Tuesday, July 9, 2013

देव तारी त्याला ......



 उत्तराखंडात पुराने झालेल्या भीषण हानीची वर्णने टि.व्ही वर बघुन आणि त्या संदर्भातल्या बातम्या वाचून मन सुन्न झाले नाही असा दर्शक विरळा. दरवर्षी इतक्या प्रचंड संख्येने भाविक चारधाम यात्रेला जातात. त्यावेळी त्यांची नोंद,त्यांचे शारीरिक स्वास्थ्य(फिजिकल फिटनेस) बघितला जातो का? असे बरेच प्रश्ण या संदर्भात ऐरणीवर आले आहेत. पूरग्रस्तांचे पुर्नवसन आणि मृतांच्या नातलगांना मदत म्ह्णून जमा होणाऱ्या कोट्यावधीच्या निधी पेक्षा ,हिमालय़ातील भौगोलिक परिस्थिती, तिथल्या बदलत्या हवामानाचा अभ्यास करुन आधीच काही योजना राबवत्या आल्या नसत्या का? बेकायदेशीर बांधकामे,हवामानखात्याने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष अशी अनेक कारणे या मनुष्य हानी बद्दल दिली जात आहेत. विचार करावा तितका त्रास फार होतो. मोक्ष मिळावा म्हणून यात्रा करायची तर ती करताना मरण आले तर मग त्याचे दुःख कशासाठी असा विचार ही आल्याशिवाय राहत नाही. मात्र अशा पधद्तीने आलेला हा शेवटचा दिस ’गोड’ खचितच नाही. माझ्या नणंदेने हि यात्रा नुकतीच केली , तिचा हा अनुभव माझ्या शब्दात.


      केदारनाथच्या रस्त्यावर पोहोचताना संध्याकाळ होवुन गेली.रस्त्यावर वहानांची तुफान गर्दी. पुण्यातुन गर्दी, ट्रॅफिक जामला कंटाळुन इकडे आलो तर त्याने काही पिच्छा  सोडलेला नाही.शिवाय इथले अगदिच अरुंद रस्ते, एका बाजुला खडा पहाड आणि दुसरीकडे खोल दरी. इकडचे ड्रायव्हर बाकी शांत आणि समजुतदार. एवढ्या गर्दीतुन शांतपणे मार्ग काढीत असतात. उगीच कुणाला शिव्यागाळी नाही, कर्णकर्कश्श आवाजात हॉर्न वाजवत मागच्याला ओव्हरटेक कराय़चे, आपल्या पुढे गेलेल्यावर दातओठ खात त्याला ओव्हरटेक करायचे असा प्रकार नाही. गौरीकुंडला पोहोचताना तिन्हीसांज होवुन गेली होती अंधारुन आले ते आभाळ भरुन आल्यामुळे. दिवसभरचा प्रवास, अरुंद रस्त्यांमधुन वाट काढीत येताना जीव मुठीत धरल्यामुळे खूपच शीण जाणवत होता. समोर दिसणाऱ्या एका बऱ्या लॉजवर जागा मिळवली.कधी एकदा पाठ टेकतो असे होवुन गेले होते. पहाटे पाच उठुन केदारनाथ कडे रवाना व्हायचे ठरले होते.बरोबरच्या सगळ्यांशी तसे बोलुन झोपलो.

    डोळे मिटल्यावर तीस-बत्तीस वर्षांपूर्वी आई-दादांबरोबर चार-धाम यात्रा केली होती ते दिवस साकारले. किती शांतता होती तेंव्हा ! रस्त्यावर तुरळक गर्दी. पाऊस देखील अजिबात नव्हता. धर्मशाळेतही मोजकी माणसे. पहाटे उठून चालायला सुरुवात केली. आईला दम लागायचा म्हणून तिच्याकरीता घोडा केला होता, मी आणि दादा पायी जाणार होतो.दादा भराभर पुढे जात होते,त्यांच्या हातात जपाची माळ असे.मी घोड्याबरोबर चाललेली.अरुंद वाट ,पाय घसरायची भिती होती पण घोड्याचा पाय घसरला तर आईचे काय होईल याचीच काळजी असल्याने मी आईची पाठ सोडत नव्हते, आजुबाजुला बघताना त्या अरुंद वाटेचा विसर पडला.काय मनोहर दृष्य होते ते! आभाळाला भिडणारे उंच वृक्ष, बर्फाच्छादित हिमालयाची शिखरे कोवळ्या उन्हात सोन्यासारखी चमकणारी. आजुबाजुला यात्रेकरुंचा मेळा. काही घोड्यावर जाणारी,काही डोलीतुन जाणारी काही माझ्यासारखी पायी चालणारी. लहान वय आणि पहिल्यांदाच बघायला मिळालेली ती अफाट निसर्गसंपदा यामुळे चालण्याचे श्रम मुळी जाणवलेच नाही. केदारनाथच्या मंदिरात दादांनी सोवळे नेसुन रुद्राभिषेक केला. दादांचा धीरगंभी्र आवाज कानी येतोय असे वाटताना डोळा लागला.

    पावसाच्या आवाजानेच जाग आली. आन्हिके उरकुन निघालो. चिखल,पाऊस आणि गर्दी यामुळे चालण्याचा बेत मी रहितच केला.आमचे सहप्रवासी आधीपासूनच घोड्यावरुन जाणार होते. घोडे ठरवले. घोड्यावरुन जाताना चिखल पाऊस,गर्दी यामुळे वाट कधी संपतीय असं होवुन गेलं. आजुबाजुच्या रमणीय निसर्गाचा विसरच पडला होता जणू. मनात देवाचे नाव येत होते पण ते जीव वाचावा यासाठी. मंदिराजवळ पोहोचायला दहा वाजले. अलोट गर्दीने परिसर फुलून गेला होता. हेलिकॉप्टर मधुन येणाऱ्या भाविकांना तात्काळ गाभाऱ्यात प्रवेश होता. पैसा असला कि सगळी कामे कशी चुटकी सरशी होतात , याला देवदर्शन पण अपवाद नव्हते.  तिरुपतीला हा भेदभाव बघितला होता.पण भोळा आणि विरागी म्हणून प्रसिध्द असा शिव देखील या पैसेवाल्यांमुळे सामान्यांना उशीरा दर्शन देतो हे बघुन नवल वाटले. रांगेत उभे राहुन दर्शनाची प्रतीक्षा करताना तीन चार तास गेले. त्यातही तिथले पंडीत(पांडे) लोकांकडून प्रत्येकी १०००-२००० रु घेऊन त्यांना पुढे घुसवत होते. हताश पणे हे बघण्याशिवाय आमच्या हातात काहीच नव्हते.

    दोन वाजता आत जायला मिळाले.गर्दीच्या लोढ्य़ांमधुन सरकत जमेल तसे मनोभावे दर्शन घेतले.गाभाऱ्यात शांती आणि मांगल्याचा अभावच होता. गर्दी, घाई यामुळे मी मिटल्या डोळ्यापुढे लहानपणी बघितलेला देखावा आणला आणि नमस्कार करुन बाहेर पडले. आता बद्रिनाथला जायचे होते. येताना परत घोड्यावरुन गर्दीतुन वाट काढत निघालो. पाऊस नव्हता. परतताना हिरवाई, बर्फाच्छादित शिखरे यामुळे मन प्रसन्न झाले होते. गर्दी,चिखल सगळ्याचा विसर पडला.निसर्ग शोभेचा आस्वाद घेत खाली उतरलो आणि बद्रिनाथकडे रवाना झालो. जातानाही भरपूर गर्दीमुळे पोचायला बराच उशीर झाला.बद्रीनाथला चालावे लगत नाही.देवळाजवळ पर्यंत गाडी जाते.तिथेही गर्दीमुळे दर्शनाला उशीर. पण त्या सगळ्याची एव्हाना सवय झाली होती. दर्शन घेवुन परत आलो. आमचा ड्रायव्हर आमची वाटच बघत होता. केदारनाथला ढगफुटी होवुन खूप पाऊस झाला आहे. वातावरण ठिक नाही आपण तडक हरीद्वारला जायला हवे असे त्याने सांगितले. विचार कराय़लाही वेळ नव्हता.ड्रायव्हरच्या आवाजावरुन धोक्याची पुसट कल्पना आली.येताना गर्दीमुळे झालेल्या उशीराने परतायला वेळ लागणार याची कल्पना आलेली होती. शिवाय आता दोन धामांचे दर्शन झालेले होते तेंव्हा परतणे शहाणपणाचे ठरेल असा विचार करुन निघालो.

    गोविंद घाटीला येताना दुपारचे दोन वाजले होते. तिथे रस्त्यावर वाहनांची अशी काही गर्दी होती कि बोलता सोय नाही. गोगलगायीच्या गतीने आम्ही दोन तासात शंभर मीटर तरी पुढे सरकलो असू किंवा नसू. चार नंतर तर गाडी बंद करुन ठेवली ड्रायव्हरने. हताश पणे पुढचे वाहन सरकण्याची वाट बघण्याखेरीज हातात काहीच नव्हते.रात्रीचे नऊ वाजले तरी परिस्थितीत काहीच फरक नव्हता.तेंव्हा हि रात्र इथेच काढायचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. ड्रायव्हरलाही झोपेची नितांत गरज होती. गाडी थोडी मागे घेवुन थांबवली.खाली उतरुन एका लॉज मधे आम्ही खोल्या मिळावल्या.पहाटे सहा वाजता निघयचे ठरले.

    आता गर्दी कमी झाली असेल आपण दुपारी चार पर्यंत हरिद्वारला जावु असे म्हणत सकाळी गाडीत बसलो. पण कसलं काय ? गाडी मुंगीच्याच वेगान, गर्दीतुन पुढे सरकत होती. सकाळचे १० वाजुन गेले , आम्ही १० ते २० किमी पुढे आलो होतो, अशा वेगाने आम्हाला हरिद्वारला जायला किती वेळ लागेल याचा हिशेब प्रत्येक जण मनात करत असला तरी बोलून दाखवायचा कुणालाच धीर होत नव्हता.१२ वाजुन गेले, गाडी जरा कडेला घेवुन खाणी पिणी उरकली. चार वाजले , सहा वाजले.घड्य़ाळ पळत होते, गाडी गर्दीतून मंद गतीने सरकत होती. मन चिडचीड, वैताग आणि काळजीने व्याकुळ झाले होते.कुणालाच कुणाशी बोलायचे त्राण नव्हते. प्रत्येकाचे मोबाईल वाजत, चौकशा होत.जमेल तशी उत्तरे दिली जात. माझ्या मुलाचाही फोन आला. त्याचा आवाज ऐकून मला गहिवरुन आले. "आम्ही हरीद्वारला निघालोय, रस्त्यावर खूप गर्दी आहे रे, गाडी हलता हलत नाही बघ. तू जरा प्रार्थना कर रे, आम्ही सुखरूप येण्य़ासाठी." "आई, याल तुम्ही सुखरुप, काळजी नको करु. हरिद्वारला पण थांबू नका, लगेच दिल्लीला यायला निघा , करतो मी परत दोन तासांनी फोन, फोन बंद कर, दोन तासांनी परत ऑन कर नाहीतर बॅटरी संपेल"  त्याच्या आवाजाने आणि त्याच्याशी बोलल्यावर जरा बरे वाटले मला. पर्समधुन जपाची माळ काढली, जप करायला सुरुवात केली.मन अजिबात ऐकत नव्हते,पण तरीही जमेल तसे नामस्मरण करीत होते. आता भोवतालच्या परिस्थितीचा स्विकार करायची तयारी झाली. गाडी हळूहळू का होईना चालली आहे,  आपण निश्चित पोहोचणार आहोत असे मनाला बजावत जप चालू होता. नऊ वाजून गेले.

    हरीद्वार अजून ५० किमी तरी असावे, ड्रायव्हर म्हणाला, रात्री मी गाडी चालवणार नाही. आता पुन्हा मुक्कामासाठी ठिकाण शोधा, सकाळी पुन्हा गर्दी असणार, आम्हा सगळ्यांनाच कधी एकदा हरीद्वारला जातोय असे झालेले. सगळ्यांनी मिळुन त्याला हरीद्वार पर्य़ंत जाण्याची विनवणी केली. जास्त पैसे देण्याचे अमिषही दाखवले. शेवटी तो तयार झाला. रात्रीच्या अंधारात आमचा प्रवास चालू राहिला. बाहेर अखंड पाऊस पडत होता. पुलावर आमची गाडी दोन तास अडकून होती. निम्मा पूल ओलांडला आणि बघितले तर एक झाड  पडून रस्ता अरूंद झाला होता, आमच्या गाडीतले चार -पाच पुरुष खाली उतरले त्या सगळ्यांनी मिळून झाड थोडे बाजुला सरकवले. गाडी जायला रस्ता केला. ते गाडीत भिजून, गारठून आणि दमुन आले, पुढचा थोडा वेळ त्यांना टॉवेल देण्यात बाहेरच्या पावसाचे, मागच्या पुढच्या गर्दीचे वर्णन ऐकण्यात गेला. एरवी गाडी सुरु झाली कि माझे डोळे मिटतात. चालत्या गाडीतून पळती झाडे पाहिलेली मला काही आठवत नाही. पण यावेळी माझी झोप पळाली होती.तहान ,भुकेची जाणीवही नष्ट झाली होती. हरीद्वारला पोचणे हा एकमेव ध्यास आम्हा सगळ्यांना लागला होता. ड्रायव्हर बिचारा गाडी चालवत होता. पहाटेचे तीन वाजून गेले. आता गाडीने थोडा वेग घेतला. पावसाचा जोरही काहिसा कमी झाला असावा. पाच वाजता आम्ही हरीद्वारला पोचलो.

    हरीद्वारला दोन दिवस रहावे असे वाटत होते  मनातुन पण सकाळी दहा वाजता हरीद्वार सोडले आणि दिल्लीला जाणाऱ्या बस मधे बसलो. हरीद्वारपासून हरीद्वारपर्यंत अशी आम्ही मिनी बस ठरवली होती. त्या बस ड्रायव्हरने पाच सहा दिवस फार चांगली गाडी चालवली. त्याचे आभार मानले, त्याला ज्यादा पैसेही दिले.पण तरीही जास्त बोलायला वेळ मिळाला नाही. दिल्लीच्या बसमधे बसलो. प्रवासाने अंग अंबुन गेले होते.दिल्लीच्या बसमधे मला जरा झोप लागली. दिल्लीत ऊतरलो. हॉटेलमधे पोहोचल्यावर फोन चालू केला. १०-१५ मिस्ड कॉल्स होते, भावाचा,मैत्रीणींचे. अंघोळ आदि आन्हिके उरकून सहज टि.व्ही लावला. उत्तराखंडात पुराने घातलेल्या थैमानाच्या बातम्या बघताना मी मटकन खालीच बसले. आदल्या रात्री ज्या पुलावर आम्ही दोन तास अडकलो होतो, तो पूल पहाटे वाहून गेला होता. बद्रीनाथ, केदारनाथ कडील लोकांचा हरीद्वारशी संपर्क तुटला होता. बाकीच्या बातम्या आणि वर्णने सर्वांना माहित आहेतच. मानवाने निसर्गाची केलेली पायमल्ली, नदीच्या दोन्ही तीरावर केलेली अनधिकृत बांधकामे ,पांड्याने केलेले देवाचे बाजारीकरण यामुळे शिवाने तिसरा डोळा उघडून हा प्रलय घडवला असे सगळे बोलत होते. मुलगा मला दिल्लीला ताबडतोब निघुन या, असे का म्हणत होता त्याचा बोध झाला. इतक्या मिस्ड कॉल्स चा संदर्भ लागला.  आम्ही कसे वाचलो याचा मी सारखा विचार करत होते.
   
      केवळ नशिबवान म्ह्णून आम्ही सहिसलामत सुटलो.  आमच्या मागे चाललेल्या या प्रचंड हाःहाकारा विषयी अगदीच अनभिज्ञ होतो आम्ही. हरीद्वारला पोहोचणे हे एकच ध्येय ठ्वुन  मार्गक्रमणा करीत होतो.  क्रांतीकारकाचा इंग्रजानी केलेला , किंवा शिवाजी महाराजांचा सिध्दी जोहारने केलेला पाठलाग मला आठवला. साक्षात काळ आमचा असाच पाठलाग करीत होता.  शंकराने हृदयी जपलेला रामनामाचा मंत्र मी करत होते. माझे वडील हा जप तिन्ही त्रिकाळ करीत, मलाही जप करावा असे नेहमी सांगत, कदाचित त्याने आमचे रक्षण केले असेल, काही असेल  काळ आलेला होता पण वेळ आली नव्हती म्हणूनच आम्ही पुण्य़ापर्यंत सुखरुप पोहोचलो.    

No comments: