Friday, July 25, 2008

नाट्यछटा

मुलांना द्यायला आपल्याकडे वेळ नाही, हि आजच्या पिढीची व्यथा आहे घर,संसार आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करणाऱ्या सगळ्याच कुटुंबाची हि कथा आहे.मुलांना तिसऱ्या वर्षापासून शाळेत घालतानाहि त्याचा तेवढाच वेळ बाहेर जाईल हा हेतू असतो. एकदा का मूल शाळेत जायला लागले कि अभ्यास त्याच्या मानगुटी बसतोच. वेगवेगळ्या अभ्यासाच्या आणि अभ्यासेतर स्पर्धा आणि त्या अनुशंगाने लागणारे मार्गदर्शन याच्या नावाखाली मुलाचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जातो, उरलेल्या वेळात त्याच्याशी बॊलायला कॊणी नसेल तर त्याने सगळा वेळ टि.व्ही समोर घालवला तर त्यात त्याचा दोष कितपत आहे? मुलांना महागडी खेळणी , ब्रॅंडेड कपडे, शूज आणून असलेल्या थोडक्या वेळात त्यांचे फाजील लाड करून आपण मनाचे समाधान करत असतो, वास्तविक मुलांना तुमचा वेळ हवा असतो. इंटरनेट वर या विषयावर गोष्टी आलेल्या आहेत. एका सहा सात वर्षाच्या मुलीच्या मनाचे अंतरंग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे या नाट्यछटेमधून.

मला काही सांगायचयं
बाई, बाई,बाई वैतागले बाई मी या मोठ्या माणसांना, एकाला माझ्याशी बोलयला वेळ असेल तर शपथ. आता कालचीच गोष्ट, सकाळी आईनं मला जरा रागातच उठवलं,"मैत्रू, उठं,बरं लवकर शाळेत नाही का जायचं ? आत्ता रीक्षा येईल बघं" इतक छान स्वप्न पडल होतं, म्हणून सांगते! स्वप्नात किनई मी जंगलात गेले एकटीच, काय मस्त जंगल होत ते, तिथे किनई मला एक मॊठ्ठा वाघोबा दिसला, मला म्हणतो कसा,’बैस मैत्रू मझ्य़ा पाठीवर ,आपण लांब चक्कर मारुन येऊ", मला ना अज्जिबात भिती नाही वाटली त्याची, मी बसले त्याच्या पाठीवर आम्ही निघालॊ....आणि तेव्हढ्य़ात आईनं उठवलचं. इतकं सुंदर स्वप्न कुणाला तरी सांगावं असं नाही का वाटणार?मी उठून आईजवळ गेले तिला सांगायला हि गम्मत, तर वस्सकन ओरड्ली माझ्यावर "आत्ता बड्बड नकोयं, आवरं चटचट, तोंड् धू, दूध पी, आंघोळ कर...शाळेला जयला उशीर होतोय, तुझ्यामुळे मला ऑफीसला हि उशीर होतो..." दिदिला सांगायला गेले तर ती खेकसली,"उगीच बोअर नको गं करुस, मला माझा होमवर्क करुदे" शाळेत टिचरांना सांगायला गेले तर म्हणाल्या,’Maitreyee, talk in English, don't talk in Marathi' आता तुम्ही मला सांगा वाघोबा जर माझ्याशी मराठीत बोलला तर मी त्यांना english मध्ये कसं सांगू? कुण्णाकुण्णाला वेळ नाही आमच्याशी बोलयला, आमचं ऎकायला.संध्याकाळी खेळून घरी आलं की, ग्राऊंड वरच्या गमती जमती कधी एकदा बाबांना सांगेन असं वाटतं, मी धावतच घरात शिरते, बाबा बाबा..करतच. बाबा हॉल मधेच फोन वर बोलत असतात 'hello yes, hello Ralph,how are you , I am fine thank you' मला पाहून डोळे मोठे करतात , आई मला ओढून आत नेते,’बाबा फोन वर् कामच बोलतायतं दिसत नाही? चल हातपाय धू, कपडे बदल, रामरक्षा म्हणं आणि होमवर्क कर’ रात्री जेवण झालं कि वाटत आईच्या कुशीत शिरावं, तिला दिवसभरातल्या सगळ्या गमती सांगाव्या. पण कसलं काय! आई जवळ गेले कि ती म्हणते ’मैत्रु माझी कंबर दुखतीय गं’ मी म्हणते ’आई तुला मी मूव्ह लावून देऊ? टि.व्ही. तली आई कशी मुव्ह लावल कि लग्गेच बरी होते, तू पण तशीच बरी होशील.’ ’काही नकोय ते मूव्ह आणि टुव्ह, सारखा टि.व्ही. बघयचा... आणि आईच जे लेक्चर सुरू.. माझे तर डॊळेच मिटतात.
तुम्ही म्हणाल ’आजीला सांगाव्या गमती, अहॊ काय करणार माझ्य़ा बाबांची आई मी लहान होते तेव्हाच देवाघरी गेली. आईच्या आई कडे सोड्तात बाबा मला कधी त्यांना कामाला जायचं असेल कि. दारात पाऊल टाकताच आजी जवळ घेऊन म्हणते ’सुकलं ग माझं बाळ. फार रागावते का ग शुभी तुला? थांब आता आली कि बोलतेच तिला. माझ्या आवडीचा खाऊ खाता खाता आमच्या गप्पा सुरु होतायत तोवर आजीची शेजारची मैत्रीण येते.आजी मला म्हणते,’तू खा हं खाऊ, अजून हवा तर घे त्या डब्यातला, एवढा ज्ञानेश्वरीचा अध्याय यांना वाचून दाखवते, मग बोलू हं आपण’ त्यांच वाचन पुर व्हायच्या आत बाबा हजर ! ’चला मैत्रूबाई , खूप झाल्या आजीशी गप्पा, घरी जायला ऊशीर् नको’ कि चालली आमची वरात घरी.
अहो कुणालाच वेळ नाही माझ्याशी बोलायला कित्ती कित्ती गमती असतात ,कित्ती कित्ती प्रश्ण विचारायचे असतात ’चिमणीला घरटं बांधायला कॊण शिकवतं? मनीमाऊ बाळ कुठल्या हॉस्पिटल मधून आणते? अंड्यातून पिल्लू बाहेर कसं येत? एक ना दॊन हजार प्रश्ण असतात पण कुणालाच सवड नाही. मी परवा खूप चिडले आईवर, म्हणाले,’तुला वेळ नाही , तर आणलस कशाला मला हॉस्पिटल मधून? मी जाते होस्टेलवर रहायला.’ मग मात्र तिच्या डोळ्यात पाणीच आलं मला जवळ घेऊन म्हणाली,’खरं आहे गं तुझं म्हणणं, आता तुझ्या शाळेला सुट्टी लागली ना कि मी पण रजा घेईन मग आपण खूप खूप गप्पा मारु ,मज्जा करु ’
 पण  मी आता ठरवलयं, मोठी झाले कि टि.व्हीत दाखवतात तसं कोर्टात काम करायचं कसलं म्हणून काय विचरताय, ’ऑर्डर! ऑर्डर ! करणाऱ्या माणसासारखी होणार आहे मी, सगळ्या आई बाबांना कोर्टात बोलावणार आणि संगणार ऑर्डर! ऑर्डर ! रोज दोन तास मुलांशी बोललं पाहिजे, त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे, नाही तर सगळ्यांना मोठ्ठी शिक्षा. ऑर्डर! ऑर्डर !


©

5 comments:

Ramesh Rao said...

Shubha,
It's really mind opening. One has to maintain balance between family & his carrier path. He should realise the importance of family & priotise the same before it becomes too late.

Maitreyee said...

its gr8 mom u rock

Bhagyashree said...

Khupach surekh lilhile ahe apan!!

Aajchya mulanchi tar vyatha ahe hi..amhi lahan astana nahi evdhe vatle..karan tyaveli aai-papa, aaji-ajoba, dada sagle jawal asyache...

शंतनु said...

khup masta lihila ahe

Gauri Inamdar said...

aagdi mazya mulichya manatle vichar aastil aase vatte. baryachda aapan mulanshi aasech bolto.ya natya chatemule mala tari mazi chuk lakshat aali. Thanks!