Friday, November 7, 2014

अजब तुझे सरकार

         अकबर बादशहा आणि बिरबलच्या कथा अबालवृध्दांमध्ये लोकप्रिय आहेत, शिवाय त्या आजच्या काळातल्या प्रसंगाना लागु होणाऱ्या आहेत. अशीच एक कथा.
एकदा विरबलाचा दुःस्वास करणाऱ्या लोकांनी बादशहाचे कान भरले. त्यांनी अकबराला सांगितले.बिरबल हा अतिशय भ्रष्ट आहे. तो पैशाची अफरातफर करतो, प्रत्येक कामात स्वतःचा खिसा कसा भरेल यावर त्याची नजर असते इ.इ. बादशहा्ला संताप आला.बिरबल आणि असं वागतो? त्याने दोन दिवस विचार केला.  चतुर बिरबलाच्या नजरेतुन बादशहाच्या वागणुकितला फरक सुट्णे शक्य नव्हते. त्याने त्याचा कार्यकारण भाव शोधुनही ठेवला होता.पण आपण होवुन बादशहाला काही विचारायचे नाही असे त्याचे धोरण होते. बादशहाने बऱ्याच विचारांती बिरबलला बोलावले आणि सांगितले," उद्यापासून तू दरबारातील कुठलेच काम करायचे नाहीस. सकाळी उठून नदीवर जायचे दिवसभर तेथेच बसायचे"
"जशी आज्ञा ,सरकार" बिरबल उत्तरला.
बादशहा मनाशी म्हणाला ," आता बिरबल कसे पैसे खाईल तेच बघतो" त्याने त्याचा एक गुप्तहेर बिरबलावर नजर ठेवायला पाठविण्याचीही खबरदारी घेतली.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबल  नदीकाठावर जावुन बसला. लोक बिरबलाकडे नवलाने बघत होते तो शांतपणे पाण्याकडे पहात होता
हळूहळू नावाडी येवु लागले, पलिकडे जाण्याकरीता लोक येवु लागले.नावाडी आपल्या नावा सोडू लागले तसे बिरबल ओरडला ,"थांबा. कुणीही नावा पाण्यात सोडायच्या नाहित. "
"का? "
"तशी सरकारची आज्ञा आहे"
"पण मग आम्ही पलिकडे जायचे कसे?" लोकांनी एकच गलका केला
"आमचा धंदा कसा चालणार?" नावाडी विचारु लागले
"पण नावा न जावु द्यायच कारण काय?, हि आज्ञा कशासाठी?"
"संथ पाण्यातील लाटा मोजायच काम चालू आहे, नावा सोडल्या कि लाटा नीट मोजता येत नाहीत... बिरबलाने पाण्याकडे पहातच उत्तर दिले."
"किती वेळ चालेल हे काम?"
"न संपणार काम आहे हे? किती वेळ कसं सांगता येईल?"
"मग आंम्ही कराव तरी काय?"
"ते मी काय सांगु, चला बाजुला व्हा ,मला माझ काम करु द्या"
लोकांनी जरा वेळ वाट पाहिली, आपापसात विचारविनिमय केला. आणि त्यातल्या एकाने अक्कलहुशारीने एक तोडगा काढला
बिरबलाजवळ जावुन तो म्हणाला
"हे बघा,बिरबलसाहेब मला जरा फार महत्वाचं सामान पलिकडे पोचवायचयं, तुम्ही परवानगी द्या आणि हे जवळ असुद्या, एक नाव गेली तर लाटांवर जास्त परीणाम होणार नाही"
बिरबलाने त्याच्याकडे पाहिले त्याने हळूच दहा नाणी बिरबलाच्या हातात सरकवली .सराईतासारखी ती आपल्या अंगरख्यात टाकून त्याला परवानगी देवुन बिरबल नदीकडे बघू लागला.
एक होडी गेली. बाकिच्यांनीही त्याचीच युक्ती वापरली आणि थोड्या थोड्या वेळाने एक एक करीत सगळ्या नावा निघुन गेल्या आणि बिरबलाचा खिसा नाण्यांनी भरुन गेला.
बादशहाचा माणूस चकित नजरेने हे सगळे पहात होता. त्याने संध्याकाळी राजाला सगळा वृत्तांत सांगितला. राजा अवाक झाला.

त्याने बिरबलालाच स्पष्ट जाब विचारायचे ठरवले आणि दुसऱ्या दिवशी खाजगी मुलाखतीस हजर व्हायला सांगितले. बिरबल सकाळी बादशहाकडे गेला
बादशहाने त्याला आधी त्याच्याबद्दल काय समजले म्हणून त्याला सजा म्हणून नदीतीरी जाण्यास सांगितले वगैरे सगळे सांगितले आणि तो म्हणाला
"नदी किनाऱ्यावर नुसते बसायला सांगितले तरी तू त्यातुन पैसे काढलेस? इतक्या खालच्या पातळीवर तू कसा गेलास? "
"खाविंद, माझ्याविरुध्द कुणीतरी  तुमचे कान भरलेत हेच मला तुम्हाला दाखवुन द्यायच होतं, मुळात मी पैसे खाणाराच असतो तर आज माझ्या नाहीतर माझ्या बायकामुलांच्या नावावर मी आजवर अमाप दौलत जमा केली असती.माझं घर तुम्ही बघताच आहात. मला हे सिध्द करायच होतं कि पैसे खाणारा माणुस त्याला कुठेही ठेवलत तरी ते मिळवायचे मार्ग शोधतो. तेंव्हा त्याच्या कामाच्या जागा बदलणं हा त्यावर उपाय नव्हे. ती वृत्ती कमी कशी करता येईल ते बघितल पाहिजे. हे कालच्या दिवसात मिळालेले पैसे , सरकारजमा करा. तसेच ज्यांनी ते दिलेत त्यांनाही समज द्या कारण पैसे खाण्याइतकाच खाय़ला घालण हा गुन्हा आहे हे रयतेला समजल पाहिजे."
बादशहाला अर्थात स्वतःची चूक समजली.त्याने परत बिरबलाला प्रधानपदी बसवलं.

       हि कथा आत्ता आठवायच कारण ,सध्या आलेलं नव सरकार. भ्रष्टाचार मुक्त भारत बनवणं इतक सोप आहे? मुळात लोकांच्या मनात वर्षानुवर्षे मुरलेल्या सवयी सहजासहजी जातील? सरकारी कामांच्या,ते कारण्याच्याही काही पध्दती आहेत. मा.पंतप्रधान स्वतः 'task master ' आहेत. मी हेडमास्टर नाही, टास्कमास्टर आहे असं ते शिक्षकदिनी संवाद साधताना म्हणाले. ते आहेतच तसे. पण गेल्या सहा दशकात सरकारी खात्यांमधे कामापेक्षा काम करण्याचा दिखावा करायची जी सवय लागलीय ती मोडण गरजेचं आहे. हि सवय घालवण हे या टास्क मास्टरला मोठं टास्क ठरणार आहे !

आक्टोबरमधे महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधुन मा.पंतप्रधानजींनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले.अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. कुठल्याही कामाची सुरुवात घरापासून करायची या तत्त्वानुसार सर्व सरकारी कार्यालयांमधे ’स्वच्छ भारत अभियान’ चे फतवे गेले. झाले, सर्क्युलर आले कि मिटींगा सुरु झाल्या, चर्चा झाल्या,बैठका झाल्या.’स्वच्छ भारत कमिट्या’ तयार झाल्या. त्यांनी जोरदार कामाला सुरुवात केली. आधी भरपूर बजेट सॅंक्शन करुन घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या बजेट मधुन पोस्टर्स,बॅनर्स बनविली. स्वच्छ भारत बनविण्याच्या शपथपत्रांच्या शेकडो प्रती काढल्या. त्या कर्मचाऱ्यांना वाटल्या.शपथ घेवुन झाल्यावर त्या कागदावर त्यांच्या सह्या घेवुन त्याची फाईल बनविली.
प्रत्येकाला ’स्वच्छ भारत’  असे लिहिलेले बॅचेस दिले.बॅचेस लावुन ,प्रतिज्ञा म्हणून,पोस्टर्स,बॅनर्स लावुन लोकांनी उरलेल्या वेळात जमेल तेवढी स्वच्छता केली त्याचे असंख्य फोटो आणि व्हिडीओ बनवले. ते दुसऱ्या दिवशी फेसबुक आदी सोशल साईट्स वर झळकले. यात बॅनर्स, पोस्टर्स,बॅचेसचा जो कचरा तयार झाला त्याची आवश्यकता होती का?

सरकारी कार्यालयातला शिपाई,सफाईवाला देखील किमान दहावीपर्यंत गेलेला असतो. त्याच्याकडे टि.व्ही आहे,मोबाईल आहे.’स्वच्छ अभियानाबद्दल’ सगळ्यांना सगळे माहित आहेच तर  मग बॅनर्स,  पोस्टर्स,बॅचेसचा खर्च आणि पसारा का? आपला देश स्वच्छ असावा असं आपल्याला मनापासून वाटतं, कधीकधी ऑफिसमधेसुध्दा असलेला कचरा पटकन झाडून साफ करावा असं कित्येकांच्या मनात येतही असेल,पण आपल्या पोस्ट्ला,पोझिशन ला ते काम करणे शोभणार नाही,काहीजण आपली चेष्टा करतील अशी भीड बरेचदा वाटते.मा.पंतप्रधानांनीच स्वतः हातात झाडू घेतलाय म्हणल्यावर मनातील अशी जळमटे झटकुन फक्त सफाई करणे जमायला काय हरकत होती? पण नाही, सरकारी खात्यांमधे प्रत्येक गोष्टीचा असा बोजवाराच करायची वर्षानुवर्षाची हि सवय लागलीय ती कशी जाणार?  प्रत्येक कृती करताना त्यातुन मला काय मिळणार? माझ्या सी.आर.मधे काय लिहिले जाइल? माझ्या कामाने माझा बॉस खुष कसा होईल आणि मला प्रमोशन कसे मिळेल या अट्टहासापायी सगळ्या गोष्टी कागदावर आणण्याची सवय लागते. कामाचा मूळ उद्देश्य बाजुला राहतो त्याचा उपयोग आपल्या वैयक्तिक विकासाची शिडी म्हणून कसा करता येईल एवढच बघितल जातं. आणि म्हणूनच या आणि अशा अनेक चांगल्या योजनांच निव्वळ हसं होत. हि सुरुवात मंत्री महोदयांपासून होते. कालच टि.व्ही.वर दिल्लीमधील ’स्वच्छता अभियान’ अंतर्गत एका कार्यक्रमाला गेलेल्या सत्ताधारी राजकीय पक्षातील एका जेष्ठ व्यक्तिबद्द्ल दाखवित होते. ती व्यक्ती ’स्वच्छता अभियान’ ला जाणार म्हणून एका स्वच्छ जागेवर आधी कचरा पसरला आणि नंतर त्यांनी तो झाडला त्याचे फोटो काढून सोशल मिडीयावर टाकले. पण त्या आधी कचरा टाकणाऱ्यांचे फोटो कुण्या पेपरवाल्याने टिपले आणि मग काय मिडीयाच्या हाती कोलितच मिळाले. सगळा वेळ तिच चर्चा! त्यावर त्या जेष्ठ व्यक्तिची सारवासारव . एका अतिशय चांगल्या सर्वसामान्यालाही पटणाऱ्या, जमणाऱ्या आणि जगात आपल्या देशाची प्रतिमा चांगली बनवली जाणाऱ्या उपक्रमाची वाताहात आपलेच निवडून दिलेले नेते कशी करतात याच हे बोलक उदाहरण.

यात त्यांची तरी चूक कशी म्हणावी? ’स्वच्छता अभियान’ अंतर्गत मा.पंतप्रधानांनी झाडू घेवुन स्वच्छता कशाला करायला सांगायची? जगात इतके स्वच्छ सुंदर देश आहेत त्यांचे दौरे करायला पाठवायला हव होतं.त्यानिमित्ताने युरोप,अमेरीका,चीन,जपान,सिंगापूर,मलेशिया अशा नानाविध स्वच्छ सुंदर देशांची पहाणी करायला हे मंत्रीमहोदय, सरकारी आधिकारी गेले असते. पहाणी केली असती, रीपोर्ट लिहिले असते. सुधारणा सुचविल्या असत्या. देश नाही तरी देशाचा खजिना थोडाफार स्वच्छ झाला असता. ते सोडून खुशाल त्यांना सफाई कराय़ला लावली.ज्यांनी घरात कधी पाण्य़ाचा ग्लास हातानी घेतला नाही त्यांच्या हातात चक्क झाडू, फारच झाल हे? यासाठी केला होता का अट्टहास?

जे ’स्वच्छ भारत अभियानाचे’ तसेच एकता अभियानाचे. सरकारी कार्यालयात आधीच कामाला वेळ पुरत नाही आणि आता तर काय दर महिन्याला नव्या शपथा. स्वच्छ भारत घेवुन झाली. मग दक्षता सप्ताह सुरु झाला , त्यात भ्रष्टाचार करणार नाही अशी शपथ घेवुन झाली.मग सरदार पटेलांची जयंती एकता दिन घेवुन आली, कि घेतली एकतेची प्रतिज्ञा. इतक्या शपथा आणि प्रतिज्ञा घेऊन त्याचा उपयोग होणार आहे का? शपथा या केवळ एक उपचार ठरतो, त्याचा व्यवहारात उपयोग करायचा आहे ह्याचाच मुळी विसर पडतो.

इकडे जनतेने एकतेच्या शपथा घ्यायच्या, आणि पंचविस वर्ष युतीत राहिलेल्या राजकीय पक्षांनी सत्तेच्या हव्यासापोटी एकी तोडून राज्याचे भले करण्याऐवजी आपापसात भांडायचे या विरोधाभासाला काय म्हणायचे?

लोकांची मानसिकता बदलणे हे अशक्य नसले तरी अवघड काम जमले तरच ’अच्छे दिन ’ येतील न पेक्षा आहेत त्या दिवसांना ’अच्छे दिन’ समजायची तयारी आपण ठेवावी हे चांगले .

3 comments:

Anonymous said...

Completely agree with the sentiment!

--Gayatri

SUJATA said...

Something to really thought about - very well said - Sujata

Unknown said...

Very well written piece about cleanliness drive...Vaishali