Tuesday, January 19, 2016

जिणे गंगौघाचे पाणी

  टि.व्ही. वर मुलीने लावलेला सिनेमा बघत होते ’पिकू’ नावाचा. सिनेमात वृध्द आणि विधुर अमिताभ आपल्या एकुलत्या एक मुलीला सळो कि पळो करुन सोडत होता.तिच्या ऑफिसमधे फोन कर,तिला पार्टीतून बोलावुन घे सतत तब्येतीची रडगाणी , एक ना दोन. मुलगी म्हणाली ,"बघ आई, म्हाताऱ्या माणसांना वृध्दाश्रमात पाठवणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही नावे ठेवता, पण इथे हा आजोबा त्या मुलीचा किती छळ करतोय तिच लग्नही होवु देत नाहीय "

        अस घडतही असेल, पण माझे वडील ५२ म्हणजे आजकालच्या भाषेत तरूण वयात गेले, आणि सासरेही ६५ व्या वर्षी अगदी निरोगी तब्येत असताना अचानक हार्ट्फेल होवुन गेले. त्यामुळे त्रासदायक म्हाताऱ्यांचा मला अनुभव नाही असे म्हणताना झटकन डोळ्यापुढे आता ऐंशींव्या वर्षात पदार्पण करणारे काका आले.   पिकू सिनेमाच्या पूर्णतः विरोधी अस त्यांच वागण असल्याने  त्याचे वय जाणवत नसावे असे वाटते. दहा वर्षापूर्वी माझी काकू अगदी ध्यानीमनी नसताना अचानक गेली.हा धक्का आम्हालाच एवढा होता कि काका आणि त्याच्या मुलींवर काय बेतले असेल याची कल्पनाही करवत नाही. काकांनी कपभर चहा देखील हाताने केलेला आम्ही कधी बघितले नव्हते. अर्थात ते दिवसभर त्यांच्या व्यापात असत आणि काकूनेही त्याबद्दल चुकूनही तक्रारीचा सूर काढला नव्हता. मात्र अचानक आलेल्या या प्रसंगाने काका फारच खचले. त्यांची एक मुलगी ठाण्यात डॉक्टर आणि दुसरी अमेरिकेत. काकांना एकट्याला पुण्यात ठेवायची मोठ्या मुलीची तयारी नसल्याने तिने त्यांना ठाण्याला नेले. मी दोन चार दिवसांनी फोन करुन चौकशी करायची त्यांची. एकदा ते फोनवर मला म्ह्णाले, " शुभा, माझी लेक माझी खूप काळजी घेते,सतत माझ्या बरोबर असते. मला एकटेपणा जाणवू नये यासाठी खूप करते ती .आता ती म्हणतीय मी माझी संध्याकाळची प्रॅक्टीस बंद करते तुमच्यासाठी. पण तू माझ्या वतीने तिला एक सांगशील का?"
" काय?"
" तिला म्हणावं माझी एवढी काळजी करू नको, हे दुःख खूप गहिरं आहे ते संपणार नाहीच,पण यातून मी हळूहळू बाहेर येईन त्याकरीता तिन तिच आयुष्य,करीयर वाया घालवणे बरोबर नाही.तिची आई गेली आहे याच दुःख विसरुन ती माझा विचार करतीय ह्याचा मला त्रास होतो. तेंव्हा तू तिला समजावुन सांग"
आपले दुःख जाणणाऱ्या मुलीला तिचे आयुष्य सुरु करायला सांगणारे माझे काका किती मोठ्या मनाचे ! अशा  लोकांच्या सहवासात असल्याने मला पिकू सिनेमा कसा पटणार?

    काका वयाने मोठे आहेतच पण ते पुण्याच्या नामांकित कॉलेजमधुन प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. एम.एस.स्सी ला सुवर्णपदक मिळवणारे, गणितावर पन्नासहून जास्त पुस्तके लिहिणारे, तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास असणारे आहेत.
   
      आमच घर लहान होत,  घरात माणसं जास्त होती.  आई नेहमी सांगायची कि  मी लहान असताना फार हट्टी आणि रडकी होते. सतत् मला घेऊन बसावे माझ्याकडे लक्ष द्यावे अशी माझी अपेक्षा असे आणि मला कुणी घेतले नाही तर् मी तारस्वरात रडायची. (हल्लीच्या लहान मुलांना जे आपसुख मिळते त्यासाठी मला बंड करावे लागत होते.)  आईला कामामुळे मला सतत् घेवुन बसणे शक्य नसे. त्यावेळी माझे काका् एस.पी. कॉलेजमधे प्राध्यापक होते. त्यांचे लग्न झालेले नव्हते. आम्ही कॉलेजच्या आवारातच राहत होतो. काका त्यांना वेळ मिळाला कि तडक घरी येत आणि मला घेवून् खेळवत बसत.  गोल्ड मेडल मिळविलेल्या, कॉलेजमधे शिकविणाऱ्या दिराला या पोरीपायी घरी येवुन तिला खेळवावे लागतय या गोष्टीचा आईला फार संकोच वाटायचा.पण काकांचा स्वभावच तसा होता, दुसऱ्याला समजून घेण्याच्या  अतिशय दुर्मिळ स्वभावाचे माझे काका. अर्थात ते कळायच माझ वयच नव्हतं.
   
    लहान पणी घरात वडील रागीट ,आईचा स्वभावही तापट  आणि काकांचा स्वभाव अतिशय शांत. आम्हाला त्यांनी मारणे सोडाच कधी आवाज चढवून बोललेले आठवत नाही सहाजिकच सगळ्या भाच्या पुतण्यांचे ते लाडका मामा आणि काका.  पुढे काकांच लग्न झालं, आम्ही सहकारनगरच्या घरी रहायला गेलो.काकांच घर डेक्कन जिमखान्यावर. सहकारनगरमधुन तिकडे जायला सोईच्या बस नव्हत्या.  काकांकडे जाणे येणे कमी झाले,काकाही कॉलेजमधे विभागप्रमुख झाले, ते पुस्तकेही लिहित त्यामुळे त्यांनाही दिवस कमी पडायचा. सहाजिकच आमच्या गाठी भेटी सणावारी,समारंभापुरत्या मर्यादित झाल्या. पुढे मी सायकल चालवू लागल्यावर काकांकडे जाऊ लागले.

    बारावीत गेल्यावर काकांना विचारुन क्लास लावले.फिजिक्स, काकांचे एक मित्र शिकवत होते, मॅथ्ससाठी काकांच्या कॉलेजमधील सहकारी प्रयाग मॅडमकडे मी जात होते.पण co-ordinate geometry काकांचा आवडता विषय होता. त्यावेळी काका व्हाइस प्रिन्सिपल होते पण त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढून त्यांनी त्यांचा लाडका विषय मला शिकवायचे कबुल केले. गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस मी ,माझी चुलत बहीण आणि  एक मैत्रीण  त्यांच्याकडे जात होतो. गुरुवारी संध्याकाळी सहा ते आठ आणि रविवारी दुपारी तीन ते सहा असं सलग आम्ही शिकत होतो.काका कुठल्याही पुस्तक अथवा नोटस हातात न घेता सहज शिकवत. circle,parabola,ellipse,hyperbola पासून सुरुवात करुन Three dimentional geometry पर्यंतचे सगळे धडे काकांनी तीन चार महिन्यात शिकवले. तीन तीन तास बसूनही मला कधी शिकायचा कंटाळा आला नाही याच श्रेय काकांना जितक आहे तितकच मधल्या वेळात दरवेळी काकू चहा आणि पोहे,उप्पीट,वडा असे चविष्ट खाय़ला काहीतरी आणून द्यायची त्यालाही आहेच. फार मजेचे दिवस होते ते. काकांच्या हुशारीबद्दल काका सोडून घरातील सगळ्यांकडून समजे.माझ्या दादांना तर् धाकट्या भावाच्या बुध्दीमत्तेचा प्रचंड अभिमान. दिवसातुन किमान एकदातरी त्याच्या हुशारीचं कौतुक व्हायचच.  काकांच्या बुध्दीमत्तेची जाणीव तेंव्हा मला प्रथमच झाली.अत्यंत अवघड प्रोब्लेम काका वेगवेगळ्या चारपाच पध्दतीने सोडवून दाखवीत आणि त्यातली शेवटच्या पध्दतीत तीन किंवा चार स्टेपसमधे रिझल्ट मिळे.  गणिताची गोडी मला होतीच पण त्यातली मजा मला काकांकडे आणि प्रयाग मॅडमकडे शिकल्यामुळे जास्त जाणवू लागली.काकांचा दिवस त्यावेळी पहाटे चारला सुरु होई. कॉलेजमधल्या जबाबदाऱ्या,आमची स्पेशल ट्युशन त्यांचे पुस्तक लिखाण हे सगळे सांभाळून भगवदगीतेचा अभ्यास चालू होता त्यांचा. पण हे सगळे असले तरी अभ्यास झाल्यावर काका सिनेमा,नाटक ,गाणी या पैकी कशावरही गप्पा मारीत .

    बारावीनंतर बी.एस्सी.ला मी काकांच्या कॉलेजमध्येच ऍडमिशन घेतली. माझ्या अडनावावरुन आणि तोंडावळ्य़ावरुन मी सरांची पुतणी आहे हे सगळ्या कॉलेजला माहित झाले. पण काकांच्या नावाचा गैरफायदा घ्यावा असे मला कधीही वाटले नाही. अतिशय शांत असणाऱ्या काकांचा  असा धाक होता ! मी एस.वाय ला असताना माझ्या दादांचे अकस्मिक निधन झाले. त्यावेळी काका आणि काकुने मला दिलेला मानसिक आणि भावनिक आधार मी कधीच विसरू शकणार नाही. कॉलेजमधे फि भरायची नोटीस लागताच काका मला बोलावुन पैसे आहेत कि मी भरू असे विचारायचे. मागितल्यावर पैसे देणारे भेटतात पण मागण्याची लाजिरवाणी वेळ  येवु   न  देण्याची काळजी घेणारे काका. अर्थात सुदैवाने त्यांना पैसे भरायची वेळ नाही आली.पण अडचण आली तर आपले कोणी आहे ही मोठा आधार त्यावेळी काकांनी दिला. मी तेंव्हा सकाळी ट्युशन्स घेत असे, संध्याकाळीही एखादी असायची. पण सुट्टीत कराय़ला काही नसे, मग काका त्याच्या पुस्तकाच्या हस्तलिखिताचे काम मला देत आणि त्याचे पैसे दे्त. माझा स्वाभिमान न दुखावता केलेली हि मदत मी कशी विसरु शकेन?
        पुढे एम.एस्सी ला ऍडमिशन घेतल्यावरही वेगवेगळ्या टप्प्यात काकांची मदत असेच.माझ्या नॅशनल स्कॉलरशिपचा फॉर्म आमच्या डिपार्ट्मेंटकडून मला मिळाला नव्हता, त्यांच्याकडून तो गहाळ झाला सबब माझा फॉर्म न मिळाल्याने मला स्कॉलरशिप न मिळाण्याची अडचण उभी राहिली. संकटकाळी सुटाण्याचा एकच मार्ग मला ठाऊक होता तो म्हणजे काका. त्यांना सगळे सांगितले त्यांनी त्यांच्या सगळ्या व्यापातुन चौकशा करुन मला कुलगुरुंना भेटायला सांगितले,माझ्यासाठी त्यांनी विद्यापिठाच्या कुलगुरूंकडे रदबदली केली आणि चुटकीसरशी माझे काम झाले.

        एम.एस्सी झाल्यावर मला लगेच नोकरी लागली आणि मी मार्गी लगले. काकांकडे अधुनमधुन चक्कर असेच.त्यांच्या मुलीही आता मोठ्या झालेल्या होत्या, मोठी मेडीकलला होती धाकटी  बी.एस्सी करत होती. मुली फारच  हुशार पण काका काकुंसारख्याच अतिशय साध्या आणि निगर्वी. काकाच्या तोंडून मी मुलींची फारशी स्तुती कधी ऐकली नाही. काका काकुंनी मुलींना रागावलेल ही मी कधी बघितल नाही.  काकांच्या मुली लाडक्या होत्या, कशा ते एकाच उदाहरणातुन लक्षात येईल.एका रविवारी मी काकांकडे गेले तर काका एकटेच घरी क्रिकेट्ची मॅच बघत बसले होते. मुली आणि काकू कुठे विचारल्यावर ते म्हणाले, "आज नेहरु स्टेडीयमवर मॅच आहे ना? मुलींना एकदा live match बघायची होती मग त्या तिघींना तिकिटे काढून दिली. गेल्यात तिकडे. "
" मग तुम्ही का नाही गेलात ?"
" घरी बघता येतेच ना? मग कशाला जाय़च म्हणून बसलोय घरी बघत, तुला नसेल बघायची मॅच तर टि.व्ही. बंद कर आपण गप्पा मारू "
 त्यावेळीही  मॅचचे तिकिट बरेच असेल , मुलींच्या हौशीसाठी काकांनी त्यांना पाठवले स्वतः मात्र घरात बघत होते.

        माझ्या लग्नाचे देवक त्यांनीच बसविले. पुढे सासरी गेल्यावर मी घर,नोकरी आणि संसार यात पार बुडून गेले. घरापासून दूर ऑफिस नवीन नोकरी आणि नवा संसार सगळ्याशी जुळवून घेण्यात मला काकांकडे जायला जमेना .फोन ही नव्हता तेंव्हा आंम्हा कुणाकडेच. कधी लग्नाकार्यात काकांशी गाठ पडत असे. भेटल्यावर ते घर,संसार यातले काही न विचारता विचारीत ,"नवीन काय वाचलस?" सुरुवातीच्या काळात खरोखरीच पुस्तक वाचनाचा मला छंद आहे या गोष्टीचा मला विसर पडावा अशी परिस्थिती होती.काकांच्या प्रश्णाने मी खजील होई. नवीन पुस्तकच काय़ रोजचा पेपर वाचणे मला जमत नव्हते.
" अहो ती आता संसारी झालीय,नोकरी आणि घर सांभाळून पुस्तके कशी वाचेल?" कुणीतरी माझी बाजू सावरुन घेत.
" बरोबर आहे, घरकाम आणि नोकरी म्हणजे तारेवरची कसरत आहे खरी पण बघ त्यातुन वेळ काढत जा"
        मग हळूहळू मी खरचच लायब्ररी लावली पुस्तके वाचायला वेळ काढू लागले. काकांनी वेळोवेळी मला विचारले नसते तर मी वाचनाच्या अपूर्व आनंदाला नक्कीच मुकले असते. काकांच्या मोठी लेक डॉक्टर झाली, पुढे लग्न होवुन ठाण्याला गेली. धाकटीच्या लग्नाच्या वेळी काका निवृत्त झाले होते, तरीही कॉलेजच्या सोसायाटीचे अजीव सभासद असल्याने ते काम करीत होते. मी त्यांना माझ्या घरी केळवणाला येण्य़ाचा आग्रहच नाही तर हट्ट्च केला आणि ते सगळे माझ्या घरी जेवायला आले.माझ्या हातचे ते त्यांचे पहिलेच जेवण होते. त्यामुळे मी केलेल्या प्रत्येक पदार्थाचे त्यांनी इतके कौतुक केले कि त्या कौतुकानेच माझे पोट भरले. (माझ्या नवऱ्याला तर असे कुणाचे कौतुक करायची आणि बघायची सवय नसल्याने सगळे जरा अतीच होतय असं वाटल असेल) निघतानाही ते म्हणाले, " शुभा ,तुझा अभ्यास मी बघितला होता पण तू इतका सुरेख स्वयंपाक करत असशील याची मला कल्पना नव्हती .."

            माझ्या नवऱ्याला नाशिकला झालेल्या जिवघेण्या अपघाताची बातमी समजल्यावर काका फार कासाविस झाले, ते सतत फोनवर माझी चौकशी करत.त्यांची डॉक्टर मुलगी सतत माझ्या संपर्कात होतीच, पुढे पुण्यात त्यांना आणल्यावरही ते रोज हॉस्पीट्ल मधे भेटायला येत आणि मला धीर देत.त्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळेच मी त्या प्रसंगातुन सुखरुप बाहेर पडले.
           
            काकांना सहा भावंडे त्यातल्या एका भावाची मी मुलगी , माझ्या इतकेच बाकीच्या सगळ्या भाच्या पुतण्यांशी त्यांचे असेच सलोख्याचे संबध आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते असेच उपयोगी पडतात, प्रत्येकाच्या आनंदाच्या प्रसंगी आवर्जुन उपस्थित राहतात. त्यांचे स्वतःचे बाळपण वडील लवकर वारल्याने फार त्रासात गेले. देवाने अलौकिक बुध्दी दिली होती पण त्यावर शाळेखेरीज कुठले संस्कार नव्हते. पुढे पुण्यात आल्यावर माझ्या दादांकडून वाचनाचा वारसा मिळाला आणि त्यातून त्यांनी स्वतःचा विकास स्वतःच केला. घरातील सततच्या अडचणींवर शांत चित्ताने मात करीत आपल्या करीयरचा ग्राफ चढताच ठेवला. एम.एस्सी झाल्यावर त्यांना रिझर्व बॅंकेतील नोकरीचे नेमणुक पत्र मिळाले होते पण प्राध्यापक होण्याचा  निश्चय त्यांनी इंटर सायन्सलाच केला होता. त्यासाठी त्यावेळी सहज मिळालेला इंजिनियंरीगचा प्रवेश त्यांनी नाकारला असल्याने, त्यांनी एस.पी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी घेतली आणि नंतर माझ्या वडीलांबरोबर त्यांनी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या. त्यात धाकट्या भावाचे शिक्षण, दोन्ही बहिणींच्या लग्नाची कर्जे फेडणे अशा अनेक बाबी. त्यावेळी अमेरीकेत जावुन प्राध्यापकाची नोकरी मिळविणे हि त्यांना सहज शक्य होते आणि तसे केले असते तर आज ते किती वैभवात राहिले असते. पण घरच्या जबाबदाऱ्या टाकुन आणि आपल्या लोकांना सोडून ते गेले नाहीत.तिकडे राहूनही त्यांनी इकडे पैसे पाठवले असते पण त्यांच्या असण्याचा पुढे आम्हाला जो सतत फायदा झाला तो होवु शकला नसता. त्यांना झालेल्या या त्रासाचा  ते कधीही उल्लेख करत नाहीत. आम्हा प्रत्येक भावंडाला दहावी पास झाल्यावर काका बक्षिस देत. एकदा सहज बोलता बोलता त्यांनी सांगितले, " मी बी.एस.स्सी.ला विद्यापिठात पहिल्या क्रमांकाने पास झालो, मला सुवर्णपदक मिळाले. आमचे सगळे काका,मामा त्यावेळी सुस्थितीत होते पण मला कुणीही एक रुपयाही बक्षिस म्हणून दिला नाही. मी नोकरीला लागल्यावर ठरविले मी माझ्या भाच्यांना,पुतण्यांना महत्त्वाच्या परीक्षा पास झाल्यावर बक्षिस देईन. " परिस्थितीने काही माणसे कडवट होतात तर काही अशी. आम्हाला बक्षिस देणारे काका होते पण आमच्या पैकी कोणीच पुतणे,भाचे त्यांच्याइतके उज्ज्वल यश नाही मिळवू शकलो. तरी आमच्या यशाचे त्यांनी नेहमीच कौतुक केले. आजुनही दरवर्षी ते त्यांच्या दोघी बहिणींना वर्षातून एकदा घरी बोलावून त्यांचे माहेरपण करतात. त्यावेळी त्यांना चहा देखील ते करु देत नाहीत. पत्नीच्या वियोगाचे दुःख गिळून आपल्या मुलींच्या अड्चणींना ते खंबीर पणे उभे राहतात. त्यांच्या आनंदात सहभागी होतात. ठाण्याला पंधरा दिवस आणि पुण्याला पंधरा दिवस आस त्यांनी त्यांच साधारण वेळापत्रक आखलय, पुण्यात त्यांच्या कॉलेजच्या सोसायटीचे काम आजही ते उत्साहाने बघतात नुकतीच त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. तेथेही  त्यांच्या वागण्यामुळे सोसायटीतील सगळ्य़ांचे ते लाडके सर आहेत.

            काकांनी खूप मोठा काळ बघितला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून नंतरच्या जवळजवळ ७० वर्षांच्या पदीर्घ काळाचे ते साक्षीदार आहेत. जग किती झपाट्याने बदलतय. पण काकांसारख बदलत्या जगाशी जुळवून घेणं क्वचितच कोणाला जमेल. त्यांच्या अमेरीकेतल्या मुलीकडे त्यांचे जाणे होत असते. तिकडे गेल्यावर इकडच्या लोकांशी संपर्कात राहण्याकरीता त्यांनी इ-मेल शिकून घेतले. माझ्या ब्लॉगची लिंक पाठवल्यावर तो वाचून त्यातल्या लेखांवर सुरेख अभिप्राय ही ते मेल वरुन पाठवतात. मेल वरुन ते सगळ्य़ांची खुशाली विचारतात. मोबाईल फोन हल्ली सगळेच वापरतात.पण ग्रुप बनवून सगळ्यांना मेसेजेस करणे त्यांनी कधीच सुरु केले.आता स्मार्ट फोन घेतल्यावर whatsapp च्या माध्यमातुन ते सगळ्यांशी connected असतात. त्यांच्या माजी विद्यार्थ्यांचा ग्रूप बनवून ते दररोज ग्रुप वरील बातम्या रस घेवुन वाचतात.  त्यामुळे आमच्या मुलांचेही ते लाडके आजोबा आहेत. माझ्या घरी आले की माझ्या मुलींच्या अभ्यासाची ते चौकशी करतातच पण त्यांच्याजवळ एखाद्या नवीन सिनेमाबद्दलही ते चर्चा करु शकतात. मुख्य म्हणजे मुली सांगत असले्ली प्रत्येक नव्या गोष्ट कमालीच्या औत्सुक्याने ते ऐकतात आणि जुन्या लोकांसारखे हल्लीच्या प्रत्येक गोष्टीला नावे ठेवुन आमच्या वेळी कसे छान होते असे न म्हटल्यामुळे मुले खुष असतात. माझ्या धाकट्या मुलीला बारावीत अपेक्षेपेक्षा कमी मार्कस मिळाले. तेंव्हा मला फोन करुन त्यांनी सांगितले, " शुभा, तिला रागावु नको हं, मुल वर्षभर अभ्यास करतात,  आजकाल जीवघेण्या स्पर्धा आहेत ,मुलांना खूप टेन्शन्स असतात. ऐनवेळी काही झाले असेल,कदाचित तिचे प्रयत्नही कमी पडले असतील पण या वयात मुलांना बोलल तर ते त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहत. ती हुशार मुलगी आहे, पुढे नक्की चांगले यश मिळवेल " हल्लीच्या मुलांना किती क्लासेस असतात, किती सुख सुविधा असतात आमच्या वेळी ... असही ते म्हणू शकले असते.

            अमेरिकेतुन आल्यावरही ते तिकडच्या संपन्न आणि सुखासिन आयुष्याचे सतत कौतुक आणि आपल्याकडच्या गोष्टींना नावे ठेवणे असे करत नाहीत कि तिकडेही आपल्या कडील कुटुंबवत्सलतेचे गोडवे गात नाहीत. ते मला म्हणतात, " मी गीतेचा अभ्यास करीत असताना लोक मला म्हणायचे तुम्हाला पुस्तक लिहायचे आहे का? तेंव्हा मी म्हणे मी त्यातील शिकवण अंगिकारण्याचा प्रयत्न करणार आहे. "

        काकांचा प्रयत्न  यशस्वी झालेला आहे असं मी नक्कीच म्हणू शकते. माझं पूर्वसुकॄत मोठ आहे म्हणूनच अशा दिलदार माणसाची पुतणी होण्याच भाग्य मला मिळाल.  काकांबद्दल मनात इतक काही आहे, पण मन भावनेने भरुन गेल कि शब्द सुचत नाहीत तसच माझ झालय. मनात आलेले असंख्य विचार मी शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. माझ्या भावना व्यक्त कराय़ला मी कवीवर्य बोरकरांचे शब्द उसने घेते जणू माझ्या काकांच्या बद्दलच त्यांनी हि कवीता लिहिली आहे

                             नाही पुण्याची मोजणी,  नाही पापाची टोचणी
                              जिणे गंगौघाचे पाणी ,जिणे गंगौघाचे पाणी...


No comments: