Tuesday, May 11, 2010

गावाकडच्या गोष्टी... क्रमश:

वामन पोरका झाला.त्याची आई बाळंतपणातच वारली होती तेंव्हापासून तो आजोळीच रहात होता, वडीलही प्लेगच्या साथीत गेले.आजोळची परिस्थितीही बेताचीच.या मुलासाठी त्याचे वडील सटीसहामाशी पाठवत असणारी रक्कमही आता मिळणार नव्हती.सहाजिकच त्याचा भार वाटू लागला.त्याच्या मामाला घरातून वामनची काहीतरी सोय करा अशी वारंवार बोलणी होवु लागली.मामांनाही पटत होते, पण एवढ्या लहान मुलाला कुठे सोडणार?

मामलेदार साहेबांकडे पूजा होती मामांना ब्राह्मण म्हणून बोलावले होते.जेवणे झाल्यावर विडा खाताना मामलेदार साहेबांनी विचारले,"मामा, घरी सगळे ठिक आहे ना?, आज तुमची तब्येत बरी वाटत नाही. कसली काळजी लागलीय ?"
" काही नाही हो, आमचं आपलं नेहमीचचं रडगाणं.प्रपंचाच्या न संपणाऱ्या कटकटी "
"तरीपण,आजवर तुम्ही कधी असं देखील बोलला नाहीत? मला मोकळेपणनं सांगा , अनमान बाळगू नका"
" अहॊ, वामन , माझ्या सक्ख्या बहिणीचा मुलगा, बहीण गेली तेंव्हापासून इथेच आहे, गेल्या महिन्यात त्याचे वडील आमचे मेहुणे वारले,आता त्याच्या संगोपनाचा प्रश्ण आला.घरी त्यावरुन सतत कटकटी होत आहेत, आता आमच्या मुलांसारखा तो, त्याला का रस्त्यावर सोडून देवू?"
"नको नको, असं नका करु, तुम्ही त्याला आमच्या घरी पाठवा.आमची मुले लहान आहेत, तो त्यांना सांभाळेल,आम्ही त्याची मुंज करु.आमच्या मॊठ्या बारदानात सहज सामावला जाईल., एवढी छोटी बाब, तुम्ही आधीच सांगायची"
मामलेदार साहेबांचे आभार कसे मानावे, मामांना समजेना.

मामलेदारांच्या घरी वामन रहायला आला.त्यांच्या आबा आणि भाऊ बरोबर त्याची ही मुंज झाली.त्याला शाळेतही घातले होते, पण अभ्यासात त्याला विशेष गती नव्हती.घरकामात मात्र तो तरबेज होता. विहिरीवरुन पाणी आणणॆ, बंब पेटवणे,अंगण झाडणॆ ही कामे तो बिनबोभाट करी. पुजेला भटजी यायच्या आत पूजेची तयारी करुन ठेवी.काकूंच्या लहान धाकट्या मुलांना खेळवी.इतकेच नव्हे तर काकूंकडून त्याने स्वयंपाक ही शिकून घेतला.मामलेदार साहेबांना दौऱ्यावर खेडोपाडी जावे लागे.तिकडे जेवणाचे हाल होतात असे त्याने ऎकले होते.
एकदा ते दौऱ्यावर निघताना तो म्हणाला,"काका , मी येऊ तुमच्या बरोबर?"
"तू काय करणार तिकडे?"
"तुमच्या साठी स्वयंपाक करेन,तुमचे कपडे धुवेन."
"आणि तुझा अभ्यास? त्याच काय?"
"रागावणार नसाल तर बोलू?"
"बोल"
" मला नाही जमत गणित आणि इंग्रजी,तीनदा नापास झालो.तुमच्यावर तरी किती बोजा देवू? झाले तेवढे शिक्षण पुरे."
" ठिक आहे तुझी मर्जी, पण स्वयंपाक करण्यात तरी हातखंडा मिळव, उद्या त्यावर तरी पोट भरु शकशील, चल माझ्या सोबत"
वामन मामलेदारसाहेबांबरोबर गेला, त्याने त्यांची चोख व्यवस्था ठेवली, त्यांचे कपडे धुणे, सामन आवरणे, ते यायच्या आत गरम गरम जेवण तयार ठेवणे हे सारे तो आवडीने करी, मागचे सगळे आवरुन टाकी.त्याच्या हाताला चवही छान होती.आठ दिवस आंबवडे,उतरवली,आंबेघर, गोळ्याची वाडी असा दौरा आटोपून वामन आणि साहेब भोरला आले.
आल्याबरोबर मामलेदार साहेबांनी काकूंना बोलवून सांगितले,"वामन फार दमला आहे.माझी सारी काळजी तो घेत होता, आज त्याला बिलकूल काम सांगू नका त्याला आमच्या बरोबर जेवायला वाढा."पुढे मामलेदार साहेबांबरोबर वामनला दौऱ्यावर न्यायचे असा शिरस्ताच झाला.वामन असाच मोठा होत होता.मामलेदारांच्या घरात आपण आश्रित आहोत हि जाणीव त्याला कुणी करुन दिली नसली तरी तो आपली पायरी जाणून वागत होता.घरातल्या कुठल्याच कामाला तो मागे नसे.त्यामुळे सगळ्यांना तो हवाहवासा वाटे.

गोदु सासरी गेली आणि चार सहा महिन्यातच मामलेदार साहेब आजारी पडले.औषधपाणी सुरु होते, पण गुण येत नव्हता.वामन अखंड सेवा करीत होता.मामलेदारांना आतुन जाणावले आता आपले काही खरे नाही. एक दिवस रात्री त्यांनी काकू आणि आपले मुलगे आबा,अण्णा यांना जवळ बोलावले.
ते म्हणाले, " मी बरा होईन असे मला वाटत नाही.आपल्याला काही कमी नाही शेती वाडी आहे, मुले शिकून मोठी होतील दहा हातांनी उदंड मिळेल. पण प्रत्येकाचे प्रपंच वाढतील, पैशाला वाटा फुटतील, पैशाच्या मागे धावू नका, प्रपंचासाठी तो जरुर मिळावा मात्र त्या करीता माणुसकी सोडू नका. होता होईल तो अडलेल्यांना मदत करा आणि मुख्य म्हणजे वामनला कधीही अंतर देवू नका. तुम्ही पाच भाऊ नसून सहा आहात असे समजा.आपल्या सुखात तसेच दुःखातही त्याला बरोबर ठेवा. त्याच्या मामाला मी शब्द दिलेला आहे, मुलगा गुणी आहे. आता शिकला नाही फारसा.पण त्याने काही बिघडत नाही.कष्टाला तो कमी पडणार नाही.तो स्वतःहून जात नाही तोवर तो या घरातच राहील त्याला कुणी घराबाहेर काढणार नाही असं मला वचन द्या.,मला त्याशिवाय सुखाने मरण येणार नाही"
आबा म्हणाले,"काका, असं बोलू नका, तुम्ही बरे व्हाल.आणि आम्हाला वामन भावासारखाच आहे, त्याला आम्ही सांभाळू"

मामलेदारसाहेब नंतर आठ्वड्याभरातच गेले.ते गेले आणि घराच्या वैभवाला जणू दृष्टच लागली.एन्फ्ल्युएंझाच्या साथीत दोन दिवसाच्या तापाचे निमित्त होवुन आबाही अकस्मिकरित्या वारले.एकापाठोपाठ एक असे दोन कर्ते पुरुष गेल्याने घराची रयाच गेली.मोठ्या घराचा कारभार चालवायला अण्णा मुंबईची नोकरी सोडून आले.बाकीची मुले मोठी होत होती,घरात लग्नं कार्ये होत होती.घरातल्या मुली लग्न होवुन सासरी जात होत्या.परक्याच्या मुली या घरात सुना म्हणून येत होत्या.घरातल्या लहान मोठ्या समारंभाचा स्वयंपाक करायची जबाबदारी वामनवरच असे.त्याच्या स्वयंपाकाची सगळे स्तुती करीत.वामनच्या लग्नाबद्दल मात्र कुणीच विषय काढला नाही.काकूंना वाटे याचेही लग्न केले पाहिजे, पण नवरा आणि मुलगा पाठोपाठ गेल्याने त्यांचा पूर्वीचा उत्साह कमी झाला होता.

खुद्द वामनला ह्या घराचा आधार वाटत होता, वेगळं राहण्याची त्याची मानसिक तयारी नव्हती.आपण आश्रित मग कशाला लग्न करुन बायकॊला इथे कामाला लावायची? बरं आहे आहे तेच आयुष्य ! इथल्या सासुरवाशणींचे हाल तो बघत होताच, तीन -तीन पर्य़ंत काम करुन सुखाचा घास मिळायचा नाही.सोवळी-ऒवळी सांभाळताना जीव थकायचा.कामात थॊडी कसूर झाली की काकूंचा पट्टा चालु व्हायचा.बाळंतपणात पुरेशी विश्रांती नाही की वेळेवर जेवण नाही. आबा, भाऊ दोघांच्या बायका बाळंतपणातच गेल्या.आपली आईपण तशीच गेली, नको ते संसाराचं लोढणं. आपलं हे परस्वाधीन जगणं आपल्याबरोबरच संपुदे.

दिवस असेच जात होते, काळ बदलत चालला होता.मामलेदारांची मुले आपल्या पिढीजात श्रीमंतीच्या ऎटीतच होती.सणवार,व्रतवैकल्ये शिस्तित चालत.मुलींची लग्ने, मुलांच्या मुंजी थाटामाटत पार पडत.रामनवमीच्या उत्सवाला भोरच्या राजवाड्यात वाईहून भिक्षुक येत.त्यांच्या रात्रीच्या फराळाची, मुक्कामाची व्यवस्था मामलेदारांच्या वाड्यात होई. खर्च पूर्वीसारखाच, पण आवक मात्र कमी होती.मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढावी लागली होती.शेतात कष्ट करायची कुणाचीच तयारी नव्हती, आणि खॊटी प्रतिष्ठा आड यायची. कुळे देतील त्यावर समाधान मानायचे, त्यांच्यावर देखरेख करायला बाबाला ठेवले होते, पण त्याचा सगळा वेळ गावात पांढरेशुभ्र कपडे घालून लोकांशी गप्पा, चर्चा करण्यात जाई.या सगळ्याचा व्हायचा तोच परीणाम झाला.बडा घर पोकळ वासा.वामनला हे दिसत होते.पण तो बोलू शकत नव्हता.अडाणी असून तो गावातील लग्नाकार्याला आचारी म्हणून जाऊन पैसे मिळवत होता.आपला भार तो घरावर टाकत नसे, शेतात देखील त्याने स्वतः खड्डे खणून आंब्याची रोपे लावली, कळश्या डोक्यावर घेवून तो पाणी घाली.घरातल्या सगळ्यांनी कष्ट केले पाहिजेत असे त्याला वाटे, पण सांगण्याचा त्याला अधिकार नव्हता.
बापू सगळ्यात धाकटा, काकूंचा लाडका.मॅट्रीकला नापास झाला.अण्णांनी राजांकडे शब्द टाकून संस्थानात त्याला कारकुनाची नोकरी मिळवून दिली.कारण परीक्षेला बसला तेंव्हाच त्याचे लग्न काकूंनी करायला लावले होते.आता चार पैसे मिळवणे क्रमप्राप्त होते.बापूची बायको देखील दोन मुले झाल्यावर गेली.तिचा मुलगा अवघा सहा महिन्यांचा होता.शेवटच्या आजारत ती वामनला म्हणाली होती,"वामनराव, तुम्ही मला मोठ्या भावासारखे, माझ्या मुलाला सांभाळाल ना? ह्यांचे दुसरे लग्न होईल, प्रत्येकाला आपला संसार. त्याच्याकडे तुम्ही बघा"
वामननेही या बाळाला जीव लावला.प्रत्येक माणसाला कुणावर तरी माया करायची ऊर्मी असते.या बाळच्या रुपाने वामनला ती व्यक्ती मिळाली.त्याने त्याचे लाड केले.
यथावकाश बापूचे दुसरे लग्न झाले.घराला त्यावेळी उतरती कळा लागायला सुरुवात झालेली होती.बापुरावांची हि बायको, काकी हुशार होती,व्यवहारी होती.फायनल पर्यंत शिकलेली देखील होती.तिला घराच्या अवस्थेची कल्पना आली. घरात वामन हा उपरा आहे, आपलेच नीट भागत नसताना हि बाहेरची ब्याद हवीय कशाला? असा तिचा स्वच्छ प्रश्ण होता. त्यातून तो बाळचे जास्त लाड करतो हि देखील टोचणारी बाब होती.काही ना काही कारण काढून काकी वामनशी भांडत. वामनने मागच्या परसदारी बरीच भाजी लावली होती. तो स्वतः पाणी घालून त्यांची देखभाल करी. घरात देवून उरलेली भाजी तो विकत असे. त्या्चे किरकोळ खर्च तो त्या पैशातुन भगवत असे. पण एक दिवस त्यावरुन काकी चिडल्या आमच्या परसातल्या भाज्या विकून ते पैसे तुम्ही घेता हे चुकीचे आहे, सगळे पैसे माझ्याजवळ दिले पाहिजेत असा त्यांनी फर्मान काढले.वामन वरुन घरात रोज भांडणे होत असत.

एक दिवस दुपारची वेळ होती, पोस्ट्मन घरात पत्र टाकून गेला.म्हसवडहून काकींच्या भावाचे पत्र होते.पत्र वाचून काकी पदराने डॊळे पुसू लागल्या.त्यांची थोरली जाऊ जवळ आली,म्ह्णाली,"काय लिहलय गं पत्रात ? काय झाल?"

" अहो माझा धाकटा भाऊ, डोक्याने जरा कमी आहे त्याला मोठ्या वहिनींनी घराबाहेर काढला. कुठे जाइल हो तो? डोक्यानं कमी हा काय त्याचा दोष आहे?"
"बघितलस, तुझ्या भावाला घराबाहेर काढल्यावर झालं ना तुला दुःख, हा वामन तसाच आहे हो! शिकला नाही बिचारा लहानपणापासून इथंच वाढलाय, त्याला कुणी नाही.या वयात कुठे जाईल बिचारा? मामंजींना ह्यांनी शब्द दिलाय आम्ही अर्धपोटी राहू पण आमच्या हयातीत आम्ही त्याला नाही हकलून दे्णार. तू पण तसे मनात आणू नको.त्याने ही या घरासाठी, इथल्या माणसांसाठी खूप केलयं. अगं भाकड गाईला , म्हाताऱ्या बैलालाही आपण सांभाळतो हा तर माणूस आहे, तुझ्या माझ्यासारखा आणि कष्ट करतोय तो, फुकट नाही ना खात. त्याला असं तोडून नको बोलत जाऊ. त्याच्यावरुन भरल्या घरात नको वाद घालू. घर फिरलं कि घराचे वासे फिरतात असं म्हणतात मात्र हा वामन इतकी वर्ष इनामेइतबारे आपल्या घरात राहतोयं, मी काही तु्झ्यासारखी शिकलेली नाही.पण मला अडाणीला वाटत ते बोलले हो, मोठेपणाचा मान देत असशील तर ऎक माझं एवढं"

तेंव्हापासून वामनला हकलण्याच्या गोष्टी कमी झाल्या, भांडणे संपली मात्र नाहीत.वामनराव अखेरपर्य़ंत त्या घरातच राहीले.फारसे आजारी न पाडता त्यांना मरण आले. त्यांच्या प्रामाणिकपणाची दखल अशा तऱ्हेने तरी देवाने घेतली म्हणायची.गेल्यावर त्यांचे शव उचलले, आणि त्यांच्या उशीखाली दहा-दहा रुपयांच्या चार-पाच नोटा मिळाल्या.आपल्या क्रियाकर्मांचे पैसे देखील त्यांनी ठेवले होते.

वामनरावांनी शेतात लावलेल्या आंब्याना कित्येक वर्षे शेकड्यांनी आंबे आले आणि पुढच्या दोन पिढ्यांनी ते आवडीने खाल्ले, पण त्यातल्या फार थॊड्या मुलांना ती झाडे लावणारा , जगवणारा माहित आहे. आपल्याला भरभरुन देणाऱ्या देवाचा आपल्याला विसर पडतॊ मग वामन सारख्या अनाथाची काय कथा?


©

7 comments:

Anonymous said...

आपल्या दोन्ही गोष्टी वाचल्या. ही गोष्ट तर काळजाला चटका लावणारी. फारच छान.

psiddharam.blogspot.com said...

katha aawadli... bhasha prawahi ahe... manavi bhwbhawanancha nemakepanane wedh ghetala ahe... sanskarksham katha lihilyabaddal dhanyawad.
mi solapur tarun bharat dainikat upsampadak ahe... aapala sampark kramank dyawe vinanti...

Unknown said...

manala bhidnari katha ahe, khup sunder

Maithili said...

Tumacha blog vaachala na ki mala eka serial chi aathavan yete...
Moodal mane naavachi kannad maalika marathit trasnlate keli hoti Soniyaacha Umbaraa mhanun...Khoop chaan hoti ti serial.. agdi sadhi , saral , sopi kahani pan tarihi laksh vedhun ghenari.... agdi tasach aahe tumacha blog....

हेरंब said...

अतिशय प्रवाही.. शेवट वाचून गलबलून आलं :( ..

तुमची प्रत्येक कथा वाचल्यावर असं विषण्ण झाल्यासारखं वाटतं. क्षणभर आपण त्या कथेचा भाग बनून जात असू कदाचित !!

Shubhangee said...

Thanks to all

Ramesh Rao said...

खरच पुर्वीचे दिवस आठवतात. माझ्या दावणगिरिच्या आजोबांची आठवण येते.पुर्वी खरोखरीच अशी माणसे घरोघरी होती