Saturday, April 30, 2011

भूमिका

अभिनयातली ’भूमिका’ सोडून, भूमिका म्हटल्यावर मनात आलेल्या विचारांतून प्रकट होणारी माझी हि भूमिका........

"तू आई झालीस कि समजेल" ,दरवेळेस भरपूर मार दिल्यानंतर थोड्य़ावेळाने शांत (ती आणि रडून रडून आम्ही) झाल्यावर जवळ घेवुन आई स्वतः रडत बसे तेंव्हा आम्ही आईला विचारत असू " आमचं चुकलं म्हणून मारलसं ना, आता कशाला रडत आहेस?" त्यावेळी तिचं हे ठरलेलं उत्तर असे.मुलगी असल्याने आई होणे हि बाब भविष्यात सत्यात उतरण्य़ाची शक्यता होती,पण आम्हाला भाऊ असता तरी त्याला आईने असेच बडवले असते आणि नंतर तेच सुनावले असते आणि त्याला कधीच समजले नसते असे आम्हांला त्यावेळी नेहमी वाटे. आता कळते, तिला माझ्या भूमिकेतून बघा म्हणजे कळेल असे म्हणायचे असे, हे सारे कळण्य़ाचे ते वय नव्हते.
मात्र पुढील वयात नेहमीच असे प्रसंग येत गेले, आपल्या सगळ्य़ांच्या आयुष्यात कायमच आपल्याला वादविवादाच्या वेळी म्हणण्याची सवय असते ,"तुला बोलायला काय होतयं , माझ्या जागी तू असतास म्हणजे कळलं असतं" समोरच्याची बोलती बंद होते या वाक्याने, किमान तो विचारात पडल्यासारखा तरी होतो या वाक्या नंतर. दुसऱ्याच्या भूमिकेतून विचार करणे हे परकाया प्रवेश केल्यासारखे आहे.

लहान मुले अनुकरण करतात असे आपण म्हणतो, पण खरं तर ती खेळताना दुसऱ्याच्या भूमिकेत फार चटकन जातात ,भातुकली खेळणाऱ्या मुली मोठ्या बायकांची वाक्ये,त्यांच्या हलचाली काय हुबेहुब वठवतात !. अतिशय तन्मयतेने खेळणारी मुले बघताना आपलीही तहान भूक हरपते.मात्र आपण त्यांच्या नकळत त्यांना बघायला हवं. उपजत कुशल अभिनेते असणाऱ्या या चिमुकल्यांपैकी काहींना हल्ली जरा समजू लागताच सुट्टीमध्ये अभिनयाच्या वर्गांना जावे लागते !

’अंगात येणे’ हा प्रकार मी बरेच दिवसात पाहिला ऐकला नाही.लहानपणी बऱ्याच वेळा सार्वजनिक गणपतीच्या आरतीच्या वेळी एखादी बाई अचानक घुमू लागायची. तिच्या अंगात देवी आली अशी कुजबुज सुरु होई. अगदी चार चौघींसारखी दिसणारी ती बाई निराळीच दिसू लागे. आजुबाजूच्या लोकांमध्ये धावपळ सुरू होई. मग तिचे कपाळ लाल मळवटाने भरले जाई, तिची ओटी भरायला बायकांची लगबग उडे. तिच्या पायावर डोके ठेवण्यासाठी लहान मोठ्यांची झुंबड उडे.तिच्या कडून कुंकू घेवुन ते लावण्यात विवाहित बायकांची घाई असे. मला मात्र या सगळ्या प्रकाराची विलक्षण भिती वाटे. इतका वेळ आपल्यासारख्याच असणाऱ्या या बाईमध्ये देवी आली कशी असे कुतूहल वाटे ते वेगळेच. पुढे मोठेपणी मानसशास्त्रांच्या पुस्तकांमधून हा एक मानसिक आजाराचा प्रकार असल्याचे समजले आणि मग त्याबद्दलच्या इतर तशा अनेक उदाहरणादाखल दिलेल्या केसेस वाचताना त्याबद्दल खात्री पटली पण तरीही त्या बायकांचे अभिनय कौशल्य म्हणा किंवा त्यांच्यातील देवीच्या संचाराचे सादरीकरण कमालीचे असे यात वादच नाही. देवीच्या भूमिकेत जावुन कुणी गरीब (स्वभावाने) सासुरवाशीण सासुकडून सेवाकरुन घेइ. कुणी नवऱ्याला पायावर नाक घासायला लावी तर कुणी खणानारळाच्या वसुल्या पदरात पाडून घेई !.

अगदी मेणाहून मऊ असलेली बाई (किंबहुना कुठलीही बाई) सासूच्या भूमिकेत गेली कि कशी बदलते याची उदाहरणे आपण वाचतो,बघतो.वास्तविक हा दोष कुणा व्यक्तिचा नसून त्या नात्याचाच असावा. सुधीर मोघे म्हणतात ना, ’बायको फार चांगली जेंव्हा ती मैत्रीण असते आणि मैत्रीण फारच चांगली कारण ती बायको नसते’ काही नातीच अशी असतात कि त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा ठेवताच येत नाहीत. जावयाच नातं देखील असच काहीस. आता काळ बदलत चाललाय या नात्यामधले संबंधही त्यामुळे बदलत आहेत.(कदाचित आजकाल नवरा बायकोंमधलं नातच फारस टिकावू न राहिल्याने बाकीच्या नात्याबद्दल फारसा विचार करण्याची जरुर नसावी)

रामायणातील एक गोष्ट आठवते, रावणाला सीतेला वश करण्य़ात यश मिळत नव्हते. त्याला तिच्यावर बळजबरी कराय़ची नव्हती,नाना तऱ्हेची अमिषे दाखवूनही ती साध्वी त्याला वाऱ्यालाही उभे करत नव्हती. रावणासारखा पराक्रमी राजा असा हतबल झालेला बघून त्याला त्याच्या मंत्र्याने सुचविले,"महाराज तुम्ही मायावी रुपे सहज घेवू शकता, मग रामाचे रुप घेवून का जात नाही? म्हणजे तिला समजणारही नाही"
यावर रावण म्हणाला ,"हे मी केले नसेल असे तुला वाटलेच कसे? मी रामाचे मायावी रुप धारण केले, त्याक्षणी मला वाटले, ही दुसऱ्याची पत्नी आहे, तिच्य़ाबद्दल अभिलाषा बाळगणे हे पाप आहे आणि मग पुढे जायचा विचारही आला नाही ... त्यामुळेच तर ही बाकीची धडपड..." रामचंद्रांच्या एकपत्नीव्रताचे त्याच्या शत्रूकडून ऐकलेले हे थोरपण त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेवुन ठेवते.शिवाय वाल्मिकींच्या प्रतिभेचे मोठेपण जाणवते ते वेगळेच. त्याच वेळी स्वतःला परमेश्वराचे अवतार म्हणवणाऱ्या तथाकथित बाबा -साधू महाराजांच्या वागणुकीतील विसंगती ठळकपणे जाणवते.


©

5 comments:

Ramesh Rao said...
This comment has been removed by a blog administrator.
Ramesh Rao said...

Top good!
Now everyone can decide his stand ^bhumika^ on every issue easily

Gayatri said...

मावशी, खूप आवडला हा लेख! ’भूमिका’ तात्पुरती असली तरी तिच्याशी पुरेपूर एकरूप होता येणं खरंच कठीण - पण आपखुशीनं स्वीकारलेली किंवा नकळत गळ्यात पडलेली अशी एखादी भूमिका बरंच काही शिकवून जात असणार.
तू सांगितलेली राम-रावणाच गोष्ट सुरेखंय :)

Anonymous said...

jhakkas!! vegla jhala ahe lekh.....mastch...

SUJATA said...

Subha- very well said - liked it so much - also introducing your blog to Sanju and Swati - I love your style and I am sure they, are going to like it as well