Friday, July 23, 2010

गावाकडच्या गोष्टी..

(माझ्या आईचे माहेरचे कुटुंब मोठे , तशी जुन्या काळातील सगळीच कुटुंबे मोठीच असत, एकत्र राहत असल्याने त्यांच्यात संबंध असत, भांडणे, भाऊबंधक्याही असत.तसेच माया, प्रेमही असे. माझ्या आईकडून तिच्या घराण्यातील सगळ्या काका-आत्यांच्या, मामा मावशांच्या कथा मी वारंवार ऎकलेल्या आहेत.
सध्या आई आजारी असते, कंपवाताने ती घराबाहेरही पडू शकत नाही.रेडीओखेरीज दुसरी करमणुक तिला नसते, तिच्याशी बोलताना आजार सोडून बोलणे कठीण असते, मग परवा मी पुन्हा तिला तिच्या बालपणात नेऊन त्या आठवणींमध्ये तिला रमवण्याचा प्रयत्न केला त्यातुन तिचा वेळ चांगला गेलाच पण मला देखील काही गोष्टी नव्यानेच समजल्या.तिने सांगितलेल्या काही घटना या तिलाही केवळ ऎकुनच माहित आहेत, आता तिच्या घराण्यातली सगळ्यात मोठी अशी तिच शिल्लक आहे, बाकिची मंडळी तिच्याहून लहानच असल्याने या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहतील. गोदुची कथा त्या पैकीच एक. या गोष्टी ऎकताना मला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे तिला तर नाहीच माहित पण ती कुणालाच माहित असणार नाहीत. तिने सांगितलेल्या गोष्टीमंधले कच्चे दुवे कल्पनेने जोडण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा कथानकांवर खर तर चांगल्या मालिकाही बनू शकतील, पण सध्या तरी त्या ब्लॉगवाचकांपर्यंत पोचाव्यात या साठी हा लेखन प्रपंच.....)




पुरोहितींकडच्या लग्नाला माई गेल्या होत्या. थोरामोठ्यांच्या तोलाचे कार्य होते. त्यामध्ये एक त्यामानाने साध्या पातळात लगबगीने वावरणारी मुलगी माईंच्या तीक्ष्ण नजरेने हेरली. मुलगी खरोखरीच नक्षत्रासारखी होती. माईंचा काशीनाथ नुकताच एम.एस्सी. परीक्षा पहिल्या वर्गात पास झाला होता. त्याच्यासाठी मुली सांगून येत होत्या.कुणाची पत्रिका जुळायची नाही, तर कुठे मुलगी पसंत पडायची नाही. पहिली सून घराला योग्य मिळाली कि पुढचे सारे सुरळित होईल अशी माईंची धारणा होती.

माईंजवळ येवून दोघी-तिघींनी आपल्या मुली, नाहीतर भाच्या,पुतण्य़ांची गुणवर्णने ऐकवली. एक दोघींनी पत्रिकाही दिल्या. पण मघाची मुलगी माईंनी मनातल्या मनात काशीनाथ साठी पसंतच केली होती जणू, इतरांच्या बोलण्याकडे त्यांचे फारसे लक्षच नव्हते. पुरोहितांच्या मालू बरोबर ती हळदी-कुंकू देत होती.मालूला त्या म्हणाल्या ,’अगं हळद-कुंकू लावून झाल्यावर ये गं, तुझ्याशी बोलायचयं’.मालू अर्ध्या तासात माईंजवळ आली.
’काय माई, काय काम काढलसं?’
’तुझ्या बरोबर अत्तर लावणारी मुलगी कोण गं?’
’ती वसुधा, आमच्या भालूमामाची धाकटी मुलगी.’
’काय करते? कुठे असते?’
’ती मधू मामांकडे असते मुंबईला, मामा वारले ना तेंव्हापासून. कॉलेजला जाते, इंटरला आहे शिवाय नोकरी पण करते’
माईंनी पुरोहित वहिनींकडून वसुधाची पत्रिका मागवली, पत्रिका नव्हतीच त्यांच्याकडे, वसुधा दोन वर्षाची असताना तिची आई गेली होती.भालूमामांनी दुसरे लग्न केले नव्हते. वसुधाची मॅट्रीकची परीक्षा झाली आणि भालूमामा अचानक वारले.हृदय-विकाराचा झटका असणार, त्या वेळी रोगाचे नाव माहित नव्हते. वसुधाला तिच्या काकांनी मुंबईला नेले. मुलगी हुशार होती,गुणी होती.मात्र तिला आई-वडील नव्हते. पहिल्या लेकाच्या लग्नात हौसमौज करुन देणारे व्याही नसणार एवढी एक गोष्ट सोडली तर मुलीत नावं ठेवायला जागा नव्हती. माईंनी पुरोहितींकडे निरोप पाठवून वसुधाला घरी बोलावून घेतले. त्या आपल्या यजमानांजवळ आणि काशीनाथजवळ मुलीबद्दल बोलल्या होत्या. त्यांच्या यजमानांचा काचकामाचा व्यवसाय होता, व्यवसायाचा व्याप ते एकटेच बघत असल्याने प्रपंचाची सगळी जबाबदारी माईंवर होती आणि माईंच्या कर्तबगारीवर त्यांचा पूर्ण विश्र्वास होता.घरातले लहानमोठे निर्णय माई घेत त्यात ते ढवळाढवळ करीत नसत.

वसुधाला घेवून पुरोहित वहिनी आल्या.दाखविण्य़ाचा कार्यक्रम झाला. पाहुण्यांशी चार शब्द बोलून माईंचे यजमान नाना, कामासाठी बाहेर पडले. काशीनाथने तिला चार प्रश्ण विचारले. काशीनाथला मुलगी पसंत असावी असे माईंना वाटले.एक-दोन दिवसांनी त्याला त्यांनी विचारले.
"आई, मला अजून पुढे शिकायचे आहे, इतक्यात लग्नाचं तू काय डोक्यात घेतलसं?"
"तू आता नोकरीला लागलास.वडीलांच्या धंद्यात लक्ष घालायच नाही म्हणालास, कशाला आम्ही अडकाठी केली नाही, एवढा एम.एस्सी.झालास, अजून किती शिकायच? आणि संसार कधी करायचा?,तुझ्याबरोबरची मुले लग्न करुन संसाराला लगली, अरे इतकी चांगली,शिकलेली मुलगी आहे. नको जास्त विचार करुस.आणि शिकायच तर नंतरही येईल शिकता. तुझ्या मनातलं मी ओळखलय, आवडलीय ना तुलाही वसुधा ! कळवून टाकते तिकडे मी. लवकारात लवकरचा मुहूर्त बघुया"
माईंनी काशीनाथचा होकार गृहित धरुन पुढल्या तयारीला सुरुवात केली.नानांनाही मुलगी पसंत होती.बाकी देण्याघेण्य़ाला त्य़ांचा पहिल्यापासून विरोध होता. माईंना वसुधा विषयी आपुलकी वाटायच एक कारण म्हणजे त्यांची गोष्ट तिच्यासारखीच होती. त्यांच्यातर जन्मानंतर का्ही तासात त्यांची आई गेली. मामीनेच त्यांना वाढविले. त्यांचे वडील त्यांना आजोळी भेटायला येत, पण त्या लहानपणी वडीलांबरोबर न गेल्या्ने त्यांना ते घर परकेच राहीले,आजॊळीच त्या वाढल्या, पुढे त्यांच्या वडीलांचे दुसरे लग्न झाले,मग त्यांचे येणे कमी झाले. माईंच्या लग्नाच्या आधी दोन वर्षे त्यांचे वडीलही गेले. त्यांच्या मामानेच त्यांचे कन्यादान केले.नाना लग्नाच्या वेळी नोकरी करीत होते, पण त्यांचा स्वभाव धडपडा होता, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर काचेचा कारखाना काढला व अतिशय मेहनतीने तो नावारुपाला आणला.अर्थात माईंच्या समर्थ साथीशिवाय हे शक्य झाले नसते.माईंनी घरातल्या सगळ्या गोष्टींची सर्व जबा्बदारी घेतलीच, शिवाय धंद्यातल्या चढ उतारांशी सामना करताना नानांना संपूर्ण साथ दिली. सुरुवातीच्या अडचणीच्या काळात त्या काटकसरीने रहात होत्या, धंद्यात बरकत आल्यावरही त्या मातल्या नाहीत, घरातली सर्व कामे त्या स्वतः करत. एकवर्षी दिवाळीत कुठलीशी मोठी ऑर्डर रद्द झाल्याने कारखान्याचे बरेच नुकसान झाले होते. दिवाळीत बोनस मिळणार नाही अशी बातमी पसरल्याने कारखान्यात वातावरण तापले होते.नानांची अस्वस्थता माईंना जाणवली,आपले दागिने त्यांनी नानांपुढे आणून दिले. आणि म्हणाल्या
’ हे माझे दागिने घ्या आणि लोकांच्या बोनसची व्यवस्था करा’ त्यांच्या माहेरहून आलेले आणि नानांनी हौशीने केलेले सगळे दागिने त्यात होते
’अगं , नको, तुझं स्त्री-धन आहे ते, मला ते घ्यायचा आधिकार नाही’
’वेळेला उपयोगी यावेत म्हणून तर असतं ना ते ! दागिने काय परत करता येतील. आज कामगारांना बोनस मिळाला कि ते जोमाने कामाला लागतील, नुकसान भरपाई झाली की त्यांचे संसारही मार्गी लागतील आज तुमच्या कारखान्यावर कित्येकांचे संसार चाललेत , त्यांचे शाप घेवून मला हे दागिने काय सुखं देणार?’
पत्नीच्या मनाच्या मोठेपणानं नाना भारावून गेले.त्यामुळेच तिच्यावरचा त्यांचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला.

