Wednesday, March 21, 2012

नष्ट नीड - उध्वस्त घरटे

 रविंद्र्नाथ टागोरांच्या तीन कादंबऱ्यांचा तीन दीर्घ कथांमध्ये निलिमा भावे यांनी ’नष्ट नीड’ नावाच्या पुस्तकात  अनुवाद केलेला आहे. या कथांचे विषय  कादंबरी,प्रेमकथा यात आढळणारे प्रेमाचे त्रिकोण इ.नेहमीचेच आहेत. मात्र त्यामधून मानवी मनाच्या भावनांची गुंतागुंत,नात्यांमधले नाजुक भावबंध, स्वभावाचे चित्रण इतकं अप्रतिम आहे कि त्या कथा मनाला नुसत्या भिडतच नाहीत तर कायमच्या घर करुन राहतात. रविंद्र्नाथांचे साहित्य कालातीत आहे हे पटतं.
 विवाहबाह्य प्रेम हा आजकाल दूरदर्शन मालिकांमधुन चावुन चोथा झालेला विषय आहे, त्याबद्दल कुणालाच काही वाटेनासे झालयं, पति-पत्नी मधले प्रेम हाच सध्या आश्चर्याचा मुद्दा ठरु शकेल. टागोरांच्या या तीन कथांमध्येही  "विवाहबाह्य प्रेम” हाच वि्षय आहे, त्यांनी रंगवलेले प्रेम हे जरी भावनिक पातळीवरचे आहे तरी त्या काळी या कादंबऱ्या बऱ्याच वादग्रस्त ठरल्या होत्या. .
   ’नष्ट नीड’  या कथेत वयाने जरा जास्त मोठ्या आणि व्यवसायात मग्न असणाऱ्या नवऱ्यामुळे आपल्या वयाच्या  अमल नावाच्या दिरा बरोबर चारुलता मन रमवित असते.दोघांचे एकत्र वाचन, लेखन, साहित्यिक चर्चा चालू असतात. त्या बरोबर एकमेकांची चेष्टा, रुसवे-फुगवे. दिराबरोबर रमणारी चारुलता तिच्याही नकळत त्याच्या प्रेमात पडते. त्याचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वहिनी, कदाचित एक मैत्रीण इतकाच असतो. अमल त्यांच्या घरात आश्रित असतो. त्याला जेंव्हा चारुलतेचा नवरा मोठ्या आर्थिक संकटात असल्याचे समजते, त्यावेळी तो खडबडून जागा होतो. वहिनी बरोबरच्या साहित्यिक गप्पा, वाचन,चर्चा यातला फोलपणा त्याला जाणवतो,अपराधीही वाटते. दादाने स्वतःच्या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला थोडीसुध्दा कल्पना दिली नाही आपल्या शिक्षणाला मदतच करत राहिला याबद्दल त्याच्या मनात दादाच्या मोठेपणाबद्दल कृतज्ञता दाटुन येते. त्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे या  भावनेतून तो दादाने सुचवलेल्या धनिकाच्या मुलीला न बघताच होकार देतो  आणि  शिकून येवुन दादाला मदत करण्याच्या हेतूनेच सासऱ्याच्या खर्चाने विलायतेस उच्च शिक्षणासाठी जातो.

 चारुलता नवऱ्याच्या वृत्तपत्र व्यवसायाशी पूर्ण अनभिज्ञ असते.संस्कारांमुळे नवऱ्याच्या सेवेत ती कुठलीही कसूर ठेवत नसली तरी त्याच्या मनातली घालमेल,त्याचे ताणतणाव तिला कधी जाणवत नाहीत.  नवऱ्याला   आपल्या व्यवसायातील चढ उतार चारुलतेजवळ सांगायचे असतात मात्र तिला ते सांगायची वेळ जमुन येत नाही. ती सगळा वेळ ’अमल’च्याच विचारात रममाण असते. सहाजिकच त्याच्या अकस्मिक जाण्याने बसलेला धक्का आणि पोकळी तिचे जीवन वैराण करते.
 चारुलतेच्या आपल्यावरच्या प्रेमाबद्दल कणमात्र शंका नसलेल्या तिच्या नवऱ्याला जेंव्हा तिचे मन अमलमधे गुंतलेले समजते, त्यावेळी त्याला दुःख होते तेही  तिच्यासाठीच. अमलचे  लग्न त्यानेच करुन दिलेले आहे. चारुलतेचा त्याला राग येत नाही, आपण तिला फार गॄहित धरले ,तिला मनाविरुध्द आपले करायला लागले यामुळे त्याला स्वतःचा राग येतो. इथेच टागोरांचे थोरपण जाणवते. कुणाचे मन कधी, कुठे जडेल हे समजणे खरचं कठीण आहे. एखाद्याला आपल्यावर प्रेम कर अशी बळजबरी नाही करता येत. समाजाची बंधने पाळणारेच जास्त असतात,चौकटी मोडून जगणे तेवढे सोपे पण नसते, अशा वेळी चारुलतेला घरी एकटी सोडून कामाच्या निमित्ताने दुसऱ्या गावी कायमचे निघुन जाण्याचा तिच्या नवऱ्याचा निर्णय पटतो.


 चारुलतेची अमलमधली पराकोटीची भावनिक गुंतवणूक हल्लीच्या परिस्थितीत अवास्तव वाटू शकते. ती एका बाजुला नवऱ्याला खुष करु पहात असते.पण अमलला विसरणे तिला अशक्य असते, एका बाजुला अमलवरचे प्रेम आणि दुसरीकडे नवऱ्याशी आपण प्रतारणा करीत असल्याची अपराधी जाणीव यातुन  होणारी तिची  मानसिक होरपळ आपल्याला जाणवते. प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर असताना प्रत्येकाच्या वाट्याला आलेली वेदना वाचकाला सुन्न करते. मानवी जीवन हे नियतीच्या हातातल्या बाहुल्यासारखं आहे असं वाटतं राहते.

©

3 comments:

aativas said...

वाचली आहे ही कथा मी पूर्वी .. रोचक आहे.
बाकी दोन कथा कोणत्या?

SUJATA said...

apustak vachayachee utsukata lagalee

भानस said...

वाचायला हव्यात या कथा.