Tuesday, April 27, 2010

गोदुची कथा

अखेर गोदुचं लग्न ठरलं. लग्न न जमण्याचं काही कारण नव्हतचं म्हणा.शंभरजणीत उठून दिसेल असं देखणं रुप होतं तिचं,शिवाय वडील मामलेदार. चौसोपी वाडा-शेती-वाडी. नोकर चाकर सगळ कसं यथास्थितं.पण तरी मुलीच लग्नं ही काळजीचीच बाब.आधी स्थळं समजणं, मग पत्रिका जुळणं , गोत्र, प्रवर नाडं, गुण जुळले पाहिजेत.जातीच्या बाहेर जाण्याचा प्रश्णचं येत नसे.हे सगळ बघताना मुलाचं वय, त्याचा स्वभाव, घरची परिस्थिती या गोष्टींकडे दुर्लक्ष होणारच. शेवटी कुठेतरी तडजोड हवीच. मुलीच्या आवडी -निवडीचा संबंध येतो कुठे? आणि लग्नाच्या गाठी या वरच बांधल्या जातात आपण काय निमित्त मात्र.आपल्या जातीतली, पत्रिका जुळणारी स्थळं शोधताना मुलीचं वय वाढुनही चालत नसे.जरा कुठे चौदावं संपुन पंधरावं लगतय अशी कुणकुण जरी लागली तरी प्रथमवर मिळण कठीण.गोदु दिसायला ऊंच थोराड बांध्याची म्हणूनच आईच्या जिवाला घोर होता, कोल्हापूरच्य़ा आंबाबाई जवळ रोज साकड घालणं चालायच, पोरीला चांगलं घर मिळूदे.

आंबाबाईनंच गाऱ्हाणं ऎकलं, बडोदा संस्थानच्या कोषाधिकाऱ्याशीच गोदुचं लग्न जमलं.मुलगा हुशार कर्तबगार.एवढ्या मोठ्या बडोदा संस्थानचा खजिनदार म्हणजे किती जोखमीच काम! सगळे म्हणाले पोरीनं नशीब काढलं. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. दोन्ही घरच्या दागदागिन्यांच्या ओझ्यानी वाकलेल्या गोदुनी भरल्या डोळ्यांनी आईचा निरोप घेतला.
ऎंशी-नव्व्द वर्षांपूर्वीचा तो काळ. भोरहून बडोद्याला जाणं म्हणजे कित्ती लांबचा पल्ला! पुण्यापर्यंत बस, तिथुन पुढे मुंबई मग रेल्वेने बडोदा.गोदुबरोबर पाठराखणीला तिची बहीण होती तिचीच काय ती सोबत. पण दोघींनी पुण्यापर्य़ंतचा प्रवास देखील एकदाच केलेला, थोरल्या भावाच्या लग्नाच्या वेळेस.कुठे दूर देशी जाउन पडलॊ आपण, आता आपली माणसं कधी आणि कशी बघायला मिळतील? सासरची माणसं कशी असतील? नीट वागतील का आपल्याशी? अनेक प्रश्णांनी गोदुच्या डोक्यात काहुर मजवले होते.धाकट्या अंबुशी बोलावेसे वाटत होते, पण बोलायला सुचत नव्ह्ते.सासरच्या लोकांचे डॊळे आपल्यावरच रोखलेत, आपल्या प्रत्येक हलचालीवर कुणाची ना कुणाची नजर आहे या जाणीवेने गोदु मिटुन गेली होती.आपलं माणूस ज्याच्या साठी घरदार, आई-वडील भावंडांचा गोतावळा सोडून निघालो, त्याचा जवळपास पत्ताच नव्हता, अंतरपाट बाजुला झाल्यावर माळ घालताना ओझरतं पाहिलं.सप्तपदी चालताना मान वर करुन बघण्याची हिम्मतच नाही झाली.होमाच्या धुरा्ने डोळे चुरचुरत होते, अंगावरच्या शेल्याने जीव घुसमटत होता.छे,कित्ती आठवायचं म्हटलं तरी चेहरा नाहीच येत आहे डोळ्यापुढे. कसं होणार माझं? एकदाही नीट न बघितलेल्या माणसाबरोबर उभं आयुष्य घालवायचं? त्याच्या घराला आपल घर मानायचं? आधी त्याला आपलं मानता यायला हवं.
कुठे शिकवतात हे सगळ? चौथी पास झाल्यावर शाळा सुध्दा बंद झाली. करायचयं काय मुलीच्या जातीला जास्त शिकून?आपल्या घराण्याची रितच नाही तशी.मुलीच्या जातीने घरातले रिती-रिवाज कुळधर्म -कुळाचार शिकायला हवेत.तर्कबुध्दीने संसार करायला हवा. श्रावणातल्या सत्यनारायणाच्या पुजेची तयारी, हरताळकेच्या पुजेची तयारी, गणपतीच्या दिवसात त्याच्या पुजेची तयारी करण्यात वय वाढत गेले . स्वयंपाक करायला पण नाही शिकवला, सतत यांची सोवळी-ओवळी. मुलींनी फक्त वरकाम करायच. नैवेद्याचे झाले कि शेवटच्या दोन भाकरी कर, कुठे भाताचे तांदुळ धुवुन दे. दिवाळीच्या फराळात लाडू वळ तर कधी करंज्या कात.भाजी चिरणे, पान घेणे, उष्टी काढणे एवढीच कामे केलेली.लग्न ठरल्यावर आईला म्हटलं सुध्दा,’अगं मला स्वयंपाक तरी कुठे येतो सगळा?’तशी हसून म्हणाली,’तुझ्या घरी काही तुम्ही राजा राणी राहणार आहात का? सासवा-जावा आहेतच की, शिकशील त्यांच्याकडून पाण्यात पडलं की पोहायला येत.प्रत्येक घरातील करण्याची रितही निराळी सासरीच शिकावं लागतं.आणि मालूताई सांगत होत्या तुझ्या सासरचे एवढे श्रीमंत आहेत,स्वयंपाकाला बाई आहे कायमची.’ हिच आई मोठ्या वहिनींना स्वयंपाक येत नव्हता तर किती बोलायाची ! बाई एक शब्द उलट न बोलता मुकाट्यानं ऎकायच्या,पुन्हा तिला विचारत सगळं शिकल्या. कधीतरी मागच्या पडवीत हळूच डोळे पुसायच्या.भरल्या घरात रडायची पण चोरी. सुनेसाठी नियम वेगळे, आत्ता हे जाणवतयं, वहिनी पण बिचाऱ्या आपल्याशी किती मायेनी वागतात, त्यांना कधी निवांत बसलेलं बघितलेल नाही.आपल्या वन्सं आपल्याशी कशा वागतील? पण् आपल्याला त्यांच्यांशी आपल्या वहिनींसारखां प्रेमानं वागता यायला हवं.विचार करता करता कधी बडोदा आलं ते समजलचं नाही.

गोदु सासरी गेली, एक जबाबदारी मिटली.आता तिला पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आणायची, दिवाळसण एक करायचा बाकी वर्षा-दोन वर्षांनी येईल माहेरपणाला. मामलेदार साहेब , गोदुचे वडील अचानक वारले त्यामुळे गोदुचे वर्षाकाठी होणारे माहेरपणही थांबले.मोठे भाऊ आबा यांना नुकत्याच आलेल्या एन्फ्ल्युएंझाच्या साथीच्या तापाचे निमित्त झाले. आणि तो सव्वा-सहा फुटी उंचापुरा माणूस माडीवर झोपायला गेला, तापाने दोन दिवस फणफणला आणि त्याचा मृत्युने घासच घेतला.जिन्यातून त्यांचे प्रेत खाली आणायलाही काय त्रास पडले! गोदुच्या आईवर असे एकामागोमाग एक धक्के बसत होते.गोदुला पत्रातुन या दुःखद वार्ता समजत होत्या.रडून रडून उशी ओली करण्यावाचून तिच्या हातात काहीच नव्हते.रात्री डोळे मिटले की आबा दिसत, वहिनींचा गोरापान चेहरा, त्यावरचे मॊट्ठे कुंकू , आता कशा दिसत असतील? त्यांना मुलगी झाल्याचे सुध्दा इतक्यातच समजले, अन् पाठोपाठ हि बातमी.आईला भेटायला जायचयं असं परवा ओझरतं म्हणायचा अवकाश,"तिकडं जाऊन काय साथीत मरायचय़ं?" "इथलं जगणं तरी काय वेगळं आहे?" गोदुच्या ऒठावर आलं होतं, पण बोलायची हिम्मत नव्हती. छोट्या अप्पाकडे बघून सगळं सहन करण भाग होतं.लग्नाला सहा वर्ष उलटतील येत्या वैशाखात.सहा वेळा सुध्दा माहेरी नाही जाता आले.तिकडेही अशा एकापाठोपाठ एक अशा दुदैवी घटना घडल्या की आपलं दुःख सांगुन त्यात भर घालणं नकोसं वाटलं. आणि आपलं दुःख सांगून त्याचा उपयोग किती झाला असता हा पण एक प्रश्ण होताच.एकदा सासरी गेलं की तेच घर आपलं, चुलीतलं लाकुड चुलीतच जळायला हवं.खायला प्यायला, ल्यायला पुरेसं असलं म्हणजे झालं, आणखी काय पाहिजे बाइच्या जातीला अशीच बोलणी सगळीकडे ऎकू यायची.मुलगा झाला की बाईच्या जन्माचं सार्थक. ते पहिल्या खेपेलाच झालं ,नाहीतरी सोन्याच्या मण्यासाठी दोरा सांभाळावा तसं आपल आयुष्य.संस्थान कुठलही असो, भोर काय नि बडोदा काय आपल्या आयुष्य़ात काय फरक पडतो?

लग्नानंतर थोड्याच दिवसात, घरातल्या स्वयंपाकीण बाईंच्या वागण्यातला बेताल पणा गोदुच्या नजरेत भरला.एरवी कडक वाटणारा आपला नवरा तिच्याशी अंमळ लाडात बोलतो हे तिला जाणवत होतं.त्या बाईंना देखील ह्यांच्या खाण्यापिण्याच्य़ा सगळ्या आवडी-निवडी पक्क्या माहित.आणि त्यांच्याबद्दल बोलतानाचा सूरही वेगळाच.गोदुच्या अंगाची लाही-लाही झाली.पण सांगणार कुणाला? जाब विचारावा इतकं नवऱ्याशी हक्काचं नातं झालच नव्हतं,पण चाललयं हे ठिक नाही एवढं तिच्या मनाला पक्क समजत होतं, दुपारी निवडा-टीपायला बायका यायच्या त्यांच्या बोलण्यात विषय असलेच,कुणा थोरा मोठ्यांच्या पुरुषांच्या रंगेलपणाच्या कथा हळू-कुजबुजत्या आवाजात, मधूनच सासुबाईंची फेरी तिकडे वळली की आवाज अजून लहान होत, त्यांच्या कानावर कुजबूज गेली की कधी त्या रागावित तर कधी म्हणत ,’पुरुषांना अंगवस्त्र असायचीच,पूर्वीचे राजे नव्हते चार चार राण्या करीत, आता रामासारखा एकपत्नी एखादाच., पुरुषांची कर्तबगारी बघावी, बाकी सगळं माफ आहे त्यांना’ त्यांचच अस मत मग त्यांना सांगून काहीच उपयोग नाही, एकूण हे दुःख सहन करायचं किंवा आपणच हिम्मत बांधुन त्यावर उपाय काढायचा.रडत बसून संसार करण गोदुला जमणार नव्हतं आपलं हक्काच नात आपण मिळवायच, फक्त ते कसं याचा विचार करत ती बसे.आदळआपट करुन किंवा भांडून तांडून काही होइलसे वाटत नव्हते, उगीच चार लोकात तमाशा आपली हानी अन् जगाच हसं असा प्रकार. प्रेमानेच हे साधता येइल.आपल्या सहनशीलतेने,मायेने, प्रेमाने आपण आपल्या माणसाला जिंकू असा तिला विश्वास होता.

भोरच्या घरावर आबांच्या अकाली मृत्यूने कुऱ्हाड कोसळली.त्यांच्या पाठचे भाऊ नोकरी निमित्ताने बाहेर गावी होते, त्यांचीही पहिली पत्नी बांळंतपणात वारली होती.घराचा कारभार , शेती वाडी, पै-पाहुणा, व्रत-वैकल्ये कोण बघणार? एवढ्या मोठ्या घराचा व्याप सांभाळायला आता मुंबईहून गजाननाला बोलावून घ्या असा गोदुच्या आईने धोशा लावला.गोदुच्या आईला सगळे काकू म्हणूनच संबोधत, बाई मोठी धीराची. नवरा, मुलगा, दोन सुना यांचे पाठोपाठ झालेले मृत्यूचं दुःख पचवणं सोपी गोष्ट नव्हतीच. आपोआपच येऊन पडलेली जबाबदारी त्यांनी धीराने झेलली.भाऊला इथे येऊन राहणे शक्य असले तरी त्याच्याच्याने हा गाडा रेटला जाणार नाही, त्याची प्रकृती नाजुक मन हळवं, इथे आता गजाननच हवा.गजाननाला अण्णा म्हणत, लगोलग पत्र धाडून त्याला कळवले,आईच्य़ा पत्रातील मजकुराचे गांभीर्य अण्णालाही जाणवले असणार, त्याला मुंबईच्या प्रेस मध्ये चांगली नोकरी होती.स्वतःच्या अंगभूत हुशारी आणि धडाडीने पुष्कळ गोष्टी करण्याची धमक होती, पण तो काळ असा होता कि वैयक्तिक विकास,करियर यापेक्षा आपले घर आपली माणसे यांच महत्त्व जास्त होतं आणि आपलेपणाच्या कक्षा फारच रूंद होत्या.मोठ्यांच्या शब्दाला मान देणे , एखाद्याला दिलेल्या शब्दासाठी जिवाचे रान करणे अशा संस्कारातुन मोठ्या झालेल्या अण्णाने पुढचा मागचा विचार न करता नोकरीचा राजिनामा दिला आणि भोरला प्रस्थान ठेवले.त्याच्या नोकरीचा अनुभव विचारात घेवुन राजांनी त्याला भोरच्या प्रेसचे काम सोपवले .घराची विस्कटलेली घडी लवकरच जागेवर आली.

त्याचवेळी बडोद्याहूने तार आली.गोदू अत्यवस्थ आहे.घरावर पुन्हा दुःखाचे सावट आले.अण्णांना प्रेसमध्ये बातमी समजताच घरी येवून पैसे घेवुन मिळेल त्या वाहनाने त्यांनी पुणे गाठले.बडोद्याला पोहोचले तेव्हा पहाट झाली होती.गोदु पलंगावर झोपली होती,खोलीभर माशा घॊंगावत होत्या,दुर्गंधी पसरली होती.तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता."चार दिवस जुलाब होतायत, थांबायची लक्षणे नाहीत,वैद्य येवुन गेले, आम्ही म्हटल, तिच्या माहेरी कळवू, नंतर आम्हाला बोल नको”. अण्णांनी गोदुकडे बघितले,काय दशा झालीय पोरीची,कशामुळे झालय हे सारं? विचार करायला वेळ नव्हता, त्यांच्या मनाने घेतलं गोदुला इथुन हलवायची, मिरजेला त्यांच्या मोठ्या बहिणीचे यजमान डॉक्टर आहेत, मिरजेचं मिशनरी हॉस्पिटल चांगल आहे,तिथे योग्य ते उ्पचार होतील. इथे आपली कुणाशी ओळख नाही. आण्णांनी गोदुला मी घेवुन जातो असे सांगितले आणि स्पेशल गाडी करुन तिला मिरजेला आणली. डॉक्टर मेहुणे सुदैवाने घरातच होते निघायच्या तयारीत होते, त्यांना तार मिळाली नव्हती, अचानक गाडी दारात बघून त्यांना नवल वाटले, आण्णांनी थोडक्यात सगळा वृतांत सांगितला, गोदुला तपासून ते म्हणाले ’अरे हिला अन्नातुन विषबाधा झाली आहे.गाडी फारच उताराला लागलीय तू तिला इथे आणण्यापूर्वी थोडी चौकशी करायला हवी होतीस नेमके काय झाले असावे याची, मला यात घातपाताचा संशय येतो’ अण्णा म्हणाले,’मला तिच्या सासरच्या लोकांच्या बोलण्य़ावरुन जाणवले,पण तेवढा विचार करायला वेळ नव्हता,आधी तिच्यावर उपचार करणे महत्त्वाचे वाटले मला.’ गोदुला लगोलग हॉस्पिटलात हलवले,प्रयत्नांची शर्थ केली पण यश आले नाही. गोदुने अखेर पर्यंत आजारपणाचे कारण सांगितले नाही, ती एकतर अर्धवट शुध्दीत होती, माझ्या अप्पाला सांभांळा एवढाच जप तिने लावला होता.अण्णा कडे बघत क्षीण हसत ती म्हणाली होती,’फार वाट बघायला लावलीस रे, पण कुणीतरी माझं माणूस मला भेटलं, माझ्या अप्पाला सांभांळा.तुमच्या एवढ्या मोठ्या घरात त्याला कधीतरी आजोळची माया द्या’.

गोदुच्या निधनाची वार्ता घरी कशी कळवावी याचीच अण्णांना चिंता लागून राहीली.बडॊद्याला तार करुन कळविले.तिच्या सासरच्या मंडळींनी तुम्ही हलगरज केली असा कांगावा करायला सुरुवात केली, डॉक्टरांनी त्यांना सुनावले,’आमची मुलगी विषबाधेने गेली हे आम्ही सिध्द केले तर तुम्हाला बेड्या पडतील’
मग मात्र त्यांचा आवाज बंद झाला.गोदुच्या मृत्युचे रहस्य अखेरपर्य्ंत तसेच राहिले.ते समजूनही ती परत येणार नव्हती,तिच्या माहेरी कुणाला या गोष्टीची शहानिशा कराविशी वाटली नाही, कारण त्यांना त्यांची दुःखे फार झाली होती.

काकू, गोदुच्या आई मात्र कित्येक वर्षे म्हणत "माझी सोन्यासारखी लेक त्या दैत्यांनी मारली.नखात रोग नव्हता तिच्या." आपल्या नातवंडांना गोदुच्या आठवणी सांगून त्या टिपे गाळत.


©

3 comments:

THEPROPHET said...

सहीच आहे गोष्ट!

prasad bokil said...

तू सांगितला होतास हा प्रसंग. पण वाचताना अजूनच भयंकर वाटला. जमल्यास मधे मधे जिथे काळ बदलतो तिथे ओळ सोड.

साधक said...

छान कथा. आवडली. सुंदर मांडणी.