काशीनाथचे लग्न थाटात झाले. वसुधाला माईंनी घरच्या रितभाती शिकवायला सुरुवात केली.त्यांचे कुटुंब मोठे होते.आला गेला सतत असे.त्या काळी सधन लोकांकडे शिक्षणासाठी मुले असत, वारावर जेवणारे विद्यार्थी असत.कुणी गावाकड्ची निराधार म्हातारी,एखादा लांबचा अपंग नातलग यांना ठेवून घ्यायची पध्दत होती. ’सामाजिक बांधिलकी’ हा शब्द न वापरता लोक ती मानित. पैसा जास्त असला तरी त्यांचे रहाणीमान सर्वसामान्यांप्रमाणेच असे.फक्त शिक्षणासाठी त्यांच्या मुलांना त्रास पडत नसे, आणि त्यांच्या बायकांच्या अंगावर जरा जास्त दागिने असत.वसुधा सासरी चांगलीच रुळली.काशीनाथसारखा हुशार,देखणा नवरा आणि माई-नानांसारखे प्रेमळ सासुसासरे.गोकुळासारख नांदत घर, सुख -सुख म्हणजे अजून दुसरं काय असत? तिच्या मुळच्या सुंदर रुपाला आणखीच झळाळी आली.

वसुधाचे बाळंतपण माईंनी सासरीच करायचे ठरविले.तिचे डॊहाळजेवण थाटात केले.वसुधाला मुलगा झाला.मुलगा तीन महिन्यांचा झाला.शंतनू असे त्याचे नाव ठेवले. काशीनाथने अचानक अमेरीकेला उच्च शिक्षणाला जाण्याचा निर्णय जाहीर केला.त्या दृष्टीने गेले काही महिने त्याचे प्रयत्न चालू होतेच.मात्र घरात त्याने कुणालाच काही सांगितले नव्हते, अगदी वसुधालादेखील.ऐकल्यावर वसुधा जरा खट्टू झाली, नाही म्हटले तरी तिला न सांगता हा निर्णय त्याने घेतला याचे तिला दुःख झाले.आपण काही इतक्या अडाणी नाही, शिवाय त्यांच्या प्रगतीच्या आड येण्य़ाचा कोतेपणाही आपण केला नसता, मग आपल्याला एका शब्दाने सांगावेसे का नाही वाटले यांना? माईंना सांगितल्याशिवाय नाना कुठलीच गोष्ट करीत नाहित.
रात्री काशीनाथ बाळंतीणीच्या खोलीत आला. पाळ्ण्यात पहुडलेल्या शंतनुला खेळवताना त्याचे लक्ष वसुकडे होते.ती मुद्दाम पाठ करुन झोपली होती.
बाजेच्या कडेशी बसत तो हलक्या आवाजात म्ह्णाला ," आमच्याशी बोलायचं देखील नाही का?"
"बोलण्यासारखं काही आहे का?" वळत वसुधा म्हणाली
रडून रडून तिच्या नाकाचा शेंडा लालबुंद झाला होता.
"अगं मी कुठे रणांगणावर चाललो नाही, शिकायला जातोय अमेरीकेला, इतकं रडायला काय झालं? "
"त्यासाठी नाही मी रडत, एवढी मोठी बाब, तुम्ही मला एका शब्दानं सांगितली नाही त्याच वाईट वाटतयं,"
"एवढचं ना, अगं लग्नाच्या आधीपासून मला तिकडे शिकायला जायचे मनात होते, सहा महिन्यांपूर्वी माझा मित्र तिकडे गेला त्याच्याशी पत्रव्यवहार करुन तिकडच्या विद्यापिठांशी संपर्क साधला,शिष्यवृत्ती मिळाली तरच जायचे असे ठरवले होते.तिकडून उत्तर यायला दोन तीन महिने गेले, तेंव्हा तू नुकतीच बाळंतीण झाली होतीस त्या आधी तुझी प्रकृती नाजूक होती म्हणून मुद्दाम नाही सांगितलं. हे पत्र आल्याबरोबर लगेच सांगितलच ना. समजल आता का नाही सांगितलं की अजून आहेच राग? तुम्हा दोघांना सोडून जायचं जिवावरही आलयं काय करू, एवढी चांगली संधी परत मिळेलच असं नाही"
"आम्हालाही न्या मग तुमच्या बरोबर" राग विसरुन वसुधा निरागसतेने म्हणाली
"नेल असतच गं, पण सध्या मला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिघांच कसं भागणार? आता आपल्या खर्चासाठी नानांजवळ पैसे मागण.."
" नको, नको, अहो मी गमतीने म्हणाले,तुम्ही अगदी निर्धास्त पणे जा, आणि लवकर शिकून परत या, आम्ही तुमची वाट बघू, , आपल्या शंतनुचा पायगुण बर हा "

पन्नास-साठ वर्षांपूर्वी अमेरिकेत शिकायला जाणं आजच्या इतक सहज नव्हतं, फार थोड्य़ा संधी होत्या आणि फार कमी लोक जात.संपर्क माध्यमं कमी असल्याने इतक्या दूर जाणे त्रासदायक वाटे. काशीनाथच्या जाण्याची तयारी झाली.त्याला निरोप द्यायला मुंबईला घरचे सगळे गेले.
काशीनाथचे पहिले पत्र आले.तिकडचे वर्णन वाचून सगळे अचंबित झाले.आल्यागेल्याला माई कौतुकाने काशीनाथच्या पत्राबद्दल सांगत.वसुधाही त्याला पत्रे लिहू लागली.पत्र मिळायला महिना -पंधरा दिवस लागत.काशीनाथचे पत्र आले कि त्याच्या पत्राची पारायणे करताना रात्री निघून जात. एरवी सगळा वेळ शंतनुच्या संगोपनात आणि घरकामात पटकन जाई.म्हणता -म्हणता दोन वर्षे जातील वसुधा रोज मनाला सांगे.

सुरुवातीला नियमित पणे येणारी काशीनाथची पत्रे उशीरा येवू लागली.वसुधाच्या दोन-तीन पत्रांनंतर त्याचे एखादे पत्र.ते ही त्रोटक. आता परीक्षा जवळ आली असेल, अभ्यासाचा ताण असेल, नसेल होत वेळ लिहायला. वसु मनाशी म्हणे.शंतनू चालायला लागला.त्याचा वर्षाचा वाढदिवस झाला.त्याचा स्टुडीयोत फोटो काढून त्याच्या बाबांना वसूने पाठविला. आता तो बोलू लागला, त्याच्या बोबड्या बोलांने घरादाराला बोबडे केले.दिवसा मागून दिवस, महिने जात होते. दोन वर्षे उलटून गेली.काशीनाथची पत्रे अगदी क्वचित येत, त्यात परत येण्याची भाषा नसे.पत्रातला सूरही किंचित परका,दूरचा वाटे. वाट बघण्य़ाशिवाय कुणाच्याच हातात काही नव्हते.

माईंच्या घरात बाकीची मुलेही मोठी होत होती, त्यांची शिक्षणे चालू होती.आता दुसऱ्या रघुनथचे लग्न ठरले. वसू लग्नाच्या तयारीत बुडली.शंतनू तीन वर्षाचा झाला.कशीनाथच्या येण्य़ाचे चिन्ह नव्हते.त्याच्या काळजीने,विरहाने वसू खंगत होती.तिचे दुःख माईंना जाणवत होते. त्या काही करु शकत नव्हत्या. उपास-तापास,नवस सगळं चालल होतं, बाहेरुन आनंदी चेहऱ्याच्या माई वसूला धीर द्यायच्या पण मनातून त्याही नाराज असत. दुसरी सून आली. माईच्या लेकीचेही लग्न झाले.नानांचे वय होत चालले. तरुण वयात अपार कष्ट केल्याने आता थकल्यासारखे होई, नाही म्हटले तरी त्यांनाही काशीनाथच्या न येण्य़ाची काळजी होतीच.

वसूने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईला नानांच्या भाड्याची जागा होती.तिथे त्यांची विधवा बहीण तिच्या मुलीबरोबर रहात असे.मुलगी सासरी गेली होती आणि ती बहीण म्हातारपणामुळे माईंकडे येवुन राहिल्याने ती जागा कुलूप लावून ठेवली होती.वसूने तिकडे जायचे ठरविले. तिला सुदैवाने शाळॆत नोकरी मिळाली. शंतनुला शाळेत घातले.माई नाहीतर तिची नणंद अधूनमधून जात. तिला मुंबईला पाठविणे माईंच्या अगदी जिवावर आले होते. पण तिचे म्हणणेही त्यांना पटले, "दीरांच्या वाढत्या संसारात पुढे मागे वाद होण्यापूर्वीच मार्ग काढलेला बरा. आपले हातपाय धड आस्ताना, आपल्या जवळ शिक्षण असताना दुसऱ्याच्या आभार-उपकारावर किती दिवस जगायचे? वेळेला मदत मागणे वेगळे आणि सतत अवलंबून राहणे वेगळॆ! शंतनुला समजायच्या आत मी पायावर उभी राहते, तुमच्या आधारची गरज आहेच, पण उद्या तुमच्या म्हातारपणाला मला तुम्हाला आधार देण्यासाठी मला बळकट व्हायला हवे" असे वसू त्यांना म्हणाली होती.काशीनाथचे न येणे तिने आता मनाने स्विकारले होते.

मधल्या काळात माईंचा दूरचा पुतण्य़ा अमेरिकेला कामासाठी जाणार असल्याचे नानांना समजले, त्यांनी त्याला काशीनाथची चौकशी करण्य़ाची विनंती केली.त्याने काशीनाथचा पत्ता शोधून काढला.त्याला भेटला. काशीनाथने तिकडच्याच मुलीशी लग्न केले होते, राजवाड्यासारख्या घरात तो रहात होता.विद्यापिठात तो प्रोफेसर होता. बंगला, गाडी असे वैभव होते. त्याच्या बायकोसमोर काशीनाथला तो काही विचारु शकला नव्हता.

ही सगळी बातमी समजल्यावर माईंच्या घरावर दुखाःचे सावट आले.वसूलाही हि बातमी कुणाकडून तरी समजली.दुःख करण्याच्या पलीकडे तिची अवस्था झाली.आता शंतनूकडे बघून सगळा राग,दुःख गिळायला हवे होते.शंतनू मोठा होत होता. वसूने नोकरी सांभाळून बी.ए, एम.ए. च्या परीक्षा दिल्या. माईंनी शंतनूची मूंज करायचे ठरविले, त्यांनी वसूला पुण्याला बोलावून घेतले. मुंजीची सगळी तयारी केली होती. मातृभोजनाची वेळ झाली. वसूला सुंदर साडी आणि साखळी देत माई म्हणाल्या,"वसू ही साडी नेसून मातृभोजनाला बैस"
वसूला हुंदकाच आला.
"डॊळे पूस वसू, माझा मुलगा करंटा, एवढी गुणी,सुंदर बायकॊ , मुलगा सोडून गेला, तुझी त्यात काय चूक? आजचा मान तुझाच आहे.मी तुझ्या सदैव पाठीशी आहे, मुलगा शिकून मोठा होईल, तुझे पांग फेडेल माझा तुला कायम आशीर्वाद आहे"

काळ कुणासाठी थांबत नसतो, नाना गेले.कारखाना आता रघुनाथ बघत होता. माई बहुतेकवेळा वसू कडेच असत. त्याही थकल्या होत्या.आजारी पड्ल्या. शेवटच्या आजारात त्या वसूजवळाच होत्या, तिने त्यांची सेवा केली.
"मी गेल्याचे काशिनाथला कळवू नका,त्याने मला तिलांजली देखील द्यायला नको. मी त्याला कधीही माफ करणार नाही" माईंचे हे अखेरचे शब्द होते.


वसूताई आता शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या. शंतनू अतिशय बुध्दिमान होता. एस.एस.सी परीक्षेत तो बोर्डात आठवा आला. त्याला मेडीकलला प्रवेश मिळाला.आता तो एम.बी.बी.एस.ची परीक्षा होवुन एम.एस. ही उत्तम रित्या उत्तीर्ण झाला होता.घरात नुकताच टेलीफोन घेतला होता.शंतनुला वेळी-अवेळी कॉल आला कि जावे लागे, त्याला उशीर झाला कि वसूताई काळाजी करीत, म्हणून त्याने नोकरी लागल्याबरोबर आधी टेलीफोन घेतला.

रविवारची संध्याकाळ, शंतनू बाहेर पडायच्या तयारीत होता.त्याचे लग्न ठरले होते, वर्गातल्याच मुलीशी त्याचे जमले होते.आज बरेच दिवसांनी दोघांना मोकळा रविवार मिळाला होता. फोनची बेल वाजली वसूताई देवापाशी दिवा लावत होत्या. निघता निघता शंतनूने फोन घेतला.
"हॅलो, मी रघुनाथ बोलतोय पुण्याहून "
"बोला काका"
"अरे शंतनू आई आहे का?"
" ती देवापाशी दिवा लावतीय काही निरोप आहे का? "
" अरे काशीनाथदादा, तुझे बाबा , येतोय इकडे, पंचवीस वर्षांनी त्याने सगळ्यांना एकत्र बोलावलय, पुढल्या रविवारी,म्हणून फोन केला होता"
"काका , तुम्ही भेटा त्यांना आम्ही येणार नाही.मी तर नक्कीच नाही आणि आईसुध्दा नाही येणार, इतकी वर्ष आम्ही राहिलोच ना त्यांच्या शिवाय आता त्यांना भेटायची अजिबात इच्छा नाही, ठेवू फोन?"
"अरे शंतनू, तुझा राग मी समजू शकतो पण वहिनींची इच्छा असेल तर.. "
"तिची पण नाही इच्छा..थेवतो फोन मी"
शंतनूने रागानेच फोन ठेवला. वसूताई बाहेर आल्या.त्यांनी आतून शंतनूचे बोलणे ऐकले होते
"आई काकांचा फोन होता, काशीनाथ येणार असे ते म्हणत होते आपल्याला भेटायला बोलावले होते तुझ्यावतीनेही मी त्यांना येणार नाही म्हणून कळविले आहे."
"असा नावाने उच्चार करु नये वडील आहेत ते तुझे"
"आई , मी त्यांना बघितले नाही.माझी आई-बाबा तूच होतीस आता सिनेमात दाखवतात तसे तुला त्यांच्या सोबत जायचे असेल तर जा, पण ज्या माणसाने तुला आयुष्यभर मनःस्ताप दिला त्याला भेटायची गरज नाही असे मला वाट्ते."
"मी नाही जाणार, तू म्हणतोस ते अगदीच काही खोटं नाही.आता त्यांना भेटून काय होणार? माझं मन पार मरुन गेलेलं आहे पण नाही गेले तरी बरं दिसणार नाही लोक काय म्हणतील?"
" हा विचार त्यांनी केला का? तू इकडे किती त्रासात दिवस काढलेस तेंव्हा त्यांनी काय केलं? आणि तसच वाट्त असेल तर आजी आठव, ती काय म्हणायची शेवटी ती असती तर कशी वागली आसती? आई आणि त्यांच्यासाठी मन मारायची काही जरुर नाही, मी आहे ना! आता तू अगदी आरामात रहा. हिंड , फिर मजा कर मी जाउन येतो"
शंतनू बाहेर पडला. वसूताई विचार करत बसल्या.खरचं आता त्या माणसाचा राग नाही पण त्याला भेटावं असंपण वाटत नाही.एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल वाटते तशी निर्विकार भावना आहे त्यांच्याबद्दल.शंतनूच मन मोडून जाण्यात काही अर्थ नाही. वडिलांबद्दल काही वाईट न सांगूनसुध्दा त्याच्या मनात त्यांच्याबद्दल आढीच राहिली.शाळेत त्याने मुलांना त्यांच्या वडीलांबरोबर बघितले असेल.आपले वडील नसतात, त्यांची पत्रे येत नाहीत.याचा त्याच्या बालमनावर परिणाम झालाच असेल.हुशार व समजूतदार असल्याने त्याने कुणाला तसे जाणवु दिले नाही.काशीनाथला भेटायला वसूताई आणि शंतनू गेलेच नाहीत.

महिनाभर काशीनाथ पुण्य़ात होता. वसु-शंतनू येतील असे त्याला वाटत होते, पण ना ते आले ना त्यांचा फोन, काशीनाथला वसूला तोंड दाखवायला लाज वाटत होती. त्याने केलेला अपराधच तेवढा मोठा होता.पण जाण्यापूर्वी एकदा तरी तिला भेटून तिची माफी मागायची इच्छा होती आणि शंतनुलाही बघायचे होते, त्याचा वर्षाच्या वाढदिवसाचा फोटो वसूने पाठविला होता, त्यानंतर काही संबंधच राहीले नव्हते(आपणच ठेवले नव्हते) त्याच्या हुशारीच्या गोष्टी सगळ्य़ांकडून ऐकलेल्या होत्या.

जायचा दिवस आला.मुंबईला पोचताना संध्याकाळ झाली होती.रात्री दहा वाजता विमानतळावर पोचायचे होते.रघुनाथ सोडायला आला होता.मनाचा हिय्या करुन काशीनाथ त्याला म्हणाला.
"वसू तेवढी नाही भेट्ली, निदान फोनवर तरी बोललो असतो"
"अरे त्यात काय अजून आहेत दोन-तीन तास फोन करु त्या दुकानातून घरी असतील तर जाऊनच येवु ना"
दुकानापाशी गाडी थांबवून रघुनाथने फोन लावला.वसूताई नुकत्याच शाळेतून येवुन टेकल्या होत्या.तो फोन वाजला, त्यांनि फोन उचलला
"हॅलो,मी रघुनाथ बोलतोय , कोण वहिनी का? काशीनाथदादा आणि मी आत्ता येतोय मुंबईत तुम्हाला भेटायला यायच होत..."
वसुताईना क्षणभर काही सुचेना. त्यांना शंतनुचे त्या दिवशीचे बोलणे आठवले.माईचे शेवटले बोलणे आठवले "मी त्याला कदापी माफ करणर नाही"
एक आई जर मुलाला माफ करणार नाही म्हणते तेंव्हा त्याची चूक तेवढीच मोठी आहे. आपण कॊण त्यांना क्षमा करणार?
’सॉरी रॉंग नंबर.. "असे म्हणून वसू ताईंनी फोन ठेवला् आणि त्यांनी रिसिव्हर काढूनच ठेवला, पुन्हा फोन नको ते बोलणे देखील नको.
आत जावून पाय धुवुन त्या देवापाशी गेल्या.

रघुनाथराव पुन्हा पुन्हा नंबर फिरवत होते. फोन लागत नव्हता.
"उचलत नाही रे फोन , मगाशी एकदा रॉंग नंबर लागला, अजून घरी आल्या नसतील वहिनी, आमच्या इकडचे फोन पण ना..."
"राहू दे रघुनाथ नाही योग भेटीचा , मानी आहे ती आईसारखीच, माफ नाही करणार मला ती या जन्मी तरी"

©

10 comments:

Unknown said...

chan aahe katha.....aaavdli.......

भानस said...

कथा भावली.:)

Anonymous said...

हे काय संपली?

Unknown said...

गोष्ट वाचली.छान साधली आहे,नशिबाने कधीकधी चुकीच्या माणसांच्या गाठी पडतात जीवनात,पण असे एकाकी आयुष्य
फक्त जुन्या पिढीतील बायकाच काढू जाणे,आजकाल स्त्री स्वातंत्राच्या जमान्यात असे बहूदा एखाद्या पुरुषाच्या वाट्यास
येईल.फिटंफाट.
विद्या

SUJATA said...

I loved the story.I admire those two strong ladies, Mai and Vasu, sujata

aativas said...

आवडली तुमची कथा मला.

Shubhangee said...

Thanks to all

Ramesh Rao said...

"राहू दे रघुनाथ नाही योग भेटीचा , मानी आहे ती आईसारखीच, माफ नाही करणार मला ती या जन्मी तरी"
भेटायला जायची कल्पना कशी करवते? अति नालयक माणसाचा नमुना.

Deepak Shirahatti said...

छान आहे।

Anonymous said...

किती मन हेलावून टाकणारी कथा आहेना?
त्या माणसाला माफ नाहीच केले पाहिजे.
खूप चांगलं लिहलय आपण
पुढच्या पोस्ट साठी शुभेच्छा
जहीर