Thursday, March 8, 2012

महिला दिन

नेमेची येतो मग पावसाळा.. च्या चालीवर दरवर्षी महिला दिनाचे डंके मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून झडायला सुरुवात होते. आमच्या कार्यालयातही आम्ही मागची ३-४ वर्षे हा उपक्रम केला.त्यातील एका वर्षी  मी मांडलेले विचार येथे ब्लॉगवाचकांकरीता देत आहे.


आजच्या आपल्या अतिथी श्रीमती पाटील, श्रीमती.बेन्द्रे, जोग मॅडम आणि माझ्या भगिनींनो,
एकविसाव्या शतकाची सुध्दा दशकपूर्ती होईल,अशा परीस्थितीत 'महिला दिन' साजरा करायची खरोखरीच आवश्यकता आहे का? आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताहेत. आज दहावी बारावीच्या गुणवत्ता याद्य़ांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असते.आपल्या देशाच्या पंतप्रधान महिला(इंदिरा गांधी) होत्या आज राष्ट्र्पतीही प्रतिभा पाटील या महिला आहेत. आपल्या डी.डी.जी हि जोग मॅडम आहेत.आज मुलींना जर मुलगी म्हणून काही मिळविण्या साठी झगडावे लागत नाही तर आपला खास 'महिला दिन' कशासाठी?
    जी गोष्ट न मागता , न झगडता मिळते त्याची किंमत नसते असे म्हणतात. आज आपण समाजात पाहतो, मुलींना हवे ते, हवे तेवढे शिक्षण ,स्वातंत्र्य मिळत आहे. त्याचा फायदा घेणाऱ्या बहुतांश जणी असल्या तरी त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्याला कॊण जबाबदार हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी वस्तुस्थितीकडे डोळेझांक करता येणार नाही. पब मध्ये जाणाऱ्या मुली, सिंहगड पायथ्य़ाशी झालेल्या रेव्ह पार्टीमध्ये असणाऱ्या मुलींची उपस्थिती कशाचे द्यॊतक आहे? समाजात वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण काय सुचविते?
 आपल्याला मिळालेल्या समानतेचा  आपली पुढची पिढी असा अर्थ घेणार असेल तर ते कितपत योग्य ठरेल?  स्वातंत्र्य या दुधारी शस्त्राचा योग्य वापर करायला आपल्या मुलींना शिकविणे, त्यांच्यावर् तसे संस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे.
आज आपण समाजात ज्या प्रतिष्ठेने वावरत आहोत,जे स्वातंत्र्य ऊपभोगत आहोत ते  मिळविण्यासाठी अनेक  व्यक्तिंनी विशेषतः स्त्रियांनी आपली आयुष्यॆ वेचली.
        खऱ्या सौंदर्याची, स्वातंत्र्याची आपण पूजा करुया. आणि आज आपल्याला या व्यासपीठावर इतक्या मोकळेपणाने गप्पा मारता येणे ज्यांच्यामुळे शक्य झालयं त्यांचे स्मरण करुया.
           कविवर्य बा.भ.बोरकर म्हणतात,
           देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
 गोरटे कि सावळे या मोल नाही फारसे
 तेच डोळे देखणे जे कोंडिती सार्‍या नभा
 वोळती दुःखे जगाच्या सांडिती चंद्रप्रभा
  देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
 आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे
 देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
 मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे
 देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
 वाळ्वंटतुनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती
खऱ्या सौंदर्याचं बोरकरांनी ईतक्या सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे, कि त्यावर वेगळ्या भाष्याची गरजच नाही.
आशाच काही देखण्या व्यक्तिमत्त्वांबद्द्ल  मी आज  बोलणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या विभूती माहित असतील.काहींना, नव्याने माहित होतील.

 सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, आपल्या माजी पंतप्रधान तर आजच्या राष्ट्र्पतीही महिला आहेत. आपल्याला १९४७ मध्ये स्वराज्य मिळाल्यानंतर लोकशाही पध्द्तीचा आपण अवलंब केला, त्याच वेळी आपल्याला म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.मात्र युरोप आणि अमेरीकेत मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी स्त्रियांना वर्षानुवर्षे लढावे,झगडावे लागले. 'एमिलिन पॅंखर्स्ट' ह्या विदुषीने आपले उभे आयुष्य युरोप आणि अमेरीकेतील महिलांना मतदानाचा हक्क मिळविण्याकरीता वेचले.त्यांचा लढा होता लोकशाहीत महिलांना बरोबरीचे स्थान मिळावे या साठी. त्यावेळी स्त्रियांना मतदानाचाच आधिकार नव्हता मग उमेदवार म्हणून निवड्णूकीला उभे राहणे दुरची गोष्ट. १४जुलै १८५८ मध्ये  'एमिलिन ' यांचा जन्म झाला.अतिशय बुध्दीमान आणि तितक्याच संवेदनाशील एमिलिनला समाजकारण आणि राजकारणामध्ये सुरुवातीपासुनच रस होता. बॅरीस्टर पॅंखर्स्ट हे स्त्री स्वातत्र्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्याशी विवाह झाल्यानंतर एमिलिनने त्यांना सर्वतोपरी मदत केली. महिलांना मतदानाचा हक्क मिळविण्याकरीता कार्यरत असणाऱ्या सेफ्रजेट चळवळीत भाग घेतला,१८९४ मध्ये काऊंटी कौन्सिलच्या, म्हणजे आपल्याकडील नगरपालिकेच्या उमेदवाराच्या निवड्णुकीच्या वेळी मतदानाचा आधिकार मिळाला.पुढे त्यांनी हि चळवळ अशीच चालू ठेवली.वैयक्तिक जीवनात त्यांना बरीच दुःखे सोसावी लागली.पती निधन,पुत्र वियोग अशा मोठ्या विपत्तिंना तॊंड देतानाही त्यांनी हा लढा चालूच ठेवला, बरेच वेळा तुरुंगवासही भोगला. पण रशीया,अमेरीका असे दौरे करुन स्त्रिसंघटना वाढवली.त्यांच्या धडपडीस अखेर यश मिळालेच. १५मे१९१७ रोजी ३० वर्षांवरील स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
   अशा या  अखंड ध्यासपंथी चालणाऱ्या 'एमिलिन पॅंखर्स्ट' यांना नम्र अभिवादन!

            युरोप ,आमेरीकेत मतदानाचे हक्क मिळविण्याच्या चळवळी चालू होत्या त्या वेळी आपल्या देशातील महिला मात्र अज्ञानाच्या अंधःकारात पिचत होत्या. सारा देशच ब्रिटीशांच्या गुलामगिरीत होता.आणि बायका तर पुरुषांच्या गुलाम. त्यांना शिक्षण नव्ह्ते, ते मिळविण्याची संधी नव्हती.बालविवाह होत होते. जरठ-कुमारी विवाह सर्रास होत , पति निधना नंतर सती किंवा केशवपना सारख्या अमानुष रुढी होत्या.यामधून सुटून मोकळा श्वास घेता येतो हेच मुळी त्यांना माहित नव्हते. स्त्री जन्म म्हणजे सोसणे हे समीकरण त्यांच्या माथी पिढ्यानपिढ्या रुजविले होते, त्यामुळे त्याविषयी तक्रार, बंड करण्याचा प्रश्णच नव्ह्ता. याच काळात अनंतशास्त्री ह्या विद्वान ब्राह्मणाने आपली पत्नी लक्ष्मी हिला वेदाभ्यास शिकवायला सुरुवात केली. त्याला समाजाने तीव्र विरोध केला. समाजापासून दूर मंगळूर जवळील जंगलात हे दापंत्य गेले.तेथेच २३ एप्रिल १८६२ रोजी त्यांनी कन्येला जन्म दिला हिच ती जागतिक कीर्ति मिळविलेली 'पंडीता रमा'. तिचे   नाट्यमय आयुष्य वाचतानाही अंगावर रोमांच उभे राहतात. पंधरा वर्षा पर्यंत वडिलांकडून वेदाभ्यास मुखोद्गत करणाऱ्र्या रमेला लहान वयात आई वडीलांचा वियोग सहन करावा लागला. समाजाने बहिष्कृत केल्याने आईच्या ताटीला खांदाही तिने दिला. नंतर भावा बरोबर संपूर्ण भारत भ्रमण पायी केले.आणि वडीलांच्या स्त्री-शिक्षणाच्या विचारांबद्द्ल व्याख्याने दिली. तिच्या विद्वत्तेने उभा भारत अचंबित झाला. कलकत्त्यात भावाच्या निधनानंतर रमाबाईंनी 'बिपिनचंद्र मेधावी' याच्याशी आंतरजातीय विवाह  केला. त्यांना एक मुलगी झाली.मात्र हि मुलगी दोन वर्षांची असतानाच बिपिनचंद्र मेधावी याचे अकस्मिक निधन झाले. एकामागोमाग एक असे जवळच्यांच्या मृत्यूचे दुःख रमाबाईंनी कसे सोसले असेल ! एवढ्या अपार दुःखांनाही त्यांनी धिरोद्दातपणे तॊंड दिले.इतकेच नव्हे तर इंग्लड,अमेरीकेला जाऊन  त्यांनी भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीबद्द्ल व्याख्याने दिली.स्त्रिशिक्षणाची निकड पट्वून तिकडून देणग्या मिळविल्या. पुण्यात त्यांनी ’आर्य महिला समाजाची स्थापना केली.तसेच मुंबईत 'शारदा सदन' या बलविधवांसाठी आश्रम स्थापन केला.आपले सारे सर्वस्व स्त्रियांच्या उन्नती साठी समर्पण करणाऱ्या या विदुषीस लाख लाख प्रणाम!
      याच काळात ३१ मार्च १८६५ रोजी यमुना जोशी हिचा कल्याण येथे जन्म झाला. अवघ्या नवव्या वर्षी तिचे लग्न गोपाळ जोशी यांच्याशी झाले आणि तिचे नाव 'आनंदी' झाले.आनंदीला लग्नानंतर  शिकावे लागेल या अटीवरच तिला गोपाळरावांनी पत्करली होती.वरवर विक्षिप्त वाटणाऱ्या या माणसाची स्त्री-शिक्षणाची तळमळ जबरदस्त होती.त्याच्या धाकाने , थोड्याशा नाराजीनेच शिकायला सुरुवात केलेल्या आनंदीची बुध्दिची झेप मात्र विलक्षण होती. मॅट्रीकच्या पुढे काय शिकावे असा विचार करताना तिला जाणवली ती स्त्रियांची केविलवाणी स्थिती. वैद्यकीय उपायांअभावी घडणारे बालमृत्यू, स्त्रियांचे दुर्लक्षित आजार,पुरुष डॉक्टरांकडे संकोचापायी न जाण्याने झालेले त्यांचे अकाली मृत्यू. तिने वैद्यकीय शिक्षण घेवुन स्त्री समाजाचे आरोग्य सुधारण्याचा ध्यास घेतला.घराबाहेरही एकटीने जाणे निषिध्द मानल्या जाणाऱ्या काळात आनंदीने एकटीने आमेरीकेला प्रयाण केले.आणि फिलाडेल्फीया विद्यापीठातून ’एम.डी’ ही पदवी मिळविली वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी! आमेरीकेत तिने फार हाल सोसले, तिथले थंड हवामान,अपुरा पैसा, शाकाहाराच्या आग्रहामुळे सोसावी लगलेली उपासमार  या साऱ्यांचा परीणाम तिच्या प्रकृतीवर झाला आणि तिलाच क्षय रोगाने ग्रासले.भारतात आल्यावर तिला अनेक अपमान ,निंदा यांना तोंड द्यावे लागले. विदेश गमन तेही एका तरूण विवाहितेने एकटीने ,हे समाजाच्या दृष्टिने महान पातकच होते! जे आनंदीने समाजाच्या उध्दारासाठीच केले होते. मात्र आनंदीला योग्य वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत आणि वयाच्या २२व्या वर्षी तिने इहलॊक सोडला. तिचे स्त्री आरोग्य सुधारण्याचे स्वप्न अपुरे राहिले तरी तिची शिकण्याची जिद्द, कठोर परीश्रम याचे मोल कुठेही कमी ठरत नाही. भारतातील या पहिल्या महिला डॉक्टरचे 'महिला दिनी' कृतज्ञतापूर्वक स्मरण !
           सावित्रीबाई फुले यांना तर कॊण ओळ्खत नाही? १८५२ मध्ये त्यांनी पुण्यात दलित मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या पहिल्या भारतीय स्त्रि-शिक्षिका.
           अशा अनेक स्त्रिया आहेत, पण वेळेअभावी आणि तुमच्या सहन शक्तिचा विचार करुन मी काहींचाच उल्लेख केला आहे.
         आज आपल्याला अनेक संधी सहज उपलब्ध आहेत. आज पूर्वीच्या मानाने स्पर्धा जास्त आहे हे मान्य करावे  लागेल.परंतु आज  थोड्याशा अपयशाने खचून जाणारी, जराशा दुःखाने स्वतःच्या अगर दुसऱ्याच्या जिवावर उठणारी नवी पिढी पाहिली की वाटते त्यांनी या महान विदुषींची चरीत्रे वाचावी. त्यांनी ज्या संकटांना तोंड देऊन जे महान कार्य केले आहे ते वंदनीय  आहे.आपण या निमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण, त्यांच्या कार्याचे मनन केले आणि जमल्यास काही प्रमाणात अनुकरण केले तर  'महिला दिन' खऱ्या अर्थाने साजरा झाला असे मला वाटते. मला येथे माझे विचार मांड्ण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानून रजा घेते.

2 comments: