Friday, December 7, 2012

सुडोकु

चाळीशीनंतर घडणाऱ्या शारीरिक बदलांबद्द्ल आणि त्यावरील उपायांबाबतही सतत कानी पडत असते. शारीरिक फिटनेस साठी चालणे,जॉगिंग पासून जिम योगा,ट्रेकिंग याबद्द्ल लोक किती जागरुक झालेत हे सकाळ, संध्याकाळच्या टेकड्या, जॉगिंग ट्रॅक्स वरील गर्दी आणि जिमच्या वाढत्या संख्येवरुन दिसून येतच आहे. पण शरीराच्या तंदुरुस्ती इतकेच मनाचे आणि मेंदुचे स्वास्थ हि महत्त्वाचे आहे हे सुध्दा आता जाणवू लागलेले आहे. उतार वयात होणारे पार्किसन्स, डीमेन्शिया,अल्झायमर यांसारखे मेंदुचे आजार  परदेशांइतकेच आपल्या देशातही दिसू लागले आहेत. अर्थात पूर्वीपण असे आजार नसतीलच असे नाही,पण त्यांची हि नावे आपल्याला माहित नव्हती.शिवाय सरासरी आयुर्मान हे गेल्या पन्नास वर्षात वाढलेले दिसते. शंभर वर्षांपूर्वी साठी गाठणे अवघड होते त्यामुळे एखाद्याने वयाची साठ वर्षे मोठा आजार,अपघात न होता घालवली कि त्याची ’साठीची शांत ’ म्हणून मोठा समारंभ करीत असावेत अन्यथा वाढदिवस साजरे न करण्याच्या आपल्या रितीत हा सोहळा बसलाच नसता. त्या काळी जास्त जगणाऱ्यांची संख्या कमी होती तरी कंपवात, भ्रमिष्ट्पणा , म्हातारचळ या नावाने  पार्किसन्स, डीमेन्शिया,अल्झायमर हे आजार माहित होते.पण त्याचे प्रमाण मात्र फारच कमी होते. आजकाल या आजारांचे प्रमाण बरेच वाढलयं आणि विभक्त कुटुंब पध्दती ,शहरीकरण यामुळे अशा आजारांनी पिडित व्यक्ती आणि त्यांचे करावे लागणारी त्यांची मुले यांचे हाल वर्णनाच्या पलिकडे आहेत.

        विस्मरणाचा आजार भविष्यात टाळायचा असेल तर योगाभ्यासाबरोबर मेंदुचे व्यायाम करा असे डॉक्टर सांगत असतात. म्हणजे शब्द्कोडी सोडविणे, डायरी लिहिणे, सुडोकु सारखी गणिती कोडी सोडविणे . ज्या योगे मेंदुला चालना मिळते. मला हल्ली बरेचदा महत्त्वाच्या कामांचा विसर पडतो, वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ आठवायला वेळ लागतो, सकाळी स्वयंपाक करताना फ्रिजपाशी जा्वुन फ्रिज उघडला तर आपण काय़ घ्यायला आलो ते चटकन आठवत नाही मग पुन्हा ओट्यापाशी जायचे आठवायचे आणि लगेच फ्रिजकडे जायचे असे उद्योग करावे लागतात. त्यामुळे मुलींनी ,"आई, तू रोज सुडोकु सोडव ,शब्दकोडी सोडव" असा धोशा लावला. शब्द्कोडी मी पूर्वीपासून सोडवत होते, ती सोडवायला मला काहीच त्रास नव्हता उलट मजाच यायची आणि आताही माझा हा विसराळूपणा शब्दकोडे सोडवताना मला अजिबात त्रास देत नव्हता. ’सुडोकू’ हि भानगड मात्र नविनच होती. एका 9x9  च्या मोठ्या चौरसात ९ लहान चौरस आखलेले. प्रत्येक चौरस पुन्हा 9x9 मध्ये विभागलेला.म्हणजे एका मोठ्या चौरसाचे  ८१ छोटे भाग पाडलेले. त्यात एक ते नऊ असे अंक कोडे घालणाऱ्याने मधे मधे लिहिलेले असतात, खेळाचा नियम म्हणजे प्रत्येक आडव्या उभ्या रेषेत एक ते नऊ असे नऊ अंक आले पाहिजेत आणि नऊ चौरसातल्या प्रत्येक चौरसातही एक ते नऊ असे नऊ अंक आले पाहिजेत.  सुरुवातीला हे कोडे फारसे अवघड नाही वाटले. एकही आकडा आडव्या उभ्या रांगेत पुन्हा आला नाही कि झाले इतके सोप्पे, यात कसला आलाय मेंदुला व्यायाम आणि ताण म्हणून पेन्सिल घेतली आणि बसले सोडवायला. पण जसे सोडवू लागले तसा त्यातला गणिती हिसका जाणवू लागला. आडव्या रांगांवर लक्ष ठेवून अंक भरायला घ्यावे तर उभ्या रांगांमध्ये आकडे रीपीट होत. उभ्यांकडे बघावे तर आडव्या रेघांमधे गडबड. तर कधी एखाद्या लहान चौरसात एक आकडा दोनदा. पुन्हा पुन्हा खोडून पेपर फाटून जायचा , मग मी हे कोडे एका कागदावर उतरवून घेई. पेपरामधले त्यांनी लिहिलेले आकडे लाल आपण लिहिलेले काळे असत , मी उतरवून काढलेल्या कागदावरचे सगळे आकडे काळे मग तर माझा खूपच गोंधळ उडे आधी दिलेले आकडे आणि मी लिहिलेल्या आकड्यांमधून मूळचे कोडे बाजूला राही वेगळ्याच जंजाळात मी अडकून जायची.गणिताला भोंगळपणा, कामचलाऊ पणा किंवा दे दणकवुन असे काही मंजूर नसतेच. त्यामुळे एका चौरसात पाच आकडे असतील तर उरलेले चार आपल्याला हवे तसे लिहिताच येत नाहित, त्यावेळी उभ्या आडव्या रेघांचा विचार करावाच लागतो.एका रिकाम्या जागेत २ किंवा ४ यापैकी कोणताही आकडा चालेल असे असेल तर आदमासाने दोन लिहून टाकू असे म्हणून लिहिले कि संपले. पुढचे सगळे कोडे चुकलेच म्हणून समजा.त्या दोन शक्यता मधून एकच पक्का आकडा येण्याकरीता चारी बाजूनी विचार करणे जरुर असते.

     सुरुवातीला हे नियम समजून कोडे सोडवणे अवघड जात होते,पण ते सोडवण्याचा मोह मात्र कमी होत नव्हता. आता जिंकून खूप मोठे काही मिळवायचे नव्हते त्यामुळे जिंकण्याची इर्षा नव्हती आणि हरल्यावर कुणी काही म्हणणारही नव्हते. माझी धाकटी लेक खूपच पटकन सुडोकू सोडवते. ती मला कधी चिडवायची तर कधी मोठेपणाने चल मी तुला पुढचे सोडवून देते असे म्हणून कागद हातात घ्यायची. मला पण आता या खेळाचे अगदी व्यसनच म्हणाना लागले. पेपर आला कि बाकिच्या कुठल्याच बातम्या न बघता सुडोकुचा कागद घ्यायचा आणि पेन घेवुन सुरु व्हायचे. हळूहळू मलाही जमायला लागले. आडव्या,उभ्या रेघा आणि चौकोनांमध्ये पुनरावृत्ती न करता एक ते नऊ आकडे बसविणे मला येवु लागले. पुढे पुढे मला या खेळाचा छंद लागला. एखाद दिवशी चहा पिता-पिता कोडे सोडवूनही होई , तर कधी सकाळची पहिली गडबड संपली कि निंवात बसल्यावर कोडे जमून जाई. कधी ऑफिसला लवकर जायचयं, एखाद्या मिटींगची तयारी किंवा तत्सम काही टेन्शन असले कि त्याच्या विचारांमध्ये खेळाकडे दुर्लक्ष होई मग ते कोडे सुटायला वेळ लागे आणि ते न सुटणारे कोडे मला इतर का्मांत अडथळा बनुन जाई. बाकीची कामे करताना ही डोक्यात विचार सुडोकुचाच असे. रात्री सगळी कामे उरकल्यावर हातात कागद घेवुन मी परत सोडवायला घेई आणि कोडे सुटले कि सारा दिवसभराचा शिण नाहिसा होवुन मी उत्साहाने दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागे.सुडोकु सोडवायचे तंत्र एकदा समजले कि खरं तर ते सोडवायची मजा संपली. पण बघताक्षणी ते सोडवून टाकण्याइतका सराईतपणा माझ्यात अजून आला नाही म्हणून कदाचित अजूनही ते सोडवण्याची मला अजून गोडी वाटतीय.
  सुडोकुच्या त्या चौकोनांकडे आणि त्यातील आकड्यांकडे बघून माझ्या मनात वेगळेच विचार सुरु होतात हल्ली. नऊ चौरसातल्या एखाद्या चौरसात तीन आकड्यांची बाकी असते आणि एखादा चौरस एक आकडा घेवुन बसलेला असतो.योग्य अंक भरताना हा रिकामा चौरस पटकन भरुन जातो आणि तीन आकडे हवा असणारा शेवटपर्यंत रखडतो. ते पाहून मला वाटते, एखाद्याला आयुष्यात बरेच मिळालेले असते थोड्याच गोष्टी हव्या असतात , त्यामुळे त्या गोष्टी अमुक अशा, आणि तशाच हव्यात असा त्याचा आग्रह असतो, उलट एखादया जवळ काहीच नसते, मग तो मिळेल त्यात समाधान मानतो.किंबहुना मिळेल ते त्याला हवे वाटते आणि लवकरच तो भरुन पावतो. एखादी एक, दोन अंकासाठी अपूर्ण रेघ देखील अडून राहते आणि आर्ध्याहून जास्त रिकामी रेघ तिच्या आधी भरते. एखाद्या ऊंच-गोऱ्या सडपातळ आणि सधन कुटुंबातल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न लांबावं आणि अगदी बेताच्या परिस्थितीतल्या रुपाने सामान्य मुलीला चांगले स्थळ मिळून तिचं घर भरावं असं वाटतं ते बघताना.

      ’सुडोकू’ हे मानवी जीवनाचं प्रतिक आहे असंही वाटतं कधीतरी. प्रत्येकाच्या नऊ कप्प्यांच्या घरात किती  आकडे आधीच लिहून आलेत ते आपल्या हातात नाही. कुठल्याच आकड्याची पुनरावृत्ती न करता नऊ कप्प्यात नऊ अंक भरायचे.आजुबाजूचे चौकोन म्हणजे आपल्या आजुबाजुची परिस्थिती,आपले सगेसोयरे, मित्र, समाज. सगळ्यांना समान पातळीवर ठेवता आले म्हणजे तुम्ही खेळाचे नियम पाळून आयुष्यात यशस्वी झालात. आपले कोडे आपणच सोडवायचे. नियम पाळणे न पाळणेही आपल्यावरच.पण आजुबाजुचे चौकोन आपल्यासारखेच भरता येण्याची कला साधता आली कि जमले म्हणायचे. ’सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्चन्तु मा कश्चित दुःखवाप्नुयात’ असे सांगणारे आपले ऋषी मुनी तरी वेगळं काय सांगतात?

      सुडोकू सोडवताना अंकांची मांडणी बरोबर यावी यासाठी आडव्या,उभ्या आणि चौरसातल्या अशा तिन्ही ठिकाणचा विचार करीत अंक भरुन मजा आलीच, त्याच्याकडे वेगळ्या बाजूने बघतानाही एका गोष्टीकडे बघाय़चे वेगवेगळे दृष्टिकोन समजले हाच असेल ना मेंदूचा व्यायाम? अशा व्यायामाने मेंदू तंदुरुस्त राहणार असेल तर करावाच रोज हा व्यायाम.   ’सुडोकू’ या कोड्याचा जनक कोण असेल आणि त्याचा मेंदू किती तल्लख असेल. सुडोकुच्या जनकाला आपले लाख सलाम !
©

4 comments:

Shubha Pathak said...

Shubha, tu tar choukonatune jag baghayala laglis. Yevadhhese code to ekadam aayushyacha drushtikone tyatun shodhalas! Va SHabbas

Shubha Pathak said...

Shubha, tu tar choukonatune jag baghayala laglis. Yevadhhese code to ekadam aayushyacha drushtikone tyatun shodhalas! Va SHabbas

aativas said...

छान अर्थ लावला आहे 'सुडोकु'चा. लेख आवडला.

Deepak Shirahatti said...

छान। सुडोकु ला जीवनाबरोबर मस्त ज़ोड़लं।

तसं तर मला अशी छान भाषा वाचूनच मजा येतो। आणि त्यात मनाला पटणारे विचार। उत्तम।