Friday, July 8, 2011

खरा तो प्रेमा

नुकतीच एक घडलेली घटना ऐकली. पुण्य़ाजवळील लोणी-काळभोर नामक गावातली.

एक वृध्द जोडपे रहात होते तिथे. त्यांचे पोट पिकले नव्हते.एकमेकांच्या आधाराने चालला होता संसार.लहान गाव असल्यामुळे अजुबाजुचे लोकांची सोबत चांगली होती. चरितार्थासाठी त्यांचं एक टपरीवजा दुकान होतं, चहा-बिस्कीटं, बिड्या-काड्य़ा अशी किरकोळ सामानाची विक्री करीत तेथे.रोज पहाटे आजोबा उठून टपरीवर येत, दरवाजा उघडून देवाच्या तसबिरीपुढे उदबत्ती लावत.समोरचा चौक झाडून पाणी मारुन ठेवत आणि एकीकडे गॅसवर आधण ठेवत.गवळ्य़ाने दूध आणून दिले कि ते तापवुन घेत पाण्य़ात साखर,चहापत्ती टाकुन उ्कळी येईतो, मजूर, रात्रपाळीहून परतणारे कामगार टपरीशी येत, आजोबा त्यांना गरम गरम चहा देतात तो आजी गुडघ्यावर हात ठेवत ठेवत दुकानाशी येत.कपबश्या विसळणे, लागेल तसा चहा गाळणे हि कामे त्या करु लागत. सकाळची गडबड कमी झाली कि आजी पुन्हा घरी जात, दुपारी आजोबा जेवायला घरी जात. चार वाजता परत दुकानात येत.असा त्यांचा गेले कित्येक वर्षाचा दिनक्रम होता. तुकोबांची पालखी टपरीवरुन जायची तेंव्हा आजी आजोबा जमेल तेवढ्या वारकऱ्यांना चहा आणि केळी देत.तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेत.दोघांच्या कपाळी बुक्का,गळ्यात तुळशीची माळ.

वयाप्रमाणे आजींच्या तब्येतीच्या कुरुबुरी सुरु असत.कधी गुडघे दुखत, कधी खोकला फार दिवस टिके.चालताना हल्ली धापही लागे,दुकानापर्यंत येताना वाटेत दोनदा त्या कुठेतरी टेकत. फार झालंतर जवळचा डॉक्टर गोळ्या देई,क्वचित सुई टोचे.आजोबा मात्र ताठ होते.म्हातारीला ते विश्रांती घ्यायला लावत.तिला बर नसलं तर् आपणच घरी चक्कर टाकुन तिला औषध देवुन येत.

यंदा पालखीचे दिवस जवळ येवु लागले.आजींची तब्येत नरमच होती.माझ्या हातुन यंदा वारकरी चहा पितील का?पालखीचे दर्शन घ्यायला मिळलं का ?असं त्या वारंवार म्हनू लागल्या. आजोबा म्हणत," काळजी कशापायी करतीस? काय बी न्हाई झाल तुला.तुकोबा आनी माऊली हायतं ना, सम्दं झाक हुईल. अन् न्हाई वाटलं तुला बरं तर कुनी तुला शिक्षा करनारे का? जमलं तेव्हढं मी करीन. घरात बसुन नमस्कार केलास तर त्यो बी पोचल ना तुकोबांना.नको तरास करुन् घेऊ त्यानं दुखनं वाढलं "

पालखी आली, आजी विठ्ठ्लाचं नाव घेत, उठत बसत आल्याच.बसल्या बसल्या त्यांनी दोन पातेली चहा उकळला,शेजारच्या शांतीला हाताशी घेवुन वारकऱ्यांना चहा दिला. देवळात पालखीचा मुक्काम असतॊ तिथे पहाटे चारलाच अंघोळ करुन जाऊन दर्शनही घेतल त्यांनी. दोन तीन दिवस तयारीत आणि नंतर सगळं मनासारखं झाल्याच्या समाधानानं आनंदात गेले. आजोबा म्हणाले," बघ, झालं ना संम्द नीट, आता तू पण बरी होशील बघ.चार दिवस दुकानात नको येवू.घरी आराम कर लई धावपळ केलीस" आजी समाधानानं हसल्या."आपल्या मानसांसाठी आनी देवासाठी केलेल्या कामानं कुठं दमायला होतं व्हय.बर वाटतय मला, अन् मी घरी राहिले तर तुम्हाला एकट्याला दुकनात धावपळ किती करावी लागती, येत जाईन मी बसत उठत, घरी तरी काम काय असतय?"
आजींचा उत्साह चार दिवस राहिला.पुन्हा दुखण्यानं मान वर काढली. चालताना थकवा वाटे,थोडं चाललं कि धाप लागायची. डॉक्टरन भारी गोळ्या दिल्या आणि आजोबांना सांगितले आजींना मोठ्या दवाखान्यात घेवुन जा, त्यांच्या छातीचा फोटॊ काढायला हवा, हार्टचं दुखण आहे, खर्च बराच येईल. ससून हॉस्पीटल मधे गेलात तर तुम्हाला परवडेल, मी चिठ्ठी देतो, माझ्या ओळखीचे मोठे डॉक्टर आहेत.त्यांना भेटा.

आजोबांचा चेहरा उतरला इतके दिवस आजींना धीर देणाऱ्या आजोबांचा स्वतःचाच धीर खचला.
"हार्टचं दुखणं लई वंगाळ असतं न्हव? मानुस न्हाई उठतं त्यातुन, पर माझ्या पार्वतीला कशापाई झालं असं?"

"घाबरु नका आजोबा,आता खूप नवे नवे शोध लागलेत, औषधं पण भारी निघालीत आजी बऱ्या होतील, वयाप्रमाणे असे आजार व्हायचे, त्यांच्या घराण्यात असेल कुणाला हा आजार. पण तुम्ही आजिबात काळजी करु नका. पैशाची सोय मात्र करा,औषध-पाण्याला लागतील"
"पैशाची वेवस्था मी करेन ,पण ती बरी व्हाया हवी"

डॉक्टरांशी बोलून आजोबा निघाले.विठोबाच्या देवळाजवळ पोहोचले.रोजच्या लोकांचा घोळका बाहेरच्या पारावर होता, त्यांना हातानेच राम राम करुन ते आत गेले.कटीवर हात ठेवुन विठोबा शांतपणे उभा होता, त्याच्या पायावर आजोबांनी डोकं ठेवलं.
"इठ्ठ्ला,हे काय संकट आनलसं, आमच्या पोटी लेकरु न्हाई दिलस, त्याचं कायबी वाईट वाटून न्हाई घेतलं, भावाच्या लेकरांवर जीव लावला, त्यांना मदत केली. त्यांची काम झाल्यावर त्यांनी पाठी फिरवल्या त्ये बी न्हाई मनावर घेतलं या गावात कष्टाची भाजी भाकरी खाऊन राहतोयं तरं आता हिला हे कुठलं दुखनं लावलस? आता मला बळ दे यातुन तिला वाचवायचं, माज्या जवळचं सगळ घे, वेळ पडली तर् दुकान विकिन पर तिला बर करं"

देवळात बसल्यावर आजोबा थोडे शांत झाले, आजींना आपण आजार किती मोठा हाय ते सांगता उपेगी न्हाई काळजीनं अजुन खंगायची.

’इतका उशीर कशापाई झाला? काय म्हनाला डॉक्टर?’ आल्या आल्या आजींनी विचारल.
’काई इषेश न्हाई, पर ससून मधे जाऊन मोठ्य़ा डॉक्तराला दाखवा म्हनत होता, सारख सारखच व्हाया लागलय ना तुला काय ना काई?"
"मी न्हाई आता कुठे जायची, आता काय राह्यलय माजं, उगी मोठा डाक्तर नि महागडी औषध नका आनु"
" त्ये बघु उद्या आपुन आता जेवायाच बघुया का? मी पिठल भात करु ?"
"आत्ता गं बया, ऐकेल कुनी, तुम्ही अन् कधी पास्न कराया लागला? शेवंतान दिल्यात भाकऱ्या करुन, भाजी आमटी केली मी भात बी झालाय"
"मी केला नसला तरी शिकेन बघ,आता तू आराम कर अगदी, च्या तर करतोच् कि मी रोज, भात आमटी बी करत जाईन"
जेवण झाल्यावर आजोबांनी आजींना झोपायलाच लावले, मागचं सगळ आवरुन त्यांनी भांडीपण घासून टाकली.

पावसानी दोन चार दिवस इतका जोर धरला कि आजोबांना आजींना ससूनला घेवुन जाता येईना, डॉक्टरच्या गोळ्य़ांनी आणि आरामाने आजींची तब्येतही सुधारल्यासारखी झाली,शिवाय त्यांची ससुनला जायची तयारी नव्हतीच.पावसाचा जोर ओसरला. आजोबांनी नेहमी दुकानात येणाऱ्या येशा रिक्शावाल्याला ससूनला घेवुन जाशील का विचारले. येशा म्हणाला,"आजोबा, जाऊया की.परवा चालेल तुम्हाला, उद्या मला जरा उरळीकांचनला जायचय"

"चालल ना, उद्याच्याला मी डॉकटरकडून चिठ्ठी आणतो, पैशे बी काढायला हवेत."
"उद्या संध्याकाळी मी येतो इथे, मग सांगा मला परवा कधी निघायच ते"
आजोबा घरी आले. रात्रीची जेवणं झाली.आजींना ते म्हणाले,"उद्या आपल्या डॉकतरन बोलावलय, तो चिठ्ठी देणारे,आपण परवा ससुनला जाऊ, येशा रिक्षावाला घेवुन जाईल आपल्याला"
"आता कशापाय़ी जायचं? बर वाटेल मला या गोळ्य़ांनी,नका उगी त्रास करुन घेवु. मी न्हाई कुठे जायची"
"अगं , नुसतं जाउन येऊ.लवकर बरी होशील तू"
"पैसा बराच लागतो , माहित हाय मला. माझं ऐका, माजी आता कायबी इच्छा नाही राह्यली अहेवपणी मरण आल तर् बरच आहे"
"तू नको काळजी करु आनि वेड वाकड बोलू नको"
" बरं आता पडा , दमला असाल,सकाळी बघू"

रात्री विचार करता आजोबांचा डॊळा कधी तरी लागला. आजींना गोळ्यांमुळे झोप लागली. रात्रीत केंव्हातरी यमदूताने डाव साधला.झोपेतच त्यांचा जीव गेला. त्यांनी हु कि चू देखील केले नाही.पहाटे आजोबा जागे झाले, आजी शांत झोपल्या होत्या. पहाटेच्या काळोखात त्यांनी सावकाश अन्हिके आवरली.आजींची काहीच हलचाल नाही हे पाहून त्यांच्या मनात पाल चुकचुकली. जवळ जावुन त्यांनी हलकेच त्यांना हाका मरल्या , हलवले...अंग थंड पडलेलं,श्वास थांबला होता.आजोबांना सत्य पचवायला जड गेले.दहा मिनिटे ते त्यांच्या जवळ असहायपणे बसुन राहिले.वस्तुस्थितीची जाणीव त्यांना जशी होत गेली तसे त्यांचे मन एक निर्धार करु लागले, त्यांनी शांतपणे कपाटातुन आजींच जरीच लुगडं काढलं त्यांना नेसवल, कुंकवाचा मळवट भरला.तोंडात तुळशीचे पान ठेवले. स्वतः कपडे करुन घराला कुलूप लावुन बाहेर पडले.
दुकानात आले, नेहमीप्रमाणे चहा केला.लोकांना दिला.आठ वाजताच सगळं आवरुन दुकानाला कुलूप घातले, शेजारच्या सायकल वाल्याने विचारले,"आजोबा, आज लवकर चाललात, आजी बऱ्या आहेत ना?"

" तिच्यासाठीच चाललोय"
आजोबा घरी आले, दरवाजा लावुन घेतला. त्यांनी पुजा केली, आपणही नवे कपडे घातले आणि बायकोच्या शेजारी पंख्याला दोरी बांधुन फास लावुन घेतला.
दहा वाजून गेले, घराचा दरवाजा बंद कसा म्हणून शेजारी जमा झाले, हाका मारु लागले, दुकानाजवळचे लोकही आले, बराच वेळ हाका मारुन कुणी दार उघडत नाही हे पाहुन लोकांनी दार तोडले,आतले दृष्य बघून त्यांचे काय झाले असेल त्याची कल्पनाच केलेली बरी!

आजोबांनी असे का केले असेल यावर खूप विचार केला मी. आपला जीव अशा प्रकारे द्यायला हिम्मत तर हवीच.तिच्यासाठी आपण काही करु शकलो नाही हि अपराधी भावनाही त्यामागे असेल. कुणाचाच आधार नसल्याने आता कुणासाठी मागे रहायचे अशा टोकाच्या निराशेने त्यांना घेरले असेल. पण त्याहून् आजींशिवाय जगण्याची कल्पनाच त्यांना सहन झाली नसेल हि शक्यताच अधिक असावी.आपले प्रेम बोलून आणि चारचौघात त्याचे प्रदर्शन न करणाऱ्या पिढीतले होते आजोबा पण त्यांच्या प्रेमाची जात ज्योतीवर झडप घेऊन प्राण देणाऱ्या पतंगाच्या प्रेमाची होती!


©

4 comments:

श्रद्धा said...

वाचून मन आणि बुद्धी 'सुन्न' झाले. प्रत्येक आयुष्य किती निराळ असतं नाही?

Feelings.... said...

kevdhe he prem ! Nirmal ! Shudhh ! Aajji lucky hotya asa prem karnara navra milala tyanna !

SUJATA said...

CHATAKA LAVANARI KAHANEE- MANASACHYA MANACHA THANNG LAGANE KATHIN- CHHAN LIHILAY

Deepak Shirahatti said...

अतिप्रम।
शुभांगीच लेखन कार्य दिवसेंदिवस अधिक उंची वर जातं आहे। Keep it up.