Wednesday, November 27, 2024

दिवेआगरची सहल

 

माझी नोकरी संपत आली . माझ्या टीम मधील मुलामुलींना आपण ट्रीपला जाऊ असे चार वर्षांपासून देत आलेले अश्वासन मी पुरे करु शकले नाही, मी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे टिम मधल्या मुलांची छोटीशी मागणी पुरी न केल्याची मलाही फार खंत वाट्त होती, पण land records सारख्या department चे काम आम्ही करत असल्याने सतत कामाचा ताण असे, रोजच्या नवनव्या मागण्या,कधी सर्व्हर स्लो,कधी सर्व्हर डाऊन,कधी स्वातंत्र्य मिळाल्याला ७५ वर्षे झाली म्हणुन मोफत सातबारा योजना,कधी महसुल सप्ताह असे काही ना काही चालू असे व त्यामुळे सुट्टीचा एक दिवस आम्ही सहल ठरवु शकत नव्हतो.

        नोव्हेंबर माझा शेवटचा महिना. आक्टोबरच्या सुरुवातीला मुलांनी माझ्याकडे ट्रिपला जायची आठवण केली, पहिल्य़ा शनिवार रविवार नवरात्र होते, दुसऱ्या विकएंडला दसरा होता, तिसरा शनिवार रविवार सोईचा होता, मला खर तर सकाळी जाऊन संध्याकाळी येणे बरे पडणार होते,करण माझ्या मुलीचे लग्न डिसेंबर अखेरीस असल्याने मला लग्नाची पण बरीच कामे दिसत होती. मुलांनी पुण्याजवळची बरीच ठिकाणे शोधली पण योग्य  काही मिळेना, कोकणातील दिवेआगर जवळ एक हॉटेल मिळाले मात्र इतक्या दूर जायचे तर एक मुक्काम करणे अनिवार्य होते, मग मी हि एक दिवस काढायचा असे ठरवले व आमची ट्रिप जायचे नक्की झाले.

आयुष्यात प्रथमच मी फक्त बॅग घेऊन निघणार होते, मला कुठलीही चौकशी करायची नव्हती, स्वयंपाकघरात तयारी करायची नव्हती. मी बॉस असल्याने मला न्यायला बस घराजवळ येणार होती. शनिवारी पहाटे साडेसहाला सेनापती बापट रोडवर मला न्यायला बस आली.बसमधुन राहुल, सौरभ,दीप, दिपाली आणि ऋतुजा आलेले होते. त्यांना किती लवकर उठुन यावे लागले असेल, पण कोणाच्याच चेहऱ्यावर मरगळ नव्हती.सगळे फारच उत्साहात होते.माझी बॅगही मुलांनी घेऊन बसमधे ठेवली. वाटेत दोन -तीन ठिकाणी बस थांबत बाकीच्यांना घेणार होती.  बाणेर ला सचिन चढला,बस हाय वेला येऊन थांबली.अर्चना,सीमा आणि प्रियांका ,सजदा चार ठिकाणाहुन तेथे येणार होत्या, तिघींना त्यांच्या नवऱ्यांनी सोडले.सीमा तिच्या तीन वर्षाच्या मुलीला सोडून येत होती, प्रियांकाचा पाच वर्षाचा मुलगाही तिला सोडायला आला होता. त्या मुलांच्या आयांचा वेळ मी घेत असल्याच्या भावनेने मला अपराधी वाटले. त्या दोघींनाही मुलांना सोडणे अवघड वाटले असेल पण त्या मुलांच्या वडीलांनी मुलांची जबाबदारी घेऊन बायकोला एक दिवस मजा करायला पाठवणे हा समाजातला बदल मला आवडला. माझ्या वेळी मी असे करु शकले नव्हते !

पुढच्या स्टॉपवर अभिजित व शेवटी दिग्विजय चढला. कुठल्या कुठे लांबवर मुले राहतात आणि रोज वेळेवर ऑफिसला पोचतात ,विचारानेच मन भरुन आले. आता गाडीने वेग घेतला, ताम्हिनी घाट सुरु झाला, गप्पा,गोष्टी ,चेष्टा विनोदाला बहर आला. मुलींनी एक  दिवसाच्या ट्रिप करता केवढे सामान आणले होते ! त्यांच्या सामानाने मागचे पूर्ण सीट भरुन गेले होते ! पावसाळा संपल्यामुळे डॊंगर हिरवेगार होते,रस्ता सुरेख होता व वाहतुक बेताची होती त्यामुळे मजा येत होती. तरुणाईच्या सहवासाने मन अगदी हलके हलके झाले होते. तहान भुकेची मला तर आठवण नव्हती. बस थांबवली समोर दरीत ढग उतरुन आले होते,हवेत हवाहवासा गारवा होता. मुलामुलींनी लगोलग फोटो काढायला सुरुवात केली, मला मधे घेऊन फोटो सेशन झाले. कॅमेऱ्याशी माझी ओळख खूप उशीरा झाली ,मी कधी फोटो काढलेच नाहीत, मोबाईलच्या कॅमेऱ्यानेही मी फोटो काढु शकत नाही,आणि माझे फोटो कधी चांगले येत नाहीत त्यामुळे सगळी दृष्ये डोळ्यात साठवण्यावर माझा भर असतो !  पोटभर फोटॊ काढल्यावर आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. नऊ वाजुन गेले होते, नाष्ट्यासाठी हॉटेल्सची शोधाशोध सुरु झाली. चांगलेसे हॉटेल पाहुन गाडी थांबवली, नाष्ता केला. पोटे भरल्याने पुढच्या प्रवासात उत्साह आणिकच वाढला. गाण्यांच्या भेंड्या सुरु झाल्या, मुलींना नवी,जुनी बरीच गाणी येत होतीच मात्र सौरभ आणि राहुलने गवळणी,भारुडे,भजने म्हणुन खुपच बहार आणली . दिवेआगरला कधी पोचलो ते समजलेच नाही

आम्ही हॉटेलवर गेलो तेंव्हा साडेबारा वाजले असतील.तिकडे सामान टाकुन दिवेआगरच्या गणपतीचे दर्शन घ्यायल गेलो, मी वीस वर्षांपूर्वी दिवेआगरला गेले होते, त्यावेळी देऊळ खुपच लहान होते,आता खुप मोठे मंदिर बांधलय. सोन्याची गणेश मुर्ती कडेकोट बंदोबस्तात आहे. दुपारचे एकचे उन बाहेर चटचटत होते,देवळात मात्र निरव शांतता व थंडगार वातावरण होते.दर्शन छान झाले. आमच्या हॉटेलमधे शाकाहारी जेवणाची व्यवस्था होती, मासे खाय़ला आमच्यातले काही दुसरीकडे गेले. माझ्यासोबत पाच सहा जण हॉटेलवर आले.अत्यंत रुचकर आणि घरगुती जेवण होते.गरम गरम तांदळाची भाकरी,रस्साभाजी, कोशिंबीर्, चटणी,पापड,आमटी भात आणि थंडगार सोलकढी.  मस्त जेवण झाले , पहाटे पासुन उठल्याने पोटभर जेवल्याने डोळे मिटु लागले. तास दोन तास झकास ताणुन दिली, पाचच्या सुमारास बीचवर निघालो. चालत दहा मिनिटांच्या अंतरावर बीच होता, तरी हॉटेलवाल्याकडून स्कुटर घेऊन सचिनने मला बीचवर सोडले, इथल्या बीचवर काळी वाळु आहे, बरेच स्टार फिश पाण्यातुन वाहुन किनाऱ्यावर येत होते. सजदा आयुष्यात पहिल्यांदाच समुद्र बघत होती ! तिच्या चेहऱ्यावरील आनंद,आश्चर्य बघायला मजा वाटत होती ! सगळे पाण्य़ात शिरले,मलाही यायचा आग्रह करत होते,पण शिंगे मोडुन वासरात जाणे मला बरे वाटेना . दुरुन त्या मुलांच्या आनंदाचा आस्वाद घेण्यात जास्त सुख होते. वय,संसार,जबाबदा़ऱ्या, नोकरीतली टेन्शन्स सगळे विसरुन पाण्याच्या लाटांवर स्वार होत धमाल करणाऱ्या त्या सगळ्य़ांना बघताना खरच खुप मजा येत होती. बघता बघता सूर्य मावळला ! क्षितीजावर थोडे ढग आल्याने तो केशरी गोळा पाण्यात बुडताना स्पष्ट नाही दिसला,पण पाण्यावर केशरी आभा पसरुन गेली. थोड्याच वेळात अंधाराचे साम्राज्य येऊ लागले  , ओहोटीची वेळ होती,पाणी मागेमागे जात होते .पाण्यात दुरवर गेलेल्या मुलांची मला थोडी काळजी वाटायला लागली !  पण हळुहळू सगळे माघारी आले.पाण्यात मनसोक्त खेळून सगळेच जाम थकले होते, चहा पिऊन रुमवर गेलो,सगळ्य़ांनी अंघोळी केल्या आणि अचानक बाहेर पाऊस कोसळु लागला ,विजा चमकल्या, दहा मिनिटांत वातावरण पार बदलले. तासभर पाऊस पडला आणि अचानक आला तसा थांबला देखील ! जेवायला आम्हाला जवळच्या एका खाणावळीत जायचे होते,पाऊस थांबल्याने आम्ही निवांत चालत पोचलो. अगदी उत्तम कोकणी जेवणाचा बेत होता,गरम गरम् मोदक,बिरड्याची उसळ, वाफाळता भात, आमटी. जेवण करुन पान खाऊन परत आलो. मुलांना माझ्याकडून गोष्टी ऐकायच्या होत्या ! मग आठवत होत्या त्या व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील यांच्या कथांचे कथन केले. खुप मजा आली. भुताखेतांचे विषय झाले ,एक दीड वाजेपर्यंत गप्पा चालूच राहिल्या. सकाळी उठुन पुन्हा समुद्रावर जायचे असे ठरवुन झोपलो, पहाटे पुन्हा समुद्रावर गेलो. मी किनाऱ्यावर भरपुर हिंडले, माझ्याबरोबर राहुल थांबला. सगळे पुन्हा पाण्यात खेळले. परत माघारी येऊन ,अंघोळी उरकल्य़ा,नाष्ता करेतोवर साडेअकरा वाजुन गेले. संकष्टीचा दिवस होता, म्हणुन पुन्हा गणपतीचे दर्शन घेतले. देवळाच्या बाहेर कोकम,आगळ,पापड,मिरगुंड अशी किरकोळ खरेदी करुन निघायला बारा  वाजले. 

परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. जातानाचा उत्साह आता नव्हता, घरी जाऊन दुसऱ्या दिवशीची कामे,ऑफिस असे सगळेच डोळ्यासमोर दिसु लागले होते. पुण्य़ाजवळ संध्याकाळी आल्याने ट्रॅफिकचा हिसका सुरु झाला. मला सेनापती बापट रोड वर सातला सोडल्यावर राहुलला घरी पोचायला आठ वाजुन गेले !

  एक दिवसाच्या ट्रिपसाठी या मुलांनी केवढे प्लॅनिंग केले होते, बस ठरवणे,हॉटेल बुक करणे सगळे त्यांनी खुप छान केले. एक दिवसासाठी मुलींनी दोन दोन बॅगा आणल्या होत्या,पण त्यांनी कपडे बदलले,त्याला मॅचिंग दागिने,मेक अप ,चपला सगळे सगळे केले, असंख्य फोटो काढले (त्याची रिल्स, स्टोरीज बनवल्याच असतील ) एकुणात ट्रीपचा क्षण न क्षणी एन्जॉय केला . समरसुन कसे जगावे हे नव्या पिढीकडुन शिकायलाच हवे ! माझा एक दिवस या मुलांमुळे खुप छान गेला, या दिवसाच्या आठवणी माझ्या मनात कायम राहतील . माझ्या नोकरीची पस्तीस वर्षातील आनंदाचे क्षण आणि मुलांबरोबर ट्रीपचा एक दिवस यांमधे या सहलीचे पारडे जड असणार कारण त्यात या मुलांनी माझ्यावर केलेल्या मायेचे तुळशीपत्र आहे !


Monday, June 17, 2024

काशी यात्रा

   ’ काशीस जावे नित्य वदावे ’ प्रवासाची साधनांची सोय नसताना , पैशाची चणचण असण्याच्या काळात हे वाक्य प्रचलित होते. एकतर कशी विश्वनाथाचे  आणि गंगेच्या पवित्र प्रवाहात स्नान हि पुण्य गाठीशी जोडणे हि साध्ये होती आणि त्यासाठी आवश्यक वेळ, प्रकृती आणि पैसा यावा  म्हणून हि सकारात्मकता .

आता मनात आले कि जाणे फारसे कठीण राहिले नाही असे असूनही मला काशी बघायला वयाची साठी गाठावीच लागली ! सेवानिवृत्ती जवळ आली आणि शेवटचा LTC घ्यायला हवा असे सहकारी म्हणू लागले. आधीचे बरेच LTC बुडले होते, तेंव्हा अखेरचा तरी घे असे घरचे पण म्हणू लागले. जायचे कुठे हा प्रश्ण होताच, तेंव्हा नुकत्याच उद्घाटन झालेल्या आयोध्येतल्या राम मंदिराची आठवण झाली, मार्च महिना उन्हाळ्याचा असला तरी उत्तर प्रदेशात उन्हाचा तितकासा कडाका नसणार असे हवामान दाखवत होते. मंदिरात भाविकांची गर्दी असली तरी व्यवस्थापन उत्तम असल्याच्या बातम्या होत्या, म्हणून आयोध्या, प्रयागराज आणि काशी असे जायचे नक्की केले. बरोबर कोणी सखे ,सोयरे आले तर यात्रा आणि सहल अ्शी दुहेरी मजा येईल अशा विचाराने बऱ्याच जणांना विचारुन बघितले पण प्रत्येकाला काही ना काही अडचणी होत्या. कुणाला मार्च एंडींग, कुणाची आधीच दुसरीकडे ट्रिप ठरलेली .एकुणात रामरायाने आणि काशी विश्वेश्वराने आम्हा दोघांनाच बोलावले असे समाधान मानुन तायारीला लागलो.

हाताशी वेळ फारसा नव्हता कारण  ठरलेच उशीरा , त्यातुन रजा मंजूर झाल्याखेरीज पुढचे नियोजन करणे नाही हे मागच्या अनुभवातुन शिकले होते, जानेवारीत एका मैत्रिणीबरोबर कान्हा जंगलाची ट्रिप ठरवली , रजा भरलेली होती मात्र आयत्या वेळी दिल्लीत केंद्र सरकारी कर्मचारी संपावर जाणार म्ह्णून सगळ्य़ांच्याच रजा कॅन्सल केल्या , माझी ट्रीप ,पैसे सगळेच वाया गेले आणि खूप मनःस्ताप झाला. रजा मंजूर झाल्यावर शोधाशोधीला सुरुवात केली. ऑफिसच्या कामातुन डोके वर निघत नव्हते आणि घरी गेल्यावर थकुन गेल्यावर लॅपटॉप उघडायच्या आधी डोळे मिटत होते. नवऱ्याचे नेटवर्क उपयोगी आले. त्यांच्या दोन मित्रांकडून दोन ट्रॅव्हल एजंट समजले. त्यांनी ’मिशन आयोध्या’ मनावर घेऊन रितसर दोघांकडून कोटेशन्स वगैरे घेतली, किंमती पेक्षा वेळेवर देणाऱ्याला झुकते माप दिले. जाण्यायेण्याची तिकीटे सरकारी नियमाप्रमाणे काढायची असतात, आयत्या वेळी ठरवल्यामुळे  Advance मिळणार नव्हता. त्यामुळॆ तिकिटे काढुन झाली, अनिवार्य सरकारी नियम व अटी पाळून तिकिटे  काढताना ,वेळेची सुविधा वगैरेचा विचारही करता येत नाही, तस्मात जाण्या येण्याच्या वेळा अवेळीच होत्या. जाताना पुण्याहून पहाटे सव्वाचारची फ्लाईट होती. 


शुक्रवारचा दिवस सुट्टी घेतेलेली असून दिवसभर मिटिंग्ज मधे गेला. online मिटींग करता करता आवराआवरी चालू होती. रात्री लवकर जेवणे आटोपुन नऊ साडेनऊला झोपलो रात्री एकचा गजर लावला होता, झोप लागेपर्य़ंत उठायची वेळ झालीच होती. Uber App वरुन गाडी मागवली. गॅसवर चालणारी गाडी असल्याने सामान कसेबसे गाडीत बसवुन आम्ही गाडीत बसलो, गाडी अत्यंत जुनी, खडखड आवाज करणारी, एसी बंद ,ड्रायव्हर नवशिका . रस्त्यातल्या प्रत्येक खड्ड्य़ाची जाणीव देत प्रवास चालू झाला. प्रत्येक रोड डिव्हायडर वर गाडी तीन ताड उडे, आणि त्यावर ड्रायव्हरचे सॉरीचे गाणे यामुळे उरली सुरली झोप पार उडाली. गाडी येरवड्याला लागल्यावर जेल रोडला न जाता कल्याणी नगर जाऊ लागल्यावर नवऱ्याचा संयम संपला ! ड्रायव्हरवर आरडाओरडा त्याचा माफिनामा , प्रवासाची अशी सुरुवात कुठे घेऊन जाणार या शंकेने माझी कासाविशी , यातुन शेवटी एकदाचे विमानतळावर पोचलो.

वेब चेक -इन केलेले होते.तिकडे नव्यानेच फोटो वगैरे घेऊन पाठवत होते. दोन्ही सुटकेस चेक-इन करुन छोट्या हॅंडबॅग्स घेऊन सिक्युरिटी कडे कूच केले. रमेशकडच्या हॅंडबॅगेमधे स्विसचाकू निघाला, तो नेता येणार नाही असे पोलींसांनी सांगितले. त्या चाकुने लोणी देखील कापले जाईल का अशी शंका येत होती.पण त्यांनी तो फळे कापायला लागला तर असावा म्हणून घेतला असावा आणि घोकुनही तो चेक-इन मधे ठेवायचा राहिला होता. चाकू टाकुन जाणे त्यांना जिवावर आले होते. त्याच्या नाजुक रुपाची भुरळ मलाही पडली,पण चुक झालीय त्याची किंमत मोजा आणि सोडून जाऊया असे मी म्हणत होते, मात्र त्या चाकुच्या विरहाने पुढची सगळी ट्रीप दुःखद होणार हे मला दिसत होते. पोलीसांना बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर ते म्हणाले, "चेक-इन बॅगेत नेऊन ठेवा". सुदैवाने बराच वेळ हाताशी होता. रमेश पुन्हा चाकु घेऊन चेक-इन काऊंटर कडे धावले. मी खुर्चीवर सामान सांभाळत बसले.पंधरा वीस मिनिंटांनी विजयी मुद्रेने ते परत आले. आमच्या बॅग्स केंव्हाच पट्ट्य़ावरुन गेल्या होत्या, पण एका सद्गृहस्थांनी रमेशच्या विनंतीला मान देऊन स्वत्ःच्या बॅगेत तो मौल्यवान चाकु ठेऊन घेतला.लखनौच्या विमानतळावर त्यांनी त्यांच्या बॅगेतुन काढुन आम्हाला सुपुर्द केला.त्या नंतर घरी येईपर्यंत त्याचे दर्शन घ्यावे लागले नाही .

लखनौ ला पोचलो तेंव्हा सहा वाजायला आले होते, सामान ताब्यात घेऊन बाहेर पडलो. लखनौ पासुन एक टॅक्सी बुक केलेली होती .ड्रायव्हर आलेला होता. गाडीतुन जाताना त्याने त्याच्या तिथल्या साथिदाराला फोन केला व त्या माणसाने गुगल मॅप्सचे काम चोख बजावत आम्हाला हॉटेलसमोर उभे केले.हॉटेल अगदी गावाच्या मध्यातच,आपल्याकडील मंडईत असावे तसे. त्यात त्यामधे नूतनीकरणाचे काम चालू होते. एकूण हॉटेल यथातथाच होते. आम्ही अंघोळ आदि आन्हिने उरकुन नाष्ता केला आणि लखनौ दर्शनासाठी बाहेर पडलो. ब्रिटिश रेसिडन्सी हे आमचे पहिले स्थान होते. आमच्या ड्रायव्हरचा साथिदार गाईड म्हणुन आमच्या दिमतीला होता.  १८५७ च्या उठावातील एक म्युझियम होते आणि त्या काळातील इमारती बघताना नवल वाटले, वाळू,सिमेंट असे साहित्य न वापरता माती,चुना,चणाडाळीचे पीठ,गुळ असे साहित्य वापरुन केलेल्या दणकट इमारती , संसाधनांइतकीच कामाबद्दलच्या निष्ठा इमारती मजबुत करत असतील का असे वाटत राहिले. १८५७ च्या उठावात झालेल्या हल्ल्यातील बंदुकांच्या निशाण्या मिरवत असलेल्या इमारती ,त्यावेळी बलिदान केलेल्या देशप्रेमींची आठवण जागवत होत्या. ब्रिटीश रेसिडन्सीचे आवार भरपुर झाडीने व स्वच्छ परिसराने सुंदर वाट्ते. रुमी गेट हे नबाब कालीन लखनौचे प्रवेशद्वार आता फोटो पुरतेच राहिले आहे. द्वार सुरेख आहे पण आता तेच प्रवेशद्वार राहिलेले नाही


बडा इमामबाडा अर्थात भुलभुलैय्या हे दुसरे प्रेक्षणीय स्थान होते.नाबाला साजेशीच अतीशय भव्य व देखणी वास्तु.आत ठराविक गाईड कडूनच माहिती घेणॆ बंधनकारक होते. जास्तीतजास्त लोकांचा समुह मिळवणे हे गाईडचे ध्येय आणि आपल्याला सगळे नीट समजावे म्हणून ग्रुप लहान असावा हि पर्यटकांची इच्छा , यामधुन मार्ग निघाला आणि एका गाईड्ने आमचा ताबा घेतला. (नबांबांची नामावळी मी विसरले वयाचा परीणाम आणि ते तपशील सांगायला गुगल समर्थ आहेच ). मध्ये एकही खांब नसलेला,अशीयातील सर्वात मोठा दिवाणखाना या महालात आहे असे गाईड सांगत होता. गालीचे व झुंबरे असताना त्याचे रुप किती देखणॆ असेल याची कल्पना येत होती, आजही झुंबरे आहेत पण गालीचे दयनीय झालेत. भुलभुलैय्या मात्र कमाल वास्तुरचना आहे. एका जिन्यातुन वर गेल्यावर चार चार रस्ते दिसतात आणि त्यातला एकच योग्य ठिकाणी नेतो. बाहेर कडक उन असूनही आत  गारवा होता. सिमेंट ,वाळू न वापरता केलेल्या बांधकामाची ती कमाल होती.गच्ची वरुन लखनौ शहराचे दर्शन घडते.या महालाचा आर्किटेक्ट इराणी इसम होता , त्याने नबाबाला माझी कबर तुमच्या कबरीशेजारी असावी एवढीच मागणी केली. मला रायगडाचे बांधकाम करणारे हिरोजी इंदुलकर आठवले.त्यांनी देखील आपल्या नावाची एक पायरी असावी एवढीच मागणी शिवाजी महाराजांना केली होती. ’मरावे परी कीर्ति रुपे उरावे’ एवढी अपेक्षा बाळगणारे हे गुणी व इमानी सेवक ! मनोमन त्यांचे वंदन

बडा इमामबाडा जवळ एक पायऱ्यांची विहिर ही फार सुंदर आहे. वरच्या मजल्यावरुन महालाच्या बाहेरच्या रस्त्यावरील प्रत्येक वस्तु, व्यक्तीचे पाण्यात प्रतिबिंब दिसते आणि रस्त्यावरुन आतील काही दिसत नाही. कॅमेरे वगैरे काही नसतानाच्या काळात सुरक्षितेसाठी केलेला शास्त्रीय नियमांचा वापर फार आवडला.


सगळे बघुन बाहेर आलो तोवर आडीच वाजले असावेत. छोटा इमामबाडा, हुसैन क्लॉक,सतखंडा गाडीतुन बघितले आणि पोटपुजेसाठी निघालो,आम्ही शाकाहारी असल्याने लखनौच्या स्वादिष्ट मांसाहारी खाण्य़ाचा मजा घेणॆ शक्य नसले तरी तेथील चटपटे चाट चे options खाण्यासाठी आमच्या गाईडने योग्य ठिकाणी आम्हाला नेले. तेथे बास्केट चाट आणि लस्सी पिऊन दिल खुष झाला ! नंतर थोडीफार खरेदी करुन हॉटेलवर गेलो. थोडावेळ आराम करुन संध्याकाळी गोमती रिव्हर फ्रंट बघायला बाहेर पडलो. आमच्या गाईडला त्याच दिवशी बाबासाहेब आंबेडकर गार्ड्न, यु.पी दर्शन वगैरे राहिलेली प्रेक्षणीय स्थळे बघावी असे वाटत होते,त्याला दुसऱ्या दिवशी जमणार नव्हते म्हणून त्याला सगळे काम त्याच दिवशी संपवायचे होते. पण आदल्या रात्रीचे जागरण आणि सकाळचे चालणे याने मी दमले होते, शिवाय दुसरा दिवस आमच्या हातात होता. तेंव्हा गोमती रिव्हर फ्रंट बघुन परतायचे ठरवले. जाताना उत्तर प्रदेशाची नवी विधानसभा इमारत बघितली. हा लखनौ चा भाग एकदम स्वच्छ ,सुंदर आहे. गोमती रिव्हर फ्रंट , साबरमती नदीच्या धर्तीवर केले आहे. दहा रु.तिकीट काढल्यावर  आमचा गाईड म्हणू लागला,’आज लाईट्स नाहीत, जायचे की नको कारण बऱ्याच पायऱ्या उतरायच्या होत्या आणि मी बाकीच्या ठिकाणी जायला नको म्हणाले होते. पण आम्ही उतरलो, लेझर लाईटस मुळे खूप छान दिसते असे गाईड सांगत होता.मात्र चालायला रस्ता छान होता, फुलांचे ताटवे, हिरवळ, बसायला बाक सगळे सुरेख होते,नदीला पाणी पण बरेच होते. आपल्या मुळा,मुठा नद्यांच्या तुलनेत छानच होते सगळे. तेथे चना जोर गरम विकणाऱ्या दोघांनी आधीच्या मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीत कसे रोज लाईट्स असत आता कसे सगळे वाईट आहे इइ. सांगु लागले, आमचा गाईड ’योगी भक्त’असल्याने तो चिडला,तेथेच दोघांमधे भांडणे सुरु झाली. आम्ही आमच्या गाईडला निघायला लवले. पायऱ्या चढुन आल्यावर रमेशने तिकीट विक्रेत्याचे लाईट्स नसताना पैसे घेणे कसे चुकीचे आहे यावर बौध्दिक घ्यायला सुरुवात केले. तो हि ," हे बघा आता दुरुस्तीला हि माणासे आली आहेत, होईलच दुरुस्ती एवढ्यात वगैरे सांगायला लागला" त्या सगळ्या थापाच होत्या, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी तिकडून गेलो तरी तिकडे अंधारच होता !

दुसऱ्या दिवशी लखनौ विद्यापीठ बघितले रविवार असल्याने सगळ्या इमारतीत सामसूम होती आणि सगळे बंद होते, रॅंग्लर परांजपे या विद्यापीठात कुलगुरु होते त्याबद्दलच्या शकुंतलाबाई परांजप्यांनी आठवणी वाचल्यामुळे मला ती वास्तु बघण्याची उत्सुकता होती. मक्खन मलाई हि लखनौची खासियत असल्याचे लेकीने सांगितले होते , हा पदार्थ एकदम गावात मिळतो, आपल्याकडच्या बोहरी आळी सारख्या गजबजाट व लहान लहान गल्लीतुन जायला आमचा टॅक्सीवाला कुरकुरत होता पण आम्ही त्याला न्यायलाच लावले, रस्त्यावरच जागोजागी मक्खन मलाई च्या गाड्या होत्या. दोन गाड्यांवर आम्ही मक्खन मलई घेऊन खाल्ली, खरोखरीच तोंडात विरघळणारा हा पदार्थ लाज़वाब असतो. उन्हाची काहिली विसरवणारी आणि जीव थंडावणारी मलाई ! त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि यु.पी.दर्शन अशी दोन ठिकाणे बघितली. यु.पी दर्शन हि नुकतीच उद्घाटन झालेली वास्तु आहे. भरपूर मोठ्या जागेत उत्तर प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांची मॉडेल्स केलेली आहेत. झांसी पासून, ताजमहाल, आयोध्या,मथुरा ,काशीविश्वेश्वर अशी अनेक स्थळांची माहिती व सुबक अशा प्र्तीकॄती केलेल्या आहेत. मला आवडले ,बरीच लहान मुले आलेली होती, आपल्या राज्यात काय काय बघण्यासारखे आहे याची माहिती त्यांना लहान वयात होणे किती चांगले. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ही प्रचंड मोठ्या जागेवर उभारलेली वास्तु आहे.ग्रानाईट मुळे अतिशय स्वच्छ आणि चकचकित ! संध्याकाळच्या थंड हवेत बरे वाटात होते,मात्र दुपारच्या उन्हात चांगलेच तापत असणार. मयसभेची आठवण व्हावी अशा रचनेत फार जपून पाय टाकावे लागत होते कारण गुळगुळीत फरशीवरुन पाय घसरायची भिती ! बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा आहे,मात्र मायावतींचे चार चार पुतळे आहेत. सत्ता हातात असताना काय काय करता येते हे पाहुन मन थक्क झाले खरोखरी ! दक्षिणेत जयललिता चे मंदिर आणि इकडे मायावतींचे पुतळे !आसेतुहिमाचल व्यक्तिपुजा .


सोमवारी पहाटे लवकर उठुन आम्ही आयोध्येला जायला निघालो. रस्ता सुंदर असल्याने दहा,साडेदहा वाजता आयोध्येजवळ पोचलो देखील. वेशीजवळच कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. सगळ्या खाजगी गाड्या एका ठराविक ठिकाणी पार्किंगमधे ठेवाव्या लागतात, तेथुन इ-रिक्शा करुन गावात जावे लागते. तेथुन बरिच घासाघिस करुन एक रिक्शा मिळवली आणि हॉटेलवाल्याला फोन करुन रिक्षावाल्याला पत्ता समजावला. आमचा ड्रायव्हर आता आम्हाला दुसऱ्या दिवशीच भेटणार होता. हायवेवर दुतर्फा रामायणातील प्रसंग सुंदर चित्रित केलेले आहेत.मात्र गावात अजुन सुधारणा चालू आहेत, ’सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी ’ आठवताना ,लहान,लहान गल्ल्या ,उघडी गटारे मनाला यातना करत होती. लहान गल्लीतून हॉटेलपाशी पोचलो, सामान ठेऊन फ्रेश होई पर्यंत बारा वाजायला आले होते. राममंदिराकडे जायला निघालो. कोपऱ्यावर रिक्षा उभ्या होत्या, त्यातल्या एकाला विचारले तो म्हणाला,’ तुम्हाला चालतच जावे लागेल,गर्दी आहे, रिक्षा जाऊ शकत नाही’ आम्ही चालायला सुरुवात केली. पन्नास मीटर गेल्यावर मुख्य रस्ता लागला. भक्तांचे लोंढेच्या लोंढे रस्त्यावरुन चालले होते, आम्ही गर्दीतुन जाऊ लागलो, वाटेत हनुमान गढी लागली, तेथे प्रचंड गर्दी होती, आधी रामारायाचेच दर्शन घ्यायचे असे ठरवुन पुढे निघालो. मोबाईल वगैरे सामान ठेवायला लॉकर्स होते,तेथे एका पर्समधे दोन्ही मोबाईल्स ठेऊन टोकन घेतले, चपल बूट ठेवायला हि चांगली व्यवस्था होती, तेथे पादत्राणे ठेऊन पुढे गेलो. सिक्युरिटी मधुन बाहेर आलो. मंदिर आता दिसू लागले होते.एकावेळी चार रांगातुन भक्तांना सोडले जात होते.कुठेही धक्काबुक्की नव्हती,पोलीस होते, त्यांना लाठी वा कठोर वाणीचा वापर करावा लाघत नव्हती. आम्हीआत सभामंडपातुन पुढे,पुढे जात होती.आणि अचानक प्रसाद आणि आरतीची वेळ झाली म्हणून रामलल्लांना पडाद्याआड केले.आम्हाला आत शांत थांबा असे पोलीस सांगत होते.बऱ्याच जणांनी खाली बसून घेतले. एका स्त्री-पोलिसने मला स्वतःची खुर्ची बसायला दिली.शांतपणे देवळचे कोरीवकाम बघायला मिळत होते,मी मनातल्या मनात रामरायाचे आभार मानत होते. एरवी इतका वेळ मंदिरात थांबायचे ठरवले असते तरी शक्यच नव्हते. पंधरा -वीस मिनिटांनी पडदा दूर झाला आणि २१ जानेवारीला टि.व्ही वर बघितलेली रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन झाले.रांगेतून पुढे जाताना नजर त्या मूर्तीवरच खिळून होती !.समोर जेमेतेम २-३ मिनिटेच थांबता आले.पण तेवढ्या दर्शनानेही मन भरुन गेले होते ! मंदिरातुन बाहेर आलो, प्रसाद घेतला आणि देणगी द्यायला काऊंटर वर गेलो. तेथे रमेशच्या कॉलेजचे माजी विद्यार्थी श्री.आफळे यांच्या पत्नी भेटल्या , त्यांनी श्री आफळ्यांना फोन करुन बोलावले. त्यांच्याकडून हे दांपत्य गेले चार वर्षे आयोध्येत असल्याचे समजले. श्री.आफळे हे मंदिर निर्माण कार्यातील प्रमुख व्यक्ती ! एवढे मोठे काम करणारी व्यक्ती भेटणार आणि ते पुणेकर असल्याचे समजल्यावर फार अभिमान वाटला. दहा पंधरा मिनिटांत आफळे साहेब आले. ते खुपच बिझी असतात, अजून अकरा इमारती, रस्ते,पाणी वगैरे बरीच कामे राहिली आहेत,मंदिराची रचना करताना कोणत्या बाबींचा विचार केला. रांगामधे जास्तवेळ उभे रहावे लागू नये याकरीता विज्ञानाचा वापर केलेला होता. दररोज १ ते दिड लाख भाविक येतात तरिही कोणालाच फार काळ रांगेत तिष्ठावे लागत नाही याचा अनुभव आम्ही पण घेतला होता.’मंदिरातील मूर्ती थोडी उंचावर आहे, पांढऱ्या संगमरवरी पार्श्वभागावर काळी मुर्ती व भरपूर उजेड यामुळे सभामंड्पात शिरल्यापासुन मूर्ती दिसत राहते त्यामुळे मूर्तीजवळ जास्त वेळ थांबता आले तरी भक्तांचा हिरमोड होत नाही.’ आफळे सर सांगत होते. मंदिराच्या बांधकाम करण्यापूर्वी त्यांनी अनेक देवस्थानांचा अभ्यास कसा किती केला,त्यांतील लोकांचे रांगामधे जास्त वेळ थांबणे त्यामागची कारणे याचा बारकाईने विचार व अभ्यास करुन या मंदिराची रचना केली आहे. आयोध्येचे मंदिर व्हावे याकरीता १९९० व १९९२  कारसेवकांनी कि्ती हालआपेष्टा सोसल्या, किती जणांना प्राणांचे मोलही द्यावे लागले याच्या बातम्या अप्रसिध्द असल्या तरी त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही हे बघुन मन अधिकच भरुन आले ! . आफळे साहेबांना बरीच कामे असूनही त्यांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि थोडक्या वेळात बरीच महिती दिली. दिवस अगदी सार्थकी लागला ! 

 मोबाईल ताब्यात घेतले,पादत्राणेही घेतली ,दोन वाजुन गेले होते. ऊन बरेच होते , तरी रस्ते माणसांनी फुलुन गेलेले होते. हॉटेल्स मध्येही तोबा गर्दी. एका लहान हॉटेलमधे कचोरी,सामोसा खाऊन पोट्पुजा केली आणि इतर देवळे बघायला निघालो. दशरथ महाल,कनक महाल हि पूर्वीची मंदिरे आहेत.दक्षिणेतील मंदिरांसारखे इकडे मंदिराच्या बाहेर कोरीवकाम वगैरे नव्हते. संध्याकाळी सरयू नदीची आरती बघायला इ-रीक्षा करुन निघालो,एक बंगाली जोडपे आम्हाला भेटले. त्यांची मुलगी पेंटींग्ज व चित्रे काढायला गेले अनेक महिने आयोध्येत आहे. तिला भेटायला व राम मंदिर बघायला ते उभयता आले होते. जाताना वाटॆत अनेक लहान मोठी देवळॆ दिसत होती. रस्ते,खूपच लहान, उघडी गटारे, असंख्य माकडे ,एकुण सुधारणेला खुपच वाव आहे.  नदीपाशी रिक्षातुन उतरलो.सूर्यास्ताला व आरतीला अवकाश होता, म्हणून नदीतून बोटीतुन चक्कर मारायचे ठरविले. बोटीत बसायला ग्रुप असेल तर अडाचण नसते, दोघांसाठी ते पूर्ण बॊटीचे भाडे मागतात व तेथील कोणाबरोबर आपल्याला शेअर करु देत नाहीत ! मात्र सुदैवाने आम्हाला एक पंजाबी कुटुंब भेटले ते चौघे होते व आम्ही सहा जणांनी एक बोट केली. नदीचे पात्र विशाल आहे आणि मार्च महिना असून पाणी पुष्कळ होते.पाणी स्वच्छ ही होते, प्लॅस्टीक, फुले असा कचरा नव्हता. पश्चिमेचा थंड वारा ,मावळता दिनमणी त्याच्या लाल प्रतिबिंबाने नदीच्या पाण्याला आलेलीआभा अत्यंत आल्हाददायक वाटत होते. दूरवर नदीवर बांधलेले अधुनिक पूल आयोध्येच्या कायापालटाची साक्ष देत होते. अर्धा पाऊण तास फिरुन येईपर्यंत  नदीच्या घाटावर आरतीसाठी गर्दी होऊ लागली होती.जागा पकडली , आरती सुरु झाली. गंगा नदीची आरती ह्र्षीकेशला बघितली होती. नदीला देवता मानुन तिची आरती करायची हि कल्पना खूप सुंदर आहे. कॄतज्ञता हा आपल्या संस्कॄतीचा गाभा आहे, मात्र आता आपल्याकडे या साऱ्या गोष्टी कर्मकांडासारख्या होतात.नदीचे पावित्र्य आपण ठेवत नाही, कपडे धुणे,अंघोळी या किरकोळ गोष्टी , नदीत मैल्याच्या पाण्य़ापासून कारखान्यातील विषारी द्रव्ये सोडण्यापर्यंत आपली मजल गेलीयं. मनात असे विचार चालू होते. आरती संपली नदीला वंदन करुन निघालॊ. वरच्या बाजुला अतिशय देखणा लेझर शो चालू झालेला होता. पाण्यामधे नाना रंगाची उधळण चालू होती आणि त्या पार्श्वभूमीवर मोठ्या पडद्यावर रामायण चालू होते. जरावेळ तेथे थांबलो पण दिवसभराच्या दगदगीने शरीर दमल्याची जाणीव हॊऊ लागली होती. रीक्षा करुन माघारी निघालॊ ,हॉटेलवर पोचायला आठ साठेआठ वाजुन गेले. जेवण करुन झोपलो.दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रयागराजला निघायचे होते.


आयोध्या ते प्रयागराज अंतर १६० कि.मी च्या आसपास आहे, रस्ता लहान असल्यामुळे तीन तासाहुन जास्त वेळ लागला, हॉटेलवर पोचेपर्यंत अकरा वाजुन गेले होते. सामान रुमवर ठेउन बाहेर पडलो. नेहरु कुटुंबाचा  ’आनंदवन” बंगला बघायला गेलो. प्रचंड मोठ्या आवारात प्रासादवत वास्तु पाहताक्षणी मनात भरते. भरपूर झाडी, सुंदर हिरवळ आणि गुलाब व विलायती फुलांचे ताटवे,फारच सुंदर. तिकीट व पोलिस पहाऱ्याने वास्तुचे सौंदर्य व स्वच्छता टिकलीय. मोतीलाल नेहरुंपासुन ,इंदिरा गांधींपर्यंत सर्वांच्या वस्तु,पुस्तके जतन केलेली आहेत.इंदिरा गांधीचे बालपाणापासून, तारुण्यातील,राजीव,संजय या मुलांचे बालपणातील, इंदिरा गांधींचे पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या प्रसंगांचे,विविध ठिकाणी भाषणे देतानाचे असंख्य फोटॊ आहेत.बघताना कसा वेळ गेला समजले नाही ! 

तिकडुन खुस्रो बाग बघायला गेलो. शहाजहानच्या या मोठ्या भावाला त्याने कपटाने मारले, त्याची ,त्याच्या बेगमची व त्याच्य़ा बहिणीची कबर  असलेली हि प्रचंड मोठी बाग आहे. तेथे सरकारने सध्या शेकडो आंब्याची व लिचीची झाडॆ लावली आहेत. कुस्त्रो बाग हि १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे लष्करी ठाणे असल्याची पाटी वाचली आणि त्या वास्तुबद्दल  आदर निर्माण झाला !.

दुपारचे उन चटचटत होते , त्रिवेणी संगमावर पोचलो. बऱ्याच बोटी होत्या , बोटवाले मनाला येईल तेवढे पैसे मागत होते,आठ दहा जणांच्या ग्रुपला ३०००रु द्यायला जड वाटत नाही,पण आम्ही दोघेच होतो आणि कोणाबरोबर एकत्र बोट कराय़ची तर बोटवाले तसे करु देत नव्हते, आमचा ड्रायव्हर , तुम्ही पैसे देऊन टाका म्हणत होता,पण आम्हाला दोघांनाही या साऱ्या अरेरावीचा फार राग आला, मी तर तेथुनच नदीला नमस्कार करुन माघारी निघाले,तेंव्हा एक बोटवाला आला व म्हणाला,"तुम्ही किती पैसे देणार?" ,मी म्हणाले," दहा जणांच्या ग्रुपला तुम्ही ३०००रु घेता, मी माणशी ३०० रु देते, तुम्ही अजुन आठ लोकांना घ्या,माझी हरकत नाही" तो आम्हा दोघांना ६०० रु.घेऊन जायला तयार झाला. त्याने ठेकेदार कसे त्रास देतात वगैरे सांगायला सुरुवात केली , म्हणजे एवढया पैशातले त्या बोट चालवणाऱ्यांना कमीच मिळतात आणि ठेकेदार माजतात. उन्हाळा सुरु झालातरी पाणी बरेच होते, आम्ही यमुना नदीपाशी बोटीत बसलो होतो, पुढे गेल्यावर गंगेचा प्रवाह नावाड्य़ाने दाखवला.सरस्वती गुप्त आहे. आम्हाला संगामात स्नान करायचे नव्हते त्यामुळे बोटीतुन फिरुन आलो आणि चंद्र्शेखर बाग, भारद्वाज बाग बघुन रुमवर पोचलो.

प्रयागराज अर्थात अलाहाबाद शहर मला आवडले.वाहने कमी असल्यामुळे असेल पण रस्ते मोठे वाटले आणि भरपूर झाडी, बागा यामुळे शहराला एक प्रकारचा घरंदाज बाज आहे. त्रिवेणी संगमाच्या किनारीअसल्याने पाण्याचे सौख्यही आहेच. कुंभमेळ्याच्या वेळी येणाऱ्या सांधुंच्या वास्तव्याने शहर पुनित होत असेल. 

दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे आम्ही चित्रकुटला निघालॊ. चित्रकूट पर्वतावर व त्या परिसरात राम,लक्ष्मण,सीता दहा वर्षे राहिल्याचे वाचले असल्याने तिकडे फार उत्सुकतेने व आवडीने मी गेले, मात्र माझा भ्रमनिरास झाला !

चित्रकुट हे शहर उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशाच्या सीमारेषेवर आहे.कदाचित मध्यप्रदेशाकडील भाग निसर्गरम्य असेल,कदाचित आम्ही गेलो तोवर उन्हाळ्यास सुरुवात झाली होती ,पण एकंदरीत घनदाट झाडी वगैरे काहीच नव्हते,पर्वत म्हणावे असे डोंगर नव्हते. मंदाकिनी नदीचे पात्रही बेताचेच, दोन्ही तीरावर मोठमोठे घाट आणि पलिकडच्या घाटावर मंदिरे, त्या तीरावर जायला बोटी आणि बॊटीतुन जायचे तर त्यांनी मुहमांगा दाम मागायचा आणि आपण आडल्या हरी सारखे त्यांची मनमानी सोसत ते द्यायचे. पलीकडच्या तीरावर ,भरत रामाला जेथे भेटला व त्यांच्या पादुक नेल्या ती जागा व तेथे देऊळ आहे, तुलसीदासाला रामाने याच ठिकाणी दर्शन दिले ते हि मंदिर आहे, सीतेचे मंदिर, रामाने वडीलांचे श्राध्द केले ती जागा अशा अनेक जागा त्या नावाड्याने उत्साहाने दाखवल्या. पण नदीचे अस्वच्छ पात्र, त्यात अंघोळी करणारे, प्लॅस्टीकसकट सगळा कचरा त्यात टाकणारे भाविक बघुन मन उद्विग्न झाले !  स्फटिकशीला ,अरुंधती आश्रम, श्रीराम व सीता कुंड अशी अनेक स्थळे बघितली, सगळीकडे भरपूर गर्दी होती . गुप्त गोदावरी व श्रीराम व सीता कुंड हा वास्तविक निसर्गाचा चमत्कार आहे. बऱ्याच पायऱ्या चढुन गेल्यावर , एका अगदी लहान दारातुन एकावेळी एक माणुस उतरु शकेल एवढ्या लहान जागेतुन आठदहा पायऱ्या उतरले कि आत गुहा होती, आत सीता कुंड आहे.रामकुंडासाठी पण असेच खोल जावे लागते आणि आत दोन्ही बाजुनी डोंगराच्या कपारी व मधे नदिचा प्रवाह, खुप छान आहे,पण गर्दी,धक्काबुक्कीने व मातीच्या पायांनी पाणी घाण झाल्याने सौंदर्य जाणवत नव्हते हे खरे. 

                  प्रयागराजला पोचायला रात्रीचे आठ वाजले. खूप उन लागल्याने खुप दमल्यासारखे वाटत होते. भुकही गेली होती. गरम पाण्याने अंघोळ करुन मी झोपुन गेले. पहाटे उठल्यावर ताजेतवाने वाटु लागले. सकाळी नाश्ता करुन काशीला जायला निघालो. सुरुवातीचा रस्त्याचे काम चाललेले होते, पण नंतर एकदम चारपदरी सुंदर रस्ता आहे. सारनाथला पोचलो तेंव्हा अकरा वाजले होते, सुदैवाने आकाश ढगाळ होते. ड्रायव्हरला घरी जायचे होते, तो म्हणू लागला ,’तुम्ही आता आराम करा, उद्या सारनाथ बघा’ आम्हाला दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंतच वेळ होता, त्यामुळे सारनाथ बघुनच आम्ही हॉटेलवर जायचे ठरवले. एक चांगला गाईड मिळाला, त्याने खुप छान माहिती दिली. थायलंड सरकारच्या सहाय्याने बनवलेली प्रचंड उंच बुध्दाची मूर्ती , मंदिर सगळे खुप सुंदर आहे.परीसरही खुप सुंदर आणि शांत आहे.  भारताची राजमुद्रा असलेल्या चार सिंहाची मूर्ती बघायची खुप उत्सुकता होती , शिवाय सारनाथच्या स्तुपाबद्दलही बरेच ऐकुन होते. ते सारे दुसऱ्या भागात आहे. पुरातत्व विभागाला उत्खननात मिळालेल्या वस्तुंचे देखणे संग्रहालय अवघ्या दहा रुपये तिकिटात बघता येते. तेथेच  सुप्रसिध्द चार सिंहाची राजमुद्रा आहे. उत्खनानात मिळालेल्या अनेक मूर्ती, मंदिराचे अवशेष भग्न स्वरुपात आहेत.आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या वस्तु बघताना मला मात्र ’मातीची दर्पोक्ती’ आठवत होती  !  

  पाहून हासु ये तुमचे ताजमहाल

अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ?

शेकडो ताजही जिथे शोभले काल

ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी

मातीवर चढणे एक नवा थर अंती !

          सारनाथचा स्तुप हि मात्र एक अत्यंत विशाल आणि भव्य वास्तु आहे ! त्याला प्रदक्षिणा घालुन आम्ही बाहेर आलो. एव्हाना आडीच वाजले होते, आमचे हॉटेल सारनाथ जवळच होते.रुमवर गेलो आणि संध्याकाळी गंगेची आरती बघायला जाऊ या असे सांगुन ड्रायव्हर गेला.आम्हाला भुक नव्हती , फळे खाल्ली जरावेळ आराम केला पाच वाजता गंगेच्या आरतीसाठी निघालो. अंतर फारतर १० किमी असेल पण आठ किमी. जायला तास लागला. रस्त्यात  खचाखच गर्दी होती.  घाटापसून दोन किमी लांब पार्कींग आहे, ड्रायव्हर च्या मागुन चालताना माझी दमछाक झाली , त्या पठ्ठ्याकडे मोबाईल नव्हता त्यामुळे गर्दीत चुकामुक परवडारी नव्हती. साडॆसहाला आरती सुरु होते आम्ही जेमेतेम पोचलो, नदीत बोटींची खेचाखेच होती . एकाबोटीत आम्ही चढलो, ड्रायव्हरचे बोटवाल्याशी बोलणे झाले होते. बोट निघाली आणि त्या अनेक बोटींच्या गर्दीत त्या नावाड्याने आमची बोट घुसवुन एका ठिकाणी थांबवली . हृषिकेशला आम्ही  गंगेची आरती २०१६ मधे पाहिली होती , तिकडचे वातावरण जास्त आवडले.इथे असलेल्या गर्दीने प्रसन्नता जाणवत नाही. नदीचे पात्र विशाल आहे. तीरावरील घाट दिव्यांनी उजळले होते. पाच ठिकाणी पुरोहित उभे राहुन आरती करत होते . आरती झाल्यावर नावाड्याने  नावेतुन आम्हाला गंगेवरील घाट दाखवले. तुलसी घाट, सिंदिया घाट, मनकर्णिका घाट असे अनेक घाट ! तुलनेने हे घाट आता खूप स्वच्छ आहेत . एक तास कसा गेला समजलेच नाही. काठावर येऊन परत गाडीपर्यंत पोचताना पुन्हा तीच जिकिर,तीच धडपड ! हॉटेलवर पोचायला नऊ वाजुन गेले होते, पोटात भुकेने रान कडाडले होते, जाताना आम्ही जेवायला येणार असे सांगुन ठेवले होते.पण हॉटेलच्या डायनिंगहॉलची सफाई चालली होती आणि तिथल्या खानसाम्यांना आमच्या जेवणाबद्दल काहीच कल्पना नव्हती हॉटेलमधे आमच्याखेरीज कोणीच गेस्ट नव्हते त्यामुळे ते निवांत होते, त्यांनी शांतपणे ऑर्डर घेतल्यावर बनवुन देतो असं म्हटल्यावर रमेशचा पारा चढला, त्यांनी आवाज चढवला, मॅनेजर आला , त्याचाही तोल सुटला. मी हताश पणे बसुन होते, पण खानसामा शहाणा निघाला, तो तेथुन निघाला आणि अक्षरशः दहा पंधरा मिनिटात , दोन भाज्या, दाल आणि दोन गरम गरम फुलके बनवुन घेऊन आला . दुसऱ्या वेटरने चटचट वाढले. आम्ही जेवायला सुरुवात केली. ताजे गरम अन्आणि पोटात भुक ! अन्न हे पूर्णब्रह्म का म्हणतात ते कळलं.  चार गरम घास पोटात गेल्यावर रमेशचा राग थंड झाला. वेटर त्यांच्यांशी बोलत राहिला आणि दुसरा एक जण गरम फुलके आणत होता ! दोन फुलके खाल्ल्यावर मी भात मागितला, तो ही आलाच पाच मिनिटात, जिरा राईस आणि दाल फ्राय  खुप चविष्ट होते. त्या बरोबरच मलईदार दही पण होते . जेवुन आम्ही त्या अन्नदात्यांना सुखीभव म्हणून रुमवर गेलो. आम्हाला दुसऱ्या दिवशी पहाटे पाचला निघायचे होते. सहा वाजता  काशी विश्वनाथाचे दर्शन घ्यायचे होते. 

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे काशी हे तिर्थक्षेत्र . सर्वात पुरातन शहर आणि बनारस, वाराणासी आणि काशी अशी तीन बिरुदे लाभलेले कदाचित एकमेव ! काशी हे सर्वात प्राचीन नाव आहे, संस्कृत धातु ’कास’ म्हणजे चमकणे , त्या मुळेच विश्वनाथाला काशी विश्वनाथ, तेजस्वी विश्वनाथ असे म्हणत असावेत .  वाराणासी हे नाव गंगॆच्या वरुणा आणि आसि यांच्या संगमावर हे शहर असल्याने त्याचे नाव वाराणासी पडले. इथे गौतम बुध्दाला ज्ञानप्राप्ती होऊन सारनाथ येथे त्यांनी आपले पहिले प्रवचन दिले.बनारस नावाची व्युत्पत्ती मात्र समजु शकली नाही ! 

पहाटे पाच वाजता अंघोळी आटोपुन आम्ही निघलो, आम्हाला VIP दर्शन घडवायची हमी आमच्या ट्रॅव्हल एजंट्ने एका व्यक्तीचा नंबर देत दिली होती, त्यांच्यांशी आदल्या दिवसापासुन संपर्क चालुच होता. सकाळी साडेपाचला गाडी लावुन त्या माणासाची वाट बघत बसलो. पावणे सहाला तो आला. त्याच्या ताब्यात आम्हाला देऊन ड्रायव्हर गुप्त झाला. त्याने आम्हाला एका टपरीवजा दुकानात नेऊन तेथे मोबाईल,चपला ई . लॉकर मधे ठेवायला सांगितले, लॉकरला भाडॆ नव्हते, पण तेथे प्रसाद विकत घेणॆ बंधनकारक होते, कमीतकमी साडेतिनशे रुपयाचा प्रसाद घेतला. VIP दर्शनाला ६०० रु घेतले , त्याचे रितसर तिकिट मिळेल असे सांगितले. तिकीट घेउन एकजण आला आणि त्याच्याबरोबर एक तरुण मुलगा होता , त्याच्या गळ्यात आयकार्ड सारखे काहीतरी होते, धोतर आणि भगवा झब्बा घातलेला तो मुलगा आम्हाला घेऊन निघाला, अर्धा पाऊण कि.मी चालल्यावर मंदिर आले,आत सिक्युरीटी पाशी आमचे सामान तपासले, माझी पर्स मी लॉकरमधेच ठेवली होती पण पैसे तिकडॆ कसे ठेवणार म्हणून रमेशने त्यांच्याजवळ एक छोटी बॅग ठेवली होती. त्यातल्या काही वस्तू पोलिसाने काढायला लावल्या. आत गेल्यावर आणखी एका सिक्युरिटीतुन जाताना बॅगेतली छोटी चांदीची लवंगा ठेवायची डबी काढायला लावली, ती ठेवायला पुन्हा अर्धा पाऊण कि.मी जाणे कठीण होते, पण मंदिराच्या परिसरात लॉकर्स होते अ ते विनामूल्य होते, तेथे ती डबी ठेवली. दर्शनाची रांग फार नव्हती. रांगेतुन पुढे गेलो, गाभाऱ्यात जायला स्पर्श दर्शनाचे तिकिट घेणे जरुर होते, त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती, मग बाहेरुन दर्शन घेतले, अभिषेकाचे दूध दुरुनच ओतले तो लोटा पोलिस बाईने काढुन घेतला.  

काशीचे मूळ मंदिर औरंगजेबाने नष्ट करायचे ठरवलयं अशी कुणकुण आल्यावर तिकडच्या पुजाऱ्यांनी शिवलिंग काढुन विहिरीत टाकुन दिले,ती विहिर मंदिराच्या आवारात आजही आहे, तिला ग्यानवापी म्हणतात. त्याचे पाणी काढुन तीर्थ म्हणून देतात. मंदिराच्या जागी आज मशिद उभी आहे आणि मशिदीच्या समोर नंदी मात्र आहे. हा नंदी सध्याच्या शिवाच्या मंदिरापासून थोडा दूर आहे. त्याचे दर्शन घ्यायला वेगळी रांग होती. ग्यानवापीला लागुन सभामंडप आहे, तेथे बसुन रमेशने रुद्राचे एक आवर्तन केले.  एका अपूर्व समाधानाने मन भरले. आम्ही अन्नपूर्णा देवीचे दर्शन घेतले.शंकराचार्यांचे अन्नपूर्णा देवीचे अप्रतिम स्तोत्र मला माहित होते. 

अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।

ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति  

माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।

बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्  

दक्षिणेतील केरळ जवळील लहानशा खेडेगावातील शंकराचार्य हे एक तेजस्वी संन्यासी.सातव्या शतकात त्यांनी चालत भारतभ्रमण केले. हजार बाराशे वर्षांपूर्वी कुठल्याही सोयी सुविधा नसताना एक तरुण संन्यासी चालत एवढे अंतर कसा आला असेल. ईश्वरी संकेत आणि त्याची कॄपा असल्याखेरीज हे शक्य वाटत नाही. हिंदू धर्मातील असलेली अवास्तव कर्मकांडे, स्मार्त आणि वैष्णव पंथियांनी केलेल्या देवांच्या वाटण्या व भांडणे , यातुन सर्वसामान्यांना परमेश्वराचे खरे स्वरुप समजावण्यासाठी त्यांनी आपले जीवन खर्ची घातले. देव पंचायतन हि संकल्पना आणली. बौध्द आणि जैन धर्माच्या प्रसारामुळे सनातन हिंदु धर्मावर आलेले मळभ दूर करण्यासाठीच जणु या ज्ञानमार्तंडाचा उदय झाला आणि अवघे ३२ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या यतीने अद्वैत सिंध्दांत्ताने मानवजातीवर केवढे उपकार केले ! काशीच्या  या मंदिराच्या परिसरात त्यांना शिवाने दर्शन दिल्याचे वाचले होते. मला खरंतर या करीताच काशीला यायचे होते. 

औरंगजेबाने मंदिर उध्वस्त केल्यानंतर तेथे शंभर वर्षे कोणीच येत नव्हते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची अवस्था बघितली आणि नर्मदा तीरावरुन शिवलिंग पाठवुन पुन्हा मंदिर बांधले. अर्थात ते दुसऱ्या ठिकाणी बांधले.मशिद काही हलवली नाही, आताचे मंदिर लहान आहे.  सध्या मंदिराचा परिसर खुप मोठा आणि अतिशय स्वच्छ आहे. चारी दरवाजे उघडे असून सगळीकडून भाविक मंदिरात प्रवेश करु शकतात ,सुरक्षा व्यवस्था चांगली असल्याने गोंधळ,गड्बड नव्हती. 

मंदिरातुन बाहेर आलो व चप्पल,बूट आणि मोबाईल ताब्यात घेतले. तेथील लोकांनी आमच्या बरोबर आलेल्या पंडिताला पैसे द्या असे सांगितले, त्याने २१०० रुपयाची मागणी केली. आम्ही हतबुध्द झालो, आमच्या ट्रॅव्हल एजंटने ५०० रु द्या असे सांगितले होते, आम्ही तेवढे देऊ असे म्हणाताच तो भयंकर चिडला,संतापला, पैसे नकोतच असे ओरडू लागला. आमच्या बरोबर आलेल्या माणसाने त्याला समजावले व ५००रु. घ्यायला लावले.गाडी पाशी आलो तेंव्हा आम्हाला तिथवर आणाणाऱ्यानेही पैसे मागितले, त्यालाही पैसे देणे भाग पडले.  मी नंतर नेटवर बघितले, ऑनलाईन स्पेशल दर्शनाला तुम्ही माणशी ३००रु देता त्यावेळी तुमच्या बरोबर एक पंडीत येतो तो तुम्हाला मंदिराची माहिती देतो, प्रसादही देतो. आम्हाल प्रसाद तर  मिळालाच नाही आणि पंडीताने वर पैसे मागितले, दिलेल्या पैशाबद्दल नाराजी दाखवली ! मी आम्हाला गाडीपासून टपरी पर्य़ंत आलेल्या माणासाला तुम्हीच आम्हाला मंदिरात का नेले नाही असे विचारल्यावर म्हणाला होता ,’आम्हाला परवानगी नाही , ठराविक पंडीतच जाऊ शकतात " त्याचा उलगडा झाला. पैसे गेल्याच्या दुःखापेक्षा फसवणुकीचा जास्त विषाद झाला ! आमची चूक ही होतीच, पण सामान्य जनता कशी फसवली जाते याचा अनुभव आला.त्या फसवेगिरीत आमचे ट्रॅव्हल एजंटपण असल्याने जास्तच वाईट वाटले !

नंतर संकट्मोचन मारुती, दुर्गा, तुलसी रामायण मंदिर बघुन बनारस हिंदू विद्यापीठ बघायला गेलो. मदन मोहन मालवीय यांनी देणग्या गोळा करुन उभारलेले विद्यापीठ मला बघायचेच होते. जयंत नारळीकरांच्या आत्मचरीत्रात त्याबद्दल खूप वाचले होते . विद्यापीठाचे आवार खूप मोठेव शांत, हिरवेगार आहे. आवारात एक शंकराचे संगमरवरी मंदिर असून ऋग्वेद, यजुर्वेदातील ऋचा अर्थासकट कोरलेल्या आहेत. दहा वाजुन गेले  होते, पहा्टेपासून काहीच न खाल्ल्याने भुकेची जाणीव तीव्र होऊ लागली. हॉटेलवर जाऊन नाश्ता करण्यात बराच वेळ गेला असता, त्याऐवजी आम्ही रस्त्यावर कचौडी सब्जी खायचे ठरवले, ड्रायव्हरने चांगली टपरी दाखवली तेथे खाल्ले,लस्सी प्यायली. क्षुधाशांती झाल्यावर पाळंदे गुरुजींकडे जायला निघालो.

वाराणासीला गंगा किनारी पितरांचे श्राध्द विधी करुन गंगेत पिंडदान करावे अशी आम्हा उभयतांची इच्छा होती, त्याप्रमाणॆ पाळंदे गुरुजींकडे गेलो, त्यांच्या घरी फक्त चालतच जाता येते, एकावेळी दोन जण शेजारी शेजारी चालू शकत नाहीत अशा लहान लहान गल्ल्यामधुन त्यांच्या घरी गेलो त्या आधी तशाच गल्ली बोळातुन काळभैरवाचे दर्शन घेतले होते. श्राध्द विधी गुरुजींनी यथासांग करविला, एक वाजता चटचटत्या उन्हातुन घाटावरुन नदिकिनारी गेलो आणि नदित बसुन दुरवर जाऊन पिंडदान केले.

बनारसला काही खरेदी करायची असे ठरवले होते पण उत्साह शिल्लक नव्हता. इकडच्या लोकांच्या लबाड व फसवण्याच्या प्रवृत्तीने मन उद्विग्न झाले होते.  एक दोन दुकानात गेलो पण काही आवडेना , मग हॉटेलवर परतलो, जरा वेळ आराम केला आणि सामान आवरुन संध्याकाळी सात साडेसातला जेवण केले आणि पुण्याच्या प्रवासाला जायला सिध्द झालो ! 

अशी हि आमची काशी यात्रेची कहाणी सुफळ संपूर्ण  

चैत्रातले हळदी-कुंकू

माझ्या शालेय जीवनातल्या बहुतेक सुट्ट्या भोरला गेलेल्या आहेत.भोरच्या ऎसपैस घरात सुट्टीमध्ये बरीच मंडळी यायची.मी-आणि माझी धाकटी बहीण जायचो, भोरातच मंगळवार पेठेत राहणाऱ्या माझ्या आत्याच्या दोघी मुली सुट्टीला तेथे यायच्या.मुंबईची आत्या यायची. कधी सोलापूरहून आमचे मोठे काका सहकुटुम्ब सहपरिवार यायचे, पुण्यातले दोन काका एकदोन दिवस येऊन जायचे.एकूण घर भरलेले. आम्हा मुलांची चैन असायची.शाळेला सुट्टी,सकाळी अंघोळी वगैरे उरकल्यावर काकुला स्वयंपाकात थोडी फार मदत करायची. भोरला काकांकडे भरपूर पुस्तके होती. त्यामुळे आमची दुपार बहुतेक वेळा पुस्तके वाचण्यातच जायची. कधी कधी काकू साबुदाण्याच्या पापड्य़ा, बटाट्याचा किस, पापड करण्याचा घाट घाली मग ते ही आम्ही हौसेने करु लागायचो. एकुणात सुट्टी मजेत जायची, पण सगळ्यात मजा म्हणजे चैत्रात घरोघरी हळदी-कुंकू असायचे. दररोज तीन चार, तर कधी पाच सहा घरुन आमंत्रणे यायची. काकु आम्हाला तिच्या मेधा सकट सगळ्या पुतण्या,भाच्यांना घेऊन जायची. तिच्याकडे एक स्टीलचा डबा असे. प्रत्येक घरी कागदावर किंवा द्रोणात कैरीची डाळ मिळायची .पहिल्या एक दोन  घरी डाळ आम्ही खायचॊ.पुढच्या घरी काकु आम्हाला डाळ डब्यात ठेवायला लावायची. ओल्या हरबऱ्याची ओटी तिच्या पिशवीत पडायची.पन्हे आम्ही प्यायचो. घरी आल्यावर सगळी डाळ एकत्र करुन त्यावर काकु पुन्हा एकदा खमंग फोड्णी घालायची. ती डाळ घरातल्या पुरषांना आणि आजीला मिळायची.आमची पोटे बहुदा भरलेलीच असत. ओल्या हरबऱ्याची खमंग उसळ बनाय़ची. 

एक दिवस आमच्या घरी हळदीकुंकू ठरायचे. घराची साफसफाई होई. घरात करंज्या,लाडू बनत.कलिंगडे,टरबुजे येत. आम्हाला घरोघरी जाऊन आमंत्रणे करायचे काम असे. हळदिकुंकवाच्या दिवशी जेवणे झाली कि आवराआवरीला सुरुवात होई. बाहेरच्या हॉलमधे आम्ही काकुच्या साड्या,किंवा चांगल्या चादरीचे पडदे बनवायचो .पुढे टेबलावर देवीची आरास असे. पायऱ्या बनवुन त्यावर घरातल्या शोभिवंत वस्तु, फराळाचे पदार्थ ठेवले जात.पुढे सुंदर रांगोळी.देवीसाठी काकु कधी कलिंगडाचे कमळ तर कधी कलिंगडाची होडी करी ,टरबुजाची कमळे दोन्ही बाजुंना ठेवत असे. काकु जन्मजात कलावंत होती, अगदी सहज ती रांगोळ्या काढी, कलिंगड,टरबुजाची कमळे करी,आम्ही थक्क डोळ्यानी तिची कलाकुसर बघायचो. होडीत किंवा कमळात ती देवी स्थानापन्न होई. आमच्या जवळचा मणी,खडे,रंगीत दगड असा सगळा मौल्यवान खजिना देवीच्या पायापाशी रुजु करायला आम्ही एका पायावर तयार असायचो. त्यांच्य़ा रंगीबेरंगी आकॄत्या तयार करायचो आम्ही. आमची इंदाआजी पण आमच्या बरोबर हौशीने या आराशीत भाग घ्यायची. एकदा तिने आम्हाला बांगड्य़ांच्या काचा आणायला सांगितल्या होत्या.आत्याच्या घरा जवळ एक कासाराचे दुकान होते. आत्याच्या मागे लागुन त्या कासारणी कडे तिला नेले.ती पण तिच्या एवढ्या धबडग्यातुन कासारणीकडे आली तिच्याकडे आमच्या करता फुटक्या बांगड्याची मागणी केली. मग त्या काचांचे तुकडे पिशवीतुन जपुन आणले.आजीने रात्री सगळी कामे उरकल्यावर समई वर त्या काचा वाकवुन एकात एक घालुन त्याचे इतके सुंदर तोरण बनवुन दिले कि आम्हाला आजीबद्दल फारच आदर दाटुन आला. आज आठवताना वाटते, कि आजीला त्यावेळी इतकी कामे असत, तिची साठी सहज उलटुन गेली होती, तरी नातींसाठी इतका उत्साह ती कुठुन आणत होती? ऐन तारुण्यातच वयाच्या बत्तीस तेहेतीसाव्या वर्षी आजीला वैधव्य प्राप्त झालं होतं आणि त्या काळात तिला सुवासिनींच्या कुठल्याच कार्यक्रमांना जायची मुभा नव्हती, असं असून देखील ती हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सगळी कामे आनंदाने करायची, त्यावेळी खरचचं जाणवलं नाही.  तिला कधीच फुले घातलेली बघितलं नाही. आमची दुसरी आजी आमच्या घरी आली कि अंघोळ झाली कि तिची लाकडी पेटी घेऊन बसे, कपाळाला मेण लावुन त्यावर कोरडे कुंकू लावत असे. एकदा ती गेल्यानंतर आमची इंदा आजी आमच्याकडे आली. तेंव्हा तिची अंघोळ झाल्यावर माझी धाकटी बहिण तिला म्हणू लागली,"आजी ,तू काकी आजी सारखं कुंकू लाव ना " आजी ने तिच्याकडे दुर्लक्ष केले. पुन्हापुन्हा ती म्हणू लागल्यावर माझी आई तिला रागावली,तेंव्हा आजी आईलाच म्हणाली,’अगं त्या लेकरावर का रागावतेस? तिला काय कळतयं ’ सीमा आईच्या रागावण्याने गप्प बसली , पण आजीबद्दलचा माझ्या मनातला आदर वाढला . 

थोडक्यात हळदीकुंकवाची तयारी खूप सुंदर होई. हॉलमधे मोठी सतरंजी घालणे वगैरे कामे पुरुषांच्या मदतीने होत. सकाळची जेवणखाणी उरकली की काकु आणि आजीची हळदीकुंकवाच्या तयारीला सुरुवात होई. भिजवलेले हरबरे उपसुन ठेवणे. कैरी किसुन देणे अशा छोटी मोठी कामांना आमचा हातभार लागे, पण भिजवलेली डाळ कुटायचे काम आजी आणि काकुच करत. मिक्सर नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर डाळ बनवणे सोपे काम नसे !. आत्या माहेरवाशीण म्हणून आलेली असे, ती पण असे मदतीला.पण एकूण कामे खुप कष्टाची होती. कैरीचे पन्हे पण असेच मोठे काम असे. पडवीत बरेच माठ भरुन ठेवलेले असत त्यातले पाणी वापरुन कैरीचे पन्हे मोठ्या कल्हईच्या पातेल्यात केले जाई.

सहा नंतर बायका येऊ लागत , त्या आधी आमचा नट्टापट्टा होऊन आम्ही ठेवणीतले नवे फ्रॉक घालुन पावडर,कुंकू करुन तयार होत असू.  हळदीकुंकू, अत्तर लावणे,गुलाबपाणी शिंपडणे आणि वाटली डाळ देणे हि कामे आम्ही सगळ्या करायचो. हरबऱ्याची ओटी काकु भरायची आणि पन्हे भरायचे काम आत्या ,आजी करायच्या ते हळुवार पणे करावे लागे. काकु हाडाची शिक्षिका असल्याने ती आम्हाला कामे अशा प्रकारे वाटुन द्यायची कि आमच्यात भांडणे न होता कामे बिनबोभाट होत. रात्री साडेआठ नऊ पर्यंत बायकांची येणी जाणी चालत. काका लोकांना बाहेर येता येत नसे. रात्री आमचा मामा, आत्याचे यजमान बापुराव, काकांचे आणखी काही मित्र येत मग  स्वयंपाघरात या खास लोकांची बैठक असे,त्यांना हरबऱ्याची उसळ,करंजी,लाडू मिळे. मुली दमल्या असे म्हणत आम्हालाही तो खाऊ मिळॆच. कलिंगड, टरबुजे चिरली जात. आजी काकु,आत्या,मामी सगळ्यांना नाव घ्यायचा आग्रह करायची. सगळ्या जणी आजीचा मान राखत उखाणे घेत. आम्हाला ते ऐकताना फार मजा यायची. आमच्या आत्याचा उखाणा ठरलेला असायचा ’ हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रघुनाथरावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी’ आत्याची लेक म्हणे, " आईने दरवर्षी बर्फांच्या राशींवर बसवुन बाबांचा स्वभाव थंड झालाय"  आमचा सुरेश मामा पण हौसेने भला मोठा उखाणा घ्यायचा  "पुणं झालं जुनं, सातारा झाला म्हातारा..... शेवटी गाठली सांगली गीता सगळ्यांहुन चांगली".अशा चेष्टा विनोदांत गप्पा गोष्टीत वेळ मजेत जायचा.

मे महिन्याच्या सुट्टीच्या अशा या सुरेख आठवणी. मध्यंतरी जी.ए.कुलकर्णी यांची ’चैत्र’ नावाची कथा वाचली होती. त्यातल्या गरीब पण स्वाभिमानी स्त्रिचा हळदीकुंकवाच्या दिवशी श्रीमंताच्या घरी अपमान होतो आणि ते बघुन तिचा मुलगा दुखावतो, मग ती मुलाच्या मनातुन त्या घराबद्दलची आढी घालवण्यासाठी घरातले सोने विकुन हळदिकुंकवाचा घाट घालते असे काहीसे कथानक आहे.ते वाचताना मला भोरचे हळदीकुंकू आठवत होते. आमचे घर त्या कथेतील मामलेदारांसारखे गडगंज श्रीमंत नव्हते आणि फार गरीबही नव्हते. सगळ्यांचे आदरातिथ्य सारखेच होत असे. भोर मधे घराघरात एकोपा होता. सगळेच मध्यमवर्गीय सुखी समाधानी. घरात एक दिवसाच्या हळदिकुंकवाच्या समारंभासाठी घरातल्या बायकांचे आठ दहा दिवस कामात जात.आधीची तायारी, त्या दिवसाची धावपळ , नंतरची आवराआवर. आणि हे सारे सुट्टीत घरात आलेल्या वीस पंचवीस पाहुण्यांचे सारे करत असतानाच. पण काकु, आजी ,आत्यांनी कधी कुरकुर ,चिडचिड केलेली आठवत नाही. या सगळ्या माउल्यांच्या अपार कष्टाच्या खतपाण्यामुळे आमचे बालपण समॄध्द झाले यात शंकाच नाही. 



Tuesday, April 25, 2023

लिला आजी

आमच्या विद्याताईचे लग्न ठरले तेंव्हा मी नववीत होते. लिलाताई तिच्या सासुबाई, पण त्या सासुबाई वाटतच नाहीत असे आम्हा सर्व भावंडाचे एकमत होते. एकतर त्यांची लहान चण, हसरा आणि बोलका चेहरा आणि बडबडा स्वभाव यामुळे तथाकथित सासुच्या प्रतिमेत त्या बसत नव्हत्या.लग्नात त्यांनी विहिणीचा मानपान घेतला असेल तेवढाच .एरवी त्या कायम आमच्याशी  प्रेमाने आणि जिव्हाळ्याने वागल्या. विद्याचे घर आमच्या घराजवळ असल्याने येताजाता त्या सहज म्हणून डोकावत आणि गप्पागोष्टी करुन जात.चहापाण्याचे त्यांना वेड नव्हतेच आणि खाण्यापिण्याची पण फार आवड नसल्याने त्याचीही अपेक्षा नसे.त्यांचा जनसंपर्क प्रचंड होता आणि स्मरणशक्ती अचाट होती.आमच्या चुलत, मावस,आते बहिणींची लग्ने जमवताना त्यांची खूप मदत झाली.

आमचे दादा १९८२ साली अचानक वारले आणि आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अशा वेळी बोकील कुटुंबाने आम्हाला दिलेला आधार आम्ही कधीच विसरु शकत नाही.विद्या आमची मोठी बहिणच होती पण प्रकाशराव, लिला आजी आणि भाऊंनी आमच्या दुःखात आम्हाला फार मोठा आधार दिला. आमच्या दोघींची लग्ने ठरल्यावर साखरपुडे त्यांच्या घरीच झाले. लग्नाचा मुहुर्त, घाणा भरणे, मंगलाष्टके,विहिणिच्या पंक्तीला गाणी आणि शेवटची पाठवणी सगळ्य़ाला लिला आजींच्या गाण्यांनी बहार आणली होती.माझ्या दोन्ही मुलींना घरी आणल्यावर पहिली अंघोळ लिला आजींनीच घातलीयं. 

२००४ नंतर आमच्या आईचा कंपवाताचा आजार वाढत गेला व तिला घरात एकटे ठेवु नका असे डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी भाऊंनी आईला आपल्या घरी आणा असे विद्याला सांगितले. त्यावेळी प्रसाद कानपुरला, विद्या व प्रकाशरावांची नोकरी ,भक्तीचे इंजिनियरींग व भाऊंचे स्वतःचे आजारपण असताना आई त्यांच्या घरी गेली.तिला वरच्या मजल्यावर ठेवले होते. आईचे जेवण,चहा सगळे लिला आजींनी विनातक्रार केले. त्याचा कधी कुठे उल्लेखही केला नाही.विहिणीला बहिण मानणाऱ्या लिलाआजी खरोखरीच असामान्य होत्या.एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे एकमेकांसाठी करायचे त्यांच्या रक्तातले संस्कार होते. आजींनी आमच्यासाठी इतकं केलयं कि सांगायला वेळ पुरणार नाही.माझ्या थोरल्या लेकीचे लग्न ठरले खरेदी  ,कार्यालय बघणे चालु होते,विद्या भक्तीकडे इंग्लडला गेल्याने मला फारच एकाकी वाटत होते, तेंव्हा एक दिवस आजींचा फोन आला,’शुभा तनुच्या लग्नाचा मुहूर्त कधी करणार? मी म्हटले ,"विद्या नाही ,माझ्या घरी सांगायला मोठं कोणी नाही मला काही सुचत नाहीये" त्या लगेच म्हणाल्या,"अगं मी आहे ना, आपण रविवारी मुहूर्त करुन घेऊ".काय काय तयारी हवी ते त्यांनी सांगितले, रविवारी आल्या, मुलींना नऊवारी साड्य़ा नेसवण्यापासून गाणी म्हणत पापड,पाच खिरी सगळे मजेत झाले. पुढे ग्रहमख,लग्न सगळ्याला आजी होत्या. माझ्या लग्नापासुन माझ्या मुलीच्या लग्नापर्यंत आजी त्याच उत्साहात वावरल्या.


वयाच्या पन्नाशीनंतर त्या पौरोहित्य शिकल्या आणि सत्यनारायण पुजा,वटपौर्णिमा,मंगळागौर अशा अनेक कार्यक्रमांसाठी त्यांना बोलावणी येऊ लागली. पहाटे उठुन घरातली कामे आटपुन त्यांचा दौरा सुरु होई. पुजा सांगण्यापुरते त्यांचे काम मर्यादित नसे, पुजेची तयारी करण्यापासुन असेल त्या सामग्रीत उठुन दिसेल असे कार्य साजरे करण्याचे कसब त्यांच्याजवळ होते. यजमानांच्या सांपत्तिक स्थितीवर पुजेचे काम कधीच अवलंबुन नसे. मिळणारी दक्षिणा कधी त्यांनी स्वतःसाठी खर्चच केली नाही. त्या कार्यक्रमांतही ओळखी करुन  अनेक लग्ने जमवली त्यांनी. लिलाआजींजवळ उत्साह आणि उर्जेचा एवढा साठा कसा ?असा मला नेहमी प्रश्ण पडे मग लक्षात आले, त्यांचं वय वाढल होत, पण मन मात्र लहान मुलासारखच होते, काळजी,चिंता त्यांच्या थाऱ्यालाही उभ्या नसत. एक तर सतत कामात असल्याने विचार करण्याएवढे रिकामपण त्यांच्याकडे नव्हते . कोणी गावाला जावो,गावाहुन येणार असो, कोणी आजारी असो आजींना कधी चिंतागती होवुन बसलेल्या कुणी बघितलच नाही.  त्या कुठे गेल्या तरी तिकडे पोचल्याची खबर घरी द्यायचे त्यांच्या डोक्यात नसे. आला दिवस आनंदात घालवायचा , दुःखाचा प्रसंग आलाच तर मनमोकळेपणाने रडुन घेत. आपल्या भावंडांचे,दिरा जावांचे,नणंदांचे ,विहिणींचे अनेक मृत्यू त्यांनी बघितले .त्या त्या घरी जाऊन लागेल ती मदत करुन येत .तिकडून आल्यावर पुन्हा नेहमीचे आयुष्य सुरु करीत. आठवणी काढुन रडत बसुन घरातले वातावरण दुःखी केले नाही. मॄत्युची अपरिहार्यता त्यांनी सहज स्विकारली होती. वर्तमानात जगा असे सगळे स्वामी,महाराज शिकवतात,मोठमोठी पुस्तके वाचुन, व्याख्याने ऐकुन शिकल्या सवरलेल्यांना न जमणारे जगणॆ आजी जगत राहिल्या.म्हणुनच त्यांना वृध्दत्वाचा स्पर्श झाला नाही.


त्यांनी अनेकांना सहज मदत केली पण कोणाकडून कुठलीच अपेक्षा बाळगली नाही.अनेकांची लग्ने जमवली, अनेकांना कामे मिळवुन दिली,घरी आलेल्यांना जेवायला घातले. गीतेमधील कर्मयोगाचे पालन सहज केले त्यांमुळे सगळ्यांना हव्याहव्याशा वाटत असतानाच त्या अचानक आपल्यातुन निघुनही गेल्या. हसत हसत जगल्या आणि तशाच आनंदात गेल्या. त्यांच्या जीवनभराच्या पुण्याईमुळे त्यांना असे भाग्याचे मरण लाभले. आजी आपल्या सगळ्यांच्या कायम आठवणीत राहणार. त्यांच्यासारखे आनंदी, सकारात्मक जगायले शिकणे हिच त्यांना श्रध्दांजली ठरेल. 



Thursday, October 22, 2020

भ्रमनिरास

 

नाव: पद्मशीला तिरपुडे
जिल्हा: भंडारा. 
खलबत्ते, वरवंटे विकून संसार व मुलाला सांभाळून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन MPSC ची PSI ची परीक्षा पास करणारी ही मुलगी आहे.
💐 सलाम तिच्या मेहनतीला 💐

WhatsApp वर हि बातमी फिरतीय.  या मुलीचा फोटोही झळकतोयं. खरोखरीच या मुलीच्या जिद्दीचे,परिश्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आजच्या चंगळवादी जगात तर या मुलीचे कष्ट जास्तच उठून दिसतात. हि मुलगी सरकारी नोकरीत रुजु झाली त्यातही पोलीस खात्यात गेली आहे हे वाचल्यावर मात्र तिला नोकरीत कशा अनुभवांना तोंड द्यावे लागेल याचं चित्र उभं राहीलं आणि त्याचच हे कल्पनाचित्र. तिचे  अनुभव  असेच असतील असे नाही, किंबहुना ते असे नसावेतच तरीही.....


जातीने मी पाथरवट

दगड धोंड्यांना देते घाट

खल बत्ता पाटा वरवंटा

बनवायाला हवा देह धट्टाकट्टा

देहाहुनही  कणखर मन

घेतल त्यानं मनावर

फोडून टाकीन दारिद्र्याला

दिस सुखाचं दावीन लेकराला

केली एक दिस अन् रात

अभ्यास करुन झाले पास

गेले कराया नोकरी सरकारी

म्हटल संपवेन इथली गुंडगिरी

पाहुन  कारभार इथला सारा

वाटे व्यवस्थेहुन  पाषाण बरा

फोडुन  दगड केल्या जिनसा

विकुन मिळे घामाचा पैसा

इथल्या राबण्यात नाही घाम

उठता लाचारी बसता सलाम

देवा कशाला दिली परीक्षा

चांगल्या कामाला मिळे रे शिक्षा

चोर फिरती मोकळे मस्त

आम्ही बंदोबस्तात अखंड व्यस्त

राहायचे इथे टिकुन तर आवर रडं

मारुन मनाला बन दगड

सौ.शुभांगी राव

Thursday, May 21, 2020

मरणाने केली सुटका ....

सकाळी आठ वाजता नवऱ्याचा फोन वाजला. कमलताईंचा मिस्ड कॉल. सकाळी काय काम असेल असे वाटून रमेशनी लगेच फोन लावला.फोन त्यांच्या जावयाने केला होता.त्याने सांगितले काल रात्री कमलताईंना हार्ट ऍटॅक आला ,त्यांना हॉस्पीटल मध्ये नेले पण त्या वारल्या. सकाळी साडेनऊ पर्यंत घरी आणतील.
दहा बारा दिवसांपूर्वीच त्यांचा फोन आला होता ,सगळ्यांची चौकशी करत होत्या,आपल्या रात्रीच्या ड्यूटीमुळे समक्ष येऊन गाठ घेता येत नसल्याची खंत व्यक्त करत होत्या. त्यावेळी मी त्यांना मीच येऊन जाते असे तोंड भरुन अश्वासन दिले पण दिवसभराच्या नोकरीतुन घरी गेल्यावर जायचा आळस केला अन अचानक आज हि बातमी.

कमलताई, माझ्या आईला शेवटच्या आजारात दिवसभर सोबत करायला येत होत्या. आल्या दिवशी बोलताना मला जरा त्या फटकळ वाटल्या."पेशंटच्या खोली बहेर मी येणार नाही, पेशंट सोडून मी इतर कुठलेही काम करणार नाही,एकदा काम हातात घेतले कि पेशंट जाईपर्यंत मी काम सोडत नाही" अशा अटी त्यांनी घातल्या.माझा अगदीच नाईलाज होता आधीची बाई अचानक काम सोडून गेली होती आणि मला बाईची जरुर होतीच.त्यांच्या सगळ्या गोष्टींना मी हो म्हणाले आणि कामाचे तास कमी असल्याने नेहमी इतके पैसे न घेण्याचे त्यांनी मान्य केले आणि त्या दुसऱ्या दिवसापासून येऊ लागल्या.

सावळा रंग, उंच आणि सडपातळ बांधा कपाळावर मोठे कुंकू साधी पण स्वच्छ साडी. केसाचा घट्ट अंबाडा अशा वेशात कमलताई येऊ लागल्या. आईची तब्येत तेंव्हा बरीच बरी होती.तिला पार्किसन्स अर्थात कंपवात होता. पण त्यावेळी अधुन मधुन डावा हात हालू लागे, हाताबरोबर बाकीचे अंग हालू लागले कि तिला झोपुन रहावे लागे. एरवी ती कमलताईंशी गप्पा मारत बसे. तिचास्वभाव गोष्टीवेल्हाळ , जवळ नाना तऱ्हेच्या अनुभवांचं गाठोडं आणि बरोबर अगदी नवा श्रोता मग काय तिच्या गप्पांना बहर येई. दुपारी दोघी मिळून जेवत. आपल्यातली भाजी,आमटी तर आई त्यांना देईच पण त्यांनी आपली भाजी तिला देवू केली तर ती पण आई आनंदाने घेई. एकंदर दोघींचे छान जमायचे.आईला स्वस्थ बसून राहायला कधीच आवडले नाही, त्यामुळे ती कपड्यांच्या घड्या कर, भाजी निवडून दे अशी छोटी मोठी कामे करत असे. कमलताई पण तिच्याबरोबर भाजी निवडू लागत. कपबशा विसळून ठेवत. एखाद दिवशी माझी कामवाली आली नाही तर जेवणानंतरची भांडी पण न सांगता घासून ठेवत. हळूहळू त्या आमच्यात मिसळू लागल्या आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय आम्हाला येऊ लागला. त्यांचा आवाज लहान होता, बोलणे कमी होते, उगाच चौकशा करायची वाईट खोड त्य़ांना नव्हती. सुरुवातीला मला त्या फटकळ वाटल्या याला कारण त्यांच्या आधीच्या कामांवर त्यांचा घेतला गेलेला गैरफायदा असावा. आमच्या घरी मात्र त्यांनी त्यांचे ब्युरेचे नियम लावले नाहीत. माझी धाकटी लेक दहावीत होती.एकदा तिला खूप ताप आला होता, म्हणून मी रजा घेतली होती तरीही  मला ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मिटींग असल्याने जावे लागले. मिटींग संपवून मी दुपारी घरी आले तर आई आणि कमलताई दोघी माझ्या लेकीच्या उशा पायथ्याशी बसल्या होत्या. तिचे पाय चेपून देत होत्या. 

माझी आई बोलकी आणि प्रेमळ होती ,माझ्या मुली देखील लाघवी स्वभावाच्या आहेत त्यामुळे कमलताईंशी आमचे सूर जुळले. त्या घरच्या कटकटी कधी बोलून दाखवत नसत. पण बोलण्यातुन त्यांच्या तीन मुलांपैकी एका मुलीला व मुलाला लहानपणी पोलिओ झाल्यामुळे दोघांच्या पायात थोडा दोष राहिला होता. त्यांनी आधीच्या आयुष्यातही अतोनात शारीरिक कष्ट केले होते. लहानपणी खेडेगावी शेतात,रस्त्यावर मजुरी केली होती. पुण्यात आल्यावर पापड लाटणे,घरकामे करणे अशी अनेक कामे करत आता बेडरीडन पेशंटच्या आयाचे काम त्यांनी पत्करले होते. माझ्याकडे त्या कुठल्याही ब्युरोकडून नआल्याने ब्युरोला द्यायचे पैसे वाचत शिवाय घर चालत येण्याच्या अंतरावर असल्याने वेळही वाचायचा त्यांचा. त्यांच्या घरात मोठा मुलगा,सून त्यांची दोन मुले, मुलगी जावई ,धाकटा मुलगा आणि कमलताई व त्यांचे पती एवढी माणसे होती. नवऱ्याला वृध्दापकाळाने शारीरिक कष्टाची कामे होत नव्हती. मोठ्या मुलाची कांदे बटाट्याची गाडी होती .दुसरा मुलगा पोलिओने अपंग असल्याने लहान मोठी कामे करायचा. मुलगी घरातले स्वयंपाकपाणी बघे. पण घरातल्या खर्चाचा बराच वाटा कमलताईंच्या कमाईतुनच चाले. त्या सगळे कसे भागवत असतील याचे मला फार नवल वाटे.पण त्यांनी कधीही परिस्थितीचे रडगाणे गायले नाही कि मला कधी पगारापूर्वी  पैसे मागितले नाहीत. फार स्वाभिमानी होत्या.एकदा खूप संकोचाने त्यांनी मला ,"ताई,तुमच्या कडे जास्तीचे ताक असेल तर द्याल का? " असे विचारले. आमच्याकडे भरपूर ताक असायचे रोज आईबरोबर मी त्यांना ही तुम्ही ताक घेत जा असे सांगायची पण त्या नाही घ्यायच्या. मी त्यांना ताक देवु लागले.मग कधी संध्याकाळी एखादी भाजी जास्त उरली असेल तर ,"न्याल का?" विचरले तर नेऊ लागल्या. मी त्यांना आईबरोबर डोसा,इडली खाय़ला दिले तर स्वतः न खाता नातवंडासाठी डब्यात ठेवत. मग मी त्यांना खायला लावुन त्यांच्या नातवंडांकरता देत असे.पण माझ्या या किरकोळ मदतीची जाण त्यांनी किती ठेवावी? त्यांना बरे नसले तरी त्या माझ्या ऑफिसला जायला अडचण नको म्हणून रीक्षा करुन यायच्या.कधी काही कामामुळे त्यांना यायला जमणार नसेल तर त्या त्यांच्या मुलीला कामाला पाठवत. ती देखील आई सारखीच मितभाषी होती.

आईची तब्येत हळूहळू बिघडू लागली तिला सतत झोपुनच रहावे लागे.कमलताईंनी कधी तिच्यावर चिडचिड केली नाही.शांतपणे तिला जेवु घालत.प्रेमाने अंघोळ घालत. तिचे हात हालुन हालुन दुखत ते चेपून देत. आईची खोली  स्वच्छ ठेवत. माझ्या भाचीचे लग्न ठरले.कार्यालयात आदल्या दिवशी जायचे तर आईकडे कोण बघणार ? याची मला काळजी होती.कमलताईंचे पती आजारी असून त्यांनी दोन दिवस रात्री पण माझ्या घरी रहायचे कबुल केले आणि मी निर्धास्तपणे लग्नाला जाऊ शकले.
आईचे शेवटी खुप हाल झाले, तिला ऊठवुन बसवले तरी तिचे बी.पी. लो व्हायचे , तिला झोपवुनच ठेवावे लागे पण अंथरुणाला खिळूनही तिला बेडसोअर्स झाले नाहीत कारण मी व कमलताई रोज तिचे स्पजिंग करुन तिला पावडर लावायचो, तिची कुसही बदलावी लागे सगळे त्यांनी विनातक्रार केले.
                 १६ जून नंतर तिचे बोलणेही कमी झाले,काही खायला घतले तरी ते पोटात टिकत नव्हते. शेवटी कोमट पाण्यात भरपूर साखरेचे लिंबु सरबत देत होतो. ती कॉटवरुन एकदोनदा खाली पडता पडता वाचली .तिला जमीनीवरच झोपवुअसे कमलताईंनी सुचवले.  खाली झोपवल्याने बेडपॅन देणे ,काढणे करणाऱ्या माणसाला जिकिरीचे होत होते पण कमलताईंनी त्याबद्दलही तक्रार केली नाही. १८ तारखेला आईला खूप कफ झाला.तोंडातला कफ थुंकायची पण तिच्यात ताकद नव्हती.सकाळी तिच्या तोंडात कपडा घालून मी तो कफ साफ केला.नंतर ती झोपलेली होती ,आधीचे आठ-दहा दिवस , तिची तब्येत जास्त बिघडल्याने मी घरी होते. त्या दिवशी सोमवार होता, कमलताई रविवारी मला म्हणाल्या,"ताई,तुम्ही किती दिवस घरी राहणार? उद्यापासून जायला लागा कामवर,काही कमी जास्त झाले तर धाकटी ताई फोन करुन  तुम्हाला बोलवुन घेईल,उगीच कशाला कामवर खाडे ?"म्हणून मग मी ऑफिसला जायच्या तयारीत होते.कमलताई आल्या, त्या आईजवळ गेल्या त्यांना काय जाणवले कोण जाणे पण त्या म्हणाल्या,"ताई,आजींचा प्राण गेलाय वाटतं तुम्ही डॉक्टरांना बोलवून खात्री करा"
मी ताबडतोब माझ्या मैत्रीणीला फोन केला .ती लगेचच आली आणि आई गेल्याचे तिने सांगितले.

आई गेल्यानंतर वास्तविक कमलताईंची ड्यूटी संपली होती.पण त्या आमच्या सोबत दहा दिवस होत्या. आईचा त्यांना ही लळा लगला होता.नंतर त्यांना दुसरे काम बघणे क्रमप्राप्त होते.पण त्यानंतरही त्या आमच्या संपर्कात राहिल्या. जमेल तशा येत होत्या, फोनवर चौकशी करायच्या. आमच्या घरी आल्या तरी कधी रिकाम्या हाताने आल्या नाहीत मुलींसाठी काहितरी खाऊ आणायच्या. आईला जाऊन सात वर्षे झाली तरी आमच्याशी त्यांचे संबंध टिकून राहिले. त्यांनी अनेक ठिकाणी कामे केली पण सगळीकडेच त्यांचे असे संबंध नव्हते. त्या मला म्हणत,"ताई ,तुम्ही माणुसकीने वागता म्हणून तुमच्याकडे यावसं वाटतं. " मला त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटायचा कारण त्यांच्या जिवावर आईला सोडून मी ऑफिसला जायची. त्याबद्दल मी त्यांना पैसे देत असले तरी अशा कामाची किंमत पैशात होत नसते याची जाण मला होती ते माझ्यावरील आईवडीलांचे संस्कार.
मी त्यांना दिवाळीत फराळाचे देत होते, पैसे द्यायची,दिवाळीला त्यांना मी साडी द्यायची कारण त्यांच्या मोठ्या प्रपंचात त्यांना नवीन साडी घेणे होत नसे, ते मला दिसायचे. त्यांच्या घरी गेले कि त्यांना इतका आनंद व्हायचा, त्यांच्या घरातले सगळेच आमच्या भोवती जमायचे. माझ्या लेकीचे लग्न ठरल्याचे त्यांना कळवले तेंव्हा त्या खूप खुश झाल्या.फोनवर फोन करुन मला बोलवत होत्या.मी व माझे पती त्यांच्याकडे आमंत्रणाला गेलॊ तर मला सुंदर महागाईची साडी,माझ्या मिस्टरांना शर्टपॅंटचे कापड,टॉवेल-टोपी असा यथासांग आहेर त्यांनी दिला,मला खरचं खूप भरुन आले. माणसाची दानतच त्याची श्रीमंती ठरवते. कमलताई किती श्रीमंत होत्या. मी जे मला सहज शक्य होते तेवढेच त्यांना देत होते पण त्यांनी मात्र स्वतःच्या कमाईतला केवढा मोठा भाग मला आहेर म्हणून दिला ! माझ्याबरोबर कासारणीचे दुकान दाखवायला आल्या आणि तिला चांगल्या बांगड्या दे असे बजावले त्यांनी.

त्यांच्या अपंग मुलाला आम्ही काम मिळवुन दिले, माझ्या घरातील कपडे,वस्तू, नारळाच्या करवंट्या अशा त्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तू आम्ही त्यांना देत असू. पण या लहान सहान मदतीची त्यांनी सदैव जाणीव ठेवली आणि अधुन मधुन फोन करुन आमची चौकशी करत राहिल्या. आजारी नवरा, आडाणी मुले,अपंग मुलगी यामुळे त्यांच्य़ा आयुष्यातला उन्हाळा संपलाच नाही. दिवसभर घरात नवऱ्याची सेवा व इतर कामे करत रात्री आजारी पेशंट कडे जात त्या झिजत होत्या. त्यांच्या स्वतःच्या तब्येतीच्या तक्रारींकडे लक्ष द्यायलाही त्यांना जमले नाही. अखेर शरीराने साथ सोडली आणि घरच्यांना त्रास नको म्हणून जीवही चटकन गेला त्यांचा.

         सुरेश भटांच्या गजलेतील दोन ओळी त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच मला आठवल्या

         इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
          मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

Friday, March 6, 2020

पराधिन आहे जगती

       शनिवारची दुपार ,सुट्टी घेतल्यामुळे मी घरीच होते,घरातली बरीच जास्तीची कामे करुन आडवी झाले होते. चार वाजून गेले असावेत. तेवढ्यात फोन वाजला.मोठ्या बहिणीचा फोन होता
"अगं आत्ता अंजूचा फोन आला होता, आपला मामा आत्ता गेला. मेडीपॉईंट हॉस्पीटल मधे चार दिवस होता ,तिकडेच गेला आणि आता तेथूनच औंधच्या स्मशानभूमीत नेणार आहेत हेच आणि एवढेच सांगून तिने फोन ठेवला. आता आपण काय करायच ?"
मामा गेला हि बातमी अकस्मिक होती त्यामुळे मलाही क्षणभर काही सुचेना.
"तू माझ्याघरी ये मग ठरवू काय करायचं ते "एवढं बोलून मी फोन ठेवला. आई गेल्यानंतर मामाशी संबंध पूर्णच संपले होते .त्याचे वय  ८३ होते त्यामुळे कधी ना कधी हे घडणारच होते मात्र त्याची निरोगी तब्येत बघता हि बातमी अकस्मिकच होती.  बहिण घरी आल्यावर काय करायचे ते ठरवलेच नव्हते. मला लक्ख जाणवले कि मामाकडील कोणाचेच फोन नंबर माझ्या जवळ नाहीत कि त्यांच्यापैकी कोणाचाच पत्ता मला माहित नाही.बरीच फोनाफोनी केली तरी कुणाचाच नंबर मिळाला नाही.बहीण आणि मेहुणे येऊन बसले होते.शेवटी मेडीपॉईंट हॉस्पीटलचा नंबर शोधुन तिथे विचारले तर अजून बॉडी हलवली नव्हती. मग काहीही विचार न करता आम्हाला घेवुन माझ्या नवऱ्याने गाडी हॉस्पीटलकडे दामटली. शनिवारची संध्याकाळ रस्त्यावर वाहने ओसंडुन वाहत होती त्यातून वाट काढीत वीस,पंचवीस मिनिटात आम्ही हॉस्पीटलमध्ये पोचलो. हॉस्पीटलच्या दारात ऍम्ब्युलन्स उभीच होती. स्ट्रेचरवरुन मामाला आणत होते .तेथेच आम्ही त्याचे दर्शन घेतले आणि पाचच मिनिटात मामाची मुले आमच्याशी एक शब्दही न बोलता ऍम्ब्युलन्स मध्ये बसुन निघूनही गेली. मामी मागून आली आम्हाला बघून तिला शोक अनावर झाला.ताईच्या गळ्यात पडून ती रडू लागली. ताईने तिला जवळ घेतले. मामीच्या नाती तिला घरी चल म्हणून घाई करत होत्या.
मामी आम्हाला म्हणाली," तुम्ही काय करता?" आम्हाला करण्यासारखे काय होते? आम्ही आमच्या घरीच जाणेच योग्य होते.मामीच्या मुलांना आमच्याशी बोलायचे नव्हते.मामा नसलेल्या त्यांच्या घरात आम्ही कशासाठी जायचे होते?   मामीचा निरोप घेऊन जड मनाने आम्ही घरी गेलो.
भरपूर मोठ्या घरात ,माणसांमध्ये जन्माला आलेल्या चार बहिणी,एक भाऊ स्वतःला एक मुलगा,एक मुलगी,सून,जावई,नातवंडे सगळे असलेल्या आमच्या मामाला हॉस्पीटलमधुन  परस्पर स्मशानात चार लोकांनी नेवुन भडाग्नी दिला ! त्याच्या स्मरणासाठी एक पणती देखील लागली नसेल ! त्याच्या मृत्यूची बातमी आम्हाला केवळ उपचार म्हणून सांगण्यात आली होती.आम्ही येऊ अशी मामाच्या मुलीची अपेक्षा नव्हती पण आमची,आमचीच नव्हे तर त्या गेल्या जीवाची कदाचित आम्ही त्याच अंत्यदर्शन घ्याव अशी इच्छा असावी आणि इच्छा तिथे मार्ग म्हणून आम्ही तेथे पोचलो.

मानव जन्म हा दुर्लभ असे संत सांगतात. अशा दुर्लभ जन्मात चार लोक जोडणे, नातलगांशी सौहार्दाचे संबंध ठेवणे हे काही मामाच्या उच्चशिक्षित मुलांनी केले नाही. मामाचा स्वभाव अगदीच गरीब. त्याची आई तो सहा महिन्याचा असताना गेली एकत्र कुटुंबात त्याची आबाळ झाली नसली तरी लाडही झाले नाहीत. फार लहानपणापासूनच तो स्वावलंबी झाला .मॅट्रीक होईपर्य़ंत त्यांची परिस्थिती फारच खालावली होती.त्याच्या आजोळी (मामांच्या कडे) संकोचाने चार वर्षे काढून त्याने पदवी पदरात पाडून घेतली आणि नंतर नोकरीसाठी वणवण सुरु झाली.मिळेल तेथे त्याने नोकऱ्या केल्या. वडीलांची नोकरी कधीच संपली होती, शेतातुन फारसे उत्पन्न मिळत नव्हते. तीन बहिणी  आणि एका भावाचे शिक्षण  सगळेच व्हायचे होते. दोन बहिणींची लग्ने खटपटी करुन त्याने जमवली ,लग्नाची कर्जेही फेडली. त्याचे स्वतःचे लग्न व्हायला वयाची तिशी उलटली. पदवीधर बायको मिळाली .मामा संसारात जास्तित जास्त मदत करत असे.नोकरी तर तो करत होताच पण पुरुषांनी घरकामाला हात न लावण्याच्या काळात मामा घरात मामीला  सर्वतोपरी मदत करत असे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली .खऱ्या अर्थाने चौकोनी कुटुंब होते.  बायकोच्या साथीने सुखाचे दिवस सुरु होतील असे वाटले होते , पण.... या माणसाला नुसते दारिद्र्यच नाही तर इतर किती प्रकारे त्रास होऊ शकतो याची जाणीव व्हावी अशीच जणू नियतीची इच्छा होती. मामीचा स्वभाव फारच चमत्कारिक होता.कदाचित कुठला मानसिक आजार असेल तिला .त्यावेळी कळून आला नाही आणि त्यावेळी त्याबद्दल अनभिज्ञताही होती.सतत रडका चेहरा,आणि घरात नवऱ्याखेरीज कोणीही आलं कि कपाळाल्या आठ्या . बारीक सारिक कारणांवरुन नवऱ्याशी भांडणे,त्याला घर सोडून जायच्या,जीव द्यायच्या धमक्या यामुळे मामा जेरीला आला. मामाची  फिरतीची नोकरी आणि दमुन भागून घरी जावे तर रुसलेली ,रागावलेली आणि नवीन आजाराचे घुंगट घेतलेली बायको ! सल्ला देणारे कोणी नाही.कुणाला घरी बोलवायची चोरी त्यामुळे सहाजिकच त्याने दुसऱ्याकडे जाणे कमी केले.मामाच्या बहिणी सुस्थितीत अजिबात नव्हत्या पण आहे त्या परिस्थितीत आनंदाने सासरी नांदत होत्या.सासर-माहेरच्या लोकांच्या अडचणींना मदत करणे ,घरी आलेल्यांचे स्वागत करुन आपल्यातले आहे ते त्यांना देण्याचा तो काळ होता.सगळीकडे थोडी बहुत अशीच परिस्थिती असे. मामाचा मुळ स्वभाव आनंदी,हौशी,रसिक,समाधानी होता. त्याच्या प्रत्येक घरातल्या अंगणात वेगवेगळी फुलझाडे तो लावत असे.गुलाबांना डोळे लावणे तो कुठे शिकला होता माहित नाही पण एका फांदीवर लाल,तर दुसरीवर पिवळे गुलाब फुलवण्याच कसब त्याच्या हातात होतं. आमच्या घरी आला तरी त्याच्या एक दोन दिवसाच्या धावत्या भेटीतही तो बागेत कलमे कर्, अंगण झाड , झाडांना पाणी घाल असे उद्योग करी. या सगळ्या आनंदी,हौशी स्वभावाला मामीच्या आक्रस्ताळेपणाचे ग्रहणच लागले.

कामाकरता पुण्यात आला कि तो आमच्या घरी येत असे.आई त्याची थोरली बहीण. बहीणीजवळ तो मन मोकळे करी ,क्वचित लहान मुलासारखा रडतही असे. माझी आई खूपच करारी आणि धीराची होती.भावाच्या दुःखाने ती हळवी व्हायची पण ती त्याची तिच्या परीने समजूत घाली.बरेचदा तिने त्याला बायकोचा एवढा त्रास सोसण्यापेक्षा वेगळा हो असा सल्लाही दिला असेल.पण मामामध्ये हिम्मत नव्हती आणि त्याला स्वतःला आईची माया न मिळाल्याने मुलांवर ती वेळ येऊ नये असे त्याला वाटत असेल. त्याचा भित्रा स्वभाव  मामीने जोखला होता. आपल्या शेतातला हिस्सा म्हणजे धान्यं, तेल ,डाळी वगैरे मिळावा म्हणून मामी मामाशी भांडायची.त्याने बहिणींच्या लग्नासाठी खर्च केला त्यामुळे तिची मागणी गैर नव्हती शिवाय शेतावर त्याचाही हक्क होताच .मात्र शेतातले काही हवे असेल तर इथे येऊन कष्ट करावे असा त्याच्या गावातल्या भावाचा आणि आई वडीलांचा युक्तिवाद असे.आई सावत्र असली कि वडील सावत्र होतात अशी आपल्याकडे सार्थ म्हण आहे. त्याच्या वडिलांचा स्वभाव मामासारखाच होता.यासगळ्यात मामाची आयुष्यभर ससेहोलपट झाली. मामाचे कामानिमित्त बाहेर राहणे हे त्याचे परिस्थितीपासून पलायनही असू शकेल.

त्याच्या कष्टाळू स्वभावामुळे आणि निर्व्यसनी प्रवृत्तीमुळे त्याने सांगलीला सुरेख बंगला बांधला होता .दोन्ही मुलांना भरपूर शिकवले.मोठा मुलगा इंजिनियर होऊन ,आय.आय.टी मद्रास मधुन एम.टेक झाला.मुलगी एम.एस्सी झाली. मात्र मुलांना वडीलांचा सहवास कमीच मिळाला.आईच्या संगतीत राहिल्याने,तिच्यातील गुण अवगुण सहवासाने ,रक्तातुन त्या मुलांमध्ये पुरेपूर उतरले. कमालीची आत्मकेंद्री प्रवृत्ती, समोरच्या व्यक्तीबद्दल मनात संशय, विनोदबुध्दीचा अभाव अशा स्वभावाच्या या मुलांना आम्ही होता होईल तो आमच्यात सामावुन घेण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्या धाकट्या बहिणीला वडीलांच्या जागी राज्य सरकारात नोकरी लागली आणि वर्षभरात तिची सांगलीला बदली झाली.नोकरी सोडणे तिला शक्यच नव्हते.त्यावेळी मामाने तिला आपल्याकडे ठेवुन घेतले होते. बहिण तेथे सहा महिने होती.मामाने त्यावेळी तिचे पैसेही घेतले नव्हते.पण तिचे सहा महिने काही सहज गेले नाहीत.मामीला घरात मदत करुन ,हसतखेळत राहायचा तिने प्रयत्न केला मात्र तिच्याच वयाचा आमचा मामेभाऊ सहा महिन्यात तिच्याशी सहा वाक्ये देखील बोलला नाही. मामीचे मूड सांभाळत तिने ते दिवस कसेबसे घालवले. पुढे काही वर्षांनंतर मामाच्या याच मुलाला पुण्याला नोकरी मिळाली तेंव्हा मात्र तो कोणतीही पूर्वकल्पना न देता खुशाल आईकडे येवुन राहीला.आईने त्याचे मायेने स्वागत केले.वर्षभर त्याच्याकडून एकही पैसा न घेता आईने तिच्या मुलीला भावाने ठेवुन घेतल्याची फेड केली वर भाच्याचे लाड केले ते वेगळेच. तो पुढेही दोन वर्षे आईकडे राहीला पण आता तो पैसे देत असल्याने पेंईंग गेस्ट सारखा राहीला यात नवल नव्हते.त्याने औंधला फ्लॅट घेतल्यावर आमच्या आईकडे पाऊल टाकले नाही.आई बिचारी त्याची आठवण काढत बसे.तिच्याकडे फोनही नव्हता त्यामुळे संपर्कच राहिला नाही. मामच्या मुलीचे लग्न  आईने ओळखीतुन  जमवले.आमच्या घरीच साखरपुडा,खरेदी सगळे झाले.लग्न पुण्यात झाल्यामुळे सगळी धावपळ,कमीजास्त शारीरिक,मानसिक आणि आर्थिक झिज आईने, आम्ही बहिणींनी  सोसली.त्यात आईला भाचीचे भारी  कौतुक  होतेच. या भाचीनेसुध्दा आत्याकडे पाठच फिरवली.या सगळ्याचा आईला त्रास होई.आम्ही सुध्दा आईला त्यावरुन बरेच बोलायचो, नावे ठेवायचो .

मामाला मात्र याची जाणीव होती . त्या बहीण भावांमध्ये अतिशय प्रेम होते. मामा जमेल तेंव्हा आईकडे येवुन जात असे. मामीच्या हट्टासाठी मामाने सांगलीचे घर विकले आणि ते दोघे मुलाकडे पुण्यात येवुन राहीले. मामाची सून नोकरी करत होती आणि नातवाला सांभाळण्याची जबाबदारी मामा-मामींवर होती. पुण्यात असूनही त्यांचे आमचे संबंध संपलेच होते. दरम्यान आईची दुखणी सुरु झाली होती.तिला आता घरी एकटे ठेवणे शक्य नसल्यामुळे ती आम्हा बहिणींकडे राहायला आली होती.आई जिच्याघरी असे तिच्याकडे मामा येत राहिला.शेवटची तीन-साडेतीन वर्षे आई माझ्याघरी होती.त्यामुळे आईला भेटण्याकरीता मामा माझ्याघरी येऊ लागला. पहिल्यांदा तो मामी आणि मुलीला घेवुन आला,नंतर मात्र तो एकटाच येत होता.तो सहसा मी ऑफिसमध्ये गेल्यावरच येत असे.पण क्वचित मला उशीर झाला अथवा मी रजेवर असले तर मला भेटत असे. चहा सुध्दा नको म्हणायचा. मी घरात असेन तर त्याला घरात असलेला खाऊ ,चहा घेतल्याशिवाय पाठवत नव्हते. त्याला मात्र काही खायला अतिशय संकोच वाटायचा. आपण यांना घरी बोलावू शकत नाही,बहिणीसाठी काही करु शकत नाही याची अपराधी जाणीव त्याच्या डोळ्यात दिसे. आईचे शेवटी फार हाल झाले.कंपवाताने तिचे अंग सतत हालत राही तिला अन्न जात नसे.नंतर नंतर  दिसेनासे झाले,कानाने कमी ऐकू येई.तिच्याशी संवाद करणे अवघड झाले होते.शेवटी सुटका झाली तिची. तिच्या दहाव्या,तेराव्याला मामा मामी आले .नंतरची पाच वर्षे मात्र त्यांचे आमचे संबंध संपलेच. मामा सोडून कोणालाच आम्ही नको होतो आणि मामालाही त्यांच्याशी विरोध पत्करुन आमच्याशी संबंध ठेवणे त्रासदायक होत असणार.शिवाय त्याचे वयही झालेलेच होते.सुदैवाने त्याची प्रकृती चांगली होती.आमचे आजोबा ९५ वर्षे निरोगी आयुष्य जगले.मामा त्या बाबतीतही वडीलांवर गेला असावा.त्याला मधुमेह,रक्तदाब काहीच नव्हते.  शांत व गरीब स्वभाव,भरपूर व्यायाम, मिताहार आणि सतत पडेल ते काम करणे  हे त्याच्या चांगल्या प्रकॄतीचे रहस्य असावे.

आता उरल्यात फक्त आठवणी आणि जरतारी प्रश्ण. मामाच्या मुलीने तो आजारी असतानाच कळवले असते तर त्याला भेटायला गेलो असतो,त्याच्याशी दोन शब्द बोललो असतो,एखादा पदार्थ खायला नेला असता.  आमच्या मनात मामाबद्दल अजिबात राग नव्हता. त्याच्या भित्र्या ,गरीब स्वभावाची त्याने पुरेपूर किंमत मोजली होती, आणि आमची ही परतीच्या  प्रवासाला सुरुवात झालेली असताना कसल्या चुका काढायच्या आणि दोष दाखवायचे? त्याने आमचे लहानपण आनंदी केले होते.त्याच्या परिस्थितीप्रमाणे आमचे लाड केलेले होते. आमच्या मनात असून त्याच्या विचित्र कुटुंबीयांमुळे त्याचे उतराई होणे जमलेच नाही. मामाच्या मुलांनी त्याला तिलांजली, बारावा,तेरावा श्राध्द वगैरे केले कि नाही याची काहीच कल्पना नाही.ते न केलेलेच बरे.श्रध्देने केले जाते ते श्राध्द . जिवंत असताना कुठलेच सुख द्यायचे नाही आणि गेल्यावर पैसे खर्चुन जेवणावळी घालायच्या हे अयोग्यच आहे. शिवाय जेवणावळी घालायला जोडलेली माणसे हवीत ना?

मामाला शाब्दिक श्रध्दांजली देवुन माझ्या मनाचे मी समाधान करते