Tuesday, July 5, 2011

विश्वास


    फार जुनी गोष्ट आहे. एका गावात दुष्काळ पडला. शेतकरी हवालदिल झाले.नद्या ओढे तर सुकले होतेच विहिरी देखील आट्ल्या. पिके येणार नव्हती पण प्यायला पाणी मिळणेही मुष्कील होवुन बसले. सगळा गाव काळजीत बुडाला. अर्थातच अशा संकटकाळी देवाला साकडे घालण्याशिवाय अन्य मार्गच दिसत नव्हता.एके रात्री गावातल्या पंचांनी सगळ्या गावकऱ्यांची सभा बोलावली. उद्या उगवतीलाच सगळ्यांनी गावाबाहेरच्या माळावर एकत्र यायचे आणि सगळ्यांनी मिळून शंभूमहादेवाला साकडे घालायचे गावातल्या सगळ्यांनी एकत्र प्रार्थना करायची असे ठरले. दुसऱ्या दिवशी उजाडायचा अवकाश गावातल्या गल्ली बोळांमधून लोकांची एकच झुंबड उडाली.लहान मोठी,म्हातारी कोतारी माळरानाच्या दिशेने जात होती.एक सात आठ वर्षांचा मुलगा हातामध्ये त्याच्या उंची एवढी जुनी छ्त्री घेऊन धडपडत धावत चालला होता.माळवर जमलेल्या माणसांपैकी एकानं त्याला विचारल,"अरे, छत्री कशाला आणलीस?"
त्यावर तो उद्गारला,"काका, पाऊस येईल ना, आपण प्रार्थना केल्यावर, माझी आजी लई म्हातारी हायं भिजली तर आजारी पडल्ं तिच्या साठी आणली छत्री"
एवढ्या सगळ्यांनी मिळून देवाला आळवल्यावर पाऊस येणारच हा विश्वास फक्त त्या चिमुकल्या मुलाला होता ! बाकीचे नुसतेच अखेरचा उपाय म्हणून प्रार्थनेला जमले होते.

 विश्वास हि भावनाच सगळ्या मानवजातीच्या सुखशांतीचा पाया आहे.तान्ह्या लेकराला तो फक्त त्याच्या जन्मदात्या आईबद्दलच असतो तिच्या केवळ स्पर्शाने ते शांत होतं.जसंजसं मोठं होईल तशी अजुबाजुची माणसं त्याच्या ओळखीची होतात आणि मग सगळेच त्याला आपले वाटू लागतात. अगदी घरातल्या कुत्र्या -मांजरा पाशी देखील ते तितक्याच विश्वासाने खेळू लागतं. अर्थात प्राण्यांना माणसांची वेगळी पारख असते,ते त्या जीवाला जीव लावतात. मोठ्यांच्या मनातच शंका-कुशंकांचे जाळे असते.
 एका अगदी अनोळखी व्यक्तिबरोबर उभे आयुष्य काढायचे, ते देखील काही मिनिटांच्या दाखवण्याच्या कार्यक्रमानंतर हि आपल्या कडची पिढ्यान् पिढ्या चालत आलेली परंपरा. हजारो लग्ने अशीच होत गेली. त्यातली सगळीच लग्ने अपयशी झालेली नसतात. यामध्ये संस्कार,लोक काय म्हणतील हि भिती यामुळे एकत्र राहणारी जोडपी असतील आजही आहेत, पण प्रेमाने गुण्यागोविंदाने राहणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही. आणि प्रेमविवाह तरी शंभर टक्के यशस्वी होतात असं कुठे आहे? मग या यशस्वी संसारिक जीवनाचे श्रेय कुणाला द्यायचे? कुणी त्याला योग म्हणतात , कुणी लग्नाच्या गाठी स्वर्गात मारल्या जातात असं सांगतात.पण मला वाटतं, त्या एका भेटीत एकमेकांबद्दल जो विश्वास वाटतो तोच पुढच्या सहजीवनाचा पाया ठरतो. मात्र कधी कधी या अपार विश्वासापोटी आपले सर्वस्व देणाऱ्या मुलींच्या पदरी निराशा येते. नवरा व्यसनी असतो,तो मारहाण करतो, लग्नाआधी कर्णाचा अवतार वाटणारा नंतर पै-पैचे हिशेब मागतो किंवा माहेरकडून पैसे आणण्यावरुन छळ करतो.एखाद्या मुलीच्या संसाराच्या सुखस्वप्नांची नवऱ्याच्या विवाहापूर्वीपासूनच्या अनैतिक संबंधामुळे राखरांगोळी होते. काही मुली आपली लग्नापूर्वीची प्रेमप्रकरणे लपवितात कधी घरच्यांच्या दबावाने तर कधी इतर काही कारणांनी. लग्नानंतर इतरांकडून नवऱ्याला ते समजले कि विश्वासाला तडा जातो,मग संसाराची इमारत मुळातूनच हादरायला सुरुवात होते! 
 एखाद्या व्यक्तिला कुठल्याही व्यक्तिबद्दल वाटणारा विश्वास हे त्याच्या निरोगी मनाचे लक्षण असते. उगीचच कुणी कुणाशी वाईट वागत नाही. धर्मराज आणि दुर्योधन दोघांना म्हणे श्रीकृष्णाने गावात पाठविले, धर्मराजाला चार वाईट लोक शोधायला सांगितले तर दुर्योधनाला चार चांगली माणसे घेवुन ये असे सुचविले.दिवसभर हिंडून दोघेही मोकळ्या हाताने आले. धर्मराजाला सगळी प्रजा सदाचारी वाटली कुणीच वाईट नव्हते, तर दुर्योधनाच्या मते सगळे लोक एकजात दुष्ट, कपटी आणि दुराचारी होते.माणसे तीच होती पण बघणाऱ्याची दृष्टी भिन्न असली कि असं होतं. पण निरक्षीर विवेक मात्र असावा लागतो. 
दुसऱ्यांवर नसलेला विश्वास माणसाला संशयी बनवतो,तणावमय जीवन जगायला लावतो.पण सगळ्यात महत्त्वाचा असतो स्वतःवरचा विश्वास ’आत्मविश्वास’.तो असेल तर माणूस जीवनात यशस्वी होतोच. स्वतःवरच विश्वास कमी असेल तर ती व्यक्ती न्यूनगंडाने पछाडलेली.कुणी वाईट म्हणण्यापूर्वी स्वतःच स्वतःला कमी लेखून मागे राहणारी. हि अवस्था वाढली तर ती माणसाला मानसिक आजाराच्या खोल गर्तेतही नेवु शकते.याऊलट काही जणांना स्वतःबद्दल फाजील विश्वास असतो,हि माणसे आपल्याच मोठेपणात मग्न आणि सतत दुसऱ्याला कमी लेखून स्वतःचे मोठेपण सिध्द करत राहतात.ह्या दोन्हिचा मध्य गाठणा्री व्यक्ती आपण आत्मविश्वासाने वागतेच आणि समोरच्यालाही आत्मसन्मानाने वागू देते.

 मागे सिध्द समाधी योग या नावाचा एक कोर्स मी केला होता. त्यामध्ये सहभागी झालेल्यांचे गट पाडले होते, आणि दोन दोन लोकांच्या जोड्या केल्या, जोडीमधील एकाचे डोळे बांधले दुसऱ्याने त्याचा हात धरुन चालायचे होते. एकदाही डोळे उघडून कुठे जातोय ते बघावे असे किती जणांना वाटले? वगैरे प्रश्ण नंतर विचारले.त्याचे तात्पर्य  असे होते  कि आपले आयुष्य हे कुणीतरी आखून पाठवलय, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवुन रहा बरेच तणाव आपोआप कमी होतील. हे थियरी म्हणून वाचणे जितके सोपे आहे तितके प्रत्यक्षात अमलात आणणे कठीण. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग लहान होत चाललय, पण माणसा-माणसांमधे भिंती बांधल्या जात आहेत. आई-वडीलांचा मुलांवर विश्वास नाही, नोकरीत सहकाऱ्यांवर भरवसा नाही. शिक्षणसंस्था, राजकीय व्यवस्था, पोलीस कुणाकुणावर विश्वास ठेवण्य़ाची स्थितीच नाही.त्यामुळे सतत सगळीकडे सतर्कतेने राहताना  ताण वाढतात, मग ताणमुक्ती करता विविध मार्ग शोधत रहायचे. इंटरनेट्वरुन जगभरात संपर्क साधायचे आणि त्याचा गैरफायदा घेणारे आढळले कि फायरवॉल बांधत बसायचे.

 श्रध्दा हि विश्वासाच्या पुढची पायरी! तिच्या पुढे विचार पांगळे ठरतात. परमेश्वरावर खऱ्या भक्ताची असते ती श्रध्दा. कुठल्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी लागणारं मानसिक बळ श्रध्दाच देवु शकते. सुशिक्षित किंवा फार विचार करणारी माणसं जवळची व्यक्ती आजारी पडली कि हवालदिल होतात , तेच एखादी अडाणी बाई आपल्या आजारी नवऱ्याला किंवा मुलाला डॉक्टरच्या हवाली करते, त्याला म्हणते,’तुझ्या रुपानं देवच भेटला बाबा’ आणि हा देव आपल्या माणसाला नक्की बरं करणार अशी तिला खात्री असते.तिची सकारात्मक प्रवृत्ती तिला तर निश्चिंत बनवतेच पण त्या आजारी माणसालाही बरं करायला उपयोगी ठरते. विश्वास हा ’तो’ आहे तर श्रध्दा हि ’ती’ आहे, त्यामुळे तिच्यात असणारी ’स्त्री शक्ती’ विश्वासाहून मोठीच असते. म्हणूनच विश्वासाचा घात होतो तसा श्रध्देचा होवु शकत नाही.त्यामुळेच कदाचित माणसांवर आपण विश्वास ठेवतो आणि देवावर श्रध्दा.  कवीवर्य ग.दि.माडगूळकरांच्या कवितेते थोडा बदल करुन म्हणता येईल

     सामर्थ्याहुन समर्थ श्रध्दा  अशक्य तिजसी काय
     पडे अहल्या शिळा त्यास्थळी येतील प्रभुचे पाय



©

 

4 comments:

श्रद्धा said...

छान - to the point लेख.

आदित्य चंद्रशेखर said...

मस्त! खूप सुंदर चिंतन आहे! तुम्ही खरंच खूप छान लिहिता. गावाकडच्या गोष्टी तर मस्तच!

Shubhangee said...

धन्यवाद आदित्य आणि श्रध्दा!

Anonymous said...

chan jhalay lekh.....ata astitv.....liha lavkar......