Tuesday, January 12, 2016

मला वेड लागले.....

तंत्रज्ञानातील वाढत्या सुधारणांमुळे जग झपाट्याने बदलत आहे. "दहा दिशांचे तट कोसळले ध्रृव दोन्ही आले जवळी" हि कवीकल्पना अक्षरशः वास्तवात उतरली आहे.मोबाईल फोन ने जी क्रांती केलीय तिला तोड नाही. या फोनवरुन बोलणे हा फोनचा उपयोग विसरावा इतके त्यावरील विविध ऍप्स ने आपल्याला वेडे करुन सोडलय. ई-मेल,फेसबुक यांना केव्हाच रद्दीत टाकत whats app नामक जादुगाराने आपल्या जादुने साऱ्या समाजाला अक्षरशः वेड लावलय. अशाच माझ्या whats app वेडाची कथा

    मोबाईल वापरायला मी खूपच उशीरा सुरुवात केली होती.मला त्याची फारशी जरुर भासत नव्हती हे प्रमुख कारण, मुली पुरेशा मोठ्या झालेल्या होत्या,ऑफिस घरापासून जवळ होते ,घर आणि ऑफिस दोन्हीकडील लॅंड्लाईन फोन वरून लोकांच्या संपर्कात राहता येत असे.ऑफिसमधील बहुतेकांजवळ मोबाईल आले. ऑफिसमधील टेलीफोन ऑपरेटर आमच्या क्लाएंट्सचे फोन द्यायला कंटाळा करु लागले. मुली ,आई मोबाईल घे असा आग्रह करतच होत्या पण तो घेतला कि सांभाळण्याची ,तो बरोबर बाळगण्याची जबाबदारी येणार त्याचाच मला त्रास वाटत  होता. एकदा मुलीला घेउन  भाजी आणायला मंडईत गेले. तिथल्या भाजीवाली कडे मोबाईल बघितल्यावर मात्र ती वैतागली."आई, या भाजी वाली पेक्षा तुला जास्त पैसे मिळत असतील तरी तू मोबाईल घेत नाहीस?"
"नाही अगं कदाचित ती माझ्याहूनही जास्त कमवित असेल"
"पण तू जास्त शिकलेली तर आहेस,ऑफिसर आहेस आणि तरी अशी राहतेस ....."
दरम्यान मोठी मुलगी पुढील शिक्षणासाठी होस्टेलवर गेली आणि तिच्याशी वेळी अवेळी बोलण्याकरीता मोबाईल हवा असे वाटू लागले.
मग मोबाइल घेतला. पण तो माझ्यापेक्षा धाकटीच्या ताब्यात जास्त वेळ असे.माझ्या फोनच्या रिंगटॊन बदलणे,त्यात स्वतःच्या आवडीचे गाणी घालणे असे उद्योग ती कराय़ची. एकदा दुपारी साडेचार वाजता माझा फोन वाजला.एका अनोळखी मुलीचा आवाज होता.
"कोण बोलतयं?" मी विचारले
"काकू , मैत्रेयीला द्याना फोन, मी तिची मैत्रीण बोलतीय"
" मैत्रेयी घरी आहे, मी ऑफिसमधे आहे, तिला कसा देवू फोन"
" ठिक आहे, मी करते घरी फोन". म्हणजे या पठ़्ठीने खुशाल माझा नंबर मैत्रीणींना स्वतःचा म्हणून दिला होता !

    मला माझा फोन, माझा वाटून त्यातील सगळी फ़्ंक्शन्स समजावून घेई घेई पर्यंत स्मार्ट फोन्स बाजारात आले. त्याच्या ट्च स्क्रीन आणि विविध नवनव्या सोयींमुळे तरूण पिढीच्या तो हातात ने येता तरच नवल. माझी धाकटी लेक आता दहावी पास होउन कॉलेजला जायला लागली होती त्यामुळे तिला फोन घेवुन देणे क्रमप्राप्तच होते. तिने नव्या साध्या फोन पेक्षा वडीलांचा जुना टच स्क्रीन फोन वापरण्याचा समजुतदारपणा दाखविला. हा समजुतदारपणा पुढे आम्हाला खूपच महागात गेला कारण एक नवे खेळणे मिळाल्यासारखे अकरावीचे निम्मे वर्ष तिने त्या फोनशी खेळण्यात घालविले. ती बाहेर गेल्यावर तिला फोन करावा तर् तो कधीच लागत नसे वा ती कधी उशीर होणार असल्यास फोन करण्याची तसदी घेत नसे. फोन करायचा सोडून इतर सगळे उपयोग तिने केले. पुढे बारावीला तिने फोन वापरणे बंद करुन अभ्यासाला सुरुवात केली. दरम्यान तो फोन टाकण्याच्या लायकीचाच झाला होता ! तिला इंजिनियरींगला ऍडमिशन घेतल्यानंतर स्कुटर हवी का मोबाईल असे विचारताच तिने पुन्हा शहाण्यासारखा मोबाईल मागुन आमचे बरेच पैसे वाचविल्याचा मोठेपणा घेतला. दरम्यान whatsapp या नव्या जादुगाराचे आगमन झाल्याची गंधवार्ताही मला नव्हती. नवा फोन आल्यानंतर घरात वायफाय ही आले. लेकीकडे आणि तिच्या वडीलांकडेही स्मार्ट फोन होते. दोघांचा मुक्काम  रेंज जास्त असलेल्या खोलीतच असे. त्याच वेळी मोठी मुलगी उच्च शिक्षणाकरीता इंग्लंडला गेली.मग तिच्याशी संपर्क साधायला मोबाईल हेच माध्यम सोईचे वाटू लागले. घरच्या डेस्कटॉपवर स्काईप वरुन तिच्याशी बोलता येई पण तिकडच्या आणि इथल्या वेळेमधील साडेचार तासांच्या फरकामुळे शनिवार रविवार खेरीज बोलणे जमत नसे. तिलाही नवीन देश,नवीन मित्र मैत्रीणी आणि नवीन युनिव्हर्सिटीचे अप्रूप होते. प्रत्येक खरेदी केलेली वस्तू,प्रत्येक बनविलेला पदार्थ ,भेट दिलेले प्रत्येक ठिकाण याचे फटाफट फोटो काढून ते whatsapp वर टाकायचा तिने सपाटा लावला.मला तिची खुशाली आणि फोटो बघण्यासाठी छोटीच्या फोन म्हणजे पर्यायाने तिची मदत घ्यावी लागे. त्या करीता तिच्या फोनच्या अनिर्बंध वापराबद्दल गप्प बसणे मला भाग होते. माझ्यापुढे whatsapp साठी स्मार्ट फोन घ्यावा कि न घ्यावा असा नेहमीचा सवाल होता, कितीही नाही म्हटले तरी मध्यमवर्गीय मूल्ये सुटत नसतात. जुना फोन चांगला आहे, अजून त्याची काही तक्रार नाही (कशाला असेल तक्रार त्याचा वापरच मर्यादित ,फक्त फोन करणे आणि तो घेणे.घरात रेंज नसल्याने घरात तो बिचारा मुकाच असे.फोटो काढणे ,मेसेज करणे असे उद्योग मी कधी केले नाहीत, त्याचा रंग, स्क्रिन इतकेच नाही तर कि-पॅड हि छान होते. ) आणि वस्तुचा सुध्दा आपल्याला लळा लागतो त्यामुळे स्मार्ट फोन घेण्याचा विचार मी पुढे ढकलत होते.

    अखेर शेवटी नवऱ्याने अचानक स्मार्ट फोन भेट देवुन माझी बोलती बंद केली, आणि लवकरच ती करण्यामागची भूमिकाही समजली. झालं होत असं कि मोठी लेक परदेशात आणि घरी हे दोघे सतत मोबाईल मधे डोके घालून, माझ्याशी बोलाय़ला घरात कोणीच नाही. सतत त्यांच्या मोबाईल वरील मेसेज वाचन,forwarding  ने माझं डोके फिरुन जाई. घरी कोणाला बोलावले तरी आलेली व्यक्ती पण मोबाइलवरच नजर ठेवुन. आपापसात संवाद न होता त्यांचे मोबाईलवरील चॅटींग बघण्यातच वेळ जायचा. ऑफिसमधल्या मैत्रीणींकडेही स्मार्ट फोन आलेले होते,whatsapp वरील मेसेजची चर्चा चालायची त्यात मी कुठेच नसे. आता माझ्याकडेही स्मार्ट फोन आला, ’ज्याचा केला कंटाळा ते आलं वानवळा’ अशी गत असली तरी तो शिकणे,सांभाळून ठेवणे आणि त्याचा वापर करणे गरजेचे होतेच. लेकीने न सांगताच शिकविण्याची जबाबदारी घेतली. whatsapp डाऊनलोड करुन दिले, देवनागरी कि-बोर्ड डाऊनलोड करुन दिला. मी देखील उत्साहाने काही नव्या गोष्टी करायला सुरुवात केली.शाळेतील आमचा मैत्रीणींचा ग्रूप हल्ली परत भेटू लागला होता, त्यांचा एक ग्रुप मी बनविला.मुलीला आश्च़र्याचा धक्काच होता. आपली आई स्वतःचे डोके वापरुन काही करु शकते यावर मुलींचा विश्वास बसणे जरा अवघडच असते. हळूहळू शाळेच्या मैत्रीणींचा एक ग्रूप, कॉलेजच्या मैत्रीणींचा वेगळा ग्रूप, चुलत भाऊ,बहिणींचा एक तर मामे-मावस बहीण भावांचा असे अनेक ग्रुप झाले. काही मी बनविले तर काहींमध्ये मला घेतले गेले. एकंदरीत माझे जबरदस्त नेटवर्क तयार झाले. सकाळच्या सुप्रभात मेसेज पासून सुरुवात होई रात्री पर्यंत प्रत्येक ग्रूपवरुन अनेक मेसेजचा ओघ सुरु होई. काही चांगले मेसेज मी इकडून तिकडे पाठवी.काही चांगल्या कविता,सुंदर चित्रे,सुविचार असे बरेच काही वाचायला मिळे. पण काही दिवसांतच माझ्या लक्षात आले कि बरेच मेसेजेस वेगवेगळ्या ग्रुप वरुन पुन्हा पुन्हा फिरत. तेच तेच विनोद, त्याच त्याच कविता , त्यावरील ठराविक प्रतिक्रीया !

    हल्ली शहरातील धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात मनात असूनही एकमेकांच्या घरी जाणे खरोखरीच शक्य होत नाही , सोशल नेट्वर्कच्या या नविन माध्यमाने आपण एकमेकांच्या संपर्कात राहू अशा विश्वासाने मी अनेक ग्रूप्सची सभासद झाले होते.पण संपर्कात राहणं साध्य झाल अस म्ह्णायला जीभ कचरते. एकमेकांची खुशाली समजत होती असही नाही. निरर्थक,वायफट बडबड (बडबड नाही म्हणता येणार कारण ते चॅटींग म्हणजे टायपिंगच असे) भरपूर चाले. एखादी मैत्रीण परदेशात जाऊन आली की तिचे फोटो बघून मजा यायची पण एखाद्या मैत्रीणीच्या आजारपणाची बातमी कशी समजणार? तिला बरे वाटल्यावर तिने काही लिहिले तरच कळणार. एखाद्याच्या घरातील मृत्यू्ची बातमी अशीच कुणकडून मेसेजच्या स्वरुपात समजे मग तिथेच सगळ्य़ांनी RIP लिहायचे( हि RIP ची भानगड समजायला मला थोडा वेळच लागला Rest in peace) पुण्यातल्या बहिणीला जावई आलाय हे अमेरीकेच्या बहिणीकडून समजले तेंव्हा मला या नेटवर्कची महती खऱ्या अर्थाने समजली. मंगेश पाडगावकरांसारखा कवी गेला कि त्यांच्या कवितांची बरसात सुरु झाली पण त्यातली किंवा त्यांची एक तरी कविता संपूर्ण   पाठ असणारे किती जण त्यात होते? ज्यांच्याकडे त्या कविता आल्या त्यातल्या किती जणांनी त्या मनःपूर्वक वाचल्या ?

    पण आता मला एक नवाच साक्षात्कार झालाय असं वाटत, जगाचे एकूणच संसाराचे आसारपण समजण्याकरीता whatsapp सारखं साधन नाही. तिथल्या निरर्थक मेसेजेसची गर्दी, खोटया फसव्या शुभेच्छा, वेगवेगळ्या स्माइली, एकमेकांची फार काळजी असल्याचे दाखवणे हे सार खऱ्या जगापासून आपल्याला दूर ठेवत असतं. आपल्या संत महंताना आपल्या सामान्यांचं रोजच जगण बघुन असच वाटत असेल का? आपण सारे परमेश्वराची खरी भक्ती करायची सोडून ,आत्म्य़ाला काय हवय याचा विचार करायचा सोडून नश्वर देहाच्या सुखामागे धावण्यात अवघे आयुष्य व्यर्थ घालवत असतोच.  त्यात आता हि virtual reality. म्हणजे आपला विकास होतोय असं आपण म्हणतो ती खरच प्रगती आहे कि अधोगती? या आणि अशासारख्या अनंत विचारांनी माझ मन व्याकुळ होत.

    whatsapp हे एक व्यसनच आहे ज्याच्या अगदी आहारी नाही तरी बऱ्याच अंशी मी आधिन झालेली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मी निकराचा प्रयत्न चालू ठेवला आहे. whatsapp सॉफ्ट्वेअर फोन मधुन काढुन टाकणे हा एक सोपा मार्ग आहे. पण तो खरा मार्ग नाही, कारण जे नाही ते असावे या साठी मन फारच बंड करुन उठते.   हळूहळू ग्रूपवरील गोष्टी forward न करणे, त्यावार प्रतिक्रिया न देणे अशी सुरुवात केली आहे. माझ्या मोबाईल वर whatsapp असून ते मी वापरले नाही तर मी माझ्या मनावर खऱ्या अर्थी विजय मिळविला असे होईल.
    फार वर्षांपूर्वी ’लाखाची गोष्ट’ नावाचा सिनेमा बघितला होता. राजा परांजपे आणि राजा गोसावींचा गाजलेला चित्रपट. या दोन कफल्लक कलावंत तरुणांना श्रीमंत मुलीचा बाप तुम्हाला पैसे मिळवण्याचीच नाही तर खर्च करायची देखील अक्कल नाही असे म्हणून एक लाख रुपये महिनाभरात खर्च करायला सांगतो आणि पुढे ते पैसे कसे उधळायला लागतात पण त्यांना अधिकाधिक पैसे मिळतच जातात याचे खूप छान चित्रण आहे, पण त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते दोघे त्या महिनाभरात आपली कला विसरतात,सतत त्यांच्या डोक्यात पैशाचेच विचार.मग ते मुलीच्या वडीलांकडे जावुन म्हणतात," नको हा पैसा  आम्हाला आमच्या कलेपासून तो आम्हाला दूर नेतो" आणि तीच खरी लाख मोलाची गोष्ट होती. whatsapp च्या नादाने चांगली पुस्तके वाचणे, आवडत्या कवितांचे पुस्तक घेवून त्या पुन्हा पुन्हा वाचणे.मनातले विचार कुठेतरी लिहून व्यक्त करणे या सगळ्याचा मला विसर पडत चालला आहे. तेंव्हा whatsapp ला विसरणे हे लवकरात लवकर केलेच पाहिजे.  नव्या वर्षाचा हा संकल्प असेही मी म्हणणार नाही कारण बहुतेकसे संकल्प अल्पजीवी असतात.लवकरात लवकर माझा संकल्प सिध्दीस जावो हि इश्वरचरणी प्रार्थना.

8 comments:

Unknown said...

Humans are social animals and the desire to keep in touch is made possible in this modern world because of social media. However as you have rightly said , it's up to us to restrict its usage , to allow us time to pursue other activities of our choice without being compelled to read and react to what is forwarded.

Unknown said...

Humans are social animals and the desire to keep in touch is made possible in this modern world because of social media. However as you have rightly said , it's up to us to restrict its usage , to allow us time to pursue other activities of our choice without being compelled to read and react to what is forwarded.

Unknown said...

Above comment by Janaki Soman

Unknown said...

Above comment by Janaki Soman

Sujata Rao said...

I agreed with u.

Sujata Rao said...

I agreed with u.

Shubhangee said...

Thank you Janaki and Sujata

Unknown said...

Very Good article on WhatsApp.