Thursday, May 17, 2012

हा भारत माझा

सुनिल सुखथनकर आणि सुमित्रा भावे या द्वयीने आजवर एकापेक्षा एक सुंदर चित्रपट दिले त्या तीलच ’हा भारत माझा’ हा चित्रपट. मायबोलीच्या खास प्रयोगाच्या वेळीच तो पाहण्याचा योग लाभला हे माझे सद्भाग्यच. कारण त्या चित्रपटापूर्वी त्याची पार्श्वभूमी सुनिल सुखथनकरांनी नेमक्या शब्दात मांडली आणि चित्रपटानंतर सुमित्रा भावे, सुनिल सुखथनकर,उत्तरा बावकर, दीपा लागू यांनी प्रेक्षकांशी संवादही साधला.
 अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे अवघा भारत देश ढवळून निघालेल्या दिवसात घडलेली घटना हि चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना असली तरी मध्यमवर्गीय माणसाची भ्रष्टाचाराबद्दल चिड,मात्र नितीमत्तेला धरुन राहण्यासाठी जी  किंमत मोजावी लागते, ती मोजण्याची तयारी नसणं या मुळे कात्रीत सापडलेल्या मध्यमवर्गीय माणसाचं उत्तम चित्रण आहे.

 आजच्या तरुण पिढीने जरुर बघावा हा चित्रपट. कारण कुठलेही अनैतिक काम पैसे देवुन करुन घेणे यात गैर आहे असे हल्ली बहुतेकांना वाटतच नाही. सिग्नल तोडायचा, विना लायसन्स गाडी चालवायची आणि पोलिसांनी पकडले कि दंड न भरता त्याला ५०-१०० रु.देवु करायचे, वर पोलिस कसे पैसे खातात म्हणून त्यांना ,देशाला शिव्या घालायच्या.सिग्नल तोडणे किंवा विना लायसन्स गाडी चालविणे हि कामे गैर आहेत,अनैतिक आहेत असे वाटतच नाही. डोनेशन देवुन ऍडमिशन घेणे,बिल्डरकडून फ्लॅट घेताना २ नंबरचे पैसे देणे, महानगरपलिकेतील,मामलेदार कचेरीतील कुठलेही काम पैसे देवुन करुन घेणे,इतकेच नव्हे तर ड्रायव्हींग लायसन्स एजंटला पैसे देवुन काढण्यात आपण अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहोत याचा आपल्याला विसर पडत आहे. ज्या भ्रष्ट साखळीचे आपणही एक घटक आहोत ती तोडणे फार कठीण आहे.कारण दुसऱ्याला दोषी ठरवणे नेहमीच सोपे असते.

 चित्रपटामध्ये अण्णा हजाऱ्यांच्या आंदोलनाने ढवळून निघालेला देश दिसतो. समाजाच्य़ा सगळ्या थरांमधील त्याचे पडसाद बघतानाही जाणवते कि त्याची खरी जाणीव होते ती मध्यमवर्गालाच.आजवर बहुतेक क्रांत्या या मध्यमवर्गामुळेच घडल्या असे इतिहास सांगतो. श्रीमंतवर्गातील लोकांना असे विषय चघळायला बरे वाटतात.वेळ आल्यावर स्वतःच्या फायद्यासाठी कुठलाही मार्ग,कोणतीही किंमत(अर्थात पैशाची) मोजायची त्यांची तयारी असते.अगदी तळागाळातल्या माणसाची सगळी शक्ती जगण्याच्या धडपडीत जात असल्याने एवढा विचार,विवेक करायला वेळ नसतो. शिवाय त्याच्या अस्तित्वासाठी त्यालाही भ्रष्टाचाराचे मार्ग अवलंबावे लागतात. जसे त्यांच्या झोपड्या पाडायला आलेल्या त्याला महानगरपालिकेच्या माणसाला पैसे द्यावे लागतात, आणि त्यामुळेच गॅस सिलेंडर लवकर आणुन देण्याबद्दल पैसे घेण्यात त्याला गैर वाटत नाही.
 चित्रपट हि एका सुखात्मे कुटुंबाची कथा न रहाता, प्रत्येक व्यक्ती त्यातल्या प्रसंगाशी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घटना नकळत पडताळत राहते . म्हणूनच तो मनाला खूप भिडतो. चित्रपटाचा शेवट सकारात्मक करुन भविष्याबद्दल दर्शविलेला आशावाद हे देखील चित्रपटाचे वैशिष्ठ्य फार आवडले. हिंसात्मक चित्रपटांमधून तरूणांच्या मनावर परिणाम होतात, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळते असे म्हणतात. ते जर खरे असेल तर ’हा भारत माझा’ बघुन  मनावर चांगले संस्कार नक्कीच घडतील आणि काही थोडे त्याचे आचरण जरुर करतील.

©

3 comments:

SUJATA said...

Movie pahanyachee utsukata nirman zaliye. - Sujata

भानस said...

हा सिनेमा पाहायचा योग जुळून आला नाही. जालावर आहे का पहायला हवे.

भानस said...

खूप दिवसात काही नवीन काही पोस्ट नाही.. :(

वाट पाहतेय..