Monday, October 12, 2009

सल

पटवर्धन बागेतल्या गजबजलेल्या रस्त्यांतून जाताना, तीस पस्तिस वर्षांपूर्वी मी तिकडे येत होते, असे मुळीच वाटत नाही. दर दोन वर्षांनी बदलणऱ्या पुण्यात जन्मापासून राहून देखील कित्येक भागात बऱ्याच काळाने गेल्यावर भंजाळायला होतं. बंगले पाडून मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात, गल्ल्या जावून रुंद रस्ते बनतात.ओळखीच्या खुणा नष्ट होतात.
पटवर्धन बागेत रामकाकांच घर होतं, रामकाका माझ्या वडीलांचे, दादांचे बालमित्र. त्यांचे वडील दादांचे शाळेतले गणिताचे सर.त्यामुळे दर दोन -तीन महिन्यात त्यांच्याकडे दादांची चक्कर असायची. त्यावेळी फोन नसल्याने एकमेकांकडे भेटायला जाणे चालायचे. रामकाकाही अधूनमधून आमच्याकडे येत. त्यावेळी सहकारनगरमधून दादांबरोबर मी कधी चालत तर कधी सायकलवरुन जात असे.म्हात्रे पूल त्यावेळी नव्हता, आम्ही गरवारे कॉलेजच्या कॉज-वे वरुन गेल्याचे मला आठवते.शेतजमीनीवर अधूनमधून पटावर सोंगट्या पडाव्यात तशी घरे विखुरलेली होती.रस्तेही मातीचेच.काकांचा रवी माझ्य़ापुढे आणि प्रसाद हे मुलगे आणि सीमाच्या पुढे एक वर्ष असल्याने त्या दोघांची पुस्तके आम्ही वपरायचो. ती आणायला मला दादांबरोबर जावे लागे.एरवी त्यांच्याकडे जाणे मी टाळायची , एकतर तिथे बोलायला कुणी नसायचे.दादांच्या सरांबरोबरच्या गप्पात मला रस नसे.पण येता जाता दादा भोरच्या आठवणी, सरांच्या आठवणी त्यांच्या शाळेतल्या गमती सांगत, म्हणून जायला काही वाटत नसे.दहावी नंतर पुस्तकांसाठी जाण्याचा प्रश्ण संपला , अर्थात दादा जायचेच.
मी एफ.वाय ला असताना दादांचे अकस्मिक निधन झाले.रामकाकांना कुठुन समजले कोण जाणे? पण ते लगेचच घरी आले.बालमित्राच्या आठवणी सांगून घळाघळा रडले.नंतर अधूनमधून येत राहिले.आम्हाला दादांच्या ऑफीस प्रोसिजर्स काहीच माहित नव्हत्या.कुठे अर्ज करायचे, कुणाला भेटायचे यासगळ्या बद्द्ल काका मार्गदर्शन करीत. माझ्या बहिणीला दादांच्या जागी नोकरी लावण्यासाठी सुध्दा त्यांनी बरेच प्रयत्न केले. मंत्रालयात सतत जावुन पाठपुरावा करणॆ हि किती जिकिरीची गोष्ट आहे, हे त्यातून जाणाऱ्यालाच कळेल. हे सारे काकांनी केवळ मित्रप्रेमापोटी केले.घरी आले तरी चहाशिवाय ते काही घेतही नसत. आमच्या लग्नांना ते आले. नंतर ते ही सेवानिवृत्त झाले.अधूनमधून आईकडे येत, पण फार क्वचित. त्यांच्य़ा आई,वडीलांचे निधन झाले, त्यांची बायकॊ आजारी असे, ती हि गेली. आईकडे गेल्यावर बातम्या समजत. आईकडे फोन नव्हता, त्यामुळे या बातम्या आईलाही उशीरा समजत. आई देखील आजारी असल्याने पत्र पाठवण्या शिवाय काही करु शकत नव्हती. आम्हाला ती काकांकडे जा, असे सांगायची पण आमची नोकरी, संसार ,घरातल्या रोजच्या अडचणी यात राहून जायचे. मधल्या काळात आईच्या घराची दुरुस्ती केली त्यात जुनी कागदपत्रे,वह्या ,रद्दी फेकताना काकांचा पत्ताही गहाळ झाला.
गेल्या वर्षी पटवर्धन बागेतल्या बंगल्यांच्या सोसायटीत कुणाकडे तरी जायचा प्रसंग आला, तिथे मी करमरकर कुठे राहतात , माहित आहे का? असे विचारले. माझ्याजवळ पत्ता, खुणा काहिच नसल्याने जास्त विचारता येईना,आणि त्यांनाहि सांगता येइना. पण मला सारखे जवळच ते राहत असावे असे वाटत होते. त्यानंतर एक महिना उलटून गेला असावा. मी काही कामासाठी रजा घेतली होती, आणि मुलीला घेवून बाहेर गेले होते. अचानक मला वाटले चला, आज आपण काकांचे घर शोधायचेच. पुन्हा पटवर्धन बागेतल्या बंगल्यांच्या सोसायटीतल्या लहान लहान गल्ल्यांमधून मी फिरु लागले. दिसेल त्या माणासाला विचारु लागले. माझी मुलगी मला वेड्यात काढीत होती.तिच्याकडे दुर्लक्ष करीत माझा शोध चालू होता.पाऊण तास होवून गेला होता, लेक वैतागली होती
"आई , आता बास, उगीच प्रत्येक घरात जावून विचारत बसू नको, एक तर धड पत्ता नाही जवळ, आणि त्या काकांना किती वर्षात बघितलेलं नाहीस , समोर आले तरी ओळखू शकशील का? घरी जायचं का मी जाऊ एकटी? तू बस फिरत"
" अगं, थांब, हि शेवटची गल्ली बघू आणि निघुया" असं म्हणून एका सायकलवरुन जाणाऱ्या शाळ्करी मुलाला थांबवत मी विचारले ,"अरे करमरकर कुठे राहतात माहित आहे कारे?"
"मला दोन करमरकर माहित आहेत, तुम्हाला कोणते हवेत?"
" दोन्ही घरे दाखवतोस?, प्लीज"
" हो, चला ना " असे म्हणत त्याने सायकलवर टांग टाकली.त्याच्या मागे आम्ही गेलो. एका दुमजली घरापाशी तो थांबला. मी त्याला म्हटले इथेच थांब , मी आत जावुन येते.दारात तुळशी वृंदावन होते.पुढच्या दाराला कुलूप होते, पण आशा चिवट होती घराभोवती हिंड्ताना मागचे दार उघडे दिसले जिन्यात वरच्या मजल्यावरून बोलण्याचा आवाज ऎकू आला, कामवाली बाई जिना उतरत होती.तिला विचारले,"राम करमरकरांचे हेच घर का?"
"व्हयं, वैनी कोन आलयं बघा" असं म्हणत ती बाई बाहेर पडली.मुलीने त्या मुलाला हेच घर अशी खूण केली तो मुलगा गेला.
एक नाजूक चेहऱ्याची बाई बाहेर आली.तिच्या चेहऱ्यावर प्रश्णचिन्ह.काकांची सून असावी.
"रामकाका इथेच राहतात ना? मी त्यांच्या मित्राची मुलगी, भेटायला आलीयं त्यांना" एका दमात मी सांगितले.
" हो, याना आत. बसा, पण तुम्हाला समजलेलं दिसत नाही, ते वारले नुकतेच"
" केंव्हा? काय झालं होतं?" काहीतरी विचारायचं म्हणून तोंडतून गेलं, खरतरं मनं एका मोठ्या अपराधी भावनेनं मिटून गेलं होतं. तिनं मला नाव विचारलं. पाणी दिलं.
मी तुम्हाला कधीच पाहिल नाही, पण बाबांच्या तोंडून तुमचं, तुमच्या वडिलांच वर्णन ऎकलयं... ती बोलत होती, मी पण जमेल तसं बोलत राहीले.मनातल्या मनात स्वतःलाच लाख शिव्या मोजल्या.
आज जसा वेळ घालवला तसा काही महिन्यांपूर्वी का घालवला नाही? असा स्वतःला बोल लावत राहीले. काकांना भेटले असते तर त्यांना किती बरे वाटले असते.ज्या माणसाने निरपेक्ष भावनेने आम्हाला एवढी मदत केली त्यांना उतारवयात भेटून आनंद देणे माझ्य़ा हातात होते, ते मी नाही करू शकले.मनात काकांबद्दल कृतज्ञतेची भावना कायम होती, त्यांची आठवणही येत असे. पण त्याला कृतीची जोड नाही देता आली.आज समजतयं दादांचे त्यांच्या सरांना भेटायला जाणं किती मोलाचं होतं, सायकलवरून दादा जात होते, मी मात्र गाडी असूनही गेले नाही.दरवेळी काही ना काही कारणांनी जायचे राहत गेले.
माणसाच्या असण्याला किती गृहित धरतो आपण!, त्यामुळेच भेटण्यासारख्या गोष्टी पुढे ढकलत जातॊ. न संपणाऱ्या कामांच्या फेऱ्यात अडकुन महत्त्वाची कर्तव्ये चुकतात.मागे राहते एक अखंड सलणारी, ठसठसणारी जखम!


©

5 comments:

HAREKRISHNAJI said...

nice blog

Anonymous said...

खर आहे, काही जख्मांना न भरण्याचा अश्वत्थामी शाप असतो.. पण अशाचवेळेला त्या व्यक्तीला आवडणारी एखादी गोष्ट आपण सुरु केली, वा तिच्या जवळच्यांना काही मदत केली (कोणत्याही स्वरुपात) तर नक्कीच खपली धरते! माझ्यामते ही गोष्ट नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहचेल!

Gaurav said...

Hello,
I Liked the article.
Good blog.
Very Fresh Pictures as well.

Shubhangee said...

धन्यवाद हरेकृष्णजी, निलेश सकपाळ आणि गौरव
शुभांगी

Deepak Shirahatti said...

प्रत्येक मनुष्याच्या जीवनात असं काही न काही असतच, जेव्हां त्याच्या थोड्याश्या आळसा मुळे किंवा एक छोट्याश्या कारणा मुळे अशी काही तरी च़ूक होऊन जाते।

मात्र इतक्या छान शब्दान मधे लिहिणं सर्वांना जमत नाही।

ही गोष्ट वाचल्या नंतर स्वतःच्या अश्या पुष्कळ चुका पुन्हा आठवल्या। परत एकदां मनात म्हटलं कि आता असं नाही करायचं।