Tuesday, December 3, 2013

दैव जाणीले कुणी

कोल्हापुरला बदली झाल्याची ऑर्डर घेवुन सदानंद जागेवर येऊन बसला. प्रमोशन वर बदली होणार याची कल्पना होतीच,फक्त ठिकाण समजायचे होते. पुण्यात बदली झाली असती तर बरे झाले असते, सुरेखाला दर आठवड्याला येता आले असते, किंवा आपल्यालाही ये-जा करणे सोपे झाले असते. प्रमोशन नाकारणे हातात होते, पण कशासाठी? वास्तविक ते मिळून पगारात फार वाढ होणार नव्हती उलट घरभाडे भत्ता मुंबईचा जास्त, कोल्हापुरात कमीच होणार तो, पण प्रमोशन म्हणजे नुसती पगारवाढ नसते, आता पत वाढणार घरात आणि ऑफिसमधेही. इतरांसारखी साहेबांपुढे लाळघोटे पणा कधी जमला नाही आपल्याला. म्हणून मागच्या दोन वेळा मिळाले नाही. हे करुर साहेब फार कडक. अतिशय शिस्तीचे, त्यांच्यासमोर जायला कसे सगळॆ चळाचळा कापत.माझ्या कामावर खुष होते ते. त्यांनी चांगले सी.आर. लिहिल्याने यावेळी प्रमोशन द्यावेच लागले. बदली पुण्याला मागायची त्यांच्या समोर टापही नाही. या बाबतीत ते कसे वागतील सांगता नाही येणार. घरच्या कुठल्या अडचणी सांगितलेल्या त्यांना खपायच्या नाहीत.ते स्वतः नऊच्या ठोक्याला जागेवर हजर असत. आठ-आठ वाजे पर्यंत काम करत. ते कुणावर कधी रागावलेत,कुणाला फार आवाज चढवुन बोललेत असं नाही, पण एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वात जरब असते तशी आहे त्यांच्यात. वागणे अतिशय नेमस्त. स्वच्छ आणि चोख कारभार. साहेब असावा तर असा.
 
              सदानंद जोशी, सरकारी आधिकारी.मुंबईमधेच जन्म शिक्षण आणि इतके वर्ष नोकरी देखील. घरात इतर भावंडांपेक्षा जरा कमी हुशार. मोठा भाऊ खूपच बुध्दीमान, स्वतःच्या हुशारीच्या जोरावर आर्थिक परिस्थितीवर मात करीत शिष्यवृत्त्या मिळवित गेला. आय.आय.टी तून इंजिनियर होवुन  उच्च शिक्षणाकरीता अमेरिकेत गेला आणि तिकडेच स्थायिक झालेला. त्याच्या पाठची उमा,हुशार तेजस्वी,सडेतोड. मेडीकलची ऍडमिशन एका मार्कांनी हुकली तेंव्हा खचून न जाता फिजिओथिरपी सारखा त्यावेळी फारसा परिचित नसलेला कोर्स करुन त्यात उच्च शिक्षण घ्यायला परदेशात जावुन इकडे परत आली.मुंबईतल्या जसलोक, के.इ.एम्. सारख्या इस्पितळातुन तिची प्रॅक्टिसही सुरु होती.लग्न करायचे नाही असे तिने शिकतानाच ठरवले होते. सदानंदही हुशार होता. त्याला घरात तसे कुणी जाणवू देत नसले तरी बाहेर, शाळा-कॉलेज मध्ये नातेवाईंकांत तशी तुलना व्हायचीच आणि उगाचच त्याच्या मनात न्य़ूनगंड निर्माण झाला. मेडीकल, इंजिनियरींग सारख्या प्रोफेशनल कोर्सला न जाण्याचा त्याचा निर्णय त्यातुनच जन्माला आला. एम्.एसस्सी झाल्यानंतर नोकरीसाठी बरेच झगडावे लागले त्याला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्याने सुरु केला आणि पहिल्या परीक्षेतच मिळालेले यश त्याला अनपेक्षित वाटले.

    सरकारी नोकरी मिळाली. क्लास टू ऑफिसर म्हणून नेमणूक ही झाली. यथावकाश त्याच्या लग्नाची चर्चा घरात सुरु झाली. मोठ्या विजयने अमेरिकेतल्या मुलीशीच लग्न केले होते, उमाच्या लग्नाचा प्रश्ण् नव्हता. ओळखीतून आलेल्या बॅंकेत नोकरी करणाऱ्या सुरेखाला त्याने पसंत केले आणि संसाराला सुरुवात झाली. नोकरीतल्या कामामुळे सदानंदचा आत्मविश्वास वाढीला लागला. त्याला आयुष्यात आपणही काही करु शकतो याची जाणीव झाली. सुरेखा कनिष्ठ मध्यमवर्गातून् आलेली मुलगी होती. तिला नवऱ्याच्या शिक्षणाचे, नोकरीचे अमाप कौतुक होते. विदुलाच्या जन्मानंतर तर सुखाचे वर्तुळ पुरे झाल्यासारखे वाटले. विदुलाच्या पाठोपाठ चार वर्षांनी मुलगा झाल्यावर तर सदानंद सुरेखाचे सुखी चौकोनी कुटुंब झाले. पण विवेक दोन महिन्याचा झाला आणि त्याची मेंदुची वाढ पुरेशी नसल्याचे लक्षात आले. तसा तो अशक्तही होताच. सुखाच्या संसारात मिठाचा खडा पडावा असं घडल. आपल्या मुलाचे हे अपंगत्व स्विकारायला सगळ्या कुटुंबालाच जड गेलं. त्याच्याकरीता नोकरी सोडावी असं किती वेळा सुरेखाच्या मनात येई,पण त्याच्या आजारपणाचीच नाही तर भविष्याची तरतूदही आत्तापासून करावी लागणार या जाणीवेने ती बॅंकेत जात होती. ऍलोपॅथी बरोबर आयुर्वेदिक, होमिओपाथी अश्या सगळ्या प्रकारच्या उपाययोजना चालू होत्या. घरात खूपच पुरोगामी वातावरण असून आजकाल सुरेखा उपास-तापास करु लागली होती. तिच्या चेहऱ्यावरचा टवटवितपणा मावळला होता.काळजीने काळवंडला होता. सदानंदही जास्तीत जास्त वेळ ऑफिसमधेच काढी. बिचाऱ्या विदुलेकडे आई-बाबांचे दुर्लक्ष होवु लागले होते.आजी-आजोबा,आत्या घरी होते म्हणून बरे. ती सगळावेळ आजीजवळच असे. आत्याही घरी असले कि तिच्याशी खेळे. घरातल्या या अडचणीमुळे सदानंदला ऑफिसमधे प्रमोशन न मिळाल्याचे दुःख फारसे जाणवले नव्हते. एका मोठ्या वेदनेपुढे या बारीक दुःखाची काय मात्तबरी? शिवाय प्रमोशन वर बदली झाली असती तर सुरेखाचे किती हाल झाले असते! तीन वर्षाचा विवेक तब्येतीने सुधारला होता, पण चालु शकत नव्हता. त्याचे सगळेच करताना घरचे दमत होते.
   
    प्रत्येक सीझन बदलताना विवेक आजारी पडेच, या वेळी थंडी सुरु झाली आणि तो सर्दी तापाने आजारी झाला.मुंबईतली थंडी तरी कसली? पण त्याच्या अशक्त देहाला वातावरणातले बदल तेवढे जाणवत. सदानंदने लगेच औषधे आणली. मात्र त्याच्या आजाराने बघता बघता गंभीर रुप घेतले.श्वास घ्यायला त्याला त्रास होवु लागला. उमाने लगोलग के.इ.एम. मधे ऍडमीट केले. पण न्युमोनिया झालाय असं डॉक्टर म्हणाले. दोन दिवसातच विवेकने जगाचा निरोप घेतला. त्याच्या असण्याचा घरच्यांना त्रास होत असला तरी त्याच्या जाण्याचे दुःख ही सगळ्यांना खूपच झाले. अशा मुलांना आयुष्य कमी असते हे उमाला माहित होते. तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर त्या अश्राप जीवाचं करताना आपण कमी पडलो का? अशी वेदना तिलाही जाणवली. सुरेखाला तर दुःखाने वेड लागेल का असं वाटू लागल. सदानंदलाही फार अपराधी वाटले.या मुलापायी आपले आयुष्य उध्वस्त होतयं असा विचार त्याच्या मनात अनेकदा आला होता ! त्याच्या जाण्याला आपले हे विचारच कारणीभूत आहेत असे त्याला वाटू लागले. या सगळ्यात शांत होत्या सदानंदच्या आई. त्या माऊलीने कधीच विवेकचा राग केला नव्हता.त्याला न्हाऊ घालणे, भरवणे त्या अगदी मायेने कराय़च्या.विदुलेलाही भावाबद्दल माया वाटावी म्हणून त्याच्याशी बोलायला लावित. सुरेखालाही त्या समजावित असत.
"आपल्या घरात त्याची चांगली देखभाल होते,म्हणून देवाने त्याला इथे धाडलयं. अगं सुधारणा सुध्दा होईल त्याच्यात हळूहळू.नवीन औषधे येतील. कित्ती शोध लागताहेत हल्ली "
तो गेल्यावर त्यांना दुःख झाले पण त्यात त्याच्या वियोगाची वेदना होती.आपण त्याचे सगळे नीट केले. त्याचे आयुष्यच तेवढे त्याला काय करणार? अशी त्यांनीच सगळ्यांची समजुत काढली.

    दिवस उलटु लागले तसे विवेकच्या मृत्युचे दुःख कमी होत गेले.सगळॆजण आपापल्या कामाला लागले. सदानंद कामावर जाऊ लागला. त्याच सुमारास करुर साहेब सदानंदच्या ऑफिसमध्ये आले. साहेबांमुळे ऑफिसचे वातावरण बदललेच.सगळा स्टाफ वेळेवर येवु लागला. कामे भराभर उरकु लागली. सदानंदवर त्यांचा विशेष लोभ होता.त्याची कामातली तत्परता ,कमी बोलणे, कुठल्याही नव्या कामाला आवडीने सुरुवात करणे ह्यामुळे दोघांची वेव्हलेंथ जुळली. त्याला इतकी वर्षे प्रमोशन का दिले नाही असा त्यांना प्रश्ण पडला होता.  त्याचे उत्तम सी.आर. लिहिल्याने प्रमोशन मिळायला अडचण आली नाही.
   
  " मि.जोशी, अभिनंदन! लवकरात लवकर चार्ज घ्या. कोल्हापूरच्या ऑफिसमधेही असेच काम करा."
  "यस सर.." सदानंदला पुढे बोलवेना.नंतरचे दिवस खूप भराभर गेले.ऑफिसमधे पार्टी दिली. कोल्हापूरला जावुन कामाचा चार्ज घेतला. नंतरच्या शनिवार-रविवार मधे तेथे जागा बघितली. एक दिवस सुट्टी घेवुन थोडेफार सामान मुंबईहुन आणले. कोल्हापूरचे जीवन मुंबईच्या मानाने अगदीच निवांत. काम संपवुन घरी यावे तर घरात तरी कोण होते? सदानंदचा वेळ जाता जात नसे. वाचन करावे म्हणून लायब्ररी लावली पण वाचनाची फारशी आवड नव्हतीच त्याला. इथे कुणी मित्रही नव्हते. ऑफिसमधे हळुहळू ओळखी व्हायला लागल्या. गल्लीतल्या रिकामटेकड्या लोकांनी सदानंदचा ताबा घेतला. यातुनच पत्ते खेळायची सवय लागली. अधुनमधुन पार्ट्या सुरु झाल्या. जोशी साहेब-जोशी साहेब म्हणत तिथल्या लोकांनी सदानंदच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. आजवर बाहेरचं जग न बघितलेल्या सदानंदला वागण्यातले छक्केपंजे ठावुक नव्हते. ऑफिसमधे साहेबीपणा दाखवायची त्याला सवय नव्हती. अगदी नकळत तो दारु,पत्ते याच्या नादी लागला. ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष होवु लागले. मुंबईला जाणे कमी होवु लागले.विदुलाची शाळा,सुरेखाची बॅंक यामुळे त्यांनाही सुट्टीखेरीज इकडे येणे शक्य नसे. ऑफिसमधे सदानंदला जी पोस्ट मिळाली होती ती न मिळाल्याने कोल्हापूरातले पाटील आणि देवरे  हे दोघेजण त्याच्यावर रागावुन होतेच.त्यांनी सदानंदचा काटा काढायचा ठरवले. गोड गोड बोलुन त्यांनी आधी सदानंदचा विश्वास संपादन केला. त्याच्यासाठी घरुन डबे आणणे, त्याला जेवायला घेउन जाणे असे करुन पाटील आणि देवरे त्याचे डावे -उजवे हात बनले. त्यांनी बनवुन आणलेल्या नोट्स,बिलांवर तो न वाचता सह्या करु लागला. ऑफिसमधील एक निवृत्तीला आलेले क्लार्क पिंगळे यांनी आडून आडून सदानंदला सावध कराय़चा प्रयत्न केला. पण किती झालं तरी तो मोठा साहेब होता, लहान तोंडी मोठा घास ठरेल म्हणून जास्त बोलणे त्यांना जमले नाही.

    विनाशाची वाट निसरडी असते. त्यावरुन घसरायला फारसा वेळ लागला नाही.सदानंदला कोल्हापूरात येवुन वर्ष झाले. ऑडीट कमीटी आली. ऑडीट्मधे सदानंदच्या सह्या असलेली काही अशी बिले सापडली ज्याची खरेदी झालेलीच नव्हती. अशा कुठल्या बिलांवर सह्या केलेल्या त्याला आठवत नव्हते.पण सह्या त्याच्याच होत्या. अलगदपणे सदानंद सापडला. लहान गावात असल्या गोष्टींच्या चर्चा व्हायला वेळ लागत नाही. पेपरमधे बातमी आली. सदानंदला काही समजायच्या आत त्याची सस्पेंशनची ऑर्डर देखील आली. आजपर्यंत अतिशय ताठ मानेने जगलेल्या सदानंदला हा धक्का पचवणे केवळ अशक्य होते.  पश्चात्तापाने पार खचुन गेला तो. मुंबईला कुठल्या तोंडाने परत जायचे त्याला समजेना. आत्महत्येचा विचारही  मनाला शिवुन गेला.पण डोळ्यासमोर  प्रेमळ सुरेखा, थकलेले आई-बाबा, आधार वाटावी अशी उमा  आणि गोजीरवाणी विदुला यायची त्यांच्या मायापाशाने तो आत्मघातकी कॄत्य कराय़ला धजावला नाही इतकच.

    मुंबई ऑफिसला सदानंदच्या सस्पेंशनची बातमी समजताच त्याच्या जवळचा मित्र सुरेश हबकुनच गेला.यात काहीतरी काळेबेरे असणार हे त्याला समजले.ऑफिसमधुनच त्याने आधी सदानंदला कोल्हापूरच्या ऑफिसमधे फोन लावला. तो ऑफिसमधे असणे कठीण होतेच पण त्याचा कॉंन्टॅक्ट नंबर मिळवणे जरुर होते. मोबाईल फोन त्याकाळी आलेले नव्हते. सुदैवाने पिंगळ्यानी फोन घेतला. त्यांनी सुरेशला सदानंद किती खचलाय, त्याची कशी चूक नाही हे हलक्या आवाजात सांगितले. सुरेशला परिस्थितीची कल्पना आली त्याने उमाला फोन लावला, हि बातमी सदानंदने कळवली नसेल पण ती घरी समजणे आवश्यक होते अशा वेळी आधार असतो तो आपल्या माणसाचाच. झाल्या प्रसांगाला तोंड द्यावेच लागणार. उमालाही बातमी ऐकुन धक्का बसला.पण कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता शांतपणे विचार करण्याचा तिचा स्वभाव होता.तिने सुरेशला जास्त प्रश्ण विचारले नाहीत कि सर्वनाश झाल्यासारखे दाखवले नाही.
"संध्याकाळी घरी यायला जमेल तुला,सविस्तर बोललो असतो. मी आज रात्रीच्या बसनेच कोल्हापूरला जाईन म्हणते"
"येईन मी, पण तुझ्या आईबाबांना काय सांगशील? आणि सुरेखा वहिनींचे काय? असे कसे झाले ? तो असे करणे शक्य नाही ..."
" कसे झाले,कुणाचे चुकले यावर चर्चा करण्यापेक्षा यातून मार्ग कसा काढाय़चा हे महत्त्वाचे आहे नाही का? घरच्यांना सांगायचे मी बघेन, भेटू मग संध्याकाळी"
ठरल्याप्रमाणॆ सुरेश सदानंदच्या घरी गेला.घरातले वातावरण नेहमीइतके नसले तरी बरेच शांत होते.
" सुरेश तू म्हणतोस आणि आमचीही खात्री आहे सदानंद गैरकृत्य करणार नाही.पण तो फार सरळ वागणारा आहे,घरापासून दूर एकटा असा पहिल्यांदा राहिल्य़ाने वाईट लोकांच्या संगतीत सापडला असेल. बिलांवर त्याच्या सह्या होत्या म्हणजे त्याने न वाचता त्या केल्या असणार किंवा कोणीतरी त्याच्या सह्या केल्या असतील. दोन्ही बाबतीत त्याची चूक आहेच.पण यातून मार्ग निघु शकतो. मी आज रात्रीच निघते.सकाळी त्याच्याशी बोलेन .चांगल्या वकीलाची चौकशी करावी लागेल,इतरही काही मदत लागेल ती तू करशील ना?"
" असं विचारतेस काय उमा? मी आहेच.मी देखील वकील शोधतो"
दुसऱ्या दिवशी सकाळी उमा कोल्हापूरला पोचली.सदानंदचा चेहरा बघवत नव्हता. जागरण आणि काळाजीने तो दहा-बारा वर्षाने म्हातारा झाल्यासारखा वाटत होता.
" सदानंद काय अवस्था करुन घेतली आहेस? चहा तरी घेतला आहेस का सकाळपासून, मी आधी आपला चहा करते मग शांतपणे बोलू आपण"
"सगळं संपलय उमा, फार मोठी चूक केलीय मी कुणाला तोंड दाखवायची लायकी नाही राहिली माझी...." ओंजळीत चेहरा लपवत सदानंद रडत म्हणाला.
"आधी चहा पी. एवढं काही आभाळ कोसळलेल नाही अरे,चुका कुणाच्या हातुन होत नाहीत? आम्ही आहोत ना सगळे? सार काही ठिक होईल"
चहा प्यायला नंतर उमा म्हणाली ,"आता पहिल्यापासून काय काय घडलं ते तसच माझ्यापासून काहीही न लपवता सांग."
सदानंदने उमाला जमेल तसं सांगायला सुरुवात केली. पत्ते खेळणॆ, दारु पिणे या गोष्टी त्यांच्याकडे कधी कुणी केलेल्या नव्हत्या, सांगताना सदानंद्ला मेल्याहून मेल्यासारखे होत होते.
"इतका कसा मी घसरलो? आई-बाबांचे संस्कार ,शिकवण , तुमचे प्रेम सगळ्याचा कसा विसर पडला मला? छे, मला कुणाला तोंड दाखवावेसे वाटत नाही.या चुकीला क्षमा नाही उमा "
"शांत हो सदानंद, तू चुकलास त्यात तुझ्या इतकीच परिस्थितीही कारणीभूत आहे. आज आपण सगळे इथे असतो तर कदाचित असं घडलं नसत. तुला जो एकटेपणा इथे वाटला त्यामुळे तू वाईट गोष्टींच्या नादी लागलास, या वेळाचा सदुपयोगही तुला करता आला असता पण या सगळ्या जर... तर च्या गोष्टी आहेत त्यावर चर्चा करुन वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. झाल्या गोष्टीचा तुला पश्चात्ताप आहे,यातच तुझे भले मला दिसत आहे. आपली चूक मान्य असेल तर ती सुधारणे शक्य होते माणसाला. चुकांबद्द्ल जास्त त्रास करुन घेवु नको.आम्ही कोणी तुला त्याबद्दल सतत दोष देणार नाही. आपण सगळे मिळून या संकटाला तोंड देवु. तू बिलांवर सह्या केल्यास पण पैशाचा अपहार केलेला नाहीस.तुझे या पूर्वीचे रेकॉर्ड चांगले आहे. आपण चांगला वकील बघू त्यांच्या सल्ल्याने वागु.तू नक्की सुटशील यातून"

"नाही उमा, माझ्या अपराधाला शिक्षा व्हायलाच हवी.मी माझी चूक कोर्टातही मान्य करणार "
" असं करु नको सदानंद आपण विचारु वकिलांना.."
" उमा या बाबतीत तडजोड नाही.गुन्हेगाराला सजा हवीच"
उमाने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. सदानंदने तिचे ऐकले नाही.उत्तम वकील देवुन केस लढविण्यात आली.सदानंदला २ वर्षाची सजा आणि १०००० रु. दंड ठोठावण्यात आला.केस वर्षभर चालली. त्यात सगळ्यांनाच खूप मानसिक त्रास झाला. हाय़कोर्टात जा, वेळ पडली तर सुप्रीम कोर्टापर्यंत जा असे विजयने कळविले होते.तो वेळोवेळी पैसेही पाठवत होता. पण झालेली शिक्षा मंजुर असल्याचे सदानंदने जाहिर केले. आणि येरवड्याच्या जेलमधे त्याची रवानगी झाली.

तोंडाने चूक कबुल करणे, शिक्षा मान्य करणे आणि  वेळ आल्यावर जेलमधील कपडे अंगावर चढवणे यात फार अंतर होते. आतल्या कुठल्याच माणसाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नव्हते.होता फक्त बिल्ला नंबर. आजपर्यंत सिनेमात बघितलेल्या प्रत्यक्ष जेलचे दर्शन फारच विदारक होते ! त्या छोट्या छोट्या बराकी, ते निर्ढावलेली कैदी, ते निर्विकार कर्मचारी सगळच कसं त्रासदायक. पहिल्या दिवशी दिलेल्या ऍल्युमिनियमच्या ताटली आणि मगाकडे बघुनच सदानंदला ढवळुन आले. भात आणि कसलीशी भाजी असलेल्या त्या कळकट बादल्या बघुन त्याची जेवणावरची वासनाच उडाली. लांबच लांब वाटणारे ते दिवस आणि भकास,उदास अशा न संपणाऱ्या रात्री ! दोन वर्षे कशी जाणार होती ?

मिळालेल्या रिकाम्या वेळात गतजीवनाबद्दल विचार करण्याखेरीज करता येण्य़ासारखे काही नव्हतेच. उमाच्या "तुला जो एकटेपणा इथे वाटला त्यामुळे तू वाईट गोष्टींच्या नादी लागलास, या वेळाचा सदुपयोगही तुला करता आला असता पण या सगळ्या जर... तर च्या गोष्टी आहेत" या वाक्याची त्याला आठवण झाली.  यातुन बाहेर पडायला आपणच मार्ग काढला पाहिजे. त्याने दिनक्रम ठरवुन घेतला. लवकर उठणे,सकाळी योगासने करणे, व्यायाम करणे सुरु केले. जेलमधील लिखापढीची कामे त्याला शिक्षित असल्याने दिली होती. जेलचे रेकॉर्ड त्याने नीट केले. हळूहळू कर्मचारी वर्ग, जेलर यांचा तो लाडका बनला. कैद्यांनाही आसने शिकवणे, गप्पा मारणे त्याने सुरु केले.

    महिन्यातुन एकदा सुरेखा भेटायला येई.तो दिवस मात्र त्याला नकोसा वाटे.तिच्या भेटीची ओढ होती पण तिला तोंड दाखवणे फार जड जाई त्याला.आपल्या अशा वागण्याचा तिला किती त्रास होतोय.बॅंकेत ,समाजात तिला वावरताना कशाकशाला तोंड द्यावे लागत असेल या विचाराने तो कष्टी होई. विदुलाला ती काय सांगत असेल? सुरेखाला आपण दुःखच दिले या विचाराने तो बेचैन होई. सुरेखा मात्र तसे दाखवत नसे.तिचा चेहरा त्याला बघताच फुलून येई. त्याच्या आवडीच्या चकल्या तिने आणलेल्या असत त्याला ती खायला लावी. आई-बाबांची खुशाली सांगे.विदुलाचे फोटो दाखवी.तिला कुठले बक्षिस मिळाले त्याचे वर्णन करी. बघता बघता हे दिवस संपतील, तुम्ही सुटाल.असे सांगुन ती त्याचा निरोप घेई. सुरेखा गेल्यावर पुन्हा उदास वाटू लागे.

    सदानंदच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याची शिक्षा ८ महिन्यांनी कमी झाली. वर्ष संपले. आता चारच महिने उरले होते. सदानंद सुटुन आला की त्याला या जागेत आपण नकोच आणायला असे घरच्यांनी ठरविले. इकडे नाही म्हटले तरी लोक कुजबुणार,चौकशा करणार,बोलणाऱ्यांचे तोंड धरता येत नाही. झाल्या घटना लवकरात लवकर विसरुन नवे आयुष्य सुरु केले पाहिजे.  बोरीवलीला एक ब्लॉक उमाने घेतलेला होता, तो भाड्य़ाने दिला होता. करार संपताच त्या रिकाम्या जागेत काही सामान हलविले. सदानंदने सुरेखा बरोबर रहायचे. विदुलाचे दहावीचे वर्ष इथेच होईल ११वी पासुन ती देखील तिकडेच जाईल असे ठरले. बोरीवलीच्या घरात सामन लागले.सदानंद येण्याचा दिवस जवळ येवु लागला. सुरेखा आणि उमा दोघी त्याला आणायला जाणार होत्या , त्याला टॅक्सीने बोरीवलीच्या घरी आणणार होते.त्या घरी सगळी जमली होती.

