याचा नाश झाला’
क्रमशः

1 comment:

Ramesh Rao said...

I was worried how we can reach Alandi seeing the traffic while going in th elast patch But we could manage.Now I am sure we can complete next all stages/ years very easily.
It is worth walking alongwith Palakhi / dindi people(warkari) as we see lot of their feelings when we comeacross them through dialouge or watching them. You have expressed it rightly.
Ramesh Rao