Friday, April 12, 2013

स्मरणरंजन



गतकाळाच्या जंगलात परत परत जायचा मोह पडतो
कारण तिथे भेटत राहते हरवलेले  बालपण

निरागस लोभस
निर्व्याज प्रेम करणारी जिव्हाळ्याची माणसं
छोट्या छोट्या गोष्टींमधे मिळणारे मोठे आनंद

त्या शाळेतल्या गमती, देवासारख्या वाटणाऱ्या बाई
उन पावसागत क्षणात भांडणाऱ्या अन दुसऱ्या क्षणी
गळ्यात पडणाऱ्या जिवाभावाच्या मैत्रीणी !

सगळेच काही सोनेरी नसते भूत काळात
दुःख,अपमानांच्या वेदनांच्या जखमाही असतातच कि
पण त्यांची भळभळ थांबलेली असते,
दुःखाची धार बोथट झालेली असते

दैन्याच्या उन्हाचे चटके विझुन गेलेले असतात
त्यामुळे त्यांची लाही जाणवत नाही
उलट त्यातून तावुन सुलाखून बाहेर आल्याचं समाधानच वाटतं!

बरीच वाट चालून आलो असं वाटायला लागतं
पुढं दिसणारं प्रौढ वय वाकुल्या दाखवायला लागतं
म्हणुनच मग या आठवणींच्या राज्यातच मन रमत राहतं

No comments: