Wednesday, December 9, 2009

कुसुम मावशी

सोमवार दि.१४/९ रोजी संध्याकाळी कुसुम मावशी कालवश झाली.महाजन्यांच्या घराण्यातील थोरली माहेरवाशीण गेली. मावशी त्या मानाने तब्येतीने खुपच चांगली होती.शेवटपर्यंत हिंडत फिरत होती. अंघोळ आदि आन्हिकेहि तिची तिच करत होती.पण तरीही वयपरत्वे त्रास होतोच. प्रत्येकजण आपापल्या व्यापात या लोकांसाठी द्यायला वेळ कुणाकडे नाही आणि त्यांना वेळेशिवाय दुसऱ्यांकडून काहीच नको असते.मग त्यांची तगमग आणि आपल्या सरख्यांची अगतिकता.
मावशी खुपच हौशी होती. आमचे दादा तर तिला हौशी मावशीच म्हणत.जगण्यातला आनंद भरभरुन घ्यायचा आणि इतरांनाही तो मिळावा म्हणून मदत करायची हा तिचा स्वभाव होता आणि तिला कुणी इतर, परके नव्हतेच.सगळे तिचे स्वतःचेच होते.म्हणून स्वतःला सख्खे भावंडं नसताना चुलत,मावस,आते भावंडांना तिने जवळ केले.आणि आपल्या आठ मुलांच्या संसाराच्या पसाऱ्यात सगळ्यांना सामावून घेतले.शुक्रवार पेठेतल्या मावशीच्या घराचे दार कायम उघडेच असे.घरात अखंड माणसांचा राबता.जेवायच्या वेळी तिच्या घरी गेलेली व्यक्ती जेवल्याखेरीज बाहेर जात नव्हती.किंबहुना कुठल्याही वेळेला तिच्या घरी गेलेली व्यक्ती जेवल्याशिवाय जात नव्हती. मंगल वहिनी, निर्मला वहिनी यांच्या मंगळागौरी मला आठवतात.रात्री दहा पर्यंत जेवणं चालली होती नंतर रात्रभर जागरणं. रात्री २-३ नतंर खेळून दमल्यावर गप्पा, नकला मजाच मजा.सगळे सण -वार कार्यक्रम अगदी दणक्यात.सतत कुणाना कुणाला तरी केळवण, कुणाचे डोहाळ्जेवण मावशी अगदी प्रेमाने करायची.महाजन्यांच्या घरातील सर्वांच्या अडीअडचणी मावशीच्या घरी सोडवल्या जात. आम्ही सहकारनगर मध्ये रहायचॊ.सुट्टीच्या दिवशी गावात कधी गेलो तर मावशी कडे जायचोच.आईला तर ती तिच्या आईच्या जागीच होती.एक तर आईपेक्षा ती असेल १८ ते २० वर्षांनी मोठी.आई लहानपणापासून तिच्याकडे बरेचदा राहिलेली.कुसुमताई तिला लहानपणी परकर पोलकं शिवायची हे ती कायम सांगते.आईच्या छोट्या मोठ्या हौशी कुसुमताईने पुरविल्या.अण्णांबद्दल तर आईला कोण अभिमान! कुसुमताई आणि अण्णांना आईच्या आयुष्यात फार मोठं स्थान आहॆ.तिच्या सगळ्या सुख दुःखाच्या प्रसंगांना ते कायम धावून आलेले आहेत. त्यामुळे सहाजिकच आमच्याही मनात कुसुम मावशीचे स्थान वेगळॆच, शब्दात न सांगण्याजोगे.आईला पुरानंतर त्या उभयतांनी आणि श्रीकांतदादा,अरुण दादांनी जी मदत केली त्याला तोड नाही.त्यांनी दिलेला मानसिक आधार फार मोठा होता.आमच्या तिघींच्या लग्नातही त्यांनी आपल्या घरचे कार्य समजून मदत केली, हे ऋण आम्ही कधीच विसरु शकत नाही, ते न फेडता येणारे आहे आणि त्यात राहण्यातच समाधान आहे.मावशीने सगळ्यांसाठी इतकं केलयं कि तिच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थनेची आवश्यकता नाही.
मावशीला शिकायला नाही मिळाले पण शिक्षणाविषयी तिला फार आदर.स्वातीचा लेक अमेरीकेला गेला, मंदाची वृषाली पॅथॊलॉजी शिकली, दादाचा लेक लंडनला गेला हे केवढ्या अभिमानानं ती सांगत असे.तिची मुलेही हुशार होती, परिस्थितीमुळे त्यांना म्हणावे तसे शिकता आले नाही.पण विद्यापिठातल्या मोठ्या डिग्र्य़ा नसल्या तरी जगाच्या शाळेत पहिले नंबर मिळतील असे सगळ्यांचे कर्तॄत्व आहे.कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची धमक, पटकन कुणाच्याही उपयोगी पडण्याची वृत्ती,पडतील ते कष्ट करण्य़ाची तयारी,धडाडी आणि जीवनाचा आस्वाद घेण्याचा स्वभाव असे अत्यंत दुर्मीळ गुण त्या सगळ्यांमध्ये पुरेपूर आहेत. त्यांच्या घरी मी असंख्य वेळ गेलीय, पण कुणी कधी दुर्मुखलेला, वैतागलेला , हताश्, निराश नाही बघितला.पटले नाही तर एकमेकांशी भांडतील,आरडाओरडा करतील आणि नंतर पुन्हा एकत्र येतील, उगीच एखाद्याबद्दल मनात राग धरुन कुढणॆ,कोणाच्या बद्द्ल मनात किल्मिश् बाळगणे नाही.वरवर् एखाद्याशी गोड बोलणे आणि पाठीवर त्याला शिव्या घालणॆ असा प्रकार नसल्याने मावशीचे घर कायम प्रसन्न असते. आई वडिलांकडून त्यांना मिळालेल्या या सुसंस्काराच्या ठेवीची कुठल्याही इस्टेटिशी तुलना होवूच शकत नाही.मावशी आणि अण्णांचे गुण , संस्कार जपणारी आमची हि भावंडे आहेत. मावशीची उणीव त्यामुळे जाणवणार नाही. मात्र त्यांचे अश्रू पुसण्याइतके आमचे हात समर्थ नाहित याची फार खंत वाटते.