Monday, June 17, 2024

काशी यात्रा

   ’ काशीस जावे नित्य वदावे ’ प्रवासाची साधनांची सोय नसताना , पैशाची चणचण असण्याच्या काळात हे वाक्य प्रचलित होते. एकतर कशी विश्वनाथाचे  आणि गंगेच्या पवित्र प्रवाहात स्नान हि पुण्य गाठीशी जोडणे हि साध्ये होती आणि त्यासाठी आवश्यक वेळ, प्रकृती आणि पैसा यावा  म्हणून हि सकारात्मकता .

आता मनात आले कि जाणे फारसे कठीण राहिले नाही असे असूनही मला काशी बघायला वयाची साठी गाठावीच लागली ! सेवानिवृत्ती जवळ आली आणि शेवटचा LTC घ्यायला हवा असे सहकारी म्हणू लागले. आधीचे बरेच LTC बुडले होते, तेंव्हा अखेरचा तरी घे असे घरचे पण म्हणू लागले. जायचे कुठे हा प्रश्ण होताच, तेंव्हा नुकत्याच उद्घाटन झालेल्या आयोध्येतल्या राम मंदिराची आठवण झाली, मार्च महिना उन्हाळ्याचा असला तरी उत्तर प्रदेशात उन्हाचा तितकासा कडाका नसणार असे हवामान दाखवत होते. मंदिरात भाविकांची गर्दी असली तरी व्यवस्थापन उत्तम असल्याच्या बातम्या होत्या, म्हणून आयोध्या, प्रयागराज आणि काशी असे जायचे नक्की केले. बरोबर कोणी सखे ,सोयरे आले तर यात्रा आणि सहल अ्शी दुहेरी मजा येईल अशा विचाराने बऱ्याच जणांना विचारुन बघितले पण प्रत्येकाला काही ना काही अडचणी होत्या. कुणाला मार्च एंडींग, कुणाची आधीच दुसरीकडे ट्रिप ठरलेली .एकुणात रामरायाने आणि काशी विश्वेश्वराने आम्हा दोघांनाच बोलावले असे समाधान मानुन तायारीला लागलो.

हाताशी वेळ फारसा नव्हता कारण  ठरलेच उशीरा , त्यातुन रजा मंजूर झाल्याखेरीज पुढचे नियोजन करणे नाही हे मागच्या अनुभवातुन शिकले होते, जानेवारीत एका मैत्रिणीबरोबर कान्हा जंगलाची ट्रिप ठरवली , रजा भरलेली होती मात्र आयत्या वेळी दिल्लीत केंद्र सरकारी कर्मचारी संपावर जाणार म्ह्णून सगळ्य़ांच्याच रजा कॅन्सल केल्या , माझी ट्रीप ,पैसे सगळेच वाया गेले आणि खूप मनःस्ताप झाला. रजा मंजूर झाल्यावर शोधाशोधीला सुरुवात केली. ऑफिसच्या कामातुन डोके वर निघत नव्हते आणि घरी गेल्यावर थकुन गेल्यावर लॅपटॉप उघडायच्या आधी डोळे मिटत होते. नवऱ्याचे नेटवर्क उपयोगी आले. त्यांच्या दोन मित्रांकडून दोन ट्रॅव्हल एजंट समजले. त्यांनी ’मिशन आयोध्या’ मनावर घेऊन रितसर दोघांकडून कोटेशन्स वगैरे घेतली, किंमती पेक्षा वेळेवर देणाऱ्याला झुकते माप दिले. जाण्यायेण्याची तिकीटे सरकारी नियमाप्रमाणे काढायची असतात, आयत्या वेळी ठरवल्यामुळे  Advance मिळणार नव्हता. त्यामुळॆ तिकिटे काढुन झाली, अनिवार्य सरकारी नियम व अटी पाळून तिकिटे  काढताना ,वेळेची सुविधा वगैरेचा विचारही करता येत नाही, तस्मात जाण्या येण्याच्या वेळा अवेळीच होत्या. जाताना पुण्याहून पहाटे सव्वाचारची फ्लाईट होती. 


शुक्रवारचा दिवस सुट्टी घेतेलेली असून दिवसभर मिटिंग्ज मधे गेला. online मिटींग करता करता आवराआवरी चालू होती. रात्री लवकर जेवणे आटोपुन नऊ साडेनऊला झोपलो रात्री एकचा गजर लावला होता, झोप लागेपर्य़ंत उठायची वेळ झालीच होती. Uber App वरुन गाडी मागवली. गॅसवर चालणारी गाडी असल्याने सामान कसेबसे गाडीत बसवुन आम्ही गाडीत बसलो, गाडी अत्यंत जुनी, खडखड आवाज करणारी, एसी बंद ,ड्रायव्हर नवशिका . रस्त्यातल्या प्रत्येक खड्ड्य़ाची जाणीव देत प्रवास चालू झाला. प्रत्येक रोड डिव्हायडर वर गाडी तीन ताड उडे, आणि त्यावर ड्रायव्हरचे सॉरीचे गाणे यामुळे उरली सुरली झोप पार उडाली. गाडी येरवड्याला लागल्यावर जेल रोडला न जाता कल्याणी नगर जाऊ लागल्यावर नवऱ्याचा संयम संपला ! ड्रायव्हरवर आरडाओरडा त्याचा माफिनामा , प्रवासाची अशी सुरुवात कुठे घेऊन जाणार या शंकेने माझी कासाविशी , यातुन शेवटी एकदाचे विमानतळावर पोचलो.

वेब चेक -इन केलेले होते.तिकडे नव्यानेच फोटो वगैरे घेऊन पाठवत होते. दोन्ही सुटकेस चेक-इन करुन छोट्या हॅंडबॅग्स घेऊन सिक्युरिटी कडे कूच केले. रमेशकडच्या हॅंडबॅगेमधे स्विसचाकू निघाला, तो नेता येणार नाही असे पोलींसांनी सांगितले. त्या चाकुने लोणी देखील कापले जाईल का अशी शंका येत होती.पण त्यांनी तो फळे कापायला लागला तर असावा म्हणून घेतला असावा आणि घोकुनही तो चेक-इन मधे ठेवायचा राहिला होता. चाकू टाकुन जाणे त्यांना जिवावर आले होते. त्याच्या नाजुक रुपाची भुरळ मलाही पडली,पण चुक झालीय त्याची किंमत मोजा आणि सोडून जाऊया असे मी म्हणत होते, मात्र त्या चाकुच्या विरहाने पुढची सगळी ट्रीप दुःखद होणार हे मला दिसत होते. पोलीसांना बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर ते म्हणाले, "चेक-इन बॅगेत नेऊन ठेवा". सुदैवाने बराच वेळ हाताशी होता. रमेश पुन्हा चाकु घेऊन चेक-इन काऊंटर कडे धावले. मी खुर्चीवर सामान सांभाळत बसले.पंधरा वीस मिनिंटांनी विजयी मुद्रेने ते परत आले. आमच्या बॅग्स केंव्हाच पट्ट्य़ावरुन गेल्या होत्या, पण एका सद्गृहस्थांनी रमेशच्या विनंतीला मान देऊन स्वत्ःच्या बॅगेत तो मौल्यवान चाकु ठेऊन घेतला.लखनौच्या विमानतळावर त्यांनी त्यांच्या बॅगेतुन काढुन आम्हाला सुपुर्द केला.त्या नंतर घरी येईपर्यंत त्याचे दर्शन घ्यावे लागले नाही .

लखनौ ला पोचलो तेंव्हा सहा वाजायला आले होते, सामान ताब्यात घेऊन बाहेर पडलो. लखनौ पासुन एक टॅक्सी बुक केलेली होती .ड्रायव्हर आलेला होता. गाडीतुन जाताना त्याने त्याच्या तिथल्या साथिदाराला फोन केला व त्या माणसाने गुगल मॅप्सचे काम चोख बजावत आम्हाला हॉटेलसमोर उभे केले.हॉटेल अगदी गावाच्या मध्यातच,आपल्याकडील मंडईत असावे तसे. त्यात त्यामधे नूतनीकरणाचे काम चालू होते. एकूण हॉटेल यथातथाच होते. आम्ही अंघोळ आदि आन्हिने उरकुन नाष्ता केला आणि लखनौ दर्शनासाठी बाहेर पडलो. ब्रिटिश रेसिडन्सी हे आमचे पहिले स्थान होते. आमच्या ड्रायव्हरचा साथिदार गाईड म्हणुन आमच्या दिमतीला होता.  १८५७ च्या उठावातील एक म्युझियम होते आणि त्या काळातील इमारती बघताना नवल वाटले, वाळू,सिमेंट असे साहित्य न वापरता माती,चुना,चणाडाळीचे पीठ,गुळ असे साहित्य वापरुन केलेल्या दणकट इमारती , संसाधनांइतकीच कामाबद्दलच्या निष्ठा इमारती मजबुत करत असतील का असे वाटत राहिले. १८५७ च्या उठावात झालेल्या हल्ल्यातील बंदुकांच्या निशाण्या मिरवत असलेल्या इमारती ,त्यावेळी बलिदान केलेल्या देशप्रेमींची आठवण जागवत होत्या. ब्रिटीश रेसिडन्सीचे आवार भरपुर झाडीने व स्वच्छ परिसराने सुंदर वाट्ते. रुमी गेट हे नबाब कालीन लखनौचे प्रवेशद्वार आता फोटो पुरतेच राहिले आहे. द्वार सुरेख आहे पण आता तेच प्रवेशद्वार राहिलेले नाही


बडा इमामबाडा अर्थात भुलभुलैय्या हे दुसरे प्रेक्षणीय स्थान होते.नाबाला साजेशीच अतीशय भव्य व देखणी वास्तु.आत ठराविक गाईड कडूनच माहिती घेणॆ बंधनकारक होते. जास्तीतजास्त लोकांचा समुह मिळवणे हे गाईडचे ध्येय आणि आपल्याला सगळे नीट समजावे म्हणून ग्रुप लहान असावा हि पर्यटकांची इच्छा , यामधुन मार्ग निघाला आणि एका गाईड्ने आमचा ताबा घेतला. (नबांबांची नामावळी मी विसरले वयाचा परीणाम आणि ते तपशील सांगायला गुगल समर्थ आहेच ). मध्ये एकही खांब नसलेला,अशीयातील सर्वात मोठा दिवाणखाना या महालात आहे असे गाईड सांगत होता. गालीचे व झुंबरे असताना त्याचे रुप किती देखणॆ असेल याची कल्पना येत होती, आजही झुंबरे आहेत पण गालीचे दयनीय झालेत. भुलभुलैय्या मात्र कमाल वास्तुरचना आहे. एका जिन्यातुन वर गेल्यावर चार चार रस्ते दिसतात आणि त्यातला एकच योग्य ठिकाणी नेतो. बाहेर कडक उन असूनही आत  गारवा होता. सिमेंट ,वाळू न वापरता केलेल्या बांधकामाची ती कमाल होती.गच्ची वरुन लखनौ शहराचे दर्शन घडते.या महालाचा आर्किटेक्ट इराणी इसम होता , त्याने नबाबाला माझी कबर तुमच्या कबरीशेजारी असावी एवढीच मागणी केली. मला रायगडाचे बांधकाम करणारे हिरोजी इंदुलकर आठवले.त्यांनी देखील आपल्या नावाची एक पायरी असावी एवढीच मागणी शिवाजी महाराजांना केली होती. ’मरावे परी कीर्ति रुपे उरावे’ एवढी अपेक्षा बाळगणारे हे गुणी व इमानी सेवक ! मनोमन त्यांचे वंदन

बडा इमामबाडा जवळ एक पायऱ्यांची विहिर ही फार सुंदर आहे. वरच्या मजल्यावरुन महालाच्या बाहेरच्या रस्त्यावरील प्रत्येक वस्तु, व्यक्तीचे पाण्यात प्रतिबिंब दिसते आणि रस्त्यावरुन आतील काही दिसत नाही. कॅमेरे वगैरे काही नसतानाच्या काळात सुरक्षितेसाठी केलेला शास्त्रीय नियमांचा वापर फार आवडला.


सगळे बघुन बाहेर आलो तोवर आडीच वाजले असावेत. छोटा इमामबाडा, हुसैन क्लॉक,सतखंडा गाडीतुन बघितले आणि पोटपुजेसाठी निघालो,आम्ही शाकाहारी असल्याने लखनौच्या स्वादिष्ट मांसाहारी खाण्य़ाचा मजा घेणॆ शक्य नसले तरी तेथील चटपटे चाट चे options खाण्यासाठी आमच्या गाईडने योग्य ठिकाणी आम्हाला नेले. तेथे बास्केट चाट आणि लस्सी पिऊन दिल खुष झाला ! नंतर थोडीफार खरेदी करुन हॉटेलवर गेलो. थोडावेळ आराम करुन संध्याकाळी गोमती रिव्हर फ्रंट बघायला बाहेर पडलो. आमच्या गाईडला त्याच दिवशी बाबासाहेब आंबेडकर गार्ड्न, यु.पी दर्शन वगैरे राहिलेली प्रेक्षणीय स्थळे बघावी असे वाटत होते,त्याला दुसऱ्या दिवशी जमणार नव्हते म्हणून त्याला सगळे काम त्याच दिवशी संपवायचे होते. पण आदल्या रात्रीचे जागरण आणि सकाळचे चालणे याने मी दमले होते, शिवाय दुसरा दिवस आमच्या हातात होता. तेंव्हा गोमती रिव्हर फ्रंट बघुन परतायचे ठरवले. जाताना उत्तर प्रदेशाची नवी विधानसभा इमारत बघितली. हा लखनौ चा भाग एकदम स्वच्छ ,सुंदर आहे. गोमती रिव्हर फ्रंट , साबरमती नदीच्या धर्तीवर केले आहे. दहा रु.तिकीट काढल्यावर  आमचा गाईड म्हणू लागला,’आज लाईट्स नाहीत, जायचे की नको कारण बऱ्याच पायऱ्या उतरायच्या होत्या आणि मी बाकीच्या ठिकाणी जायला नको म्हणाले होते. पण आम्ही उतरलो, लेझर लाईटस मुळे खूप छान दिसते असे गाईड सांगत होता.मात्र चालायला रस्ता छान होता, फुलांचे ताटवे, हिरवळ, बसायला बाक सगळे सुरेख होते,नदीला पाणी पण बरेच होते. आपल्या मुळा,मुठा नद्यांच्या तुलनेत छानच होते सगळे. तेथे चना जोर गरम विकणाऱ्या दोघांनी आधीच्या मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीत कसे रोज लाईट्स असत आता कसे सगळे वाईट आहे इइ. सांगु लागले, आमचा गाईड ’योगी भक्त’असल्याने तो चिडला,तेथेच दोघांमधे भांडणे सुरु झाली. आम्ही आमच्या गाईडला निघायला लवले. पायऱ्या चढुन आल्यावर रमेशने तिकीट विक्रेत्याचे लाईट्स नसताना पैसे घेणे कसे चुकीचे आहे यावर बौध्दिक घ्यायला सुरुवात केले. तो हि ," हे बघा आता दुरुस्तीला हि माणासे आली आहेत, होईलच दुरुस्ती एवढ्यात वगैरे सांगायला लागला" त्या सगळ्या थापाच होत्या, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी तिकडून गेलो तरी तिकडे अंधारच होता !

दुसऱ्या दिवशी लखनौ विद्यापीठ बघितले रविवार असल्याने सगळ्या इमारतीत सामसूम होती आणि सगळे बंद होते, रॅंग्लर परांजपे या विद्यापीठात कुलगुरु होते त्याबद्दलच्या शकुंतलाबाई परांजप्यांनी आठवणी वाचल्यामुळे मला ती वास्तु बघण्याची उत्सुकता होती. मक्खन मलाई हि लखनौची खासियत असल्याचे लेकीने सांगितले होते , हा पदार्थ एकदम गावात मिळतो, आपल्याकडच्या बोहरी आळी सारख्या गजबजाट व लहान लहान गल्लीतुन जायला आमचा टॅक्सीवाला कुरकुरत होता पण आम्ही त्याला न्यायलाच लावले, रस्त्यावरच जागोजागी मक्खन मलाई च्या गाड्या होत्या. दोन गाड्यांवर आम्ही मक्खन मलई घेऊन खाल्ली, खरोखरीच तोंडात विरघळणारा हा पदार्थ लाज़वाब असतो. उन्हाची काहिली विसरवणारी आणि जीव थंडावणारी मलाई ! त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि यु.पी.दर्शन अशी दोन ठिकाणे बघितली. यु.पी दर्शन हि नुकतीच उद्घाटन झालेली वास्तु आहे. भरपूर मोठ्या जागेत उत्तर प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांची मॉडेल्स केलेली आहेत. झांसी पासून, ताजमहाल, आयोध्या,मथुरा ,काशीविश्वेश्वर अशी अनेक स्थळांची माहिती व सुबक अशा प्र्तीकॄती केलेल्या आहेत. मला आवडले ,बरीच लहान मुले आलेली होती, आपल्या राज्यात काय काय बघण्यासारखे आहे याची माहिती त्यांना लहान वयात होणे किती चांगले. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ही प्रचंड मोठ्या जागेवर उभारलेली वास्तु आहे.ग्रानाईट मुळे अतिशय स्वच्छ आणि चकचकित ! संध्याकाळच्या थंड हवेत बरे वाटात होते,मात्र दुपारच्या उन्हात चांगलेच तापत असणार. मयसभेची आठवण व्हावी अशा रचनेत फार जपून पाय टाकावे लागत होते कारण गुळगुळीत फरशीवरुन पाय घसरायची भिती ! बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा आहे,मात्र मायावतींचे चार चार पुतळे आहेत. सत्ता हातात असताना काय काय करता येते हे पाहुन मन थक्क झाले खरोखरी ! दक्षिणेत जयललिता चे मंदिर आणि इकडे मायावतींचे पुतळे !आसेतुहिमाचल व्यक्तिपुजा .


सोमवारी पहाटे लवकर उठुन आम्ही आयोध्येला जायला निघालो. रस्ता सुंदर असल्याने दहा,साडेदहा वाजता आयोध्येजवळ पोचलो देखील. वेशीजवळच कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. सगळ्या खाजगी गाड्या एका ठराविक ठिकाणी पार्किंगमधे ठेवाव्या लागतात, तेथुन इ-रिक्शा करुन गावात जावे लागते. तेथुन बरिच घासाघिस करुन एक रिक्शा मिळवली आणि हॉटेलवाल्याला फोन करुन रिक्षावाल्याला पत्ता समजावला. आमचा ड्रायव्हर आता आम्हाला दुसऱ्या दिवशीच भेटणार होता. हायवेवर दुतर्फा रामायणातील प्रसंग सुंदर चित्रित केलेले आहेत.मात्र गावात अजुन सुधारणा चालू आहेत, ’सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी ’ आठवताना ,लहान,लहान गल्ल्या ,उघडी गटारे मनाला यातना करत होती. लहान गल्लीतून हॉटेलपाशी पोचलो, सामान ठेऊन फ्रेश होई पर्यंत बारा वाजायला आले होते. राममंदिराकडे जायला निघालो. कोपऱ्यावर रिक्षा उभ्या होत्या, त्यातल्या एकाला विचारले तो म्हणाला,’ तुम्हाला चालतच जावे लागेल,गर्दी आहे, रिक्षा जाऊ शकत नाही’ आम्ही चालायला सुरुवात केली. पन्नास मीटर गेल्यावर मुख्य रस्ता लागला. भक्तांचे लोंढेच्या लोंढे रस्त्यावरुन चालले होते, आम्ही गर्दीतुन जाऊ लागलो, वाटेत हनुमान गढी लागली, तेथे प्रचंड गर्दी होती, आधी रामारायाचेच दर्शन घ्यायचे असे ठरवुन पुढे निघालो. मोबाईल वगैरे सामान ठेवायला लॉकर्स होते,तेथे एका पर्समधे दोन्ही मोबाईल्स ठेऊन टोकन घेतले, चपल बूट ठेवायला हि चांगली व्यवस्था होती, तेथे पादत्राणे ठेऊन पुढे गेलो. सिक्युरिटी मधुन बाहेर आलो. मंदिर आता दिसू लागले होते.एकावेळी चार रांगातुन भक्तांना सोडले जात होते.कुठेही धक्काबुक्की नव्हती,पोलीस होते, त्यांना लाठी वा कठोर वाणीचा वापर करावा लाघत नव्हती. आम्हीआत सभामंडपातुन पुढे,पुढे जात होती.आणि अचानक प्रसाद आणि आरतीची वेळ झाली म्हणून रामलल्लांना पडाद्याआड केले.आम्हाला आत शांत थांबा असे पोलीस सांगत होते.बऱ्याच जणांनी खाली बसून घेतले. एका स्त्री-पोलिसने मला स्वतःची खुर्ची बसायला दिली.शांतपणे देवळचे कोरीवकाम बघायला मिळत होते,मी मनातल्या मनात रामरायाचे आभार मानत होते. एरवी इतका वेळ मंदिरात थांबायचे ठरवले असते तरी शक्यच नव्हते. पंधरा -वीस मिनिटांनी पडदा दूर झाला आणि २१ जानेवारीला टि.व्ही वर बघितलेली रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन झाले.रांगेतून पुढे जाताना नजर त्या मूर्तीवरच खिळून होती !.समोर जेमेतेम २-३ मिनिटेच थांबता आले.पण तेवढ्या दर्शनानेही मन भरुन गेले होते ! मंदिरातुन बाहेर आलो, प्रसाद घेतला आणि देणगी द्यायला काऊंटर वर गेलो. तेथे रमेशच्या कॉलेजचे माजी विद्यार्थी श्री.आफळे यांच्या पत्नी भेटल्या , त्यांनी श्री आफळ्यांना फोन करुन बोलावले. त्यांच्याकडून हे दांपत्य गेले चार वर्षे आयोध्येत असल्याचे समजले. श्री.आफळे हे मंदिर निर्माण कार्यातील प्रमुख व्यक्ती ! एवढे मोठे काम करणारी व्यक्ती भेटणार आणि ते पुणेकर असल्याचे समजल्यावर फार अभिमान वाटला. दहा पंधरा मिनिटांत आफळे साहेब आले. ते खुपच बिझी असतात, अजून अकरा इमारती, रस्ते,पाणी वगैरे बरीच कामे राहिली आहेत,मंदिराची रचना करताना कोणत्या बाबींचा विचार केला. रांगामधे जास्तवेळ उभे रहावे लागू नये याकरीता विज्ञानाचा वापर केलेला होता. दररोज १ ते दिड लाख भाविक येतात तरिही कोणालाच फार काळ रांगेत तिष्ठावे लागत नाही याचा अनुभव आम्ही पण घेतला होता.’मंदिरातील मूर्ती थोडी उंचावर आहे, पांढऱ्या संगमरवरी पार्श्वभागावर काळी मुर्ती व भरपूर उजेड यामुळे सभामंड्पात शिरल्यापासुन मूर्ती दिसत राहते त्यामुळे मूर्तीजवळ जास्त वेळ थांबता आले तरी भक्तांचा हिरमोड होत नाही.’ आफळे सर सांगत होते. मंदिराच्या बांधकाम करण्यापूर्वी त्यांनी अनेक देवस्थानांचा अभ्यास कसा किती केला,त्यांतील लोकांचे रांगामधे जास्त वेळ थांबणे त्यामागची कारणे याचा बारकाईने विचार व अभ्यास करुन या मंदिराची रचना केली आहे. आयोध्येचे मंदिर व्हावे याकरीता १९९० व १९९२  कारसेवकांनी कि्ती हालआपेष्टा सोसल्या, किती जणांना प्राणांचे मोलही द्यावे लागले याच्या बातम्या अप्रसिध्द असल्या तरी त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही हे बघुन मन अधिकच भरुन आले ! . आफळे साहेबांना बरीच कामे असूनही त्यांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि थोडक्या वेळात बरीच महिती दिली. दिवस अगदी सार्थकी लागला ! 

 मोबाईल ताब्यात घेतले,पादत्राणेही घेतली ,दोन वाजुन गेले होते. ऊन बरेच होते , तरी रस्ते माणसांनी फुलुन गेलेले होते. हॉटेल्स मध्येही तोबा गर्दी. एका लहान हॉटेलमधे कचोरी,सामोसा खाऊन पोट्पुजा केली आणि इतर देवळे बघायला निघालो. दशरथ महाल,कनक महाल हि पूर्वीची मंदिरे आहेत.दक्षिणेतील मंदिरांसारखे इकडे मंदिराच्या बाहेर कोरीवकाम वगैरे नव्हते. संध्याकाळी सरयू नदीची आरती बघायला इ-रीक्षा करुन निघालो,एक बंगाली जोडपे आम्हाला भेटले. त्यांची मुलगी पेंटींग्ज व चित्रे काढायला गेले अनेक महिने आयोध्येत आहे. तिला भेटायला व राम मंदिर बघायला ते उभयता आले होते. जाताना वाटॆत अनेक लहान मोठी देवळॆ दिसत होती. रस्ते,खूपच लहान, उघडी गटारे, असंख्य माकडे ,एकुण सुधारणेला खुपच वाव आहे.  नदीपाशी रिक्षातुन उतरलो.सूर्यास्ताला व आरतीला अवकाश होता, म्हणून नदीतून बोटीतुन चक्कर मारायचे ठरविले. बोटीत बसायला ग्रुप असेल तर अडाचण नसते, दोघांसाठी ते पूर्ण बॊटीचे भाडे मागतात व तेथील कोणाबरोबर आपल्याला शेअर करु देत नाहीत ! मात्र सुदैवाने आम्हाला एक पंजाबी कुटुंब भेटले ते चौघे होते व आम्ही सहा जणांनी एक बोट केली. नदीचे पात्र विशाल आहे आणि मार्च महिना असून पाणी पुष्कळ होते.पाणी स्वच्छ ही होते, प्लॅस्टीक, फुले असा कचरा नव्हता. पश्चिमेचा थंड वारा ,मावळता दिनमणी त्याच्या लाल प्रतिबिंबाने नदीच्या पाण्याला आलेलीआभा अत्यंत आल्हाददायक वाटत होते. दूरवर नदीवर बांधलेले अधुनिक पूल आयोध्येच्या कायापालटाची साक्ष देत होते. अर्धा पाऊण तास फिरुन येईपर्यंत  नदीच्या घाटावर आरतीसाठी गर्दी होऊ लागली होती.जागा पकडली , आरती सुरु झाली. गंगा नदीची आरती ह्र्षीकेशला बघितली होती. नदीला देवता मानुन तिची आरती करायची हि कल्पना खूप सुंदर आहे. कॄतज्ञता हा आपल्या संस्कॄतीचा गाभा आहे, मात्र आता आपल्याकडे या साऱ्या गोष्टी कर्मकांडासारख्या होतात.नदीचे पावित्र्य आपण ठेवत नाही, कपडे धुणे,अंघोळी या किरकोळ गोष्टी , नदीत मैल्याच्या पाण्य़ापासून कारखान्यातील विषारी द्रव्ये सोडण्यापर्यंत आपली मजल गेलीयं. मनात असे विचार चालू होते. आरती संपली नदीला वंदन करुन निघालॊ. वरच्या बाजुला अतिशय देखणा लेझर शो चालू झालेला होता. पाण्यामधे नाना रंगाची उधळण चालू होती आणि त्या पार्श्वभूमीवर मोठ्या पडद्यावर रामायण चालू होते. जरावेळ तेथे थांबलो पण दिवसभराच्या दगदगीने शरीर दमल्याची जाणीव हॊऊ लागली होती. रीक्षा करुन माघारी निघालॊ ,हॉटेलवर पोचायला आठ साठेआठ वाजुन गेले. जेवण करुन झोपलो.दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रयागराजला निघायचे होते.


आयोध्या ते प्रयागराज अंतर १६० कि.मी च्या आसपास आहे, रस्ता लहान असल्यामुळे तीन तासाहुन जास्त वेळ लागला, हॉटेलवर पोचेपर्यंत अकरा वाजुन गेले होते. सामान रुमवर ठेउन बाहेर पडलो. नेहरु कुटुंबाचा  ’आनंदवन” बंगला बघायला गेलो. प्रचंड मोठ्या आवारात प्रासादवत वास्तु पाहताक्षणी मनात भरते. भरपूर झाडी, सुंदर हिरवळ आणि गुलाब व विलायती फुलांचे ताटवे,फारच सुंदर. तिकीट व पोलिस पहाऱ्याने वास्तुचे सौंदर्य व स्वच्छता टिकलीय. मोतीलाल नेहरुंपासुन ,इंदिरा गांधींपर्यंत सर्वांच्या वस्तु,पुस्तके जतन केलेली आहेत.इंदिरा गांधीचे बालपाणापासून, तारुण्यातील,राजीव,संजय या मुलांचे बालपणातील, इंदिरा गांधींचे पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या प्रसंगांचे,विविध ठिकाणी भाषणे देतानाचे असंख्य फोटॊ आहेत.बघताना कसा वेळ गेला समजले नाही ! 

तिकडुन खुस्रो बाग बघायला गेलो. शहाजहानच्या या मोठ्या भावाला त्याने कपटाने मारले, त्याची ,त्याच्या बेगमची व त्याच्य़ा बहिणीची कबर  असलेली हि प्रचंड मोठी बाग आहे. तेथे सरकारने सध्या शेकडो आंब्याची व लिचीची झाडॆ लावली आहेत. कुस्त्रो बाग हि १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे लष्करी ठाणे असल्याची पाटी वाचली आणि त्या वास्तुबद्दल  आदर निर्माण झाला !.

दुपारचे उन चटचटत होते , त्रिवेणी संगमावर पोचलो. बऱ्याच बोटी होत्या , बोटवाले मनाला येईल तेवढे पैसे मागत होते,आठ दहा जणांच्या ग्रुपला ३०००रु द्यायला जड वाटत नाही,पण आम्ही दोघेच होतो आणि कोणाबरोबर एकत्र बोट कराय़ची तर बोटवाले तसे करु देत नव्हते, आमचा ड्रायव्हर , तुम्ही पैसे देऊन टाका म्हणत होता,पण आम्हाला दोघांनाही या साऱ्या अरेरावीचा फार राग आला, मी तर तेथुनच नदीला नमस्कार करुन माघारी निघाले,तेंव्हा एक बोटवाला आला व म्हणाला,"तुम्ही किती पैसे देणार?" ,मी म्हणाले," दहा जणांच्या ग्रुपला तुम्ही ३०००रु घेता, मी माणशी ३०० रु देते, तुम्ही अजुन आठ लोकांना घ्या,माझी हरकत नाही" तो आम्हा दोघांना ६०० रु.घेऊन जायला तयार झाला. त्याने ठेकेदार कसे त्रास देतात वगैरे सांगायला सुरुवात केली , म्हणजे एवढया पैशातले त्या बोट चालवणाऱ्यांना कमीच मिळतात आणि ठेकेदार माजतात. उन्हाळा सुरु झालातरी पाणी बरेच होते, आम्ही यमुना नदीपाशी बोटीत बसलो होतो, पुढे गेल्यावर गंगेचा प्रवाह नावाड्य़ाने दाखवला.सरस्वती गुप्त आहे. आम्हाला संगामात स्नान करायचे नव्हते त्यामुळे बोटीतुन फिरुन आलो आणि चंद्र्शेखर बाग, भारद्वाज बाग बघुन रुमवर पोचलो.

प्रयागराज अर्थात अलाहाबाद शहर मला आवडले.वाहने कमी असल्यामुळे असेल पण रस्ते मोठे वाटले आणि भरपूर झाडी, बागा यामुळे शहराला एक प्रकारचा घरंदाज बाज आहे. त्रिवेणी संगमाच्या किनारीअसल्याने पाण्याचे सौख्यही आहेच. कुंभमेळ्याच्या वेळी येणाऱ्या सांधुंच्या वास्तव्याने शहर पुनित होत असेल. 

दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे आम्ही चित्रकुटला निघालॊ. चित्रकूट पर्वतावर व त्या परिसरात राम,लक्ष्मण,सीता दहा वर्षे राहिल्याचे वाचले असल्याने तिकडे फार उत्सुकतेने व आवडीने मी गेले, मात्र माझा भ्रमनिरास झाला !

चित्रकुट हे शहर उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशाच्या सीमारेषेवर आहे.कदाचित मध्यप्रदेशाकडील भाग निसर्गरम्य असेल,कदाचित आम्ही गेलो तोवर उन्हाळ्यास सुरुवात झाली होती ,पण एकंदरीत घनदाट झाडी वगैरे काहीच नव्हते,पर्वत म्हणावे असे डोंगर नव्हते. मंदाकिनी नदीचे पात्रही बेताचेच, दोन्ही तीरावर मोठमोठे घाट आणि पलिकडच्या घाटावर मंदिरे, त्या तीरावर जायला बोटी आणि बॊटीतुन जायचे तर त्यांनी मुहमांगा दाम मागायचा आणि आपण आडल्या हरी सारखे त्यांची मनमानी सोसत ते द्यायचे. पलीकडच्या तीरावर ,भरत रामाला जेथे भेटला व त्यांच्या पादुक नेल्या ती जागा व तेथे देऊळ आहे, तुलसीदासाला रामाने याच ठिकाणी दर्शन दिले ते हि मंदिर आहे, सीतेचे मंदिर, रामाने वडीलांचे श्राध्द केले ती जागा अशा अनेक जागा त्या नावाड्याने उत्साहाने दाखवल्या. पण नदीचे अस्वच्छ पात्र, त्यात अंघोळी करणारे, प्लॅस्टीकसकट सगळा कचरा त्यात टाकणारे भाविक बघुन मन उद्विग्न झाले !  स्फटिकशीला ,अरुंधती आश्रम, श्रीराम व सीता कुंड अशी अनेक स्थळे बघितली, सगळीकडे भरपूर गर्दी होती . गुप्त गोदावरी व श्रीराम व सीता कुंड हा वास्तविक निसर्गाचा चमत्कार आहे. बऱ्याच पायऱ्या चढुन गेल्यावर , एका अगदी लहान दारातुन एकावेळी एक माणुस उतरु शकेल एवढ्या लहान जागेतुन आठदहा पायऱ्या उतरले कि आत गुहा होती, आत सीता कुंड आहे.रामकुंडासाठी पण असेच खोल जावे लागते आणि आत दोन्ही बाजुनी डोंगराच्या कपारी व मधे नदिचा प्रवाह, खुप छान आहे,पण गर्दी,धक्काबुक्कीने व मातीच्या पायांनी पाणी घाण झाल्याने सौंदर्य जाणवत नव्हते हे खरे. 

                  प्रयागराजला पोचायला रात्रीचे आठ वाजले. खूप उन लागल्याने खुप दमल्यासारखे वाटत होते. भुकही गेली होती. गरम पाण्याने अंघोळ करुन मी झोपुन गेले. पहाटे उठल्यावर ताजेतवाने वाटु लागले. सकाळी नाश्ता करुन काशीला जायला निघालो. सुरुवातीचा रस्त्याचे काम चाललेले होते, पण नंतर एकदम चारपदरी सुंदर रस्ता आहे. सारनाथला पोचलो तेंव्हा अकरा वाजले होते, सुदैवाने आकाश ढगाळ होते. ड्रायव्हरला घरी जायचे होते, तो म्हणू लागला ,’तुम्ही आता आराम करा, उद्या सारनाथ बघा’ आम्हाला दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंतच वेळ होता, त्यामुळे सारनाथ बघुनच आम्ही हॉटेलवर जायचे ठरवले. एक चांगला गाईड मिळाला, त्याने खुप छान माहिती दिली. थायलंड सरकारच्या सहाय्याने बनवलेली प्रचंड उंच बुध्दाची मूर्ती , मंदिर सगळे खुप सुंदर आहे.परीसरही खुप सुंदर आणि शांत आहे.  भारताची राजमुद्रा असलेल्या चार सिंहाची मूर्ती बघायची खुप उत्सुकता होती , शिवाय सारनाथच्या स्तुपाबद्दलही बरेच ऐकुन होते. ते सारे दुसऱ्या भागात आहे. पुरातत्व विभागाला उत्खननात मिळालेल्या वस्तुंचे देखणे संग्रहालय अवघ्या दहा रुपये तिकिटात बघता येते. तेथेच  सुप्रसिध्द चार सिंहाची राजमुद्रा आहे. उत्खनानात मिळालेल्या अनेक मूर्ती, मंदिराचे अवशेष भग्न स्वरुपात आहेत.आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या वस्तु बघताना मला मात्र ’मातीची दर्पोक्ती’ आठवत होती  !  

  पाहून हासु ये तुमचे ताजमहाल

अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ?

शेकडो ताजही जिथे शोभले काल

ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी

मातीवर चढणे एक नवा थर अंती !

          सारनाथचा स्तुप हि मात्र एक अत्यंत विशाल आणि भव्य वास्तु आहे ! त्याला प्रदक्षिणा घालुन आम्ही बाहेर आलो. एव्हाना आडीच वाजले होते, आमचे हॉटेल सारनाथ जवळच होते.रुमवर गेलो आणि संध्याकाळी गंगेची आरती बघायला जाऊ या असे सांगुन ड्रायव्हर गेला.आम्हाला भुक नव्हती , फळे खाल्ली जरावेळ आराम केला पाच वाजता गंगेच्या आरतीसाठी निघालो. अंतर फारतर १० किमी असेल पण आठ किमी. जायला तास लागला. रस्त्यात  खचाखच गर्दी होती.  घाटापसून दोन किमी लांब पार्कींग आहे, ड्रायव्हर च्या मागुन चालताना माझी दमछाक झाली , त्या पठ्ठ्याकडे मोबाईल नव्हता त्यामुळे गर्दीत चुकामुक परवडारी नव्हती. साडॆसहाला आरती सुरु होते आम्ही जेमेतेम पोचलो, नदीत बोटींची खेचाखेच होती . एकाबोटीत आम्ही चढलो, ड्रायव्हरचे बोटवाल्याशी बोलणे झाले होते. बोट निघाली आणि त्या अनेक बोटींच्या गर्दीत त्या नावाड्याने आमची बोट घुसवुन एका ठिकाणी थांबवली . हृषिकेशला आम्ही  गंगेची आरती २०१६ मधे पाहिली होती , तिकडचे वातावरण जास्त आवडले.इथे असलेल्या गर्दीने प्रसन्नता जाणवत नाही. नदीचे पात्र विशाल आहे. तीरावरील घाट दिव्यांनी उजळले होते. पाच ठिकाणी पुरोहित उभे राहुन आरती करत होते . आरती झाल्यावर नावाड्याने  नावेतुन आम्हाला गंगेवरील घाट दाखवले. तुलसी घाट, सिंदिया घाट, मनकर्णिका घाट असे अनेक घाट ! तुलनेने हे घाट आता खूप स्वच्छ आहेत . एक तास कसा गेला समजलेच नाही. काठावर येऊन परत गाडीपर्यंत पोचताना पुन्हा तीच जिकिर,तीच धडपड ! हॉटेलवर पोचायला नऊ वाजुन गेले होते, पोटात भुकेने रान कडाडले होते, जाताना आम्ही जेवायला येणार असे सांगुन ठेवले होते.पण हॉटेलच्या डायनिंगहॉलची सफाई चालली होती आणि तिथल्या खानसाम्यांना आमच्या जेवणाबद्दल काहीच कल्पना नव्हती हॉटेलमधे आमच्याखेरीज कोणीच गेस्ट नव्हते त्यामुळे ते निवांत होते, त्यांनी शांतपणे ऑर्डर घेतल्यावर बनवुन देतो असं म्हटल्यावर रमेशचा पारा चढला, त्यांनी आवाज चढवला, मॅनेजर आला , त्याचाही तोल सुटला. मी हताश पणे बसुन होते, पण खानसामा शहाणा निघाला, तो तेथुन निघाला आणि अक्षरशः दहा पंधरा मिनिटात , दोन भाज्या, दाल आणि दोन गरम गरम फुलके बनवुन घेऊन आला . दुसऱ्या वेटरने चटचट वाढले. आम्ही जेवायला सुरुवात केली. ताजे गरम अन्आणि पोटात भुक ! अन्न हे पूर्णब्रह्म का म्हणतात ते कळलं.  चार गरम घास पोटात गेल्यावर रमेशचा राग थंड झाला. वेटर त्यांच्यांशी बोलत राहिला आणि दुसरा एक जण गरम फुलके आणत होता ! दोन फुलके खाल्ल्यावर मी भात मागितला, तो ही आलाच पाच मिनिटात, जिरा राईस आणि दाल फ्राय  खुप चविष्ट होते. त्या बरोबरच मलईदार दही पण होते . जेवुन आम्ही त्या अन्नदात्यांना सुखीभव म्हणून रुमवर गेलो. आम्हाला दुसऱ्या दिवशी पहाटे पाचला निघायचे होते. सहा वाजता  काशी विश्वनाथाचे दर्शन घ्यायचे होते. 

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे काशी हे तिर्थक्षेत्र . सर्वात पुरातन शहर आणि बनारस, वाराणासी आणि काशी अशी तीन बिरुदे लाभलेले कदाचित एकमेव ! काशी हे सर्वात प्राचीन नाव आहे, संस्कृत धातु ’कास’ म्हणजे चमकणे , त्या मुळेच विश्वनाथाला काशी विश्वनाथ, तेजस्वी विश्वनाथ असे म्हणत असावेत .  वाराणासी हे नाव गंगॆच्या वरुणा आणि आसि यांच्या संगमावर हे शहर असल्याने त्याचे नाव वाराणासी पडले. इथे गौतम बुध्दाला ज्ञानप्राप्ती होऊन सारनाथ येथे त्यांनी आपले पहिले प्रवचन दिले.बनारस नावाची व्युत्पत्ती मात्र समजु शकली नाही ! 

पहाटे पाच वाजता अंघोळी आटोपुन आम्ही निघलो, आम्हाला VIP दर्शन घडवायची हमी आमच्या ट्रॅव्हल एजंट्ने एका व्यक्तीचा नंबर देत दिली होती, त्यांच्यांशी आदल्या दिवसापासुन संपर्क चालुच होता. सकाळी साडेपाचला गाडी लावुन त्या माणासाची वाट बघत बसलो. पावणे सहाला तो आला. त्याच्या ताब्यात आम्हाला देऊन ड्रायव्हर गुप्त झाला. त्याने आम्हाला एका टपरीवजा दुकानात नेऊन तेथे मोबाईल,चपला ई . लॉकर मधे ठेवायला सांगितले, लॉकरला भाडॆ नव्हते, पण तेथे प्रसाद विकत घेणॆ बंधनकारक होते, कमीतकमी साडेतिनशे रुपयाचा प्रसाद घेतला. VIP दर्शनाला ६०० रु घेतले , त्याचे रितसर तिकिट मिळेल असे सांगितले. तिकीट घेउन एकजण आला आणि त्याच्याबरोबर एक तरुण मुलगा होता , त्याच्या गळ्यात आयकार्ड सारखे काहीतरी होते, धोतर आणि भगवा झब्बा घातलेला तो मुलगा आम्हाला घेऊन निघाला, अर्धा पाऊण कि.मी चालल्यावर मंदिर आले,आत सिक्युरीटी पाशी आमचे सामान तपासले, माझी पर्स मी लॉकरमधेच ठेवली होती पण पैसे तिकडॆ कसे ठेवणार म्हणून रमेशने त्यांच्याजवळ एक छोटी बॅग ठेवली होती. त्यातल्या काही वस्तू पोलिसाने काढायला लावल्या. आत गेल्यावर आणखी एका सिक्युरिटीतुन जाताना बॅगेतली छोटी चांदीची लवंगा ठेवायची डबी काढायला लावली, ती ठेवायला पुन्हा अर्धा पाऊण कि.मी जाणे कठीण होते, पण मंदिराच्या परिसरात लॉकर्स होते अ ते विनामूल्य होते, तेथे ती डबी ठेवली. दर्शनाची रांग फार नव्हती. रांगेतुन पुढे गेलो, गाभाऱ्यात जायला स्पर्श दर्शनाचे तिकिट घेणे जरुर होते, त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती, मग बाहेरुन दर्शन घेतले, अभिषेकाचे दूध दुरुनच ओतले तो लोटा पोलिस बाईने काढुन घेतला.  

काशीचे मूळ मंदिर औरंगजेबाने नष्ट करायचे ठरवलयं अशी कुणकुण आल्यावर तिकडच्या पुजाऱ्यांनी शिवलिंग काढुन विहिरीत टाकुन दिले,ती विहिर मंदिराच्या आवारात आजही आहे, तिला ग्यानवापी म्हणतात. त्याचे पाणी काढुन तीर्थ म्हणून देतात. मंदिराच्या जागी आज मशिद उभी आहे आणि मशिदीच्या समोर नंदी मात्र आहे. हा नंदी सध्याच्या शिवाच्या मंदिरापासून थोडा दूर आहे. त्याचे दर्शन घ्यायला वेगळी रांग होती. ग्यानवापीला लागुन सभामंडप आहे, तेथे बसुन रमेशने रुद्राचे एक आवर्तन केले.  एका अपूर्व समाधानाने मन भरले. आम्ही अन्नपूर्णा देवीचे दर्शन घेतले.शंकराचार्यांचे अन्नपूर्णा देवीचे अप्रतिम स्तोत्र मला माहित होते. 

अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।

ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति  

माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।

बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्  

दक्षिणेतील केरळ जवळील लहानशा खेडेगावातील शंकराचार्य हे एक तेजस्वी संन्यासी.सातव्या शतकात त्यांनी चालत भारतभ्रमण केले. हजार बाराशे वर्षांपूर्वी कुठल्याही सोयी सुविधा नसताना एक तरुण संन्यासी चालत एवढे अंतर कसा आला असेल. ईश्वरी संकेत आणि त्याची कॄपा असल्याखेरीज हे शक्य वाटत नाही. हिंदू धर्मातील असलेली अवास्तव कर्मकांडे, स्मार्त आणि वैष्णव पंथियांनी केलेल्या देवांच्या वाटण्या व भांडणे , यातुन सर्वसामान्यांना परमेश्वराचे खरे स्वरुप समजावण्यासाठी त्यांनी आपले जीवन खर्ची घातले. देव पंचायतन हि संकल्पना आणली. बौध्द आणि जैन धर्माच्या प्रसारामुळे सनातन हिंदु धर्मावर आलेले मळभ दूर करण्यासाठीच जणु या ज्ञानमार्तंडाचा उदय झाला आणि अवघे ३२ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या यतीने अद्वैत सिंध्दांत्ताने मानवजातीवर केवढे उपकार केले ! काशीच्या  या मंदिराच्या परिसरात त्यांना शिवाने दर्शन दिल्याचे वाचले होते. मला खरंतर या करीताच काशीला यायचे होते. 

औरंगजेबाने मंदिर उध्वस्त केल्यानंतर तेथे शंभर वर्षे कोणीच येत नव्हते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची अवस्था बघितली आणि नर्मदा तीरावरुन शिवलिंग पाठवुन पुन्हा मंदिर बांधले. अर्थात ते दुसऱ्या ठिकाणी बांधले.मशिद काही हलवली नाही, आताचे मंदिर लहान आहे.  सध्या मंदिराचा परिसर खुप मोठा आणि अतिशय स्वच्छ आहे. चारी दरवाजे उघडे असून सगळीकडून भाविक मंदिरात प्रवेश करु शकतात ,सुरक्षा व्यवस्था चांगली असल्याने गोंधळ,गड्बड नव्हती. 

मंदिरातुन बाहेर आलो व चप्पल,बूट आणि मोबाईल ताब्यात घेतले. तेथील लोकांनी आमच्या बरोबर आलेल्या पंडिताला पैसे द्या असे सांगितले, त्याने २१०० रुपयाची मागणी केली. आम्ही हतबुध्द झालो, आमच्या ट्रॅव्हल एजंटने ५०० रु द्या असे सांगितले होते, आम्ही तेवढे देऊ असे म्हणाताच तो भयंकर चिडला,संतापला, पैसे नकोतच असे ओरडू लागला. आमच्या बरोबर आलेल्या माणसाने त्याला समजावले व ५००रु. घ्यायला लावले.गाडी पाशी आलो तेंव्हा आम्हाला तिथवर आणाणाऱ्यानेही पैसे मागितले, त्यालाही पैसे देणे भाग पडले.  मी नंतर नेटवर बघितले, ऑनलाईन स्पेशल दर्शनाला तुम्ही माणशी ३००रु देता त्यावेळी तुमच्या बरोबर एक पंडीत येतो तो तुम्हाला मंदिराची माहिती देतो, प्रसादही देतो. आम्हाल प्रसाद तर  मिळालाच नाही आणि पंडीताने वर पैसे मागितले, दिलेल्या पैशाबद्दल नाराजी दाखवली ! मी आम्हाला गाडीपासून टपरी पर्य़ंत आलेल्या माणासाला तुम्हीच आम्हाला मंदिरात का नेले नाही असे विचारल्यावर म्हणाला होता ,’आम्हाला परवानगी नाही , ठराविक पंडीतच जाऊ शकतात " त्याचा उलगडा झाला. पैसे गेल्याच्या दुःखापेक्षा फसवणुकीचा जास्त विषाद झाला ! आमची चूक ही होतीच, पण सामान्य जनता कशी फसवली जाते याचा अनुभव आला.त्या फसवेगिरीत आमचे ट्रॅव्हल एजंटपण असल्याने जास्तच वाईट वाटले !

नंतर संकट्मोचन मारुती, दुर्गा, तुलसी रामायण मंदिर बघुन बनारस हिंदू विद्यापीठ बघायला गेलो. मदन मोहन मालवीय यांनी देणग्या गोळा करुन उभारलेले विद्यापीठ मला बघायचेच होते. जयंत नारळीकरांच्या आत्मचरीत्रात त्याबद्दल खूप वाचले होते . विद्यापीठाचे आवार खूप मोठेव शांत, हिरवेगार आहे. आवारात एक शंकराचे संगमरवरी मंदिर असून ऋग्वेद, यजुर्वेदातील ऋचा अर्थासकट कोरलेल्या आहेत. दहा वाजुन गेले  होते, पहा्टेपासून काहीच न खाल्ल्याने भुकेची जाणीव तीव्र होऊ लागली. हॉटेलवर जाऊन नाश्ता करण्यात बराच वेळ गेला असता, त्याऐवजी आम्ही रस्त्यावर कचौडी सब्जी खायचे ठरवले, ड्रायव्हरने चांगली टपरी दाखवली तेथे खाल्ले,लस्सी प्यायली. क्षुधाशांती झाल्यावर पाळंदे गुरुजींकडे जायला निघालो.

वाराणासीला गंगा किनारी पितरांचे श्राध्द विधी करुन गंगेत पिंडदान करावे अशी आम्हा उभयतांची इच्छा होती, त्याप्रमाणॆ पाळंदे गुरुजींकडे गेलो, त्यांच्या घरी फक्त चालतच जाता येते, एकावेळी दोन जण शेजारी शेजारी चालू शकत नाहीत अशा लहान लहान गल्ल्यामधुन त्यांच्या घरी गेलो त्या आधी तशाच गल्ली बोळातुन काळभैरवाचे दर्शन घेतले होते. श्राध्द विधी गुरुजींनी यथासांग करविला, एक वाजता चटचटत्या उन्हातुन घाटावरुन नदिकिनारी गेलो आणि नदित बसुन दुरवर जाऊन पिंडदान केले.

बनारसला काही खरेदी करायची असे ठरवले होते पण उत्साह शिल्लक नव्हता. इकडच्या लोकांच्या लबाड व फसवण्याच्या प्रवृत्तीने मन उद्विग्न झाले होते.  एक दोन दुकानात गेलो पण काही आवडेना , मग हॉटेलवर परतलो, जरा वेळ आराम केला आणि सामान आवरुन संध्याकाळी सात साडेसातला जेवण केले आणि पुण्याच्या प्रवासाला जायला सिध्द झालो ! 

अशी हि आमची काशी यात्रेची कहाणी सुफळ संपूर्ण  

1 comment:

Anonymous said...

छानच वर्णन केले आहेस.
स्वतः जाऊन आल्यासारखे वाटले