        सदानंद १२ तारखेला सुटणार, जेलर पासुन सगळे त्याचे अभिनंदन करीत होते. त्यालाही आयुष्यातले काळे पर्व संपल्याचे जाणवत होते. पुढे काय कराय़चे ते अजुन ठरत नव्हते. ऑफिस जॉइन कराय़चे कि दुसरे काही अजुन विचार होत नव्हता. ४ तारखेला सकाळपासुन सदानंदचे अंग दुखत होते. संध्याकाळी त्याला थंडी वाजुन ताप भरला. दुसऱ्या दिवशीही तसेच.जेल मधल्या डॉक्टरांनी औषध दिले. चार दिवस झाले तरी तोच प्रकार. शेवटी ससुन मधे ऍडमिट करण्य़ाचा सल्ला दिला. ऍम्ब्युलन्स मधुन सदानंदला ससुनमधे नेले. तिकडे सगळ्या तपासण्या केल्या. मलेरीयाचे निदान झाले. पण आजाराने गंभीर रुप घेतले होते. फुफ्फुसात प्रादुर्भाव झालेला होता. त्यावेळी फार प्रभावी औषधे उपलब्ध नव्हती. जेलमधुन सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झालेली होती

    १० तारखेला रात्री सदानंद अत्यवस्थ झाला. जेलमधुन त्याच्या घरी फोन करत होते पण घरचे सगळे बोरीवलीला असल्याने फोन कुणी उचलला नाही. दुसऱ्या कोणत्याच नंबरांची त्यांच्याकडे नोंद नव्हती. १० तारखेला रात्री उशीरा सदानंदचे प्राणोत्क्रमण झाले. त्याच्याजवळ त्यावेळी घरचे कुणीही नव्हते ! त्याच्या निधनाची बातमीही घरी कुणाला समजलीच नव्हती

    बोरीवलीच्या घरात आनंदी वातावरण होते. सदानंदला आणायला सुरेखा आणि उमा जाणार होत्या पण आयत्या वेळी सुरेखाला काही अर्जंट कामामुळे बँकेत रजा नामंजुर करण्यात आली.तशीही तिच्या या काळात बऱ्याच सुट्ट्या होत असत. उमा म्हणाली,"खरं तर तू आली असतीस तर त्याला बरं वाटलं असतं पण काही हरकत नाही , मी त्याला घेवुन येते. तू कमावरुन येइपर्य़ंत तो फ्रेश होवुन तुला भेटायला तयार असेल."

    उमा पहाटे निघाली साडेदहाच्य़ा सुमारास येरवड्याला पोचली. जेलमधे गेल्यावर तिला सदानंदच्या निधनाची बातमी समजली. तिला खरच वाटेना.
"सॉरी, आपला काहीतरी गैरसमज होतोय, सदानंद जोशींकरीता मी आलेली आहे, तुम्ही दुसऱ्या कुणाबद्दल बोलत आहात का? "
"नाही मॅडम, I am really sorry, पण ही बातमी खरी आहे,आम्ही तुमच्या घरी फोन लावला पण तो लागला नाही, दुसरा कोणताच नंबर आमच्याकडे नव्हता त्यामुळे आमचा नाइलाज झाला. सगळे पेपर्स तयार आहेत. तुम्ही बॉडी ताब्यात घेणार की अजुन कुणाला बोलावताय?"

आपल्या डोक्यात कुणीतरी घाव घालतय असं उमाला वाटु लागलं, इतक्या मनःस्तापात काढलेल्या या दिवसांचा शेवट असा का व्हावा?  हि बातमी घरी कशी कळवावी ?या प्रसंगाला तोंड द्यायला लागु नये म्हणून नियतीने सुरेखाची रजा नामंजुर केली असेल का?  असे नाना प्रश्ण घेवुन उमा खुर्चीतुन उठली आणि जेलरसाहेबांच्या केबीन मधुन बाहेर पडली.
    

No comments: