Monday, May 11, 2009

रीक्षावाल्यांची अरेरावी

अखेरीस रीक्षांचा संप मिटला.या वेळी शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे हा संप बरेच दिवस टिकला.सहा दिवस हा म्हटल तर कमी,म्हटलं तर् जास्त दिवसांचा काळ. पण एकंदरीत रीक्षा हा चर्चेचा विषय व्हावा अशी परिस्थीती झाली आहे.वास्तविक आता घरोघरी वाहनांचा सुकाळ आहे.घरातील माणसांपेक्षा वाहनांची संख्या जास्त असे पुण्यात तरी दिसतेच, त्याला कारणेही आहेतच.घरातील प्रत्येकाला बाहेर जाताना वाहन हवे, शिकणाऱ्या मुलांना स्वतंत्र वाहन हवे, आई वडील दोघांसाठी वेगवेगळ्या दुचाक्या हव्यात शिवाय सगळ्यांनी एकत्र जाण्यासाठी एक चारचाकी हवीच.ईतकी वाहने असूनही रीक्षाची जरुर लागतेच.पुण्यात गर्दीच्या वेळी कार चालवणे कठीण त्याहीपेक्षा पार्कींग मिळणे अवघड.लक्ष्मी रोड, मंडईत आठवड्यातून एकदा तरी न जाणारा माणूस हा पुणेकर नाहीच.त्यामुळे अशा गर्दित जाताना वाहने घरी ठेवून रिक्षाने जाणॆ बरे असे मानणाऱ्यांची संख्याही वाढत जात आहे. जेष्ठ नागरीकांना तर रिक्षा लागतेच, आजारी माणसे, लेकुरवाळ्या बायका,या सगळ्यांना रीक्षा प्रवास अपरिहार्य आहे.आजकाल पुणे चहूबाजुंनी वाढ्त चाललयं, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शाळेची बस नसेल तर रीक्षा शिवाय पर्याय नाही. बाहेर गावाला जाताना किंवा गावाहून आलेल्यांना रीक्षा करावीच लागते.एकंदरीत रीक्षावाल्यांचा धंदा जोरात असतॊ.
रीक्षांची संख्या वाढूनही , पुण्याची लोकवस्ती वाढल्यामुळे त्यांच्या धंद्यावर परीणाम झालेला नाही.दिवसेंदिवस रीक्षावाले हे आपण रीक्षा चलवून समस्त पुणेकरांवर उपकार करत आहोत, आपल्याला या व्यवसायाची मुळीच जरुर नाही अशा थाटात वागत असतात. गेल्या वीस पंचवीस वर्षात पुण्याचा चेहरा मोहरा बदलला, अस्सल पुणेरी म्हणून वर्णिलेले पुणेकराचे खास मासले (पु.लं.चे पुणेरी लोक) आता कमी दिसत असले तरी रीक्षावाल्यांनी आपला पुणेरी बाणा सोडलेला दिसत नाही. कुठल्याही रस्त्याच्या कोपऱ्यावर ही मंडळी कोणत्याही वेळेला निवांत बसलेली असतात.कुठलेही गिऱ्हाईक आले तर त्याच्या कडे ढुंकुनही पाहायचे नाही असा त्यांची रीत असते. मात्र त्या व्यक्तिने स्टॅंड वरच्या रीक्षाऎवजी रस्त्यावरच्या चालत्या रीक्षाला हात करण्याचा अवकाश ही सगळी मंडळी खडबडून ऊठतात, त्या व्यक्तिला स्टॅंड वरचीच रीक्षा घेतली पाहिजे तसा नियम आहे इ. सुनावतात. ती व्यक्ती बिचारी चालती रीक्षा सोडते.मग स्टॅंडवरचे रीक्षावाले ओळीने त्या व्यक्तिच्या इछ्ति स्थळी आपण येणार नसल्याचे सांगतात.हातचे सोडून पळ्त्या पाठी जाऊ नये असे म्हणतात, मात्र इथे पळ्ती सोडून हातचा (स्थीर अशा अर्थी) रिक्षावाला धडा देतो.
फार जवळच्या अंतराला हे येत नाहीत, फार दुरचे अंतर त्यांना नको असते.फार काय आपण आपल्या मर्जीच्या ठिकाणी जाण्याऎवजी त्याच्या मनात असेल तिथे जावे अशी त्यांची इच्छा असावी.यात त्यांच तरी काय चूक आहे ? माणूस धंदा का करतॊ? आपल्या मर्जीप्रमाणे वागता यावे म्हणूनच ना!दुसऱ्याच्या मनासारखे वागायला ते काय तुम्हा आम्हा सारखे नोकरदार आहेत? वाटल तर ते तुम्हाला नेतील. त्यांना हव्या त्या मार्गाने,पाहीजे तशा वेगाने,रहदारीच्या स्वतःच्या नियमांनी नेतील, आणि या साऱ्याबद्दल तुम्ही त्यांना ते मागतील तितके पैसे दिलेच पाहिजेत, हक्कच आहे त्यांचा तो.सुट्टे पैसे जवळ ठेवणे हे तुमचेच काम आहे, रीक्षात बसताना तेवढी खबरदारी घेतलीच पाहिजे.अगदी सतरा रुपये झाले तरी वरचे सात सुटे द्या, नाहीतर ३ रुपयांवर पाणी सोडा.दोन तीन रुपयांसाठी कुरकुर करणारी गिऱ्हाइके घेणार नाही असा नवा नियम करायला हे रीक्षा संघटना वाले मागे पुढे बघणार नाहीत. रीक्षात पेट्रोल भरण्यासाठी तिच्यात गिऱ्हाइक बसलेले असावे हाही त्यांचा नियम असावा.चार पाच कि.मी.च्या अंतरावर जाण्यासाठी तुम्ही रीक्षात बसलात की रीक्षावाला प्रथम जवळचा पेट्रोलपंप गाठतो.जर तुम्ही काही बोलण्याचे धाडस केलेत तर "पेट्रोल अगदीच संपलयं, वाटेत बंद पडली तर मी नाही जबाबदार " अशी दरडावणीच्या आवाजात समज दिली जाते.जणू काही बसल्या बसल्या आपण त्या रिक्षाच्या टाकीतले पेट्रोल ज्युस सारखे प्यायलोय आणि त्यामुळेच ते संपलय !
हॉस्पीटल आणि कोर्ट याची पायरी चढावी असं सामान्य माणसाला चुकूनही वाटत नाही.पेशंट म्हणून किंवा त्याचे नातेवाईक म्हणून हॉस्पीटलमध्ये जायची वेळ प्रत्येकावर कधी ना कधी येतेच.दीनानाथ हॉस्पीटल मध्ये जाण्याचा प्रसंग माझावर गेले २-३ वर्षात आला. हॉस्पीटलच्या बाहेर रीक्षांची भलीमोठी रांग आणि हॉस्पीटलमधून चालत,खुरडत जाणारे अनेक असहाय चेहरे त्यात काही पेशंटस, तर काही त्यांचे नातलग.संध्याकाळ्ची सात साडेसातची वेळ आणि दहा पैकी आठ रीक्षावाले या लोकांना न्यायला नाही म्हणत शांत पणे बसलेले.कोथरुडला येणार नाही,पौड्फाट्याला जमणार नाही. औंध फार दुर आहे, सहकार नगर -तिकडून येताना एम्टी यावं लागेल.अशी उत्तरे देत सर्वांना वाटेला लावणाऱ्या रीक्षावाल्यांचा तिथे थांबण्याचा हेतू काय असेल? असा मला प्रश्ण पडला.एक तर हॉस्पीट्लमधून बाहेर पडणारी व्यक्ती प्रचंड काळजीत असते,प्रकृती-पैसा,मनुष्यबळ अशा नानाविध बाबी असतात.हॉस्पीट्लमध्ये मिळणारी वागणूकही फारशी चांगली नसते,अशा अगतिक माणसाला जाण्यासाठी रीक्षा दिसत असूनही तो येत नसेल तर त्याची काय अवस्था होत असेल?
अशीच रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅंड च्या बाहेर उभ्या असलेल्या रीक्षावाल्यांची कथा डेक्कन क्वीन, प्रगतीने येणाऱ्यांपैकी रोज पुणे-मुंबई प्रवास करणारे सोड्ले तर बरेचसे ऑफीसच्या कामासाठी गेलेले असतात, सहाजिकच माणूस दमलेला असतो, घरी जाण्याची ऒढ असते आणि रस्त्यावर आले कि हे रीक्षावाले आडमुठे धोरण दाखवायला लागतात, ज्यादा भाडे मागणे, इच्छित स्थळी यायला नकार देणे.माणसाच्या असहायतेचा फायदा उठवणाऱ्य़ांनी गिऱ्हाईकांकडून माणुसकी आणि सौजन्याची अपेक्षा ठेवायची हा केवढा विरोधाभास आहे! केवळ यांच्या संघट्ना आहेत आणि ग्राहक असंघटित, म्हणून यांची मनमानी चालते.
शाळेत रीक्षाने जाणाऱ्या मुलांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.रीक्षात किती मुले घ्यावी यावर सुरुवातीच्या काळात बंधन नसे, मध्यंतरी एक-दोन अपघात झाले त्यानंतर ह्या संख्येवर बंधन आले.पण बंधन आणि नियम हे तोडण्यासाठीच असतात ह्या जन्मसिध्द हक्कानुसार ते सारे धाब्यावर बसवून रीक्षात आठ-दहा पासून पंधरा पर्य़ंत कितीही मुले भरतात.प्रत्येकाची दप्तर,डब्याची पिशवी हे सारे पुढे असते आणि मागच्या जागेत ही सगळी मुले कोंबलेली असतात.कडेच्या मुलांची निम्मे शरीर रीक्षाबाहेर असते.मधल्या मुलांच्या मांडीवर मुले असतात, पुण्याच्या बेशिस्त रहदारीमधून अशा रीक्षा ऎन गर्दिच्या वेळेला भरधाव वेगाने धावत असतात.शाळा दहा महिने असते, त्यांना अकरा महिन्याचे पैसे द्यावे लागतात.शिवाय ट्रीप,१५-ऑगस्ट,२६ जानेवारी, गॅदरींग, रीपोर्ट -डे अशा वेगवेगळ्या निमित्ताने शाळेच्या वेळपत्रकात बदल असेल तेंव्हा रीक्षा येणार नाहीत, हे त्यांनी आधीच स्पष्ट केलेले असते.माझी मुलगी शाळेत रीक्षानेच जाते.
ती एकदा मोठ्या कौतुकाने सांगत होती,’आई ,आज ना,शाळेत जाताना आमच्याकडे सगळे बघत होते आणि हसत होते’
’का गं?’
’अगं, आमच्या रीक्षाला ट्पच नव्हते,काकांनी ते नवीन करायला टाकलयं, आम्हाला डायरेक्ट आकाश दिसत होते’
मला हसावे कि रडावे कळेना, शाळेला इतक्या सुट्ट्या असताना शाळॆच्या वेळातच रीक्षाची डागडुजी करायची जरुर आहे का? बर, हे त्यांना विचारायची सोय नसते, एकतर आपल्या नोकरीमुळे त्यांच्याशी गाठ घेणे मुश्कील.काही बोलले तरी मला हे कसे परवडतच नाही,केवळ तुमच्यावर मेहेरबानी म्हणून मी हा आतबट्ट्याचा धंदा करीत आहे असा बोलण्याचा सूर असतो.माझा मुलीच्या शाळेत शाळा सुटल्यावर एक तास मैदानावर कुठ्लाही खेळ खेळावाच लागेल अशी सूचना आली.मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्यच आहे असे सगळ्या पालकांचे मत होते.मुलांचाही या सूचनेला विरोध असण्याचे काहीच कारण नव्हते.
आमच्या रीक्षाकाकांनी आम्हाला सरळ सांगितले,’ते खेळ -बिळ तुमच्या मुलीला खेळु देवू नका ’
’अहो, पण ते कम्प्लसरी आहे, आणि त्यात वाईट काय आहे?’
’अहो त्यात काय एक खोटं, मेडिकल सर्टिफिकेट द्यायच, मी देतो हवं तर,रीक्षातल्या सगळ्यांना मी हेच सांगितलय,मला वेळ नाही ना पाच नंतर’
’पण हा काही आजचा नियम नाही,खोटे सर्टिफिकेट आम्ही देणार नाही,मुलांनी रोज खेळलच पाहिजे’
’खेळुद्याना मुलांना, तुम्ही घरुन घराजवळील ग्राऊंडवर पाठ्वा, पैसे भरले कि कुठेही घालता येतं, तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या मुलीची सोय तुम्ही करा’
म्हणजे या काकांच्या सोयीसाठी आम्ही आमच्या मुलीला शाळेत फुकट मिळणाऱ्या खेळापासून वंचित करायचं, खोटे सर्टिफिकेट देवून शाळेला फसवायचं आणि पदरमोड करून वेगळिकडे खेळायला पाठवायचं आहे कि नाही कमाल !
सगळेच रीक्षावाले असे असतात असे नाही.काही फार चांगले असतात.लोकांच्या विसरलेल्या बॅगा त्यांच्या कडे प्रामाणिक पणाने नेवून देणारे रीक्षावाले, रस्त्यावर अपघात झाला तर जखमी व्यक्तिला रीक्षातून दवाखान्यात नेणारे,अनोळखी जागी गेल्यावर पत्ता शोधायला मदत करणारे,शाळेच्या शेवट्च्या दिवशी मुलांना खाऊ खायला घालणारे असे चांगले रीक्षावाले असतात.माणुसकीचे दर्शन देणाऱ्या अशा रीक्षावाल्यांना जाहीर धन्यवाद आपण पेपर मध्ये वाचतोच.त्यांचे कौतुक करायला आपण नेहमीच तयार असतो.मात्र असे प्रसंग फार फार क्वचित येतात. एरवी नेहमीच खिशाला खार लावून त्यांची मिरासदारी सोसायची.रीक्षावाल्यांच्या संघट्ना पेट्रोलचे दर एक रुपयाने वाढल्यावर तत्परतेने किलोमीटर मागे एक रुपयाने भाडे वाढवून घेतात.मात्र पेट्रोलचे दर दहा रुपयांनी कमी होवून देखील भाडे वाढ एक रुपयांने कमी करायला यांची तयारी नाही.इलेक्ट्रॉनिक मीटर बसवायला यांचा विरोध,सी.एन.जी कीट बसवायला नाराजी.यातुनच त्यांना सध्याच्या पध्दतीत किती फायदा होतो हे न कळ्ण्याइतके पुणेकर अडाणी नाहीत.पण म्हणतात ना ’अडला हरी.....’


©

2 comments:

prasad bokil said...

तीन तिघाडा काम बिघाडा! रीक्षाला तीन च्या ऐवजी चार चाके लावून काही फरक पडतोय का ते बघायला हवे.

Maitreyee said...

hmm gud idea dada pan char chaka lavle tar char chaka mhanun paisevadhavtil