Friday, April 12, 2013

पुस्तक परीचय

 बदलत्या जीवनशैलीमुळे व्यस्त पण सुशिक्षित पालक ,संगणकाच्या युगातील स्मार्ट पिढी , शिक्षणाच्या नानाविध संधी असे असताना खरंतर मुलांविषयी फारशा समस्या असण्याचं कारण नाही. पण  परीक्षेतील अपयशाने आत्महत्या करणारी मुले, प्रेमभंग झाल्याने दुसऱ्याच्या व स्वत्ःच्या जीवावर उठणारी मुले, पैसे न दिल्यामुळे स्वतःच्या आजी वा आजोबांच्या जीव घेणारे युवक अशा सुन्न करणाऱ्या बातम्या वाचनात येतात, टि.व्हीवर दिसतात आणि मग या साऱ्याला कोण जबाबदार असा विचार मनात येतो.

 अतिरेकी लाड, अती संरक्षण, जीवघेण्या स्पर्धा अशी ना -ना कारणे जाणवू लागतात मात्र त्यावर उपाय दिसत नाही. या सगळ्या समस्यांचे निराकरण शास्त्रशुध्द , वैद्यकीय आधार असलेले पण अतिशय सोप्या शब्दात ’जावे भावनांच्या गावा’ या  डॉ.संदीप केळकर यांच्या पुस्तकात मिळते.

 मुले हळवी असतात वगैरे गोष्टी आपण जाणून असतो,   मुलांच्या शारीरिक तसेच बौध्दिक विकास करण्यासाठी आपली धडपड आपत्य जन्म क्वचित त्याआधी पासून चालू असते, मात्र मुलांच्या भावनिक विकासाकडे आपण तितकेसे लक्ष देत नाही.किंबहुना असे काही असते हेच बहुतांश पालकांना माहित नाही. लहानपणापासून भावनेच्या भरात काही करु नकोस, भावनेच्या आहारी जावुन निर्णय घेवु नये असे वाचले ,ऐकलेले असते. किरकोळ कारणाने रडणाऱ्यांना रडुबाई, पटकन चिडणाऱ्याला आग्या वेताळ अशी विशेषणे देण्याने "भावना" या विकासाच्या आड येणाऱ्या आहेत असे काहिसे मनाशी ठसलेले असते. बुध्दि आणि भावना या परस्पर विरोधी समजल्या गेल्या आहेत.आणि शालेय तसेच महाविद्यालयीन यश हे पेपरातील गुणांनी मोजत असल्याने बौध्दिक विकासास प्राधान्य दिले जाते.   हल्ली एक किंवा दोन मुले असल्याने त्यांचे लाड होतात. आई-वडील दोघे नोकरी करत असतील तर ते मुलांना वेळ देवु न शकल्याने त्यांचे अतिरेकी लाड होवु शकतात त्यातुनच हट्टी,एककल्ली दुराग्रही मुले बनतात असा सर्वसाधारण समज असतो
 ’जावे भावनांच्या गावा’ या पुस्तकातुन भावना या आपल्या शत्रू नसुन मित्र आहेत, आनंद,प्रेम ,समाधान यांच्य़ा इतक्याच दुःख, भिती,राग या भावना महत्त्वाच्या आहेत असा मोलाचा मंत्र आपल्याला मिळतो. भावनांमधे भरपूर माहिती साठवलेली असते, भावनिक मेंदू हा वैचारिक मेंदूच्या ८०,००० पट वेगाने काम करतो त्यामुळेच काहीवेळा अविचारी कृत्ये माणसाच्या हातुन घडतात.भावनिक व वैचारिक मेंदू या दोन्हीमध्ये सम्न्वय साधणे म्हणजे भावनिक प्रज्ञेचे संवर्धन होय.  लहानपणापासून अक्षर ओळखी बरोबरच मुलांना आपण या नानाविध भावनांबद्दल साक्षर केले तर त्यांचा भावनिक विकास होईल. बुध्दी आणि भावना यांचा योग्य वापर करुन आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करणे कसे शक्य आहे हे समजते. टीम वर्क , संभाषण कौशल्य, ऐकण्याची कला , आवेगांवर नियंत्रण या नोकरी वा व्यवसायात शैक्षणिक पात्रतेइतक्याच आवश्यक गोष्टी आहेत पण शालेय अथवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांचा समावेश नसतो. विभक्त कुटुंब पध्दती, मैदानी खेळांचा अभाव,टि.व्ही, संगणकांचा अतिरिक्त वापर यामुळे मुलांमध्ये त्यांचा अभाव आढळतो त्यातुन बऱ्याच समस्या उद्भवतात. हि कौशल्ये कशी वाढवावी याचे योग्य मार्गदर्शन पुस्तकात  मिळते.भावनिक कौशल्यांचा विकास हे तंत्र हि अधुनिक असून १९९० पासून अस्तित्वात आलेले आहे.भावनांबद्दलचे संशोधन पुष्कळ जुने असले तरी हे तंत्र अधुनिक आहे.

 पुस्तकात भावनांच्या भाषेची मशागत ,भावनिक सुजाण पालकत्व, टिन एजर्सच्या विश्वात, जग भावनांचं बुध्द्यांकापलीकडलं असे भाग आहेत .भावनिक बुध्दिमत्ता म्हणजे काय? भावनांक(emotional quotionent) म्हणजे काय तो कसा काढतात हे डॉक्टरांनी सोप्या शब्दात सांगितले आहे. त्यांच्या कडील पेंशंटची उदाहरणे देवुन अनेक मुलांच्या शारीरिक आजारांच्या मागे कुठली भावनिक कारणे होती हे वाचताना एक पालक म्हणून आपल्यालाही आपल्या मुलांच्या संदर्भात असे काही घडल्याचे जाणवत राहते. साध्या संवादातून किती समस्या सहज दूर होवु शकतात हे समजते  त्या करीता पालकांनाही भावनिक साक्षर व्हावे लागेल.  सुदैवाने भावनिक गुणवत्ता वयाच्या ४५ वर्षांपर्यंत वाढविता येते,त्यामुळे पालक ही या पुस्तकातुन स्वतःसाठी बरेच काही शिकु शकतात.

 विज्ञानाने प्रगती केली, समाज कितीही सुधारला तरी आपल्या मुलांची काळजी करणे हे कुठल्याच पिढीला चुकलेले नाही, काळजी करण्याऐवजी योग्य काळजी घ्या असे डॉ.संदीप केळकर सांगतात. त्यांचा या विषयातील अभ्यास किती सखोल आहे हे त्यांनी दिलेल्या अनेक संदर्भातुन जाणवते. ऑरिस्टॉट्ल, मार्टिन ल्युथर किंग,विवेकानंद यांसारख्या थोर व्यक्तिंची भावनांच्या बाबतीतील अवतरणे देवुन ते आपला विषय स्पष्ट करतात. पुस्तकाची भाषा ओघवती तर आहेच शिवाय आजकालच्या पिढीला समजणारी उदा. भावना या मेसेजस आहेत, पालकत्वाचा एक्प्रेस हायवे  या सारख्या उदाहरणांमधुन अवघड संकल्पना सोप्या पध्द्तीत समजावल्या आहेत. भावनांच्या भाषेची मशागत या भागात विविध भावनांची अक्षरओळख करुन देणारं घर हेच मुलांचं प्राथमिक शिक्षण केंद्र असल्याचं डॉक्टर सांगतात. त्यामुळे भावनांच हे प्राथमिक शिक्षण अधिकाधिक रंजक होण्याविषयी मार्गदर्शन हि करतात.’भावनिक सुजाण पालकत्व’ या भागात मुलांच्या भावना त्यांना योग्य रितीने व्यक्त करता याव्या, पालकांनी मुलांशी सुसंवाद कसा साधावा यावर भर दिलेला आहे.  पौगंडावस्थेतील मुलांचे भावनिक विश्व आणि त्यांच्या समस्यांना तोंड द्यावयास क्वचित हतबल ठरणारे पालक यांना खूप उपयुकत वाटेल असा ’टिन एजर्सच्या विश्वात’  हा विभाग आहे. मानवी मेंदूची रचना, वैचारिक आणि भावनिक मेंदुचे काम कसे चालते या विषयीची शास्त्रीय माहिती आकृत्यांद्वारे ’जग भावनांचं बुध्द्यांकापलीकडलं’ या भागात दिलेली आहे.

भावनिक बुध्दीमत्ता या विषयावरील हे पहिलेच मराठी पुस्तक वाचकांना एका नव्या विषयाची ओळख करुन देते. प्रत्येक मुलाने आपल्या भावनिक विकासाकरीता, प्रत्येक पालकाने त्याच्या व त्याच्या मुलांच्या करीता पुस्तक जरुर वाचावे आणि संग्रही ठेवावे.

No comments: