Thursday, July 17, 2008

चाळीशी: एक चिंतन

वर्तमानपत्रातील सुट्टीची पुरवणी वाचायला घेतली, त्यात ’चाळीशीच्या स्त्रियांसाठी मार्गदर्शनपर लेख’, तो वाचून बाजुला ठेवतीयं तोच ’स्त्रियांमधील चाळीशीनंतरच्या मानसिक स्थित्यंतरावरील’ खास अंकाचे साप्ताहिक नजरेस पडले. मुलीला घेऊन दवाखान्यात गेले तर तिथेही अशाच प्रकरच्या लेखांची मासिके,पाक्षिके.कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळे दिसते तसे चाळीशीची चहूल लागताच मल जिकडे तिकडे या लेखांनी भंडावल. वास्तविक हे लिहिताना वय दडविण्य़ाची स्त्रीसुलभ खोड देखील बाजुला ठेवावी लागतीयं पण हे सारे लेख वाचून,रेडीयो,टि.व्ही. वरील चर्चा ऎकून मला तर अगदी वेडावून गेल्यासारखं झालयं.खरचं, सॄष्टीची उलथापालथ व्हावी, तशी आपल्या तनामनात उलथापालथ होतीयं आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागू नये? मी सहज लेकीला म्हणायला गेले,"हे बघ, मला माझ्या चिडचिडी मागचं कारण मला समजलयं, ते किनई वयामुळे होण्याऱ्या ...." माझे वाक्य मध्येच तोडीत ती फाडकन् म्हणाली," काहीतरी फेकू नकोस हं, तू चिडकीच आहेस पहिल्यापासून , उलट आम्ही मोठ्या झाल्यामुळे हल्ली तुझी चिडचिड कमी झालीयं"माझ्या आजुबाजुच्या शेजारणी,ऑफीसमधल्या मैत्रिणी कुणाचच वागणं बदलल्याचं मला जाणवत नव्हतं.ऑफीसमधल्या जेवणाच्या सुट्टीतले गप्पांचे विषय म्हणजे मुलांचे अभ्यास,त्यांच्ये खाण्यापिण्याचे नखरे,पाकक्रीया, सासरच्य़ा निंदा, नवऱ्य़ाच्या तक्ररी ई. नेहमीचेच यशस्वी. कामवाल्या बायकांपासून ऑफीसमधल्या स्त्री बॉस पर्यंतच्या कोणत्याही बाईमध्ये चाळीशीत गेल्यावर फार मोठी मानसिक स्थित्यंतर जणवली नाहीत(स्वतः एक स्त्री असूनसुध्दा!) त्या सगळ्या लेखांचे सार होते, या वयात स्त्रियांना फार एकटेपणा वाटतो, तिच्याकडे पतिचे,मुलांचे लक्ष नसते.मुले मोठी झाल्यामुळे त्यांना आईची गरज वाटत नाही.वय वाढल्य़ामुळे नवऱ्य़ाची बायकोबद्द्ची आस्था, आकर्षण कमी होते ई.ई.
    माझ्या मते हल्लीच्या मुलांना स्वतःचे काम स्वतः करायची सवय नाही, त्यांना वेळही अजिबात नाही.त्यांच्या शाळा,क्लासेस,खेळ अशा नानाविध व्यापांमधून त्यांना स्वतःची स्वतः अंघोळ आणि जेवण यालाच जेमतेम वेळ मिळतो, बाकी सगळ्या तैनातींना आई इतकी तत्पर व्यक्ति कोण् असणार? नोकरी करणाऱ्या,न करणाऱ्या कुठल्याही बाईला मुलांची सगळी कामे करावीच लागतात.त्यात मुलांना विविध क्लासेसना सोड्ण्या,आणण्यापासून त्यांचे अभ्यास करून घेण्यापर्यंत सगळ्यासाठी मुलांना आईच हवी असते.बाईच्या चाळीशीपर्यंत तिच्या संसाराला किमान एक तप उलटलेले असते.सुरुवातीच्या नव्यानवलाईच्या काळात बायकॊशी वाद,भांडणं झाली तरी पुरुषाला त्याच्या आईच्या भक्कम पाठींब्यामुळे जेवणखाणाची ददात नसते,आता लग्नाला इतकी वर्षं झाल्याने त्याची आईही थकलेली असते, शिवाय मुलांची शिक्षणे,त्यांचे नवनवे प्रश्णं, उभयपक्षातील आईवडिलांची आजारपण या सगळ्यांसाठी सतत एकमेकांच्या आधाराची गरज असते. बायकोकडे दुर्लक्षाचा संबंधच येत नाही त्यामुळे.
  
    वयानुरुप शारीरिक,मानसिक बदल आत्ताच जाणवतात असे नाही.तिसरी,चौथीत असताना ’सोळावं वरीस धोक्यचं गं’ हे गाणं मी ठेक्यात म्हणत असताना आई रागावली होती,’असली गाणी घरात नाही म्हणायची!’ असे तिने डोळे वटारुन सांगितले. या गाण्यात ’असलं’ काय आहे हे विचारायचं धाडसही झालं नाही. ते समजायचं ते वयही नव्हतं.पुढे यथावकाश ते धोक्याच वय आलं आणि गेलं पण आभ्यास,परीक्षा,प्रॅक्टिकल्स,सब्मिशन्सच्या धबड्ग्य़ात त्यातले धोके कळलेच नाहीत. झोपाळ्यावाचून झुलायचे,फुलायचे दिवस कवितांमधुन वाचत होते. शब्दांच्या पलिकडल्या भाषांचे,परीकथेतील राजकुमारांचे स्वनाळू सहित्य वाचताना आवडत नव्हते अस कसं म्हणू? पण हे सारं पुस्तकी वाङमय पुस्तकांपुरतेच , सिनेमा,नाटकांसारखेच नकली असचं वाटायचं, कारण व्यवहारी जग फार वेगळं होतं,तिथे यातलं काहीच दिसतं नव्हतं.कारण प्रेम करायच तर पतंगासारख "जगी सांगतात प्रित पतंगाची खरी झडप घेऊन देतो प्राण दिपकचे वरी” किंवा गोविंदग्रजाचे "क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा मग पुढे " हे मनावर इतकं ठसलेलं होतं की प्रेमं करायचं तर मरायचीच तयारी ठेवावी लागते असच काहिसं मनानं घेतलं  आणि जगायची अमर्याद हौस असल्यामुळे तो आपुला मार्गच नव्हे असं सरळ गणित मी सोड्वून टाकलं माझ्य़ापुरतं.थोडक्यात काय, धोक्याच्या वयातले धॊके दिसले नाहित, निसरडे रस्ते जाणवले नाहीत. तेंव्हा पुढे होते कॉलेज, तो भरपूर आभ्यास,परीक्षा आणि रिझल्टस्. करियर वगैरे शब्द न शिकता पदव्युत्तर शिक्षण सहज जमत गेलं आणि मिळालेली नोकरी गरज म्हणूनच स्विकरली.
    पुढे यथावकाश लग्नं झालं,नंतरची वर्षं घर, संसार, नोकरी यामध्ये कशी गेली ते कळलचं नाही. म्हणजे काळ त्याच्याच गतीने जात असतॊ ,आपल्याला त्याची गती कमी जास्त जाणवते.मुलांच्या लहानपणांत त्यांची दुखणी काढताना,दिवस संपता संपत नव्हते आणि कधीकाळी आपण, मुले व नवरा सगळ्यांना एकावेळी मिळालेल्या सुट्टीच्या कपिलाष्ठीच्या योगावर कुठे गावाबिवाला गेलो तर दिवस भुर्रकन् उडत होते.या सगळ्या रगाड्यात मुले मोठी होत होती,सासु सासरे थकत होते,आई वडिलांची दुखणी सुरु झाली होती.पण आपली एनर्जी कमी होवुन् चालत नसल्याने इंजिनाच्या गतीत किंचित फरक झाला तरी चालू होतेच.
  

    अशातच चाळीशीचा उंबरठा कधी आला ते समजलेच नाही. या लेखांमधली लक्षणे कळायला तेवढं रिकामपणं आजही नाही आणि मी म्हणजे तरी कोण? एक सामान्य मध्यमवर्गाची प्रतिनिधी.कनिष्ठ किंवा गरीब वर्गामधील बायकांना मुक्ती,स्वातंत्र्य तर नसतेच,पैसे तर मिळ्वावे लागतात.त्या बिचऱ्यांना दिवसभर कष्ट,आर्थिक विवंचना,पोरांची उसाभार अन् रात्री दरुड्या नवऱ्याची मारहाण सहन करताना शारीरिक व्याधींकडे लक्ष द्यायला फुरसत नसते तर मानसिक त्रासाची काय कथा? राहिता राहिला ऊच्च वर्ग त्यातल्या फार रिकामपण असलेल्या महिलांचे सुख दुखत् असते त्यांना जणवत असतील हि मानसिक आंदोलने. कुठल्याहि गोष्टींचे उद्दातिकरण करण्याची फॅशनच झालीयं हल्ली. आता असं बघा, स्त्रीने पुरुषाच्य खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करायला लागुनही बरीच वर्षे लोटली.पुरुषांच्या बाबतीत चाळीशी हि ’चावट चाळीशी’ ठरते, तर स्त्रियांनीच चाळीशी हि तारुण्य संपल्याची चाहूल मानायचं करणच काय? आणि शेवटी तारुण्याचं नातं शरीराशी कि मनाशी हे ज्याच त्यानीच ठरवायचं आहे.उगीचचं पुस्तकामधल्या लेखांनी धडधडून घ्यायचं कारण नाही.थोडा फार त्रास झालाच तर तो दूर करायला आहेच की अत्याधुनिक वैद्यकशास्त्र आणि अद्ययावत उपाययोजना.

©

2 comments:

Ramesh Rao said...

Shubha,
You are absolutely right saying ,
(Tarunya)it should be decided by your body or mind. Its a mind block, from which you have to come out & start enjoying the life.You must accept the changes in your body as you are becoming old & we are not Chiranjeevi. So think how you can set your mind to think +vely. No doubt lady goes through transplantation on a far major/bigger level than a man in our society atleast, but see it from +ve angle & just read such articles as their view & not more than that.

Maitreyee said...

its gr8 u really rock mom