Sunday, July 20, 2014

पासपोर्ट ऑफिस : एक दाहक अनुभव

               पासपोर्ट ऑफिस मधे जायची वेळ आजकाल बहुतेकांवर येते. माझा पासपोर्ट मी पहिल्यांदा हौसेने काढला, पण त्याची मुदत संपेपर्यंत देशाची सीमा ओलांडायचे योग काही आले नाहीत. नंतर तो पुन्हा एकदा उत्साहाने री-न्य़ू करुन आणला. तरी परदेशात जायला जमले नाहीच. परत त्याची मुदत संपली.   पासपोर्ट री-न्यू करायला हवा असे नवरा म्हणू लागला ,आता मात्र मी वैतागले होते. उगीचच दर पाच दहा वर्षांनी पासपोर्ट ऑफिसला चकरा मारुन त्याचे नूतनीकरण करायचे आणि जायचे तर कुठेच नाही.मला नकोच तो पासपोर्ट असे मी जाहिर करुन टाकले.पण नेमके माझ्या पत्रिकेतले परदेशगमन घडवणारे ग्रह फिरले आणि युरोप अमेरीका नाही पण गेला बाजार साउथ -इस्ट अशियातले देश मला दाखवून आणण्याची नवऱ्याला इच्छा झाली. मी पासपोर्ट ऑफिसला जाणार नाही म्हटल्यावर त्यांनी एजंटकरवी माझा पासपोर्ट री-इश्यु करुन घेतला.

मुंबईच्या विमानतळावर फॉर्म भरताना नव्या पासपोर्ट वरील माझ्या नावाचे स्पेलींग चुकल्याचे माझ्या लक्षात आले. पासपोर्ट्वरील चुकी्च्या स्पेलींगप्रमाणेच फॉर्म भरुन मी थायलंड,मलेशिया,सिंगापुर असा सगळा प्रवास केला.मी पासपोर्ट उघडून बघितलेलाच नसल्याने सगळ्या प्रवासात चुकीच्या स्पेलींगची  टोचणी मला होती. इकडे आल्यावर हि दुरुस्ती लगेचच करुन घ्यायचे ठरविले.

पुण्याला आल्यावर मी जुना पासपोर्ट बघितला त्यावर माझ्या नावाचे स्पेलींग बरोबर होते. मग नव्या पासपोर्ट वर चुकीचे स्पेलिंग कसे? एजंटने फोर्म भरताना माझ्या नावाच्या स्पेलिंगमधले एक अक्षर खाऊन टाकले होते. नावात दहा अक्षरे असल्याने फॉर्म सही करताना माझ्या लक्षात आले नाही त्यामुळे अंतिमतः चूक माझीच होती. चूक खूपच किरकोळ होती काम सहज होऊन जाईल असे मला वाटले. इथे माझी दुसरी चूक झाली.

पासपोर्टच्या साईट्वर यासंदर्भात काय करावे याबद्दल वाचले तेंव्हा माझ्या लक्षात आले कि नव्याने पासपोर्ट काढण्याकरीत करावी लागणारी सगळी उठाठेव या क्षुल्लक वाटणाऱ्या दुरुस्तीसाठी करावी लागणार होती.  पूर्वी पुण्यात असलेले पासपोर्ट ऑफिस पुण्याबाहेर घोरपडीला नव्या जागेत हलवले आहे. जाण्यापुर्वी वेळ ठरवून घ्यावी लागते आणि दिलेल्या वेळेला हजर रहावेच लागते. पासपोर्ट ऑफिसचे संगणकीकरण एका खाजगी कंपनीने केल्याने काम अगदी वेळेत ,सहज होते अशा अनेक गोष्टी मला साईट वरुन ,काही लोकांकडून समजल्या.
मी  वेळ घेतली. दुपारी पावणेदोन ची वेळ मला मिळाली होती.मी वेळेवर सर्व कागदपत्रांसह पोचले.ऑफिसच्या बाहेर शंभर एक लोक उभे होते.आत गेल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तपासणी होऊन आत गेले तर सात आठ काऊंटरवर मारुतीच्या शेपटासारख्या रांगा होत्या. एका रांगेत उभी राहिले. माझा नंबर आल्यावर माझी कागदपत्रे पलिकडच्या मुलीने माझ्या हातातुन हिसकावुन घेतली.ती मुलगी तिच्या खास कमावलेल्या आवाजात समोरच्या प्रत्येक व्यक्तीवर नुसती ओरडत होती. ज्यांची कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्यांना झापत होती, काहींना झेरॉक्स काढायला पिटाळत होती. कागदपत्रे तिच्या ताब्यात दिलेल्या लोकांना वेगळ्या रांगेत उभे केले , मग साधारण अर्ध्या पाऊण तासांनंतर माझे नाव पुकारण्यात आले, मला माझ्या कागदपत्रांबरोबर एक कागद दिला तो माझा टोकन नंबर होता. ते सगळे घेवुन मी आतल्या हॉल मधे गेले.तेथील टि.व्ही.सारख्या पडद्यांवर टोकन नंबर आणि A1 ते A30 पर्यंत अक्षरे दिसत होती.आपल्या टोकन समोरील जो नंबर येईल त्या व्यक्तीकडे जायचे. मला A5 कडे जावे लागले.तिथे माझा फोटो काढला.सगळ्या कागदपत्रांची छाननी झाली.मला पुढे पाठवले.इथवरचा प्रवास तसा सरळ झाला. पुढच्या हॉल मधे पुन्हा तोच प्रकार आता A ऐवजी B ऑफिसर कडे जायचे.मी माझ्या टोकन समोर आलेल्या ऑफिसरच्या समोर गेले. माझ्या नावात झालेल्या छोट्या चुकीबाबत मी त्यांना सांगितले. माझ्या ऑफिसकडून पासपोर्ट् मिळण्याकरीता ’ना हरकत प्रमाण पत्र’  मी आणले होते पण त्या पत्राच्या दोन ओरीजनल प्रती आणणे अपेक्षित होते. माझ्याजवळ् एक  ओरीजनल  व एक झेरॉक्सप्रत होती, ती चालेल कि नाही याबाबतचा निर्णय ते घेवु शकत नव्हते. त्यांनी मला त्यांच्या वरीष्ठ् आधिकारी मॅडम कडे जाण्यास सांगितले. त्या मॅडम जागेवर नव्हत्या. त्यांना भेटायलाही शंभरएक लोक उभे होतेच. सुमारे एक तासाच्या प्रतिक्षेनंतर् मॅडम जाग्यावर आल्या.त्यांनीही टोकन नंबर प्रमाणॆ एकेकाला बोलवायला सुरुवात केली. माझा नंबर आल्यावर् मी गेले. मला नवा पासपोर्ट् का हवा आहे, म्हणजे माझ्या पासपोर्ट् वरील नावात कशी दुरुस्ती हवी आहे हे त्यांना समजावले.माझ्या जुन्या पासपोर्ट्वर नाव बरोबर असताना , तोच डेटा का घेतला जात नाही हि मला शंका होती त्याचेनिवारण त्या करु शकल्या नाहितच शिवाय तुमचे रेकॉर्ड मी मागवुन घेते असे खास सरकारी वाक्य बोलून त्यांनी मला थांबायला सांगितले. सुमारे एक तास बाहेर बसल्यावर् त्यांनी मला आत बोलावले आणि माझ्या एजंटने भरलेल्या फॉर्मची स्कॅन कॉपी त्यांनी मला दाखविली. (हि कॉपी त्यांना त्यांच्या स्क्रिनवर एक तासापूर्वीही दिसु शकली असती.कागदपत्रे मागवायची काही आवश्यकता नव्हती हे समजण्याइतका कॉम्प्युटरचा अनुभव मला आहे पण....) त्यात चुकीचे स्पेलिंग असल्याने त्याच नावाने पासपोर्ट् तयार झालेला आहे आणि तुमची सही असल्याने त्या चुकीला तुम्हीच जबाबदार आहात असे सिध्द करुन दाखविले. मला माझी चूक मान्य होतीच.पुढे काय करायचे एवढाच माझा प्रश्ण् होता. ,नावाच्या चुकीबाबत मी एक प्रतिज्ञापत्र आणले पाहिजे, दोन वर्तमानपत्रात छापुन त्यांच्या प्रती आणल्या पाहिजेत  असे त्यांचे म्हणणे होते. तुम्ही साईट् वर सगळे नीट् वाचले नाहीत असे त्या मला पुन्हा पुन्हा म्हणत होत्या. मग मात्र माझा संयम संपला. मी म्हणाले,"मी सगळे नीट वाचले आहे. नाव बदलावयाचे असेल तर म्हणजे एखाद्या मुलेचे लग्नानंतर् तिला नाव बदलून नव्या नावाचा पासपोर्ट् हवा असेल तर असे प्रतिज्ञापत्र करणे योग्य आहे. कारण त्या प्रतिज्ञापत्रात मी पूर्वी ....या नावाने ओळखत होते आता माझे नाव ....  झाले आहे  असा मजकूर आहे.माझ्या नावात असे काहीही झालेले नाही ,हि केवळ दुरुस्ती आहे, नाव बदल नाही" पुन्हा जुन्या पासपोर्ट वर बरोबर नाव, नव्या पासपोर्ट वर चुकीचे नाव असे सगळे त्यांना समजावल्यावर प्रातिज्ञापत्राची गरज नाही हे त्यांना पटले. पण आलेल्या व्यक्तीने आपल्याला समजावणे हे त्यांच्या पदाला मानवले नसणार , आता निमुटपणे सगळी कागदपत्रे घेवुन पासपोर्ट द्यावा असे लिहुन देणे त्यांना शक्य नव्हते मग  त्यांनी मला ऑफिसकडून दोन ओरीजनल ना हरकत प्रमाण पत्रे आणावयास सांगितली. मी नम्रपणे एक पत्र का चालत नाही असे विचारले तर् तुम्ही साईट्वर नीट् वाचत नाही   हे बघा असे म्हणून एक छापिल् पुस्तक दाखविले त्यात दोन ओरीजनल ना हरकत प्रमाण पत्रे आणावी असे लिहिले होते. साईटवरील् मजकुरा प्रमाणेच पत्र पाहिजे असे त्या म्हणाल्या. शिवाय़ मी आणलेल्या पत्रात एक मोठी चूकही त्यांना सापडली. माझ्या पत्रात मी भारतीय आहे असा उल्लेख नव्हता ! हे पत्र चालणारच नाही, नवी दोन पत्रे घेवुन परत या. मला हसावे कि रडावे समजेना, माझ्या हातात दोन पासपोर्ट होते, भारतातल्या केंद्र सरकारची मी थोडीथोडकी नाही तर पंचवीस वर्षे सेवा केली ती अभारतीय म्हणून? शिवाय माझ्या सहीने मी आजवर अनेकांना तात्काळ पासपोर्ट मिळावा म्हणून पत्रेही दिलेली आहेत. माझ्या सहीची पत्रे चालतात पण मी भारतीय आहे हे वाक्य पत्रात नसल्याने, मला पुन्हा यावे लागते. त्यांच्या जवळच्या माझ्या मागील रेकॉर्डस च्या स्कॅन कॉपीज त्यांच्या कडे होत्याच त्यात यापूर्वी माझ्या ऑफिसने दिलेली पत्रेही होती.पण आज त्यांना पुन्हा एक सोडून दोन पत्रे हवी होती. त्याच वरीष्ठ आधिकारी असल्याने पुढे जावुन तक्रार-अर्ज-विनंत्या करण्य़ाचा प्रश्ण नव्हता. आता पुन्हा अपॉंटमेंट घ्यायची का? हाच एक सवाल होता. त्यावर एखाद्या घोर अपराध्याला माफ केल्याच्या सुरात त्या म्हणाल्या, "तुम्हाला परत अपॉंटमेंट् घ्यायची जरुर नाही , सांगितलेली कागदपत्रे घेवुन परत या"

हे सगळे होइतोवर संध्याकाळचे पावणेसहा वाजले होते. तिकडे पाणी हॉलच्या शेवटच्या टोकाला होते. खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्सही होते, पण अतिशय महाग, साधा चहा २०ते २५ रु., सॅंडविच ५०रु. पासपोर्ट घ्यायला येणारे लोक उच्चभ्रूच असणार तेंव्हा त्यांना काय फरक पडतो? असे असले तरी त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेतला जात होता हि गोष्ट पण नाकारता न येण्यासारखीच. मला तर आपला नंबर कधीही लागेल त्यावेळी हातात चहाचा कप किंवा खात खात कसे जायचे या विचाराने मी काही न खाता पिता राहिले. आत ज्या व्यक्तिला पासपोर्ट हवा तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाला प्रवेश नसल्याने हातातील महत्त्वाची कागदपत्रे ठेवुन प्रसाधनगृहातही जाता आले नाही. एकुण काय तीन साडेतीन तास घालवुन मनःस्ताप घेवुन मी बाहेर पडले.

ऑफिसमधुन पुन्हा पासपोर्ट साईटवर दिल्याप्रमाणे पत्राच्या दोन प्रती घेवुन पुन्हा सकाळी नऊ वाजता पासपोर्ट ऑफिसात गेले.मला वाटले आता बाहेरच्या खिडाकीवर त्या पत्रांच्या दोन प्रती दिल्या कि माझे काम झाले. पण कसले काय? पुन्हा मागल्या वेळ सारखेच सगळे सोपस्कार करीत मला जावे लागले. यावेळी B ऑफिसरकडे माझा नंबर लागायलाच दिड तास थांबावे लागले तिथुन पुढे C ऑफिसरकडे माझी रवानगी झाली. त्यांनी ऑफिसचे पत्र बघितले आणि म्हणाले हे पत्र चालणार नाही. आमच्या साईट्च्या फॉर्म्याट सारखे हे पत्र नाही.माझे मागच्या खेपेस नाकारण्यात आलेले पत्र त्यांच्याजवळ होतेच , ते पत्र आता त्यांना योग्य वाटत होते. मला त्यांनी पुन्हा छापील पुस्तक दाखवले. मी म्हणाले ," ते पुस्तक मला दाखवु नका, मीच तुम्हाला इथुन तुमच्या साईटवरील नमुना दाखवते त्यानुसार हे पत्र नसल्यास सांगा"
"मॅडम , साईट वरील नमुना बरोबर नाही"
"मग योग्य नमुना साईट वर का नाही टाकला? आणि माझ्या ऑफिसने मागच्या वेळचे पत्र योग्य दिले असताना ते का नाकारलेत? मी पण सरकारी ऑफिसर आहे, मला नियम समजतात , तुम्ही विनाकारण त्रास देत आहात"
मी असे निर्वाणीचे बोलल्यावर त्यांनी माझी कागदपत्रे ठेवुन घेतली आणि तुमचा पासपोर्ट घरी येईल थोड्याच दिवसात असे सांगितले.

खाजगी कंपनीला पासपोर्ट ऑफिसचे काम देवुन काय साधले? वेळ वाचला नाहीच. खाजगी कंपनीमुळे ऑफिस चकाचक आहे. सरकारी  कार्यालयाची कळा त्याला आलेली वाटत नसली तरी आत मधे असणाऱ्या मोठ्या जनसमुदायामुळे कलकल गोंगाट असतोच. ऑफिसमधे ए.सी असल्याने सगळी दारे खिडक्या बंद. भर दिवसाही सगळीकडे ट्युब लाईट्सचा प्रकाश असतो. इतक्या लोकांच्या असण्याने ए.सीचा इफेक्ट अजिबात जाणवत नाही आणि वातावरणात एक प्रकारचा कोंदट्पणाच वाटतो. लहान मुले असतात, त्यांनी खाऊन टाकलेल्या बिस्कीटांच्या,चॉकेलेट्सच्या कागदांना कचरापेटी दाखवावी असे ना त्यांना वाटते ना त्यांच्या कंटाळलेल्या पालकांना. जेष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग आहे ती देखील खूपच मोठी असते.बसण्याकरीता बरेच बाकडी आहेत पण ती पुरणार नाहीत इतके लोक कुठल्याही वेळी आत असतातच.

तेथे एखाद्या दिवशी चारपाच तास घालवल्यावर माझी अशी अवस्था झाली मग तेथे रोज काम करणाऱ्य़ांचे काय होत असेल हि कल्पना मी करु शकते. हे काम अजिबात सोपे नाही. पण ते सोपे करणे शक्यच नाही असे नक्की नाही. एका ठिकाणी सगळ्यांना बोलावण्यापेक्षा पुण्य़ात चार-पाच ठिकाणी अशी कार्यालये काढता येणार नाहित का?
पासपोर्टचे नूतनी करण करताना असणारी पध्दत सोपी -सुटसुटीत करता येईल. नाव-पत्ता यांमधील चुका पुन्हा पुन्हा डेटा -एन्ट्री टाळुन कमी करता येतील. ऑनलाईन एंन्ट्री करु दिल्यास तर या चुका खूपच कमी करता येतील. साईटवर सर्व माहिती अद्ययावत ठेवल्यास लोकांचे हेलपाटे वाचतील.

पासपोर्ट हे अतिशय महत्त्वाचे दस्त आहे. तो देताना पराकोटीची काळजी घेणे आवश्यक आहे हे कुठलाही सुजाण नागरीक समजू शकतो.पण शासकीय कर्मचारी,शिक्षक,विद्यार्थी,जेष्ठ नागरिक यांना जास्तीत जास्त त्रास देणारे पासपोर्ट खाते कित्येक गुन्हेगार आणि अतिरेक्यांना पासपोर्ट देताना कुठली कागदपत्रे तपासते? अशी शंका मनात आल्यावाचून रहात नाही.

No comments: