Thursday, October 29, 2009

ते श्रीमंत दिवस

पुण्याविषयी आणि पुणेकरांविषयी इतकं लिहिलं गेलयं कि काही बोलायची सोय नाही. आता पुण्याचा चेहरा मोहरा बदलत चाललाय शिवाय वाढत्या आय.टी सेक्टर आणि नवनव्या शिक्षण संस्था तसेच नवनवे शैक्षणिक अभ्यासक्रम यामुळे अमराठी लोकांच्या पुण्यावरील अतिक्रमणामुळेही पुण्याच्या हवेइतकच पुण्य़ाचं पुणेरीपण जात चाललयं(पूर्वीचं पुणं राहिल नाही हे म्हणणारी ,पुण्याचा अभिमान बाळगणारी मी मात्र अस्सल पुणेकरच) बदल हे होतच राहणार.नोकरीच्या, व्यवसायांच्या संधींसाठी नाना ठिकाणांहून लोक ही येणार.पुण्यात राहून पुण्याला आणि पुणेकरांना नावे ठेवणारी मराठी आणि अमराठी माणसं पुणं काही सोडत नाहीत, एक दोन वर्षात पुण्यात घर घेतात.
पुण्यात राहण्याचा मला मिळालेला फायदा म्हणजे लहानपणी बघायला मिळालेले अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम आणि मोठमोठ्या व्यक्तिंची दर्शन! त्यावेळी वसंत व्याख्यानमालेत होणारी व्याख्यान असोत, की न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावरील गीत रामायण असो, बाबासाहेब पुरंदऱ्या्चं शिवचरीत्र,शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यानं, पु.ल देशपांड्यांची भाषणं तसेच व्यंकटेश माडगूळकर,द.मा.मिरासदार आणि शंकर पाटील या त्रयीचं कथाकथन असे किती प्रसंग सांगावेत?
मुक्तांगण बालविकास केन्द्र नवाची इमारत सहकारनगर मध्ये झाली त्याच्या साठी पु.ल.देशपांड्यांनी देणगी दिली होती.त्याच्या उद्घाट्न सोहळ्य़ाला पु.ल. येणार हि बातमी आमच्या येथे बरेच दिवस गाजत होती. सकाळी लवकर उठून आम्ही त्या कार्यक्रमाला आठ पासून जागा धरुन बसलो होतो.पु.लं.च ते पहिलं दर्शन आजही माझ्या लक्षात आहे.मी त्यावेळी तिसरी-चौथीत असेन ,त्यांचे भाषण काही सगळे समजले असेल असे नाही.पण 'इथे मुलांना कुणी गप्प बसा असे म्हणु नका, त्यांना नाचू दे,गाणं शिकू दे,चित्र काढू दे ,आपल्याकडे मुलांसाठी म्हणून काही केले जात नाही गोकुळाष्ट्मी हा वास्तविक मुलांचा सण, पण दहिहंडी फॊडायला चाळीस-चाळीस वर्षांचे बाप्ये असतात मला म्हणायचयं तुम्ही कराना धृतराष्ट्र जयंती मुलांच्या खेळात का येता?' असं ते बोललेले अजून आठवणीत आहे.माझ्या मनाला ते भाषण जे भिडलं कि त्या नंतर पु.ल माझं दैवतच बनले! दूरदर्शन चा जमाना त्यावेळी आलेला नव्हता, रेडीओवर ऎकलेली व्यक्ती प्रत्यक्ष बघायला मिळणं म्हणजे पर्वणीच वाटे.
वसंत व्याख्यान मालेमध्ये दरवर्षी मोठ्मोठ्या वक्त्यांची विविध विषयावर व्याख्याने होतं , अजूनही ती परंपरा चालू आहेच.मे महिन्याची सुट्टी असे, मग रोज 'सकाळ' आला कि आधी आज कोणाचे व्याख्यान आहे ते बघायचं आणि विषय किंवा वक्ता ओळखीचा असला की जायचं ऎकायला.'शिवाजी राव भोसल्यांची व्याख्यान'तिथेच प्रथम ऎकली.त्यांची शिवाजी, बाजीराव, रामदास ,विवेकानंद, योगी अरविंद अशा नाना विषयांवरची व्याख्यान ऎकताना भान हरपायचचं, पण त्यांची ओघवती वाणी,त्यांचा प्रत्येक व्यक्तिरेखेचा सखॊल अभ्यास,त्यांची स्मरणशक्ती या सगळ्याचं अतोनात कौतुक वाटायचं आणि व्याख्यान संपल्यावर एका अद्भुत जगतात जाऊन आल्यासारखं वाटायच, नंतरचे २-३ दिवस त्याच धुंदीत जायचे.रवींद्र नाथांवरील पु.लंची तीन व्याख्याने अशीच टिळक स्मारक मंदिरात अकस्मिक पणे ऎकायला मिळाली.अकरावीत एस.पी.कॉलेजमध्ये होते मी त्या वेळी ,कुणीतरी बोलताना ऎकलं आज पासून तीन दिवस टिळक स्मारक मंदिरात पु.लंची व्याख्याने आहेत.कॉलेज सुटल्यावर परस्पर तिकडेच धावलो आम्ही दोन -तीन मैत्रिणी साडेसात पावणेआठला भाषण संपल्यावर घरी गेलो,घरी काहीच महिती नसल्याने जरा रागवा रागवी झालीच असेल पण उशीर होण्याचे कारण समजल्यावर आईचा राग गेला, आणि त्या एवढ्या सुंदर व्याख्यानाच्या आनंदात बाकी सगळे कःपदार्थ होते.
मी नववीत असताना शिक्षकांचा प्रदीर्घ संप झाला होता,बेमुदतच होता तो, थोडे थोडके नाही तब्बल बावन्न दिवस चालला.हि सुट्टी मात्र तशी कंटाळवाणी ठरली असती कारण कुठल्या दिवशी शाळा सुरु होईल ह्याचा नेम नसल्याने घर सोडणे शक्य नव्हते,दिवाळीच्या सुट्टी नंतर संप झाल्याने गॅदरींग, ट्रीप सगळे बुडले,आणि माझ्या बाबतीत तर आमचे दादा ही राज्य शासनाचे कर्मचारी असल्याने ते ही संपावर! त्यामुळे घरात अभ्यास करत बसावे लागे, त्यांना हि इतका रिकामा वेळ बहुदा पहिल्यांदाच मिळाला असावा , एरवी ते घरी यायचे तेंव्हा रात्र झालेली असे.दादांनी बीजगणित ,भूमिती सगळे पुस्तक शिकवून एकूण एक गणिते सोड्वून घेतली(नववीच्या पुस्तकातले २ धडे दहावीला होते हे नंतर कळले)पण तरीही सुट्टी कंटाळवाणी न होण्याचे कारण त्याच वर्षी पुण्यात मराठी साहित्य संमेलन झाले होते आणि शाळेला सुट्टी असल्याने मी ३ दिवस सकाळ संध्याकाळ गरवारे कॉलेजच्या पटांगणावर पडीक होते.भाषणे, परीसंवाद, कवी-संमेलन कसली धमाल! पु.भा.भावे अध्यक्ष होते , ग.दि.माडगूळकर,मंगेश पाडगावकर, कवी अनिल,शांता शेळके अशा कित्ती कित्ती लोकांना जवळून बघायला मिळालं! एका लहानश्या डायरीत बऱ्याच जणांच्या सह्या देखील मिळवल्या, 'नावं काय तुझं? काय शिकतेस?' एवढे प्रश्ण त्यांच्या पैकी काहींनी विचारले तरी लेखक आपल्याशी बोलले या आनंदाते अस्मान ठेंगणं होवुन जायचं! ना.धॊं.महानोरांनी गाऊन दाखवलेल्या कवितांनी ,पाडगावकरांच्या सलाम कवितेच्या वाचनाने अंगावर उठलेले रोमांच आजही आठ्वतात.एकही पैसा न खर्चता मिळालेले हे लाखमोलाचे क्षण! त्या अनुभवांनी माझं चिमुकलं विश्व उजळून गेलं. त्यातूनच मला वाचनाची गोडी लागली.ह्या दिवसांच्या आठ्वणी माझ्य़ा आयुष्यातील सगळ्य़ात आनंदाच्या आहेत.
शिक्षण संपून नोकरी लागली ,लग्न झालं .पूर्वी सहसा बघायला न मिळणारा पैसा हातात सहज खेळू लागला आता आपण कुठलेही नाटक बघू शकतॊ, कुठल्याही समारंभाला तिकीट काढुन जाऊ शकतो असा विश्वास आला.पण..... आता पुण्यात कुठे काय चाललयं ते बघायलाच वेळ नव्हता. एखाद चांगलं नाटक आहे असं कळलं आणि जायचा विचार करायचा अवकाश !, नेमकं कुणीतरी घरी टपकायचं, कधी कुणाची आजारपणं,पाहुण्याची सरबराइ, रात्रीच्या कार्यक्रमाला बरोबर यायला कुणी नाही, दिवसाच्या वेळी ऑफीसच्या कामात रजा नाही एक ना दोन हजारो कारणं आणि सबबी ! सुरुवातीला असे चांगले काही बघायला जायचे हुकले कि जीवाची तगमग व्हायची, चिडचिड व्हायची मग नवरा म्हणायचा,"एवढं काय झालं चिडायला? कुठल्याही कार्यक्रमाच्या ऑडिओ /व्ही.डि ओ सी.डी/कॅसेट्स , मिळत असताना त्या कार्यक्रमाला जायची गरजच काय? घरी बसून आपल्याला पाहिजे तेंव्हा निवांत बघू " लहान मुलाची पटते तशी माझी समजूत पटली होती सुरुवातीला,"खरचं हे आपल्या लक्षातच नाही आलं!" मग कुठल्याशा सुमुहूर्तावर एखादी व्ही.डि ओ कॅसेट्स आणली जायची ती लावे पर्य़ंत रात्रीचे नऊ वाजून जायचे,सुरुवात होवून जरा कुठे बघण्यात मजा येतीय तोच फोन वाजायचा, बेल वाजायची. नाहीतर कुणाला पाणी दे, कुणाला खायला दे,
विरजण लावलं का?
उद्याच्या नाश्त्यासाठी तांदूळ भिजत टाकले का?
सकाळच्या डब्य़ाला भाजी काय करणार ? बसल्या बसल्या निवडून टाक.
आमच्या घरी त्याकाळी रात्री अपरात्री पाणी येत असे ,मग पाणी भरणे, बागेला पाणी घालणे हे सगळे उद्योग करताना त्या कार्यक्रमाचा पूर्ण विसर पडे आणि संपलेल्या कार्यक्रमानंतर टि.व्ही. बंद करण्यापुरता त्याच्याशी संबंध उरे.त्यातून मग घरी काही आणून बघण्यातला फोलपणा कळून चुकला.
आता सतत २४ तास वेगवेगळ्या रुपातून करमणूकीची बरसात करणाऱ्या वाहिन्यांचा जमाना आला.त्यातून जाहिराती गाळुन अर्ध्या तासांत होणाऱ्या कार्यक्रमातून करमणुक होते का हा संशोधनाचा विषय होईल.त्यांचे विषय,दर्जा यातील कशाबद्द्लच न बोलणेच शहाणपणचे ठरेल.तंत्रज्ञान आणि कलाकृती (मग ते गाणं असो, कविता , नाट्क किंवा सिनेमा)हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असावेत असे वाटते.टि.व्ही.चं स्थान घरातला एक प्रतिष्ठेचा सिम्बॉल एवढचं राहतं.घरात एकटं असताना देखील मला कधी तो लावावा असं वाटतच नाही.
अजूनही पुण्यात चांगले कार्यक्रम होतात, आता मुली मोठ्या झाल्याने त्यांना घेवून जायचा आटापिटा मी करते, मध्यंतरी माझी मोठी मुलगी नववीत असताना अविनाश धर्माधिकारी यांची वेगवेगळ्या विषयांवर सात दिवस व्याख्याने होती,मुलींना घेवून मी पहिल्या दिवशी गेले, त्यांना कितपत समजेल हि शंका होतीच. धाकटीला नाही समजले सगळे पण तनु मात्र फारच प्रभावित झाली,नंतरचे सगळे दिवस रोज जाणे मला जमणारे नव्हते (संसाराचे व्याप ताप ई...(ध्रृ.))मात्र उरलेले सगळे दिवस ती कुणाना कुणला बरोबर घेवून गेली आणि तिने त्याचा पूर्ण आस्वाद घेतला. आणि मीच तो कार्यक्रम बघीतल्याचे समाधान मला मिळाले.माझ्या वडिलांनी मला दिलेला वारसा मी माझ्या मुलीपर्यंत पोहचवू शकल्याचं ते समाधान होत!


©

No comments: